Thursday 4 April 2019

ओता कानात उकळता रस

शिवसेनेचे नवे युवराज आदित्य ठाकरे काल औरंगाबादेत होते. चारवेळा खासदार राहिलेल्या आणि आता पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत खैरे यांच्यासाठी त्यांचा ठरवून, गिरवून टॉक शो झाला. निमित्त खैरेंच्या प्रचाराचे असले तरी त्यात युवराजांच्या लाँचिंगचा मोठा भाग होता, हे स्पष्ट होत गेले. बऱ्याच प्रश्नांची पूर्वकल्पना आदित्य यांना २४ तास आधीच दिली गेली होती. स्वतःच्या कारभारावर फार मोठे बाँब गोळे पडणार नाही, याची खबरदारी खैरे आणि त्यांच्या एकनिष्ठ सहकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे सारे काही बऱ्यापैकी सुरळित झाले. युवराजांना नागरी प्रश्नांची जाणिव आहे. ते विशिष्ट वातावरणात तरुणाईला सामोरे जाऊ इच्छितात, असे चित्र निर्माण झाले. अर्थात माझा मुद्दा त्या टॉक शोच्या यशापशाबद्दलचा नाहीये. तर त्यातील स्मार्ट सिटीच्या उल्लेखाविषयीचा आहे. चंद्रकांत खैरे यांना तब्बल २० वर्षे जिल्ह्यातील सर्वोच्च पद देऊनही त्यांनी विकासासाठी काहीही केले नाही. औरंगाबादला स्मार्ट सिटी करण्याच्या योजनेला तसूभरही का पुढे सरकू दिले नाही, अशा आशयाचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नकर्त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण जाती, धर्म, पंथाच्या नावाखाली लढवल्या जाणाऱ्या सर्वच निवडणुकांत खरा विकास सर्वच राजकीय पक्षांकडून खड्ड्‌यात पुरला जातो. आणि त्याच खड्ड्‌यांवर राजकारणी बेधुंद होऊन नृत्य करत असतात. औरंगाबादमध्ये तर या भयकंर पद्धतीने कळस गाठला आहे. म्हणूनच तीन वर्षे होत आले तरी स्मार्ट सिटीचे गाडे रुतून पडले आहे. प्रसारमाध्यमांनी खूप आरडाओरड केली. थेट उद्धव ठाकरेंपर्यंत ती ओरड पोहोचली. कचऱ्याचा प्रश्न असा सुटणारच नाही. १०० कोटींच्या रस्त्यांसाठी मनासारखा ठेकेदार शोधायला वेळ लागेल, असेही महापौर नंदकुमार घोडेले यांच्या लक्षात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी करावेच लागेल, असेही त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी सिटी बस सेवा सुरू केली. आता शहराच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जाता येईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. पूर्ण संख्येने म्हणजे १५० बस अद्याप आलेल्याच नाहीत. ज्या आहेत, त्यांचेही वेळापत्रक प्रवाशांच्या हिताचे नसल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जर मोठ्या संख्येने बस आल्या नाहीत. त्यांचे वेळापत्रक सुधारले नाही. छोट्या वसाहतींमध्येही बस पोहोचल्या नाही तर ही सेवा केवळ पदाधिकाऱ्यांच्या फायद्यापुरती राहिल, हे खासदार खैरे यांच्या खास वर्तुळात असलेल्या आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या महापौर नंदकुमार घोडेले यांनी लक्षात घ्यावे. त्यासोबतच त्यांना नव्याने मिळणाऱ्या १०० कोटींच्या रस्ता कामांना वेगात सुरू करावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे समांतर जलवाहिनीचा तिढा सोडवून पाइपलाईन टाकली जात असल्याचे जनतेला दाखवून द्यावे लागेल. आणि हे सारे करवून घेण्यासाठी एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइंच्या सर्वच स्थानिक राजकारण्यांना राजकारणाचे बुरखे बाजूला सारावे लागतील. कालच्या टॉक शोमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, नागरी समस्या ही काही खासदारांची जबाबदारी नाही. दिल्लीत देशाविषयीचे धोरण ठरवणे. महत्वाच्या योजनांना मार्गी लावणे, काही लोकहिताचे कायदे करणे ही खासदारांची जबाबदारी असते. धाकले ठाकरे म्हणाले त्यात काहीच चुकीचे नाही. खासदारांनी दिल्ली पाहावी, आमदारांनी मुंबई पहावी आणि महापौरांनी गल्ली पाहावी, अशीच रचना आहे. पण खैरे यांच्या ते कधीच पचनी पडलेले नाही. लोकांच्या खरेच उपयोगाला पडेल असे दर्जेदार, स्मार्ट काम त्यांच्या शब्दकोशात कधीच नव्हते. महापालिकेच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप हेच त्यांचे धोरण राहिले. बरं, हस्तक्षेप चांगल्यासाठी केला तर त्याचेही स्वागत होईल. पण तेही त्यांना कधी जमले नाही. एकही योजना त्यांना मार्गी लावता आलेली नाही. ठेकेदार, नगरसेवकांचे एक विशिष्ट कोंडाळे त्यांनी स्वतःभोवती रचून घेतले. विशिष्ट कामे अमूक टक्के झालीच पाहिजेत, असा धोशा ठेकेदारांकडे लावला. त्यांच्या या कार्यपद्धतीचा काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना अमाप फायदा झाला. एकेकाळी दुचाकीवरून फिरणारे काहीजण आज चारचार चारचाकी राखून आहेत. त्यात केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर पक्षीयही लाभार्थी आहेत. असं आणखी बरंच काही सांगण्यासारखं आहे. पण इथं त्याचे औचित्य नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे की, विशिष्ट टक्के कामासाठी हस्तक्षेपाची पद्धत बंद करण्याचा भट्टीमध्ये उकळलेला सल्ला आदित्य यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर कारभाऱ्यांच्याही कानात ओतावा. त्याचा खैरेंना नसला तरी कदाचित सेनेच्या दुसऱ्या पिढीतील नेतृत्वाला फायदा होईल. आणि कोणाचा फायदा होवो न होवो, औरंगाबादकरांची दुष्टचक्रातून काही वर्षांसाठी सुटका तर होईल नाॽ

सांध्यावरच्या मर्मभेदी नोंदी

बालाजी सुतार हे मराठवाड्याच्या नव्या पिढीतील अत्यंत सशक्त, सखोल आणि अचूक विचार मांडणारे साहित्यिक. त्यांच्यातील या गुण- वैशिष्ट्य, बलस्थानाचा परिचय होतो त्यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहातून. जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाल्यावर खेडेगावांमध्ये नेमकी काय स्थित्यंतरे घडली. तिथले जीवनमान कसे बदलत गेले, हे तर सुतार यांची लेखणी अतिशय मर्मभेदी पद्धतीने सांगतेच. त्यात ते कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. जाती-पातींच्या आड माणूस म्हणून दडलेले राक्षसी चेहरे ते उघड करतात. कोण कुठं चुकतंय. जास्तीचं माप पदरात ओढून घेतंय, हे पण थेट हल्ला करत सांगतात. शिवाय गावांचा व्यवहार कसा. तिथली जातीव्यवस्था कुठल्या वळणावर येऊन ठेपली आहे. शतकानुशतके काबाडकष्टातच जगणारी महिला नामक व्यवस्था आज कोणत्या अवस्थेत आहे. तरुणाईची स्वप्ने कोणती आहेत. ती कशाने भंगत आहेत. गावांमध्ये धार्मिक तेढ म्हणजे नेमके काय असते, अशा एकना अनेक धागादोऱ्यांची अतिशय बळकट वीण ते आपल्याभोवती विणून टाकतात. ती देखील अतिशय सहजगत्या. म्हणजे हे सारे विषय आपल्या अवतीभोवती कधी गिरक्या घेऊ लागतात. गिरक्या घेत घेत वावटळीचे रुप धारण करतात आणि काही वेळानंतर कधी आपल्यालाच स्वःतमध्ये सामावून घेऊन भिरकावून देतात, हेच लक्षात येत नाही. कथा संपते तेव्हा आपण भानावर येतो आणि आणखी काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा मागची काही पाने चाळतो. सुतार यांनी मांडलेल्या विचारांच्या चक्रात अडकतो.  काही तपशील थोडासा सविस्तर असला तरी तो अतिशय मनापासून आलेला आहे. एकप्रकारचा तो मुक्त संवादच आहे. राजन गवस यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये म्हटल्यानुसार लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वतःचा मोकळा अवकाश करून देणाऱ्या आजच्या कथाकारांमध्ये बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या...’मध्ये ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’, ‘डहूळ डोहातले भोवरे’, ‘निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’, ‘दोन जगातला कवी’, ‘पराभवाच्या बखरीतली काही पानं’, ‘अमानवाच्या जात्याचा पाळू’, ‘संधिकाळातले जहरी प्रहर’ आणि ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ अशा एकूण सात कथा १५९ पानांमध्ये व्यापलेल्या आहेत. त्यातील पहिली ‘विच्छिन्न भोवतालचे संदर्भ’ ही कथा म्हणजे राघव नावाच्या एका तरुणाची विलक्षण शब्दांत टिपलेली भावस्पंदने आहे. दोन प्रसंगांमध्ये सुतार जी भाष्ये पेरतात ती थक्क करून टाकतात. उदा. सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्याचे काय करावे, हे त्याला उमगत नाही हीच त्याची गोची आहे. हे वाक्य पूर्ण झाल्यावर सुतार लिहितात, ‘कल्पितांना कथा समजून वाचण्यात फार दिवस व्यर्थ गेले.  जिवंत गाथा वाचायच्याच राहून गेल्या. सव्यापसव्यं यांत्रिक असतात आणि डोहातली उसळीच फक्त जिती असते, हे, भडव्या कधी उमजणार तुलाॽ पारा उडून आणि गंध विरून गेल्यावरॽ’. त्यांचा हा सवाल प्रत्येक शब्दांवर अनेक अंतरंगे उलगडतो. पुढे ते आणखी एका संदर्भात म्हणतात, ‘तांडेच्या तांडे फिरताहेत अकाली मेल्या स्वप्नांच्या तिरड्या खांद्यावर घेऊन. हे शहर आहे की स्मशानॽ’, ‘मायेचा पाऊस असला तर माणसाच्या शिवारात ओल राहते. पाऊस नाही, धान मरून जातं. पाऊस नाही, मन जळून जातं. पाऊस नाही, तहानेनं वाळून जा. पाऊस ओढ देतो, चातक होऊन बस. पाऊस झड लावतो, अगस्ती होऊन उपस. पावसात रोमँटिक कविता लिहिणं ठीक आहे. पावसात खमंग भजी तळून खाणंही ठीकच. पावसाअभावी काही पिकं, काही शेतं, काही घरं, काही गावं आणि कितीएक शंकर मरून जातात हे लक्षात असू दे.’ असे सुतार म्हणतात. तेव्हा काळजाचा थरकाप उडतो. पुढील प्रत्येक कथांमध्येही त्यांची संवेदनशील माणूस म्हणून भूमिका समोर येत जाते. एकूणच जागतिकीकरणाने, जगण्यासाठी लढण्याच्या स्पर्धेने गावांचे, शहरांचे बदललेले रूप एवढ्या आतड्यापासून अलिकडील काळात कोणी मांडले असावे, असे वाटत नाही. सुतार यांची एकूण विषय स्वतःमध्ये भिनवून घेण्याची आणि त्यानंतर तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याची शैली महान उर्दू कथाकार सआदत मंटो हुसेन यांच्यासारखी भासते. त्यामुळे त्यांचा हा कथासंग्रह अतिशय मौल्यवान आहे. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषांतही या कथांचे भाषांतर नक्कीच होईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही. आता सिनेमा, नाटकाच्या दृष्टीने एक मुद्दा. सुतार यांच्या एकूणच साहित्य विश्वातील काही निवडक गोष्टी घेत गावकथा नावाचे एक दीर्घनाट्य काही महिन्यांपूर्वी रंगमंचावर आले आहे. त्यातील दिग्दर्शक, कलावंतांनी ते अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण मेहनतीने सादर केले आहेच. ‘दोन शतकांच्या...’ वाचताना असे वाटते की साऱ्याच कथांवर एक स्वतंत्र दीर्घांक होऊ शकतो. आणि लघुपट होण्याचीही शक्ती या कथांमध्ये नक्कीच दडलेली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची बीजे मराठवाड्यात रोवणारे निलेश राऊत, सुबोध जाधव यांनी गावकथाचे प्रयोग अविष्कृत होण्यासाठी पुढाकार घेतला आहेच. त्यांनी ठरवले तर काही अप्रतिम लघुपट तयार होऊ शकतील. यु ट्यूब किंवा अन्य जागतिक पातळीवरच्या माध्यमांमध्ये हे लघुपट पोहोचले तर खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे नाव आणि मराठी गाव, गावातील माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. 

तो असा इतिहासही रचून गेला

जालना जिल्ह्याचे क्रीडाधिकारी हे त्याचे समाजातील मानाचे पद. पण त्याला आवडायचं ते रंगकर्मी असं बिरुद. तो हे बिरुद अभिमानानं सांगायचा. तेव्हा समोरच्याचे डोळे आपल्यावर पूर्णपणे रोखले जातील, याची काळजी तो घ्यायचा. पण या रोखलेल्या डोळ्यांना चुकवून तो हे जगच सोडून जाईल, असे कोणाला कधी वाटलेच नव्हते. अन्यथा साऱ्यांनीच नजरांची तटबंदी करून त्याला रोखून धरलं असतं. होय, मी तरुण रंगकर्मी संजय वनवेबद्दल सांगतोय. तो या जगात असताना एखाद्या अवखळ, निरागस मुलासारखा होता. मात्र, अकाली कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे जग सोडून जाताना सर्वांना गंभीर करून गेला. नवनव्या कलाकृती सादर करत रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करणे हे तर आपल्या रक्तातच आहे. पण हे करताना सावध रहा. काळजी घ्या. एकमेकांना मदत करा. आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा गोतावळा असू द्या, असा संदेशही त्यानं दिला. आणि संजयची महती अशी की, त्याचा संदेश मराठवाड्यातील तमाम तरुण रंगकर्मींनी मनावर घेतला. त्याच्या कुटुंबाला आपापल्या शक्तीनुसार मदत तर केलीच. शिवाय असा दुर्दैवी प्रसंग कोणावर ओढावलाच तर त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारी यंत्रणा निर्माण करण्याची शक्तीही देऊन गेला. कोणत्याही कुटुंबात, समाजात, कार्यालयात अगदी राजकीय पक्षात अशी काही माणसे असतात. ज्यांचे तसे म्हटले तर रोजच्या धबडग्यात फारसे योगदान नसते. महत्वही नसते. पण तरीही ती अनेकांना हवीहवीशी वाटत असतात. थोर व्यक्तिमत्व नसले तरी त्यांचा वावर अत्यावश्यक असतो. अशा निरलस माणसांना कोणाकडून फारशा अपेक्षाही नसतात. आपण वावरतोय, फिरतोय. सगळ्यांशी बोलतोय. आपल्या क्षमतेनुसार हातभार लावतोय, याच आनंदात ते असतात. थोडेसे पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील नारायणसारखे. एका अर्थाने ते निरुपद्रवी असल्याने आणि कोणताही प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यात नसल्याने त्यांचे खरंच महत्व आहे का, असाही फालतू प्रश्न काही मंडळी बऱ्याचवेळा विचारत असतात. हा माणूस काही कामाचाच नाही, असे म्हणत अशा नारायणांना हुसकावून लावण्याचाही प्रयत्न सुरू असतो. या प्रश्न विचारणाऱ्यांना काळ उत्तर देतोच. परंतु, निरलसपणे काम करणाऱ्यांचे महत्वही सर्वांसमोर काळच आणून देतो. यातील काहीजण काळाच्या पडद्याआड झाल्यावरही इतिहासात नोंद होईल, अशी कामगिरी करतात. मराठवाड्याच्या रंगभूमीवरून अचानकपणे लुप्त झालेला संजय वनवे त्यापैकीच एक. त्याच्या जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला. त्याच्या निधनाची वार्ता कळताच त्याची आईही हे जग सोडून गेली. 
खरेतर संजय काही पट्टीचा अभिनेता नव्हता. नाट्य दिग्दर्शन, लेखन त्याचा प्रांत नव्हता. पण रंगभूमीवर कायम वावरत राहणे. जो कोणी नाटक करतोय. त्याच्या अडीअडचणीला कोणत्याही अपेक्षेशिवाय धावून जात होता. अगदी पडेल ते काम तो करायचा. अगदी पडदा उघडायचा किंवा पाडायचा असेल तरी संजय जबाबदारी स्वीकारायचा. आपण मोठ्या पदावरील शासकीय अधिकारी आहोत, याचा किंचितही अभिनिवेश त्याच्यात नव्हता. असा हा दुर्मिळ रंगकर्मी प्रख्यात लेखक अरविंद जगताप, प्रेषित रुद्रवार, रमाकांत भालेराव, शीतल देशपांडे, सतीश परब यांचा खास मित्र आणि त्यांच्यासारख्या शेकडो कलावंतांच्या गळ्यातील ताईत. घरची परिस्थिती ठीकठाक. त्यामुळे त्याच्या जाण्याने सारे हादरले असले तरी त्याच्या कुटुंबाला मदतीचा विचार पहिल्यांदा कोणाच्या मनात आला नाही. पण म्हणतात ना दुरून दिसते ते सारेच खरे असत नाही. तशीच स्थिती होती. संजयच्या कुटुंबाला सरकारी आर्थिक मदत मिळण्यास किमान एक वर्ष लागणार, असे काही दिवसांतच प्रेषित, शीतल यांच्या लक्षात आले. आणि अरविंद, सतीश, रमाकांत आदींशी चर्चा करून मदतीची योजना आखण्यात आली. संजयच्या नावाने व्हॉटस्‌अप ग्रुप स्थापन करून ज्याला शक्य असेल त्याने यशाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील रंगकर्मी नाट्य प्रयोगासाठी एकमेकांना मदत करतील. पण अशा स्थितीत खरेच कोण धावून येईल, अशी शंका होती. इतिहासात घडून गेलेल्या काही घटनाही त्यांना आठवत होत्या. पण संजयचे व्यक्तिमत्व म्हणा किंवा रंगकर्मींना काळाने मिळवून दिलेले भान म्हणा. सारेच एकवटले. प्रख्यात अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री गीता अग्रवाल, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यापासून ते अगदी रंगभूमीवर स्थिरावू पाहत असलेल्या अनेकांनी रक्कम दिली. पाहता पाहता दोन लाखांचा निधी तयार झाला. चार मार्चला तो त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. इथपर्यंत तर कौतुकास्पद होतेच. पण डॉ. सुधीर निकम यांच्या पुढाकाराने आणखी एक पाऊल टाकण्यात आले. मराठवाड्यातील कोणत्याही रंगकर्मीवर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला तर अडीच लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची संजय कलाधार योजना आखण्यात आली आहे. ती पुढील सहा महिने-वर्षभरात कार्यान्वित होणार आहे. एक आदर्श निर्माण करण्यासाठी सारी कलावंत मंडळी पावले टाकू लागली आहेत. त्यांच्या पावलांना चित्त्याची गती, हत्तीचे बळ मिळो आणि हा निधी देण्याची वेळ कोणावरच न येवो, हीच या निमित्ताने संजय वनवेची अपेक्षा असेल नाही काॽ 

रंग, रेषांच्या दुनियेचे दर्शन

नाटक कोणत्याही ठिकाणी सुरू करता येऊ शकते आणि एकदा ते सुरू झालं की त्याला किमान भारतात प्रेक्षक मिळतातच. ते कोणत्या ठिकाणी सादर होतंय यावर त्याची लोकप्रियता अवलंबून राहत नाही. फक्त त्यात नेमकं काय सांगितलंय हेच रसिकांसाठी महत्वाचं असतं. मात्र ज्यांच्यासाठी ते नाटक तयार केलेलं असतं त्याच मंडळींसमोर ते झाले तर अधिक परिणाम साधतं. तसं चित्रकलेबद्दलही आहे. एखादी चित्रकृती रेखाटल्यावर ती विशिष्ट ठिकाणी प्रदर्शित करण्यास एक वेगळंच महत्व आहे. या प्रदर्शनाचेही एक टायमिंग असावे लागते. आणि त्यातील मांडणीची कलाही अवगत असली तर मग रेखाटनाला दर्दींची गर्दी होते. हे सारं काही माहिती असलेले, हरहुन्नरी छायाचित्रकार किशोर निकम यांच्या पुढाकाराने नुकत्याच झालेल्या पॅच नामक चित्रप्रदर्शनातून त्यावर शिक्कामोर्तब होते. औरंगाबाद शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांनी या प्रदर्शनाचा मनसोक्त आस्वाद घेतला. अनेक प्रतिभावान चित्रकार केवळ प्रदर्शनाचे तंत्र आत्मसात नसल्याने किंवा त्यापासून फटकून राहत असल्याने दुर्लक्षित राहतात. अशांना एकत्र आणून त्यांची अप्रतिम रेखाटने रसिकांसमोर आणण्याचे काम कोणालातरी करावे लागणारच आहे. ही जबाबदारी किशोर यांनी मनापासून स्वीकारली. आज मराठवाड्याच्या तरुण पिढीतील आघाडीचे फ्री लान्स छायाचित्रकार म्हणून किशोर यांचे नाव घेतले जाते. कारण त्यांनी मिडिआतील मंडळींशी सलगी असूनही कायम चौकटीबाहेर स्वतःचा वावर ठेवला.२५-३० वर्षांपूर्वी उत्तम छायाचित्रांची जाण असलेली तरुणाई पोटा-पाण्यासाठी वर्तमानपत्रांच्या जगात शिरली. त्यातील बहुतांशजणांना मिडिआच्या पॉवर, ग्लॅमरचेही आकर्षण होते. त्यामुळे ते एका कृष्णविवरात ओढले गेले. मिडिआमधील जीवघेण्या स्पर्धेत, जातीवादात आणि बातमीसाठी रोजचे फोटो एवढ्याच चक्रात अडकून पडले. निकम दोनदा अपघाताने त्या विवरात शिरले आणि चलाखीने बाहेर पडले. आता त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. शास्त्रीय, पारंपारिक नृत्यांमधील काही हालचाली कॅमेऱ्यात टिपताना विशिष्ट तंत्राचा वापर केला की ती हालचाल एखाद्या पेटिंगसारखी उतरते. या तंत्रात निकम यांनी मातब्बरी प्राप्त केली. आणि अशा प्रकारच्या चित्रांची प्रदर्शने मुंबई, पुण्यात भरवली. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचे समाधान त्यांना मिळाले. पण आपण ज्या गावात राहतो तेथील रसिकांनीही या कलाकृती पाहिल्या पाहिजेत, असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी विचार करत असताना त्यांच्या असेही लक्षात आले की आपल्यासोबत १९९८मध्ये शासकीय कला महाविद्यालयात शिक्षण घेणारे वैशाली टाकळकर, स्वाती नरेंद्रसिंग, सावी निकम, डी. विद्यासागर, डॉ. ए. डी. काटे, डॉ. सर्वेश नांद्रेकर आदी मंडळीही आज दिग्गज कलावंत म्हणून परिचित झाली आहेत. प्रत्येकजण एका विशिष्ट रंगशैलीत पारंगत झाला आहे. त्यांनाही सोबत घेऊन चित्रप्रदर्शन आयोजित केले तर ते अधिक वैविध्यपूर्ण होईल. एकाच छताखाली अनेक कलावंतांच्या सृजनशीलतेचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळेल. शिवाय सभागृहाचे भाडे आणि इतर खर्चाचा भार कोणा एकावर पडणार नाही, असा व्यावहारिक विचारही निकम यांनी केला.  त्यातून १५ ते १७ फेब्रुवारी कालावधीत एमजीएमच्या दीर्घा आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन झाले. मांडणी, आशय, विषयाच्या निकषात ते वजनदार होते. सर्वच चित्रकार, शिल्पकार दीर्घ अनुभवी आणि रंगरेषांचे उत्तम जाणकार. त्यांच्या विचारांचीही एक बैठक निश्चित झालेली. त्यामुळेही एकेक कलाकृती कसबी झाली होती. डॉ. नांद्रेकर यांनी रेखाटलेले छत्रपती शिवरायांच्या दरबाराचे चित्र कमालीचे लक्षवेधी. त्यात त्यांनी शिवकालीन तपशील ज्या बारकाईने आणि ठाशीवपणे रेखाटला तो पाहून नजर खिळते. सावी किशोर निकम, डॉ. ए.डी. काटे यांच्या पेंटिंग्ज सर्वस्तरातील रसिकांना कमालीची भावली. कारण त्यात त्यांनी जीव ओतल्याचे जाणवत होते. वारली हा तर महिला वर्गाचा आवडता प्रांत. त्यामुळे प्रदर्शनातून सावी यांच्या काही चित्रकृतींची विक्रीही झाली. डॉ. काटे यांच्या कुंचल्यात एक विशिष्ट प्रकारचा दमदारपणा, खोलाकार असल्याची नोंद अनेकांनी घेतली. स्वाती नरेंद्रसिंग यांच्या शिल्पकलेत दीर्घकाळ नजर गुंतवण्यास भाग पाडणारे सामर्थ्य आहे. त्या केवळ कलाकुसर पुरता मर्यादित विचार करत नाहीत तर शिल्पकला पाहणाऱ्यास एक थॉटही देतात. डी. विद्यासागर, 
वैशाली टाकळकर यांच्या कलाकृतींबद्दलही हेच म्हणता येईल. त्यांच्या रेखाटनातील स्ट्रोक्समध्ये छानशी लय आहे. शिवाय त्या चित्राच्या आसपासचा अवकाशही अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने भरतात. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचे मूल्य अधिक. एकूणात सर्व प्रदर्शन विविध अभिरुचीच्या रसिकांच्या मनात रेंगाळत राहिल,एवढे नक्की. निकम आणि  त्यांच्या सहकाऱ्यांनी अशीच प्रदर्शने वर्षातून दोनदा आयोजित करायची आणि त्यात चित्रकार, शिल्पकारांची संख्याही वाढवायची, असे ठरवले आहे. त्यांचे ठरवणे प्रत्यक्षात येवो आणि या कलावंतांच्या प्रयत्नांना अधिक दाद मिळावी म्हणून एक भव्य आर्ट गॅलरी उभी करण्याची सुबुद्धी सरकारला सुचो, एवढीच अपेक्षा.

कलावंत घडवणारा जवाहिर

ते तुमच्यासमोर आले आणि तुम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडवलीच तर काळजात थर्र होते. एवढी तीक्ष्ण, भेदक नजर. त्यात पुन्हा बोलणे म्हणजे जाब विचारल्यासारखे. इकडून तिकडे आरपार करणारे. पण हे सारे पहिल्या काही मिनिटांपुरतेच. नंतर हा माणूस म्हणजे स्वतःच्या क्रिएटिव्हीटी, विचार प्रवाहात इतरांनाही अलगदपणे सहभागी करून घेणारा दयाळू, कनवाळू अवलिया असल्याचे कळते. आणि त्याच्यासोबत बांधलेला धागा सुटणे शक्य नाही, असेही लक्षात येते. पुढील प्रवासात हा माणूस अक्षरशः झपाटून टाकतो. आपलं जीवन घडतंय. त्यात नवनिर्मितीचा रस ओतला जातोय. आपल्या आतील आवाज बुलंद करण्याची शक्ती मिळतीय. पण ही शक्ती अतिशय विवेकाने वापरायची असते, याचीही जबाबदारी आपल्यावरच असल्याचे समजत जाते. इतक्या साऱ्या गुणवैशिष्ट्याचा संगम झालेला, ठाण मांडत नाट्य, चित्रपटांचे अनेक कलावंत घडवणारा जवाहिर म्हणजे प्रा. दिलीप महालिंगे. १५ फेब्रुवारी रोजी वयाची ५४ वर्षे पूर्ण करणाऱ्या या जवाहिर गुरुंचा सत्कार त्यांच्या शिष्योत्तमांनी १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. प्रा. महालिंगेंना नाट्यक्षेत्रात येण्यास कारणीभूत ठरलेले त्यांचे गुरु म्हणजे मास्तर डॉ. रविंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कृतज्ञता सोहळा होत आहे.
ज्यांना आपण घडवलं. ज्यांच्या आयुष्यात आपण काही रंग भरले. त्यांनी त्याची आठवण ठेवावी. रस्त्यावर कधी चुकून भेट झाल्यावर त्यांच्या नजरेत ते दिसावे. माघारी कधीतरी आपल्याबद्दल दोन शब्द सांगावेत, एवढी कोणत्याही गुरुची रास्त अपेक्षा असते. पण प्रा. महालिंगे त्याच्या पलिकडे पोहोचले आहेत. फक्त परफॉर्मन्स चांगला कर. आणि माणूस म्हणून स्वतःतील माणूसपण जिवंत ठेव. बाकी काही नाही, असा संस्कार ते विद्यार्थ्यांवर करतात. त्यामुळेच की काय त्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे मोल अवर्णनीय आहे. 
प्रा. महालिंगेंचा नाट्य चळवळीतील प्रवास नाट्यमय आहे. घरी अगदी जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेले सर उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी. तेथे नाटकासाठी ऑडिशन्स होत्या. काय सुरू आहे, असे कुतुहलापोटी पाहण्यासाठी ते गेले. तेथे रविंद्र ठाकूरसर होते. त्यांनी ऑडिशनसाठी बोलावले. तर प्रा. महालिंगे मागे सरले. ठाकूर म्हणाले, भितोस की कायॽ झाले. तेवढ्या एका शब्दाने चमत्कार झाला. तिथून महालिगेंनी वळून पाहिले नाही. अनेक स्पर्धा गाजवल्या. बक्षिसे मिळवली. १९८८मध्ये विवेकानंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाल्यावर तर कर्तृत्वाला जणू धुमारेच फुटले. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव अशा अनेक मित्रांसोबत त्यांचे विश्व विस्तारत गेले. १९९२ नंतर युवक महोत्सवात सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा दबदबा काहीसा कमी होत चालला होता. त्याची जागा विवेकानंद महाविद्यालयाने पटकावली. ती देखील प्रचंड मेहनत आणि नाविन्यपूर्ण कल्पना साकारत. एक दोन नव्हे तर १६ वर्षे विवेकानंद युवक महोत्सवाची जनरल चँपिअनशिप पटकावत आहे. यावरून प्रा. महालिंगे या माणसात कलावंत घडवण्याची किती शक्ती असावी, याचा अंदाज येऊ शकतो. सर फक्त तालमीपुरते सर नसतात. तर ते विद्यार्थ्यांचे पूर्ण विश्व व्यापून टाकतात. कलावंत आणि माणूस म्हणून मुलगा-मुलगी पूर्णपणे तयार झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आणि मग ते एका विलक्षण जिद्दीने पेटून जात एकेका पैलूवर काम करतात. एकांकिका, प्रहसन, मूकाभिनयाची तालीम म्हणजे एक परीक्षाच. त्यात परफेक्शन असेलच पाहिजे, असा प्रा. महालिंगेचा हट्ट असतो. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी अनेक एकांकिकांचे लेखन केले. त्यात मांडलेले विषय पाहिले तर लक्षात येते की प्रा. महालिंगे केवळ बक्षिसे किंवा टाळ्या मिळवण्यासाठी कलाकृती निर्माण करत नाही. तर त्यामागे त्यांचा सामाजिक बांधिलकीचा विचार आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडते आहे ते हजारो रसिकांसमोर नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तेही धारदारपणे. टोकदारपणे. पण हे करत असताना संतुलन बिघडणार नाही, यावरही त्यांचा कायम कटाक्ष राहिला आहे. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी नाट्य प्रयोगांतून त्या काळात एक लाख रुपयांचा निधी उभा केला होता. एकदा ते असेच भटकत अजिंठ्याजवळच्या लेणीपूर गावात गेले असता तेथे आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसल्याचे कळाले. मग औरंगाबादला परतताच त्यांनी काही सुहृद मित्रांच्या मदतीने त्या गावात आरोग्य शिबिर घेतले. आजारींवर उपचार केले. एवढी संवेदनशीलता प्रा. महालिंगे यांनी स्वतः जपली आहे. या वाटचालीत त्यांना पत्नीची पूर्ण साथ मिळाली. रात्री – बेरात्री तालिम संपल्यावर भुकेजल्या ५०-५० विद्यार्थी कलावंतांना गरमागरम पोटभर जेवण करून वाढणे त्यांनी कधी सोडले नाही. त्यामुळे सरांच्या यशात निम्मा वाटा त्यांच्या पत्नीचा आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रा. महालिंगेना प्रसिद्धीचा अजिबातच सोस नाही. कशाचेही भांडवल न करता आपण आपले काम करत राहायचे. पडद्यामागेच राहायचे, असा त्यांचा दुर्मिळ स्वभाव. म्हणूनच ते रंगभूमीवर स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुण कलावंताचे दिशादर्शक यंत्र झाले आहेत. या दिशादर्शकाची उंची उत्तरोत्तर वाढत जाईल. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालत शेकडो तळमळीचे, संवेदनशील, नवनिर्मितीची आस असलेले कलावंत घडतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

सवाईचा टिळा

एका वर्षीच्या नोव्हेंबरपासून सुरू होणारा सांस्कृतिक सोहळे, स्पर्धांचा मोसम दुसऱ्या वर्षाच्या फेब्रुवारीअखेरीस मावळतीला येऊ लागतो. या चार-पाच महिन्यात तमाम कलावंत मंडळी नाविन्याच्या शोधात स्वतःला झोकून देत असतात. रंगभूमीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहतात. त्यातील कित्येकजण यशस्वीही होतात. अशा यशस्वीतांचे प्रमाण औरंगाबादेत, मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहे, हे पाहून मनात एक सुखद अभिमानाची भावना निर्माण होते. वर्षानुवर्षे एकांकिका, राज्य नाट्य, कामगार असो की शॉर्ट फिल्मची स्पर्धा अनेक ठिकाणी आपले कलावंत सर्वांना चकित करत आहेत. वर्षानुवर्षे अशा स्पर्धांवर राज्य गाजवणाऱ्या मुंबई-पुणेकरांना मागे टाकत आहेत, हे केवळ कला प्रांतातीलच नव्हे तर मराठवाड्याच्या सर्वच क्षेत्रातील लोकांना आनंद देणारेच आहे. त्यापैकी तीन घटना अलिकडील म्हणून त्याविषयी. 
एककाळ असा होता की सवाई एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हायचे एवढेच औरंगाबादमधील नाट्यकर्मींचे स्वप्न असायचे. बक्षिसाचा कशाला विचार करायचा. एकदा सवाईचा टिळा लावून घेऊ. स्पर्धा कशी असते ते बघू. अनुभव घेऊ, अशी चर्चा व्हायची. कारण सवाईचा दर्जा आपल्या विचारक्षमतेबाहेर आहे. तिथल्या परीक्षकांना आवडेल असा विषय आपल्याकडे असूच शकत नाही, असा सूर असायचा. अशा त्या सवाईच्या स्पर्धेत औरंगाबादच्या मॅट्रीक या एकांकिकेने सर्वोत्कृष्टचा बहुमान पटकावला. शेखर ढवळीकर, चिन्मय मांडलेकर, निपुण धर्माधिकारी या दिग्गज परीक्षकांनी ही निवड केली. प्रवीण पाटेकर लिखित, दिग्दर्शित ही एकांकिका केवळ बक्षिसपात्र ठरली नाही तर तिने राज्यभरातील नाट्य अभ्यासकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. प्रवीण पाटेकर कायम नवीन काहीतरी सांगू पाहणाऱ्या, ग्रामीण भागातील वास्तव टिपणाऱ्या संवेदनशील रंगकर्मींपैकी एक. त्याच्या मांडणीतही एक प्रकारची धार असते. त्यामुळे येत्या काही वर्षांत तो एकूण नाट्य, चित्रपट क्षेत्रातील आघाडीचा लेखक, दिग्दर्शक झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना त्याची पावले आता त्या दिशेने पडावीत, अशी अपेक्षा आहे. मॅट्रीकमधील भूमिकेसाठी संतोष पैठणेलाही पुरस्कार मिळाला आहे. त्याचेही विशेष कौतुक. आता थोडेसे मागील काळाविषयी. मुंबई-पुण्याच्या स्पर्धांमध्ये धडक मारण्याची परंपरा प्रा. कुमार देशमुख यांनी १९८० च्या दशकात सुरू केली. त्यांच्या स्मारक नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास रचला. पद्‌मनाभ पाठक दिग्दर्शित अचानकने तब्बल २५ वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती केली. मधल्या काळात चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी यांनी स्पर्धांऐवजी दुसरा मार्ग जवळ करत व्यावसायिक रंगभूमी काबीज केली. स्पर्धांच्या निमित्ताने औरंगाबादकरांची खरी आक्रमणे सुरू झाली ती १९९३-९४मध्ये. प्रा.दासू वैद्य यांनी लिहिलेल्या ‘देता आधार का करू अंधार’ एकांकिकेने नाट्य दर्पण स्पर्धा गाजली. मराठी चित्रपटांचा सुपरस्टार मकरंद अनासपुरे, दमदार अभिनेता मंगेश देसाई याच स्पर्धेतून गाजले. किरण पोत्रेकर, सचिन गोस्वामी, प्रा. कमलेश महाजन, संजय सुगावकर यांच्यासह अनेकांनी  अशाच काही स्पर्धांतून स्वतःला सिद्ध केले. ती परंपरा प्रवीण पाटेकर, राबवा गजमल आणि त्यांचे तमाम सहकारी कलावंत पुढे नेत आहेत, उंचावत आहेत.
एकीकडे मॅट्रीक सवाईमध्ये गाजत असताना दुसरीकडे प्रा. अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित केलेल्या 15 ऑगस्ट लघुपटाने आणखी एक पुरस्कार पटकावला. माय ठाणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात तो सर्वोत्तम ठरला आहे. प्रा. साळवे म्हणजे नव्या पिढीतील अनुभवी, संवेदनशील आणि सामाजिक वेदना मांडणारे लेखक-दिग्दर्शक आहेत. देवगिरी महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असताना ते नवी पिढीही घडवत आहेत. विविध स्पर्धांमध्ये त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत. पण हे करत असताना स्वतःतील कलावंतही जिवंत ठेवत आहेत. 
औरंगाबाद-मराठवाड्याच्या सांस्कृतिक जगताचे ते अतिशय नम्रपणे प्रतिनिधीत्व करताना दिसतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
स्पर्धा आणि नाटकाच्या पलिकडे जे झाले ते म्हणजे एमजीएमच्या महागामीचा शारंगदेव महोत्सव. कमलकिशोर कदम, अंकुशराव कदम यांनी एमजीएमच्या रुपाने एक शैक्षणिक साम्राज्य उभे केले आहे. त्यातील काही अभ्यासक्रम खरेच समाजमन घडवणारे आहेत. महागामी त्यापैकी एक. त्याचे खरे श्रेय पार्वती दत्ता यांनाच द्यावे लागेल. जवळपास दोन तपांपासून त्या शास्त्रीय नृत्य परंपरा कायम ठेवून आहेत. एका विशिष्ट समाज, वर्तुळापुरतीच मानली जाणारी शास्त्रीय नृत्य कला सर्वस्तरांपर्यंत नेण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न त्या करतात. शारंगदेव महोत्सव त्याचाच एक भाग होता. यंदा त्यांनी शास्त्रीय नृत्यासोबत लोककला, सुफी कव्वालीलाही स्थान दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ परफॉर्मन्स एवढाच दत्ता यांचा फोकस नसतो. तर कलावंतांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. यातून कलेच्या विविध पैलूंची ओळख होते. ती रसिकांसाठीही पर्वणी असते. यापुढील काळातही हा प्रवाह आणखी रुंद आणि वैविध्यपूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  

आयुक्त हरवले आहेत...!

डॉ. निपुणजी रुसू नका, चंदीगडचे काम संपताच तत्काळ परत या...

नाव डॉ. विनायक निपुण. उंची अंदाजे ५ फूट ८ इंच. बांधा दणकट. चेहरा निमुळता. चेहऱ्यावर कायम गंभीर भाव, असे वर्णन असलेले औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त चंदीगड येथे शासकीय कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात येते. १७ मार्चपर्यंत ते तेथेच राहणार, अशी माहिती महापालिकेच्या परिवारातून दिली जात आहे. मात्र, ते औरंगाबादकरांवर रुसून गेले आहेत आणि तेथून दुसऱ्या शहरात बदली होऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा ऐकिवात येते. पण, १५ लाख औरंगाबादकरांना असे वाऱ्यावर सोडून कसे जाता येईल तुम्हाला?
प्रिय, डॉ. निपुण, तुम्ही कशामुळे रुसलात, हे औरंगाबादकरांना ठावूक झाले आहे. २९ फेब्रुवारीच्या महापालिकेच्या सभेत तुम्ही तुमचा वैताग, त्रागा व्यक्त केला. कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. पाणीटंचाई वाढत चालली आहे. त्यावर उपाययोजना होत नाही. काही अधिकाऱ्यांच्या तुम्ही वारंवार बदल्या केल्या. म्हणून स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी तुम्हाला १३ मुद्यांचे पत्र दिले. ते वाचून तुम्ही विमनस्क झाला. हेची फळ काय मम तपाला, अशी भावना तुम्ही वहिनीसाहेबांकडेही बोलून दाखवली. आणि मग मनातले सारे काही भडभड बोलून टाकावे, असा विचार करत दोन तास बोललात. औरंगाबाद महापालिकेच्या कारभाराची कीर्ती जगभर पसरल्याने येथे कोणी येत नव्हते. तरीही मी आलो. पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर येथील कचरा पाहून रात्र रात्र झोप येत नव्हती, असे तुम्ही म्हणालात. आणि मग हा प्रश्न सोडवण्यासाठी नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत काय केले, त्याचा तपशील सभेला ऐकवला. ते सारे ऐकून महापौरांसह सारे पदाधिकारी, नगरसेवक गहिवरून जातील. तुमची तळमळ समजून घेत तुम्हाला खरंच मनापासून सहकार्य करू लागतील, अशी तुमची अपेक्षा होती. पण यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांशी ही मंडळी जशी वागली, तशीच तुमच्याशीही वागली. ‘हो...हो...सहकार्य करू ना.’ असे म्हणाली. प्रत्यक्षात काही केले नाही. मुख्य म्हणजे ज्या वैद्यांच्या पत्रावरून तुम्ही एवढे बोलतात तेच त्या दिवशी सभेत नव्हते. उलट त्यांनी आणखी एक पत्र देण्याची तयारी सुरू केली. त्यातच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी तुमच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. म्हणून तुमचा वैताग अधिकच वाढला. आणि मग रागाच्या म्हणा किंवा संतापाच्या भरात म्हणा, तुम्ही तातडीने चंदीगडचा रस्ता धरला.
पण साहेब, घरातील एक माणूस असं काही बोलला किंवा त्यानं पत्र लिहिलं तर कोणी असं नाराज होऊन घर सोडून जातं का? घर म्हटलं की चार प्रकारचे लोक असणार. महापालिकेत तर सगळ्याच पत्रांमागे एक ‘अर्थ’ असतो. तो समजून घेतला की कामाचा आनंद अनेक टक्क्यांनी वाढतो. बरं, जी मंडळी तुम्हाला त्रास देतात. त्यांना धडा शिकवण्याचे अनेक मार्ग तुमच्याकडे आहेत. ते तु्म्ही वापरत नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कठोर निर्णय घ्या. टक्केवारीत बुडालेल्यांना उचलून बाहेर फेका असं ‘दिव्य मराठी’ने १५ लाख औरंगाबादकरांच्या वतीने तुम्हाला वारंवार सांगितले. पण तुम्ही आम्हालाही विश्वासात न घेता बॅग भरली आणि अचानक निघून गेलात. खरं तर मुख्यमंत्ऱ्यांनी भरघोस निधी देऊन तुमच्यावर किती विश्वासाने आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. रस्त्यांसाठीही पैसा दिला. समांतर जलवाहिनीचा पेच सोडवण्यासाठी दोन पावलेही उचलली. आता औरंगाबादकर तुमच्याकडे आशेने बघत आहेत, याचा कळकळीने विचार करा.
तुम्हाला कोणीही, काहीही बोलणार नाही. रागावणार नाही. पत्र देणाऱ्यांनाही आम्ही रोखून धरू. सुनिल केंद्रेकर यांच्याशी चर्चा करून तुम्हाला कार्यपद्धतीत काही सुधारणाही करता आल्या तर नक्की करा. या शहराला निपुण अधिकाऱ्यांची गरज आहे. म्हणून रुसवा सोडा आणि चंदीगडचे काम संपताच औरंगाबादेत दाखल व्हा.


Thursday 28 February 2019

कुठे नेऊन ठेवणार औरंगाबाद माझे?

कधीही दंगल उसळू शकते असा माहोल असलेले, धुळीने, खड्डयांनी माखलेले, पाणी टंचाईने त्रस्त झालेले औरंगाबाद शहर सध्या लुटारूंच्या धुमाकूळाने गांगरले आहे. विशेषत: व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आपले संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलिस दल कधी हल्लेखोर, लुटारूंना जेरबंद करणार आहे की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण अशा सरकारी यंत्रणांकडून वर्षानुवर्षे निराशा पदरी पडली आहे. त्याची आता सवयही झाली आहे. एकमेव पोलिस दलाचा आधार होता. तो देखील निखळत चालला आहे की काय, असे त्यांना वाटू लागले आहे. कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, अशी सूर आता व्यक्त होत आहे. हे सारे सांगण्यामागे गेल्या दोन-तीन आठवड्यातील धक्कादायक, चिंताजनक घटना आहेत. वर्धमान नागरी सहकारी संस्थेचे पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दिलीप शांतीलाल पांडे गेल्या बुधवारी म्हणजे २० फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास ग्राहकांकडून रक्कम गोळा करून कार्यालयाकडे परतत असताना जुन्या मोंढ्याजवळील तक्षशिलानगर येथे लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला करत ५५ हजार रुपये पळवले. पांडे काल एका विवाह समारंभास आले होते. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. आपण सुरक्षित नाहीत, हीच भावना व्यक्त होत होती. त्या आधीच्या आठ दिवसात चार व्यापारी अशाच लुटारूंना सामोरे गेले. तुमच्या कारमधील ऑइल गळत आहे, असे सांगून त्यांच्याकडील पैसे पळवण्यात आले. आता कोणी पोलिसांच्या बाजूने असेही म्हणू शकते की मोठ्या शहरात चोरीच्या, लुटीच्या घटना घडणारच. जेथे पैसा आहे तेथे हल्ले होणारच. पोलिस नेमके कुठे कुठे लक्ष ठेवणार. प्रत्येक गल्लीबोळीत तर गस्त घालता येणार नाही. हा मुद्दा मान्य आहेच. पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता एवढी नजर ठेवणे शक्यच नाही. पण हल्ला झाल्यानंतर, लूटारू पसार झाल्यावर त्यांचा माग काढणे. काही तास तर सोडा पण काही दिवसांत लुटारूंना जेरबंद करणे तर पोलिसांना शक्य आहे ना? दुर्दैवाने ते झालेले नाही. व्यापाऱ्यांना लुटण्याच्या पाच-सहा घटनांतील एकालाही पकडण्यात यश आलेले नाही. हे निश्चितच गंभीर आहे आणि म्हणून कुठे नेऊन ठेवले औरंगाबाद माझे, असा सूर लागत आहे. दिव्य मराठीने या संदर्भात एक ऑनलाईन सर्वे केला. त्यात सुमारे ५०० व्यापारी सहभागी झाले होते. ८९.८ टक्के व्यापारी म्हणाले की, पोलिसांचा धाक नसल्यानेच लूटमार वाढली आहे. तर ८८.६ टक्के व्यापारी म्हणाले की, अशी लूटमार कधीही आपल्यासोबत होऊ शकते अशी भिती वाटते. त्यांना असे वाटणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे असे पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनाही निश्चितच वाटत नसणार. पण केवळ अभिमान वाटत नाही. या घटना गंभीर आहे. तत्काळ उपाययोजना केल्या जातील, असे म्हणून त्यांना जबाबदारी ढकलता येणार नाही. तर कठोर पावले उचलून लुटमार करणारी टोळी गजाआड करावी लागणार आहे. बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते की, लुटीच्या सर्व घटना विशिष्ट भागांत झाल्या आहेत. लुटारूंची मोडस् ऑपरेंडी ठरलेली आहे. ही टोळी बाहेरच्या राज्यातील आहे. त्यामुळे त्यांचा तत्काळ सुगावा लागणे कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यात परराज्यातील आरोपी होते. त्यांच्या मुसक्या औरंगाबादेतील पोलिसांनीच काही दिवसांच्या आत आवळल्या होत्या. मग याच प्रकरणात ते शक्य का होत नाही, असे व्यापारी वर्गात विचारले जात असले तर त्यात गैर काय? पोलिसांची संख्या कमी असल्याचेही एक कारण दिले जाते. त्यात तथ्यही आहे. पण पोलिसांच्या मदतीला आता तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर का होत नाही? सेफ सिटी प्रकल्पांतर्गत १२४ कोटी रुपये खर्चून संपूर्ण औरंगाबाद शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी केली होती. त्याची खूप वाहवा झाली. सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात फक्त ४८ कॅमेरे लागले आहेत. त्यातूनही फार मोठ्या गुन्ह्यांचा सुगावा लागलेले नाही. साताऱ्यात एक राज्य राखीव दलाचा जवान मंगळसूत्र चोरायचा. त्याला सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पकडण्यात आले. त्यानंतरचे मंगळसूत्र चोर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आधी पाठपुरावा करून औरंगाबादला सेफ सिटी करण्याचा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे. आणि हे केवळ आयुक्तांचेच काम आहे, असे बोट महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इ्म्तियाज जलील, संजय शिरसाट, विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दाखवू नये. कारण या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व ही मंडळीही करतातच. या सर्वांनी एकत्र येऊन ठरवले तर महिनाभरात जागोजागी कॅमेरे लागू शकतात. पुढील काळात लुटमारीच्या घटना थांबू शकतात. लोकांचे प्रतिनिधी असे मिरवणाऱ्यांनी लोकांसाठी का होईना एकत्र आले पाहिजे, असे वाटते.

Monday 11 February 2019

उघडे ठेवा डोळे

डोक्याचा कप्पा खुला अन् डोळं उघडं ठेवा! सालाबादप्रमाणं पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय. राजकारणी लोकं पावलापावलावर भेटून नमस्कार, रामराम, आदाब, जयभीम करू लागलीयत. काही दिवसांतच तुमच्या मतदारसंघातले उमेदवार जाहीर होतील. ते घरात घुसून, चौकात भेटून, गल्लीत तुम्हाला गाठून काहीच्या काही सांगू लागतील. वोट द्या... तुम्हाला हे देतो... वोट द्या.. तुम्हाला ते देतो... असं सांगतील आणि कमरेलोक उडालेला धुरळा लिंबाच्या-आंब्याच्या टोकापर्यंत पोहोचंल. सारा गाव या धुळवडीत बुडून जाईल. महिनाभरानंतर निकाल लागंल. निवडून आलेला खासदार दिल्लीला निघून जाईल. तो पुढच्या निवडणुकीलाच परत येईल. मधली पाच वर्षं गावात पाणी नाही, वीज नाही, रस्ता नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडं खेट्या मारत बसाल. पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. कारण तुम्ही लोक डोळं उघडं ठेवून मतदान करीत नाहीत आणि डोक्याचा कप्पाही खुला ठेवीत नाहीत. त्याच्यामुळंच तुमचंच काय, शहरी भागातील लोकांचेही हाल होतात. आता खरं बोललं तर सख्ख्या आईलाही राग येतो. पण तुम्हाला कोणीतरी धाडस करून चार खऱ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत, अशी वेळ येऊन ठेपली आहे. शहरातील शहाणी मंडळीही जरा नीटपणे ऐका... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार देऊन देश घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर टाकली आहे. पण ती अनेक जण टाळतात. कशाला करायचं मतदान? असं म्हणतात आणि मग जो खासदार निवडून आला, जे सरकार आलं त्याच्या नावानं खडे फोडतात. हे चांगलं नाही गड्या. मताचा योग्य, अचूक वापर करण्याचं आपलं कर्तव्यच आहे. ते बजवायचं नाही आणि नंतर बोंब मारत सुटायचं, याला काही अर्थ आहे काॽ बरं दुसरंही तेवढंच महत्त्वाचं. बरेच लोक मला असेही माहिती आहेत. तुम्हालाही माहिती असतीलच की ते उमेदवार या जातीचा आहे का, त्या धर्माचा आहे का, त्या पंथाचा पुजारी आहे का हे पाहून बटन दाबतेत. तसं नसंल तर अमुक यांचा पाव्हणा आहे का, तमुकचा पाव्हणा आहे का, असं ठरवून मतदान करतेत. हेही नसंल तर मग शेवटचं फारच खतरनाक. ते म्हंजे एखादी दारूची बाटली, गांधी बाबाची नोट घेऊन मतदान होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलं ते आपण विकूनच टाकतो नाॽ त्यात आपलं अन् देशाचंही नुकसान करतो. आतापर्यंत केलंच. मंडळी, आतापर्यंत जे झालं ते झालं. आता जमाना वेगानं बदलत चाललाय. नवी पिढी लई हुशार होऊ लागलीय. तसे तुम्हीही व्हा. जात, धर्म, पंथाच्या, पाव्हण्या-रावळ्याच्या पलीकडं पाहा. दारूची बाटली, गांधीबाबाच्या नोटांसाठी मत विकू नका. जो तुमच्या गावात पाणी, रस्ता, वीज देईल व तुमच्या पोरांसाठी चांगल्या शिक्षण, दवाखान्याची, शेतमालाला चांगला भाव देण्याची व्यवस्था करेल त्यालाच निवडा. मतदानाच्या आधी त्याच्याकडून या सगळ्या कामाचा करार करून घ्या. निवडून आला की करार घेऊन त्याच्या मागे हात धुऊन लागा. मग बघा, दहा पंधरा वर्षांत देश कसा प्रगती करतो तेॽ एवढं कराच ताई - माई - अक्का, अण्णा, भाई, भाऊ बप्पा. तुम्हाला आपल्या देशाची शप्पथ आहे. मग कराल ना एवढंॽ आपल्या देशासाठी. येणाऱ्या पिढीला चांगलं काही देण्यासाठीॽ  
--
शब्दांकन : मक्यासाठी

खास आहे ‘आम’ लोकांसाठी


औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावर उतरून ज्युबिली पार्कमार्गे टाऊन हॉलच्या उड्डाणपुलावरून तुम्ही खाली उतरलात की डाव्या हाताला माझ्या अंगा-खांद्यावर लहान मुले, तरुण फुटबॉल खेळताना दिसतील. एका कोपऱ्यात पतंगबाजीही सुरू दिसेल. एका खांद्याला चिरून वर जाणारा रस्ताही लक्षात येईल. मग माझी ओळख सांगण्याची फारशी गरज नाही. तरीही औपचारिकतेचा भाग म्हणून सांगून टाकतो. मीच आमखास मैदान. होय. गेल्या जवळपास सहा दशकात औरंगाबादमध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा मी साक्षीदार आहे. खरं तर मला त्यापेक्षाही जुन्या काळातले पुसटसे आवडतंय. हिंदुस्थानचा शहेनशहा औरंगजेब माझ्यासमोरच्या जामा मशिदीमध्ये लवाजम्यासह आल्याचे मी पाहिले आहे. माझ्या पूर्वेकडील अंगाला लागूनच औरंगजेबाचा मुक्काम होता. सकाळच्यावेळी तो किलेअर्कच्या महालासमोर हातात जपमाळ घेऊन यायचा. नंतरच्या काळात उत्तरेकडे निघालेली पेशव्यांची फौज एकदा माझ्यासमोरून गेली होती, ते मला अंधुकसं आठवतंय. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मी निजामाच्या ताब्यात होतो. पण माझं रूप तेव्हा एखाद्या ओसाड जागेसारखे होते. त्याला पटांगण, मैदानाचा आकार नव्हता. मोगलांच्या, निजामाच्या काळात सभा, समारंभाचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे माझा वापर त्या कारणासाठी झाला नाही. शिवाय औरंगाबाद शहर म्हणजे शेकडो  खुल्या जागांचे एक मोठे गाव होते त्या काळी. म्हणूनही कदाचित राजकीय मंडळी माझ्याकडं वळाली नसतील.
मला माझा जुना काळ अगदी स्पष्टपणे आठवतो, डोळ्यासमोर उभा राहतो. तो भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरचा. निजामाचे जोखड इथल्या जनतेने झुगारून दिल्यावर विजयोत्सवाच्या मिरवणुका माझ्या अंगाखांद्यांवरून खेळत सुभेदारी विश्रामगृहाकडे गेल्या होत्या. त्यातील काही पथकांनी केलेला भारतमातेचा जयघोष माझ्या कानात घुमतोय. औऱंगाबादचे पहिले आमदार माणिकचंद पहाडे यांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पटेल यांची एक सभा गाजली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक जोशपूर्ण भाषणही मी ऐकले. त्यानंतरच्या काळात औरंगाबाद शहरातील सगळे राजकीय वातावरणच थंडावत गेले होते. पण तरुणाईचा माझ्याकडील ओढा वाढला होता. लहान मुले, कॉलेजमधील पोरे पतंगबाजीसाठी मोठ्या संख्येने येत होती. तेव्हा आताच्या एवढे फुटबॉलचे फॅड नव्हते. क्रिकेटच्या लढतीही रंगत. अशा सगळ्या वातावरणात मी पहिली जोरदार राजकीय सभा अनुभवली कामगारांचा बादशहा असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांची. आणिबाणी नुकतीच संपली होती. लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू होता. त्याच काळात बीड, परभणीच्या दौऱ्यासाठी जॉर्ज औरंगाबादेत आले होते. तेव्हा बापूंच्या प्रचाराचे नियोजन करणाऱ्यांनी त्यांना विनंती केली. एवढ्या कमी वेळात गर्दी होईल का, अशी शंका जॉर्ज यांनी मिश्किल स्वरात विचारली होती. तेव्हा प्रचारकही थोडे विचारात पडले होते. कारण माझे आकारमान. तेव्हा मी चारही अंगाने पसरलेला होता. वरच्या बाजूला तटबंदीलगत घळी तयार झालेल्या होत्या. त्यातही लोक बसू शकत. त्यामुळे गर्दी किती होईल, मैदान किती भरेल असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. पण तो काळ काँग्रेसविरोधी लाटेचा होता. जॉर्ज यांच्याभोवती सामान्य व्यक्तिमत्वाचा असामान्य माणूस असे वर्तुळ होते. त्याचा परिणाम झाला. माझ्या शरीराचा एकही कानाकोपरा रिकामा राहिला नाही. जागा मिळेल तिथे अगदी एका पायावरही लोक उभे होते. महिलाही त्यात मागे नव्हत्या. त्याच सभेत औरंगाबादच्या लोकसभेचा निकाल लागला होता. मी खास झालो आम लोकांसाठी.  त्यानंतरची मोठी सभा मला आठवते ती 1986ची. पंतप्रधान राजीव गांधी यांची. काँग्रेसने खूप गाजावाजा केला होता. पण अपेक्षेएवढे लोक आले नव्हते. आमखास मैदानाचा रिकामा भाग असं सांगणारी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा माझ्या साक्षीने झाली. तिला तुफान गर्दी उसळली होती. मग गर्दीकडे हात दाखवत बाळासाहेबांनी काँग्रेसची खिल्ली उडवली होती. आमखास मैदान भरवायचे म्हणजे अंगात दम लागतो, असं ते म्हणाले होते. आणि माझं नामकरण शिवाजी मैदान असेही करून टाकले होते. नंतर काय झाले कोणास ठावूक बाळासाहेब ठाकरे माझ्याकडे फिरकलेच नाही. त्यांनी माझा धाकटा बंधू असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे लक्ष वळवले होते. असो, ठाकरेंशिवाय पुढे चालून शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले, सोनिया गांधी यांच्याही सभा झाल्या. पण खच्चून गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाही, असे कधी झाले नाही. त्यामुळे आता आपले काही खरे नाही, असे मला वाटू लागले. त्यातच चारही बाजूंनी अतिक्रमणे, बांधकामे होऊ लागली. आणि आता आपण कधीच भरणार नाही, अशी खात्री पटू लागली. ती अजूनही कायम आहे. अपवाद दोन-तीन वर्षांपासून होणाऱ्या असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांचा. त्यांच्या सभांना तरुणाईंची मोठी गर्दी उसळते आहे. ती आता किती दिवस, किती वर्षे कायम राहते. नवा एखादा दमदार नेता येतो का बघूयात. 

Thursday 31 January 2019

तिबेटी निर्वासितांची कहाणी

अबे, तो पहा नप्पा चाललाय. चिनी आहे तो. डोळे तर गायबचंयत त्याचे. नाही रे जपानी दिसतोय. ए जपानी...एखादा अपऱ्या नाकाचा, लुकलुक्या डोळ्यांचा तरुण पाहिला की आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा संवाद असतो. दुसऱ्याला हीन लेखणे हे तर त्यात असतेच. शिवाय तो भारतीय नाही, हे पण सांगायचे असते. मग तो तरुण असामी, सिक्कीम किंवा मिझोराम, अरुणाचल प्रदेशाचा असला तरी त्याला चिनी, जपानी ठरवले जाते. म्हणजे दुसऱ्या जात, धर्म, पंथांविषयी द्वेष बाळगणे. त्याची हेटाळणी करणे, टिंगल उडवणे यापलिकडे अनेकजण जात आहेत. आणि मग हा तरुण तिबेटी आहे, असे लक्षात आल्यावर तर तुच्छतेचीही भावना व्यक्त होते. कारण तिबेटी निर्वासित आहेत. आपल्या देशात अनेक वर्षांपासून आश्रयाला आले आहेत. त्यांच्याशी आपण कसेही वागलो, त्यांच्याविषयी काहीही विचार केला तरी काय फरक पडणार, असा पवित्रा असतो. त्यांना चक्क नेपाळी म्हटले जाते. माणूस म्हणून त्यांच्या काय वेदना आहेत. आपले हक्काच्या घरातून कोणीतरी हाकलून दिले. म्हणून शेजाऱ्यांकडे आसऱ्याला राहणारी ही तिबेटी मंडळी मनावर मणामणाचे ओझे ठेवून कसे राहत असतील, याचा विचार बोटावर मोजण्याइतके राजकारणी करत असतील. संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या कलावंत, लेखक, दिग्दर्शकांनीही तिबेटींकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. तिबेटी लोक कष्टाळू, भारतीयांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेत असल्याचा हा परिणाम असावा. पण या निर्वासितांचे दुःख, वेदना, त्यांच्यावर असलेला चीनचा दबाव कोणाला तरी मांडणे आवश्यक वाटले. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या ‘क्योयोंग नगारमों – द स्वीट रिक्विअम’मध्ये अतिशय साध्या कथानकात हे सारे खूपच तीव्रतेने आले आहे. दिग्दर्शक रितू सरीन आणि त्यांचे पती तेनझिंग सोनम यांनी सहजतेने चित्रपटाची मांडणी करताना त्यातील प्रसंग, संवाद, नाट्यमयता, संघर्ष, रहस्य अशी अनेकविध बांधणी हृदयापासून केली आहे. ती पाहताना आपणही तिबेटी होऊन जातो. त्यांच्यावरील अन्यायाने किती परिसीमा गाठली आहे. त्यांच्याकडे निर्वासितापेक्षा माणूस म्हणून पाहणे किती गरजेचे आहे, हे कळते. चीनचा भारतात असाही हस्तक्षेप आहे, असा प्रश्न उपस्थित होते. दुसरीकडे खरेच आपण आपल्या देशात राहतो. आपण स्वतंत्र आहोत, ही किती भाग्याची गोष्ट आहे, अशीही भावना उचंबळून येते. याचे सारे श्रेय अर्थातच सरीन-सोनम या दांपत्याला आहे. शिवाय तेनझिंग डोलकर, जंपा कलसंग, शावो दोरजी आणि भूमिका जगणाऱ्या कलावंतांना द्यावे लागेल.
‘क्योयोंग’ची कहाणी थोडक्यात अशी. २६ वर्षांची तेनझिंग डोलकर दीड तपापूर्वी निर्वासत म्हणून भारतात येते. दिल्लीतील तिबेटी नागरिकांच्या वसाहतीत ती लहानाची मोठी होते. ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागते. तिचा नुकताच एक ब्रेकअपही झालाय. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तिबेटमधून भारतात येण्याचा तिचा प्रवास खूपच भयंकर झालाय. चिनी लष्कराच्या गोळ्या चुकवत वडिल आणि इतर काहीजणांसोबत भारताची वाट शोधत असताना त्यांची भेट गोंपो नावाच्या एका वाटाड्याशी होते. तो त्यांना दोन दिवस साथ देतो. पण तिसऱ्या दिवशी घरी मुलगी आजारी असल्याने तो त्यांना अर्धवट रस्त्यात सोडून देतो. गाढ झोपेत असलेल्यांना तसेच सोडून एक प्रकारे पळच काढतो. दिलेला शब्द पाळत नाही. जाताना तो त्याच्याकडील एक ताईत डोलकरला देऊन जातो. त्याला जात असताना फक्त डोलकरने पाहिलेले असते. नेमका मार्ग माहिती नसलेले हे सारेजण मग चिनी लष्कराच्या गोळीबारात सापडतात. डोलकर नशिबाने वाचते. इतकी वर्ष होऊन गेली तरी तिला गोंपोचा चेहरा लख्ख दिसत असतो. आणि एक दिवस गोंपो डोलकरच्या आयुष्यात येतो. ती त्याला ओळखते. तुम्ही आम्हाला त्या दिवशी वाऱ्यावर का सोडून गेलातॽ असा विश्वासघात का केलाॽ आमच्यासोबतचे जे लोक चिनी लष्कराच्या गोळीबाराला बळी पडले. त्याला तुम्ही जबाबदार नाहीत काॽ तुम्ही खरंच वाटाडे आहात काॽ असे प्रश्न तिला गोंपोला विचारायचे आहेत. पण तिचा मित्र तर गोंपो म्हणजे तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता आहे, असे सांगतो. मात्र, डोलकर स्मरणशक्तीवर ठाम आहे. ती गोंपोचा पाठलाग सुरू करते. आणि अचानक दोन चिनी गुप्तहेरही गोंपोच्या मागावर आहेत. ते त्याला धमकावत असल्याचे तिच्या लक्षात येते. पुढे काय होते, याचा उलगडा चित्रपट पाहूनच करून घ्यावा, असा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातील मानवी जीवनात जे काही सुरू आहे, त्याची मांडणी करणाऱ्या दर्जेदार कलाकृती, अशी अपेक्षा असते. ‘क्योयोंग‘ने ती पूर्ण केली आणि संवेदनशील भारतीयांना अंतर्मुख केले एवढे नक्की. 

लुटालूट

खासगीकरणातून कचरा संकलनाच्या ठेक्यात जे अडथळे आणले जात आहेत. ठरवून काही गोष्टी सुरू आहेत. ते पाहून या शहराचे भले चिंतणारा प्रत्येकजण निराश होत आहे. औरंगाबादच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार कोणास ठाऊकॽ असा प्रश्न त्याला पडू लागला आहे. इथल्या कामांवर लक्ष देण्यासाठी निवडून दिलेले कारभारीच स्वतःच्या जबाबदारीबद्दल पूर्ण प्रामाणिक नाहीत. लोकांचे भले करण्याची आश्वासने देऊन आपण निवडून आलो आहोत, याचा त्यांना केव्हाच विसर पडलाय, ही तर आता नव्याने सांगण्याची गोष्ट राहिलेलीच नाही. पण त्यात आता अशी भर पडली आहे की, गाव वसवण्याआधीच लुटालूट सुरू झाली आहे. म्हणजे बहुतांश लुटारू, ठग मंडळी आधी एखादे संपन्न आहे का, याची चौकशी करत. गावातील सुगीचा मोसम संपल्यावर हल्ला करत. अगदी पंधरा-वीस वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की, एखादा रस्ता असो की ड्रेनेज लाईन, इमारत बांधणी. थोडेसे काम सुरू झाल्यावर त्याचा दर्जा खराब करण्यासाठी ठेकेदाराशी संगनमत केले जायचे. त्यातून आर्थिक वाटाघाटी व्हायच्या. सरळ बोटाने पाहिजे तेवढे तुप निघत नाही, असे लक्षात आल्यावर सर्व पक्षांची कारभारी मंडळी सर्व मतभेद विसरून एकत्र येत. मिडिआला हाताशी धरून आरडाओरड करत. आणि मग काम बऱ्यापैकी दर्जा राखून पूर्ण होत असे. पण आता जे काही अगदी पायंडा म्हणून सुरू आहे. ते अस्वस्थ करणारे तर आहेच. शिवाय संपूर्ण शहराला एका खोल, काळ्या दरीत ढकलून टाकणारे आहे. सर्वच कारभारी यात सहभागी नाहीत. पण मूक पाठिंबा देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अधिकाऱ्यांबद्दल तर विचारायची सोयच नाही. वाटाघाटीसाठी सर्व काही विसरणाऱ्या या अधिकाऱ्यांकडे कोणी भ्रष्ट म्हणून बोट दाखवले तर लगेच ते जाती-धर्माचे अस्त्र बाहेर काढतात. अमूक काम करा, शिस्त पाळा, जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा, असे म्हटले की अधिकारी, कारभाऱ्यांचे आणि काही सेवाभावी संस्थांचे कोंडाळे शिस्त लावणाऱ्यालाच घेरते. खालच्या पातळीवर पोहोचत हल्ले करते. तेच पुन्हा समोर येत आहे. सहा महिन्यांपासून रेड्डीज कंपनीला कचरा संकलन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू होती. दहा वर्षांपूर्वी रॅम्के नावाची अशीच संस्था आली होती. पाच-सहा महिने होताच रॅम्केचे काम चांगले नाही. कचराच उचलला जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी सुरू केली. दुसरीकडे मनपाच्या कर्मचाऱ्यांना रॅम्केने सामावून घ्यावी, असा धोशा सुरू झाला. आंदोलने, घोषणाबाजी, काम बंद असेही झाले. शेवटी ती संस्था पळून गेली. त्यातून कोणताही धडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही, असे आता दिसते. कारण रॅम्कीच्या वेळी जे झाले त्याच दिशेने रेड्डीज संस्थेची वाटचाल सुरू झालीय. ती देखील कामकाजाला सुरूवात होण्याच्याआधीच. दहा वर्षांपूर्वी जे झाले त्याच्या अनेक कहाण्या समोर येतात. त्यापैकी जी सर्वचजण वारंवार सांगतात ती अशी होती की, रॅम्कीच्या व्यवस्थापनाने आपली माणसे घ्यावीत, असा दबाब तत्कालिन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी टाकला. त्यात आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. त्यापेक्षाही पुढील हद्द काहीजणांनी गाठली होती. त्यांनी विशिष्ट वॉर्डातील कचरा उचलण्याचे सब कॉन्ट्रॅक्ट घशात घातले होते. पण काम करण्यास ते तयार नव्हते. रॅम्कीने माझ्याच रिक्षा कचरा उचलण्यासाठी लावल्या पाहिजेत, असा दबाब ते टाकत होते. आताही यापेक्षा काही वेगळे सुरू असेल असे वाटत नाही. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना कचरा विषयाचे तज्ज्ञ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आणले. पण विषयाचे तज्ज्ञ असणे आणि कचऱ्यातून कमाईवरच डोळा ठेवणाऱ्या टोळीशी लढणे, यात जमीनअस्मानाचा फरक आहे. तो डॉ. निपुण यांच्या लक्षात येऊ लागला आहे. म्हणूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी भलामोठा दगड उचलणे सोपे पण मनपात काम करणे कठीण असे ट्विट केले होते. डॉ. निपुण यांच्या कार्यपद्धतीतील एक दोष म्हणजे ते संवेदनशील नागरिक, प्रसारमाध्यमांना टाळून टोळीशी लढू इच्छितात. त्यात त्यांना यश येणे कठीणच आहे. कारण टोळी खूपच मोठी आणि पसरलेली आहे. टोळीतील अनेकांनी चेहऱ्यावर चांगुलपणाचे बुरखे चढवले आहेत. त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांची पाळेमुळे खोलवर गेलेली आहेत. अनेक  अधिकारी, ठेकेदारांशी त्यांचे सूत जुळलेले आहे. गाव वसण्याआधीच लूटालुट करायची असे ठरवून ते घोड्यांवर स्वार होत गावामध्ये दाखल झाले आहेत. त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांच्याकडून कमीत कमी भ्रष्टाचारात किमान दर्जाचे काम करून घेण्याकरिता डॉ. निपुण यांना व्यवहारात आणखी निपुण व्हावे लागेल. शहरासाठी काही चांगले करू इच्छिणारे लोक तसेच प्रसारमाध्यमांची मदत घ्यावीच लागणार आहे. अन्यथा कचरा संकलनाची आखलेली योजना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडेल. यात निपुण यांचे फारसे काही बिघडणार नाही पण १५ लाख औरंगाबादकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होईल. एवढे नक्की. 

Sunday 13 January 2019

एकपात्री अस्सल, इरसाल

मराठवाड्याचा अनेक क्षेत्रात बॅकलॉग आहे. तो आणखी किती वर्षे राहिल माहिती नाही. पण कलाप्रांतात तो राहिलेला नाही. उलट मुंबई-पुण्याच्या कलानगरीवर इथले कलावंत ठसा उमटवत आहेत. रसिकांच्या हृदयात स्थान मिळवत आहेत. दरवर्षागणिक त्यांची संख्या वाढतच आहे. एकपात्री प्रयोगाचा किल्ला लढवणारे, अस्सल व्यक्ती आणि इरसाल वल्ली असलेले प्रभाकर निलेगावकर त्यापैकी एक आहेत. अतिशय जिद्दीने त्यांनी रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नवीन शोधले पाहिजे. सादर केले पाहिजे. रसिकांचे मनोरंजन करण्याचे, त्यांना हसवण्याची जबाबदारी गांभीर्याने पार पाडली पाहिजे, अशा कमिटमेंटनी ते कार्यरत आहेत, हे सर्वात महत्वाचे आहे. टीव्ही मालिका असो की चित्रपट, नाटक, चित्रकला, शिल्पकला, तांत्रिक  कौशल्य साऱ्यात मराठवाड्याचे कलावंत अलिकडील काही वर्षांत क्लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेतच. पण मला जे प्रमुख वाटते ते असे की अस्सलपणा, जिवंतपणा, जीवनाशी भिडण्याची, लढण्याची आणि त्यातून कला निर्मितीची शक्ती ग्रामीण भागाकडे वळाली आहे. आणि कृत्रिमतेत अडकून पडलेली सृजनता बाहेर येत आहे. मुंबई-पुणेकरांनाही तिचे महत्व कळाले आहे. आपली निर्मिती एका विशिष्ट चाकोरीतील आहे. दिवाणखाण्यातच ती फिरते. तिच्यात रसरशीतपणा, तजेलदारपणा नाही, असे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातून, भारताच्या छोटेखानी शहरांतून येणाऱ्या कलावंतांना स्वीकारणे सुरू केले आहे. त्यामुळेच मूळ औरंगाबादकर आणि आता पुण्यात स्थायिक निलेगावकर यांच्या कलाकृतींना भरभरून दाद मिळत आहे. त्यांचा ‘पुलंच्या व्यक्ती – वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री प्रयोग सध्या चर्चेत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात काही वर्षांपूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेले निलेगावकर निवृत्तीनंतर निवांतपणे जीवन व्यतित करू शकले असते. पण अंगातील अभिनेता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वयाचे कारण पुढे करून आराम करणे हा संस्कार त्यांच्यावर कधीच नव्हता. म्हणून त्यांनी पुलंच्या व्यक्ती-वल्लीची स्वतः निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन जुन्या पिढीतील प्रख्यात अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केले आहे. अनेक दशके विशिष्ट वर्गातील रसिकांना मनसोक्त हसवणारे पु. लं. देशपांडे यांनी अनेक व्यक्तिरेखा निर्माण केल्या. त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवले. कारण त्यामागे पुलंची सिद्धहस्त लेखणी तर होतीच शिवाय अतिशय सूक्ष्म असे निरीक्षणही होते. केवळ शब्दांच्या मांडणीतून त्यांनी साऱ्या व्यक्तिरेखा अशा काही चितारल्या की त्या साक्षात आपल्याशी बोलू लागतात. मनातले सारे काही सांगू लागतात. त्यांच्याबद्दल वाचताना आपण कधी त्यांच्यात गुंतून जातो, हेच लक्षात येत नाही. पण दुसरीकडे हेच सामर्थ्य अभिनेत्यांची परीक्षा घेणारे ठरते. म्हणजे व्यक्तिरेखेचा प्रचंड तपशील उपलब्ध. त्यातील नेमका कोणता उचलायचा कोणता वगळायचा, असा प्रश्न अभिनेता, दिग्दर्शकासमोर उभा राहतो. बरं, या व्यक्तिरेखा पुलंसह अनेक नामवंतांनी यापूर्वी साकारल्या आहेत. रसिकांच्या मनावर त्यांचे चित्रण झाले आहे. ते पुसून किंवा बाजूला ठेऊन नव्या रुपात, चेहऱ्याने सादर करणे म्हणजे तशी अग्निपरीक्षाच. ती प्रभाकर निलेगावकर यांनी दिली आहे. या धाडसाबद्दल त्यांचे मराठी रसिकांनी आणखी मनापासून कौतुक केले पाहिजे. त्यांनी बारकाव्यांनिशी टिपलेला हरीतात्या डोळ्यात पाणी आणतो. पेस्तनजी सादर करताना ते ज्या खुबीने अभंग म्हणतात. त्याला तोडच नाही. अंतुबर्वा हा पुलंच्या लिखाणातील उत्तुंग माणूस. अतिशय फाटक्या अंतु बर्व्याला पुलंनी जी शब्दांची श्रीमंती मिळवून दिली. तीच रंगमंचावर आणण्यात निलेगावकर बरेच यशस्वी झाले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. दोन तास चालणाऱ्या या प्रयोगात त्यांनी आवाजाचा विविध लयीत, शैलीत वापर केला आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्रयोगात घेणे अधिक चांगले.
आवाजाच्या वापराचे हे कौशल्य निलेगावकरांमध्ये मुळात असणारच. पण त्याला आणखी सफाईदारपणा आला तो वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्यामुळे. निलेगावकर वऱ्हाडकारांचे शिष्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात प्रा. डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभिनयाचे धडे त्या काळी गिरवले. वऱ्हाडकार ऐन बहरात असताना निलेगावकरांनी ‘अस्सल माणसे, इरसाल नमुने’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची निर्मिती केली. त्यात ते त्यांना भेटलेल्यांचे खास मराठवाडी स्टाईलने सादरीकरण करत. खुद्द वऱ्हाडकारांनी त्या प्रयोगाचे कौतुक केले. आज ‘अस्सल माणसं इरसाल...’ 2200 पेक्षा अधिक प्रयोगांचा टप्पा ओलांडला आहे. त्यावरूनही निलेगावकरांमधील अस्सल कलावंतपणा लक्षात येतो. यापुढील काळात हे अस्सलपण आणखी निखरत राहो, हीच शुभेच्छा. 

विधात्या...कादरखानसाहेबांना परत पाठव

मला माहिती नाही कादरखान साहेब की तुमच्याबद्दलचा माझ्या मनातील 
आदर, प्रेम मी योग्य शब्दांत व्यक्त करतोय की नाही
पण तुमच्या कोट्यवधी चाहत्यांपैकी मी एक आहे
त्यापोटीच मी व्यक्त होतोय. तुमच्या उत्तुंग, वैविध्यपूर्ण अभिनयाने
स्तिमित झालेल्यांपैकी मी आहे. कदाचित स्वत:ला उच्च दर्जातील 
समीक्षक मानणाऱ्यांना हे पसंत पडणार नाही. पण कोणताही सो कॉल्ड 
चेहरा नसतानाही विलक्षण बोलणारा तुमचा चेहरा, पडद्यावरचा वावर, कधी
खर्जातील गोळीबंद तर विनोदी फिरकी घेणाऱ्या आवाजात थेट प्रेक्षकांच्या
हृदयाला भिडणे हे सारेच अलौकिक होते. प्रत्येक चित्रपटात तुमचे नवे रूप 
पाहता पाहता माझ्यासारखे अनेकजण कधी तुमचे फॉलोअर्स होऊन गेलो
ते आम्हालाच कळाले नाही. साहेब, माझा तुमचा पहिला परिचय ‘सुहाग’ 
सिनेमात झाला. परभणीच्या नाझ टॉकीजमध्ये अमिताभ बच्चन, शशीकपूर,
अमजदखानचा म्हणून सुहाग पाहण्यासाठी गेलो. त्या दिग्गजांच्या गर्दीतही
तुम्ही स्वत:ची छाप सोडली होती. तुमचा निष्ठूर गँगस्टर पाहून ७५ पैशांचे तिकीट 
खरेदी केलेले अस्सल सिनेमादर्दी परभणीकर तुमच्यावर कमालीचे संतापले होते
हे मला आजही आठवतंय. पुढे औरंगाबादला मुकद्दर का सिकंदर पाहिला
तुमच्यासोबत पुन्हा एकदा महानायक अमिताभ होते. तुफान सोसाट्याचा
वारा सुटलेल्या त्या स्मशानभूमीत महानायकाला तुम्ही अशा काही शब्दांत
जीवनाचे तत्वज्ञान ऐकवले की सारे थिएटर अवाक होऊन गेले होते
मिस्टर नटवरलाल, नसीब, यारानामधील तुमच्या भूमिका तुमच्यातील 
खलनायकी अभिनयाचे वैविध्य दाखवणाऱ्याच होत्या. पण, नाविन्याची आस
म्हणून तुम्ही विनोदी भूमिकांकडे वळालात. जितेंद्र, श्रीदेवीचा हिंमतवाला पाहून
आलेला माझा एक मित्र म्हणाला, ‘कादरखानसाठी पाहा. फार धमाल उडवलीय.’ 
आणि मग मी पण तुमच्या अनोख्या अंदाजातील विनोदाचा आनंद मनमुराद लुटला.
माझ्यासोबतचे लोक तुम्ही पडद्यावर येताच लोटपोट होऊन हसत होते
तरीही साहेब, हिंमतवालाच्या चित्रपट परीक्षणात एका स्थानिक समीक्षकाने 
तुमची अवहेलना केली. तुम्ही एक सुमार दर्जाचे विनोदी अभिनेते आहात
असे म्हटले. देशभरातील समीक्षकांचा असाच सूर होता. पण तुम्ही त्याला
दाद दिली नाही. भूमिकेशी प्रामाणिक राहत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन 
करण्याच्या मूळ उद्दिष्टापासून ठळला नाहीत. आणि मग जस्टीस चौधरी, मवाली,
पाताल भैरवी, जानी दोस्त, मकसद गिरफ्तारमध्येही तुमच्यातील विनोदवीराची
अनेक रुपे आम्ही मनात साठवली. त्याचा मनसोक्त आनंद घेतला
घर एक मंदिर’मधील तुमचा सेठ धरमदास कोण विसरू शकेल. शोभा खोटे
असरानींसोबतची तुमची जुगलबंदी म्हणजे शाब्दिक करामतीचा अस्सल नमुना होता
त्यात जितेंद्र, मिथुन हिरो असले तरी खरे हिरो तुम्हीच होतात
गोविंदासोबतचा कुली नं. १ तर केवळ अफलातून. त्यात तुम्ही रुपेरी 
पडद्यावरील विनोदी अभिनय किती निखळ, सात्विक असू शकतो, हे 
सिद्ध करून दाखवले. अंगारमधील तुमच्या ‘डॉन’ने समीक्षकांची तोंडेच बंद
करून टाकलीत. साहेब, तुम्ही दिग्गज नाट्यकर्मी, ताकदीचे लेखक. त्याचा 
अनुभव मी घेतला. औरंगाबादेतील १९९० च्या सुमारास एका एकांकिका 
स्पर्धेत भगवान होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या संघाने ‘
भुखे पेट भजन न होए गोपाल’ एकांकिका सादर केली
भिकारी, अनाथांच्या जीवन संघर्षाविषयी तुम्ही त्यात हृदयापासून केलेले
भाष्य प्रत्येक संवादागणिक डोळ्यात अश्रू आणणारे होते. एकांकिका संपल्यावर
टाळ्यांचा कडकडाट झाला. कलावंतांचे कौतुक तर झालेच पण दिग्गज अभिनेते
कादर खान यांचे लिखाण असल्यानेच त्यात एवढा अणकुचीदारपणा आल्याचेही
सांगितले गेले. एक रंगकर्मी, चित्रपटप्रेमी म्हणून माझ्या मनात तुमच्याबद्दलचा
आदर आणखीनच उंचावला. कादरखान साहेब, दहा-बारा वर्षांपूर्वी तुमच्याविषयी
अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. त्यातील एक होती की, कादरखान यांच्या बंगल्यावर आयकर खात्याची धाड पडली आहे. तुम्ही बंगल्यातून चॅनेलच्या अँकरला फोन केला 
आणि सांगितले...‘माझ्या घरात कोणी आयकरवाले आले असतील तर तुम्हीच
त्यांना मला भेटण्यास सांगा. कारण मी तर घरात निवांतपणे बसलो आहे
हल्ली इकडे कोणी फिरकतही नाही. आणि माझ्याकडे कोणतीही अवैध संपत्ती नाही
असलीच तर ती अगणित चाहत्यांच्या प्रेमाची आहे. ती हवी असल्यास आयकरवालेच
काय तुम्हीही घेऊन जाऊ शकता.’ असेही तु्म्ही जाहीर केले
एक माणूस म्हणूनही तुम्ही खरेच किती उंची व्यक्तिमत्व होता, याचा अंदाज 
यावरून त्या नाठाळ चॅनेलवाल्याला आला नाही. पण माझ्यासारख्या कोट्यवधी
चाहत्यांना नक्कीच ते पुन्हा एकदा ठामपणे कळाले. साहेब, तुमचा पुर्नजन्मावर
विश्वास आहे की नाही माहिती नाही...पण माझी त्या विधात्याकडे नक्कीच
प्रार्थना राहिल, तुम्हाला त्याने काहीशी विश्रांती घेऊन पुन्हा पाठवावे...

तुमच्या अभिनयाने आमचे जीवन समृद्ध करून टाकण्यासाठी...


निरागस : सुंदर माझी शाळा

चेहऱ्यावर कायम हास्य, वागण्या-बोलण्यात कमालीचा आनंद. हालचालीही उत्साहाने भरलेल्या. अशा एकापेक्षा एक सरस देणग्या मिळालेला गणेश प्रल्हाद घुले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पदाधिकारी. निलेश राऊत, सुबोध जाधव यांच्यासोबत कायम कार्यरत असलेला. त्याच्यात हा अमाप उत्साह नेमका कुठून येतो. हा सारखा ताजातवाना, हसतमुख कसा राहू शकतो, असा प्रश्न माझ्यासारखा अनेकांना पडत असावा. त्याचे उत्तर काही दिवसांपूर्वी मिळाले आणि मोठा उलगडा झाला. गणेश घुले केवळ सामाजिक कार्यकर्ता नाही तर एक तरल, संवेदनशील आणि जागरूक कवी असल्याचे कळाले. खरेतर तो कवितेच्या जगात प्रसिद्ध माणूस. पण मलाच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागला म्हणा किंवा त्यानं त्याच्या वागण्याबोलण्यातून ते कधी जाणवू दिलंच नाही. सुंदर माझी शाळा या त्याच्या बालकवितांच्या पुस्तक प्रकाशनाची पत्रिका घेऊन तो सुबोध जाधवसोबत भेटला. तेव्हा गणेश आपल्या परिचयाचा आहे, याची जाणिव होऊन मन आनंदित झालं. आणि प्रतिभासंपन्न कवीला आपण यापूर्वी का ओळखू शकलो नाही, असा प्रश्न पडून खजिलही झालो. गणेश  यांच्या कवितांचे ‘सुंदर माझी शाळा’ पुस्तक वाचताना त्याच्यात एवढी उर्जा नेमकी कुठून येते याचा शोध लागला. लहान मुलांसोबत कोणीही काम करत असो. त्याच्यात एक निरागसपण येते. चैतन्य अंगात भरते. नाविन्याची कायम ओढ लागते. गणेश यांना ते सारेकाही चिमुकल्यांसाठी मनापासून काम करत असताना मिळाले. पण महत्वाचे म्हणजे मिळालेला आनंद, निरागसपणा त्यांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही. स्वतःच्या पोतडीत भरून ठेवला नाही. तर तो त्यांनी सुंदर माझी शाळा पुस्तकातून सर्वांना खुला करून दिला. हा केवळ बाल गीतांचा-कवितांचा संग्रह नाही तर तो मोठ्यांनाही छोट्यांच्या जगात घेऊन जातो. मोठ्यांचे मन रमवून टाकतो. एवढी शक्ती, प्रतिभा गणेश यांच्या लेखनात आहे. सामाजिक जाणिवा अतिशय तीव्र आणि जबाबदारीने स्वीकारल्या असल्याने मनोरंजन करता करता त्यांच्या कविता लहान मुलांवर दाट संस्कारही करतात. रसायनशास्त्रात एम.एस्सी., मराठीत एम.ए. आणि नंतर बी.एड. करणारे गणेश यांचा मूळ पिंड चांगला माणूस असण्याचा आणि इतरांमध्ये चांगलेपण पेरण्याचा आहे. ते रसायन त्यांच्यात काठोकाठ भरलेले असल्याचे ‘कचरा, डस्टर, पैसा, तिरंगा, शिपाईमामा’ या कवितांतून लक्षात येते. आजकाल मुलांवर छडी उगारणे म्हणजे गुन्हा असे सांगितले जात असताना, शिस्त लावणाऱ्या मास्तरांवरच हल्ला करणारे वाढत असताना छडीचे महत्व सांगण्याचे धाडसही गणेश करतात. मोबाईलच्या जगात गुंग होऊन मुलांना विसरणारे आई-बाप ही अलिकडच्या काळातील एक नवी सामाजिक समस्या. त्यावर मुलांना खरंच काय वाटतं हे सांगणारी ‘मोबाईल’ नावाची कविता तिरकस बाण सोडत धमाल उडवते त्याचवेळी पण मनाला हलवते, रुतते. ‘मामाच्या गावाला जाऊया’ ही रचनाही अप्रतिम. कवीवर्य ‘ग. दि. माडगुळकरांची क्षमा मागून’ असे नमूद करत घुले यांनी मामाचे गाव पाणीटंचाईच्या संकटाशी कसे लढते आहे, याचे अत्यंत कमी शब्दांत पण मर्मभेदी चित्र उभे केले आहे. नव्या पिढीला कळतील, उमजतील आणि लक्षात राहतील, अशाच एक दोन नव्हे तर बेचाळीस रचना त्यांनी अतिशय सहजतेने केल्या आहेत. कोठेही अतिरेक नाही. किंवा आता मुलांचे मनोरंजन झालेच पाहिजे. त्यांच्यावर संस्कार केलाच पाहिजे, असा हट्ट किंवा अतिरेकही नाही. सारे कसे एखाद्या खळाळत्या ओहळासारखे आपल्यासमोर वाहत येते. पावसाचे हलके हलके थेंब अंगावर यावेत आणि त्यांनी मन प्रफुल्लित करून टाकावे. भिजता भिजता गावाकडील उजाड रानाचीही आठवण यावी अन्‌ विचार थबकून जावेत, अशी भावना हा कविता संग्रह वाचल्यावर निर्माण होते. आणि हेच या संग्रहाचे बलस्थान आहे. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातील पाडुळी नावाचे छोटेसे गाव. तेथे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर गणेश औरंगाबादेत शिक्षणासाठी आले. पण गावची नदी, शेती, फुले, सवंगडी यांच्याशी त्यांनी नाते तोडले नाही. कवितांच्या रुपात ते जपून ठेवले. पुढे निलेश राऊत, कवी पी. विठ्ठल, गेनू शिंदे यांच्या पाठिंब्याने वर्षभरापूर्वी ‘सुंदर माझी शाळा’ या कार्यक्रमाची निर्मिती झाली. त्यात गणेश यांच्या  बालकवितांना श्रीराम पोतदार यांनी सुरेख चालींमध्ये बांधले. अभ्युदय फाऊंडेशनतर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगलीच दाद मिळू लागली. त्यानंतर घुले यांनी कविता पुस्तक रूपात उपलब्ध करून देण्याचा चांगला निर्णय घेतला. दत्ता बाळसराफ, पद्‌मभूषण देशपांडे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुरेश हिंगलासपूरकर यांच्या पुढाकाराने अतिशय सुऱेख रुपात हा संग्रह रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. घुले यांच्या रचनांना दृश्यात्मक रुपात पुंडलिक वझे यांनी अर्थवाही केले आहे. त्यांनी मुखपृष्ठासह आत केलेली रेखाटने काही क्षण थांबून, निरखून पाहावीत, अशी आहेत.