Tuesday 24 November 2015

साहित्य सम्राटांच्या लेखणीची खरी ताकद






इथे कळते साहित्य सम्राटांच्या

लेखणीची खरी ताकद

केवळ देश स्वतंत्र झाल्याने माझ्या भोवताली राहणाऱ्या, तळाच्या अगदी पायथ्याशी असलेल्या समाजाचे दु:ख संपत नाही. असे मानत मराठी साहित्यातील एकमेव साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणी खऱ्या अर्थाने झिजवली. ती देखील समाजापासून चार हात अंतर राखत नव्हे तर त्यांच्यासोबत हालअपेष्टा सहन करत. अशा या महान साहित्यिकाचे कर्तृत्व अमूल्य आहेच. शिवाय त्यांचे जगणेही एखाद्या पहाडासारखे उत्तुंग होते. त्यांचे चौफेर लेखन  त्यांच्यातील प्रतिभेची साक्ष तर देतेच. शिवाय जाती व्यवस्थेची उतरंड निर्माण करणाऱ्या हिंदू धर्माला पश्चातापदग्धही करते. दऱ्या-खोऱ्यात फिरणाऱ्या, पाठीवर बिऱ्हाड घेऊन गावाबाहेर मिळेल त्या जागेवर, प्रचंड गरिबीत जीवन जगणाऱ्या जाती-जमातींच्या जगण्याचा जो संघर्ष त्यांनी मांडला. त्याला तोडच नाही. अण्णाभाऊंची लोकनाट्ये, एक-एक कथा, कादंबरीतील प्रत्येक प्रकरण संवेदनशील मनाला हादरवून टाकते. जाती व्यवस्थेबद्दल आक्रोश निर्माण करते. त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या वैजयंता, आवडी, माकडीचा माळ, िचखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज, फकिरा, चित्रा या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. ते प्रचंड गाजले. अजूनही त्यांच्या लेखन संपदेतील मौल्यवान कथांमध्ये दडलेली बीजे विविध माध्यमातून समोर येऊ शकतात. ही बाब मराठवाड्यातील तरुण लेखक  रावसाहेब गजमल यांनी अचूक पकडली आणि अण्णाभाऊंच्या ‘बरबाद्या कंजारी’ या कथेचे नाट्य रुपांतर करून राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत (२२ नोव्हेंबर) अतिशय ताकदीने स्वत:च्याच दिग्दर्शनात सादर केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

खरे तर राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजनच हौशी कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्यांना व्यावसायिक रंगभूमीची वाट सुकर करून देणे आहेच. त्याशिवाय कसदार, वेगळ्या वाटेवरच्या संहिता तयार होण्यासाठी प्रयत्न करणे असेही आहे. त्यामुळेच सांस्कृतिक संचलनालयाने काही वर्षापूर्वी नव्या संिहतांना प्राधान्य असा नियम केला. त्यामुळेच तरुण लेखकांसमोर आव्हान तयार झाले. दरवेळी लेखकाला सापडलेले नाट्य बीज नाट्य रुपात ताकदीने उतरतेच असे नाही. कारण दोन अंकी नाटक फुलणे. ते रंगमचीय अवकाशात बांधणे आणि त्याच स्वरूपात ते प्रभावीपणे सादर करणे याला सिद्धहस्ततेसोबत टीमवर्क लागते. ते सर्वच नाट्यसंघांकडे उपलब्ध नाही. म्हणून कथा, कादंबऱ्यांचे नाटकात रुपांतर करण्याचा प्रवाह तयार होत आहे. त्याचे उत्तम उदाहरण ‘बरबाद्या’ नाटकात पाहण्यास मिळाले. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेत काहीही कर्तृत्व नसताना केवळ जन्मावर ठरलेल्या  विशिष्ट जाती दुसऱ्या जातींचे  माणूसपण नाकारतातच. शिवाय जातीअंतर्गत भेद, रुढी, परंपराही त्याला खतपाणी घालतात. जात पंचायतीच्या रुपाने तर शोषितांचे आणखी शोषण सर्रास केले जाते. अण्णाभाऊंनी ही बाब ‘बरबाद्या  कंजारी’ कथेत अतिशय साध्या पण विलक्षण जिवंतपणे मांडली. ती नाट्य रुपात सादर करताना गजमल यांनीही त्यात तेवढाच जीव ओतला. व्यक्तिरेखा ठसठशीत केल्या. जातीत प्रचंड दरारा असलेल्या बरबाद्याची परंपरा झुगारून देण्याची लढाई टोकदार केली. एकीकडे मुली, पत्नीवरील नितांत प्रेम आणि दुसरीकडे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रुढीशी लढणारा बंडखोर बरबाद्या उभा करताना अण्णाभाऊंना अपेक्षित असलेला  सामाजिक संदेशही दिला. मात्र, हे करत असताना त्यांनी काही प्रसंग नव्याने लिहिले किंवा विस्तारित केले असते तर बरबाद्या आणि त्याच्या व्याही मंडळीतील हाणामारीच्या प्रसंगाची लांबी कमी होऊ शकली असती. नाट्य आणखी गोळीबंद झाले असते. दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी कथा आणि नाट्याकडे थोडे आणखी त्रयस्थ नजरेने पाहणे अपेक्षित आहे.

रामेश्वर देवरे, राजकुमार तरांगे, रोहिदास पवार, अर्जुन टाकरस, दिशा वडमारे, श्रुती फुलारी, अभिजित वाघमारे, रत्नदीप वाव्हळे, मनोज ठाकूर, अमोल जाधव, राजेश आंगुडे, चंदू हिवाळे, प्रवीण गायकवाड या साऱ्यांनीच कथा आणि नाट्याचे मूल्य जाणून घेतले होते, असे दिसते. प्रत्येकानेच भूमिकेत जीव ओतला. अनिल बेडे यांनी  नेपथ्यातून भटक्यांची विपन्नावस्था, त्यांच्या राहण्याची, वावरण्याची ठिकाणे चांगली उभी केली होती. शेख अस्लम यांची वेशभूषा, प्रेरणा खरातांची केशभूषा, मंगेश भिसेंची प्रकाश योजना आणि भरत जाधव यांचे संगीत संहितेला न्याय देणारे होते. अण्णाभाऊंची विपूल कादंबरी, कथासंपदा आहे. त्यातील काहींचे आधी अभिवाचन करून त्यातील कोणती नाट्यबीज फुलवणारी आहे, याचा अभ्यास होऊ शकतो. आणि केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता त्यांचे नाट्य प्रयोगही झाले तर मराठी रंगभूमीच्या कक्षा आणखी रुंदावू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आणि गजमल व त्यांचे हरहुन्नरी, संवेदनशील सहकारी हे निश्चित करू शकतील. एवढी आशा बरबाद्याच्या सादरीकरणाने निर्माण केली आहे.




Saturday 21 November 2015

काँग्रेसचे शहराध्यक्षपद आणि बाभळीचे झाड



---------
इसापनितीतील एक गोष्ट. पिनाक नावाचा बिबळ्या एकदा एका खड्ड्यात पडला. बऱ्याच उड्या मारूनही त्याला त्यातून बाहेर पडता येईना. हे पाहून खड्ड्याच्या काठावर उगवलेले सुपर्णक नावाचे बाभळीचे झाड त्याला म्हणाले, मी माझ्या फांद्या खाली झुकवतो. त्यांना धरून तू बाहेर ये. बिबळ्याने तसे केले. खड्ड्यातून बाहेर पडल्यावर त्याने पाहिले तर अंगात अनेक काटे घुसले होते. कातडीला खरचटले होते. तो वैतागून बाभळीच्या झाडाला म्हणाला, अरे मदतीच्या नावाखाली हे काय केले. झाड म्हणाले की, तु माझी मदत घेण्यापूर्वीच याचा विचार करायला हवा होता. कारण काटे टोचणे, ओरबाडणे हा माझा स्वभावधर्मच आहे.

तात्पर्य : प्रगती करताना, संकटातून बाहेर पडताना आपण नेमकी कुणाची मदत घेतो, याचा अभ्यास केलाच पाहिजे.


-----------
Add caption
 यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी होते.

राज्यातील सत्तेच्या सोपानावरून खाली उतरलेल्या औरंगाबादेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपण विरोधी  पक्षात असल्याची वस्तुस्थिती उशिरा का होईना कळाली. त्यामुळे त्यांनी लोकांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांच्या काही निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ते रस्त्यावरही उतरत आहेत, असा अनेकांचा समज झाला असेल. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी ते बोटाच्या पेराएवढेच आहे. मुळाशी जाऊन तपासणी केली तर असे लक्षात येते की, आंदोलनांच्या आडून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीही लढाई सुरू झाली आहे.  पडद्याआड लपून बसलेेले  विरोधक आपल्या स्थानाला धक्का लावण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे लक्षात आल्यावर काही पदाधिकारी मंडळी सक्रिय झाली आहेत. महाराष्ट्राच्या इतर ठिकाणची काँग्रेस आणि औरंगाबादेतील काँग्रेसची रचना खूप वेगळी आहे. काँग्रेस किंवा सर्वच राजकीय पक्षात जात-पात आणि धर्माची समीकरणे मांडूनच पदांची देवघेव केली जाते. तशी ती औरंगाबादमध्ये आहेच. पण त्याही पलिकडे जाऊन आपल्याला अनुकूल असलेल्यांच्याच हातात दोऱ्या ठेवायच्या आणि आपण त्या अधून-मधून  खेचत राहायच्या असा खेळ गेली अनेक वर्षे स्थानिक नेते मंडळींनी खेळला आहे. त्यामुळेच की काय काँग्रेस राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर भरीव कामगिरी करत असताना औरंगाबादेत तो नेहमीच बैकफूटवर राहिला आहे. शिवसेना-भाजप किंवा राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या नेत्यांत गटबाजी नाही किंवा त्यांचे एकमेकांशी फार सख्य आहे. गळ्यात गळे घालून नेते मंडळी फिरतात, असे नाही. पण काँग्रेसचे पदाधिकारी लोकांमध्ये लोकप्रिय होणार नाहीत. जनतेच्या प्रश्नावर फार आक्रमक होणार नाहीत. त्यांची लोकप्रियता वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी नेते मंडळी वारंवार घेत असतात. त्यामुळे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात झालेली डिझेल दरवाढ, डाळींची महागाई, मोंढा नाका उड्डाणपुलावरील पथदिवे लावणे अशी आंदोलने त्या अर्थाने धाडसीच म्हणावी लागतील. त्यांना हटवण्यासाठी पडद्याआडून सुरू असलेल्या हालचालींचा प्रतिकार करण्यासाठी का होईना त्यांनी काँग्रेसच्या सुस्तावलेल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवले. काँग्रेसच्या शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील यांनाही त्याचे श्रेय द्यावे लागेल. लोकांचे नेमके प्रश्न कोणते आणि ते नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे मांडले पाहिजे, याचा अंदाज पाटील यांना आलेला दिसतो. तसा तो नेत्यांना आलेला नाही. त्यांचे सारे लक्ष पदाधिकाऱ्यांच्या खेळात आहे. स्वातंत्ऱ्यानंतरची किमान ३८ वर्षे काँग्रेसचे औरंगाबाद शहरावर वर्चस्व राहिले. शहरात मुस्लिम शहराध्यक्ष आणि जिल्ह्यात मुस्लिमेतर असे गणित कायम ठेवले गेले. पण ९० नंतर शिवसेनेचा उदय झाल्यावर गणित कायम ठेवूनही मूळ समीकरणे बिघडत गेली. पक्ष हळूहळू जनतेच्या प्रश्नावरून नेत्यांच्या हुजुरेगिरीकडे झुकत गेला. त्यातही नेते पूर्ण शहराचा नव्हे तर स्वत:च्या मतदारसंघापुरतेच पाहणारे निघाले.  माझा संबंध फक्त माझ्या विधानसभा मतदारसंघापुरताच. मग महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता येणार असेल तर येऊ द्या, असा त्यांचा पवित्रा राहिला. त्याच दृष्टीकोनातून त्यांनी गेली १५ वर्षे काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची मांडणी केली. आपल्याच मर्जीतील कार्यकर्ता पदावर नेमायचा आणि जर तो लोकांसाठी चांगले काम करून लोकप्रिय होण्याच्या मार्गावर असेल तर त्याला मागे खेचण्यासाठी दुसऱ्यांना भिडवून द्यायचे, अशी रणनिती आखली गेली. विधानसभेतील पराभवानंतर राजेंद्र दर्डा आता राजकारणातून बाहेर पडले. १९९९ मध्ये पहिली निवडणूक जिंकल्यावर ते औरंगाबादेतील काँग्रेसचा चेहरा बदलतील. काम करणाऱ्यांना पुढे आणि न करणाऱ्यांना मागे ठेवतील, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ती कधीच पूर्ण केली नाही. शहराच्या राजकारणात नगरसेवकांचा मोठा रोल असतो. त्यांना एकत्रित करण्याएेवजी त्यांच्यातील गटातटाला फुंकर मारणाऱ्यांना त्यांनी रोखल्याचेही उदाहरण नाही. त्या काळात झालेली पडझड अजूनही भरून निघालेली नाही. राजकारणाबाहेर पडल्यानंतरही दर्डांचे काँग्रेसमधील अस्तित्व कायम असल्याचीही चर्चा काँग्रेसच्या गोटात ऐकण्यास मिळते. अॅड. अक्रम यांना हटवून त्यांच्या जागी डॉ. जफरखान, अशोक सायन्ना, रशीद मामू यांची नावे चर्चेत आणण्यामागे प्रदेशाध्यक्ष अशोेक चव्हाण असल्याचे सांगितले जाते. तर काहीजण दर्डाच ही सूत्रे हलवत असल्याचे म्हणतात. त्यात किती तथ्य आहे, याचे उत्तर फार काळ लपून राहणार नाही. डॉ. जफर यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावली. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याची आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवत त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी त्यांनी वेळोवेळी पार पाडली आहे. सायन्ना, रशीद मामू दोघेही माजी महापौर. त्यांना काँग्रेसच्या कार्यपद्धतीचा प्रदीर्घ अनुभव आहे. शहरातील प्रश्नांची त्यांना जाणिव आहे. सायन्ना तर काही काळ भाजपमध्ये राहून स्वगृही परतले आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाकडेही शहराध्यक्षपदाची सूत्रे गेली तरी बऱ्यापैकी कामगिरी बजावण्याची क्षमता या मंडळींमध्ये आहेच. पण मूळ मुद्दा अशीच कामगिरी करणाऱ्य अक्रम यांना का हटवायचे असा आहे. त्याचे उत्तर अक्रम समर्थकांना हवे आहे. नेत्यांच्या इच्छेखातर जर हे होणार असेल तर ते योग्य नाही, असा अक्रम समर्थकांचा सूर आहे. तर एकाच व्यक्तीकडे शहराध्यक्षपद किती दिवस असा त्यांना हटवू इच्छिणाऱ्यांचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसमधील गटबाजी आणखी उफाळून येऊ शकते. त्यात नेत्यांचे भले होणार असले तरी काँग्रेस आपले प्रश्न धसास लावेल या आशेवर बसलेल्या जनतेचे नुकसानच होणार आहे, याविषयी कुणाच्या मनात काही शंका आहे का?

--




Wednesday 4 November 2015

कलावंत म्हणून तयार होण्याची संधी



--

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा महोत्सव नुकताच सुरू झाला आहे. शहराच्या एका कोपऱ्यात म्हणजे विद्यापीठातील नाट्यगृहात सुरू असलेला हा महोत्सव म्हणजे केवळ  मनोरंजनाचा किंवा सादरीकरणाचा भाग नाही. जसे शाळा, महाविद्यालयात अभ्यासाचे धडे गिरवून मुले, मुली पुढच्या वर्गात सरकतात. मग कुणी वकिल होते. कुणी प्राध्यापक. कुणी शिक्षक. कुणी डॉक्टर तर कुणी इंजिनिअर. तसे कुठल्याही प्रांतातील कलावंतांचे असते का? चित्रकला, शिल्पकलांसाठी त्या मुला, मुलीमध्ये उपजत प्रतिभा असावी लागते. एखादा कागदाचा तुकडा मिळाला. त्यावर त्याने रेखाटन केले. रंग भरले तर त्याच्यातील चित्रकार हळूहळू तयार होऊ लागतो. पुढे त्याने संधीचा फायदा घेतला. चित्रकलेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले तर त्याच्यातील प्रतिभेला धुमारे फुटू लागतात. एखाद्याने आखीव-रेखीव शिक्षण घेतले नाही तरी तो उत्तम चित्रकार वैयक्तीक साधनेवर होतो. शिल्पकाराचेही काही प्रमाणात तसेच आहे. गायकाला एखादा उत्तम गुरु मिळाला किंवा मैफलीत गाण्याचा मान मिळाला तरी त्याला स्वत:तील कौशल्याची परीक्षा घेता येते. नाट्य कलावंताची गोष्ट थोडी वेगळी आहे. तो कितीही प्रतिभावान असला. त्याच्यात कितीही नैसर्गिक गुणवत्ता असली  त्याला इतरांच्या मदतीशिवाय स्वत:तील कलावंत सिद्ध करता येत नाही. कारण नाटक ही मुळातच समूहाची कला आहे. साद-प्रतिसाद हाच नाटकाचा पाया आहे. प्रख्यात नाट्य लेखक  प्रा. महेश एलकुंचवार यांनी काही वर्षापूर्वी औरंगाबादेत अनंत भालेराव पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात या मुद्याची मांडणी केली होती. ते असे म्हणाले होते की, उत्तम नाट्यकृती तेव्हाच उभी राहते. जेव्हा त्यातील अनावश्यक गोष्टी  गाळल्या, वगळल्या जातात. संहितेला आवश्यक तेवढेच नेपथ्य वापरा. उगाच रंगमंचावर गर्दी नको. अनावश्यक संवादांवरही काट मारा. मात्र, नाटकामध्ये सादर करणारा आणि तो पाहणाराच वगळला तर काय होईल? थोडक्यात नाटक जर उत्तम व्हायचे असेल तर कलावंत आणि प्रेक्षक आवश्यक असतात. अन्यथा ते नाटकच नसते. प्रेक्षक तर निमंत्रणावरून, आयोजनाचा सांगावा धाडल्यावर मिळू शकतात. पण कलावंत तयार व्हायचा असेल तर त्यासाठी किमान दोन जण लागतात. अगदी  एकपात्री नाटकाचा प्रयोग म्हटला तरी त्यात कलावंताला काही व्यक्तिरेखा साकाराव्याच लागतात. अन्यथा त्याचे सादरीकरण म्हणजे भाषणच होते. आता समूह कसा निर्माण करायचा. रंगमंचावर लेखकाच्या संहितेला अनुसरून पात्रे कशी निर्माण करायची. या पात्रांना नैसर्गिक वाटाव्यात अशा हालचाली देताना त्या चौकटीत कशा बांधायच्या. प्रकाश  योजनेचा वापर कसा करायचा. रंगभूषेच्या वापरातून व्यक्तिरेखा कशी जिवंत करायची, असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी एकतर कलावंताला  एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे लागते किंवा अलिकडील काळात नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये दाखल व्हावे लागते. अभिनय किंवा दिग्दर्शन किंवा नेपथ्य आदी तांत्रिक बाबींसाठी नेमके काय करावे, याबद्दल अशा संस्थांतील नामवंत प्राध्यापक मंडळी शिक्षण देतात. पण सर्वात महत्वाचे असते ते एकांकिका आणि

 दोन अंकी नाटकांचे सादरीकरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे मराठवाड्यातील सर्वात जुना. तेथेच अनेक मातब्बर, गुणी  दिग्दर्शक, लेखक, अभिनेते तयार झाले. त्यांचा पाया  विभागातील शिक्षकांनी मजबूत केला किंवा नाही याबद्दल मतभेद असू  शकतील. पण सर्वजण एकमताने निश्चित सांगतील की, दरवर्षी होणाऱ्या एकांकिका आणि दोन अंकी नाटकाच्या महोत्सवाने त्यांना एक दिशा दिली. संहिता म्हणजे काय इथपासून ते प्रेक्षक म्हणून नाटक कसे पाहावे. त्याचा आस्वाद कसा घ्यावा हे देखील आम्ही महोत्सवातूनच शिकलो. नाटक ही समूहाची  कला असल्याने समूहाचा वापर कसा करायचा किंवा समूहाचा एक भाग म्हणून आपली जबाबदारी अचूकपणे कशी पाडायची, हे देखील महोत्सव शिकवत असतो. एकूणात नाट्य कलावंत घडण्याची पूर्ण प्रक्रियाच महोत्सवातून होत असते. त्यामुळे िवद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा, परीक्षेचा एक भाग असला तरी महोत्सव म्हणजे परिपूर्ण, संवेदनशील कलावंत घडण्याची महत्वाची संधीच आहे. त्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला तर पुढील काळात दर्जेदार कलावंत रंगभूमी, चित्रपट जगताला मिळतील.