Wednesday, 5 October 2016

एवढे सोबत राहिलात तरी पुरेसे


एवढे सोबत राहिलात तरी पुरेसे
--
आमदार इम्तियाज जलील यांनी आठवडाभरापूर्वी कटकटगेटला रस्ता, पुलाच्या कामासाठी पालकमंत्री रामदास कदम यांना निमंत्रण देण्याचा विषय काढला. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांसह तेथील नागरिकांनी हलकल्लोळ केला. कदमांसोबत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे  यांनाही बोलावले पाहिजे, असे इम्तियाज म्हणताच विरोध टिपेला पोहोचला.  आमच्या इलाक्यात त्यांचे काय काम? त्यांना कशासाठी बोलावता. ज्यांच्याशी आपले टोकाचे वैर आहे. ज्यांच्याविरोधात आपण निवडणूक लढवली. त्यांच्यावर टीकेचे वार केले. सध्याही करत आहोत आणि यापुढेही तेच करणार आहोत. त्यांना बोलावून काय साध्य होणार. त्याने फायदा तर काहीच होणार नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीला आपल्या विरोधात एक चांगला मुद्दा मिळेल. कट्टरपंथी मुस्लिम दुखावतील. आपल्यापासून दूर जातील. तुम्ही तर आपल्या व्होट बँकेलाच धक्का देताय, असे त्यांचे म्हणणे होते. कटकटगेट हा अत्यंत संवेदनशील भाग. येथे मुस्लिमांचे प्रचंड प्राबल्य आहे. इथे कधीच शिवसेनेचा प्रवेश झाला नव्हता. तो तुम्ही का करून देता, असाही सवाल होता. मात्र, इम्तियाज स्वत:च्या मुद्यावर ठाम राहिले. जे काही राजकारण करायचे ते निवडणुकीत केलेच पाहिजे. पण विकास कामात जात, धर्म, पंथ, पक्ष येताच कामा नये. कटकटगेटच्या रस्ता, पुलाचा विकास गेल्या २० वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांची दैना होत आहे. त्यात प्रामुख्याने मुस्लिमांचाच समावेश आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री कदमांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला असेल. तर त्यांच्याच हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. शिवाय कायम मुस्लिमविरोधी भूमिका घेऊनच पाय रोवलेल्या खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाहुणे म्हणून बोलावून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. एमआयएम म्हणजे हिंदुंच्या मुळावर उठलेला पक्ष. एमआयएमला दंगली घडवण्यात स्वारस्य आहे. कट्टरपंथी मुस्लिमांना विकास कामांशी काही देणे घेणे नाही, हा इतर समाजांमध्ये रुजलेला समज दूर करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे, असे त्यांनी पटवून दिले. आणि एकेकाळी दंगलप्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकटगेट भागात कपाळावर भगवे टिळे, गळ्यात भगवे रुमाल घातलेल्या सेना नेते, पदाधिकाऱ्यांचे भलेमोठे बॅनर झळकले. कदमांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली. औरंगाबादच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग म्हणून त्याची नोंद झाली आहे. कदम यांच्या नेतृत्वगुणाचेही करावे तेवढे कौतुक कमीच आहे. शिवसेना मुस्लिमविरोधक नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण करत असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. यातून अनेक प्रकारचे संदेश दिले गेले. विशेषत: राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. वर्षानुवर्षे काँग्रेसची व्होट बँक म्हणून राहिलेल्या मुस्लिम समाजाने त्यावर साधकबाधक चर्चा केली. विशेषत: तरुणांमध्ये इम्तियाज जलील यांच्या भूमिकेचे नाईलाज म्हणून स्वागत करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. येथे हिंदु-मुस्लिमांमधून आडवा विस्तूही जात नाही. एमआयएमच्या आगमनामुळे तणाव आणखीनच वाढणार आहे, हा समज काहीअंशी का होईना दूर होईल, असे वातावरण कटकटगेटच्या कार्यक्रमात दिसून आले. माजी महापौर रशीद मामू नेहमी असे म्हणतात की, जेव्हा जेव्हा हिंदु-मुस्लिम एक येण्याच्या प्रयत्नात असतात. काही नेते मंडळी त्यांना एकत्र आणण्यासाठी धडपडत असतात. तेव्हा एखादी क्षुल्लक घटना अशी काही घडते की तिचा भडका उडून पुन्हा दोन्ही समाज एकमेकांपासून दूर जातात. आणि त्यांच्या दुराव्यातून तयार होणाऱ्या आगीवर अनेक मंडळी स्वत:ची पोळी भाजून घेत असतात. आताही कटकटगेटच्या सोहळ्यानंतर ही मंडळी कार्यरत झालीच असणार. त्यांना वेळीच पायबंद घालण्याची जबाबदारी आमदार इम्तियाज यांनाच घ्यावी लागणार आहे. कारण त्यांनी औरंगाबादेतील मुस्लिम समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पावले टाकणे सुरू केले आहे. एमआयएमचा मूळ पाया कट्टरपंथी मुस्लिमांचा असला तरी बदलत्या काळानुसार विकास कामे ही बहुसंख्य मुस्लिमांची मानसिकता आहे. धर्माचे टोकाचे पालन करत असताना आपल्या भागात चांगले रस्ते, दर्जेदार दवाखाने, उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा असाव्यात. कचरा नियमितपणे उचलला जावा, असे त्यांनाही वाटत असते. त्याकडेही एमआयएमला अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आणि आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक असलेल्यांचीही मदत घेण्यात, त्यांचा पाहुणचार करण्यात काहीच गैर नाही. महापालिकेचा ताबा, राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेकडून कामे करून घेऊयात. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर तुटून पडूयात, असा विचार ते रुजवत आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि दुसरीकडे एमआयएम असा दुहेरी समतोल त्यांना साधावा लागणार आहे. आणि हे करताना मुस्लिमांच्या मतावर डोळा ठेवून बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीलाही घुसखोरीपासून रोखायचे आहे. राजकारण, समाजकारणात अलिकडील काळात प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या आधारावरच केली जात अाहे. दोन समाज एकमेकांजवळ येताच कामा नये, यासाठी भिंती उभारल्या जात असताना या भिंतींचा पाया खणण्याचे काम इम्तियाज यांनी सुरू केले आहे. त्याला मुस्लिम समाजातून कितपत प्रतिसाद मिळतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

Wednesday, 28 September 2016

नसीरुद्दीन नावाच्या उत्तुंग नटाचा प्रामाणिक प्रवास


--

लौकिक जगात यशस्वी झालेल्यांचा जीवन प्रवास पुस्तक रुपात वाचण्यास मिळावा, अशी अनेकांची इच्छा असते. कारण त्यांच्या प्रवासाचा मार्ग प्रेरणादायी असतो. त्यात जर ही यशस्वी झालेली व्यक्ती चित्रपट अभिनेता, अभिनेत्री असेल तर मग विचारायलाच नको. त्यांचे व्यक्तिगत जीवन जाणून घेणे लोकांसाठी मनोरंजकही असते. म्हणूनच बुलंद अभिनयाचे देणे लाभलेले नसीरुद्दीन शाह यांचे `मग एक दिवस` हे पुस्तक त्यांच्या अभिनयशैलीइतकेच आगळेवेगळे आहे, असे म्हणावे लागेल.

सुभाष घईंचा कर्मा चित्रपट दोन दशकांपूर्वी प्रचंड गाजला. त्यातील देशभक्तीपर गीते अजूनही १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हमखास वाजवली जातात. त्यातील दिलीपकुमार आणि डॉ. डँग म्हणजे अनुपम खेरची जुगलबंदी आजही अनेकांच्या स्मरणात आहेच. कर्मा आणखी एका कारणाने गाजला ते म्हणजे त्याकाळी समांतर चित्रपटांचा पडदा व्यापून टाकत विलक्षण अभिनयाची अनुभूती देणारा नसीरुद्दीन शाह व्यावसायिक पडद्यावर आला होता. रंगमंचावर काम करणाऱ्या अभिनेते, अभिनेत्रींना चित्रपटात वास्तववादी घटनांशी जवळिक साधणाऱ्या भूमिका करणे सोपे जाते. पण मसाला किंवा तद्दन व्यावसायिक चित्रपटांमध्ये वास्तवात जे घडूच शकत नाही, असे वास्तवात आणले जाते. त्यातील व्यक्तिरेखाही तशाच असतात. त्यामुळे नसीरुद्दीन फसणार. लोकांच्या पसंतीला उतरणार नाही, असे म्हटले जात होते. शिवाय त्याच्यासोबत व्यावसायिक चित्रपटांत नाव कमावलेली दिलीपकुमार, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूरसारखी प्रचंड लोकप्रिय मंडळी होती. मात्र, प्रत्यक्षात नसीरुद्दीनचा खैरू लोकांनी डोक्यावर घेतला. त्याच्या वाट्याला आलेले सर्व प्रसंग त्याने जिवंत केले. चित्रपटाच्या अखेरीस प्राण सोडताना लोकांच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद फक्त अमिताभ बच्चनमध्येच, असे मानले जात होते. (आणि ते खरेही आहे.) त्यात नसीरने स्वतःचे नावही नोंदवले आहे. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जखमी झालेले दिलीपकुमार आता वाचतील की नाही, याबाबत सांगू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर नसीरने जो काही हलकल्लोळ केला आहे, तो अंगावर रोमांच उभे करतो. त्याची अभिनयातील ताकद आणि व्यावसायिक पडद्यावरही छाप उमटवण्याची क्षमता दाखवून देतो. हिंदी चित्रपटसृष्टीत जे विलक्षण प्रतिभावान आणि उत्तुंग अभिनेते होऊन गेले आणि सध्या आहेत. त्यांच्या यादीत नसीरचा क्रमांक खूपच वरचा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. हिंदी चित्रपटात नटाला आवश्यक असणारा चेहरा, रुप नसतानाही त्याने केवळ अभिनय, पल्लेदार आवाजाच्या जोरावर हे स्थान प्राप्त केले आहे. अर्थात त्याची ही वाटचाल सुखाची नाहीच. एका उच्च मध्यमवर्गीय घरात जन्म घेऊनही त्याचा अभिनेता होण्याचा मार्ग खडतर राहिला. अनेक वळणे घेत, आयुष्यातील खड्डयांतून जात तो चालत राहिला. कोणत्याही क्षणी त्याने अभिनेता होण्याचे स्वप्न धूसर होऊ दिले नाही. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याने चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठीच खर्च केला. रंगभूमीवरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. त्यामुळे या उत्तुंग अभिनेत्याचा जीवन प्रवास म्हणजे प्रत्येक रंगकर्मीसाठी अभ्यासाचाच विषय आहे. खुद्द नसीरनेच त्याचा सारा प्रवास अतिशय प्रामाणिकपणे `मग एक दिवस` या पुस्तकात मांडला आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. आत्मकथन म्हणजे आपण आयुष्यभर केलेल्या कामगिरीचे पुनरावलोकन. आयुष्यभर घेतलेल्या निर्णयांचा किंचित मागे वळून पाहत घेतलेला धांडोळा. तो घेत असताना बहुतांश मंडळी त्यात इतरांवर आगपाखड करतात किंवा स्वतः केलेल्या घोडचुका सांगणे टाळतात. ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांचा आवर्जून उल्लेख करतात आणि ज्यांना आपल्यामुळे पश्चाताप झाला अशांबद्दल सांगणे टाळतात. नसीरने मात्, सारेकाही प्रामाणिकपणे सांगितले आहे. गांजाचे व्यसन, आई-वडिलांसोबतची बेदरकार, बेजबाबदार वागणूक, फॉकलंड रोडवर वेश्यांची संगत, मित्रांसोबतची भांडणे असे त्याने कोणताही आडपडदा न ठेवता सांगितले आहे.  आणि चुकांची कबूलीही दिली आहे. त्यामुळे अभिनेता होत असताना एक बाप, पती, मुलगा म्हणून तो कसा अयशस्वी होत गेला. आणि चुकांचे परिमार्जन करण्यासाठी त्याने खरेच काय केले, हेही वाचकांसमोर येते. सई परांजपे यांनी नसीरचे अंतरंग मराठीत आणताना त्यातील सत्व कायम राहिलच शिवाय त्यातील मराठीपण रुचेल, पचेल अशी काळजी घेतली आहे. त्यामुळे सर्वच प्रकरणे अतिशय वाचनीय, सखोल झाली आहेत. नसीरचे नट, अभिनेता म्हणून घडत जाणे कसे थरारक आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसे होते, याचे दर्शन सुरेखपणे घडत जाते. विशेषतः नसीरने चित्रपटात काम करण्यासाठी पहिल्यांदा मुंबापुरी काढल्यावर जे दिवस काढले त्याचे वर्णन नव्या पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे.

असे म्हणतात की नट तयार होत नाही. तो जन्मालाच यावा लागतो. नसीरच्या बाबतीत हे म्हणणे तंतोतंत खरे ठरते. त्याचे आत्मवृत्त वाचल्यावर तर ते अधिक ठळकपणे लक्षात येते. अगदी लहान वयातच त्याला आपण उत्तम नट होऊ शकतो, असे वाटू लागले आणि मग हे वाटणे प्रत्यक्षात आणण्यसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. मुंबईत अक्षरशः रस्त्यावर मुक्काम ठोकत मायानगरीतील ठोकरा खाल्ल्या. आता भारतीयच नव्हे तर परदेशातील रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात उंचीवर पोहोचल्यावरही त्याचा नट म्हणून स्वतःचा शोध जारी आहे. अनेक रंगकर्मी किरकोळ यश मिळताच थांबून जातात. किंवा त्याच भूमिकांच्या चौकटीत अडकून जातात. स्वतः करत असलेलेच काम सर्वश्रेष्ठ असे मानणारी मंडळी तर राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, कला प्रांतात ढीगभर आहेत. पण असे मानणे म्हणजे थांबणे होय आणि जो थांबला तो संपला, असा जगाचा नियम आहे. हेच नसीरने त्याच्या कथनात मनापासून मांडले आहे. ते तेवढ्याच मनापासून वाचले तर खरा आनंद मिळेल.

Tuesday, 20 September 2016

कदमांनी आता पालकमंत्री होण्यासोबत चालकमंत्रीही व्हावे



कुणी काहीही म्हटले. इतिहासाचे अगणित दाखले दिले. एकेकाळी इथे सोन्याचा धूर निघत होता, असे सांगितले. आणि काही वर्षांपूर्वी या शहरात देशातील सर्वोत्तम पाणी वितरण व्यवस्था होती, असे दाखवून दिले. तरीही औरंगाबाद म्हणजे मराठवाड्याची राजधानी असे केवळ कागदावरच आहे, अशी वस्तुस्थिती आहे. त्याची अनेक अनेक उदाहरणे दिली जाऊ शकतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे औरंगाबाद एका बकाल वसाहतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. चार वर्षांपूर्वी रुंदीकरण होऊनही रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. रुंद झालेला रस्ता पुन्हा फेरीवाले, पार्किंगने अडवला आहे. रस्त्यातील खड्डे हा तर औरंगाबादकरांच्या पाचवीला पुजलेला विषय आहे. २००५ मध्ये जाहीर झालेली समांतर जलवाहिनीची योजना अजूनही कार्यरत झालेली नाही. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. लाखो लोकांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. एवढे सगळे नसूनही घरांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा नसल्याने लोकांना खासगी रुग्णालयात जाऊन स्वत:चा खिसा कापून घेण्याशिवाय अन्य पर्याय नाही. ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक स्थळे अतिक्रमणांनी वेढली आहेत. आणि दुसरीकडे या शहराचा कारभार पाहणारी महापालिका भ्रष्टाचार, गैरकारभार आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या सुंदोपसुंदीत सापडली आहे. जात, धर्म आणि समाजाच्या सामाजिक समीकरणाचा फायदा घेत अनेकजण वारंवार निवडून येत आहेत. त्यांना विकासाचे अजिबात देणेघेणे नाही, असे म्हणता येणार नाही. पण त्यांची कार्यपद्धती आधी स्वत:चा मग वॉर्डाचा विकास अशीच आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात कमी अधिक फरकाने हेच सुरू असले तरी तेथे िवकासाचे, जनतेच्या हिताचे काम म्हटल्यावर सर्वजण पक्षीय मतभेद बाजूला ठेवतात. कोणत्याही पक्षाचा एक नेता जे सांगेल त्यानुसार कामांची दिशा ठरवली जाते. दुर्दैवाने औरंगाबादेत तसे घडताना दिसत नाही. किमान गेल्या २५ वर्षात त्याचा अनुभव आलेला नाही. तो आता स्मार्ट सिटी होण्याकडे निघालेल्या औरंगाबादला यावा, अशी लोकांची अपेक्षा आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी अतिशय गांभीर्य आणि आस्थेवाईकपणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला दिशा द्यावी, असा सूर व्यक्त होताना दिसतो. शिवसेनेच्या स्टाईलने काम करताना कदम यांनी अनेक घोषणा करून टाकल्या आहेत. त्या पुढील तीन वर्षांत पूर्णपणे मार्गी लागतील, यासाठी त्यांना शक्ती पणाला लावावी लागणार आहे. गेल्या आठवड्यात कदमांनी आढावा बैठक घेतली. त्यात ते मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याचे दिसून आले. हर्सूल गाळ प्रकरणात शहर अभियंता सखाराम पानझडे यांचे निलंबन योग्यच असल्याचे कदम सर्वांसमक्ष म्हणाले. त्यातून त्यांनी बकोरियांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांना स्पष्ट संदेश दिलाच. शिवाय खासदार चंद्रकांत खैरे यांनाही मीच जिल्ह्याचा नेता असल्याचे सांगून टाकले. शहरातील लोक खड्ड्यांमुळे भयंकर त्रासले आहेत. त्यातून त्यांची ठेकेदारांनी सुटका करावी. हे शहर तुमचेही आहे. त्यामुळे आठ दिवसांत खड्डे बुजवा, असे आदेश दिले. गेल्या चार-पाच वर्षात कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते खड्ड्यात का गेले याची पवईतील आयआयटीमार्फत चौकशी करा, असेही सांगितले. कटकटगेटलगत वळण रस्ता, पथदिवे खांबांच्या स्थलांतरासाठी निधीची घोषणा केली. शिवाय गेल्या आठवड्यात अचानक उभाळलेला शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे विरुद्ध आमदार संजय शिरसाट यांच्यातील वादही काही प्रमाणात निस्तरला. राजकारण आणि समाजकारणात केवळ घोषणा देऊन काहीही होत नाही. आणि विकास कामांची अशी स्थिती आहे की, ती दर्जेदारपणे पूर्ण झाली तरच लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. यासाठी कठोर पाठपुराव्याची गरज आहे. सर्वोच्च अधिकारपदावर असलेल्यांनी तो केला तरच अधिकारी मंडळी त्याला दाद देतात. आणि नगरसेवक, आमदार मंडळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कामांकडे वळतात. सद्यस्थितीत अशा पाठपुराव्याची क्षमता पालकमंत्र्यांमध्ये आहे. औरंगाबाद शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांना केवळ पालक होऊन चालणार नाही तर चालकही व्हावे लागणार आहे. त्यांनी ते केले तर औरंगाबादकर त्यांना निश्चितच दुवा देतील. आणि राजकारणात लोकांचा भक्कम पाठिंबाच महत्वाचा असतो. हे कदम यांनाही पक्के ठाऊक असणारच. नाही का?



Wednesday, 7 September 2016

उद्योगी पिढी घडण्यासाठी





प्रत्येक गोष्ट जात-पात आणि धर्माच्याच पारड्यात टाकून ती स्वतःला फायदेशीर अशीच तोलून घेण्याचा उद्योग महाराष्ट्रातील माणूस मोठ्या इमानेइतबारे, अगदी मनापासून करत आहे. मात्र, स्वतःसोबत इतरांनाही जगवणाऱया उद्योगाकडे तो ढुंकूनही बघत नाही. जी मोजकी मंडळी उद्योग, व्यवसाय उभा करत असतील. त्यांना नावे ठेवणे, त्यांच्यावर जाती-धर्माची लेबले चिटकवून टाकणे. त्यांना पूर्ण ताकदीने खाली खेचणे. चारही बाजूंनी घेरून त्याचा उद्योग संपुष्टात आणणे ही जणू काही आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे, असे मानणारे अनेकजण आहेत. त्यामुळेच की काय मराठी मुलुखात इतर प्रांतांच्या तुलनेत उद्योगाची परंपरा फारशी विकसित झाली नाही. स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे तर उद्योजक होणे म्हणजे पापच असे महाराष्ट्रात मानले गेले. शालेय स्तरावर उद्योजकांच्या यशोगाथा फुटकळ रुपात सांगितल्या गेल्या. महाविद्यालयात तर उद्योजकतेचा दुरान्वयाने संबंध नाही. इंजिनिअर कशासाठी व्हायचे तर कुठल्यातरी कंपनीत नोकरीसाठी, असा प्रवाह १९८०-९० च्या दशकात होता. आई-वडिलही मुलांना स्वतःचा उद्योग सुरू करून काय आम्हाला भिकारी करायचे का, असा सवाल करत त्याला नोकरीला जुंपून टाकत. अशावेळी साहित्यकार, लेखकांनीही उद्योजकतेची दुसरी बाजू मांडली नाही. उद्योग सुरू करूनही समाधान, आनंद मिळू शकते. चार जणांची पोटे चालवणे ही देखील मानवतेची सेवाच आहे, असा संदेश दिला नाही. उलट कारखानदार म्हणजे गरिबांचे रक्त शोषण करणारा. त्यांच्या जागा बळकावणारा. अत्याचार करणाराच असे चित्र कादंबऱ्या, कथा आणि नाटक-चित्रपटांमधून, प्रसारमाध्यमांतून रंगवले गेले. त्यात मुळीच तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. पण तमाम उद्योग जगाचा चेहरा काळा करण्यात आला, ते पूर्ण सत्य नव्हते. उद्योजक म्हणजे खलनायक असेच बहुतांश ठिकाणी चित्रीकरण झाले. तेव्हा ते सारे वास्तववादी मानले गेले. पण त्याने झालेले नुकसान अलिकडील काळात समोर येत आहे. इतर प्रांतातील मंडळींनी उद्योगधंद्यात पाय रोवले आहेत. सरकारी नोकरीच्या संधी कमी होत आहेत. तेव्हा कुठे मराठी मुला-मुलींनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. केवळ सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांच्या मागे धावाधाव न करता रोजगार देणारा बनावे, असे आवाहन सर्व पातळ्यांवर सुरू झाले आहे. उद्योग सुरू करण्यासाठी सरकार विविध योजना जाहीर करत आहे. त्याचा काही प्रमाणात फायदाही होताना दिसत आहे. उद्योग जगताशी जवळकीचे नाते असणारी काही लेखक मंडळी यशस्वी उद्योजकांच्या कहाण्या सांगत आहेत. या कहाण्या तरुणांना प्रेरणा देणाऱया, आकाशात झेप घेण्याची शक्ती देणाऱ्या आहेत. अशा लेखकांपैकी एक आहेत सुधीर सेवेकर, व्यंकटेश उपाध्ये. यातील सेवेकर म्हणजे औरंगाबादेतील चतुरस्त्र व्यक्तिमत्व. नाट्य,संगीत, चित्रपट, चित्रकला अशा विविध कलाप्रांतात त्यांचा वावर आहेच. शिवाय ते अनेक वर्षे उद्योग क्षेत्रातही कार्यरत राहिले. नाविन्यपूर्णतेचा वसा घेतलेल्या सेवेकरांकडे सोप्या पद्धतीने माहिती मांडण्याचे कौशल्य आहे. त्यांचे जगप्रसिद्ध कंपन्यांच्या यशोगाथा हे पुस्तक साकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.  यात ते कौशल्य ठळकपणे जाणवते. ३३६ पानांच्या या पुस्तकात त्यांनी जगप्रसिद्ध ३२ कंपन्यांचा (यात बजाजसह काही महत्वाच्या भारतीय कंपन्या नाहीत, हे थोडे खटकते.) धांडोळा घेतला आहे. गुगल, फेसबुक, इन्फोसिस यांच्याविषयी अलिकडील काळात खूप काही लिहून आले आहे. या कंपन्यांची उत्पादने, शक्तीस्थाने कोणती हे तरुण पिढीला माहिती असेल. पण एच.जे. हेंझ, बेन अँड जेरीज, फेडरल एक्सप्रेस, सिंगर, एव्हॉन आदी कंपन्यांमधील सामान्य मराठी माणसाला फारशी कल्पना नाही. प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करून गुगलवरून ही माहिती वाचू शकत नाही. त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे महत्वाचा ठेवा आहे. सेवेकर, उपाध्ये यांनी जगप्रसिद्ध कंपन्यांविषयी सांगताना त्यात पाल्हाळिकपणा येणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेतली आहे. उद्योजकीय प्रेरणा निर्माण करणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून पुस्तक लिहिले गेले असले तरी त्यात यांत्रिकता नाही. उलट काही कंपन्यांविषयी त्यांनी दिलेली माहिती उद्योग जगताशी फारसा संबंध नसणाऱ्यांच्या ज्ञानात भर पाडणारीच आहे. उदाहरणार्थ टोयोटा कंपनीचे संस्थापक टोयोडा कुटुंब असले तरी आरंभीच्या काही वर्षानंतर त्यांनी कंपनीचे मूळचे टोयोडा मोटर्स नाव बदलून टोयोटा केले. जपानी भाषेत टोयोडाचा अर्थ फुललेले हिरवेगात भातशेत असा होतो. म्हणजे त्याचा अर्थ शेतीशी निगडीत आहे, परंतु, धंदा तर मोटारगाड्यांचा आहे म्हणून टोयोडा नाव योग्य वाटत नाही, असे वाटल्याने १९३६ साली कंपनीने नाव सुचवा अशी स्पर्धा घेतली. यात आलेल्या २७ हजार नावातून टोयोटा नाव निवडण्यात आले. जपानी भाषेत टोयोटाचा अर्थ समृद्धी आणि सुदैव असा होतो. जो मोटारधंद्याला साजेसा ठरू शकतो. शिवाय जपानी लिपित टोयोटा हा शब्द लिहिण्यासाठी ब्रशचे आठ फटकारे मारावे लागतात. अशा आठ फटकाऱ्यातून तयार होणारे शब्द खूप भाग्य घेऊन येतात, अशी जपानी माणसाची श्रद्धा आहे. म्हणूनही टोयोटा शब्द निवडला गेला, असे सेवेकरांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे अनेक किस्से वाचण्यास मिळतात. बोईंग, फेडरल एक्स्प्रेसविषयी त्यांनी दिलेली माहितीही अशीच मनोरंजक  आणि ज्ञानवर्धक आहे. सर्वच प्रकरणात त्यांनी एक मुद्दा ठळकपणे मांडला आहे. तो म्हणजे सर्व उद्योगांच्या संस्थापकांनी धाडस केले. अपार कष्ट घेतले आहेत. आणि आज या कंपन्या कोट्यवधी लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार देत आहेत. त्यांची कुटुंबे चालवत आहेत. उद्योग म्हणजे घातच आणि तमाम उद्योजक म्हणजे रक्तपिपासू ही काही साहित्यिक, लेखक, चित्रपट आणि राजकीय पक्षांनी रंगवलेली प्रतिमा मुळीच खरी नाही. आज यशस्वी झालेल्या सर्व कंपन्यांनी अनेक संकटे झेलून यशाचे दार उघडले आहे, असेही सेवेकर, उपाध्ये आवर्जून नमूद करतात. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी तरुणांनी स्वतःचा उद्योग उभा केला तर ती खरी मानवतेची सेवा होईल. आणि इतरांना मारण्यापेक्षा त्यांना जगवण्यासाठी लढणे किती बहुमोल असते हेही कळेल. नाही का?

Monday, 25 July 2016

खट्याळपणातील मौज : संगीत संशयकल्लोळ



खट्याळपणातील मौज म्हणजे काय अन्् संसारात जोडीदारावर किती संशय घ्यावा. सुखाचा संसार कसा करावा, याची गुपिते सांगणाऱ्या संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा २० जुलै रोजी औरंगाबादेत प्रयोग होत आहे. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले आणि दमदार गायक राहूल देशपांडे यांच्या अभिनयाची धमाल असलेल्या या नाटकाविषयी

---

मराठी माणसाला अनेकविध प्रकारच्या शंका असतात. त्यातील रसिकमनाची शंका अगदीच मूलगामी आणि समाजाच्या हिताच्या असतात. उदाहरणार्थ मराठी भाषेचे काय होईल. इंग्रजीच्या लाटेत मराठी टिकेल का?  संगीत नाटकांचे वैभव परत येईल की नाही? त्यावरून राजकीय, सामाजिक क्षेत्रात बरीच भांडणे, वादविवाद होत असतात.  पण काही मंडळी या वादात पडत नाहीत. ती सृजनशीलतेचा, नाविन्याचा ध्यास घेऊन मैदानात उतरतात आणि स्वत:च्या शक्ती, प्रकृतीनुसार मराठीचे हित जपण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. मराठी  नाट्य संगीत ही एक अद््भुत देणगी असून ती रसिकांपर्यंत विविध रुपांमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे मानत असतात. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले हे त्यातील अग्रणी नाव आहे. अफलातून  टायमिंग, रंगमंचावरील सहज सुखावून टाकणारा वावर आणि शब्दांवरील हुकुमत या त्रिगुणी संगमामुळे ते लोकांच्या हृदयावर दीर्घकाळ राज्य करत आहेत. मात्र, आपण केवळ राज्य करण्यासाठी नाही तर परंपरा, संस्कृती जपण्यासाठीही काम केले पाहिजे, याची जाणिव त्यांना आहे. त्यांनी नुकत्याच रंगमंचावर आणलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातून त्यांची जाणिव ठळकपणे जाणवते.

 रात्रभर चालणारी संगीत नाटके पाहणे रसिकांना शक्य होणार नाही. अर्धा तासाचे नाट्यपद ऐकले जाणार नाही, हे लक्षात आल्यावर नव्या रुपात काय करता येईल, याचा विचार त्यांनी केला. त्यातील ताजेपणा, नाविन्य पाहता  प्रशांत दामले यांनी संगीत संशयकल्लोळचा नव्या स्टाईलमध्ये आणलेला प्रयोग खरेच कौतुकास्पद आहे.

गोविंद बल्लाळ देवल या प्रतिभावान नाटककाराने लिहिलेले संगीत संशयकल्लोळ एक अजरामर कलाकृती आहे. कारण त्यात माणसाच्या मुळ स्वभावावर बोट ठेवले आहे. हा स्वभाव अधिक उलगडून सांगितला आहे. मूळ संकल्पनेला धक्का न देता मांडणीत बदल केला तर त्यांनी केलेली रचना कोणत्याही पिढीसमोर सादर करता येऊ शकते, हे मर्म दामले यांनी अचूक ओळखले आहे. ते सांगतात की, खट्याळपणा हा माणसाचा विशेषत: पुरुषांचा स्वभावगुण. तो प्रत्येकात असतोच. पण खट्याळपणा किती करावा, याचे  भान प्रत्येकाला ठेवता आले पाहिजे. म्हणजे लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून मनसोक्त वारा अंगावर घेणे हा खट्याळपणाच आहे. पण दाराशी उभे राहून तुम्ही त्यावर झोके घेऊ लागलात की जीवावर बेतू शकते. तसेच संशयाचे आहे. संसारात जोडीदारावर किती संशय घ्यावा, याच्याही मर्यादा आहेत. हेच देवलांनी संशयकल्लोळमध्ये सुरेख पद्धतीने मांडले आहे. माणसाच्या मूळ स्वभावाविषयीचे हे भाष्य असल्याने आजकाल फेसबुक, व्हॉटस्अपमध्ये गुंतलेली पिढीही त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकते. तशाच पद्धतीने निपुण धर्माधिकारी यांनी संकलन व दिग्दर्शन केले आहे. साडेचार मिनिटांचा कालावधी असलेली १८ सुरेख नाट्यगीते प्रतिभावान गायक राहूल देशपांडेंकडून लाईव्ह ऐकता येणे, हे देखील या प्रयोगाचे बलस्थान आहे. प्रशांत दामले यांच्या अभिनयाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. तो प्रत्यक्ष अनुभवलाच पाहिजे, एवढा निरागस आणि सुखद आहे. म्हणूनच मराठी नाट्यसंगीतावर प्रेम असलेल्यांनी नव्या रुपातील संशयकल्लोळ आवर्जून पाहावे, एवढेच या निमित्ताने सांगणे आहे.

Tuesday, 12 July 2016

औरंगाबादकरांना अशा प्रसंगी संवेदनशील होता येईल का?

औरंगाबादकरांना अशा प्रसंगी

संवेदनशील होता येईल का?

----

मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही

मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना

कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना

मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा

तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे

पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने

पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही

कुणी शस्‍त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

अशी प्रख्यात कवी संदीप खरे यांची कविता. ती त्यांनी मध्यममार्गी आणि मला काय त्याचे अशी मानसिकता असणाऱ्यांबद्दल लिहिली असली तरी त्यातील वर्णन पूर्णपणे औंरंगाबादकरांना लागू होते, असेच वाटते. कारण शेकडो वर्षे गुलामीत, कुणाच्या तरी जोखडाखाली राहिलेल्या औरंगाबादकरांना कशाचेच काही वाटत नाही, असे सांगणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. म्हणजे रस्ता तयार करण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला तरी औरंगाबादकर आवाज उठवत नाही. रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्यात अधिकारी, नगरसेवकांनी पैसा खाल्ला असे डोळ्यासमोर दिसत असले तरी लोक बोलत नाहीत. वर्षानुवर्षे सिग्नल्स बंद पडतात. घाटी रुग्णालयात, महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर, औषधी नसतात. काही खासगी दवाखान्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे शोषण होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो खेट्या मारूनही काम होत नाही. पार्किंगच्या जागा बिल्डर गिळंकृत करतात. पोलिस प्रत्येक नाक्यावर कोणते तरी कारण दाखवून वसुली करतात. तरीही...तरीही...तरीही औरंगाबादचा सामान्य माणूस काहीच म्हणत नाही. रस्त्यावर उतरून मोर्चा काढणे तर दूरच साधे धरणे आंदोलनही करत नाही. अशा आंदोलनात सहभागीही होत नाही. जे काही करायचे आहे ते दुसऱ्यानेच करावे. मी फक्त त्याचा लाभ घेत राहिन आणि त्यात कुणाकडून काही चूक झाली तर त्याला मनापासून नावे ठेवीन. त्याच्या चुका दाखवून देईन.  शहरासाठी  जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या जायकवाडी धरणात हक्काचे पाणी आणण्याकरिता काही मंडळी लढा उभारत असताना त्यांना सामान्य नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद जवळपास शून्यच होता. जायकवाडीच्या वरील बाजूस धरणे उभारण्याचा सपाटा सुरू असतानाही थंडगार डोळ्यांनी लोक बघत होते. औरंगाबादच्या वाट्याचे आयआयएम, लॉ स्कूल नागपूरला पळवले गेले. पर्यटनाच्या निधीत नागपूरच्या रुपाने वाटेकरी निर्माण केला तरीही आरडाओरड नाही. आता तर त्यापलिकडे म्हणजे माणूस म्हणून असणाऱ्या संवेदनेपलिकडे औरंगाबादकर जातोय की काय, अशी भिती वाटू लागली आहे. चार जुलै रोजी आंबेडकर चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सनी सेंटरसमोर नरेंद्र सिंग या युवकाचा बळी गेला. ही घटना त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. कामानिमित्त दुचाकीवरून घराबाहेर पडलेल्या नरेंद्रला एका सोळा वर्षाच्या मुलाने दुचाकीवरूनच येत जोरदार धडक दिली. तो खाली पडल्यावर त्याच्या अंगावरून दुचाकी गेली. साक्षात समोर मृत्यू उभा ठाकला असताना नरेंद्र कुणीतरी मदतीला धावून या हो, अशा आर्त हाका देत होता. भोवताली जमाव होता. पण कुणीही पुढाकार घेतला नाही. कारण मदतीला धावून गेलो आणि पोलिसांनीच आपल्याला या प्रकरणात अडकवून टाकले तर काय होईल, असे सर्वांनाच वाटत होते. कायदा लोकांच्या मदतीसाठी आहे की त्यांना अडकवण्यासाठी आहे, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. काहीजणांकडे पोलिसांनी अडकवल्याचा अनुभवही आहे. त्यावर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करा, आम्ही तुमचा सत्कार करू, असे आवाहनही केले आहे. अपघात झाल्यापासून १५ मिनिटांत जखमीवर प्रथमोपचार झाले आणि पुढील ४५ मिनिटांत तो रुग्णालयात पोहोचू शकला तर त्याला जीवनदान मिळू शकते. हा जखमी आपल्या कुटुंबातील, आप्त असल्याची भावना प्रत्येक औरंगाबादकराने मनात आणली तर काहीजण निश्चित मदतीसाठी पुढे येऊ शकतात. नाही जखमीला रुग्णालयात पोहोचवता आले तर मदतीसाठी तयार असणाऱ्या संस्था, संघटना, सामाजिक संस्थांशी संपर्क साधण्याचे काम केले तरी ते मोलाचे ठरेल. अन्यथा कुठे नेऊन ठेवली संवेदनशीलता, असा प्रश्न निर्माण होतो.

यात आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे ३० मार्च २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. गोपाळ गौडा, अरुण मिश्रा यांनी एका प्रकरणावरील सुनावणीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी सन्मानाची वागणूक द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मदत करणाऱ्याचा पोलिस ठाण्यात कोणताही भेदभाव न ठेवता पूर्ण सन्मान केला जाईल. त्याचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल, दूरध्वनी क्रमांक मागितला जाणार नाही.

त्याला पोलिस कोणतीही अवांतर माहिती देण्यासाठी जबरदस्ती करू शकणार नाहीत. मदतकर्त्याची साक्षीदार होण्याची इच्छा नसेल तर त्याने जेवढी माहिती दिली त्यापलिकडे पोलिस त्याला कोणतीही माहिती विचारणार नाहीत. अपघाताची माहिती दिल्यावर मदतकर्ता पोलिस ठाण्याबाहेर बाहेर पडू शकतो. त्याला पोलिस रोखू शकणार नाहीत.

मदतकर्त्याची साक्षीदार होण्याची इच्छा असेल तर तो सांगेल त्याच ठिकाणी आणि तो सांगेल त्या वेळी साध्या वेशातील तपास अधिकारी त्याच्याकडून माहिती घेतील.

मदतकर्त्याने पोलिस ठाण्यात यावे, असे तपास अधिकाऱ्याला वाटत असल्यास त्यामागील कारणे त्याला लेखी स्वरूपात नोंदवावी लागतील. एखादा मदतकर्ता त्याची साक्ष प्रतिज्ञापत्रातूनही देऊ शकतो, असे या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे. त्यामुळे हक्कांसाठी, न्यायासाठी औरंगाबादचा एक आवाज म्हणून लढणे राहू द्या किमान माणूस म्हणून माणसाच्या मदतीला धावून जाण्यासाठी पाऊल उचलले तरी काही जखमींचे प्राण वाचू शकतील.





Tuesday, 5 July 2016

डास आवडती सर्वांना



माणसापेक्षा यंत्रणा अचूक अगदी एखाद्या यंत्रासारखी असली पाहिजे. म्हणजे यंत्रणेतील माणसे बदलली तरी फरक पडणार नाही. यंत्रणेतून सर्वाधिक फायदा झालाच पाहिजे, असे आजकाल वारंवार म्हटले जाते. महापालिकेच्या कारभाराचा तर मूलमंत्रच आहे. कायद्यानुसार काम कसे करायचे ते ठरलेले आहेच. त्याची फक्त अंमलबजावणी करायची असते. पण यंत्रणा माणसेच तयार करतात आणि जगातील सर्व माणसे सारखी नसतात. प्रत्येकाची विचार करण्याची, काम करण्याची पद्धत आणि क्षमताही वेगवेगळी असते. काम करण्याचे उद्दिष्ट तर मुळीच सारखे नसते. म्हणून तर माणसाचे महत्व अबाधित आहे. माणूस बदलला की यंत्रणा, संस्थेची दृष्टी, वाटचाल हमखास बदलतेच. गेल्या आठवड्यात डास निर्मूलनाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ज्या कुशलतेने परत आणण्याचा घाट महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घालण्यात आला. तो पाहता तर बदलाचे वारे कुठल्या दिशेने निघाले आहे, हे लक्षात येतेच. हे वारे नेमके कुठून सुरू झाले, याची माहिती घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

आठ-दहा महिन्यांपूर्वी महापालिकेचे तत्कालिन आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी प्रभारी कार्यभार स्वीकारला. चांगल्या कामांना प्रसिद्धी मिळावी. काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नको, असा केंद्रेकरांचा दृष्टीकोन असल्याने ते स्वतःचे वर्तमानपत्रात फोटो येणार नाहीत, याची काळजी नेहमीच घेतात. तशी त्यांनी मनपात आल्यावर घेतली. त्यामुळे केंद्रेकर नावाचे नवे साहेब आल्याचे मनपाच्या सर्वच कर्मचारी, ठेकेदार आणि ठेकेदारांकडील कामगारांना कळाले असले तरी ते कसे दिसतात, याची माहिती नव्हती. याचा फायदा केंद्रेकरांना झाला. एक दिवस सकाळी ते सिडकोत मॉर्निंग वॉकला जात असताना ठेकेदाराचे कर्मचारी डास निर्मूलन औषधीची फवारणी करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार चौकशी केली. तेव्हा ही औषधाची थातूरमातूर फवारणी असल्याची कबूली त्या कर्मचाऱ्यानेच दिली. मग केंद्रेकरांनी आणखी सखोल विचारणा केली. तेव्हा सिडको-हडकोतील सगळे ठेकेदार असेच करतात. औषधी कमी आणि पाणी जास्त वापरतात. त्यापोटी दरमहा लाखो रुपयांचे बिल उचलतात. अधिकारी, नगरसेवक सगळ्यांच्या संगनमतातून हे घडत असल्याने स्थायी समितीत टीका, सभापतींकडून चौकशीचे आदेश यापलिकडे काहीच घडत नसल्याची माहिती केंद्रेकरांना मिळाली. म्हणून केंद्रेकरांनी झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुळावरच घाव घालायचे ठरवून सिडको-हडकोतील औषधी फवारणीचे ठेकेच रद्द करून टाकले. त्यावर ठेकेदार आणि त्यांच्या समर्थक नगरसेवक, अधिकाऱ्यांनी बरीच कुरकुर करून पाहिली. पण केंद्रेकरांनी जुमानले नाही. त्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फवारणीसाठी तैनात करून त्यावर निगराणीची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर निश्चित केली. अधूनमधून ते स्वतः काम व्यवस्थित सुरू आहे की नाही, याकडे लक्ष ठेवत होते. तर केंद्रेकरांची बदली केव्हा होते आणि आपण पुन्हा फवारणीतून पैसे उगवण्याचे झाड केव्हा लावतो, यावर ठेकेदारांची नजर होती. ती त्यांनी गेल्या आठवड्यात मोठ्या शिताफीने साधली. स्थायी समितीच्या आदल्या दिवशी आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप, डॉ. मनिषा भोंडवे यांनी डेंग्यूच्या रुग्णांची गेल्या सहा महिन्यातील आकडेवारी जाहीर केली. सोबतच शहरातील 135 भाग धोकादायक आहेत, असे आमचे सर्वेक्षण असल्याचे म्हटले. या भागांमध्ये बन्सीलालनगर, पद्‌मपुरा, वेदांत कॉलनी आदी उच्चभ्रू वसाहतींचा समावेश असल्याची माहिती दिली. तीन वर्षापूर्वी एन-11 येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. तेथे अजूनही संशयित रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली. प्रसारमाध्यमांसाठी हा अहवाल महत्वाची बाब असल्याने त्याला ठळक प्रसिद्धी मिळाली. आणि शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य विभागावर हल्लाबोल केला. डास शहरात थैमान घालत असताना औषधी फवारणीचे काय असा त्यांचा सवाल होता. त्याचे उत्तर शोधताना सभापती मोहन मेघावाले यांनी केंद्रेकरांनी ठेकेदारांना बंद केलेली दारे पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. महापालिकेत वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आणि पदाधिकारी बदलताच धोरण बदलते. आणि या बदलत्या धोरणामुळे लोकांची कामे रखडतात. शिवाय पैशाची उधळपट्टीही होते. ती रोखण्याचे काम आयुक्तांच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याने करणे अपेक्षित आहे. ओमप्रकाश बकोरिया ते सहजपणे करू शकतात. डासांचे निर्मूलन हा पुढील शेकडो वर्षे चालणारा विषय आहे. प्रख्यात पत्रकार पी. साईनाथ यांनी `दुष्काळ आवडे सर्वांना` असा एक सिद्धांत मांडला होता. दुष्काळाचे निमित्त करून सर्वच जण कशी कमाई करून घेतात, हे त्यांनी दाखवून दिले होते. तशीच `डास आवडती सर्वांना` अशी अवस्था आहे. या आवडीमुळेच डास कायम राहिले पाहिजेत, असे महापालिकेला मनापासून वाटते. उर्जा निर्माण करता येत नाही. नष्ट करता येत नाही. ती फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदलता येते` या न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणेच तमाम डास फक्त एका स्थळावरून दुसऱ्या ठिकाणावर हाकलता येतील. पण ते नष्ट होणार नाहीत. सार्वजनिक स्वच्छता हा फक्त महापालिकेनेच काम करण्याचा विषय आहे. आपले काम फक्त रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे, शौचास बसणे, लघुशंका करणे, नळाचे पाणी रस्त्यावर सोडणे, गरज नसताना भांड्यांमध्ये साठवणे, गटारीत प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे असे आहे, असा बऱ्याच औरंगाबादकरांचा ठाम विश्वास असल्यामुळे डास कायम राहणार आहेतच. त्यांचे निर्मूलन नव्हे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्याच्या नावाखाली पैसा खर्च होणारच. तो केला नाही तर डेंग्यूमुळे नागरिक विशेषतः लहान मुलांचे जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणून सभापती मेघावाले यांनी ठेकेदारांना महापालिकेची दारे उघडी करून दिली असली तरी किमान त्यांच्याकडून नियमानुसार काम करून घेतले पाहिजे. लोकांच्या जीवनमरणाशी खेळ करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. औषधींऐवजी पाणी मारताना पकडले जात तर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा सज्जड दम द्यावा लागेल. सभापतींच्या आदेशाची अंमलबजावणी करणे भाग असले तरी डासांच्या नावाखाली झोळी भरून घेणाऱ्या ठेकेदारांवर करडी नजर ठेवण्याची यंत्रणा ते निश्चित राबवू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास काय हरकत आहे?