Wednesday 19 July 2017

कलेतून धर्मापेक्षा ...


कोणत्याही दोन देशांत, समाजांत काही उपद्रवी मंडळी तणावाचे वातावरण निर्माण करत असतात, तर बहुतांश कलावंत मंडळी तो कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण त्यांची बांधिलकी कलेसोबत असते. जगभरातील कलावंत म्हणजे एक देशच अशी त्यांची भूमिका असते. अर्थात दोन देशांत युद्ध झालेच तर भूमिकेत फरक पडू शकतो. पण युद्ध होऊच नये. उलट दोन्ही देशांतील समाजांमध्ये सामंजस्य निर्माण झाले पाहिजे, असा त्यांचा हेतू असतो. औरंगाबादेतील एमजीएमच्या महागामी नृत्य अकादमीत चीनच्या बीजिंग विद्यापीठातील नृत्यशास्त्र विभागातील तज्ज्ञांचे पथक गेल्या आठवड्यात आले होते. त्यांच्याशी दुभाष्याच्या मदतीने बोलताना ही बाब प्रकर्षाने जाणवली. भारत आणि चीन दोन्ही राष्ट्रे महान परंपरा सांगणारी. चीन अलीकडील काळात महासत्ता म्हणून गणला जात आहे, तर भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे. त्यामुळे सिक्कीमच्या सीमेवर तणाव असला तरी दोन्ही देशांतील कलावंतांना परस्परांच्या कला प्रांताविषयी आकर्षण, कुतूहल आहेच. त्यातल्या त्यात चिनी कलावंतांना भारतीय नृत्य कलांविषयी खूपच अप्रूप आहे. विशेषत: शास्त्रीय नृत्य हा तेथील अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. त्यामुळे त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी बीजिंग नृत्यशास्त्र विभागाचे संचालक पंग डॅन, प्रा. शी मिन, सहायक प्रा. झेंग लू, एक्सिया वेइजिया आणि परराष्ट्र व्यवहार विभागातील व्यवस्थापिका लिन लिन आल्या होत्या. महागामीच्या संचालक पार्वती दत्ता यांनी यापूर्वी चीनचे दौरे करून तेथे सादरीकरण केले असल्याने त्यांनी महागामीची निवड केली होती. येथे या पथकाने कथ्थक आणि ओडिसी नृत्याची निर्मिती नेमकी कशी झाली. त्यातील पदन्यास, मुद्राभिनयामागचे शास्त्र नेमके काय आहे. त्यांचा भारतीय परंपरा, धार्मिकतेशी काय अनुबंध आहे, हे जाणून घेतले. अर्थात यात ब्रजेशकुमार या दुभाष्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी शास्त्रीय नृत्यातील सारेच मुद्दे इतक्या प्रभावी अन् अचूकपणे चिनी भाषेत समजावून सांगितले की, ते ऐकून ओडिसी, कथ्थकचा उलगडा पथकाला झाला. अभ्यास वर्ग झाल्यावर पंग डॅन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद अतिशय महत्त्वाचा होता. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे, तर भारतात लोकशाही आहे. त्यामुळे तेथे कलावंतांना फारसे स्वातंत्र्य नाही, असे ऐकिवात होते. ते सत्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतामध्ये सरकारचा कोणताही निर्णय पटला नाही तर कलावंत मंडळी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतात. लेख लिहून प्रक्षोभ व्यक्त करतात. सरकारने अल्पसंख्याक समाजाविरुद्ध पवित्रा घेतल्याचे वाटत असल्यास किंवा आपल्या मतप्रवाहांशी सहमत नसल्याचे सरकार सत्तेवर असल्याचे वाटत असल्यास कलावंत, लेखक सरकारी पुरस्कार परत करतात. प्रा. शी मिन, पंग डॅन म्हणाले की, आमच्याकडे असे कोणतेही स्वातंत्र्य कलावंतांना नाही. सरकारचे धोरण पटले नाही किंवा सरकार एखाद्या समाजाविरुद्ध असल्याचे दिसत असले तरी त्याविरुद्ध आंदोलनच काय, भावना व्यक्त करणेही केवळ अशक्य आहे. या दोघांनी त्या पुढे जाऊन जे सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे. ते म्हणाले की, आमच्याकडे प्रत्येक कलावंत केवळ कला साधना करणे एवढ्याच एका उद्देशाने कला प्रांतात आलेला असतो. मी उत्तम चित्रकार, उत्तम नर्तक, उत्तम नट-नटी होणार, एवढेच त्याचे ध्येय असते. एकूणातच चिनी माणूस अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठा अन् श्रद्धेने आपापल्या कामात स्वत:ला झोकून देतो. आणि चिनी सरकारही कलावंतांचा सन्मान कायम राहील, त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था होईल, असे बघते. आपल्याकडे जसा प्रत्येक कलाकृतीला, कलावंतांना धार्मिक, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो, कलावंतांवर जात, धर्माचा शिक्का मारला जातो, त्याला चीनमध्ये स्थानच नाही. कोणत्याही कलेच्या माध्यमातून धर्म नव्हे, तर संस्कृतीचीच जपणूक होते. संस्कृतीचे जतन चिनी माणसाच्या रक्तातच भिनले आहे. त्यामुळे एकसंघतेची भावना आपोआप निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. एकूणात एखादा पाहुणा आपल्याकडे काही शिकण्यासाठी आला असताना आपणही त्याच्याकडून खूप काही शिकू शकतो, असेच जणू काही ही चिनी मंडळी सांगत होती. त्यामुळे त्यांच्याकडून आपण सारेच भारतीय संस्कृती जपणुकीसोबत कलेविषयीची निष्ठा, श्रद्धा शिकलो तरी बरेच काही साध्य होऊ शकते. नाही का? 

Monday 17 July 2017

निखळलेल्या दारांच्या आड लपलेले लोक

औरंगाबादकरांची महापालिका, सरकारकडून काय अपेक्षा आहे, असं पंचवीस वर्षांपूर्वी विचारलं गेलं. तेव्हा साऱ्यांनीच चांगले रस्ते द्या. कचऱ्याचे ढिगारे नियमित उचला. रात्रीच्या वेळी पथदिवे सुरू राहतील, याची काळजी घ्या आणि या मोबदल्यात तुम्हाला जे करायचं ते करा, असं सांगितलं होतं. आजही तोच प्रश्न विचारला तरीही लोक पुन्हा रस्ते गाडी चालवण्याजोगे करा. कचऱ्याची विल्हेवाट लागेल, यासाठी यंत्रणा राबवा. पथदिवे दिवसा सुरू आणि रात्री बंद असतात. ते किमान निम्मी रात्र सुरू राहतील, एवढं बघा. आणि हे सारं करताना भ्रष्टाचार थोडासा नियंत्रणात ठेवता येईल. सगळी कामं वेगाने होतील याकडे लक्ष द्या, असंच सांगतील. कारण, आक्रमक होणं, हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना जाब विचारणं औरंगाबादकरांचा मूळ स्वभाव नाही. त्याचा फायदा घेणं सुरू आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे, असं वाटणारे लोक वाढत चालले आहेत. तरीही त्यांची संख्या पुरेशी नाही. दबाव टाकेल एवढी तर नक्कीच झालेली नाही. एखाद्या वाड्याच्या निखळलेल्या दरवाजाआड लपलेल्या लोकांसारखी औरंगाबादच्या लोकांची अवस्था आहे. समोर काय चालले आहे. दिलेली जबाबदारी पार पाडणे तर दूरच, ती पार पाडण्याचा अविर्भाव निर्माण करत खिसे भरले जात आहेत, हे लोक बघत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपये दिल्यावर कारभारी मंडळी बदलतील. पारदर्शी प्रशासनाचा दावा करणारे भाजपचे लोकप्रतिनिधी वेगाने कामाला लागतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. ती फोल ठरली. १०० कोटींत नेमके कोणते रस्ते करायचे, हेही त्यांनी अजून ठरवलेलं नाही. खरे तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार महिन्यांपूर्वीच घसघशीत निधी देण्याची घोषणा केली होती. तेव्हाच महापौर भगवान घडमोडे यांनी तांत्रिक बाजूंची सर्व तयारी करणं अपेक्षित होतं. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक काय म्हणतील. एमआयएमच्या नगरसेवकांना काय वाटेल, असं वाटून त्यांनी चालढकल केली. माजी महापौर त्रंबक तुपे यांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेली यादीच पुढे केली. आणि दुसरीकडे या कामाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार झाला असल्याची अावई उठवून दिली. त्यात भर म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे यांनी निधीचे श्रेय घेण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. शिवसेना, एमआयएमला सोबत घेता घोषणा करून टाकली. एकेकाळी शिवसेनेने जे केले तेच आता भाजप करत आहे. म्हणजे सेना-भाजपमध्ये फरक राहिलेला नाही. खरे तर सत्ताधाऱ्यानं लोक विकासाच्या कामात उदार मनानं वागलं पाहिजे. विरोधकांना सोबत घेऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवता येतो. पण घडमोडे, सावे, दानवेंनी ते केले नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत अपेक्षेनुसार गोंधळ उडाला. श्रेय कुणाचे यावरून सेनेने कामकाजावर बहिष्कार टाकला. लोकांना कोणत्या भागातील रस्ते होणार आणि कधी होणार, हेच जाणून घ्यायचे होते. सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागणाऱ्या सेनेला ते भाजपकडून वदवून घेण्याची संधी होती. पण ती त्यांच्यासह एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही दवडली. सेनेच्या बहिष्कारानंतर भाजपच्या अतिहुशार नगरसेवकांनी तरी यादीसाठी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तेही झाले नाही. उलट १०० कोटींत महापालिकेच्या ४० कोटींची भर टाकून मोठ्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते करावेत, असा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यासाठी डिफर पेमेंट (ठरावीक टप्प्याने बिल देण्याची सुविधा) पद्धतीचा अवलंब करावा, प्रत्येक रस्ता ७० टक्के सिमंेटचा आणि उर्वरित डांबराचा अशीही जोडणी करून टाकली. १०० कोटींचे काम एकालाच मिळण्याऐवजी आठ-दहा ठेकेदारांचा उदरनिर्वाह चालेल, असा उदार दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. सबका साथ सबका विकास, हे मोदींचे घोषवाक्य अशा पद्धतीने अमलात आणले जात आहे. दोन वर्षांपूर्वी रस्त्यांसाठी मिळालेल्या २४ कोटींचे जे झाले तेच १४० कोटींचे करण्याची व्यूहरचना होत आहे. त्यामुळे
घरमाझे शोधाया, मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले, ते आधीच निखळले होते
अशी कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे औरंगाबादकरांची मन:स्थिती होण्याची चिन्हे आहेत. ती पुसून दर्जेदार रस्ते करण्यासाठी एखादा भलामोठा झाडू थेट मुख्यमंत्र्यांनाच हाती घ्यावा लागेल. भाजपची मंडळी त्यांना तसे करू देतील का? 

Thursday 6 July 2017

रंगमंदिराच्या खासगीकरणाचा प्रयोग

एकेकाळी औरंगाबादचेच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था रंगकर्मींनी पुन्हा एकदा मनपाच्या रंगमंचावर आणली आहे. नावासाठी नव्हे, तर गावासाठी असे रंगमंदिराविषयी तळमळीने सांगणारे आणि तमाम औरंगाबादकरांना पाठिंब्यासाठी आवाहन करणारे शीर्षकही त्यांनी सोशल नेटवर्किंगवर चालवले आहे. त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (दोन जुलै) रोजी या रंगकर्मींची बैठक झाली. 
सुमारे तीस वर्षांपूर्वी महापालिकेने सांस्कृतिक केंद्र म्हणून उभे केलेले रंगमंदिर आता अनास्थेचे केंद्र झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशी अवस्था झाल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यावरही महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी काहीही करत नाहीत. केवळ आश्वासनांवर बोळवण करतात, याबद्दल सौम्य शब्दांत संतापही व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षी पुणे, मुंबईतून व्यावसायिक नाट्य प्रयोगासाठी आलेल्या कलावंतांनी संत एकनाथचे असे हाल का झाले, त्याकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही का? रंगमंदिराची अशी बिकट परिस्थिती असेल तर येथे सांस्कृतिक कार्यक्रम कसे होणार, असे सवाल उपस्थित केले होते. त्याची अर्थातच महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून नाट्यप्रेमी, रंगकर्मींना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनीच तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांना रंगमंदिराच्या दर्शनासाठी निमंत्रण दिले. तुपेंनीही रंगमंदिराचे एवढे हाल झालेत का? असा प्रश्न करत निधी देऊन तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांनी साफसफाईचा जिम्मा उचलला होता. तुपेंच्या शब्दावर विश्वास ठेवून रंगकर्मी शांत झाले. तर रंगकर्मी यापलीकडे फार काही करणार नाहीत, असे ठाऊक असल्याने तुपेंनीही पाठपुरावा केला नाही. दोन आठवड्यांपूर्वी रंगमंदिरात ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचा प्रयोग झाल्यावर त्यातील कलावंत प्राजक्त देशमुख यांनी फेसबुकवर रंगमंदिराचे वाभाडे काढले आणि रंगकर्मींना पुन्हा आंदोलन हाती घ्यावे लागले. विशाखा रुपल, शीतल रुद्रवार या दोन महिला रंगकर्मींनी त्यासाठी पुढाकार घेतला हे विशेष. आता त्यांना दत्ता जाधव, भगवान कुलकर्णी, सारंग टाकळकर, हेमंत अष्टपुत्रे, रवी कुलकर्णी, संदीप सोनार, मदन मिमरोट, राजू परदेशी, पवन गायकवाड आदींची साथ मिळाली आहे. २५ वर्षांपूर्वी याच रंगमंचावरून नाट्यप्रवास सुरू करणारे आणि सध्या केंद्र सरकारच्या संगीत नाट्य विभागात संचालक असलेले 
जितेंद्र पानपाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. रंगमंदिराची डागडुजी होईपर्यंत विषय लावून धरण्याचा निर्धार रंगकर्मींनी केला आहे. त्यासाठी मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, विभागीय आयुक्त डाॅ. पुरुषोत्तम भापकर यांना साकडे घातले जाणार आहे. मनपाचा आतापर्यंतचा अनुभव आणि रंगकर्मींचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पाच-दहा लाखांची तरतूद करून कामाच्या निविदा निघतील. दिवाळीच्या तोंडावर काही कामे होतील. वर्षभर सर्वकाही ठीक आहे, असे वाटेल आणि वर्षभरानंतर पुन्हा जैसे थे अवस्था होईल. कारण एकच जे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादकरांना वेठीस धरत आहे, ते म्हणजे भ्रष्टाचाराचे भूत. मनपाचे काम म्हणजे पैसे खिशात घालण्याची नामी संधी, असा अर्थ काढला जातो. काम देणारे आणि ठेका घेणारे थातूरमातूर काम करून कोट्यवधी रुपये खिशात घालत आहेत. संत एकनाथ रंगमंदिराच्या डागडुजीसाठी गेल्या २० वर्षांत जेवढा पैसा खर्च झाला त्याचे ऑडिट केले तर हेच स्पष्ट होईल. त्यामुळे आता रंगमंदिर कायमस्वरूपी तंदुरुस्त ठेवायचे असेल तर खासगीकरणाचा एक पर्याय समोर आहे. या विषयी वेळोवेळी मनपाच्या सभेसमोर प्रस्ताव येऊन गेले. पण प्रस्ताव येताच रंगमंदिर भांडवलदारांच्या घशात घालायचे आहे का, अशी ओरड सुरू होते. कारण आतापर्यंत मनपाने केलेले खासगीकरणाचे सर्वच प्रकल्प ठेकेदारांना मुबलक कमाई करून देणारे ठरले आहेत. त्यामुळे अशी ओरड करण्यात चुकीचे काही नाही. पण आता नुसती ओरड करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे स्थानिक, हौशी कलावंतांना सवलतीच्या दरात रंगमंदिर मिळेल, यासह अन्य काही अटी टाकून सांस्कृतिक चळवळीविषयी आस्था असणाऱ्या संस्थेला रंगमंदिराची देखभाल करण्याचे काम किमान दोन वर्षांसाठी दिले पाहिजे. त्यातून मनपाला थोडेसे उत्पन्न होऊ शकते. डागडुजीवर खर्च करण्याची गरज पडणार नाही. आणि मुख्य म्हणजे दर दोन-तीन वर्षांआड दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदार, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा औरंगाबादकरांच्या घामाचा पैसा वाचेल. खासगीकरण हा सर्वोत्तम मार्ग नाही. पण तो एकदा आजमावून पाहिल्याशिवाय मनपाने पर्यायही ठेवलेला नाही. 

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी


--
देश बुडवण्यास निघालेल्यांचे
बुरखे ओढले जातात तेव्हा...



---


भारतीय माणसाच्या कणाकणात जात व्यवस्था भिनली आहे. जातीचा वापर करून प्रत्येकजण दुसऱ्यावर कुरघोडी करू लागला आहे. सोशल बेवसाईटस् जातीवाचक शिवीगाळींनी भरून जात आहेत. टिपेला पोहोचण्यासाठी निघालेला हा जातीवाद एक दिवस संपूर्ण देशाला घेऊन बुडेल आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी मिळवलेले स्वातंत्ऱ्य हातातून निघून जाईल, हे ठामपणे, टोकदार शब्दांत सांगण्याची हिंमत तरुण पिढीतील प्रतिभावान, संवेदनशील नाटककार अरविंद जगताप यांनी ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ नाटकात दाखवली आहे. महापुरुषांचा वापर करत जातीद्वेषाचा वणवा पेटवून देश बुडवण्यासाठी निघालेल्यांचे बुरखे खाली खेचण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. संयमित तरीही मनाला अस्वस्थ करेल अशा उपहासगर्भ मांडणीमुळे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ मराठी नाटकाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. प्रयोगानंतर रंगमंदिराबाहेर पडताना आपणही जातीवाद्यांच्या, देश बुडवणाऱ्यांच्या कळपातील नाहीत ना, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावू लागतो. हीच या नाटकाची खरी ताकद आहे.
कश्मिरपासून कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेशापासून मुंबईपर्यंत पसरलेला महाकाय देश अशी भुगोलाच्या पुस्तकात भारताची ओळख आहे. मात्र, हजारो जाती-पातींमध्ये विखुरलेला आणि कायम एकमेकांबद्दल द्वेष बाळगणाऱ्यांचा भूखंड अशीच नवी प्रतिमा झपाट्याने तयार होत आहे. हिंदू धर्मावरील काळा डाग असलेल्या वर्णव्यवस्थेचा  अभिमान बाळगणारे, दलितांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक देणारे, आदिवासींचे अस्तित्व नाकारणारे कोट्यवधी लोक भारतात राहतात, हे तर जगाला माहिती होतेच. त्यात आता जाती-जातीमधील संघर्षाची भर पडत आहे. हजारो वर्षांपूर्वी समाजाची चार वर्णात विभागणी करत स्वत:ला जन्मत:च सर्वोच्च मानणारे ब्राह्मण सर्वाधिक दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शाब्दिक आसूड गेल्या काही वर्षांपासून ओढले जात आहेतच. पण त्यासोबत इतर जातींमधील परस्पर सौहार्द, आपुलकीचे नाते संपत चालले आहे. ब्राह्मणांनी पेरलेले जातीचे विष नष्ट करण्यासाठी सर्वांनी लढा उभारण्याची इच्छा क्षीण होत चालली आहे. कोण, कोणत्या जातीचा आहे, हे कळाल्यावरच त्याच्याविषयी प्रेम किंवा दु:ख व्यक्त केले जात आहे. स्वत:च्या जातीच्या माणसाने काहीही बोलले तरी ते योग्यच आणि दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने देशहिताचे काही सांगितले तरी ते चुकीचेच मानून त्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. आपल्या जातीचा अभिमान बाळगण्यापर्यंत तर समजू शकते पण भारतीय समाज त्यापलिकडे चालला आहे. स्व जातीचा अभिमान बाळगत असताना दुसऱ्या जातीला यथेच्छ शिव्या देणे सुरू झाले आहे. ही तेढ वाढतच चालली असून सर्वात महत्वाचे म्हणजे त्यासाठी महापुरुषांचा वापर केला जात आहे. इंग्रजांशी सर्वांनी मिळून, लढून मिळवलेल्या स्वातंत्ऱ्याचा अर्थ मी कसाही वागेन. काहीही बोलेन, असा काढला जात आहे. महानगरांपासून ते खेडेगावापर्यंत जातीच्या जाणिवा तिखट, उग्र होत चालल्या आहेत. हे सारे कथा, कादंबऱ्यांमधून काही प्रमाणात उमटतानाही दिसते. पण समाज प्रबोधनाचा वारसा सांगणारी नाट्यकला त्यापासून काहीशी दूरच होती. कारण जाती व्यवस्थेविषयी बोलताना त्यावर थेट,  परखड भाष्य करण्यासाठी नाटककार अस्वस्थ मनाचा असणे गरजेचे आहे. हा समाज बदलला पाहिजे, अशी त्याला मनापासून तळमळ हवी. तरुण पिढीतील मराठवाड्याचे प्रतिभावंत नाटककार राजकुमार तांगडे यांच्यात अशी अस्वस्थता, तळमळ होती. त्यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या विलक्षण ताकदीने लिहिलेल्या नाटकात ती परिणामकारक दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते, असे तांगडे यांनी मांडले आहे. जगताप यांनी त्यापुढचे पाऊल टाकले आहे. सर्वच जाती-धर्माचे लोक स्वत:भोवती जातीच्या भिंती उभ्या करून इतरांचे जगणे कसे मुश्किल करत आहेत, अशी मांडणी त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये केली आहे. केवळ जाती प्रथांवर प्रहार करण्यापर्यंत ते थांबत नाहीत. महापुरुषांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनाच महापुरुषांनी वेळोवेळी दिलेले संदेश माहिती नाहीत. त्यांनी नेमकी काय शिकवण दिली, हे समजावून घेण्याची त्यांची तयारीच नाही, असेही ते कठोरपणे सांगतात आणि त्यामुळे हे नाट्य अधिक उंचीवर पोहोचते.
महाविद्यालयीन काळात खळबळजनक विषयाची निवड करून त्याची बहुचर्चित मांडणी करणारे जगताप आता अधिक संवेदनशील, जागरुक झाले असल्याचेही जाणवते. क्षोभक संवाद हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. काही संवाद बाँबगोळ्यासारखे आपल्यावर कोसळतात. काही आसूड ओढतात. कानशिलाखाली लगावतात. तर काही संवाद ऐकताना आपण किती हतबल आहोत, याची जाणिव होत राहते.
जातींवर पोसलेल्यांवर हल्ला चढवणाऱ्या, स्फोटक विषयाची मांडणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये करण्यासाठी जगतापांनी फँटसीचा आधार घेतला आहे. स्वर्गात पोहोचलेल्या तुकाराम (डॉ. दिलीप घारे) नामक माणसाची गाठ देवलोकातील गाइडशी (रमाकांत भालेराव) पडते. देव, जात, धर्म याबद्दल तुकाराम काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देव घोषित करायचे की नाही, याबाबत निर्णय घ्यावा, असे देवसभेत ठरते. त्याची तपासणी करण्यासाठी तुकाराम आणि गाइड भारतात येतात. तर इथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याची घटना घडल्याची चर्चा सुरू असते. असे खरोखरच घडले असेल का. असल्यास त्यामागे काय कारण असावे, याचा राजकारणी, अधिकारी आपापल्या सोयीनुसार अर्थ काढू लागतात. अखेर अश्रू आल्याची घटना म्हणजे अफवा असल्याचे समोर येते. पण यावरून उसळलेल्या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू होतो. त्याचेही जातकरण सुरू होते. मेलेला माणूस होता यापेक्षा तो कोणत्या जातीचा होता, हे शोधण्यातच साऱ्यांना स्वारस्य असते. हे सारे पाहून तुकाराम अस्वस्थ होतो. जातीचा अभिमान बाळगत, दुसऱ्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणाऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा सल्ला देतो. माणूस झाला नाहीत. जातीवाद असाच वाढवत नेला तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतो आणि अनेकांनी पांघरलेला, ओढलेला बुरखा ओढून काढत प्रयोग संपतो.
आता थोडेसे दिग्दर्शक जगतापांविषयी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे लिखाण करत असतानाच त्यातील प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांचे आरोह-अवरोह, पंचेस, काँपोझिशन्सचा अभ्यास त्यांनी केला असावा असे दिसते. तुकाराम सर्वांना माणूस म्हणण्याचा सल्ला देतो, या प्रसंगाला थोडेशी गती आवश्यक वाटते. शिवाय डावीकडून उजवीकडे रांगेत उभारलेल्यांकडे तुकारामने जाण्याऐवजी त्यातील शाब्दिक पंचनुसार निवड केली तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. जगतापांनी व्यावसायिक नाटकाला आवश्यक असणारे तांत्रिक गिमिक्सही वापरले आहेत. फक्त काही प्रयोगानंतर त्याचे टायमिंग किंचित कमी करता आले तर अधिक प्रभावी होईल. डॉ. दिलीप घारे म्हणजे नाट्यशास्त्राचे स्वतंत्र विद्यापीठ. ते या नाटकात मध्यवर्ती भूमिका करत असल्याने त्यांच्या अभिनयशैलीची छाप सर्वच कलाकारांवर पडलेली दिसते. त्यात वैविध्य आल्यास व्यक्तिरेखा अधिक उठावदार होतील, असे वाटते.
संभाजी भगत यांचे पहाडी, दणकट आवाजासह संगीत आणि दोन प्रसंगांना जोडणारे, त्यातील आशय अधिक खोलवर करणारे गझलनवाज भीमराव पांचाळे यांचे स्वर नाटकाची उंची आणखी उंचीवर नेतात. डॉ. घारेंनी उभा केलेला तुकाराम आवर्जून अभ्यासावा असा आहे. देवावर असीम श्रद्धा असलेला आणि देव, महापुरुषांचा वापर करून स्वत:ची पोळी भाजून घेणाऱ्यांवर डाफरणारा, त्यांना उघडे पाडणारा माणूस त्यांनी खूपच मनापासासून साकारला आहे. त्यांचे टायमिंग, चेहऱ्यावरील भाव आणि शब्दांमधील आशय बाहेर काढत तो फुलवून सांगणे अफलातून. रमाकांत भालेराव यांनी गाइडच्या भूमिकेत जीव ओतला आहे. घारेंसारख्या दिग्गजासोबत काम करणे म्हणजे परीक्षाच. त्यात ते सहज उत्तीर्ण होतात. शैलेश कोरडे, महेंद्र खिल्लारे या जोडगोळीने धमाल उडवून दिली आहे. त्यांचे ट्युनिंग, टायमिंग कमालीचे आणि छाप सोडणारे. दोघेही जण रंगमंचावर सहज वावरतात. ते भूमिकांशी कमालीचे समरस झाल्याचे प्रत्येक क्षणाला अनुभवास येते. डॉ. जयंत शेवतेकर यांनी सुधारकाच्या आड लपलेला जातीवादी संशोधक कमालीच्या संयमाने, बारकाव्यांसह मांडला आहे. टीव्ही वृत्त वाहिनीवरील पत्रकाराशी संवादाचा प्रसंग त्यांच्यातील अभिनय क्षमतेची साक्ष देतो. करारी बाण्याची, डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर मनस्वी प्रेम करणारी आणि त्यांचे विचार आत्मसात करणारी पोलिस अधिकारी नम्रता सुमीराजने विलक्षण ताकदीने उभी केली आहे. प्रेम लोंढेंने दलित राजकारणी उभा करताना आवाज आणि चेहऱ्यावरील रेषांचा केलेला सूक्ष्म वापर दीर्घकाळ लक्षात राहिल, असा  आहे. मुक्तेश्वर खोलेचा राजकारणी लक्षवेधी. त्यांना श्रुती कुलकर्णी, नितीन धोंगडे, राहूल काकडे, कपिल जोगदंड, अनिल मोरे, राहूल बोर्डे, उमेश चाबूकस्वार यांची चांगली साथ मिळाली आहे. शीतल तळपदे, प्रसाद वाघमारेंची प्रकाश योजना, विनोद आघाव यांचे संगीत संयोजन, राहूल काकडेंचे नृत्य दिग्दर्शन संहितेला पूरक. मूळ मराठवाड्यातील लेखक, दिग्दर्शक आणि कलावंत असलेल्या हे राहूल भंडारे यांनी अद्वैत थिएटर्सतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.