Tuesday, 13 April 2021

बुशरा : परिपूर्ण ... तरीही

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक असलेले बॅ. मोहंमद अली जीना हळूहळू बदलत गेले. २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकत नाहीत, असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे काय झाले हे सर्वांना माहिती आहेच. भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना, प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. कधीच भरून निघणार नाही, एवढे नुकसान झाले. क्रिकेट आणि कलेच्या प्रांतात तर ते खूपच हुरहुर लावणारे, खुपणारे आहे. भारत एकच देश असता तर आपला क्रिकेटचा संघ किती बलाढ्य असता, अशी चर्चा चार दशकांपूर्वी असायची. आपल्या दिलीपकुमार, माधुरी दीक्षित, हेमामालिनी, अमिताभ बच्चनवर फिदा झालेले कोट्यवधी पाकिस्तानी रसिक आहेत. तसेच तिकडेही अनेक अत्यंत प्रतिभावान कलावंत आहेत. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिकांमध्ये झळकणाऱ्या, गायिका-लेखिकाही असलेल्या बुशरा अन्सारी त्यापैकीच एक आहेत. आपल्या वहिदा रहेमान, आशा पारेख यांच्या अभिनयशैलीचे एक अप्रतिम मिश्रण त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्यात खळाळता विनोद निर्माण करण्याची क्षमता आहे. पुढील महिन्यात १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बुशरा जेव्हा पडद्यावर अवतरतात. तेव्हा पडदा पूर्णपणे व्यापून टाकतात. चाळीसपेक्षा अधिक सिनेमा, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केला आहे. पण त्या केवळ कलावंतच आहेत, असे नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहत नाहीत. इतिहासात जे घडले ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटूता कशासाठीॽ असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत – पाकिस्तानात तणाव वाढला. अणुयुद्ध होणार का, असे वातावरण मिडिआवाले तयार करू लागले. तेव्हा बुशरा यांनी ‘हमसाये माँ जायी’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मिडिआवाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे. युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेम भावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची एक बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहिण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली आहे. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रीत झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंर्तमुख केले. गाण्याचा भावार्थ समजून तसे वागले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही सोशल मिडिआवर लोकांनी दिल्या. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून मांडला. ‘बुशरा’ नावाचा अर्थ अचूकता. परिपूर्णता, अचूकतेचा ध्यास असलेली व्यक्ती असा आहे. हा अर्थ त्यांनी सार्थ केला आहे. अर्थात कलावंत होण्याचे, व्यक्तीस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचे बीज त्यांच्यात वडिलांकडून पेरले गेले. त्यांचे वडिल अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्या बाल कलावंत म्हणून काम करू लागल्या. पण त्यांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवर आलेल्या फिफ्टी-फिफ्टी या विनोदी मालिकेतून. १९८३मध्ये त्यांच्या ‘आंगन तेडा’ मालिकेने एकच खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीतही आल्या होत्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद हे पाकिस्तानच्या जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक, विचारवंत. त्यांची ‘लूज टॉक’ मालिका प्रचंड लोकप्रिय होती. त्यात ते आणि ताकदीचे अभिनेते मोईन अख्तर समाजातील दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा यांनी जी वेगवेगळी रुपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. पण, तरीही असे वाटते की, त्यांच्यातील प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग, भुमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले. फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा आणखी कस लागला असता. त्यांना विविधांगी भूमिका मिळाल्या असत्या. अन् भारतात आणखी एका रुपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर पडली असती.

Thursday, 18 March 2021

अमेरिकी

जगावर दादागिरी करणारा, भांडवलशाहीचा महामेरू, स्वैराचारी अशी असंख्य दूषणे अमेरिकेला दिली जातात. पण कोणी कितीही नावे ठेवत असले तरी तो महाकाय, महाप्रचंड, अति प्रगत देश आहे. तेथे भौतिक सुविधांची रेलचेल तर आहेच. शिवाय वैयक्तिक स्वातंत्र्याचाही बोलबाला आहे. जगभरातील लोकांना आकृष्ट करणारी शेकडो पर्यटनस्थळे आहेत, ही वस्तु्स्थिती आहे. अनेकांनी त्याविषयी लिखाण केले आहे. प्रवास वर्णनेही आली आहेत. पण तेथील खाद्यसंस्कृती, सामाजिक, सांस्कृतिक जीवन कसे आहे. सामान्य अमेरिकन माणूस कसे जीवन जगतो. त्याचे राहणीमान कसे असते. संकटांना तो कसा सामोरा जातो. तेथील आरोग्य सेवा अत्युच्च दर्जाची आहे, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ती कशी आहे. अमेरिकी लोक परदेशी पाहुण्यांना कशी वागणूक देतात, याविषयी मराठीमध्ये एखाद्या गृहिणीकडून फारसे लिखाण झालेले नाही. ही कसर डॉ. मधु निमकर यांच्या ‘स्वातंत्र्यदेवतेच्या गावात’ या पुस्तकाने ठळकपणे भरून काढली आहे. २००८च्या सुमारास डॉ. निमकर अमेरिकेत वास्तव्यास होत्या. त्यावेळी बलाढ्य महासत्ता आतून कोसळत होती. आर्थिक आघाडीवर स्थिती वाईट होती. सुदैवाने बराक ओबामा अध्यक्ष झाले. त्यांनी एका विशिष्ट दिशेने निघालेल्या अमेरिकेला सर्वसमावेशकतेचा मंत्र दिला. हा सगळा कालखंड डॉ. निमकरांनी पाहिला. अनुभवला. त्यांच्याकडे भारतात असताना लिखाणाचा मजबूत अनुभव होता. एका मोठ्या कंपनीत त्यांनी जनसंपर्काचे विपुल काम केले होते. त्यामुळे त्यावेळी कृषीवलचे आणि आता दिव्य मराठीचे राज्य संपादक असलेले संजय आवटे यांनी त्यांना कृषीवलमध्ये लिहिण्याविषयी सुचवले. त्या लेखांचे पुस्तक म्हणजे ‘स्वातंत्ऱ्यदेवतेच्या गावात’ आहे. सप्तर्षी प्रकाशनाने ते प्रकशित केले आहे. ७० पेक्षा अधिक छोटेखानी लेख असलेल्या या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अमेरिका देश नेमका कसा आहे, हे अतिरंजित पद्धतीने उलगडून सांगण्याचा, समजावण्याचा डॉ. निमकरांनी मुळीच प्रयत्न केलेला नाही. उलट अमेरिकेकडे निघाल्यापासून ते तेथे स्थिरावण्यापर्यंतचा सारा प्रवास त्यांनी अतिशय सोप्या, सहज शब्दांत मांडला आहे. त्यामुळे प्रत्येक पानावर लेखिका आपल्याशी मनातील भावना व्यक्त करत सहजपणे बोलते आहे, असे वाटत राहते. सर्वात महत्वाचे हा संवाद एका सामान्य भारतीय गृहिणीचा आहे, असे जाणवत राहते. त्यामुळे त्यातील ओलावा, भावनिकता, आपुलकी मनाला भिडते. अमेरिकेची समाज रचना कशी आहे. तेथील दैनंदिन व्यवहार कसे चालतात. भारतीयांचे नेमके स्थान काय आहे. त्यांची तेथील जगण्याची लढाई कशी असते, याची सुरेख, ओघवती मांडणी डॉ. निमकरांनी केली आहे. वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी दिलेली परीक्षा, नायगारा फॉल्स, महानगरी न्यूयॉर्क, घर खरेदी असे अनुभ‌व त्यांच्यातील लेखिका, मुक्त पत्रकाराचा परिचय करून देतात. ग्रेट रिसेशन आणि अमेरिका प्रकरणात त्यांनी त्यावेळच्या आर्थिक संकटाचे अतिशय बोलक्या शब्दांत वर्णन केले आहे. या संकटाने तेथील भारतीयांचे जीवन कसे डळमळले. प्रत्येकाच्या संसारावर कसा परिणाम झाला, हे वाचताना ती कुटुंबेच डोळ्यासमोर उभी राहतात. एका आजारपणामुळे अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आलेला अनुभवही थरथरून टाकतो. जणूकाही आपण सिनेमातील प्रसंग पाहतो की काय, असे वाटते, एवढा जिवंतपणा आला आहे. एकूणात हे पुस्तक अमेरिकेचे एक वेगळेच दर्शन घडवते. तेथील समाजजीवन आतून शोधते, याविषयी शंका नाही.

Tuesday, 2 March 2021

डफवाली

ओशो रजनीश प्रवचनात सांगत की, अग्नीवर नियंत्रण आणि चाक या दोन शोधांमुळे माणसाचे जीवन बदलून गेले. आगीचा वापर करून तो वन्य श्वापदांपासून स्वत:चे संरक्षण करू लागला. मांस भाजण्याची कलाही शिकला. चाकांमुळे त्याला प्रवास, स्थलांतर सोपे झाले. हा तर झाला बाहेरील शोध. पण माणसाला अंर्तमनातील आनंदाची पहिली वाट कशी सापडली असावीॽ प्रख्यात संगीतकार भास्कर चंदावरकर यांनी एका व्याख्यानात याविषयी सांगितले. ते म्हणाले होते की, लाखो वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलात आदिवासी टोळीतील कोणीतरी लाकडाच्या पोकळ ओंडक्यावर हात आपटला आणि त्यातून ध्वनी निघाला. तो ऐकून त्याच्या मनात आनंदाचा तरंग निर्माण झाला. या तरंगाचे रुपांतर त्याने पुढे वाद्य संगीतात केले. कोणतेही वाद्य ऐकले की, माणसाचे मन आपोआप त्या ध्वनी तरंगाकडे आकर्षित होते. रक्ताभिसरणावर परिणाम करते. चित्र, नृत्य, नाट्य, अभिनयाप्रमाणेच संगीतही जात, धर्म, पंथ, प्रांताच्या भिंती एका क्षणात जमीनदोस्त करते. अत्युच्च दर्जाचे संगीत आनंदाच्या असंख्य लाटा उसळवते. इराणच्या प्रख्यात डफवादक नघमा फराहमंद जेव्हा डफावर ताल धरतात, तेव्हा हाच अनुभव येतो. आपल्या मनात इराणची प्रतिमा कट्टर कलाविरोधी देश अशी आहे. त्यात तथ्यही असावे. पण तेथे कलेच्या प्रांतात काहीच घडत नाही. संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनयाची त्यांची कवाडे बंद झाली आहेत, हेही तितकेसे खरे नाही. जगद्विख्यात सिनेमा दिग्दर्शक माजेद माजिदी यांच्या सिनेमातून ते स्पष्ट होते. अनेक इराणी तरुण, तरुणी कलेवर निरासक्त प्रेम करतात. आपल्या कला कौशल्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. नघमा फराहमंद त्यात अग्रणी. सोशल मिडिआवर त्यांच्या नावाने सर्च केले तर एक इराणी सौंदर्यवती हातात डफ घेऊन तल्लीन झाल्याचे चित्र दिसते. एक क्षण असे वाटते की, सिनेमातील अभिनेत्रीने व्यक्तीरेखेची गरज म्हणून हातात डफ घेतला असावा. पण पुढे जाऊन पाहाल तर आश्चर्याचे धक्के बसत जातात. नघमांची नाजूक, लांबसडक बोटे अलगद डफाशी संवाद साधू लागतात. त्यातून प्रारंभी गंभीर ध्वनी ऐकू येऊ लागतो. पुढे काय होणार, असा प्रश्न मनाला पडत असताना काही मिनिटांतच डफ अक्षरश: हुंकारू लागतो. जणू काही डफाचा कोपरान् कोपरा बोलू लागतो. आपल्याला काहीतरी सांगू लागतो. पुढे नघमा यांची बोटे इतक्या वेगाने आणि विलक्षण आवेशाने फिरू लागतात. त्या अगदी सहजपणे हुंकाराचे रुपांतर कडकडाटात करतात. हा कडकडाट इतक्या टिपेला जाऊन पोहोचतो की आपण देहभान विसरून जातो. एवढी ताकद नघमा यांच्या वादनात आहे. भारतात अनेक महिलांनी तालवाद्यांत निपुणता मिळवली आहे. पण धार्मिक बंधनात जखडलेल्या अरबी राष्ट्रांमधील तरुणी छंदापलिकडे जात कला जोपासना करत असतील. व्यावसायिक वादक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असतील, तर ते अधिक कौतुकास्पद आहेच. इराणचे प्रख्यात संगीतकार महमूद फराहमंद यांची कन्या असलेल्या नघमांनी वादन कौशल्य मर्यादित ठेवलेले नाही. त्या जगभरात मैफली करतातच. शिवाय डफ आणि इतर तालवाद्य वादनाचे प्रशिक्षणही देतात. आज युरोपातील अनेक देशात त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी संगीतमय प्रवास सुरू केला. आधी त्या फरामर्झ पेव्हार, शांग कामकर यांच्या मार्गदर्शनात संतूर वादन शिकल्या. काही वर्षातच त्या डफ वादनाकडे आकर्षित झाल्या. कारण डफामध्ये आध्यात्मिक ध्वनी असल्याचे त्यांना वाटू लागले. वडिलांकडून वारसाने मिळालेली अलौकिक प्रतिभा, गुरुंचे मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत या बळावर नघमा पाहता पाहता पारंगत झाल्या. जर्मनी, स्वित्झर्लंड, जपान, फ्रान्स, इटली, कुवैत, ऑस्ट्रियातील अनेक महोत्सव त्यांनी गाजवले. त्यांचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्या केवळ इराणी, अरबी संगीत परंपरांच्या वर्तुळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. बल्गेरियन, तुर्की, भारतीय आणि युरोपिअन संगीतातही त्या समरसून गेल्या आहेत. विविध संगीत संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. प्रख्यात कलावंत अँटोन आपोस्टोलोव्ह म्हणतात की, मी ज्या महिला तालवादकांसोबत काम केले. त्यात नघमा सर्वोत्कृष्ट आहेत. कारण त्या पारंपारिक पद्धतीने डफ वादन करताना नव्या शैलीचे अगदी सहजपणे मिश्रण करतात. त्यासाठीचे एक अतुलनीय तंत्र त्यांच्याकडे आहे. अरबी कलाप्रेमी युवतींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून नघमा परिचित झाल्या आहेत. त्यांनी तालवादक महिलांची एक पिढीच निर्माण केली. अर्थात हे सारे त्यांना इराणमधून बाहेर पडत २०१० मध्ये कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारल्यावर साध्य करता आले. यशप्राप्तीसाठी कोणती तरी चौकट मोडावीच लागते नाॽ

Sunday, 21 February 2021

शशी‘कथा’

मोदी, हिंदुत्वावर सतत टीका आणि रुपेरी पडद्यावर चतुरस्त्र भूमिका अशा दुहेरी संगमामुळे तापसी पन्नू प्रसिद्धीच्या झोतात असते. सध्या ती ‘शाब्बाश मिठू’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये गर्क आहे. काही दिवसांपूर्वी तिनेच शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मिडिआवर टाकून ही माहिती दिली. ‘शाब्बाश’ची कहाणी प्रख्यात महिला क्रिकेटपटू, भारताची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते. राहुल ढोलकिया त्याचे दिग्दर्शन करत आहे. कोरोनामुळे ‘शाब्बाश’चे वेळापत्रक लांबले. मिताली राज म्हणजे भारताची सर्वात यशस्वी खेळाडू. संघर्षातून यशाचे शिखर गाठताना तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. कोणताही सिनेमा चालायचा असेल तर त्यासाठी एक चमकदार गोष्ट लागते. यशस्वी, विक्रम प्रस्थापित करणाऱ्या खेळाडूची जीवनकहाणी विकली जाऊ शकते, याचा काही निर्मात्यांचा अंदाज असतो. त्यामुळेच अलिकडील काळात त्यांनी त्याकडे थोडे जास्त लक्ष वळवले आहे. फरहान अख्तरचा मिल्खासिंग, सुशांतसिंगचा धोनी त्याची काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी प्रियंका चोपडाचा ‘मेरी कोम’ बराच गाजला. भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा यांच्यावर सिनेमा येणार, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. पण ही कहाणी प्रत्यक्षात येण्यात अडचणी येत आहेत. ही सगळी झाली हिंदी जगताची सफर. मराठीमध्ये कायॽ याचे उत्तर काही नाही, असेच म्हणावे लागेल. मराठी खेळाडू राहू द्या. ज्या राजकारणाने अख्खा मराठी मुलुख कायम व्यापलेला असतो. त्यातील एखाद्या मराठी महिलेची गोष्ट पडद्यावर येत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री, पॉवरफूल मंत्री झाली नाही. मराठी निर्माते, दिग्दर्शक गाजलेल्या राजकारण्यांना पडद्यावर आणण्यापासून दूरच राहिले आहेत. अरुण साधू, जब्बार पटेलांचा सिंहासन हा मराठीतील अत्यंत गाजलेला राजकीय सिनेमा. त्यात रिमा लागू वगळता दुसऱ्या महिलेची व्यक्तिरेखा ठसा उमटवत नाही. ती देखील लोचट राजकारण्यांना गळाला लावणारी, नवरा बुळचट असल्याने सामर्थ्यवान सासऱ्यावर भाळलेली दाखवली आहे. भारताच्या राजकारणावर अलिकडे जया जेटली, ममता बॅनर्जी, जयललितांनी प्रभाव टाकला. अर्थात ममता, जयललितांच्या तुलनेत जेटलींचा प्रभाव काळ फारच किरकोळ, मर्यादित राहिला. ममतांवर अद्याप सिनेमा, वेबसिरीज आली नसली तरी नजिकच्या काळात नक्कीच येईल. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेत राजकारणातील महिलांच्या अनेक कहाण्या छोट्या-मोठ्या पडद्यावर येत असल्याचे दिसते. जयललितांवर आधारित एक वेबसिरीज लॉकडाऊनच्या काळात प्रचंड गाजली. दुसरी येऊ घातली आहे. आता आणखी एक वादग्रस्त व्यक्तिरेखा तमिळनाडूत पुन्हा उदयास येऊ पाहत आहे. तिचे राजकारणात काय व्हायचे ते होईल. पण तिचे जीवन एका सिनेमाच्या कहाणीला लाजवेल असे आहे. ती व्यक्ती म्हणजे व्ही. के. शशिकला. एकेकाळी जयललितांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार वर्षे तुरुंगवास भोगून राजकारणात परतल्या आहेत. अद्रमुक पक्षावर ताबा घेण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. एकेकाळचे सहकारी विरोधात गेले. तुरुंगात चार वर्षे घालवल्यावर एखादी महिला मुकाट्याने शांत बसली असती. पण शशिकला येत्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे जुळवून मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहेत. जेमतेम शिक्षण असलेल्या शशिकला एवढ्या प्रभावी कशा झाल्या. याच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. त्यांचे पती एम. नटराजन यांची एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सलगी होता. हा अधिकारी जयललितांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने शशिकलांनी जयललितांशी संधान बांधले. ते एवढे कसून होते की, पुढील काळात शशिकलांशिवाय श्वास घेणेही जयललितांना कठीण जाऊ लागले. सत्तेची धुंदी, माज बहुतांशवेळा सत्ताप्रमुखाआधी त्याच्याभोवतीच्या कोंडाळ्यावर चढतो. जयललितांभोवती फक्त शशिकलांचे कोंडाळे होते. त्यांनी भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले. मग निवडणुकीत पराभूत झालेल्या जयललितांनी निग्रहाने त्यांची घरातून हकालपट्टी केली. पण शशिकलांनी पुन्हा बाजी पलटवली. काही वर्षांतच पक्षाचा जवळपास पूर्ण ताबा मिळवला. त्यांची ताकद इतकी वाढत गेली, की त्यांचाच शब्द म्हणजे प्रमाण मानला जाऊ लागला. नियतीनेही अशी काही खेळी केली की, एकेकाळी व्हिडीओ पार्लर चालवणारी ही महिला दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्रीही झाली. आणि काही महिन्यातच तुरुंगातही पोहोचली. आता तेथून बाहेर पडल्यावर डरकाळ्या फोडू लागली आहे. अनेक नाट्यमय वळणे असलेली शशिकलांची कहाणी दक्षिणेतील मंडळी मोठ्या, छोट्या पडद्यावर आणतील आणि गाजवतील. आपल्या मराठी प्रांतात नजिकच्या काळात असे व्यक्तिमत्व, ताकदीची महिला राज पटलावर येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी शशिकलांची कहाणी मराठी बाजात बांधून मांडली तर रसिकांना नक्कीच पसंत पडेल. किमान नव्या, धाडसी प्रयोगाची नोंद होईलच. शेवटी सिनेमा, छोटा पडद्याला एका चमकदार कहाणीची गरज असतेच नाॽ

Wednesday, 3 February 2021

शेळीच वात्तड होती

केबिनमध्ये बळजबरी केल्याच्या आरोपातून मिथुन चक्रवर्ती निर्दोष सुटतो. मल्लिका साराभाई न्यायालयाच्या आवारातच त्याला थांबवते. आणि अतिशय तळतळून जी सहा वाक्ये बोलते. ती कानावर अक्षरशः बॉम्बगोळ्यासारखी कोसळतात. असं वाटतं की, पुरुषी मानसिकतेचा क्रूर, ढोंगी, दांभिक बुरखा तिनं पेटवून दिला आहे. बधिर व्यवस्थेच्या कानात ज्वालामुखीचा लाव्हा ओतत आहे. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू चटर्जींच्या ‘शीशा’ सिनेमातला तो प्रसंग आजही अनुभवाला येतो. भारत स्वतंत्र झाल्यावर दोन दशकांनी मध्यमवर्गीयांची संख्या वाढू लागली. त्यांच्या आशा-आकांक्षा, मानसिकतेचे नवे, लपलेले पैलू बासुदांनी त्यांच्या अनेक सिनेमात खोलवर मांडले. ‘शीशा’मध्ये मध्यमवर्गीयांच्या निमित्ताने एकूणच पुरुषी रचनेचा एक चेहरा त्यांनी दाखवला. त्या काळात मिथुन चक्रवर्ती, मुनमुन सेन, मल्लिका साराभाईंच्या मध्यवर्ती भूमिका हे या सिनेमाचे एक बलस्थान. बासुदांनी टोकदार दिग्दर्शन तर केलेच शिवाय शंकर यांच्या मूळ कथेवर अतिशय कसदार पटकथाही बांधली. त्याचे कथानक असे होते की, दिनेश प्रकाश म्हणजे मिथुन एका बड्या कंपनीचा सीईओ आहे. त्याचा मनिषा म्हणजे मुनमुन सेनशी प्रेमविवाह झालाय. विवाहाचा पहिला वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असते. आणि त्याचवेळी टेलिफोन ऑपरेटर म्हणजे मल्लिका साराभाईवर बळजबरी केल्याच्या आरोपाखाली मिथुनला अटक झाल्याची बातमी येते. मुनमुनचे भावविश्व उद्ध्वस्त होते. आपला नवरा असं काही करू शकतो, यावर तिचा विश्वासच बसत नाही. दुसरीकडं ‘मी बळजबरी केलेलीच नाही. मल्लिकाच माझ्या गळ्यात पडली. मी तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिल्यावर तिनंच मला अडकवण्याचा प्रयत्न केला.’ असं मिथुन सांगत राहतो. खटला सुरू होतो. हळूहळू मिथुनच्या कार्यालयात कंड्या पिकू लागतात. मल्लिकाच कशी बदचलन आहे. यापूर्वीही तिने बड्या अधिकाऱ्यांना कसे जाळ्यात पकडून ब्लॅकमेल केले, याच्या कहाण्या सांगणे सुरू होते. तेव्हा मुनमुन नेमकं काय घडलंय, याचा शोध घेऊ लागते. मल्लिकाच्या वस्तीतील एक ज्योतिषी मल्लिकाच्या वाईट चारित्र्याचे पुरावे पोलिस ठाण्यातून मुनमुनला मिळवून देतो. ते घेऊन ती न्यायालयात जाते, मल्लिकाच वाईट चालीची बाई आहे, असे सर्वांसमोर येते. आणि त्या आधारावर मिथुनची निर्दोष मुक्तता होते. मल्लिका पुन्हा एकदा पराभूत होते. माघार घेते. पण वस्तुस्थिती तशी असते का? त्या दिवशी केबिनमध्ये खरंच तिनं मिथुनला ऑफर दिलेली असते की वेगळंच काही घडलेलं असतं? स्वत:ची नोकरी पक्की करून घेण्यासाठी तिनं त्याला मोहात पाडलेलं असतं का? त्याने निग्रहाने नकार दिल्यावर ती आरडाओरड करते का? या प्रश्नांची उत्तरे सिनेमाच्या अखरेच्या तीन मिनिटांत आणि मल्लिकाच्या सहा वाक्यात मिळतात. एकूणच पुरुषी नियंत्रणातील समाजात महिलाच महिलेकडे कशाप्रकारे बघते, हेही कळते. १९८६चा हा सिनेमा. आज २०२१. पण समाजमनात फारसा फरक पडलेला नाही. फक्त शेळीचा फडशा पाडून झाल्यावर तीच वात्तड होती, असे सांगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पुरुषाच्या काहीतरी भानगडी असतात. विशेषत: सार्वजनिक जीवनात मोठ्या पदांवर काम करणाऱ्याच्या तर त्या असतातच. पण त्या उघड करायच्या नसतात. उलट सर्वांनी मिळून त्या झाकण्याचाच प्रयत्न करायचा असतो, असा भयंकर पवित्रा बहुतांश प्रकरणात घेतला जातो. त्याला राजकारण, समाज, जात, धर्म, पंथ, मतांची गणितेही जोडली जातात. काही वेळा ‘मी टू’ सारखी चळवळ चालवणाऱ्या महिला, संघटना, प्रसारमाध्यमेही विशिष्ट प्रकरणात संधीसाधू मौन बाळगतात. त्या पुरुषाची कधी थेट कधी आडपडद्याने पाठराखणही करतात. स्त्री कशीही असली तरी तिच्या मनाविरुद्ध काहीही करण्याचा अधिकार पुरुषाला नाही, असा कायदा आहे. पण ती स्त्री वाईट चालीचीच आहे, असे सिद्ध केले. तसा गवगवा केला की, तिला लुटल्यावरही निर्दोष मुक्त होण्याचा मार्ग सापडतो, हे अनेकांना माहिती आहे. ते त्याचाच वापर करतात. चारही बाजूंनी तिच्याच चारित्र्यावर क्रूर, हिणकस, खालच्या पातळीवर जात हल्ले करतात. या हल्ल्यांनी ती हमखास मोडकळीस येते. मीच वाईट चालीची, बदनाम स्त्री आहे. मीच त्या पुरुषाला ब्लॅकमेल करत होते, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्यवस्थेकडे न्याय मागण्यात काय अर्थ आहे? मी माघार घेऊन टाकते, असा पवित्रा घेण्याशिवाय तिला पर्याय राहत नाही. तिला लुटणाऱ्या पुरुषाभोवतीची टोळकी त्या पुरुषाचा जयजयकार करू लागतात. बासुदांनी ३४ वर्षांपूर्वी ‘शीशा’मध्ये जे दाखवले तेच अजूनही सुरू आहे. होय ना?

Saturday, 23 January 2021

अम्मीचा गौरव

भारतीय पुराणात, लोककथा, कथा-कादंबऱ्यांत आईबद्दलची हजारो प्रकारची वर्णनं आहेत. हे खरं असलं तरी आईशी जाहीरपणे संवाद साधण्याचा,त्यातून समाजमन, समाजमनाच्या तळाशी सुरू असलेली उलघाल मांडण्याचा आणि त्यातून आईचं एक विशाल रूप सांगण्याचा प्रयत्न फारसा कुणी केलेला नाही. त्या अर्थाने प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक सईद मिर्झा यांचे “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ हे पुस्तक भारतीय साहित्य जगतात माइलस्टोन म्हणावे लागेल. पुण्यात १७ ते ३१ जानेवारीदरम्यान सुरू असणाऱ्या इंटरनॅशनल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने मिर्झा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. हा त्यांच्या सिनेजगतातील कर्तृत्वाचा गौरव असला तरी हे कर्तृत्व त्यांच्यात जागृत करण्याचा, फुलवण्याचा पहिला मान त्यांच्या अम्मीस आहे. “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ हे पुस्तक वाचताना प्रत्येक ओळीत ते ठसत जाते. मुस्लिम समाज म्हणजे पारंपरिकता, कट्टरता. त्यात महिलांना स्वातंत्र्य नाही. त्यांना एका विशिष्ट चौकटीतच जगावे लागते. चौकटी ओलांडण्याचे धाडस कुणी दाखवतही नाही, असे म्हटले जाते. मिर्झा यांच्या अम्मींनी ते धाडस दाखवले आणि ते ठामपणे सांगण्याचे धाडस सईद मिर्झा यांनी दाखवले आहे. अशी आई आणि असा मुलगा मुस्लिमच काय, सर्वच समाजात अतिशय दुर्मिळ. खरे तर आपण सारेच जण आपल्या आईच्या अतिशय जवळ असतो. तिच्या छत्रछायेखाली वाढत असताना तिच्या वाटचालीला, विचारांना अनुभवत असतो. आई करत असलेल्या संस्कारांत घडत असतो. त्याचे ऋण अनेक जण अलीकडील काळात वर्तमानपत्रात लिखाण करून सांगत असतात. पण आईशी मनमोकळा संवाद साधत अवघ्या विश्वाचा, समाजाचा तळ शोधण्याएवढी संवेदनशीलता सईद मिर्झांसारख्या कलावंतातच असते. वरवर पाहता हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्र अशी धारणा होते. पण त्या अर्थाने ते आत्मचरित्र नाही तर त्यांनी राजकीय वादळे, संस्कृतीतील बदल, सिनेमाच्या संहिता, प्रवास अशी एक आगळीवेगळी रचना त्यात केली आहे. कुणीही व्यक्ती आईला पत्र लिहील तेव्हा त्यात राग, लोभ, चिंता, व्यथा असणारच. मनात साचलेला विचार मुक्त करण्याची भावना असते. पण त्यात एक आपुलकी, आस्था आणि हक्काचे स्थान असते. या पुस्तकात मिर्झा यांनी तोच धागा ठेवला आहे. तसे म्हटले तर “अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर’ एक प्रकारे राजकीय पुस्तकही आहे. पण केवळ तेवढ्यापुरते ते मर्यादित राहत नाही. वैज्ञानिकता, नव्या विचारांचा सहज स्वीकार आणि सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वधर्मसमभाव यावर ठाम विश्वास असलेल्या आणि त्यानुसारच जीवन जगलेल्या एका मातेचीही गोष्ट या पुस्तकात आहे. भारतीय उपखंडात १९३० नंतर घडलेल्या अनेक घडामोडींचा चित्तवेधक प्रवास यात आहे. कारण १९३०च्या दशकात मिर्झा यांचे माता-पिता मुंबईत आले. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानऐवजी भारताची निवड केली. कारण स्वातंत्र्यानंतर भारतानं स्वीकारलेली धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना मिर्झा यांच्या अम्मीला भावली होती. जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात घडू पाहणारा भारत देश आपल्या कुटुंबाला आणि समाजाला नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्यांना होता. यावरून त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वातील सखोलता लक्षात येते. त्या किती खोलवरचा विचार करत असाव्यात, याचा अंदाज येऊ शकतो. एक गृहिणी, एक आई, एक पत्नी यासोबत त्यांचे एक विश्व होते. पुढे चालून त्या विश्वाला अनेक तडे गेले. धर्मनिरपेक्षतेच्या मजबूत पायावर हल्ले झाले. त्यामुळे अम्मीच्या मनात कल्लोळ उठला. त्या विलक्षण अस्वस्थ होत गेल्या. तो कल्लोळ, ती अस्वस्थताही सईद यांनी अतिशय संवेदनशीलतेने टिपली आहे. आणि ते टिपताना कुठेही अतिरेक नाही. उगाच संशयकल्लोळ, तिखट शब्दांचा मारा नाही. त्यामुळे ते सारे वाचताना आपणही त्यात नकळतपणे जोडले जातो. आपल्या आईचा चेहरा, तिचे विचार, संस्कार शोधण्याचा नव्याने प्रयत्न करतो. अलीकडच्या काळात मुला-मुलींच्या शाळेच्या दाखल्यात आईचेही नाव लावले जात आहे. आईवर निबंध लिहा, असा एक धडाही वर्गात गिरवला जातो आणि आपण तो पुढे विसरूनही जातो. आपल्यापैकी काही जणांनी तो धडा आईसोबतच्या पत्ररूपी संवादातून, नाटक, सिनेमा, कथा-कादंबरीतून विस्तारला तर ती भारतीय साहित्य विश्वात मोलाची भर ठरेल. आई-मुलाच्या नात्याची आणि त्या निमित्ताने समाजाची विविध रूपे उलगडतील. होय ना?

Thursday, 7 January 2021

विस्तव आणि वास्तव

संभाजीनगर – औरंगाबाद असा अनेक वर्षांपासूनचा मुद्दा शिवसेनेच्या पोतडीतून पुन्हा एकदा वर काढण्यात आला आहे. हिंदुत्ववादी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या राजकारण्यांना या मुद्याची निवडणुकीच्या तोंडावरच गरज भासते. भावनिक मुद्यावरच मतदान झाले पाहिजे, अशी शिवसेनेची उघडउघड आणि इतर काही पक्षांची छुपी भावना असते. औरंगाबाद महापालिकेचा राजकीय इतिहास पाहिला तर मोठ्या संख्येने औरंगाबादकरांनी भावनेच्या आहारी जाऊनच मतदान केल्याचे दिसते. पण एकदा निवडणुका झाल्या की नामांतराचा मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. त्याचा जाब कोणीही विचारत नाही, ही या शहराची खासियत आहे. पण या वेळी पेच थोडा गुंतागुंतीचा आहे. कारण, सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आणि नामांतराला कायम विरोध असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत भागिदार आहेत. आणि आतापर्यंत शिवसेनेच्या साथीला असलेला भाजप विरोधात बसल्याने शिवसेनेच्या कोंडीची संधी शोधत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वी दिलेला शब्द खरा ठरणार की नाही, अशी वक्तव्ये करून सत्ताधाऱ्यांमध्ये फटी पाडण्याचे काम भाजप करत आहे. तर आमच्यासाठी सत्ता दुय्यम अशी टोकाची भूमिका काँग्रेसने जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही हाच सूर लावला आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर भडका उडवण्याचे शिवसेनेचे धोरण दिसते. त्यामुळे बाजूने आणि विरोधात ठिणग्या अधिक उडत आहेत. त्याची झळ अर्थातच औरंगाबादकरांना बसणार आहे. खरे तर मराठवाड्याची राजधानी असे बिरुद विनाकारण मिरवणाऱ्या या शहरात आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. नवी पाणी योजना प्रत्यक्षात येईलच, अशी हमी कोणीही देऊ शकत नाही. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटलेला नाही. कोरोनाच्या संकटातून अजून सुटका झालेली नाही. औरंगाबादचे खरे वैभव असलेल्या आणि शेकडो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या मोगल आणि निजामकालीन वास्तूंना पुर्नवैभव मिळवून देण्यात ‘औरंगाबाद’प्रेमींनाही स्वारस्य नाही. अशा स्थितीत भावनेच्या आहारी जायचे की पाणी, रस्त्यांसाठी राजकारण्यांना धारेवर धरायचे, याचा निर्णय लोकांना घेण्याची हीच ती वेळ आहे.