Wednesday 30 September 2015

हा ठेवा नव्या रुपात जपायलाच हवा

चौदा कलांचा अधिपती, चौसष्ट विद्यांचा महामेरु असलेल्या गणेशाचा उत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या देवतेला पुढल्या वर्षी लवकर या, दुष्काळाचे अरिष्ट दूर करा, असे साकडे घालत निरोप दिला. त्यात कलावंत मंडळींचाही समावेश होता. मात्र, ही मंडळी यंदा काहीशी हळहळल्या सारखी वाटत होती. कारण गणेशोत्सव म्हणजे विविध कलागुणांचे दर्शन असे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून पाहण्यास मिळत होते. यावेळी कुठेही नाट्य, गायन, चित्र अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांना सादरीकरणाची संधीच मिळाली नाही. केवळ औरंगाबादच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात कमी अधिक फरकाने अशीच स्थिती होती. त्यामागे दुष्काळी वातावरण हे प्रमुख कारण असले तरी कलाप्रांताविषयी वाढती अनास्था आहे. शिवाय कलावंत मंडळीही नव्या वाटा शोधण्यात कमी पडत आहेत, असे वाटते. एकेकाळी गणेशोत्सव म्हणजे कलावंत तयार होण्याची खाण होती. त्याचे मराठवाड्यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे, प्रख्यात लोककलावंत विश्वास सोळुंके. हे दोघेही मातब्बर. त्यांनी त्यांच्या आठवणीत गणेशोत्सवाचा आवर्जून उल्लेख केला होता. ते सांगत की, गणेशाचे आगमन होण्याच्या महिनाभर आधीच बाल कलावंतांना मेळ्याचे वेध लागत. वाड्यांच्या ओसरीत, गल्लीतील खुल्या जागेत रात्री उशिरापर्यंत तालमी होत. पट्टीचे गीतकार सामाजिक भाष्य करणारी गीते रचत. वादक त्यांना तालात बसवत. उत्स्फूर्त नाट्ये रचली जात. त्यात भूमिका करण्यासाठी कलावंतांमध्ये स्पर्धा असे. समूह गायन, वैयक्तीक गायनाचे संचही तयार असत. रात्रभर अक्षरश: कलावंतांचा जल्लोष असे. टीव्ही नसल्यामुळे लोक प्रचंड प्रतिसाद देत. तो कलावंतांना पुढील वर्षभर पुरत असे. मेळे हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर प्रबोधनाचे माध्यम होते. त्या काळातील सामाजिक घडामोडींवर त्यात परखड भाष्य होते. जबाबदारीची जाणिवही करून िदली जात असे. त्यामुळे समाजमन घडवण्याचे मोठे काम मेळ्यांमधून साधले जात होते. १९८४ मध्ये टीव्हीचे आगमन झाल्यावर हळूहळू मेळा परंपरेला ओहोटी लागली. त्याची जागा नाटकांनी घेतली. गणेश मंडळाचे हरहुन्नरी कलावंत छोटेखानी नाट्यप्रयोग सादर करू लागले. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. काही ठिकाणी हौशी, अर्ध व्यावसायिक नाट्य कलावंतांनाही निमंत्रित केले जात होते. पुरुषोत्तम खोपटीकर, विवेक दिवटे यांनी १९९० च्या दशकात विनोदी नाटकांची बहार उडवून दिली होती. त्यांच्या डार्लिंग डार्लिंग, टूरटूर नाटकांमध्ये मकरंद अनासपुरे, मंगेश  देसाई या सध्या चित्रपट क्षेत्रात नाव कमावलेल्या अभिनेत्यांनीही कामे केली होती. श्रीमंत गणेश मंडळे मुंबई, पुण्याहून व्यावसायिक नाट्य प्रयोगांना निमंत्रण देत. शिवाय बड्या गायकांच्या मैफली होत. जुन्या औरंगाबादेतील मंडळांमध्ये तर ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या तारखा मिळवण्याकरिता धडपड सुरू असे. हे सारे टप्प्या टप्प्याने विसर्जित होत गेले. त्यामुळे गणेशोत्सव फक्त देखाव्यांपुरता मर्यादित राहिला की काय, असे वाटत आहे. हे चित्र सुखावणारे नक्कीच नाही. त्यावर सर्वांनाच गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. कारण हा केवळ मनोरंजन किंवा कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतचा मर्यादित विषय नाही. तर सामाजिक भान प्राप्त करून देण्याशी याचा संबंध आहे. मेळे, संगीताच्या मैफली आणि नाटकाचे प्रयोग यातून संवेदनशील कलावंत तयार होत होते. समाजात नेमके काय सुरू आहे, याची ते संवेदनशीलपणे नोंद घेत आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचवत.

त्यांचेही मन घडवण्यात या कलावंतांचा मोठा वाटा होता, हे नाकारता येणार नाही. सर्व जाती, धर्माचे आणि पंथाचे लोक भेद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येत होते. त्यातून सामाजिक एकोप्याचा संदेश ठसत होता. बालवयात आवश्यक असलेला सभाधीटपणाचा, वक्तृत्वाचा संस्कार कलावंतांवर होत असे. आणि तो संस्कार खोलवर रुजावा यासाठी वरच्या फळीतील कलावंत मंडळी जाणिवपूर्वक प्रयत्न करत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या या सगळ्या वाटा बंदच झाल्या आहेत. त्या खुल्या करण्यासाठी राजाश्रयाची म्हणजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. लोकाश्रयाशिवाय सादरीकरण तर होऊच शकत नाही. म्हणून असा काही प्रयत्न झाला तर टीव्हीच्या खोक्यांबाहेर पडून लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे काळाची गरज लक्षात घेऊन कलावंतांनीही नव्या स्वरूपाची निर्मिती करावी. विविध कला दर्शनाची चपखल मांडणी केली. त्याला व्यावसायिकतेची जोड दिली तर हे शक्य आहे. मोठ्या नाटकांचे प्रयोग होणे शक्य नसल्याने दहा मिनिटांचे तीन प्रहसने केली. त्याला तीन-चार जुन्या नव्या गाण्यांची जोड दिली तर उत्तम मनोरंजनाचा कार्यक्रम सादर होऊ शकतो. शेवटी गणेशोत्सव आणि त्यात होणारे विविध कलांचे सादरीकरण हा मराठी माणसाचा ठेवा आहे. तो नव्या रुपात जपायलाच हवा. अन्यथा गणेशोत्सवासारखी महत्वाची चळवळ आपल्या हातून निघून जाईल.



Tuesday 22 September 2015

मैफलींचा सुगंध

एका प्राध्यापकाने सांगितलेला किस्सा. २५ वर्षापूर्वी एक जर्मनीचे पर्यटक जोडपे अभ्यास दौऱ्यासाठी बीड शहरात आले. ते चांगले महिनाभर मुक्कामी होते. तेथील सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास संपत आल्यावर या जोडप्याने काही करमणुकीची साधने आहेत का? अशी विचारणा केली. मग प्राध्यापक महोदयाने त्यांना आसपासच्या डोंगरदऱ्यांवर भटकंती करून आणली. तरीही त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. काही करमणूक, मनोरंजनाचे साधन नाही का? आता या जर्मन जोडप्याचे कसे मनोरंजन करावे? असा प्रश्न प्राध्यापकाला पडला. बराचवेळ विचार केल्यावर त्यांना एक कल्पना सुचली. ते त्यांना जवळच्या खेड्यातील एका टुरिंग टॉकीजमध्ये हिंमतवाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले. वाळूच्या ढिगाऱ्यावर मनसोक्त लोळत त्यांनी चित्रपटाचा आनंद घेतला. नंतर सलग चार दिवस हे जोडपे तेथेच मुक्कामी राहून हिंमतवाला पाहात होते. प्राध्यापकाने कुतूहलापोटी अखेर त्यांना विचारले. एवढे तुम्हाला या चित्रपटात काय आवडले? कुणाचा अभिनय चांगला वाटला. त्यावर त्या जोडप्याने सांगितले की, कथा, संवाद तर आम्हाला फारसे कळाले नाहीत. पण त्यातील गाणी हा प्रकार फारच भन्नाट वाटला. आमच्या जर्मन चित्रपटात गाणी वगैरे काही भागच नसतो. चित्रपट गीतांची मनापासून आवड असलेले प्राध्यापक महोदय खूपच खुश झाले. आणि मग या जोडप्याला घेऊन ते बीड शहरात  आयोजित ऑर्केस्ट्रा म्हणजे चित्रपट गीतांच्या मैफलीला घेऊन गेले. ती ऐकून तर जर्मन जोडप्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. त्यांनी त्यांच्या अभ्यास  पुस्तिकेत  भारतीय चित्रपट गीते आणि त्यांच्या मैफली असा  विषय घेत त्याचा अभ्यासही केला. चित्रपटातील गीते हुबहू भारतीय कलावंत सादर करतात. त्यात खूपच अस्सलपणा असतो. ही गीते ऐकताना भारतीय रसिक देहभान विसरून जातात. या मैफली म्हणजे  केवळ विरंगुळा नव्हेत तर आनंद मिळवण्याचे ठिकाण असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ही जुनी घटना असली तरी त्यातील अस्सलपणा कायम आहे.

असे म्हणतात की,  नाटक, कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नृत्य, शास्त्रीय व सुगम गायन म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून  सुसंस्कृत मनाची जडणघडण होत असते. माझ्या मते भारतीय त्यातही मराठी रसिकाविषयी सांगायचे झाले तर यामध्ये हिंदी, मराठी चित्रपटगीतांच्या मैफलींचाही समावेश करावा लागेल. एवढ्या त्या आपल्याशी एकरूप झाल्या आहेत. अनेक लोक अशा मैफलींची वाट  पाहत असतात. केवळ वाट पाहतात असेच नाही तर तुंबळ गर्दीही करतात. औरंगाबादमध्ये त्याचा वारंवार अनुभव येत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मल्हार ग्रुप आणि  सूर दरबारतर्फे नुकत्याच झालेल्या ‘जुस्तजू : फिर छिडी शाम’, ‘हमारी आशा’ या सुमधूर मैफलीने कानसेनांना तृप्त केले.  आणि विशेष म्हणजे या तृप्ततेसाठी रसिकांना  एक पैसाही खर्च करावा लागला नाही. नीरज वैद्य यांचा मल्हार ग्रुप गेल्या काही वर्षापासून सातत्याने अशा मैफलींचे आयोजन करत आहे. कधी शिक्षक, कधी अभियंते तर कधी डॉक्टर अशा समाजातील विविध घटकांना त्यांच्या मैफली समर्पित असतात. स्वत:च्या व्यवसायातून मिळणारी रक्कम नीरज आणि त्यांचे सहकारी अखिल अब्बास, हितेन पटेल मैफलींच्या आयोजनासाठी खर्च करत असतात. स्वरसाक्षीचे अतुल दिवे, प्रसाद साडेकर, आलापचे अभिजित शिंदे, सरला शिंदे आणि त्यांचा मित्र परिवारही याच पद्धतीने आयोजन करतात. त्यातून जीवन कुलकर्णी, जितेंद्र साळवी, राजेश भावसार आदी वादक मंडळींनी औरंगाबादकरांना त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला. संगिता भावसार, कविता वतनी, डॉ. नासेर सिद्दीकी, ईश्वर शर्मा, प्रज्ञा उम्रीकर, शीतल देशपांडे - रुद्रवार यांच्यासारख्या प्रतिभावान गायकांनी त्यांच्यातील ताकद सिद्ध केली. प्रेषित रुद्रवार, नीता पानसरे, दिलीप खिस्ती, डॉ. सर्वेशा महाजन असे उत्तम निवेदक, सूत्रसंचालक अशा मैफलींमध्येच तयार झाले. प्रा. राजेश सरकटे, प्रमोद सरकटे, राम विधाते, बजरंग विधाते, केशव कुंभकर्ण यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठी भक्तीगीत, भावगीतांच्या मैफलींचे आयोजन करून औरंगाबादचे संगीत जगत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. प्रा. सरकटे तर राज्यातील आघाडीचे राजगायक म्हणून परिचित झाले आहेत. कोणताही मोठी राजकीय, शासकीय सोहळा त्यांच्याशिवाय अपूर्ण राहतो. भक्तीच्या आनंदाची पर्वणी रसिकांना देत असताना त्यातील त्यांचे सातत्य कमालीचे आहे.  संगीत मैफलीच्या तमाम गायक, वादकांना केवळ औरंगाबादच किंवा मराठवाड्यातच नव्हे तर राज्यभरात लोकप्रियता लाभली आहे. मुंबई, पुण्याचे अनेक मोठे कलावंत त्यांच्यासोबत गाण्यास उत्सुक असतात किंवा गाताना येथील वादकांची साथसंगत घेत असतात. या साऱ्यांच्या मैफलीचा सुगंध सांस्कृतिक विश्वाला ताजेपणा प्राप्त करून देत आहे. तो कायम ठेवण्यात येथील रसिकांनीही कसूर ठेवलेली नाही, हे महत्वाचे. पूर्वीच्या काळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मेळे होते. त्यात गायक, वादकांना त्यांची प्रतिभा चमकवण्याची संधी मिळत होती. लक्ष्मीकांत देव, दीपा काळे, लक्ष्मीकांत काळे आदींचे ऑर्केस्ट्रा ऐकण्यासाठी औरंगाबादलगतच्या आणि मराठवाड्यातील काही शहरांमधूनही लोक येत. काळाच्या ओघात मेळे लुप्त होत गेले. ऑर्केस्ट्रांचे प्रमाणही कमी झाले. त्यांची जागा तरुण पिढीतील कलावंतांनी वेगळ्या बाजातील संगीत मैफलीतून काही प्रमाणात भरून काढली आहे. शास्त्रीय गायनाची मनापासून आवड असणाऱ्या रसिकांनाही आवडेल, अशी मांडणी असणाऱ्या त्यांच्या मैफलींची सुगंध असा दरवळत राहावा आणि वाढावा. औरंगाबाद स्मार्ट होईल तेव्हा होईल. तोपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या सुगंधित राहावे, हीच अपेक्षा. ती मुंबई, पुण्याकडे न धावता ताज्या दमाचे गायक, वादक, निवेदक नक्कीच पूर्ण करतील, याची खात्री सर्वांना आहे.

Thursday 17 September 2015

बाग वाढवताय, पण



माओ त्से तुंग यांची एक लोकप्रिय कथा आहे. एक छोटासा मुलगा आपल्या आजी सोबत राहत होता. त्याच्या घरासमोर एक छोटीशी बाग होती. त्या बागेची निगराणी त्याची आजी नित्यनेमाने करायची. एक दिवस आजी आजारी पडली. तिला घराबाहेर पडणेही मुश्किल होऊ लागले. आजीला काळजी होती बागेची. बागेतील रोपट्यांना पाणी कोण घालणार? त्यांची निगा कोण राखणार? असा प्रश्न तिच्यापुढे होता. त्यामुळे तिने त्या मुलाला जवळ बोलावले. आणि ती म्हणाली, बाळा बागेतील  रोपटी सुकणार नाही, याची काळजी घे. पाने वाळून जाणार नाहीत, हे पाहण्याची जबाबदारी आजपासून तुझीच आहे. मुलाने मोठ्या आनंदाने होकारार्थी मान हलवली. आजीपेक्षा आपण चांगली बाग राखू. एवढेच नव्हे तर  बाग वाढवू, तिचा विस्तार करू, असे त्याला वाटले. महिनाभरानंतर आजीबाईंची प्रकृती सुधारली. त्या घराबाहेर पडल्या आणि पाहतात तर काय? रोपटी निष्प्राण होऊ लागली होती. आजीने काहीसे रागावतच मुलाला विचारले. अरे, तुला तर काळजी घेण्यास सांिगतले होते ना? त्यावर तो मुलगा म्हणाला, पण आजी मी तर रोज झाडांना पाणी घालत होतो. पाने सुकू नयेत म्हणून  दूरवरून पाणी आणून पानांवर टाकत होता. ते एेकून आजी त्याला म्हणाली, अरे वेड्या बाग टिकवायची असेल तर पानांना नव्हे तर रोपट्यांच्या  मुळांना पाणी द्यावे लागते.  गोष्टीचा मतितार्थ असा की, बाग जगवायची असेल तर रोपट्यांचे झाडात रुपांतर करण्याचे ज्ञान असलेला माळीच हवा. अन्यथा रोपटी जळून जातात.

ही गोष्ट  महापौर त्र्यंबक तुपेंनी सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ गावे मनपाच्या अखत्यारीत आणताना लक्षात घेतली पाहिजे. सोमवारच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध डावलून महापौरांनी प्रस्ताव मंजूर करून टाकला.  वीस वर्षापासून महापालिकेच्या हद्दीत असलेल्या १८ खेड्यांचा अजून विकास झालेला नाही. तेथील वसाहती बकाल आहेत. एवढेच काय पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने औरंगाबाद शहरातील अनेक भाग खेड्यांसारखे आहेत. तेथील हजारो नागरिक पाणी, रस्ते, पथदिवे, ड्रेनेजच्या प्रतीक्षेत आहेत. मग नवी २६ गावे घेऊन काय साध्य होणार? असा सत्तेत असूनही विरोधी भूमिका मांडणाऱ्या भाजपचा सवाल होता. तुपे यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून प्रस्ताव मंजूर करून टाकला. अर्थात केवळ सभेत प्रस्तावाला मान्यता मिळाली म्हणजे ही गावे मनपात आली असे मानण्याचे कारण नाही. कारण नगरविकास मंत्रालयाचे त्यावर शिक्कामोर्तब आवश्यक आहे. तेथे भाजपची मंडळी त्याला रोखू शकतील.

पण या निमित्ताने महापालिकेत कायम सत्तेत असलेली शिवसेना विकासाचे नियोजन कशा पद्धतीने करते, हे सर्वांसमोर आलेे. आघाडी सरकारने केलेल्या चुका पुढे रेटण्याचे किंवा त्याला वेगळी दिशा देण्याचे काम सेना करत असल्याचे दिसते. फक्त पानांना पाणी देऊन झाड जगत नाही, हे शिवसेनेच्या नेते मंडळींना यापूर्वीही मान्य नव्हते आणि नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तुपेंनाही मान्य नाही, याचे आश्चर्य वाटते.  जेव्हा खड्ड्यांनी बेसुमार भरलेल्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा तुपे यांनी एका वर्षात पाचच रस्त्यांचे पण कायमस्वरूपी दर्जेदार काम करण्यावर मी लक्ष देणार आहे, असे ठणकावून सांगितले. मग हीच भूमिका आधी शहरातील वसाहतींमध्ये सुधारणा मग झालर क्षेत्रातील गावे, अशी का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. तुपे यांना क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेने झालर क्षेत्राबद्दल साकडे घातले होते, असे म्हटले जाते. बिल्डर बिल्डरांच्या जागी बरोबर आहेत. त्यांनी या २६ गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. अनेक राजकारणीही जमिनीच्या व्यवहारात आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील प्रवासाची सोय करण्याचा प्रयत्न तुपे अन्् शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींनी केला असावा. डीएमआयसीच्या अनुषंगाने २६ गावांचा विचार करणे गरजेचेच आहे. मात्र, बाग वाढवताना रोपट्यांची निगा राखण्याचे ज्ञान असलेले माळी आहेत का, हे आधी तपासून तशी माहिती सर्वसाधारण सभेला द्यायला हवी होती. सिडको झालर क्षेत्राचे त्रांगडे आघाडी सरकारने करून  ठेवले. विकास आराखड्याच्या नावाखाली नगररचना अधिकाऱ्यांची स्वत:च्या झोळ्या भरून घेतल्या. बड्यांच्या भूखंडांवरील आरक्षणे बदलली. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागताच  आराखडा गुंडाळून ठेवला तर ठेवलाच शिवाय या गावांतील विकास कामांचा मार्गही बंद करून टाकली. तीन वर्षापूर्वी औरंगाबादपासून २० किलोमीटर अंतरावरील सर्व गावांसाठी एक महानगर नियोजन प्राधिकरण करण्याचे सरकारने जाहीर केले. नंतर ते बासनात बंद केले. आता २६ गावांसाठी शिवसेनेने हट्ट धरला आहे. तो  मंजूर करण्यापूर्वी गावांचा विकास कोण, कधी आणि कसा करणार? याची उत्तरे सरकारने द्यावीत. विकास आराखडा पारदर्शी पद्धतीने तयार होईल, याची हमी घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा आणि या गावांचा कारभार चालवण्यासाठी महापालिकेच्या अंतर्गत का होईना  प्राधिकरण असावे.  तरच तुपे, सेनेचे पदाधिकारी,  बिल्डर आणि त्यांच्यासोबतच्या सर्वपक्षीय राजकारण्यांना त्यांच्या पाठपुराव्याचे ‘फळ’ मिळेल. अन्यथा ही गावे माओ त्से तुंगच्या कथेत म्हटल्याप्रमाणे सुकून, कोमेजून जातील. एकदा रोपटी निष्प्राण झाल्यावर त्यांना कितीही पाणी दिले तरी त्याचा उपयोग नसतो, हे शिवसेना नेत्यांच्या गावी नसले तरी भाजप, एमआयएमने त्यांना आक्रमकपणेा लक्षात आणून दिले तर औरंगाबादच्या पुढील  पिढ्या त्यांना नक्कीच दुवा देतील.

Thursday 10 September 2015

जाब द्या : तेव्हा कुठे होता तुम्ही ?

पूर्वेकडील भिंत बांधल्याशिवाय पश्चिमेकडील भिंत पाडू नका, अशी अरबस्तानात एक म्हण सांिगतली जाते. आणि आपल्याकडे जुन्या पिढीतील लोक अनेकदा अंथरुण पाहून पाय पसरू नये, असा इशारा आवर्जून देतात. अनुभवातून आलेल्या या म्हणी आणि ज्येष्ठांचे सांगणे या कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देण्याची प्रथा सगळीकडे आहे. त्याला औरंगाबादच्या जयभवानीनगर, मुकुंदवाडीतील लोक कसे अपवाद असतील. त्यांनी हेच केले आणि आता क्षणिक  मोहातून निर्माण होणारा त्रास त्यांना भोगावा लागत आहे.  त्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या टोलेजंग इमारती महापालिकेच्या बुलडोझरने जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. त्यात काही गोरगरिबांचे संसारही मोडले गेले. त्यांच्यावर त्यांच्या घराच्या पडलेल्या भिंतींच्या आडोशाला, रस्त्यालगत रात्र कंठण्याची वेळ आली आहे.  बड्या मंडळींचे नुकसान मोठे असले तरी त्यांना किमान निवाऱ्याची चिंता नाही. मात्र, गरिबांचे हाल आहेत. जयभवानीनगरच्या लगत विश्रांतीनगर ही कष्टकऱ्यांची वसाहत आहे. भूखंड माफियांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून त्यांनी आयुष्यभराची कमाई खर्चली.  तात्पुरता निवारा उभा केला.  शहराचा सुनियोजित विकास करताना या गरिबांना त्यांना दिलासा, आधार देण्याची जबाबदारी महापालिकेच्या कारभाऱ्यांची आहे.  हर्सूलजवळ महापालिकेकडे मोठी खुली जागा आहे. ती भूखंड माफियांच्या घशात जाण्यापेक्षा विश्रांतीनगरवासियांना देण्याचे काम झाले पाहिजे.

थोडी मोकळी जागा दिसली की त्यावर कब्जा करण्याचा माणसाचा स्वभाव आहेच. पण अशा कब्जा करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तेथेच खरे पाणी मुरते. जयभवानीनगर-मुकुंदवाडीत नेमके हेच झाले.  आधी सिडकोने येथील रस्ता ६० फुटांचा असल्याचे जाहीर केले. लोकांनी ८० फुटांचा रस्ता गृहित धरून तेवढी जागा सोडत बांधकामे केली होती. २० फुटांची जागा रिकामी का सोडायची असा एका बड्याच्या मनात विचार आला. त्याने बांधकाम पुढे वाढवले. त्याचे पाहून दुसऱ्यानेही तेच केले. सारीच बडी मंडळी होती. पैसाही मुबलक होता. शिवाय महापालिकेतील अति प्रभावशाली अधिकारी आणि अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या बंधू, भगिनीने बांधकाम केले होते. कुंपण राखणाऱ्यानेच कुंपण ओलांडण्याची अलिखित परवानगी दिल्यावर सगळ्यांचे धाडस वाढले. पाहता पाहता अनेकांची मजल २० फुटाच्या वर वाढली. प्रचंड रहदारीचा रस्ता चिंचोळा होऊन गेला. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकात उतरणाऱ्यांचे हाल होऊ लागले. रिक्षातून, दुचाकीवरून एका मिनिटांत पार करण्याच्या रस्त्यासाठी पंधरा-वीस मिनिटे लागू लागली. लोकांनी तत्कालिन महापौर, आयुक्तांकडे तक्रारी केल्या. निवेदने दिली. उपोषण केले. पण कुणालाच त्याचे सोयरसुतक नव्हते. महापालिकेच्या विकास आराखड्यात महापालिकेनेच निश्चित केलेला रस्ता मोकळा करण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली नाही. पण म्हणतात ना की सरकारी यंत्रणेविरुद्ध आवाज उठवण्याचे धारिष्ट्य  एक लाख लोकातील एकाच व्यक्तीकडे असते. सुरुवातीला त्याचा स्वर एकाकी आणि काहीसा क्षीणही असतो. पण ती व्यक्ती जर आवाज उठवण्यावर ठाम असेल तर तो आवाज निश्चित ऐकला जातो. त्याचा परिणाम एक हजार टक्के होताच. आणि हा आवाज  जर सुधारणेच्या बाजूने असेल तर त्यात उशिरा का होईना यश असतेच. मुकुंदवाडी रस्त्याच्या प्रकरणात मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी हा आवाज उठवला. महापालिकेचे कारभारी  रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  दीड वर्षे एकाकी लढा देऊन अतिक्रमणे पाडण्याचा अादेशही मिळवला. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्याकडे डोळेझाक होऊ लागली. वर्मा यांच्यासमोरील मार्ग थांबला होता. तो पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोकळा केला. धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध होत असलेले ‘एक’ यांनी मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना तुम्ही रुंदीकरण करा नाहीतर मीच कारवाई करतो, असा इशारा दिला. त्याचा अचूक परिणाम झाला. आठ दिवसांत रस्ता विस्तीर्ण झाला. आता तेथे डांबरीकरण होईल. वीजेचे खांब हटतील. ज्यांची बांधकामे पडली त्यांचे नुकसान झाले असले तरी  खुल्या रस्त्यालगत घर असल्याचा त्यांना पुढे फायदाही होणार आहे.

यात मूळ मुद्दा आहे ज्यांनी ही अतिक्रमित बांधकामे सुरू असताना डोळेझाक केली. त्यांना संरक्षण, प्रोत्साहन दिले. त्यांच्यावर कठोर कारवाई होणार की नाही? कारण जेवढे नागरिक दोषी आहेत त्यापेक्षा अधिक दोष कायदा राखण्याची जबाबदारी असणाऱ्यांचा आहे. महापालिकेचा कोणताच अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी, नगरसेवक आणि पोलिस अधिकारीही कोणत्याही बांधकामाकडे अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय डोळेझाक करत नाही. संध्याकाळी विशिष्ट पॉकेटमनी गोळा केल्याशिवाय घरात पाऊल ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच ही मंडळी घराबाहेर पडत असतात. त्यांना धडा शिकवण्याचे काम  जोपर्यंत महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त करत नाही तोपर्यंत औरंगाबादेत  प्रशासनाची जरब बसणार नाही. अशी जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम लोकांना करावे लागणार आहे. एवढे टोलेजंग बांधकाम होत असताना तुम्ही कोठे होतात? तुमचे डोळे काय बघत होते? असा सवाल विचारला पाहिजे आणि या साऱ्याच प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह धरावा लागेल. अन्यथा एकीकडे स्मार्ट सिटीसाठी पावले उचलली जात असताना दुसरीकडे अतिक्रमणांचे फुटलेले पेव वाढतच राहिल. एक दिवस सारे औरंगाबाद  स्मार्ट अतिक्रमित शहर म्हणून जगाच्या नकाशावर नोंदवले जाईल.



Tuesday 1 September 2015

शोधाचे उत्तर

जगातील बहुतांश तत्वज्ञांनी स्वत:चा शोध म्हणजे जीवनाची पूर्णता असे म्हटले आहे. ओशो म्हणतात,  स्वत:चा शोध घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे, ही देखील अत्यंत महत्वाची पायरी आहे. या जगात दररोज कोट्यवधी प्राणी निर्माण होतात. तेवढेच मरणही पावतात. पण आपण नेमके कोण आहोत? कुठून आलोत? कशासाठी आपण निर्माण झालो आहोत. आपल्या येण्याचे उद्दिष्ट आणि जाण्याचे कारण काय, असे असंख्य प्रश्न माणसालाच पडतात. त्याचे उत्तर शोधता शोधता अनेकांचे जीवन संपते. काहींना त्याचा शोध लागतोही. मात्र, शोधाचे उत्तर काय मिळाले, हे त्यांना कुणालाच सांगता येत नाही. हीच जीवनातील खरी गूढता आहे. हे गूढ उकलणे सध्यातरी विज्ञानाला शक्य झालेले नाही. नाटककार, साहित्यकारांनी  तसा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यासाठी त्यांनी कल्पनाविष्काराचा आधार घेतला आहे. खरेतर मनुष्याचे जीवन असे आहे की, स्वत:चा म्हणजे स्वयम््चा शोध  घेण्याची प्रक्रिया प्रत्येकाच्या जीवनात एका विशिष्ट वेळी प्रज्वलित होते. ही ज्योत जेवढी तीव्र तेवढ्याच तीव्रतेने स्वयमच्या शोधाचा प्रवास अधिक तीव्र होतो.

बहुतांश वेळी आशा, अपेक्षेच्या धक्क्यातून ज्योत पेटते. कुणीतरी जवळचा व्यक्ती धोका देतो. दूर निघून जातो. मग आपण आपल्या स्वत:चा शोध घेतला पाहिजे, असे वाटू लागते. स्रियांमध्ये स्वयमचा शोध घेण्याची प्रक्रिया अधिक असावी. कारण त्यांचे जीवन पुरुषांच्या तुलनेत अधिक धक्कादायक असते. ज्या पुरुषांवर आपण सर्वाधिक अवलंबून असतो. ज्याच्यासाठी आपण आयुष्याचा बहुमोल काळ खर्ची घातला. तो दुसऱ्या कुणामध्ये अडकल्याचे प्रसंग स्रियांच्या नशिबात जास्त येत असतात. अर्थात हे काही पूर्णांशाने सत्य नसले तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. अशाच एका स्त्रीने घेतलेला स्वयम शोध पुण्यातील बहुआयामी लेखिका आशा साठे यांनी मांडला.

स्वत:चे विचार आणि अस्तित्वाबद्दल काहीशी बोल्ड, ठाम भूमिका असणाऱ्या कलावंत रमाकडे तिच्याच एका मित्राने लिहिलेले नाटकाचे स्क्रिप्ट येते. त्यातील अनुराधाची भूमिका रमाने करावे, असा त्या मित्राचा आग्रह असतो. नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीशी जुळलेले संबंध स्वीकारण्यापर्यंत तयारी असणाऱ्या सोशिक अनुराधाची भूमिका रंगमंचावर साकार करण्यास रमा ठाम नकार देते. पण स्क्रिप्टचे वाचन करत असताना तिला तिचे पूर्वायुष्य आठवू लागते. आपल्यातही एक अनुराधा दडलेली आहे, असे तिला वाटू लागते. आणि हळूहळू ती स्वत:चा शोध घेऊ लागते, अशी वळणावळणाची मांडणी साठे यांनी केली आहे. स्त्री पुरुषांचे नाते-संबंध हा अतिशय गुंतागुंतीचा आणि अनेक कंगोरे असलेला विषय. पुरुषाला स्त्री विषयी प्रचंड आकर्षण असतेच आणि तो ते व्यक्त करत असतो. तसे स्त्रीलाही असते मात्र ते व्यक्त करण्यासाठी तिला अनेक मर्यादा समाजव्यवस्थेने घालून दिल्या आहेत. काही तिने स्वत:हून आखून घेतल्या आहेत. अजूनही स्त्रीच्या बाजूने पुरुषांविषयीच्या आकर्षणाचे, ओढीचे पैलू समोर आलेले नाहीत. म्हणूनच या आकर्षणाचा, नात्याचा, त्यातील सर्व धाग्यांचा तळ आणि त्यातील नेमकेपण सांगणे कठीणच. म्हणूनच की काय अनेक बाजूंनी मांडला तरी हा विषय चर्चिला जातोच. साठे यांनी त्यातील एका धाग्याचे सुरेख विस्तारीकरण करताना स्त्रीचे स्वत:चे अस्तित्व शोधण्याचा केलेला प्रयत्न अधोरेखित केला आहे.

एकेकाळी म्हणजे साधारणत: १२ वर्षापूर्वी दीपा लागू, लालन सारंग यांनी केलेल्या या दीर्घांकाचा प्रयोग नुकताच सभुच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात पद्मनाभ पाठक यांच्या दिग्दर्शनात झाला. पाठक यांनीही संहितेची धाटणी अभ्यासत त्याचे प्रवाही सादरीकरण होईल. त्यातील आशय टोकदारपणे रसिकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे या नाट्यातील दोन टोकांच्या महिलांमधील अंतरंग, त्यांच्या भाव भावना, एकारलेपण वेगवेगळे दिसत असले तरी ते महिलांमध्ये निसर्गत: दडलेल्या दोन व्यक्तिरेखाच आहेत. ही बाब पाठक यांनी टिपत एकाच कलावंतांकडून दोन्ही व्यक्तिरेखा ठसठशीत कशा होतील, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सादरीकरणाची उंची अधिक उंचावली आहे. या नाटकाचे तिसरे आणि अत्यंत महत्वाचे बलस्थान म्हणजे सुजाता देशमुख पाठक यांनी साकारलेली मध्यवर्ती भूमिका. अनुराधा आणि रमा या दोन भिन्न स्वभावाच्या, वेगवेगळा जीवन प्रवास असलेल्या महिला त्यांनी खूपच विलक्षणरित्या उभ्या केल्या आहेत. त्यांचा रंगमंचावरचा वावर, शब्दफेक, चेहऱ्यावरील हावभाव सारेच त्यांच्यातील अभिनयाच्या ताकद प्रगट करणारे होते. विशेषत: रमाच्या भूमिकेतून अनुराधाच्या भूमिकेत आणि अनुराधाच्या भूमिकेतून रमाच्या भूमिकेत प्रवेश करताना त्यांनी खांद्यांना दिलेला जर्क, आवाजातील करारी व कोमलपणा, शरीराचे पोश्चर, इतर लकबी अगदी डोळ्यातील भावही त्यांनी लिलया बदलले होते. त्यांना मणिराज पवार, ऐश्वर्या हुद्दार यांनी छोट्याशा भूमिकेत दिलेली साथही लक्षणीय. विजय पवार, अपूर्व बुद्रूककर, विकी वाघमारे यांचे नेपथ्य, मुस्तजीब खान, विकास पगारे, चेतन ढवळे यांची प्रकाशयोजना, आकाश थोरात यांचे संगीत, जयंत शेवतेकर यांचे नृत्य दिग्दर्शन आणि यशोदा आहेर यांची रंगभूषा संहितेला न्याय देणारी होती.

आता थोडेसे या प्रयोगाच्या मानकऱ्यांविषयी. प्रख्यात अभिनेते संदीप पाठक यांचे वडिल शाम पाठक बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील हरहुन्नरी कलावंत आणि लेखक. त्यांनी तरुण पिढीत नाट्यबीजे रोवली. त्यांच्यावर अभिनय, लेखनाचा संस्कार केला. या संस्काराचा वसा सांगणारे त्यांचे विद्यार्थी संजय शिंदे, अभय देशमुख, सुनिलदत्त कुलकर्णी, ललिता बडवे आदींनी एकत्र येऊन स्वयमच्या सादरीकरणासाठी पुढाकार घेतला. अशी गुरुदक्षिणा देण्याची परंपरा नाट्यकर्मींनी सुरू केली तर औरंगाबादेत अनेक नाट्यप्रयोग होऊ शकतील, होय ना?