Thursday 26 July 2018

जलधारांसोबत ...

भारत हा खरंच खूप विचित्र देश आहे. इथे तुमचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवा, असे वारंवार सांगावे लागते. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी एक पोलिस उभा करावा लागतो. हा देश तुमचाच आहे. त्यात रस्त्यावर थुंकू नका, कचरा टाकू नका, अशा जाहिराती कराव्या लागतात. थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करावा लागतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेतील ओळींची वारंवार आठवण करून द्यावी लागते. कारण एकमेकांशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध ठेवून जाती, धर्माविषयी सोशल मिडिआवर विष कालवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. झुंडीने हल्ले होत आहेत. हा अमुक जातीचा म्हणजे वाईटच. तो तमूक धर्माचा म्हणजे राक्षसच, असा प्रचार सुरू आहे. चारही बाजूंनी असा मारा होत असताना काहीच चांगले होत नाही. कोणालाही त्याविषयी काही वाटत नाही. कोणी त्याविरोधात उपाययोजना करत नाही, असे नाही. संख्येने कमी असतील पण काही व्यक्ती निश्चित धोरण आखत समाजाला जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन एकत्र आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष किशोर जगन्नाथ शितोळे त्यापैकीच एक आहेत. भेगाळलेल्या जमिनीला जलधारांना भिजवण्यासोबत ते सामाजिक एकोप्याचीही पेरणी करत आहेत. पाणी उपलब्ध होण्याइतकेच समाज एक राहणे महत्वाचे आहे. जातीय, धार्मिक द्वेषापलिकडे एक जग आहे. आणि ते खूपच समाधान मिळवून देणारे आहे, असा संस्कार ते तरुण पिढीवर करत आहेत.  
तीन-चार वर्षांपूर्वी दुष्काळाचे संकट मराठवाड्याला गिळंकृत करण्यास निघाले होते. सरकारकडून नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस सुरू झाला होता. जलयुक्त शिवारची योजना जाहीर झाली होती. काही गावांत त्याची कामे खरेच लोक सहभागातून आणि प्रामाणिकपणे केली जात होती. अनेक गावांत ठेकेदार, राजकारणी घुसून स्वतःचे बंधारे बांधून घेऊ लागले होते. अशावेळी महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरेने प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाऊंडेशन स्थापन केले. त्या माध्यमातून नाला खोलीकरण, नदी रुंदीकरण, तलावातील गाळ काढण्याची कामे सुरू झाली. तेव्हा त्यापासून मराठवाड्यातील काही तरुण, उद्योजकांनी प्रेरणा घेतली तर किती बरे होईल, असे वाटत होते. आणि मितभाषी, कायम नाविन्याच्या शोधात असलेल्या किशोर शितोळे यांनी ती अपेक्षा पूर्ण केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या उन्हाळ्यात त्यांनी शेकडो ग्रामस्थांची तहान भागेल, त्यांच्या शेताला पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था त्यांच्या जलदूत संस्थेमार्फत ग्रामस्थांना सोबत घेऊन केली आहे. आधी स्वतःचा वाटा देऊन आर्थिक पाठबळ लोकवर्गणीतून उभे केले.एवढेच नव्हे तर शहरातील लोकांमध्येही जागरुकता आणली आहे. विशेषतः सातारा देवळाई भागावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. तेथे महापालिकेचे पाणी नाही. नजिकच्या काळात पोहोचण्याची शक्यता नाही. भूगर्भातील पाणी खोल खोल होत चालले आहे. अशा काळात तुम्हालाच तुमचे पाणी मिळवावे लागेल. पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवावा असे घरोघरी जाऊन समजावून सांगितले. केवळ समजावणुकीचे कार्यक्रम तर अनेक संस्था करत असतात. शितोळेंनी त्यापुढे एक पाऊल टाकले. ज्यांनी जल पुनर्भरणाची तयारी दाखवली. त्यांना पूर्ण तांत्रिक सहाय्य प्लंबिंग असोसिएशनच्या मदतीने उपलब्ध करून दिले. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील धूपखेडा गावाजवळील येलगंगेचे पुनरुज्जीवन इतर उद्योजकांच्या मदतीने करण्याचे अत्यंत कठीण आव्हान त्यांनी पेलले. सातारा, मुकुंदवाडी, वानखेडेनगर येथील पुरातन बारवांची साफसफाई केली. तेथील बुजलेले पाण्याचे झरे पुन्हा वाहू लागले आहेत.
हे सारे काही करताना शितोळे यांनी जी पद्धत अवलंबली ती अफलातून आहे. तरुणाई हीच खरी शक्ती आहे. तिला योग्य दिशा दाखवली तर ती अफाट काम करू शकते. लोकांच्या उपयोगी पडू शकते. शिवाय विविध जाती, धर्म, पंथ तसेच राजकीय विचारसरणींना मानणारे तरुण एकत्रित काम करू लागले तर त्यांच्यातील द्वेषाची धार निश्चित कमी होईल. ते एकमेकांना समजून घेतील. परस्परांच्या मतांचा आदर करू शकतील, हे त्यांना पक्के ठावूक होते. त्यामुळे त्यांनी जलदूतच्या प्रत्येक उपक्रमात तरुणांना सोबत घेण्यावर भर दिला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दलित पँथर, रिपब्लिकन अशा सर्व पक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून अमूक एका गावातील श्रमदानासाठी यावे, असे आवाहन ते करतात. त्याला आता भरभरून प्रतिसाद मिळतो. तरुणाई गाण्यांच्या तालावर नाचत-गात अंग झोकून काम करते. मग गावकऱ्यांसोबत चुली पेटवून स्वयंपाक केला जातो. रुचकर, खमंग भाकरी, पिठलं, ठेचा असा बेत असतो. तो संपवून मुले एका नव्या उमेदीने, सळसळत्या उत्साहाने घरी परततात. तेव्हा त्यांच्यात माणुसकीचा एक नवा कोंब पेरला गेलेला असतो. जात, धर्म, पंथ आणि राजकारण म्हणजेच सर्वस्व नाही. त्यात जगाचे, भारताचे सौख्य सामावलेले नाही. आपण सारे मतभेद बाजूला ठेवून गोरगरिबांच्या मदतीला एकत्रपणे धावून जाणे हीच खरी सेवा, असल्याचा विचार त्यांच्या मनात निश्चितपणे पेरला जातो. माझ्यामते शितोळेंच्या उपक्रमांची खरी ताकद आणि वैशिष्ट्य हेच आहे. कारण अनेकजण स्वतःच्या गोतावळ्यालाच सोबत घेऊन काम करत भेदाच्या भिंती आणखी उंच करत आहेतच. शितोळेंची जलदूत प्रारंभापासून भेद मोडण्यासाठीच काम करत आहे. प्रारंभीच्या काळात त्यांच्यासमोरही अनेक अडचणी आल्या. हेतूवर शंका उपस्थित करत टीकास्त्र सोडले गेले. त्यावर त्यांनी एक इंचही पाऊल मागे घेतले नाही. उलट दोन पावले पुढे टाकण्याची हिंमत दाखवली. यापुढील काळात जलदूतचे कार्य आणखी विस्तारत जावो. त्याचा पाया असाच सामाजिक एकोप्याचाच कायम राहो, अशी अपेक्षा आहे.  द्वेषाचा वणवा आणि त्यावर फुंकर घालत बसलेली मंडळी पाहता असंख्य शितोळेंची गरज आहे. चांगली कामे होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा ती होतात तेव्हा दीर्घकाळ पक्की राहतात. शितोळे करत असलेले जलपुनर्भरण, सामाजिक एकोप्याचे कामही असेच चांगले आहे. ते आणखी विस्तारत नेऊन मजबूत करण्यासाठी किमान चार-पाच जणांनी प्रेरणा घेतली तर देशाचे भले होईल ना?

Thursday 19 July 2018

मूक वेदनांचे आक्रंदन

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर होणाऱ्या सरकारी मदतीच्या योजना दिसायला गोंडस, गुटगुटीत असतात. त्या ग्रामीण भागात लवकर पोहोचतच नाहीत. जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्यातील प्राण अधिकाऱ्यांनी कधीच काढून घेतलेला असतो. दुसरीकडे निसर्गाचा, दलालांच्या लुटीचा, राजकारण्यांच्या लुटमारीचा मार आहेच. तिसरा भाग आहे तो आपल्या संस्कृती, परंपरांचा. त्याच्या जोखडाखाली मुली, महिलांची आयुष्य होलपाटून निघत आहे. पुरुष काही बोलूतरी शकतात. पण महिलांचे जीणे निष्पर्ण, वठलेल्या झाडांसारखे आहे. त्यांचे स्वतःचे असे विश्व नाहीच. बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार त्यांना दिलेलाच नाही. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांनी हेच वास्तव ‘नली’ या कलाकृतीत मांडले आहे. जळगावच्या परिवर्तन संस्थेने त्याचा एकपात्री प्रयोग रविवारी गोविंदभाई श्रॉफ अकादमीच्या सभागृहात केला. एकतर देशमुख यांच्या कसदार लेखणीला धार चढलेली. योगेश पाटील यांचे शब्दनशब्द घासून पुसून घेतलेले, चौकटी मोडून टाकणारे दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनेते हर्षल पाटील यांनी विलक्षण आत्मियतेने जिवंत केलेली नली. सारेच चटका लावून जाणारे. संवेदनशील मन एखाद्या भट्टीत भाजून काढणारे होते. एकपात्री असूनही असा अनुभव ‘नली’ पाहताना येतो. यावरून शेतकरी महिलेचे दुःख किती प्रभावीपणे रंगमंचावर आविष्कृत झाले असावे, याचा अंदाज व्यक्त करता येईल.
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे दिग्गजांचा. प्रा. डॉ. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांनी तर कलावंतांच्या किमान तीन पिढ्या घडवल्या. आता त्यांची परंपरा प्रा. डॉ. किशोर शिरसाट अत्यंत प्रामाणिकपणे चालवत आहेत. नवनव्याचा ध्यास आणि सर्व प्रवाहातील रंगकर्मींना संधी हे त्यांचे तत्व आहे. त्याची सुरुवात त्यांनी चार वर्षांपूर्वी रंगयात्रा उपक्रमातून केली. रंगमंचावर नेहमी काहीतरी घडत राहावे. विशेषतः तरुण पिढीचे अविष्कार कोणत्या का होईना रुपात सादर झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. विशेष म्हणजे त्यांनी विभागाचे दरवाजे सर्वच रंगकर्मींसाठी खुले ठेवले आहेत. केवळ औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील कोणीही येऊन त्याची कलाकृती सादर करू शकतो, असे धोरण राबवले आहे. त्यातून जळगावच्या परिवर्तन संस्थेने ‘नली’ हा एकल प्रयोग अविष्कृत केला. नव्याने काही सांगू पाहणारी ही कलाकृती अनुभवण्याची संधी प्रा. शिरसाट यांच्यामुळे औरंगाबादकरांना मिळाली

आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख यांनी ग्रामीण भागात आयुष्यभर काबाडकष्ट करून जगणाऱ्या, सुखाचा एखादा क्षण वाट्याला यावा म्हणून क्षितिजाकडे पाहत राहणाऱ्या आणि मातीत कष्ट करत करत मातीतच मिसळून जाणाऱ्या महिलांचे दुःख नलीमध्ये मांडले आहे. काहीवेळा महान लेखक व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ कादंबरीतील अंजीचे पात्र देशमुखांनी टिपून मांडले की काय, असे वाटत राहते. ‘शेतात राबणाऱ्या सगळ्या बायकांचे चेहरे एकसारखेच दिसतात’ असं एक काळजाला भेगा पाडणारं वक्तव्य ते करतात. ‘नली’मध्ये अशी हृदय तळतळून टाकणारी अनेक विधाने आहेत. त्यातील तीक्ष्णता केवळ विधानांपुरती थांबत नाहीत तर हे भारतीय समाजातील भयाण सत्य आहे. आणि त्याला तुम्ही सारेच जबाबदार आहात, असेही सांगते. ही सारी प्रखरता, वास्तव रंगमंचावर आविष्कृत करणे म्हणजे एक मोठे आव्हानच. ते दिग्दर्शक योगेश पाटील, अभिनेते हर्षल पाटील यांनी एकदम मनापासून पेलले आहे. देशमुख यांना जे काही सांगायचे आहे. तिथपर्यंत ते निश्चितच रसिकांना घेऊन जातात. महान दिग्दर्शक पीटर ब्रुक त्यांच्या ‘एम्प्टी स्पेस’ पुस्तकात म्हणतात की जमिनीच्या कोणत्याही भागावर एक अदृश्य रेषा आखून एक अभिनेता त्यात उभा राहतो आणि प्रेक्षक त्याला तन्मयतेने पाहू लागतो. तेथेच रंगभूमीचा जन्म होतो. नलीचा प्रयोग पाहताना तसाच काहीसा अनुभव येतो. हर्षल पाटील तासाभरात कहाणी नाट्यान्वित करताना रंगमंचावर अख्खा गाव आणि त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा उभ्या करतात. ती कहाणी थोडक्यात अशी की, खानदेशातील एका अतिशय छोट्या खेड्यागावातील बाळ्या लहानपणापासून हुशार. वर्गात शिकणारी सुंदर, चुणचुणीत नली त्याला आवडू लागते. तिलाही बाळ्या आवडत असतो. पण नली अभ्यासात कमालीची कच्ची. तिच्या घरी शिक्षणाचा गंधही नाही. हळूहळू ती मागे पडत जाते. दोघांचे प्रेम अव्यक्तच राहते. बाळ्या मोठा अधिकारी होतो. नलीचे गावातल्याच एका सुमार माणसाशी लग्न होते. ती शेतात राबू लागते. संसाराचा गाडा ओढता ओढता तिच्यातील माणूसपण मरून जाते. एक दिवस ती कर्जाला कंटाळून आत्महत्या करते. कायम संकटांशी दोन हात करणाऱ्या नलीनं खरंच आत्महत्या केली असावी काॽ शेतात काम करणाऱ्या बाया मातीत का मिसळतातॽ असा सुन्न करणारा प्रश्न विचारून प्रयोग थांबतो. पण तेथून तो प्रत्येक संवेदनशील मनात असंख्य विचारांचा प्रवास सुरू करून देतो.

प्रयोग एकपात्री असल्यामुळे आवाजातील वैविध्य, भाषा शैली अभ्यासपूर्णच लागेल, याचा अभ्यास दिग्दर्शक योगेश पाटील यांनी केला होता. तो त्यांनी हर्षल यांच्याकडूनही करून घेतला. त्यामुळे रुढ अर्थाने आवाजाला मर्यादा असल्या तरी त्याच्या वापरात हर्षल यांनी कोणतीही मर्यादा जाणवू दिली नाही. ग्रामीण भागातील दुःख, वेदना सारेकाही आत्मसात केले असल्याने सुरुवातीची एक-दोन मिनिटे सोडली तर त्यांच्या अभिनयात, रंगमंचावरील वावरात कमालीची सहजता जाणवत होती. शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यावर नाट्य किती उंचीवर जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर यांनी वेगळी वाट निवडत या प्रयोगाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. होरिलसिंग राजपूत यांची प्रकाश योजना, राहूल निंबाळकर यांचे पार्श्वसंगीत व्यक्तीरेखा म्हणून प्रेक्षकांशी बोलते एवढी त्यात कल्पकता आहे. मंजुषा भिडे यांची वेशभूषा ठीकठाक.

Thursday 5 July 2018

नोकरशाहीचे असेही दर्शन

नाटकाच्या अखेरच्या प्रसंगात रंगमंचाच्या मध्यभागी हातात कुत्र्याचे पिल्लू घेऊन बसलेली नायिका दिसते. ती कुत्र्याला जोराने भुंकण्यास सांगते. पण ते कुंथतच राहते. आपण सारे सुन्न होऊन जातो. खरे तर नायिका कुत्र्याच्या पिल्लाला नव्हे तर भारतीय समाजव्यवस्थेला भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवण्यास सांगत आहे. आणि आपल्यातील बोटावर मोजण्याइतक्या लोकांतच आवाज उठवण्याची ताकद आहे. बाकीचे सगळे निमूटपणे तिच्यासमोर शरणागती पत्करत आहेत. आपणही त्या शरणागतात आहोत. गलितगात्र झालो आहोत, अशा जबरदस्त थपडा पडू लागतात. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हिंदी विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे गेल्या महिन्यात झालेल्या ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सवात सादर झालेल्या ‘ताजमहल का टेंडर’ नाटकाने संवेदनशील मनांना या थपडा लगावल्या. अजय शुक्ला यांनी लिहिलेल्या आणि चित्तरंजन त्रिपाठी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात जागोजागी भारतीय समाजव्यवस्था शोषून, पिळून, पोखरलेल्या नोकरशाहीचे वाभाडे काढले आहेत. अब्जावधी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून कोसो मैल दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचे हसतखेळत अक्षरश: कपडे फाडले आहेत. हे नाटक केवळ नोकरशाहीचे हिंस्त्र, ओंगळवाणे, हिडीस रूप दाखवून थांबत नाही. तर ही व्यवस्था खरेच का निर्माण झाली. तिच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले लोक तिच्यासमोर का नतमस्तक होतात. राजकारणी मंडळी नोकरशहांना डोक्यावर का घेतात, अशी विचारणा करताना यातून भारतीय समाजाची कधी सुटका होणार की नाही, असा मूलभूत प्रश्नही उपस्थित करते. नाटककाराने यात स्वत:चे मत नोंदवताना ‘अशी कित्येक युगे येतील आणि जातील. शहाजहानसारखे बादशहा तख्तावर येतील. नामशेष होतील. पण खरे राज्य नोकरशहांचेच असेल’ असे म्हटले आहे. ते ऐकल्यावर मागे वळून पाहताना आणि भविष्यात डोकावतानाही ते सत्यच असल्याचे जाणवते. यामुळे तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते. एवढ्या प्रभावीपणे संहितेची मांडणी झाली आहे. भारतात तर नोकरशाहीने कहर केला आहे. पण काही अपवाद वगळता बहुतांश देशांमध्येही अशीच स्थिती आहे. रशियात कामगार क्रांतीनंतर गरीब, शोषित, पिडितांच्या प्रतिनिधीचे राज्य आले. काही वर्षे उलटून जाताच तेथे नोकरशाही गरीब, शोषितांची पिळवणूक करू लागली. चीनमध्येही नोकरशाहीच बलवान, भ्रष्ट आहे. यातील एक महत्वाची बाब म्हणजे नोकरशाहीतील वरच्या सिंहासनावर बसलेले लोक नोकरशाहीतल्याच खालच्या लोकांचीही पिळवणूक करत असतात. नोकरशाहीला नाव ठेवणारे, त्यातील भ्रष्टाचारावर हल्ला चढवणारे लोक स्वत: नोकरशहा होताच त्या भ्रष्ट सिस्टीमचा एक भाग होऊन जातात. त्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे प्रत्येक माणूस स्वत:चे हक्क, अधिकारांबद्दल जागरूक नाही. समाज व्यवस्थेत आपली नेमकी काय जबाबदारी आहे, याचे भान बहुसंख्य लोकांना नाही. ज्यांना हे भान आहे, ते पुरेसे ताकदीचे नाहीत. किंवा काही काळ लढल्यावर ते शरणागती पत्करतात. जात, धर्म, पंथाच्या नावाखाली परस्परांवर हल्ले चढवण्यात मशगुल होऊ जातात. नोकरशाही आणि त्यांच्याआडून व्यवहार करणाऱ्या राजकारण्यांना, राजकारण्यांच्या चेल्या-चपाट्यांना ते पुरते ठावूक झाले आहे. अशी विस्तीर्ण पटाची मांडणी ‘ताजमहल का टेंडर’मध्ये आहे. त्यासाठी लेखकाने निवडलेले कथानक अतिशय साधेसोपे पण हृदयात भाला खुपसणारे, रक्तबंबाळ करणारे आहे.
शहाजहान बादशहा जेव्हा ताजमहल उभा करायचा ठरवतो. तेव्हा नेमके काय झाले असेल, अशी कल्पना लेखकाने फुलवली आहे. शहाजहान त्याकाळचा सर्वात पॉवरफुल राजा होता. भारताची अर्थव्यवस्था त्यावेळी प्रचंड मजबूत होती. आजच्याच भाषेत सांगायचे झाले तर जीडीपी किमान १५ टक्के होता. तरीही ताजमहलचे बांधकाम कासवगतीनेच झाले. त्यामागे एकमेव कारण नोकरशाहीच असावे, अशी मांडणी शुक्लांनी केली आहे. सध्याची स्थिती आणि शहाजहानचा काळ यांची सांगड घातली आहे. त्या काळातही एक चीफ इंजिनिअर असेल. या कामातून मलिदा काढण्यासाठी त्यानेही उचापत्या केल्या असणार. त्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, म्हणून खटपटी केल्या असतील. शहाजहानच्या दरबाऱ्यांनी इंजिनिअरविरोधात मोर्चेबांधणी केलीच असेल. एकदा या बांधकामात पैसाच पैसा आहे, असे कळाल्यावर त्यावेळच्या काही उचापतखोर लोकांनी विरोध दर्शवून कमाई केलीच असणार, असा विस्तार अतिशय खुमासदारपणे मांडला आहे. दिग्दर्शक त्रिपाठी यांनी संहितेचे मूल्य, त्यातील खाचाखोचा आणि उपहास क्षणाक्षणाला उफाळत, ओसंडत राहिल, याची काळजी घेतली आहे. सादरीकरणाला प्रचंड वेग असला तरी प्रत्येक घाव वर्मी लागेल एवढी मेहनत घेतली आहे. दोन प्रसंगांमधील धागा गुंफणे, व्यक्तिरेखांना संहितेपलिकडे नेऊन सशक्त करणे, संवादशैलीतून अभिनेता, अभिनेत्री बलवान करणे आणि नि:शब्द शब्दांना बोलते करणे ही दिग्दर्शकाची खरी वैशिष्ट्ये किंवा ताकदीची स्थळे मानली जातात. ती त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनात पुरेपुर दिसतात. ‘ताजमहल का टेंडर’ यशस्वी करण्यात जेवढा वाटा लेखकाचा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिक दिग्दर्शक त्रिपाठींचा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्रिपाठींनी या नाटकाचे संगीतही दिले आहे. ते देखील चपखल, प्रवाही आणि संहितेला अर्थ देणारे आहे. लेखक, दिग्दर्शकाला हवे तेच अतिशय सू्क्ष्मतेने मांडणारे कलावंत अत्यंत दुर्मिळ. पण या नाटकात तेही जमून आले आहे. शहानवाज खान (शहाजहान) आणि चीफ इंजिनिअर गुप्ता (सुरेश शर्मा) यांचा अभिनय पाहताना त्याचा अनुभव येतो. दोघांनी भूमिकांत अक्षरश: जीव ओतला आहे. असे म्हणतात की, रंगमंचावर वाचिक अभिनय जास्त असतो. म्हणजे संवादफेकीवर व्यक्तिरेखा फुलत जाते. पण काही कलावंत असे असतात की त्यांचा अभिनय संवादासोबत डोळ्यांमधूनही प्रेक्षकांशी बोलू लागतो. असे कलावंत अभिनेते, अभिनेत्री म्हणून ओळखले जाऊ लागतात. शहानवाज आणि शर्मा हे त्यापैकीच एक आहेत. व्यक्तिरेखेवर हुकूमत म्हणजे नेमके काय याचा वस्तुपाठच त्यांनी नव्या पिढीतील रंगकर्मींसमोर उभा केला. इतर कलावंतांमध्ये औरंगाबादचा सिद्धेश्वर थोरात, दीपकुमार, श्रुती मिश्रा, शंपा मंडल, राजू रॉय, अपर्णा मेनन, अपराजिता, मोहनलाल, बर्नाली बोरा, नवीनसिंग ठाकूर आदींनी धमाल केली आहे. ‘ताजमहल का टेंडर’चा पुन्हा प्रयोग औरंगाबादेत झाल्यास तो चुकवू नये, अशीच ती आहे. आपण सारेच अलिकडील काळात शोषणाविरुद्ध मूक, अंध, बहिरे नायक होऊ लागले आहोत. हे नाटक पाहून भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध मनात छोटीशी ठिणगी पडली तरी पुढील काही वर्षात काही काळापुरता का होईना वणवा पेटेल, अशी अपेक्षा आहे.