Thursday 20 December 2018

एक कोटी २० लाखांचे पान

एका गावात एक रिकामटेकडा तरुण होता. एक-दोन वर्षे थोडीफार कष्टाची कामे केल्यावर त्याच्या डोक्यात आपण झटपट श्रीमंत झाले पाहिजे, असा विचार घोळू लागला. अशा श्रीमंतीचा मार्ग नेमका कोण दाखवेल, याचा त्याने शोध सुरू केला. गावातील प्रत्येकाला तो गाठून गाठून मला कोणीतरी भेटवून द्या म्हणू लागला. तेव्हा एकाजणाने सांगितले, त्या चार डोंगराच्या पलिकडे एका झोपडीत फकीर राहतो. त्याच्याकडे झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र आहे. झाले. खूप मागे लागलास तर मिळेल तुला मंत्र. तरुण फकीराकडे पोहोचला आणि म्हणाला, ‘मला श्रीमंत होण्याचा मंत्र द्या’. फकीर म्हणाला, अरे बाबा असा काही मंत्र नाही माझ्याकडे. पण तरुण हट्टाला पेटला होता. झोपडीत मुक्काम ठोकत त्याने फकिरामागे एकच भुणभुण लावली. कंटाळून फकिराने त्याला एका झाडाच्या पानावर काहीतरी खरडून दिले. हा मंत्र दहा लाख वेळा म्हटला की, श्रीमंत होशील, असे सांगितले. तरुणाला अत्यानंद झाला. पान घेऊन तो पळत सुटला. फकिराने ओरडून सांगितले, हे पहा मंत्र म्हणत असताना मनात लोण्याच्या गोळ्याचा विचारही आला तर मंत्राचा प्रभाव राहणार नाही. त्यावर ‘अहो मी तो लोण्याचा गोळा काय असतो तेच मला माहिती नाही. तर त्याचा विचार कसा येईल.’ असे म्हणत तरुण गावात पोहोचला. मंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी फकिर लोण्याच्या गोळ्याचे काय सांगत होता बरं, असे त्याने आठवून पाहिले. आणि झाले त्याच्या डोळ्यासमोर लोण्याच्या गोळ्याचे चित्र फिरू लागले. दहा-बारा वेळा मंत्र म्हणताच पुन्हा पुन्हा लोण्याचा गोळा दिसू लागला. कितीही प्रयत्न केले तरी लोणी काही नजरेसमोरून हटेना. वर्षभर हाच प्रकार चालला. लोक तरुणाला वेडा म्हणून लागले. अखेर कंटाळून त्याने मंत्र लिहिलेले पान चोळामोळा करून टाकले.
ओशो रजनीशांनी सांगितलेल्या एका बोधकथेचा हा काहीसा बदललेला सारांश. तो आठवून दिला महापालिकेच्या कारभाराने. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत एक कोटी २० लाख रुपयांच्या उधळपट्टीचा विषय आला. औरंगाबादच्या मानगुटीवर मनपाचे कारभारी, पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याचा प्रश्न टाकला आहे. तो सोडवण्याच्या नावाखाली कमाईचे नवे रस्ते कसे शोधले जात आहे, याचे दर्शन त्यात घडले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत. म्हणून लोकांचे उद्बोधन, प्रबोधन करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्ली येथील फीडबॅक फाऊंडेशन, नॉलेज लिंक आणि नांदेडच्या अॅक्शन फॉर बेटर टुमारो संस्थांना पाचारण केले. पाच महिन्यात प्रत्येकी दहा लाख रुपये असे एका संस्थेला चाळीस लाख म्हणजे एकूण एक कोटी २० लाख रुपये देऊन झाल्यावर या संस्थांनी नेमके काय काम केले. त्याचा फायदा झाला की नाही, हे शोधण्यासाठी स्थायी समितीने त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची उलटतपासणी केली. त्यात एकवेळा महापौर, सभापती राहिलेले गजानन बारवाल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कोंडीत पकडले. कुठे झाले काम. कोणत्या वॉर्डांत केले प्रबोधन, उद्बोधन अशी विचारणा केली. स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनीही बारवालांप्रमाणेच तिन्ही संस्थाचे काम निरुपयोगी असल्याचे मत नोंदवले. एवढ्यावर प्रकरण थांबले नाही तर दस्तुरखुद्द भोंबे यांनी संस्थांच्या प्रबोधनाचा अपेक्षित उपयोग झालाच नाही. लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत, असे सांगितले. मग सभापतींनी फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता या आदेशातून काहीही साध्य होणार नाही. तिन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. लोकांना विनवणी केली. पण लोकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. कारण ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ड्रम नाहीत, असा निष्कर्ष निघेल. संस्थांना दिलेला पैसा पुन्हा वसूल करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची त्यात चौकशी लावली जाईल. प्रबोधन, उद्बोधनासाठी इंदूर, भोपाळ, नागपूर, पुणे, मुंबईच्या नामवंत संस्थांनाच बोलवावे, असा फर्मान निघून सहा महिन्यांत अशा संस्था कामकाजही सुरू करतील. मूळात प्रश्न आहे की, या संस्था प्रबोधन करतात की नाही, हे चार महिने एकाही नगरसेवकाने का पाहिले नाही. संस्थेचे कर्मचारी काहीच करत नाही, हे त्यांनी आयुक्तांना का सांगितले नाही. की संस्थांना कोंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता औरंगाबादकरांनी करापोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेले १ कोटी २० लाख लोकहिताच्या नावाखाली उधळल्याचे प्रकरण दफन केले जाईल. कारण ओशो रजनीशांनी सांगितलेल्या कथेनुसार इथे लोण्याच्या गोळ्याचा ध्यास असलेल्यांची कमतरता नाही. केवळ एका मंत्राचा जप करून श्रीमंत व्हायचे आहे. आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत. लोकांच्या सेवेसाठी नोकरीत आहोत. लोकांनी कष्टाने, पै पै करून जमवून दिलेल्या पैशातून आपला पगार होतो, याचा विसर पडला आहे. हा पैसा आपल्या खिशात घालण्यासाठी दिलेला नाही, हे तर त्यांना मान्यच नाही, अशी स्थिती आहे.

Wednesday 12 December 2018

मुक्या प्राण्यांचातरी दुआ घ्या

दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठा-वेरुळच्या लेण्या झाल्या. हजार – बाराशे वर्षानंतर दौलताबादचा किल्ला उभा राहिला. चारशे वर्षांनी बिवी का मकबरा, पाणचक्की, निर्माण झाली. मग सगळे दुष्काळ पडल्यासारखे कोरडेठाक झाले. हे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त मनमोहनसिंग यांना ४० वर्षांपूर्वी खटकले. म्हणून औरंगाबाद शहराच्या वैभवात भर टाकणारे सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय उभे राहिले. आता एकदा ते वैभव म्हटले की त्याची निगा राखण्याची जबाबदारी वैभवाच्या तळ्याभोवती बसून दिवसा एक – एक लोटा आणि रात्रीच्या वेळी मनसोक्त पाणी पिणाऱ्यांचीच आहे की नाहीॽ पण औरंगाबादमध्ये असे कोणतेही नियम, अलिखित संकेत नाहीत. ज्या कामात फारसा पैसा नाही ती कामे लोकांसाठी कितीही महत्वाची असली तरी सगळ्यात शेवटी ठेवायची, असे धोरण कायम राहिले. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची नोटीस केंद्रीय झू ऑथॉरिटीने काढली आहे. आता ती रद्द करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले लवाजमा घेऊन दिल्लीची वारी करणार आहेत. त्या दौऱ्यावर किमान ६०-७० हजार रुपये ते खर्च करतीलच. अर्थात हा पैसा जनतेचा असल्याने त्यावर कोणीही, कधीही आक्षेप घेणार नाही. महापौर, आयुक्तांनाही त्याचे काहीच वाईट वाटणार नाही. जनतेचा पैसा अशाच कामांसाठी वापरण्याची सवय पूर्वापार चालत आली आहे. तर महापौर दिल्लीला जाऊन झू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना भेटतील. सोबत अर्थातच खासदार चंद्रकांत खैरे असतील. आणि मग काही दिवसांची मुदतवाढ मिळवून महापौर परततील. वर्ष-सहा महिन्यांनी पुन्हा हाच प्रसंग पाहण्यास, ऐकण्यास मिळेल. कारण खरे पाहिले तर ही कहाणी २००६-०७ पासून सुरू आहे. तेव्हा प्राणीसंग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. एस. व्ही. रिझवी यांनी हरीण, वाघाच्या कातडीचा गैरव्यवहार केला, अशी बातमी फुटली. रिझवी यांच्यावर खार खाणाऱ्या त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांनीच ती प्रसारमाध्यमांना पुरवली असावी. त्यामुळे पुढे सारे काही नियोजनबद्धरितीने झाले. गैरव्यवहार झाला की नाही, याचा खरा तपास लागलाच नाही. डॉ. रिझवी निलंबित झाले. त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. लगोलग एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती महापालिका प्रभाव क्षेत्राच्या किंचित बाहेर असल्याने संवेदनशीलतेने प्राणी संग्रहालयाची तपासणी झाली. तेव्हा एवढ्या कमी क्षेत्रफळावर एवढ्या मोठ्या संख्येने प्राणी ठेवणे चुकीचे आहे, असे समितीने स्पष्ट केले. काही प्राण्यांचे पिंजरे तातडीने बदला, अशी सूचना केली. तर केंद्रीय झू ऑथॉरिटीने तत्काळ प्राणीसंग्रहालय शहराबाहेर हलवा, असे म्हटले होते. त्यास आता किमान दहा वर्षे होऊन गेली आहेत. महापौरांनी दिल्लीवारी जरूर करावी. पण एकदा जुनी कागदपत्रेही चाळून बघावीत. थोडा अभ्यास करून  गेलात तर प्राणीसंग्रहालयाच्या विषयावर ठोस मार्ग काढता येईल. कारण मधल्या काळात काहीच झाले असे नाही. पण जे व्हायला हवे होते, ते झालेलेच नाही. सरकारी कारभाराच्या कासवगतीने कासवालाही लाजवले. मिटमिटा – शरणापूर येथे प्राणीसंग्रहालयासाठी १२५ एकर जागेच्या १२५ वेळा घोषणा झाल्या. खुल्या, मोकळ्या जागेत जगण्याची स्वप्ने पाहत पाहत अनेक प्राण्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. जे जगताहेत त्यांच्याही  आशा मावळल्या आहेत. जे कारभारी लाखो लोकांना पाणी देण्यासाठी पंधरा-पंधरा वर्षे घेतात. ते आपल्यासाठी किमान ५० वर्षे तरी काही करणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली असावी. पण काही प्राणी, औरंगाबादचे नागरिक अजूनही आशावादी  आहेत. वाटे-हिस्से करून का होईना, आमदारपदाची स्वप्ने पडत असल्याने का असेना शहरासाठी थोडेफार काम करण्याची घोडेले यांची इच्छा सध्यातरी दिसते. त्यामुळे ते मुदतवाढीसोबत मिटमिटा-शरणापूर येथे अप्रतिम प्राणीसंग्रहालय तातडीने कसे सुरू करता येईल, याकडे लक्ष देतील. केवळ लक्ष देणार नाहीत तर अंमलातही आणतील, असे वाटते. तसे झाले तर औरंगाबादकरांसाठी एक बहारदार पिकनिक स्पॉट तयार होईल. आता जसे लोक सिद्धार्थ उद्यानासाठी मनमोहनसिंग यांचे नाव घेतात, तसे घोडेले यांचे नाव होऊ शकते. असे म्हणतात की चांगुलपणा नेहमीच जगात अल्पसंख्य असतो. लुटारू, कपटींची संख्या जास्तच असते. तरीही चांगुलपणाचे सामर्थ्य अधिकच असते. जसे काळोख्या अंधाराला एक पणती वितळवून टाकते, तशी स्थिती असते. बहुतांश वेळा चांगुलपणा तळागाळात जाऊन पडलेला असतो. दफन अवस्थेत पडतो. लुटारू, कपटींचेच राज्य येते. चांगुलपणावर विश्वास असलेली माणसे गलितगात्र होतात. आणि एका क्षणी सगळी शक्ती एकवटून उफाळून वर येतात. लुटारू, कपटी वृत्तीला पराभूत करतात. वाईटातून चांगले जन्माला येण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. ती घोडेले यांनाही पक्की ठावूक आहे. महापौरपदाची सूत्रे खाली ठेवण्यापूर्वी लोकांच्या लक्षात राहणारी किमान तीन कामे करण्याची त्यांची इच्छा  आहेत. त्यात त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या स्थलांतराचा समावेश केला. वाघ, सिंह, नीलगायींसह सर्वच प्राण्यांना आणखी मोठ्या, खुल्या हवेत जगू दिले तर हे मुके प्राणी त्यांना नक्कीच आशिर्वाद देतील. तो घेण्याची संधी महापौरांनी घालवू नये, असे वाटते.

दशा, दिशेचे नाट्य

हिंदू धर्म, भारतीय  समाजाला लागलेला सर्वात काळाकुट्ट डाग म्हणजे वर्ण, जाती व्यवस्था. हजारो वर्षांपासून हा डाग कायम आहे. जाती-पातीच्या या अमानवीय, क्रूर पद्धतीतून महामानव, तेजसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना बाहेर काढले. तु देखील माणूस आहे. तुलाही स्वाभिमान आहे. तो मुळीच हरवू नको. या देशावर तुझाही सवर्णांइतकाच अधिकार, हक्क आहे. तो मिळवण्याचा, अबाधित राखण्याचा मार्ग मी तयार करत आहे., असे बाबासाहेबांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सवर्णांनी पुढील काळात दलितांना चिरडून टाकू नये म्हणून कायद्याचे संरक्षण दिले. उत्तम शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देताना इतरांप्रमाणे  चांगल्या दर्जाची सरकारी नोकरी मिळेल, अशी व्यवस्था केली. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणातही दलितांचे स्थान अबाधित राहिल. त्यांनाही सत्तेत वाटा कसा मिळू शकेल, हे सांगितले. एकदा सत्तेत वाटा मिळाला सत्ताधारी जमात होऊन हे दलित नेते खालच्या पायरीवर उभ्या आपल्या बांधवांना मदत करून वरच्या पायरीवर आणतील, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. नेमकी ही अपेक्षाच फोल ठरत चालल्याची भावना आंबेडकरी चळवळीत रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २५–३० वर्षांत कमालीची वाढली आहे. स्वाभिमानाने चळवळ कशी चालवायची. कोणाविरुद्ध लढायचे. कोणाला फटकारायचेॽ सगळ्या सवर्णांना एका तराजूत तोलणे खरंच योग्य आहे काॽ आणि हे सगळं करत असताना व्यावहारिक जगात जगायचं कसंॽ हलाखीच्या चक्रातून बाहेर कसं पडायचंॽ असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले आहेत. कारण सत्ताधारी जमात होण्याच्या नावाखाली राजकीय तडजोडी करत अनेक नेते वरच्या पायरीवर गेले. पण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खालच्या पायरीवर उभ्या तमाम दलित समाजाला वरती आणण्यासाठी सत्ता वापरलीच नाही. स्वतःच्या समर्थकांपुरतेच ते मर्यादित राहिले. आणि इतरांना सत्तेच्या सोपानापासून कसे रोखता येईल, यासाठीच शक्ती पणाला लावू लागले. महाराष्ट्रात, मराठी मुलुखात हे अधिक प्रमाणात झाले, असे सिद्धहस्त साहित्यिक, समीक्षक आणि नियोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांना जाणवले. ही जाणिव त्यांना कमालीची टोचू लागली. अस्वस्थ करू लागली. ही अस्वस्थता त्यांनी ‘भाई तुम्ही कुठे आहात’ या दोन अंकी नाटकात अधोरेखित केली आहे. आंबेडकरी चळवळीच्या दशा, दिशेला अतिशय कमी, मोजक्या पण जहाल शब्दांत वाट दाखवणारे हे नाट्य आहे. जहालता असली  तरी त्यात विखार, द्वेष नाही. उलट सगळा समाज आंबेडकरी जनतेसोबत जोडण्याचा एक आशावादी सूर डॉ. कांबळे या नाट्यातून ठामपणे मांडतात. आंबेडकरांच्या नावावर मोठ्या झालेल्या नेत्यांना प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करताना, त्यांच्यावर कठोर प्रहार करतानाही त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा नाही. त्यामुळे ‘भाई तुम्ही कुठे आहात’ अधिक व्यापक भूमिकेचे असल्याचे जाणवत जाते. परिणाम करत राहते. 
दोन अंकात आणि बारा दृश्यात डॉ. कांबळे यांनी नाट्याची मांडणी केली आहे. मंत्री झालेले भाई, एकेकाळी त्यांच्यासोबत दलितांच्या हक्कासाठी लढलेला मिलिंद, भाईंचे सहकारी दिनकरराव, भाईंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्यातील लढवय्येपणाची धार बोथट करणारे भास्करराव यांच्यातील संघर्ष, संवाद, प्रवास बारा प्रवेशात आहे. त्यात एक प्रवेश दलितांच्या हक्कासाठी स्वजातीयांशी वैर पत्करणाऱ्या एका ब्राह्मण दांपत्याचाही आहे. आंबेडकरी चळवळीची दशा नेमकी काय झालीय, दिशा काय आहे आणि प्रबोधन करणे, कार्यकर्त्याच्या मनातील खदखद नेत्यांपर्यंत पोहोचवणे, हेच डॉ. कांबळे यांच्या लेखनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी संपूर्ण मांडणी उद्दिष्टाला पूरकच केली आहे. नाटक लोकप्रिय, वादग्रस्त, मसालेदार करण्यासाठी ओढूनताणून नाट्यमयता, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स किंवा अन्य विशिष्ट गणिते पेरलेली नाहीत. एका निखळ, प्रामाणिक भावनेतून त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे ते दिग्दर्शकालाही प्रचंड संधी उपलब्ध करून देते. नाट्य लेखकाला रंगमंचावर  व्यक्तिरेखा कशा उभ्या राहतात, हे संवादांमधून सांगावे लागते. आणि दोन संवादांमधील निःशब्द क्षणांतून त्याला अभिनयाच्या जागा दाखवून द्यायच्या असतात. यात डॉ. कांबळे यशस्वी झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सरस्वती भुवन महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दिलीप घारे यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे हे नाटक सत्ताधाऱ्यांमधील किंवा विशिष्ट उच्चभ्रू जातींमधील दोषांवर प्रखऱ भाष्य करते. पण त्याचबरोबर दलित चळवळी संबंधात आपल्याला अंतर्मुख करते. भारतीय विशेषतः मराठी सामाजिक रचनेवर भाष्य करताना आजच्या काळात सशक्त दलित चळवळ का उभी राहू शकत नाही, असा प्रश्न उभे करते. त्याची काही उत्तरेही देण्याचा निश्चित प्रयत्न करते. त्यामुळे ‘भाई तुम्ही कोठे आहात’ दलितविषयक प्रश्नांची मांडणारी करणारे दुर्मिळ, मौल्यवान नाटक आहे. औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनाचे दीपाली कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांनी ते पुस्तक रूपात प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतुक गोळेगावकर यांचे मुखपृष्ठ नेमकेपणा सांगणारे. आता दोन वाक्ये सादरीकरणाविषयी. या नाटकाचे काही प्रयोग झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. आता येत्या काळात आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक संस्था, महाविद्यालय, वसाहतीत प्रयोग व्हावेत. म्हणजे डॉ. कांबळे यांना हृदयापासून तळमळीने जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. नेत्यांचे हृदय परिवर्तन होण्याची, त्यांना कोणाची कणव येण्याची शक्यता नाहीच. पण समाजावर त्याचा परिणाम होऊन एक दोन चांगले सामाजिक बदल झाले तरी ते पुरेसे आहे.