Tuesday, 29 November 2016

राज्य नाट्य : काही प्रयोगातील आशय, मांडणीने वाढल्या अपेक्षा

चित्र, मूर्ती,शिल्प आदी कला महान असल्या आणि त्यातून मानवी जीवन समृद्ध होत असले तरी या परिपूर्ण मानल्या जात नाहीत. कारण त्यात इतर कलांचा अाविष्कार तेवढ्या ताकदीने होत नसतो. नाटक ही कला मात्र सर्व कलांचे एकत्रीकरण समजले जाते. त्यात सर्वच कला कमी अधिक प्रमाणात अाविष्कृत होत असतात. त्यामुळे नाटक लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि त्यातील अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, प्रकाश योजनेची मांडणी करताना इतर सर्व कलांचा विचार करावा लागतोच. तरच ते नाटक रंगतदार ठरते. म्हणूनच नाटक सादरीकरणात खरा कस लागतो. त्यातल्या त्यात जर ते अलीकडच्या स्पर्धांमधील दोन अंकी नाटक असेल तर त्यात लेखक, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञांना सर्वस्व ओतावे लागते. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे सध्या अंतिम टप्प्याकडे निघालेला राज्य नाट्यस्पर्धांचा मोसम. हौशी, निमव्यावसायिक रंगभूमीवर काम करत असलेल्या प्रत्येकासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असते. त्याला नाटकाची आवड निर्माण झाल्यावर पहिली काही वर्षे तरी त्याचे लक्ष्य सांस्कृतिक संचालनालयाच्या राज्य नाट्य आणि कामगार नाट्यस्पर्धा असतेच. एकांकिका स्पर्धांमध्ये कितीही सहभाग घेऊन बक्षिसे मिळवली असली तरी एकदा राज्य नाट्यमध्ये नाव कमावायला पाहिजेच, असा विचार हौशी रंगकर्मीच्या मनात असतोच. कारण पूर्ण पल्ल्याच्या नाटकांमध्ये आपली पूर्ण परीक्षा होते, हे कलावंताला पुरेपूर माहिती असते. म्हणूनच की काय अनेक चढउतार पाहूनही ही स्पर्धा टिकून आहे. दहा वर्षांपूर्वी लागलेली घरघर सांस्कृतिक संचालनालय आणि नव्या पिढीच्या कलावंतामधील जिद्दीमुळे बऱ्यापैकी थांबली आहे. एकेकाळी सलग ३० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला टीव्ही सिरियल्समुळे ओहोटी लागली होती. थोडेफार नाव मिळाले की कलावंत मुंबईकडे धावू लागले होते. नव्या संहिताच येणे बंद पडले होते. काही केंद्रावर नाट्य प्रयोग रद्द करण्याचे प्रकार वारंवार घडू लागले होते. सुदैवाने हे सारे किमान औरंगाबाद केंद्रावर तरी थांबल्याचे दिसते. ते २३ नोव्हेंबर कालावधीत औरंगाबादमध्ये प्राथमिक फेरी झाली. त्यात सादर झालेल्या नाटकांच्या आशय, विषय आणि सादरीकरणावर नजर टाकली तर तरुणाई पुन्हा स्पर्धेकडे वळाली आहे. आणि नाटक म्हणजे खूप मेहनतीने उभी राहणारी कला आहे, हे त्यातील अनेकांना कळाल्याचे लक्षात येते. पहिल्या फेरीत `एक परी` हे किरण पोत्रेकर यांनी लिहिलेले आणि उमेश राजहंस यांनी दिग्दर्शित केलेले नाटक पहिले आले. पोत्रेकर मूळ वसमतचे. १९९० च्या दशकात ते औरंगाबादेतील हौशी रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या एकांकिकांनी त्या वेळी स्पर्धा गाजवल्या होत्या. नंतर मुंबईत व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी ठसा उमटवला. त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धेसाठी नेमके काय लागते, याचा त्यांना अचूक अंदाज होता. तो त्यांनी पूर्ण प्रतिभा पणाला लावत एक परीमध्ये अाविष्कृत केला आहे. निराश्रितासारख्या एका मुलीला एक हमाल रात्रभर आपल्या खोलीवर आणतो आणि मग त्यांच्यात नेमके काय घडते याची मांडणी पोत्रेकरांनी केली आहे. दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बुरगुंडामध्ये प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी लोककलावंतांच्या व्यथा मांडल्या आहेत. प्रा. सोनवणेही लोककलांचे मास्टर म्हणूनच गणले जातात. त्यांची केवळ लोककलांशी नाळ जुळलेली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सोनवणे त्यापलीकडे जाऊन लोककलावंतांच्या दुःख, वेदनांशी समरस झाले आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत असतात. बुरगुंडामध्येही त्यांनी भारुडकार, गोंधळ्यांचे जगणे मांडले आहे. सतीश लिंगाडे यांनी लिहून दिग्दर्शित केलेले `सपान` नाटकही लक्षवेधी ठरले. तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या सपानमध्ये खेडेगाव बदलण्याची कहाणी सांगितली आहे. राणी माशी (लेखक शैलेश कोरडे, दिग्दर्शक विनोद आघाव), भाकवान (लेखक तुषार भद्रे, दिग्दर्शक शिवाजी मेस्त्री) ड्रम डान्सर (लेखक रमेश पवार, दिग्दर्शक वैजनाथ राठोड), जेंटल मेंटल (लेखक राहुल ढोले, दिग्दर्शक अविनाश भोसले) या नाटकांचे विषय आणि मांडणी दाद मिळवून गेली. काही अपवाद वगळता सर्वच नाटकांमध्ये सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा विचार देण्याचा प्रयत्न लेखकांनी केल्याचे दिसते. ही रंगभूमीसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण जोपर्यंत नव्या दमाचे आणि विचारांचे लेखक येत नाहीत. तोपर्यंत नाट्यकलेला लोकाश्रय, राजाश्रय मिळणार नाही. हौशी रंगभूमीची चळवळ पुढे जाणार नाही. त्याचा थेट परिणाम पुढे व्यावसायिक रंगभूमी आणि कमी अधिक प्रमाणात सिरियल्स, चित्रपटांवरही होत असतो. म्हणून नवे लेखक येणे आणि त्यांनी नव्या पद्धतीने विचारांची मांडणी करणे या दोन गोष्टी राज्य नाट्यच्या निमित्ताने घडत आहेत. संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या ते कमी असले तरी पुढील काळात त्यात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना विभागप्रमुख प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी मराठवाड्यात व्यावसायिक रंगभूमी उभी राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रख्यात अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी नाटक म्हणजे पॅशन असल्याचे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यामुळे या स्पर्धेत यश मिळवणाऱ्यांनी लगेच मुंबईकडे धाव घेतली नाही तर मराठवाड्यात व्यावसायिक रंगभूमी उभी करण्याचे बऱ्हाणपूरकरांचे स्वप्न साकार होईल. आणि कलावंतांसाठी नाटक म्हणजे पॅशन असल्याचेही सिद्ध होईल.

Wednesday, 23 November 2016

अशी स्वारी झाली तर येईल खरी बहार




जुन्या आठवणीत रमणे, त्यात दंग होऊन जाणे अनेक जणांना कमी-अधिक फरकाने आवडतेच. कारण मागे वळून पाहताना भूतकाळ नेहमीच सुखावह वाटतो. आणि अलीकडील काळात जगण्याची रोजची लढाई इतकी तीव्र झाली आहे की गेल्या आठवड्यातील दिवस सुखाचा होता, असे अनेकांना वाटू लागले आहे. म्हणूनच शाळा, महाविद्यालयांमध्ये वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन सोहळे प्रचंड प्रतिसादात आयोजित होऊ लागले आहेत. त्या काळात एका बाकावर बसत केलेल्या गमतीजमती आठवून आताचा ताण घालवण्यासाठी अशी संमेलने उपयुक्त ठरत आहेत. शिवाय त्यातून शाळा, महाविद्यालयांना काही देणग्या, उपयोगी वस्तूही मिळत आहेत. म्हणजे जुन्या आठवणींचा उजाळा सामाजिक पातळीवरही उपयोगी ठरू लागला आहे. असाच एक सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी रविवारी आयोजित केला होता. तोही धमाल रंगला होता. आयोजनाची जोरदार तयारी बऱ्हाणपूरकर, प्रा. जयंत शेवतेकर, प्रा. अशोक बंडगर आणि विद्यमान प्राध्यापक मंडळींनी केली होती. रंगभूमी, चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या आणि इतर क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्यांना रीतसर निमंत्रणे दिली होती. मात्र, एकेकाळी विभागात दिवस-रात्र तालमी करून नावलौकिक कमावत यशाच्या शिखरावर जाऊन बसलेले अनेक कलावंत सोहळ्याकडे फिरकले नाहीत. शिखराकडे निघू पाहणारे संजय सुगावकर, शिव कदम आले होते. गीत, नाटक अकादमीचे माजी संचालक विजयकुमार गवई, प्रा. डॉ. दिलीप घारे यांच्यासह हौशी, व्यावसायिक रंगभूमीवर थोडीफार कामगिरी करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामुळे माजी विद्यार्थ्यांचा सोहळा खऱ्या अर्थाने कौटुंबिक वातावरणात पार पडला. सेलिब्रिटी मंडळी आली असती तर त्यांच्या भाषणात, लाडात, कौतुकातच विद्यार्थीपण हरवून गेले असते. मेळाव्याला आलेल्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातील प्रमुख होता तो म्हणजे आपल्या विभागाची बाहेर बदनामी कोण अन्् का करतो? माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी त्यांच्या खास शैलीत विभागाची बदनामी बाहेरचे कोणी नाही, आपण करतो, असे ठणकावून सांगितले. आणि त्यामागे राजकारण असल्याचेही उघड केले. त्यांचे हे बोलणे काही जणांना कटू वाटत असले तरी ते सत्य आहे. कलेच्या प्रांतात शिखरावर पोहोचलेले अनेक विद्यार्थीच विभागाचे नाव घेणे टाळतात किंवा त्याविषयी खासगीत अनुद‌्गार काढतात. प्राध्यापक मंडळींमधील वादाने आमचे नुकसान झाले, असे सांगतात. त्यात तथ्यांश असला तरी विभागाने काहीच दिले नाही, असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण ठरेल. नाट्यशास्त्रात पारंगत असलेल्या प्राध्यापक मंडळींमध्ये कमालीचे हेवेदावे असले, त्यांनी जातीपातीची छोटी-मोठी तटबंदी उभारली असली तरी त्यांच्यापैकी एकानेही कोणाला कधी तालमी करण्यापासून रोखले नाही. चांगल्या सादरीकरणाचे तोंडभरून कौतुक केले नसले तरी प्रयोग हाणून पाडण्यापर्यंत ते कधीच गेले नाही. हेही नसे थोडके. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रा. कुमार देशमुख, प्रा. आलोक चौधरी, प्रा. प्रताप कोचुरे, प्रा. अचलखांब, प्रा. बऱ्हाणपूरकर यांनी कलावंतांच्या दोन-तीन पिढ्या घडवल्या. सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्यांनी तशी मनमोकळी कबुली दिली. आजकाल कोणीच कोणाला कोणत्याही चांगल्या घटनांचे श्रेय देत नसताना गुरुजनांनी आमच्या जीवनाला आकार दिला, असे काही विद्यार्थी नाटकाच्या क्लायमॅक्सप्रमाणे २५ वर्षांनंतर का होईना सांगत असतील तर नाटकाच्या पहिल्या अंकाचा शेवट गोड आहे, असे म्हणावे लागेल.
अचलखांब यांनीच मांडलेला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण मराठवाड्यातील कलावंत मंडळी (इतर क्षेत्रांप्रमाणे) सारखे मागासलेपणाचे चऱ्हाट लावत असतो. खरे तर आपल्यातच अस्सलपणा आहे, जिवंतपणा आहे. त्यामुळे कोणापुढे झुकण्याची गरजच नाही. आपले नाणे खणखणीत आहे तर ते खणखणीतपणेच वाजवले पाहिजे, हे त्यांचे म्हणणे पूर्ण सत्य आहे. फक्त असे करताना आपण पूर्णपणे व्यावसायिक आहोत ना, याची खात्री करून घेतली पाहिजे. कारण मुंबईत कलावंत म्हणून अस्सलपणा कदाचित नसेलही; पण तेथील व्यावसायिकता खरेच शिकण्याजोगी आहे. वेळेला महत्त्व आणि अंग झोकून काम करणे, ही मुंबईची ताकद आहेच. म्हणून आपण नेमके कोण आहोत, खरेच प्रतिभावंत आहोत का, कलेच्या प्रांतातील कोणत्या क्षेत्रात काम करण्याची आपली क्षमता आहे, हे लक्षात घेऊनच मुंबईत पाऊल टाकावे, असा सल्लाही शिखराकडे निघालेल्यांनी सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या नव्या कलावंतांना दिला. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा मुद्दा निघाला जुने विद्यार्थी आता विभागाला काय देणार? त्यात कमलेश वर्मा यांनी वीस वर्षांपूर्वी विभागातून नेलेला एक ड्रेस परत आणून देत प्रामाणिकपणा दाखवून दिला. दिवंगत प्राध्यापकांच्या नावाने पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आला. त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. पण एवढ्याने मराठवाड्यातील रंगकर्मींचे समाधान होणार नाही. त्यांना माजी विद्यार्थ्यांकडून एका सर्वोत्तम नाट्यप्रयोगाची अपेक्षा आहे. ती पूर्ण करणे तसे अवघडच आहे. कारण बहुतांश मंडळी चित्रपट, सिरियल्स किंवा इतर व्यवसायांमध्ये अडकली आहेत. पोटपाणी बाजूला ठेवून इथे केवळ रंगभूमीच्या सेवेसाठी येणे त्यांच्यापैकी किती जणांना जमेल याविषयी शंकाच आहे. सोहळ्यात बोलणे सोपे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी त्यापेक्षा कठीण असतेच. पण खरेच या कलावंतांनी प्रयोग सादर केला तर ती रसिकांसाठी अमूल्य देणगी ठरेल. प्रा. अचलखांब सरांच्याच भाषेत सांगायचे झाले तर मराठवाड्यातील कलाकारांनी पूर्ण तयारीनिशी नेहमी स्वारी केली पाहिजे. एका प्रयोगापुरती का होईना अशी स्वारी करणे जमले तर बहार येईल, नाही का?


Wednesday, 16 November 2016

एक्स्पर्ट ग्लोबलची जागतिक भरारी








जालन्यातून देशभरातलोखंडाचा पुरवठा होतो. नांदेड, लातूर, हिंगोलीत छोटे-मोठे उद्योग आहेत. तरीही औरंगाबाद हेच मराठवाड्याचे उद्योग केंद्र आहे. कारण येथे इतर शहरांपेक्षा अधिक उद्योग आहेतच. शिवाय त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण होतो. आजमितीला किमान तीन लाख लोक औरंगाबादमधील उद्योगांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. पुढील काळात डीएमआयसीमुळे (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर) अनेक उद्योग येऊ घातले आहेत. त्यात काही जागतिक पातळीवरील कंपन्याही आहेत. त्या येण्याची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे. मात्र, ते सारे परदेशी पाहुणे आहेत. आपल्याकडील काही उद्योजक आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योगांमध्ये सहभागी कधी होतील, औरंगाबादचे नाव जगाच्या नकाशावर केव्हा नोंदवतील, असा प्रश्न सर्वांना, विशेषत: तरुणाईला पडला होता. त्याचे उत्तर सोमवारी मिळाले. स्वयंचलित कारसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान संपूर्ण जगाला औरंगाबादेतूनच मिळणार आहे. ही ऐतिहासिक आणि प्रत्येक औरंगाबादकरांना अभिमान वाटावा, अशी भरारी घेतली आहे प्रशांत देशपांडे यांच्या एक्स्पर्ट ग्लोबल कंपनीने. त्यासाठी जर्मनीतील सी-मोर ऑटोमोटिव्ह कंपनीसोबत करार झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भरारी म्हणजे केवळ परदेशी कंपनीसाठी तंत्रज्ञान विकसित करून देण्यापुरती नाही, तर त्या कंपनीत एक्स्पर्ट ग्लोबलची भागीदारीही राहणार आहे. सी-मोर आणि ग्लोबल एक्स्पर्ट लवकरच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये स्वतंत्र उद्योग उभा करणार आहेत. शहरातील अनेक उद्योजक उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाव कमावून आहेत. त्यांची उत्पादने युरोपमध्ये गेल्या काही वर्षांपासून जात आहेत. मात्र, जर्मनीतील कंपनीसोबत स्थानिक उद्योगाची अशा स्वरूपातील भागीदारी ही बाब केवळ उद्योजकांनाच नव्हे तर तमाम तरुणाईला नवी ऊर्जा देणारी आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी करणे उद्योजक प्रशांत देशपांडे यांना कसे शक्य झाले, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत दडलेले आहे. अत्यंत मृदुभाषी आणि संयमी व्यक्तिमत्त्व असलेले प्रशांत म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातील मंदाताई (शिशुविकास मंदिर शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका) आणि कै. विजय देशपांडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक) यांचे सुपुत्र. शालेय जीवनापासूनच हुशार आणि मेहनतीचा मंत्र जपणारा विद्यार्थी अशी प्रशांत यांची ओळख होती. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतल्यावर जवळपास दहा वर्षे ते अमेरिकेत राहिले. तेथील अनुभव गोळा केला. खरे तर त्यांना तेथेच राहून उद्योजक होण्याची संधी होती. पण आपण भारताचे काही देणे लागतो. त्यामुळे भारतात आणि तेही आपल्या मूळ शहरातच उद्योग, व्यवसाय केला पाहिजे, या जाणिवेतून ते औरंगाबादेत आले. कायम नावीन्य आणि काहीतरी वेगळे करण्याकडे त्यांचा कल होताच. त्यामुळे त्यांनी २५ वर्षांपूर्वी शहरात एक्स्पर्ट ग्लोबल या सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना केली. आज सात देशांमध्ये एक्स्पर्ट ग्लोबलच्या उपकंपन्या आहेत. ऑटोमोटिव्ह म्हणजे वाहन उद्योगांसाठी लागणाऱ्या हार्डवेअर, सॉफ्टवेअरची निर्मिती करण्याचे काम धडाक्यात सुरू केले आणि त्या माध्यमातून जगभरातील उद्योजकांशी चांगला संपर्कही ठेवला. काही वर्षांपूर्वी स्वयंचलित, चालकविरहित कार रस्त्यावर आणण्याची चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपण पुरवू शकतो, असा आत्मविश्वास प्रशांत यांना होता. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यास जर्मनीची सी-मोर कंपनीकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुणे, बंगळुरूसारखी आयटी क्षेत्रासाठी नामवंत मानली जाणारी शहरे सोडून सी-मोरच्या व्यवस्थापनाने ग्लोबल एक्स्पर्टची निवड केली. ही ग्लोबलच्या जागतिक दर्जाच्या ज्ञानाची पावतीच म्हणावी लागेल. मात्र, त्याचे श्रेय प्रशांत स्वत:कडेच घेता औरंगाबादच्या तरुणाईला देतात, हेही त्यांच्यातील लीडरशिप क्वालिटीचे उत्तम उदाहरण आहे. ग्लोबलमधील विभागप्रमुख मिताली मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीतील ५० जणांची टीम चालकविरहित कारसाठी लागणारे सॉफ्टवेअर विकसित करणार आहे. सी-मोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्रेगर मेटेनर, रिचर्ड वॉलर यांनी जे सांगितले ते तर खूपच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, ग्लोबलसोबत आम्ही तीन वर्षांपासून काम करत आहोत. या कंपनीतील स्थानिक गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा आम्हाला भावला. सध्या अॅपल, गुगल, स्टेला कंपन्या चालकविरहित कार निर्मितीसाठी काम करत आहेत. आम्हीही याच स्पर्धेत उतरलो आहोत. पुढील दहा वर्षांत जगातील बहुतांश लक्झरी कार स्वयंचलित होणार आहेत. त्यासाठी लागणारे सर्वोत्तम तंत्रज्ञान औरंगाबादेतच तयार होणार आहे. वळणावर, स्पीड ब्रेकरवर कारची गती आपोआप कमी होणे आणि सरळ रस्त्यावर वाढणे. वाहतुकीचे नियम स्वयंचलित पद्धतीने पाळणे जाणे, यासाठीची प्रणाली औरंगाबादमध्ये विकसित होणार आहे. एक्स्पर्ट ग्लोबल, सी-मोर ऑटोमोटिव्ह मिळून तयार होणारी स्वतंत्र कंपनी मर्सिडीझ, बीएमडल्ब्यूसह जगातील दिग्गज कार कंपन्यांसाठी सॉफ्टवेअरचे संशोधन, विकासाचे काम करणार आहे. जागतिकीकरणामुळे सामाजिक पातळीवर अनेक गुंतागुंतीचे आणि बिकट प्रश्न निर्माण केले असले तरी कोणत्याही शहरातील प्रतिभावंताला जगाच्या नकाशावर स्वत:चे स्थान निर्माण करून देण्याची संधी मिळाली आहे, हे ग्लोबल एक्स्पर्टच्या भरारीवरून लक्षात येते. गरज आहे ती फक्त नावीन्याचा ध्यास घेण्याची आणि त्यासाठी चिकाटी, जिद्दीने परिश्रम करण्याची. प्रशांत देशपांडे यांच्यात हे दोन्ही गुण आहेतच. शिवाय त्यांचे पायही जमिनीवर आहेत. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना त्यांनी कायम जपली आहे. औरंगाबाद शहराच्या विकासात्मक उपक्रमांत त्यांचा सातत्याने सहभाग असतो. त्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून औरंगाबादेतील इतर अनेक तरुण पश्चिम महाराष्ट्राने अन्याय केला, सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही, अशी ओरड करता भरारी घेतील, अशी अपेक्षा निश्चित करता येईल.

Wednesday, 9 November 2016

परिवर्तन : नाटकाच्या जगातील नव्या पैलूची ओळख





अनेकांनी प्रयत्न केले. काहीजण त्यात बऱ्यापैकी यशस्वीही झाले. तरीही मराठवाड्यातील नाट्यचळवळ प्रामुख्याने हौशी रंगभूमीपुरतीच राहिली. अर्थात या हौशी रंगभूमीवरूनच अनेक दिग्गज अभिनेते, लेखक, दिग्दर्शक तयार झाले. मुंबईत जाऊन स्थिरावले. त्यातील काहीजणांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. ठसाही उमटवला. त्यामुळे राज्य नाट्य, कामगार नाट्य आणि एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून कलावंतांना सादरीकरणासाठी जागा निर्माण करून देणाऱ्या हौशी रंगभूमीला महत्व आहेच. या रंगभूमीला कलावंत देण्याचे प्रमुख काम औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाने केले. अलिकडील काळात बीडच्या केसके, औरंगाबादच्या एमजीएम, देवगिरी महाविद्यालयांतील नाट्यशास्त्र विभागांनीही उत्तम कलावंत दिले आहेत. याशिवाय अनेक नाट्य संस्थांनीही हौशी रंगभूमी जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यात प्रामुख्याने जिगिषा, परिवर्तन, नाट्यरंग, स्नेहांकितचा समावेश करावा लागेल. या संस्थांनी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रयोगांचे सादरीकरण केले. त्यातील परिवर्तन संस्थेचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कारण या संस्थेने केवळ नाटकच नव्हे तर साहित्यविषयक उपक्रमांचेही आयोजन करण्याची परंपरा जपली आहे. १९९० च्या दशकात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांच्या जिगिषा संस्थेने औरंगाबादेत अनेकविध नाट्यप्रयोग केले. त्यांची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचल्यावर जिगिषातील कलावंत मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर जिगिषाची जागा भरून काढण्याइतपत संस्थेची आवश्यकता भासू लागली. रंगकर्मींमध्ये तशा अर्थाने चर्चाही सुरू झाली होती. प्रख्यात नाट्य-चित्रपट लेखक आणि पटकथाकार असलेले प्रा. अजित दळवी, ज्येष्ठ अभिनेत्री प्रा. अनुया दळवी यांनाही ही बाब जाणवत होती. ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे त्यावेळी औरंगाबादेत कार्यरत होते. नाट्य-साहित्य वर्तुळाशी त्यांचाही निकटचा संबंध होता. त्यामुळे या मंडळींनी एकत्र येत परिवर्तनची स्थापना केली. या संस्थेतील सर्वचजण दिग्गज आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांचे सादरीकरण केले. नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमीदिनानिमित्त परिवर्तनतर्फे झालेला क्लायमैक्स कार्यक्रम अशा नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार कार्यक्रमांच्या मालिकेतीलच होता. कोणत्याही नाटकातील क्लायमॅक्स म्हणजे शेवट म्हणजे सादरीकरणातील परमोच्च बिंदू असतो. त्यात लेखकाने नेमके काय म्हटले आहे आणि तो किती प्रभावीपणे रंगमंचावर अविष्कृत झाला यावर नाटकाचे यश-अपयश अवलंबून असते. प्रा. दळवी यांनी हाच मुद्दा पकडत विविध नाटकांतील क्लायमॅक्सचे सादरीकरण करण्याचे ठरवले. हौशी, व्यावसायिक, निमव्यावसायिक रंगभूमीचा प्रदीर्घ अनुुभव असलेल्या कलावंतांना सोबत घेतले. त्यामुळे हा अफलातून प्रयोग रसिकांना कमालीचा भावला. संगीत सौभद्र नाटकातील कृष्ण-बलरामाचा प्रसंग विश्वनाथ दाशरथे, सुधीर मोघे यांनी सादर केला. त्यांनी गायलेली पदे दाद मिळवून गेली. प्रा. अनुया दळवी यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या नटसम्राटमधील कावेरीची भूमिका संवाद आणि अभिनयाच्या बळावर जिवंत केली होती. प्रशांत दळवींचे चारचौघी हे तुफान गाजलेले नाटक. त्यातील विनीच्या समोर उभा राहिलेला पेचप्रसंग अदिती मुखाडकर, नीलेश चव्हाण, आकाश काळे यांनी पूर्ण ताकदीने सादर केला. अशोक पाटोळे यांच्या आई रिटायर होतेय या नाटकात आई स्वत:चे आयुष्य जगण्यासाठी घराबाहेर पडते, हा प्रसंग अंगावर काटा उभा करतो. तो सुजाता कांगो, मोहन फुले यांनी विलक्षणरित्या फुलवला होता. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे आमदार सौभाग्यवती हे महत्वाचे राजकीय नाटक. त्यातील दोन प्रसंग प्रा. दळवी, सुधीर मोघे यांनी सादर केले. प्रशांत दळवी यांच्याच ध्यानीमनी नाटकातील मनोचिकित्सक, महिलेतील प्रसंग सुजाता कांगो, अभिषेक देशपांडे यांनी उभा केला. किमयागार या शिरवाडकरांच्या नाटकातील प्रसंग निना निकाळजे, मुग्धा निकाळजे, सीमा मोघे, सुधीर मोघे, सूरज शिंदे यांनी जिवंत केला. महेश एलकुंचवारांच्या आत्मकथा नाटकातील प्रसंग सुजाता कांगो, प्रा. दळवी यांनी सादर केला. घाशीराम कोतवाल हे मराठी नाटकाच्या इतिहासातील सर्वात महत्वाचे नाटक. त्यात घाशीरामाच्या अखेरच्या क्षणाचा प्रसंग अभिषेक देशपांडे, मल्हार देशमुख, आकाश काळे यांनी त्यातील आशयासह मांडला. एकूणात या उपक्रमातून परिवर्तन नाटकातील एका वेगळ्या पैलूची ओळख रसिकांना करून दिली. अशाच प्रकारचे उपक्रम यापुढेही आयोजित झाल्यास मराठवाड्यातील हौशी रंगभूमी अधिक दमदार नक्कीच होईल.

Sunday, 6 November 2016

‘तलवारीच्या छायेतच स्वर्ग’

Tuesday, 25 October 2016

रसिकांच्या कडेलोटाचा महोत्सव



--

औरंगाबाद म्हणजे पर्यटकांची वर्दळ असलेले शहर. त्यांच्यासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणारच, असा कुणाचा समज होऊ शकतो. पण तो समजापुरताच मर्यादित राहावा, अशी स्थिती पूर्वीही होती आणि आजही आहेच. अर्थात येथे सांस्कृतिक जगतात काहीच घडत नाही, असे नाही. नाटक, नृत्य, शिल्प, चित्र अशा प्रांतात काहीना काही घडत असतेच. पण ते कलावंतांच्या पुढाकाराने होते. येथून मराठी, हिंदी चित्रपट-नाट्य सृष्टीला अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंत मिळाले. येथील नर्तकांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाहवा मिळवली. सुनिल देवरेंची शिल्पकला अमेरिकेसह युरोपातील अनेक शहरांत गाजली. सध्या टीव्ही मालिकांमध्ये औरंगाबादचे कलावंत लोकप्रियता मिळवत आहेत. निरंजन भाकरे, मीरा उमप यांची लोकलला लोकांनी डोक्यावर घेतली. बशर नवाज यांची शायरी देशाच्या हद्दी ओलांडून गेली. हे सगळे कलावंतांनी त्यांच्या बळावर मिळवलेले यश आहे. असे म्हणतात की, कलेला राजाश्रय असला की ती अधिक खुलते. सर्वस्तरातील लोकांमध्ये पोहोचते. आणि त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम सुसंस्कृत समाज घडवण्यात होत असतो. राजाश्रय देण्याचा एक मार्ग म्हणजे किमान मोठ्या शहरांमध्ये दर्जेदार महोत्सवांचे आयोजन करणे. त्यात जागतिक पातळीवरील कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्यातील ताकदीचा अनुभव रसिकांना करून देणे. आणि अशा महोत्सवांमध्ये स्थानिक प्रतिभावान कलावंतांनाही संधी देणे. महाराष्ट्रातील इतर प्रांतात सरकार कलावंतांना मदत करताना दिसते. त्यांच्यासाठी महोत्सवांचे आयोजन केले जाते. मात्र, पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत असे सातत्यपूर्ण महोत्सव होत नाहीत. त्यामुळे १९८० च्या दशकात सुरू झालेला वेरुळ महोत्सव म्हणजे कलावंत, रसिकांसाठी एक पर्वणीच होती. कडाक्याच्या थंडीत मकबरा, वेरुळ येथे अत्युच्च दर्जाच्या कलावंतांचे सादरीकरण ऐकण्या-पाहण्यासाठी औरंगाबादकरच नव्हे तर मराठवाड्यातील रसिकही गर्दी करत होते. मात्र, कधी दुष्काळाचे सावट कधी सामाजिक ताणतणावांमुळे गेल्या काही वर्षात महोत्सवाच्या आयोजनात सातत्य राहिले नव्हते. गेली तीन वर्षे दुष्काळ असल्याने सरकारी यंत्रणेने महोत्सवातून अंग काढून घेतले होते. यंदा चांगला पाऊस होताच रसिकांनी वेरुळ महोत्सव झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. तो विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मान्य केल्यावर तर जणू उत्साहाला उधाण आले होते. नव्या सरकारने हे फार चांगले केले, असे रसिक म्हणू लागले होते. प्रत्यक्षात महोत्सवाच्या आयोजनाचा तपशील जसजसा समोर येऊ लागला तसतसा रसिकांचा अपेक्षाभंग होऊ लागला. आणि महोत्सवातील सादरीकरणाने तर त्याचा कडलोटच झाला. महोत्सव म्हणजे सर्वांसाठी खुला असेल असे वाटत होते. मात्र, सरकारी यंत्रणेने संपूर्ण महोत्सवातील रसिकांचे कंत्राट कलासागर संस्थेला देऊन टाकले होते. पैसे मोजून आपल्यापुरते कला प्रदर्शन अशी मानसिकता असलेल्या कलासागरला सरकारी महोत्सवात अतिशय छुप्या पद्धतीने प्रवेश देण्यात आला. तिकीटाचे दरही हजार, दीड हजार रुपये ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य रसिकांसाठीचे दरवाजे आपोआप बंद झाले. महोत्सव सरकारीऐवजी खासगी संस्थेचा झाला. स्थानिक कलावंतांना सादरीकरणासाठी महोत्सवाच्या पूर्वरंगमध्ये संधी देण्यात आली. खरेतर त्यांना संत तुकाराम, तापडिया अशा शहराच्या मध्यभागी किंवा रसिकांना सोयीस्कर अशा ठिकाणी सादरीकरण करता आले असते तर ते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले असते. पण ज्या कलाग्राममध्ये कधीही कुणी फिरकत नाही, अशा ठिकाणी या कलावंतांना जागा देण्यात आली. त्यामुळे त्यांची कला रसिकांपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारेच पोहोचली. प्रत्यक्ष जेव्हा कलावंत गात होते. नृत्य करत होते. तेथे त्यांच्यासमोर दाद देण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेही प्रेक्षक नव्हते. सरकारने स्थानिक कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिले पाहिजे, असे म्हणणारेही या कलावंतांच्या कौतुकाकडे पाठ फिरवून बसले होते. मूळ महोत्सवात प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचे वेरुळ लेणीच्या पायथ्याशी झालेले नृत्य उत्कृष्टतेचा नमुना होते. (एमजीएम महागामीच्या पार्वती दत्ता प्रत्येक सरकारी, निमसरकारी महोत्सवात असतातच.) त्यामुळे महोत्सवाचा प्रारंभ चांगला झाला असे वाटले. मात्र, दुसऱ्या दिवशी सोनेरी महालात झालेल्या अजय-अतुल यांच्या मैफलीने जबर धक्का दिला. मराठी चित्रपट संगीताला देशभरात पुन्हा एकदा सुवर्ण वैभव मिळवून देणाऱ्या या जोडगोळीकडून फार अपेक्षा होत्या. त्यांचे लाईव्ह गाणे ऐकण्यासाठी आलेल्या (कलासागर वगळता) रसिकांना त्यांनी साऊंड ट्रॅकवरील गाणे ऐकवले. रसिक, आयोजकांची कलावंतांशी एक अप्रत्यक्ष बांधिलकी असतेच. पण इथे अजय-अतुल यांच्या लेखी आयोजक अन् रसिक यांचे मूल्य शून्य असल्याचे लक्षात आले. तिसऱ्या दिवशी अदनान सामी यांची मैफल असाच अनुभव देऊन गेली. समोर कोणत्या प्रकारचा रसिक आहे, याचा अंदाज न घेताच सामींनी गायन केले. त्यामुळे महोत्सवाचा समारोप अपेक्षेनुसार झाला नाही. औरंगाबादकरांच्या मागणीनुसार वेरुळ महोत्सव घेण्याचा डॉ. दांगट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न म्हणून चांगला असला तरी त्यात त्यांनी ज्या काही अनिष्ट गोष्टी पेरून ठेवल्या. त्या निश्चितच सांस्कृतिक जगताला धक्का देणाऱ्या आहेत. पुढील वेळी त्या उपटून टाकाव्या लागतील. तरच तो खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचेल.

Wednesday, 12 October 2016

निष्कलंक : डॉक्टरांचा संदेश





अलिकडे सगळ्याच क्षेत्रात नितीमूल्यांची, नैतिकता आणि चांगुलपणाची जोरदार घसरण सुरू झाली आहे. राजकारण तर व्यवसाय होऊ घातला आहे, असे म्हणणे पलिकडे गेले आहे. शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक शिक्षकांची गळचेपी करत आहेत. अनेक शिक्षक त्यांचे मूळ काम विसरत आहेत. कलावंत मंडळी मनोरंजनातून मिळवलेली लोकप्रियता राजकारण, प्रॉपर्टी डिलिंगसाठी वापरत आहेत. पोलिस, सरकारी नोकर वरकमाईसाठीच काम करत आहेत. व्यापारी मंडळी टोकाच्या फायद्याचा विचार करत आहेत. पत्रकार, उद्योजक सत्ताधाऱ्यांना ताब्यात ठेवण्यासाठी शक्ती वापरत आहेत. आणि एकेकाळी देवाच्या जागी मानले जाणारी अनेक डॉक्टर मंडळी रुग्णाला वेठीस धरून धनिक होण्यासाठी धडपडत आहेत. (प्रा. अजित दळवी यांच्या डॉक्टर तुम्ही सुद्धा या प्रचंड गाजलेल्या नाटकात वैद्यकीय जगाची काळी बाजू खूप टोकदारपणे आली आहे.) ही सगळी वस्तुस्थिती असली तरी प्रत्येक क्षेत्रात बरीच सुजाण, संवेदनशील लोकही आहेत. त्यांचे सामाजिक भान अत्युच्च आहेच. पण केवळ भान राखण्यापुरतेच ते स्वतःला थांबवत नाहीत. तर पिडीत, शोषितांच्या मदतीलाही धावून जात आहेत. त्यात डॉक्टरांचाही समावेश आहे. औरंगाबादेत असे काही डॉक्टर सातत्याने सामाजिक उपक्रमांसाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यांची आयएमए ही संघटना नवनवे कार्यक्रम हाती घेत असते. रविवारी आयएमएच्या रंगकर्मी ग्रुपतर्फे सादर झालेली `निष्कलंक` एकांकिका सामाजिक दायित्व निभावण्याचाच एक भाग होता, असे म्हणावे लागेल. कारण हे सादरीकरण केवळ डॉक्टरांना रंगमंचावर येण्याची हौस होती म्हणून झाले नाही तर त्यातून एक चांगला संदेश समाजाला देण्यात आला. काही वर्षांपूर्वी घडून गेलेली आणि पडद्याआड लपलेली एक सत्य घटना पडद्यासमोर आणण्यात आली. निष्कलंकमध्ये मांडण्यात आलेला प्रश्न अजूनही कायम असल्याने विषयाचे समकालीन मूल्य आणखी तीव्रतेने जाणवते. आणखी थोडीशी तयारी करून या एकांकिकेचे किमान मराठवाड्यातील आठ-दहा प्रमुख शहरांमध्ये प्रयोग झाले तर महिलांविषयी अजूनही कलुषित, पारंपारिक विचार करणारी काही मने बदलू शकतील.

अशी मने बदलण्याची सुरुवात डॉ. भवान महाजन यांनी निष्कलंकच्या निमित्ताने सुरू केली, असे म्हणता येईल. इंग्लंडमध्ये डॉक्टरी व्यवसायात स्थिरावलेले असतानाही डॉ. महाजन मराठी ग्रामीण रुग्णांची सेवा करण्यासाठी परतले. येथे त्यांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यांचे दुःख, वेदना त्यांनी जाणून घेतल्या. अनेकांना सढळपणे मदतही केली. हे सारे करत असताना आलेले अनुभव त्यांनी मैत्र जिवाचे या पुस्तकात नोंदवले. खरे म्हणजे ग्रामीण आरोग्य आणि डॉक्टरी पेशाचा तो एक दस्तावेजच आहे. त्यातील एका सत्य घटनेवर आधारित कहाणीचे नाट्य रुपांतर डॉ. अनंत कडेठाणकर यांनी केले. आणि डॉक्टरी व्यवसायात कमालीच्या व्यस्त असलेल्या डॉ. अमोल देशमुख, डॉ. स्वप्ना बोंडेकर, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. वर्षा वैद्य यांना सोबत घेऊन त्याचा प्रयोगही सादर केला. नाट्यशास्त्राचे विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन रंगकर्मींच्या सादरीकरणात लावले जाणारे निकष निष्कलंकला लावता येणार नाहीत. कारण यातील एकही जण मूळचा रंगकर्मी नाही. हौशी रंगभूमीवर काम केल्याचाही मोठा अनुभव त्यांच्याकडे नाही. तरीही त्यांनी एका महत्वाच्या प्रश्नाकडे सुजाण समाजाचे लक्ष वेधणाऱ्या एकांकिकेचे सादरीकरण केले. हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रयोगाच्या उद्‌घाटनास आलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. अनुया दळवी यांनीही हाच मुद्दा मांडला आणि तो अतिशय योग्य आहे. डॉ. महाजन यांची कथा अतिशय भेदक आणि अस्वस्थ करणारी. तिचे नाट्य रुपांतर डॉ. कडेठाणकर यांनी संवेदनशीलतेने केले. वांझपणाचे दुःख भोगत जगणारी आणि ऑपरेशननंतर आपण वांझ नाही, असे कळाल्यावर आनंदाने फुललेली तान्हाबाई प्रगती फुलगीरकरांनी खूपच सहजपणे साकारली. डॉ. अमेय देशमुख यांनी तान्हाबाईच्या पोटात गर्भ होता हे कळाल्यावर उडालेली खळबळ छान व्यक्त केली. शिवाय स्वगतात त्यांचा प्रामाणिकपणाही अपेक्षेनुसार जाणवला. पुढील प्रयोगात डॉ. स्वप्ना बोंडेकरांच्या संवाद शैलीवर दिग्दर्शकाने थोडे लक्ष दिले तर डॉक्टर पती-पत्नीतील संभाषणे अधिक गंभीर होऊ शकतील. विषयाला अधिक सखोल करू शकतील. डॉ. कडेठाणकर यांचा बंडेराव, अनंत कुलकर्णींचा बारकू, वर्षा वैद्य यांची सासूबाईही भूमिकेला साजेशी. रवी कुलकर्णी यांचे नेपथ्य अत्यंत लक्षवेधी. आयएमएच्या अत्यंत छोट्या आकाराच्या रंगमंचावर कुलकर्णी यांनी डॉक्टरचे घर, दवाखाना, तान्हाबाईचे घर उभे केले होते. आणि हे करताना प्रत्येक कलावंताला रंगमंचावर वावरण्यासाठी पुरेशी जागा राहिल, याचीही काळजी घेतली होती. अमेय बोंडेकर यांची ध्वनी, प्रकाशव्यवस्था व्यावसायिक कसोटीवर उतरणारी होती. असे म्हणतात की, आपण ज्या व्यवसायात, क्षेत्रात, समाजात काम करतो. त्यातील अपप्रवृत्तींवर आपणच प्रहार केले पाहिजेत. सुधारणेसाठी पावले टाकली पाहिजेत. डॉ. भवान महाजन, डॉ. अनंत कडेठाणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न नक्कीच केला आहे. इतर क्षेत्रात नाव कमावलेल्यांमध्ये असा प्रयत्न करण्याचे धाडस आहे काय