Friday 26 January 2018

उलट सुलट : गलबलून टाकणारा अनुभव



---
`काय मागतो हो आम्ही. तुम्हालाही मिळत असलेलं पाणी आणि
वीज आम्हाला द्या, एवढंच तर म्हणतोय. बरं, पाणी अन् 
वीज मुबलक दिली तर जे काही पिकंल ते तुमच्याच पोरा-बाळांच्या
पोटात पडणार आहे. तेही थोडं स्वस्तातच. अन्‌ आम्ही जे पिकवू ते 
केवढ्यात विकायचं हे ठरवायचा तरी आम्हाला अधिकार द्या`
असं दिनवाण्या स्वरात लाखो शेतकरी म्हणत होते. तेव्हा  
`आपण सरकारच्या तिजोरीत कर जमा करायचा आणि सरकारनं
 शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन टाकायची, हे कुठवर चालणार,` 
असा कुजबुजता सूर शहरी भागातून लावला गेला. कधी पाऊस
 नाही तर कधी जास्त पाऊस झालाय, कधी खते नाही म्हणून
 तर कधी बाजारभाव पडला म्हणून हे लोक किती दिवस रडत
 राहणार? ते आत्महत्या करतात. तर त्यात आमचा काय दोष, 
असेही फेसबुक, व्हॉटस्‌अपच्या दुनियेतच राहणाऱ्यांकडून विचारले गेले.
 त्याचं केवळ टोकदार नव्हे तर हृदयातून आरपार जाणारे उत्तर 
सुयोग निर्मित `उलट सुलट` नाटकातून मिळते. केवळ बळीराजाची
 वेदना सांगण्यापुरते ते राहत नाही तर त्यापुढे जाऊन शायनिंग
 इंडियापेक्षा भारत कसा वेगळा आहे. तो खरंच कोणत्या अवस्थेत
 जगतोय. अन्‌ प्रत्येक भारतीय माणूस शेतकऱ्याला सहज मदत
 करताना सुखी, संपन्न कसा होऊ शकतो, हेही अतिशय साध्या,
 सोप्या मनात कायम मुक्काम करेल अशा शब्दांत सांगते. त्यामुळे
 उलट सुलट एका विलक्षण उंचीवर जाऊन पोहोचते. ग्रामीण भागातील
 वास्तव प्रथमच एवढ्या निर्णायक रुपात मांडणारे हे नाटक त्या 
अर्थाने मराठी रंगभूमीवरील महत्वाचे वळण ठरणार आहे. 
कारण ज्याच्या अपार कष्टामुळं आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला मिळतो.
 त्याला आपण त्याचा योग्य मोबदला देणार की नाही. त्याचेही जगणे
 आपल्यासारखे सुखा समाधानाचे व्हावे, असा आपल्या मनात विचार
 तरी येतो की नाही. चकचकित, थंडगार मॉलमधील भाज्या 
पिशव्यांत ठेवताना या भाज्या उन्हा-तान्हात उभा राहून पिकवणारा आणि निसर्गाचा लहरीपणा अंगावर
 घेत निसर्गाशी लढणाऱ्याला जगण्याचे बळ देणे आपले कर्तव्य
 आहे की नाही, असे मूळ प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. 
स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटून गेली तरी देशातील कोट्यवधी कोरडवाहू
 शेतकरी आजही दारिद्र्यात का जगत आहेत. त्यांची लढाई पूर्ण
 भारताची लढाई का होत नाही. त्यांच्या जीवावर मोठे गबरू झालेले
 पुढारी त्यांनाच मातीत का मिसळत आहेत. गरीब शेतकऱ्यांच्या
 नावाखाली सर्व फायदे लाटणाऱ्यांना बाजूला का सारले जात नाही.
 आणि या साऱ्या जीवघेण्या प्रश्नांचे काही उत्तर आहे की नाही, 
हा सवाल देशभर घोंगावू लागला आहे. काही संवेदनशील कलावंत, 
लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांना बळीराजाच्या दुःखाने अस्वस्थ केले आहे.
 त्यावर त्यांनी थेट मैदानात उतरून शेतकऱ्यांना मदतीचा हातही देऊ केला आहे. 
चार वर्षांपूर्वी मराठी चित्रपटाचा सुपरस्टार मकरंद अनासपुरेने नाम 
फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याची सुरवात केली. शेकडो गावांमध्ये 
फाऊंडेशनने नद्यांचे खोलीकरण केले. तलावातील गाळ काढून दिला. 
त्यामुळे निसर्गाने थोडीशी कृपा करताच दुष्काळी गावांतील विहिरी डबडबल्या.
 या गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. 
रुपेरी पडद्यावरचा हा नायक गोरगरिबांच्या जीवनातील खरा नायक 
ठरला आहे. जे काम सरकारने पन्नास वर्षांपूर्वी करायला
 हवे होते. ते आज नाम फाऊंडेशनने केले आहे. तेही सरकारपेक्षा
 किती तरी कमी खर्चात. शेतकऱ्यांनाच सोबत घेऊन त्याने 
हा बदल घडवून दाखवला आहे. पण केवळ मुबलक पाणी उपलब्ध
 झाल्याने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. त्याला हमीभावासाठी
 सरकारची मदत लागणार आहे. व्यापारी, दलाल, खत कंपन्यांकडून
 होणारी पिळवणूक कधीतरी थांबेल या आशेवर तो जगत आहे. 
त्याची आशा मान मुरगळून पडण्याआधी त्याला सावरले गेले पाहिजे. 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोट्यवधी छोट्या शेतकऱ्यांचे नेमके
 काय प्रश्न आहेत, हे शहरी लोकांना एक कलावंत म्हणून समजावून
 सांगणे असे मकरंदला वारंवार वाटत होते. आणि त्याचवेळी त्याच्याकडे
 किरण मानेंनी लिहिलेल्या या नाटकाची संहिता आली. आणि त्यावर
 माने आणि मकरंद तसेच दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अक्षरशः
 झपाटून जात काम केले. नामच्या निमित्ताने महाराष्ट्राचा 
कानाकोपरा पायाखाली घातलेल्या आणि वाड्या-तांड्यावरील शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतलेल्या मकरंदने 
संहितेत हे सारं काही येईल, असे बदल सुचवले. शेतकरी कुटुंबातील
 किरण मानेंनेही ते अतिशय ताकदीने प्रवाहित केले. पावसाचा थेंब न थेंब
 जशी काळी माती उरात सामावून घेते तसा दिग्दर्शक सोहोनी यांनी 
संहितेतील शब्द न शब्द रंगमंचावर अविष्कृत केला आहे. 
काही संवादांवर प्रेक्षागृहामध्ये फुटणारे हुंदके हे सारे लोकांपर्यंत
 पोहोचल्याची साक्षच देतात. नाटक शेतकऱ्यांविषयी असले तरी ते 
प्रामुख्याने शहरी लोकच पाहणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न 
मध्यम, उच्च मध्यमवर्गापर्यंत पोहोचवणे हाच हे नाटक उभे
 करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. ते साध्य करताना सादरीकरण
 एकतर्फी झाले तर ते केवळ प्रचारकी थाटाचे होईल आणि 
त्यात व्यावसायिक मूल्य काहीच राहणार नाही, याची कल्पना
 मकरंद, किरण आणि सोहोनी यांना होतीच. त्यामुळे त्यांनी
 काही संवादांतून शेतकऱ्यांमधील त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे. 
शिवाय पुढील काळात बळीराजाने काय करायला हवे, अशी
 अपेक्षा व्यक्त करताना तथाकथित शेतकरी नेत्यांवर आसूडही
 चालवला आहे. शहरी माणसांना शेतकऱ्यांविषयी काहीच आस्था नाही.
 तमाम शहरी लोक शेतकऱ्यांचे शत्रूच आहेत. हा विषारी प्रचार 
योग्य नाही. शेतीशी काहीही संबंध राहिला नसलेले लोकही
 शेतकऱ्यांना मदत करू इच्छितात. त्यांचे जीवन बदलण्यासाठी
 वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी काही शहरी लोक 
दाखवत आहेत, हेही या नाटकात आवर्जून, लक्षात येईल 
इतक्या ठळकपणे मांडले गेले आहे. नाटक म्हणून एक नाट्य 
प्रेक्षक, रसिकांना अपेक्षित असते. ते देखील योग्य जागी पेरण्याचे
 कौशल्य लेखक-दिग्दर्शकाने दाखवले आहे. म्हणून `उलट सुलट`चे 
कथानक `असं होणं कसं शक्य आहे,` असे वाटत असतानाही
 गुंतवून ठेवतं आणि अखेरच्या टप्प्यात तर गलबलून टाकतं.
हे नाट्यमय कथानक असं की, मुंबईतील धनाढ्य वकिल आणि 
अन्न-धान्य आयात करणाऱ्या कंपनीचा मालक असलेला 
अभय देशमुख (किरण माने) आणि त्याचा मित्र 
विश्वजित (समीर देशपांडे) सरकारी यंत्रणेचा वापर करून तूर डाळ
 आयात करतात. यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होते.
 सदानंद मानूरकर या शेतकऱ्याची (मकरंद अनासपुरे) बायको, मुलगी 
विष पिऊन आत्महत्या करतात. अडीच एकरचा मालक 
सदानंद शेतीत काही खरं नाही, असं म्हणून मुंबईत टेंपो चालवण्याचं
 काम करू लागतो. एक दिवस देशमुखची बायको आणि दोन मुलं 
हायवेवर जात असताना त्यांची कार सदानंदच्या टेंपोला धडकते. 
अब्जाधीश देशमुखचं जीवन उद्‌ध्वस्त होतं. 
पण तो सदानंदवर गुन्हा दाखल करायचा नाही, असं ठरवतो. 
आणि देशमुखच्या तूर डाळ आयातीमुळं आयुष्यच संपलेला 
सदानंद आणि सदानंदच्या टेंपोला कारच्या धडकेमुळं 
बायको-मुलांना गमावलेला देशमुख यांचा आमना-सामना होतो. 
पुढं काय होतं. ज्याच्यामुळं आपल्या बायको-मुलीनं विष पिलं तो नेमका कोण, 
हे सदानंदला कसं कळतं. आणि कळाल्यावर तो काय करतो, याचे 
उत्तर नाटक पाहताना मिळते. आधीच म्हटल्याप्रमाणे मातब्बर दिग्दर्शक
कुमार सोहोनी यांनी संहिता आत्मसात करून त्यातील प्रत्येक
 शब्दांवर प्रचंड मेहनत केली आहे. सादरीकरणाचा प्रवाह, 
प्रसंगांमधील नाट्यमयता काही क्षणानंतर टोकाला 
जाण्यासाठी निघेल आणि टोकाला पोहोचेलच याची काळजी
 त्यांनी घेतली आहे. मांडणीवरील त्यांची पकड जाणवत राहते. 
फक्त सदानंद, देशमुख मद्य प्राशन करून एकूण शेतकरी प्रश्नाची उलगड
 करतात, या प्रसंगाची लांबी आणि दोघांच्या हालचाली किंचित
कमी व्हाव्यात, असे वाटते. 
महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि तमाम शेतकऱ्यांच्या 
जीवनातील खराखुरा नायक मकरंद अनासपुरे 
हा `उलट-सुलट`चा केंद्रबिंदू. विनोदी भूमिकांच्या वर्तुळातून बाहेर
 पडत आपणही गंभीर व्यक्तिरेखा लिलया सादर करू शकतो, 
हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मुळातच मकरंद 
ग्रामीण भागातून आलेला आणि गावकुसांशी नाळ जोडलेला. 
त्यात नामच्या निमित्ताने शेतकऱ्यांची दुःखे काळजात खोलवर रुतलेला. 
त्यामुळे त्याने अनेक पैलू असलेला सदानंद अक्षरशः जिवंत 
केला आहे. तो रंगमंचाच्या चौकटीबाहेर पडून रसिकांशी थेट बोलतो. 
त्याचा रंगमंचावरील वावर, व्यक्तिरेखेवरील पकड, मुद्राभिनय 
आणि शब्दांमध्ये दडलेले अर्थबीज बाहेर काढून लोकांच्या 
मनात पेरणे सारेच `उलट-सुलट`चा पट सामर्थ्यवान करत जाते. त्याला 
तेवढीच चांगली साथ किरण मानेकडून मिळाली आहे. गडगंज पैसेवाला, 
कुटुंबच दैवगतीला प्राप्त झाल्याने कोलमडलेला, ज्याच्यामुळे
 आपले कुटुंब संपले तोच आपल्यासमोर उभा असल्याचे
 कळाल्यावर संतापलेला आणि आपले कुटुंब संपवणाऱ्याचे
 कुटुंब आपल्यामुळेच कधी काळी आयुष्यातून उठले असे
 कळाल्यावर हादरलेला अभय देशमुख त्यांनी अप्रतिम 
उभा केला आहे. शहरी माणसाला शेतकरी प्रश्नाबद्दल नेमके
 काय वाटते हे त्यांनी अजिबात न बिचकता ठामपणे उभे केले आहे.
 आणि त्यात शहरी माणसाचं कुठं चुकतंय, हेही लक्षात आणून
 देताना त्यातील अपराधीपणाची भावनाही तेवढ्याच ताकदीने
 प्रकट केली आहे. मकरंदसारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर उभे
 राहताना किरणचे पाय रंगमंचावर घट्ट रोवलेले असल्याने
 सर्व प्रसंग रंगतदार होत जातात. समीर देशपांडेचा विश्वजित तेवढाच
 महत्वाचा. अभयच्या मदतीने कोट्यवधींची उलाढाल करणारा, 
महिलांच्या वर्तुळात वावरत महिलांचा योग्य प्रसंगी वापर
 करायचाच असतो, असं म्हणत ते अंमलातही आणणारा, 
व्यवसाय हेच दैवत मानणाऱ्यांचा नायक त्यानं देखणेपणाने उभा 
केला आहे. कृतिका तुळसकरच्या वाट्याला इशिताची 
भूमिका आली आहे. एक स्वैर, बिनधास्त बाई ते ग्रामीण भागातील
 जीवन जाणून घेऊ इच्छिणारी, स्वतःच्या आयुष्यात बदल घडवू
 पाहणारी महिला असा प्रवास तिने मोजक्याच प्रसंगांत चांगलाच
 लक्षात राहिल इतपत केला आहे. तनवी पंडितने श्वेताच्या
 भूमिकेला न्याय दिला आहे. प्रदीप मुळ्ये यांचे 
नेपथ्य डोळ्यात भरणारे. अभय देशमुख या अब्जाधीशाचे घर
 आलिशान, दोन मजली घर उभे करताना त्यातील सारे तपशील
 अचूकपणे ठसवले आहेत. साहित्याची बरीच गर्दी असूनही
 पात्रांना फिरण्यासाठी व्यवस्थित जागा राहिल, हेही 
पाहिले आहे. भुषण देसाईंची प्रकाश योजना, राहूल रानडेंचे
 संगीत संहितेला आणखी सखोल करणार आहे.