Wednesday 29 March 2017

विद्यापीठ नाट्यशास्त्राचाही महोत्सव दिल्लीत व्हावा



ॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे कायम टीकेचा धनी, असे चित्र अनेक वर्षे होते. प्रख्यात, उत्तुंग अभिनेते आणि वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे या विभागाची धुरा सांभाळत असताना टीकेचा स्वर खूपच तीव्र होता. कारण विभागाची सर्व सूत्रे ते स्वत:च्या हातात राखून होते. वऱ्हाड त्या काळात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर होते. देशभरातील सर्वच नामवंत कलावंत आणि सरकारी अधिकारी अगदी सर्वपक्षीय राजकारणीही देशपांडेंच्या अभिनयावर फिदा होते. त्यामुळे
अनेक चांगले, दर्जेदार उपक्रम राबवत असतानाही प्रसिद्धीचा आणि सृजनशीलतेचा झोत त्यांच्याशिवाय अन्य कुणावरही जात नव्हता. गेला तरी तो काही काळातच पुन्हा वऱ्हाडकारांवर येत होता. नाट्यशास्त्र विभागाचे एकांकिका आणि दोन अंकी नाटकांचे महोत्सव हा विभागासाठी सर्वात महत्त्वाचा भाग. वर्षभर नाटकाचे नेमके काय शिक्षण घेतले ते या महोत्सवात विद्यार्थ्यांना दाखवून द्यावे लागते. तो त्यांच्या परीक्षेचाच एक भाग असतो. त्यात रसिक हेच पहिले परीक्षक असतात. शिवाय पुढे नाट्यक्षेत्रात किंवा टीव्ही मालिका, चित्रपटाकडे वळायचे की नाही, याचा अंदाज बहुतांश विद्यार्थ्यांना येत असतो. प्रा. देशपांडे यांच्या आधी विभागप्रमुख पदाची धुरा सांभाळणारे प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी महोत्सवांची परंपरा सुरू केली. त्यांच्या काळात ते प्रचंड लोकप्रिय होते. कारण त्यामागे सोनटक्केंची प्रचंड मेहनत होती. कलावंत घडवणे म्हणजे नेमके काय, हे त्या महोत्सवातून कळत होते. नंतर देशपांडेंनी दरवर्षी महोत्सवांचे आयोजन केले. पण एकूणच विभाग हाताळण्याची त्यांची पद्धत वेगळीच म्हणजे आक्रमक होती. परिणामी नाट्यक्षेत्रात त्यांच्या इतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा किंचित उजवे असणारे प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूकर, प्रा. अलोक चौधरी, प्रा. कुमार देशमुख बरेच झाकाळून गेले होते. अनेक बड्या कलावंतांना ते महोत्सवातील काही प्रयोग पाहण्यासाठी घेऊन येत. त्यामुळे महोत्सव चर्चेत येत असे. मात्र, त्याचा थेट विद्यार्थ्यांना कोणताही फायदा होत नसे. त्याही काळात प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब यांनी वऱ्हाडकारांचा प्रभाव कमी करण्यात आघाडी घेतली होती. अस्सल लोककलावंत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा वर्ग निर्माण करण्यातही त्यांना यश मिळाले होते. पुढे विभागप्रमुख झाल्यावरही अचलखांब यांनी अनेक उत्तम महोत्सवांचे आयोजन केले. स्वत: परफॉर्मिंग आर्टिस्ट असल्याने काही नाटकांमध्येही भूमिकाही केल्या. अचलखांब यांच्यानंतर विभागप्रमुख झालेले प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचा महोत्सवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. काही िवद्यार्थी केवळ कलावंत आहेत तर काही जणांमध्ये नाट्य व्यवस्थापन आयोजनाचे गुण आहेत. त्यांनाही वाव मिळाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. सरकार दरबारी आणि समाजातील विविध स्तरांत बऱ्हाणपूकर यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना होती. त्याचाही उपयोग त्यांनी विभागासाठी करून िदला. प्रसिद्धी, सृजनशीलतेचा झोत आपल्यावरच राहता कामा नये, याची बरीच काळजी घेतली. प्रचंड मेहनत आणि संवादांतून अभिनय उलगडून दाखवणे, ही बऱ्हाणपूरकरांची शक्तिस्थाने होती. ती त्यांनी महोत्सवातील काही नाट्यप्रयोगात दाखवून दिली. शिवाय लोकल ते ग्लोबल असा नारा देत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. दोन अंकी शिवाय एकांकिका महोत्सवावरही त्यांनी लक्ष दिले होते. विद्यार्थ्यांनी स्वत:च एकांकिका लेखन केले पाहिजे, यावरही भर दिला. एवढेच नव्हे तर तरुण लेखकांच्या कार्यशाळाही घेतल्या. त्यांच्या नाट्य लेखनाचे अभिवाचन महोत्सव औरंगाबाद, मुंबईत घेतले. एका अर्थाने कलावंत, लेखक, नाट्य व्यवस्थापकांची पिढी घडवण्याचे काम त्यांनी तसेच प्रा. डॉ. अचलखांब यांनी बऱ्याच अंशी केले. बऱ्हाणपूरकर सेवानिवृत्त झाल्यावर प्रा. डॉ. जयंत शेवतेकर यांच्याकडे विभागप्रमुखपदाची जबाबदारी आली. शास्त्रीय नृत्यातील मातब्बर आणि नाट्यक्षेत्रातील जाणकार अशी ओळख असलेले शेवतेकर आता नेमके काय करणार. विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम राबवणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यातील शास्त्रीय नाट्य महोत्सवाचा प्रयत्न त्यांनी विभागातील सहकारी तसेच प्रा. डॉ. दासू वैद्य, प्रा. डॉ. मुस्तजीब खान या संवेदनशील रंगकर्मींच्या मदतीने यशस्वी केला आहे. नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) तर्फे २२ ते २५ मार्च कालावधीत आयोजित हा महोत्सव रसिकांच्या पसंतीस उतरणारा ठरला. सुप्रसिद्ध रंगकर्मी, संगीतकार, चित्रकार आणि अभिनेते रतन थिय्यम यांनी दिग्दर्शित केलेले ‘उरुभंगम’ तसेच कवालम नारायण पण्णीकर दिग्दर्शित महाकवी कालिदासाचे शाकुंतलम्, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ दिग्दर्शित भगवद्अजुयक्कियम, एनएसडीचे संचालक वामन केंद्रे दिग्दर्शित मोहे पिया ही वेगळ्या धाटणीचे आणि नव्या रंगकर्मींना खूप काही शिकवून जाणारे प्रयोग सादर झाले. महोत्सवाच्या उद््घाटनासाठी त्यांनी विभागापासून अनेक वर्षे दूर राहिलेले माजी विभागप्रमुख प्रा. सोनटक्के यांना निमंत्रित केले होते. उद्््घाटनात प्रा. सोनटक्के यांनी सांिगतले ते महत्वाचे. ते म्हणाले की १९७३ मध्ये हा प्रयोग सुरू झाला. तेव्हा तो एकपात्री प्रयोग होता. पुढे प्रा. लक्ष्मण देशपांडे, प्रा. दत्ता भगत, रुस्तुम अचलखांब, दिलीप घारे आदींनी विभागाला उंचीवर नेले. रंगकर्मी म्हणून ज्या गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत, त्या आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवल्याचा आपल्याला अभिमान अाहे. सोनटक्केंचे हे म्हणणे अगदी खरे आहे. कारण त्याकाळी नाट्य जगतात स्वत:चे अस्तित्व सिद्ध करून दाखवण्यासाठी धडपडणारे विद्यार्थी होते. आणि त्यांच्यासाठी मेहनत घेणारे िशक्षकही होते. आता विद्यार्थ्यांना नाटकापेक्षा टीव्ही मालिका, चित्रपटांचे अधिक आकर्षण आहे. एक-दोन नाटकांत भूमिका केल्यावर मुंबईला पळण्याची घाई आहे. त्यांना येथे रोखून त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ देण्याची जबाबदारी डॉ. शेवतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. त्याकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. जसा एनएसडीचा महोत्सव औरंगाबादेत झाला तसा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचा महोत्सव दिल्लीला एनएसडीत करता आला तर बरेच काही साध्य होईल. नाही का?

Wednesday 8 March 2017

अस्तु : कौटुंबिक नात्यातील भावनिक ताकदीचा प्रत्यय



कुटुंब म्हणजेकेवळ परस्परांसोबत शरीराने राहणे नव्हे. कुटुंब म्हणजे केवळ हास्य, विनोद आणि आनंदच नव्हे, तर कुटुंब म्हणजे जबाबदारी, ताणतणाव आणि परस्परांच्या दु:खात, अडचणीत मदतीला धावून जाणेही आहे. कुटुंबातील सारे जण एकसारखे नसतात. भांड्याला भांडे लागतेच आणि त्यातून संघर्षाच्या ठिणग्या उडतात. कधी कोणाच्या वाट्याला अपमानाचे प्रसंगही येतात. पण ते बाजूला सारून पुढे वाटचाल करायची असते. तरच कुटुंब टिकून राहते. ही वस्तुस्थिती आहे. भारतीय समाज रचनेत तर कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीचा सांभाळ करायचा हा संस्कार लहानपणापासूनच बहुतांश कुटुंबांमध्ये वर्षानुवर्षे केला जातो. अलीकडील काळात कुटुंबे लहान झाली आहेत. एकाच वाड्यात काका, काकू, त्यांची मुले, आजोबा, चुलत आजोबा, चुलती असे राहण्याचे दिवस संपले आहेत. त्याची जागा चौकोनी कुटुंबांनी घेऊन टाकली आहे. आता तर त्रिकोणी कुटुंबांचा जमाना येत आहे. मुलगा किंवा मुलगी आणि आई-वडील म्हणजे कुटुंब अशी धारणा होत चालली आहे. त्यात वृद्ध आई-वडिलांची कित्येकांना अडगळ वाटत आहे. म्हणूनच की काय वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे. सध्या भारत जगाच्या पाठीवरील सर्वाधिक तरुणांचा देश असला तरी येत्या ४०-५० वृद्धांचा देश होणार आहे. वृद्धाश्रम कमी पडतील आणि आई-वडिलांना घरीच सांभाळण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी स्थिती नक्कीच येईल. एकीकडे लहान मूल आणि दुसरीकडे लहान मुलासारखे वागणारे माता-पिता अशी दुहेरी जबाबदारी शहरातील तरुणांना पार पाडावी लागणार आहे. पण माता-पित्यांना सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि आपणच का सांभाळायचे, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. त्याची उत्तरे ‘अस्तु’ या मराठी चित्रपटातून मिळतात. केवळ उत्तरेच मिळतात असे नाही, तर कुटुंब व्यवस्थेतील विलक्षण भावनिक ताकदीचा प्रत्ययही देतात.
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या केवळ मनोरंजन पर्वातून मराठी चित्रपट वेगाने बाहेर पडत आहे. अनेक नवे विषय हाताळले जात आहेत. मराठी मनाचे बदलते जग त्यातून समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगण्यातील महत्त्वाच्या मूल्यांविषयी नव्या पिढीला रुचेल, पचेल आणि समजेल अशा पद्धतीने संस्कारही केला जात आहे. अस्तु चित्रपटात तर तो खूपच साध्या आणि तरीही विलक्षण ताकदीने केला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम, शांती नर्सिंग होमच्या वतीने रुक्मिणी सभागृहात तो दाखवण्यात आला. प्रेक्षागृह खच्चून भरले होते आणि अस्तु संपला तेव्हा सर्वांचे डोळे पाणावलेले आणि मन विचारांच्या कल्लोळात बुडाले होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. आणि हीच अस्तुची परिणामकारकता आहे. अल्झायमर या विस्मरणाच्या आजारावर आधारलेल्या या चित्रपटाची कहाणी साधी, सरळ. संस्कृतचे प्रकांड पंडित डॉ. चक्रपाणी शास्त्री म्हणजे मोहन आगाशे त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर मुलगी इरा पाठकच्या (इरावती हर्षे) पुण्यातील घरात राहत असतात. तिचा पती डॉ. माधव (मिलिंद सोमण) समंजस माणूस. तिची प्राध्यापक बहीण राही (देविका दफ्तरदार) मुंबईत एकटीच राहते. विस्मरणाच्या आजाराने ग्रस्त अप्पा एक दिवस इरासोबत बाजारात जातात आणि बाजारपेठेत फिरणारा हत्ती पाहून कारमधून उतरून जातात. वडील हरवल्याचे लक्षात येताच इरा भांबावून जाते. पोलिसांच्या मदतीने वडिलांना शोधू लागते. माधवही तिला मनापासून मदत करतो. अप्पा हरवल्याची बातमी कळल्यावर राहीदेखील इराकडे येते. पण ती इराइतकी हळवी नाही. ज्यांची स्मृतीच नष्ट झाली आहे तो माणूस मृत असल्यातच जमा आहे, असे म्हणत ती मुंबईकडे निघते. दुसरीकडे लहान मुलासारखे झालेले अप्पा माहुताच्या (नचिकेत पूर्णपात्रे) कुटुंबासोबत फिरू लागतात. माहुताची पत्नी चन्नम्मा (अमृता सुभाष) अप्पांना लहान मुलासारखे सांभाळू लागते. अखेरीस पोलिसांच्या शोधमोहिमेला यश येते आणि अप्पा सापडतात. त्यांना इराकडे सोपवताना चिन्नम्मा जे सांगते ते कुटुंब व्यवस्थेतील आशा, अपेक्षा आणि सुखाचे सार आहे. जे जसं असावंसं वाटतं तसं त्या क्षणाला असणं म्हणजे ‘अस्तु’ हा दोन शब्दांतील मोठा अर्थ उलगडतो. आपण कोण, असा प्रश्न हजारो वर्षांपासून प्रत्येक संवेदनशील मनाला पडतो. आपलं नाव, व्यवसाय, कुटुंबाची आठवण म्हणजे स्मृती हीच आपली ओळख आहे. पण स्मृतीच नष्ट झाली तर काय, असा विचारही हा चित्रपट मांडतो. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी खूपच तपशिलात दिग्दर्शन केले आहे. बुद्धिमान आणि प्रचंड स्मृती असलेला प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तीचा त्यांनी वापर प्रतीकात्मक करून त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. डॉ. मोहन आगाशे यांनी उभा केलेला अप्पा उत्तुंग उंचीवर जातो. लहानपणीच मातृछत्राला पारखे झाल्याने चन्नम्मात आई शोधणारे अप्पा सर्वांना हलवून टाकतात. इरावती हर्षे यांनी त्यांच्यातील एका शक्तिमान अभिनेत्रीचा परिचय करून दिला आहे. अमृता सुभाष यांची चन्नम्मा तर अफलातूनच. मिलिंद सोमण, देविका दफ्तरदार, नचिकेत पूर्णपात्रे, इला भाटे, अदिती कुलकर्णी, संघर्षा संकट, डॉ. शेखर कुलकर्णी आदींच्याही भूमिका जमून आल्या आहेत. फक्त काही प्रसंगांची लांबी किंचित कमी केली असती तर आणखी चांगले झाले असते.

Wednesday 1 March 2017

गालिचे पायाखालचे तुझ्या, टोचतील एक दिवस पायाला




तमाम औरंगाबादकर गेल्या दहा-बारा वर्षांपासून समांतर जलवाहिनी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यावर चर्चा करत आहेत. केव्हा होणार आहे हे काम आणि कधी मिळणार चोवीस तास पाणी, हा त्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण महापालिका आणि औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या वादामुळे प्रकरण आता न्यायालयाच्या दारातून लवादाच्या टेबलावर जाऊन पोहोचले आहे. लवादामध्ये त्यावर पुढील वर्षभर सुनावणी होईल. मग त्याचा जो काही निकाल लागेल त्यावर पुन्हा याचिका होऊन योजनाच मातीमोल होणार, अशी चिन्हे आहेत. दरम्यानच्या काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होईल. स्मार्ट सिटीकडे निघालेल्या औरंगाबादमध्ये पाणीच नाही, अशी ओरड नगरसेवक करू लागतील. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि एखादी नवी योजना जाहीर होईल. कारण अशा प्रकारे लोकांना खेळवण्याचे काम महापालिका नेहमीच करत आली आहे. एक योजना जाहीर करायची. त्यात ठेकेदारांचेच भले व्हावे, अशा पद्धतीच्या अटी, शर्ती टाकायच्या. नंतर लोकांनी आरडाओरड केली की ती योजना गुंडाळून टाकायची आणि काही वर्षांनी पुन्हा नवीन योजना आणायची, असा प्रकार सुरूच आहे. कधीकधी गुंडाळलेल्या योजनेतून लोकांच्या भल्याचे काही तरी होऊन जाते आणि त्यातील गैरव्यवहार झाकला जातो किंवा मागे पडतो. त्याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. ते म्हणजे शिवाजीनगर, पुंडलिकनगरातील जलकुंभ योजना. अर्धवट यशस्वी झालेल्या या योजनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. १९९६-९७ मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. पुंडलिकनगर, शिवाजीनगर वसाहत तेव्हा झपाट्याने वाढत होती. मतदार युतीचे समर्थक होते. त्यामुळे तेथे पाणीपुरवठ्याकरिता ६८ कोटी खर्चून एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्याचे आणि दोन जलकुंभ बांधण्याचे ठरले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जबाबदारी देण्यात आली. मात्र, कागदावर केलेले नियोजन प्रत्यक्षात आणण्याची राजकीय नेत्यांची, मनपाची इच्छाशक्ती तेव्हाही नव्हती. मुळात जायकवाडीतून वाढीव पाणी आणणे शक्य नसल्याने जलकुंभ बांधण्यास अधिकाऱ्यांचा विरोध होता. मात्र, सरकारकडून पैसा मिळतोय तर काम केलेच पाहिजे, असा आग्रह नेतेमंडळींनी धरला. २००५-२००६ मध्ये दोन्ही जलकुंभ उभे राहिले. पण तेथे पाण्याकरिता वाहिनी टाकल्यास सिडको-हडकोतील पाणीपुरवठ्याला फटका बसणार, असे समोर आले. मग, पुंडलिकनगरवासीयांनी जोरदार आंदोलन करत पुंडिलकनगरच्या जलकुंभाला पाणी मिळवून घेतले. मात्र, २६ लाख लिटर क्षमतेचा शिवाजीनगरचा जलकुंभ कोरडाच राहिला. राजेंद्र जंजाळ शिवाजीनगरातून नगरसेवक पदावर निवडून आल्यावर त्यांनी हा मुद्दा उचलला. उपमहापौर स्मिता घोगरे यांनीही त्यात लक्ष घातले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी अभियंता सतनामसिंग चहल यांनाही जलकुंभाचे महत्त्व पटले. दहा लाख रुपये खर्चून पाइप जोडणीचा निर्णय झाला. आता महिनाभरात शिवाजीनगरसह मेहेरनगर, भारतनगर, बाळकृष्णनगर, गजानननगर, शिवाजीनगर, रेणुकानगर, नाथ प्रांगण परिसरातील २० हजार कुटुंबांना या जलकुंभावरून पाणी मिळेल, असा दावा महापालिका करत आहे.
अशा प्रकारे महापालिकेने अर्धवट सोडून दिलेली योजना ११ वर्षांनंतर का होईना, लोकांच्या उपयोगात येत आहे, याचा आनंद आहेच. पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी जागरूक असतील तर काय होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहेच. त्याचबरोबर मनपाचा कारभार किती नियोजनशून्य असतो, हेही समोर येते. मुळात १९९८ मध्ये जायकवाडीतून औरंगाबादेत पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांची वाढीव पाणी आणण्याची क्षमता नसताना (अजूनही स्थिती तशीच आहे.) शिवाजीनगरात जलकुंभ बांधण्याचा आणि एक्स्प्रेस वाहिनी टाकण्याचा घाट घालण्यात आला. त्यामागे नेते मंडळींच्या वर्तुळातील काही ठेकेदारांना काम मिळावे, त्यांचे उखळ पांढरे करावे, हाच उद्देश होता. त्यामुळे किमान २० कोटी रुपये तब्बल ११ वर्षे वाया गेले. लोकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तो कधीच भरून निघणार नाही. शिवाय या कामाकरिता विनाकारण उधळपट्टी झाली आहे. इतर जलकुंभांच्या तुलनेत शिवाजीनगर जलकुंभावर जास्तीचा खर्च झाला. हा खुला भ्रष्टाचार काळाच्या पडद्याआड गेल्यासारखे दिसते. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. कारण ही रक्कम लोकांनी त्यांच्या कष्टातून सरकारी तिजोरीत जमा केली होती. तिच्या एक- एक रुपयावर लोकांचा अधिकार आहे. आणि हा पैसा जर ठेकेदार, अधिकारी आणि काही नेत्यांच्या खिशात गेला असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. शिवाजीनगरचा जलकुंभ हे केवळ एक उदाहरण आहे. मनपाच्या सांस्कृतिक सभागृह, खुल्या रंगमंचांच्या बांधकामातही हाच प्रकार झाला आहे. रस्ताकामांमधील लुटीने तर कळस गाठला आहे. पारदर्शकतेच्या झांजा वाजवत, चौकशीची पावली खेळणाऱ्या भाजपचे भगवान घडामोडे महापौर झाले आहेत. या प्रकरणात लक्ष घालण्याची हिंमत ते दाखवतील का? अन्यथा मुंबईतील कवी गणेश पावले यांनी म्हटल्याप्रमाणे, अंत पाहतोय वाट तुझी, झोळी हाती तुझ्याही येईल...लूट जगाला लुटायचे तेवढे, उद्या दुसराच कुणी तुझी जागा घेईल...गालिचे पायाखालचे तुझ्या, टोचतील एक दिवस पायाला...लक्षात ठेव भ्रष्टाचार, सोपा नाही पचायला, असे लोकांनाच महापालिकेला सांगावे लागणार आहे.