Monday 28 December 2020

प्रकाश वाटेच्या मानकरी

परिवर्तनवादी विचारांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एक इतिहास रचला गेला. ‘दिव्य मराठी’च्या रातरागिणी उपक्रमात किमान १५ हजार महिला अंधारावर मात करण्यासाठी अंधारावर चालून गेल्या. औरंगपुरा येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष केला. इतिहासात नोंद झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा पाया कसा रचला गेला. रातरागिणी उपक्रमाचा एकूण प्रवास कसा होता, हे वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त सांगणे महत्वाचे आहे. तर झाले असे की, गेल्या वर्षी डिसेंबरच्या प्रारंभी सोयगाव तालुक्यात एका शिक्षकाने मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटेसरांनी ठोस भूमिका घेतली. दिव्य मराठीची टीम सोयगावात पोहोचली. शोषणामुळे प्रचंड घाबरलेल्या मुलींना धीर दिला. संवाद साधत बोलते केले. तेथे 'मौन सोडू चला बोलू' अभियानाचा प्रारंभ झाला. यानंतर ‘दिव्य मराठी’ महिलांवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेवर अतिशय संवेदनशील आणि आक्रमक मांडणी केली. आरोपींवर कठोर प्रहार केले. गर्भातच मुलींचे जीवन उद्धवस्त करणारी एक टोळी ‘दिव्य मराठी’ने गजाआड केली.

पण केवळ वार्तांकन करून थांबता येणार नाही. तर महिलांवर होणारे अत्याचार पाहतात्यांच्या एकूण जीवनात बदल झाला पाहिजे. आणि या बदलांचे बीज आपणच रोवले पाहिजे, असा विचार ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे व्यक्त केला. आणि तातडीने अंधारावर चालून जातील रातरागिणी ही संकल्पना मांडली. तो दिवस होता १२ डिसेंबर २०१९. वर्षातील सर्वात मोठी रात्र अर्थात २२ डिसेंबर रोजी क्रांती चौकातून औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यापर्यंत अंधारावर चालून जायचे ठरले. आणि त्यापुढील दहा दिवसांत आवटेसरांच्या मार्गदर्शनाखाली दिव्य मराठीचे डेप्युटी चीफ रिपोर्टर शेखर मगर, रिपोर्टर रोशनी शिंपी यांच्या पुढाकारात संपादकीय सहकाऱ्यांची एक टीम रातरागिणी आयोजनासाठी झपाटून मैदानात उतरली. त्यावेळचे निवासी संपादक दीपक पटवे यांनी स्थानिक पातळीवर नियोजन केले. या उपक्रमात अर्थातच समाजातील प्रत्येक घटकाचा, महिला, युवतींचा सहभाग आवश्यक होता. त्याकरिता विविध जातीधर्मसंस्थासंघटनाविचारधारेच्या महिलांना ‘दिव्य मराठी’ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. एका आवाजाला प्रतिसाद देत शेकडो प्रतिनिधी बैठकीला आल्या. संकल्पना ऐकल्यावर त्यांनी हा आमचा कार्यक्रम आहेआम्ही तो यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला. महाविद्यालयीन तरुण, तरुणी देखील हिरीरीने सहभागी झाल्या. अगदी पाच वर्षांची चिमुकली ते ८० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने पाठबळ दिले. काहीजणींनी नियोजनासाठी मौलिक सूचनाही केल्या. औरंगाबाद शहरात रात्रीच्या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरणार होत्या. त्यामुळे त्यांच्या वाहनांचे पार्किंग, शिस्तबद्ध मार्गक्रमण आणि घरी परतण्यासाठी बसची व्यवस्था अशी अनेक आव्हाने होती. पण तत्कालिन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेकजणांनी मदत केली.

औरंगाबाद शहरच नव्हे तर उपनगरातील महिलाही मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमल्या. अपेक्षेपेक्षा दहापट अधिक संख्येने सहभागी होत त्यांनी रातरागिणीची कमान हातात घेतली. डॉक्टरइंजिनियरसीएउद्योजकपरिचारिकाड्रायव्हरसामाजिक कार्यकर्ताप्राध्यापकशिक्षिकाकलावंतगृहिणी अशा एक ना अनेक सहभागी झाल्या. मार्गात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत होते. लोक कुतूहलाने ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत होते. क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठणगेट येथे मलखांबाच्या कवायती, पोवाडे, स्फूर्तीगीतांचे गायन असा माहोल होता. औरंगपुऱ्यात महात्मा फुले पुतळ्याजवळ एवढ्या मोठया संख्येने महिला आल्या होत्या की, रात्री बाराच्या सुमारास ‘अंधारावर मात करणारी पहाट झाली’ अशी नोंद जगाने घेतली. महिलांनी रात्री सातच्या आत घरात असलेच पाहिजे, या पुरुषांनी पेरलेल्या भितीयुक्त अंधारावर मात करून प्रकाश वाटेने त्या चालत गेल्या. त्या साऱ्या रातरागिणींना औरंगाबादकरांच्यावतीने लाख लाख धन्यवाद !


Saturday 19 December 2020

परिवर्तनाचा हुंकार

वर्षानुवर्षे एका साचेबद्ध पद्धतीने जगणाऱ्या, घुसमट हेच आपले प्राक्तन असे मानणाऱ्या समाजात परिवर्तन झाले पाहिजे. अन्याय करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे, यासाठी खडतर वाटचाल करणारे काहीजण साहित्य विश्वात आहेत. महेश खरात हे त्यापैकीच एक. ते सातत्याने परिवर्तनाची लढाई लढत आहेत. शिवाय एक साक्षेपी, परखड समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे परिवर्तनवादी विचारवंत, समीक्षक अशी दुहेरी ओळख असलेले खरात स्वतःचे अनुभवविश्व, विचारांमागील भूमिका ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ या पहिल्या कविता संग्रहात विविध रचनांच्या रुपात मांडतात. तेव्हा त्याला एक विशिष्ट उंची आणि एक खोलीही प्राप्त होते. एकेक ओळ, त्यातील भावार्थ कसदार असल्याची जाणिव होते. लोकवाङ्मयगृहाने ४० रचनांचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. प्रख्यात पुरोगामी विचारवंत, कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांचे भाष्य आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची बारा पानांची दीर्घ प्रस्तावना या ‘ओळ तुझ्या-माझ्या...’ संग्रहाला लाभली आहे. यावरून तिचे साहित्य व्यवहारातील महत्व अधोरेखित होऊ शकते. साहित्य वर्तुळात प्रदीर्घ काळापासून वावर असलेल्या खरात यांच्या विचारात, लेखणीत धारदारपणा आहे. तो त्यांच्या साहित्य कृती समीक्षणात दिसून येतो. समीक्षक म्हणून त्यांनी त्यांना जे योग्य वाटले ते मांडण्यात मुळीच हयगय केली नाही. अनेक वर्षे इतरांच्या लेखनाविषयी भाष्य करत असताना खरात यांच्या मनामध्येही अनेक प्रकारचे विचार उसळी घेत होते. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना, समाजाचे साचलेपण, काही घटकांचे एकारलेपण अनुभवत होते. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत गेली. असे म्हणतात की, कवितांच्या ओळी अस्वस्थतेच्या गर्भातूनच जन्माला येत असतात. तसेच काहीसे ‘ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची’ कविता संग्रहात झाले असावे. खरात यांचा मूळ पिंड समीक्षकाचा. त्यात कवीमनही जोडले गेले. सभोवताली जे काही घडते आहे. ते पाहून निर्माण होणारी संतप्तता ते मांडतात. त्यात कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. थोडासा धागा मांडायचा आणि त्याचा विस्तार करणे सोडूनच द्यायचे. किंवा त्यातून अंग काढून घ्यायचे, असा काही कवींचा पवित्रा असतो. त्याला खरात यांनी पहिल्याच कविता संग्रहात छेद दिला आहे. म्हणूनच त्यांची कविता वास्तवाला भिडणारी आणि परिवर्तनाचा विचार अधिक टोकदार, आक्रमक, व्यापकपणे मांडणारी झाली आहे.'ओळ तुझ्या-माझ्या स्वातंत्र्याची''मधील सर्वच कवितांचा केंद्रबिंदू माणूस आहे.‘चक्र परिवर्तनाचे'', ''सुरकुतलेल्या चेहऱ्याआड'' आणि ‘पासवर्ड आनंदाचा'' अशा तीन विभागात प्रा. खरात यांनी कवितेची विभागणी केली आहे. सामान्य माणसाला कोणकोणत्या पातळ्यांवर लढावे लागते, याची अतिशय प्रभावी मांडणी खरातांच्या कवितेत आहे. विशेष म्हणजे ते एक प्रकारचा आशावादही निर्माण करतात. एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गोष्टी बोलल्या जातात. दुसरीकडे भेदभाव, द्वेष्, अहंकार वाढत चालला आहे. एक वर्ग झपाट्याने प्रगती करतोय तर दुसरा झपाट्याने तळाला जातोय. यात बदल झाला पाहिजे. अशा अन्यायकारक वागण्याला जबाबदार असणाऱ्यांना कडक शब्दांत प्रश्न विचारले पाहिजेत, असे खरात सूचित करतात. त्यामुळे एकूणात हा कवितासंग्रह परिवर्तनाचा हुंकार देणारा ठरला आहे.

खुरपं

गेल्या १००-१२५ वर्षांत अनेक मराठी साहित्यिकांनी महिलांचे भावविश्व यथार्थपणे मांडले. त्यांच्या जगण्यातील दु:खवेदनांना आवाज मिळवून दिला. पण त्यातील बहुतांश कथानके, व्यक्तिरेखा शहरी तोंडवळ्याच्या आहेत. कारण मूळ ग्रामीण भागातील असले तरी ही लेखक मंडळी शहराशी नाळ जोडलेली होती. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार आदींनी ग्रामीण महिलांच्या व्यक्तिरेखा चित्रित केल्या. पण त्या बहुतांश विनोदी अंगाने होत्या. त्यामुळे शेतात अपार कष्ट करणाऱ्या, विहीरीवर पाणी शेंदून हाताला घट्टे पडलेल्या आणि कायम ग्रामीण समाजरचनेच्या तळाला राहणाऱ्या महिलांचे चित्रण तेवढ्या ताकदीने, विविध अंगाने, खोलवरपणे फारसे आलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे खेड्यापाड्यातील संस्कृतीत जगलेल्या महिलांकडून कसदार, विपुल लिखाण दिसत नाही. त्यामुळे एकूणात मराठी साहित्य विश्व त्या दृष्टीने अपुरे होते.

मात्र, संवेदनशील, आश्वासक कथालेखिका सुचित्रा घोरपडे यांनी ‘खुरपं’ या त्यांच्या कथासंग्रहातून हे अपुरेपण बऱ्याचअंशी भरून काढले आहे. पुण्यातील आर्ष पब्लिकेशन्सने हा कथासंग्रह प्रकाशित करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
घोरपडे यांच्या या कथासंग्रहात दहा कथा आहेत. प्रत्येक कथा कसदार, आशयघन तर आहेच. शिवाय त्यातील मांडणीचा प्रवाहही चकित करणारा आहे. खेड्यांमधील बोलीभाषा कथेत अचूकपणे वापरणे म्हणजे पुरुषांचा प्रांत हा अनेक वर्षांचा समजही घोरपडे यांनी मोडीत काढला आहे. ग्राम्य बोलीभाषेतील अनेक शब्द त्यांनी अतिशय चपखलपणे आणि भावार्थासह जागोजागी पेरले आहेत. अवदस, माचुळी, येडताक, चईत, डबरणी, किनव्या ही त्यांच्या काही कथांची नावे आहेत. यावरून कथांमधील शब्दांची ताकद आणि परिघ लक्षात येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे लेखिकेने एकाही कथेची मांडणी, व्याप्ती पसरट केलेली नाही. अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. व्यक्तिरेखा आपण कधीतरी पाहिल्या आहेत, असे वाटत राहते किंवा अशी व्यक्तिरेखेशी आपले जवळकीचे नाते असावे, असे जाणवत राहते. जणूकाही आपण एखाद्या खेडेगावात राहण्यासच गेलो आहोत, असे वातावरण घोरपडे यांची लेखणी तयार करते. म्हणूनच ‘खुरपं’मधील प्रत्येक कथा हृदयात रुतून राहते.
‘खुरपं''मध्ये गावगाड्यातील महिलांच्या जीवनाचे स्पंदन आहे. ग्रामीण संस्कृती, मोडक्या -तोडक्या घरांत आणि वाड्यामध्ये निर्माण झालेले आचपेच, भाऊबंदकीतील तणाव, नातेसंबंधातील घुसमट, डोळ्यातच निष्प्राण झालेले अश्रू अशा अनेक पैलूंना वाचा फोडणाऱ्या कथा यात आहेत. घोरपडे यांनी गेल्या काही वर्षांत शब्दालय, युगांतर, पर्ण, शब्दशिवार, विवेक, अक्षरदान, चौफेर समाचार यासारख्या दिवाळी अंकातून लेखन केले आहे. शिवाय स्टोरीटेलसाठी ऑडिओ कथालेखन, डेलीहंटच्या माध्यमातून ब्लॉग लेखन, वृत्तपत्रांमध्ये कथा, लेख आणि सदर लेखन केलेले आहे. आता ‘खुरपं’मुळे त्यांच्या रुपाने एक सशक्त कथालेखिका साहित्य विश्वाला मिळाली आहे, असे वाटते.

Monday 14 December 2020

पदवीधरच्या निकालाचा धडा

कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की, त्याच्या आड दडलेल्या काही गोष्टी सर्वांसमोर येणे आवश्यक असते. कारण या गोष्टी विजेत्याची शक्तीस्थाने सांगतात. पराभूत उमेदवाराच्या मोठ्या किंवा त्याला किरकोळ वाटत असलेल्या चुका समोर आणतात. या चुकांची पुनरावृत्ती टाळली तर पराभूत उमेदवार किंवा त्याचा एखादा अनुयायी पुढील काळात विजयी होऊ शकतो. पराभूत पक्षाचे प्रमुख नेतेही यातून काही धडा घेऊ शकतात. मराठवाडा पदवीधर निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा सुमारे २७ टक्के अधिक मतदान झाल्याने प्रस्थापिताच्या विरोधात कौल असे पारंपारिक गृहीतक मांडले गेले. ते सतीश चव्हाण यांच्या विजयाने चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात हे पदवीधर मतदारसंघात होऊ शकते, हेही तेवढेच खरे आहे. आता विजय-पराभवाच्या काही मूळ कारणांकडे वळूयात. १) आपल्याला मतदान करण्याची हमी असलेल्या अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करून घेणे. भलेही त्यांच्या सर्व समस्या सोडवणे शक्य नसले तरी त्यांच्याशी अतिशय नम्रपणे, कायम संपर्कात राहणे. मतदानाच्या दिवशी स्वतंत्र, अत्यंत भरवशाची यंत्रणा लावून त्यांचे मतदान करून घेणे. ही यशाची पहिली पायरी आहे. च‌‌‌‌‌व्हाण यांना दोन निवडणुकांचा तगडा अनुभव असल्याने त्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली पायरी ओलांडली होती. २) पक्षाची यंत्रणा, पक्षाची ध्येयधोरणे, राष्ट्रीय किंवा राज्य, देशाच्या बड्या नेत्याचे वलय याचा प्रचारात फायदा होतो. पण अशा गोष्टी निकाल शंभर टक्के बदलू शकत नाही. विरोधकाला कमी लेखणे तर सर्वाधिक धोकादायक असते. बोराळकर बड्या नेत्यांचे वलय, पक्ष यंत्रणेच्या पूर्णपणे भरवशावर राहिले. तर चव्हाण शिवसेनेच्या यंत्रणेची मदत घेताना व्यक्तिगत हितसंबंधाचे धागेदोरे बळकट करत गेले. बोराळकर तुल्यबळ आहेत, असे मानत प्रचार केला. ३) कोणतीही लढाई लढायची असेल तर आधी आपल्याला पक्षाचा खरेच किती पाठिंबा आहे, याची माहिती हवी. नेत्यांचा पाठिंबा हवाच पण कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी केवळ आपल्यासाठी लढण्यास तयार आहे का, हे उमेदवाराने शांतपणे तपासून पाहिले पाहिजे. चव्हाण यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्धी नव्हता. आपल्यासाठी संपूर्ण ताकदीने लढू इच्छिणाऱ्यांची मोठी फळी त्यांनी बांधून ठेवली होती. त्या उलट नेत्यांपासून कार्यकर्ते बोराळकरांच्या विरोधात होते. ४) कोणी काहीही म्हणत असले तरी जातीपातीची गणिते हा तर भारतीय राजकारणाचा पाया आहे. मोठा वर्ग त्याच निकषावर मतदान करतो. त्यामुळे त्यानुसार मतदार नोंदणी करून घेणे आणि ती खरेच झाली आहे की नाही, याचा खरा अभ्यास, पडताळणी करावी लागते. चव्हाण यांनी यात शंभर टक्के गुण मिळवले. तर बोराळकर अभ्यास झाला आहे, या भ्रमात राहिले, असे निकाल सांगतो. ५) तसे तर आपण कोणाच्या मदतीला धावून गेलो तरच लोक आपल्याला मदतीला येतात. हा साधा नियम आहे. राजकारणात तर कमीतकमी त्रास देणारा, अडीअडचणीला किमान संपर्कात असणारा उमेदवार हवा अशी मतदार, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा चव्हाण यांनी अंमलात आणली असे दिसते. ६) कोणत्याही प्रस्थापिताला पराभूत करायचे असेल तर समोर समर्थ पर्याय आहे का? ज्याला निवडून द्यायचे तो आपल्या काही समस्या सोडवू शकतो का. किमान शांतपणे ऐकून घेऊ शकतो का. वेळोवेळी उपलब्ध होईल का? याचाही विचार मतदार काही प्रमाणात करतात. त्यामुळे प्रस्थापिताविरुद्ध प्रचंड असंतोष धुमसता हवा. तरच त्याला हवा देता येते. प्रस्थापिताचे पक्षांतर्गत विरोधक खरेच किती ताकदीचे आहेत, याचीही खरी, खोलात जाऊन तपासणी करावी लागते. चव्हाण महाविकास आघाडीचे सरकारचे उमेदवार असल्याने बोराळकर समर्थ पर्याय आहेत, असे मतदारांनी वाटले नाही. शिवाय चव्हाण यांच्याविरुद्ध धुमसता असंतोष असल्याचे वातावरण शेवटपर्यंत नव्हते. चव्हाण यांचे पक्षांतर्गत विरोधक फारसे शक्तीमान नाहीत. काहीजणांनी फसवी आश्वासने दिली होती, हे आतातरी बोराळकरांच्या लक्षात आले असावे, अशी अपेक्षा आहे.

गणित चुकलेला विद्यार्थी

गणित चुकलेल्या विद्यार्थ्याने छडी खाण्यासाठी डोळे मिटून हात पुढे करावा तसा मी उभा आहे या प्रख्यात कवी दासू वैद्य यांच्या कवितेतील ओळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पराभूत झालेले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि भाजप नेतृत्वाला लागू होण्यासारख्या आहेत २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही चव्हाण यांनी बोराळकरांवर सहज मात केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले होते. तेव्हा प्रचाराला वेळ मिळाला नाही. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात बूथनिहाय यंत्रणा उभी राहिली नाही, असा बोराळकरांचे म्हणणे होते. तेच सत्य मानून यंदाही त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तेथेच देवेंद्र फडणवीस यांचा पहिला डाव चुकला. कारण २०१४ ते २०२० या सहा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले होते. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासारखी बलाढ्य शिक्षण संस्था ताब्यात आलेल्या चव्हाण यांचे बस्तान आणखी पक्के झाले होते. पदवीधरमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या मतदार नोंदणीत त्यांनी वैयक्तिक लक्ष घालत हक्काचे सुमारे दीड लाख मतदान नोंदवून घेतले. पक्षात उमेदवारीसाठी एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. विजयाच्या इमारतीचा पाया मजूबत करत एक-एक वीट नीटपणे रचत नेली. तर बोराळकरांनी केलेली नोंदणी चव्हाणांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती. दुसरीकडे सहा वर्षांत प्रवीण घुगेंनी केलेल्या तयारीकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे घुगे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे कमालीच्या दुखावल्या. तीन दशकांपासून संघ सेवेत असलेले घुगे आपल्याला उमेदवारी मिळणार असे गृहित धरून तयारीला लागले होते. त्यांनी स्वत:ची नोंदणी, स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभी केली. अगदी बंडखोरीपर्यंत ते पोहोचले. पंकजा यांनी समजूत घातल्यावर माघार घेत ते प्रचारात सहभागी झाले. पण या साऱ्यातून मुंडे समर्थकांना जो संदेश जायचा तो गेलाच. भाजपला डॅमेज कंट्रोल जमले नाही. आणि ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..! अशी प्रख्यात कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे भाजप, बोराळकरांची अवस्था झाली.

Sunday 15 November 2020

गुढतेचा अलंकार

मानवी मनाला कायम गुढतेचे आकर्षण राहिले आहे. एखाद्या काळ्यामिट्ट गुहेत कोणी ध्यानस्थ साधू आहे का. जीर्णशीर्ण वस्त्रात गुंडाळलेल्या भल्यामोठ्या लाकडी पेटीत मृतदेह आहे का असा प्रश्न अनेकांना असतो भेसूर चेहऱ्याच्या माणसाचं जगणं कसं असावं हेही जाणून घ्यायचे असते हे सर्वांना मान्य असलेले सत्य तरीही मराठीच काय एकूणच सर्व भाषिक साहित्य विश्वात गुढ मांडणी गुढ कथानकाला अतिशय कमी स्थान मिळाले आहे विनोदाप्रमाणे गुढता हाही मुख्य प्रवाहच नाही या प्रांतातील अस्सल निर्मितीसाठी फार काही करावे लागत नाही गुढ कथानकाने समाजमन ढवळून निघत नाही अशी मराठी साहित्यिकांची पक्की धारणा झाली आहे वस्तुत: असे काही लिहिण्यासाठी खूप एकांतप्रिय नाविन्य शोधणारी सृजनता लागते. मराठी साहित्य विश्वावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनात ती जागोजागी दिसते. पण त्यांच्यानंतर तेवढ्या ताकदीचा लेखक झाला नाही. जीवनाचे एक वेगळेच दर्शन घडवणारी गुढ कथा, कादंबरी नजरेत आली नव्हती. रसिकांमध्ये खूप चर्चेत नव्हती. जणू काही गुढतेचा प्रवाहच एखाद्या काळ्याकुट् खोल दरीत गडप झाला की काय असे वाटत होते. पण असे म्हणतात ना की जगात काहीच कायमस्वरूपी संपत नाही. ते कालांतराने रुप पालटून कमी अधिक प्रमाणात प्रकट होतच असते तसेच काहीसे मूळ कवीचा पिंड असलेल्या संतोष विठ्ठल घसिंग यांच्या ‘विधाराद्रोण’ कादंबरीतून लक्षात येते. वाचकांना अद्भुत, थरारक, रोमांचकारी दुनियेत घेऊन जाणारी गुढमय संपन्न अलंकार धारण केलेली ही कलाकृती आहे. विशेष म्हणजे ती आशय मांडणीतही चमकदार आहे. जेष्ठ कवी, कादंबरीकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख विधाराद्रोण आणि घसिंग यांच्याविषयी सांगतात ते मनाला पटते. विधाराद्रोण म्हणजे नंदन शिकाऱ्याची कथा तशी अगदी साधी पण प्रचंड गुंतागुंतीची. वाघाची शिकार करायला बाहेर पडलेला नंदन जे काही या प्रवासात भोगत जातो ती म्हणजे मानवी जीवनाची अंधारगुह जाणिवा गोठून जाव्यात असा हा प्रवास एका अकल्पित जगातून जाणारा. एखाद्या गूढकथेतला हा गहनगूढ प्रवास आपल्या आकलनाची कुवत जोखणारा. अतिशय अनघड भाषा खूपदा मनाचे तुकडे करणारी. एक वेगळे प्रतिमाविश्व अनाकलनीय आणि संमोहक. उदाहरणार्थ आयुष्य फुलावरल्या दवाप्रमाणे क्षणभंगुर दुर्दम्य इच्छाशक्तीची इंद्रज्योत. असंख्य प्रतिमा. संपूर्ण कादंबरी या प्रतिमांनी लखकून जाते. कधी व्याकुळ होते. कधी मरणप्राय वेदना सोसत पुढे सरकते. घसिंग यांनी ही रचना एक कथा दुसरी कथा कथेतील कथा बाहेरची कथ अशी केली आहे. या सर्वांना जोडून येणारा व्यापक पट वेगवेगळ्या जंगलातुन गुहांमधून जाणारा जसे की कनकेश्वर मंदिराचे यातले वर्णन मुळातून वाचावे असे आहे. जितसामा, बुधलीबाई, रक्त वृक्ष, पुतळाबाई, नगरवधू अशी कितीतरी पात्रे घसिंग यांनी निर्माण केली आहेत. ती या कादंबरीत आपापले गूढ विश्व घेऊन भेटतात. हे सगळे वाचतांना मनाला सुन्न करणारी भोवळ येते. वाचताना कधीकधी ओठ कोरडे पडतात. एक विचित्र विश्व आपल्या भोवती फेर धरू लागते.पण विधाराद्रोण केवळ काहीतरी अगम्य रंजक दुनियेच्या वर्णनापुरती मर्यादित राहत नाही. तर ती आपल्याला हळूहळू मानवी जीवनाच्या गाभाऱ्याकडे नेऊ लागते. त्यावेळेसचा प्रवास आपल्याला गुंतवून ठेवतही भानावर आणत जातो. तेथे या कादंबरीची भाषा हा एक अलौकिक ठेवा असल्याचे ठळकपणे जाणवते. डॉ. गणेश मोहिते म्हणतात त्याप्रमाणे, मानवी मनाचा तळपरीघ मोह, माया, मत्सर, इच्छा - आकांक्षा, असुया, भावना, वासना यातील द्‌वंद्वाने व्याप्त आहे. त्यातून मानवी मन व्यामिश्र अनाकलनीय बनले आहे. कोऽहम... मी कोण हा अनंत काळापासून अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. त्यच्या उत्तरासाठी तर असंख्य विद्वानांनी अगाध तत्वज्ञान प्रसवले आहे. साहित्यिक, लेखक, नाटककारांनी लेखणी चालवली. मन अन् वर्तन नियमन करणारे न्याय नीति धर्मतत्वे आकाराला आली. मानवाच्या जीवनविषयक धारणांची जडणघडण करुन विशिष्ट विचारव्यूह आखण्याचे सर्वोतोपरी प्रयत्नही झाले. जीवनानुभूतींची संगती व नेणीवेतील विचारकलहाचा अन्वयार्थ लावून अनंत संज्ञा सिद्धांत जन्माला आले. तरीही माणसाचा स्वत्व शोधाचा प्रवास कधी थांबला नाही, असे विधाराद्रोण मांडते. त्या सोबत ही कादंबरी असेही सांगते की, संवेदनांचा भाषिक आविष्कार नेहमी नवे तत्वज्ञान, सिद्धांतांना जन्म देणारा असतो. त्याची कालपरत्वे निकड अधिक असते. काळ कोणताही असो आभासी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अविरत धडपड करण्यात मश्गुल राहून आनंदी असण्याचा सार्वत्रिक भ्रम पैदा करणे हा मानव जातीचा अट्टाहास आहे.मात्र खरे असे की तत्वतः मानवाला जगण्यासाठी ज्ञानापेक्षा आनंद अधिक उपयुक्त असतो. त्याकरिता निसर्गतः जगण्याचा अर्थ आणि अर्थातील 
'आनंद' कळायला हवा. असे त्यंतिक मौलिक जीवनभाष्य करणारी कलाकृती म्हणून संतोष विठ्ठल घसिंग यांची 'विधाराद्रोण' ही कादंबरी अद्वितीय ठरते. चार वेगवेगळ्या गुढ रुपकथांच्या माध्यमातून ही कादंबरी मानवी वर्तनाचे परिनियम आणि जीवनाचे सारसूत्र सांगते. मौखिक कथन परंपरेचा घाट स्वीकारुन निवेदक मानवी अस्तित्व शोधाच्या कल्पित परंतु तितक्याच जिवंत कहाण्या प्रसवतो. नायकाचा  आत्मसंवाद घडवून आणण्यात लेखक कमालीचा यशस्वी होतो. स्वःशोधाचा आत्मस्वर सापडल्याचा अतर्क्य आनंद कलाकृती वाचकांना देते. कथन वगळता कादंबरी रुपदृष्ट्या ठळक न होताही आशयातील तात्विक  जीवनभाष्याला अनुलक्षून आलेले भाषासौंदर्य वाचकांना नवं जीवनानूभुती प्रदान करणारे आहे. एखादे चित्र डोळ्यासमोर उभी करणारी अचूक प्रतिमा उभी करणे किंवा डोके लख्ख करणारी उपमा देणे हे जीए कुलकर्णी यांचे विलक्षण कसब होते. त्याच प्रकारचा अनुभव काही ठिकाणी विधाराद्रोणमध्येही येतो. प्रेरणा पाचपुते यांचे मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाला अचूकतेने पकडणारे आणि नजरेला ताण देणारे आहे. एकूणात मानवी जीवन मूल्ये आणि मनाच्या परिघांमध्ये कायम सुरू असलेली असंख्य आंदोलने यांचा एक वेगळा पट कसा असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी विधाराद्रोण नक्की उपयुक्त ठरेल.
 
-   
 

Friday 21 August 2020

सगळेच अनैतिक ...

तीन दिवसांपासून दुकान बंद. गेल्या दहा वर्षांत तर असे कधीच झाले नाही. रितेशने मोबाईलवर कॉल केला. तर स्वीच ऑफ. त्याचा धीर सुटला. त्याने पलिकडच्या हरदीपला दुकानावर बोलावून घेतलं. दोघांनी बराच विचार केला. आणि घाबरत घाबरतच इन्सपेक्टर बुधवंतांसमोर जाऊन बसले. आम्ही दोघे वंडर आर्केडमधील दुकानदार आहोत. दोघांची मोबाईल, स्पेअर पार्ट विक्री आणि दुरुस्तीची छोटी दुकाने आहेत. दोघांच्या मध्ये कापडाचं दुकान आहे. त्याचा मालक सदानंद आमचा मित्र. दहा वर्षांपासून आमची दुकाने बाजूबाजूला. गेल्या तीन दिवसांपासून त्याचं दुकान बंद, मोबाईल स्वीच ऑफ आहे. एका दमात रितेशनं सांगून टाकलं. इन्सपेक्टर बुधवंतांनी तक्रार नोंदवून घेतली. मग हवालदार मसलेंना ‘वंडर आर्केडकडे चक्कर मारा. तिथं सीसीटीव्ही आहेत का पहा. सदानंदचं घर शोधा. खबऱ्यांना कळवा.’ अशा सूचना केल्या. रात्री नऊच्या सुमारास ते ठाण्यात परतले. तेव्हा महत्वाचा पण दुर्देवी क्ल्यू हाती लागला होता. पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक प्रेत सापडलं होतं. ते बहुधा सदानंदचं असावं, असा हवालदार मसलेंचा अंदाज होता. त्यांनी दिवसभरात बरीच माहिती गोळा करून आणली होती.

त्या भागातील सर्वोत्तम कापड दुकानदार अशी कधी स्पर्धा झाली असती तर सदानंद शंभरजणांमध्ये पहिल्या पाचात नक्की आला असता. निवृत्त शिक्षक-शिक्षिकेचा तो एकुलता एक मुलगा होता. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने नोकरी करायची नाही. काका म्हणजे लक्ष्मणसारखा कापडाचा व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. म्हणून मोठी धडपड करून एका टपरीत दुकान सुरू केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं महिलांसाठी खास कापड तयार होत होते. ते सदानंद आणायचा. गरज पडली तर घरपोच कपडे पोहोचवायचा. बोलण्यात अत्यंत मिठ्ठास आणि न कंटाळता पाठपुरावा, ही त्याला मिळालेली देणगी होती. कितीही तापदायक ग्राहक असेल तरी तो कापड खरेदी करायला लावायचाच. तेही चढ्या भावाने. त्यामुळे तो झपाट्याने लोकप्रिय तर झालाच शिवाय पैसाही कमावू लागला. मग टपरीत माल ठेवणं त्याला शक्य होईना. म्हणून त्याने वंडर आर्केडमध्ये चांगला मोठा गाळा घेतला. बचतीचे वीस लाख रुपये टाकले. फर्निचर तयार केले. आपण कधी माल खरेदीसाठी बाहेरगावी गेलो तर दुकान चालवण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून चुणचुणीत दीपाची नियुक्ती केली. एकीकडे कॉलेजमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दीपाचे कापड विक्री व्यवसायात स्वारस्य वाढले होते. त्यामुळे सदानंद तिच्यावर जास्त विसंबून राहू लागला होता. त्याला घरची फार जबाबदारी नव्हती. आई-वडिलांसाठी दरमहा वीस हजार रुपये पाठवलं की तो मोकळा होत होता. त्यांचीही त्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दर महिन्याला पैसे पाठवण्यापेक्षा सुनबाईचं मुख पाहू दे, असा धोशा त्यांनी लावला होता. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोराचा संसार लवकरात लवकर मार्गी लागावा, असा ते निकराचा प्रयत्न करत होते. नातेवाईकांमध्ये चांगली मुलगी शोधत होते. पण बहुतेक मुली विवाह होऊन सुखानं नांदत होत्या. चाळिशीच्या सदानंदसाठी पस्तिशीची पोरगी कुठून मिळेल, या नातेवाईकांच्या प्रश्नावर निरुत्तर होत होते. पण सदानंदला त्याची चिंता नसावी. तो फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागला होता. शहरातील प्रख्यात कपडा व्यापारी प्रतिभाराणीसोबतचे संबंध सध्या पुरेसे आहेत, असे त्याला वाटत होते. पाच-सात वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त त्याची प्रतिभासोबत भेट झाली. पतीचे अपघाती निधन झाल्याने त्यांनी दुकान सांभाळणे सुरू केले होते. पन्नाशीच्या जवळपास असलेल्या प्रतिभा दिसायला अत्यंत मादक, आकर्षक. काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे अल्पावधीतच त्या लखपती झाल्या. एकाची तीन दुकाने झाली. त्यातले एक त्यांनी पहिला सावत्र मुलगा प्रवीण आणि दुसरे प्रीतेशच्या नावावर करून दिले. तर तिसरे स्वत:कडे ठेवले. सदानंद एवढेच वय असलेल्या प्रवीण, प्रीतेशला सावत्र आईचे म्हणजे प्रतिभाचे सदानंदसोबतचे संबंध खटकत होते. पण प्रतिभा केवळ सदानंदवर अवलंबून नव्हती. दोन वर्षांपूर्वी तिचा नाट्यगृह मालक तनसुखसोबत याराना वाढला होता. आणि हा तनसुख सदानंद नसताना दुकानावर येऊन दीपाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. प्रवीण, प्रीतेशही दीपाच्या मागे हात धुऊन लागले होते. एकूणात सगळेच नातेसंबंध अनैतिकतेच्या चक्रात फिरत होते. इन्सपेक्टर बुधवंतांनी सारे कसब पणाला लावले. खुनी कोण, खुनाचा कट कोणी रचला असावा, हे शोधले.  

नातं... फिल्म फेस्टिव्हलचे

 प्रत्येक कलेची एक जागतिक भाषा असते. ती कोणत्याही अडथळ्याविना रसिकांपर्यंत पोहोचतेच. म्हणजे एखाद्या भारतीय चित्रकाराने रेखाटलेले एब्सर्ड चित्र किंवा शिल्प असेल, तर त्यात चित्रकार, शिल्पकाराला नेमके काय म्हणायचे आहे, हे अगदी रशियाच्या एखाद्या छोट्या शहरातील शिल्प, चित्रप्रेमीला कळते. सिनेमा तर सर्व कलांतील अत्यंत प्रभावी, तीक्ष्ण, टोकदार माध्यम. इजिप्शिअन दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे. कोणता संदेश द्यायचा आहे, हे नाशिक, सोलापूरच्या सिनेमाप्रेमीला लक्षात येते. अगदी हृदयापर्यंत भिडू शकते. त्यातील बारकाव्यांमध्ये तो गुंग होऊन जातो. सिनेमातील कलावंत, पटकथा लेखक, दिग्दर्शकाची रसिकांना जोडणारी भाषा, नाते तयार होते. पण, ही जोडणी केवळ तिथपर्यंत थांबत नाही, तर सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांमध्येही एक नाते तयार होते. त्याचा अनुभव औरंगाबादेत सात-आठ वर्षे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या निलेश राऊत, सुबोध जाधव आणि प्रख्यात दिग्दर्शक शिव कदम यांना आला. झाले असे की, त्यांच्याकडे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, केरळचे  (एफएफएसआय) एक ऑनलाइन निमंत्रण आले. तेथे २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या सिनेमांचा ऑनलाइन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो पाहण्याची संधी जगभरातील रसिकांना उपलब्ध होणार आहे. त्यात औरंगाबादकर रसिकांनीही सामील व्हावे, अशी निमंत्रणामागची भावना. 

हे कसे काय घडले? त्याबाबत कदम यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाथ फाऊंडेशनच्या सहकार्याने औरंगाबादेत होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलची लोकप्रियता वर्षागणिक वाढत गेली. दर्जेदार सिनेमांच्या देखण्या आयोजनामुळे देशभरातील मान्यवर महोत्सवाला हजेरी लावू लागले. एफएफएसआयचे व्ही. के. जोसेफ त्यापैकी एक. 

औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन पाहून ते भारावून गेले. त्यांनी जेव्हा सत्यजित रे यांच्या सिनेमांचा फेस्टिव्हल आयोजित करण्याचे ठरवले, तेव्हा औरंगाबादकरांना आवर्जून निमंत्रण दिले. कदम यांनी आणखी जे सांगितले ते अधिक महत्त्वाचे. ते म्हणजे, दर्जेदार सिनेमे आणि देखणे आयोजन तर जोसेफ यांना भावलेच. पण त्यापेक्षाही त्यांना औरंगाबादच्या रसिकांचे विलक्षण कौतुक वाटले. ‘जगभरातील सिनेमांना तुमचे लोक गर्दी करतात, सिनेमात नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी धडपडतात, हे मला खूपच वेगळे वाटले’, अशी नोंद करत जोसेफ यांनी निमंत्रण धाडले. कदम यांच्या मते हे केवळ औरंगाबादकरांचेच नव्हे, तर तमाम मराठी रसिकांचे कौतुक आहे. ‘एफएफएसआय’च्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर या महोत्सवाचा आनंद घेता येईल. पथेर पांचाली, गणशत्रू, जलसागर, चारुलता, तीन कन्या, आरण्येर दिन रात्री, आगुंतक हे सिनेमे पाहण्यास मिळणार आहेत. आधी मल्याळी सिनेजगतातील मान्यवर षण्मुखदास, के. रामचंद्रन, मीना टी. पिल्लई, डॉ. जी. आर. संतोषकुमार, व्ही. एस. बिंदू, अनु पाप्पाचन, टी. के. उमेर सिनेमाची सूत्रे उलगडून सांगतील आणि मग तो रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. 

सिनेमानंतर अर्थातच ऑनलाइन संवादही होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘एफएफएसआय’ने रे यांच्या सर्व सिनेमांच्या निगेटिव्हजचे डिजिटाझेशन करून घेतले. त्यामुळे ते अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतील. सिनेमा ही खरे तर सिनेगृहातच, गर्दीत पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट. कोरोना संकटाने ती हिरावून घेतली असली, तरी त्यावर मात करण्याचा एक मार्ग सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झुंजणाऱ्यांनी शोधून काढला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.

Friday 14 August 2020

पत्थरात विचारांचे प्राण...

‘स्वर, शिल्प आणि रंग या साऱ्यांमधून उत्कट परिणाम साधणं हाच कलेचा हेतू. शिल्पकारांत ऑग्युस्त रोदँ हे त्या अर्थाने इंप्रेशनिस्ट आहेत’ असे नोबेल विजेत्या आन्द्रे जीद यांनी म्हटलं होतं. ते ज्या रोदँबद्दल सांगत होते. त्याचा साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी युरोपीय खंडात प्रचंड बोलबाला होता. त्याच्या गेटस ऑफ हेल, द थिंकर, द किस, द थ्री शेडस्, एज ऑफ ब्रांझ या गाजलेल्या शिल्पाकृती आजही त्याची साक्ष देत आहेत. पत्थराला आपल्या मनासारखे वळवून त्यात भावना ओतण्याचे अजब कौशल्य रोदँमध्ये उपजतच होते. हेच कौशल्य तरुण मराठी शिल्पकार सुनिल काशिनाथ देवरे यांच्यामध्येही आले आहे, असे त्यांच्या कलाकृती पाहून वाटते. ते सध्या मीरा – भाईंदर महापालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करत आहेत. वीस फूट उंचीच्या चबुतऱ्यावर तीस फूट उंचीचा हा पुतळा निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने देवरे यांच्या इतर शिल्पांचे दर्शन झाले. तेव्हा मन थक्क होऊन गेले. एवढ्या उंचीचा तरुण शिल्पकार मराठी मातीत रुजला, फुलला याचा मनस्वी अभिमान वाटला. 

मुळ धुळ्याचे असलेले सुनिल यांचे वडिल पुरातत्व विभागात संवर्धन अधिकारीपदावर होते. वडिलांचे बोट धरून त्यांनी लहानपणी शेकडो वेळा वेरुळ लेणी पाहिली. आपण मोठेपणी शिल्पकारच व्हायचे, असे त्यांनी ठरवले. 1992 मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, अमेरिकेत, तुर्कस्थानात त्यांच्या कलाकृती आहेत. त्यांची हंटर, बोटमॅन, लायन, लँडींग बर्ड आदी शिल्पे रोदँची आठवण करून देतात. त्यांच्या बोटातून घडलेली वेरुळ – अजिंठ्याची प्रतिकृती त्यांनी भारतीयत्वाची नाळ किती पक्की धरून ठेवली आहे हे लक्षात आणून देतात. 

तसं पाहिलं तर भारतात फार पूर्वीपासून या अतिशय कठीण कलेची पाळेमुळे रुजली आहेत. अजिंठा-वेरुळ आणि ठिकठिकाणच्या लेणी त्याची साक्ष देतात. पण दुर्दैवाने या लेण्यांमधील कला पुढे अपेक्षेप्रमाणे फुलली, रुजली नाही. मधली अनेक वर्षे शिल्पकलेला गांभीर्याने पाहिले गेले नाही. राजा-महाराजांचे पुतळे एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहिली. ब्रिटीशांच्या अमदानीत दगडांमधून भावना व्यक्त करण्याला थोडी चालना मिळाली. आणि अलिकडील काळात या कलेकडे तरुणाईचा ओढा किंचित वाढल्याचे दिसते. तरीही चित्रकारांच्या तुलनेत शिल्पकारांची संख्या कमीच. देवरे याचे उत्तर देताना सांगतात की, ‘प्रदीर्घ साधना हे तर कोणत्याही कलेच्या यशाचे गमक आहे. पण चित्र, संगीत, गायन, वादनाच्या तुलनेत शिल्पकलेत यश खूप उशिरा मिळते. कारण कोणतेही शिल्प तयार होण्यासाठी कित्येक महिने लागतात. नेमके काय सांगायचे आहे, हे ठऱवून चित्र रेखाटावे लागते. मग मातीत तयार करावे लागते. मग त्याचा लाकडी साचा तयार करावा लागतो आणि शेवटी दगडाचे रुप बदलावे लागते. त्यात प्राण फुंकावे लागतात. तरच ते चहुबाजूंनी जिवंत होते. दुसरे म्हणजे शिल्पकाराला नाभिक, चित्रकार, फॅशन डिझायनर, प्रकाश योजनाकार, सुतार अशा सर्व कलांमध्ये पारंगत व्हावे लागते. एवढा वेळ देणारे बोटावर मोजता येतील एवढेच लोक आहेत. पण असेही आहे की, ग्रामीण भागामध्ये उत्तम शिल्पकार, मूर्तीकार आहेत. त्यांना किमान प्रशिक्षणाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात शिल्पकलेचा विभाग सुरू केला तर जागतिक कीर्तीच्या कलाकृती पाहण्यास मिळतील.’ देवरे म्हणाले ते खरंच आहे. शेवटी समाजाची प्रगती केवळ कारखाने आणि मोठे रस्ते यावरच ठरत नाही. तर कलेच्या प्रांतात जगासाठी काय नवे निर्माण केले याचीही मोजदाद होत असते. होय नाॽ

भरधाव ट्रक कोणाचा...

एक तरुण आपल्या पत्नीसोबत शहराबाहेर फेरफटका मारण्यासाठी जातो. संध्याकाळची वेळ असली तरी थ्रिल अनुभवण्याच्या नादात थोड्या निर्जन रस्त्यावर चारचाकी नेतो. काही वेळाने त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर होते. तो तरुण चाक बदलण्यासाठी गाडीबाहेर पडतो. चाक बदलू लागतो आणि अचानक मागून भरधाव आलेला ट्रक त्याला चेंडूसारखे उडवतो. तरुण जागीच ठार होतो. हे दृश्य पाहून त्याची पत्नी, घटनेची एकमेव साक्षीदार बेशुद्ध पडते. दोन तासानंतर शुद्धीवर येते. तिला ट्रकचा नंबर, वर्णन आठवत नाहीतसं पाहिलं तर हा अपघातच. पण नेहमी शहराजवळच्या तलावाकडे भटकण्यासाठी जाणारे हे जोडपे नेमके त्या दिवशी निर्जन रस्त्यावर का गेले असावे? नेमके चाक कसे पंक्चर झाले. फारशी वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावर त्याचवेळी वेगात ट्रक कसा आला, असे प्रश्न इन्सपेक्टर महावीर यांना पडले. त्यांनी पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केलीसुदीप आणि अनामिका हसतमुख जोडपे. सुदीप एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता तर अनामिका एका प्रयोगशाळेत संशोधक होती. दीड वर्षांपूर्वीच त्यांच्या घरच्यांनी रितसर पाहण्याचा कार्यक्रम करून त्यांना विवाह बंधनात बांधले होते. सुरुवातीच्या काही महिन्यात एकमेकांना समजून घेण्यात थोडी अडचण झाल्याने त्यांच्यात दोघांपैकी कोण हुशार या मुद्यावरून वादावादी झाली होती. अगदी एकदा अनामिका संतापून माहेरीही गेली होती. पण त्यानंतर सारे सुरळित झाले, असे त्यांच्या आईवडिलांनी सांगितले. मग पोलिसांनी इतर दुवे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले की, कोचिंग क्लासमध्ये सुदीप अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या मार्गदर्शनात चार विद्यार्थ्यांनी सलग चार वर्षे राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे क्लासेसचे संचालक तातेडसर त्याच्यावर प्रचंड खुश होते. त्यांनी त्याचे वेतन दहा हजारांनी वाढवले होते. पण त्यामुळे त्याचे सहकारी नितीन, देवीदास त्याच्यावर खार खाऊन होते. शिक्षकांच्या मिटिंगमध्ये ते त्याचा पाणउतारा करण्याची संधी सोडत नव्हते. त्याचे कायमचे ‘कल्याण’ झाले पाहिजे, असे ते एकमेकांशी बोलताना म्हणत. पण नितीन आणि देवीदास यांच्यापेक्षाही जास्त राग तातेडसरांच्या चुलत बहिणीची मुलगी मानसीचा होता. त्या मागे कारणही तसे होते. सुदीप नोकरीस लागला. तेव्हा मानसी आणि त्याची चांगली अगदी घट्ट मैत्री झाली होती. तातेड यांना मूलबाळ नव्हते. ते मानसीलाच मुलगी मानत. क्लासच्या पैशांचा सगळा व्यवहार तीच बघत होती. पुढे चालून क्लासवर आपलीच मालकी होईल. त्यावेळी आपण दोघे मिळून हा व्यवसाय करू. राज्यातील प्रत्येक शहरात तातेड क्लासेसची शाखा असेल, असे तिचे म्हणणे होते. सुदीपला त्यात फारसे स्वारस्य नव्हते. पण सरांची मानसकन्या म्हणून तो तिला फारसा विरोध दर्शवत नसे. त्याने अनामिकासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मानसीचे भावविश्वच कोलमडून पडले. तिने भरपूर त्रागा केला. अनामिकाची भेट घेऊन तिला सुदीपसोबतचे तिचे काही फोटो दाखवावेत, असा विचारही तिने केला. पण फोटोमध्ये मैत्रीपलिकडचे काही दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर शांत राहण्याचे ठरवले. इन्सपेक्टर महावीर आणखी खोलात शिरले. तेव्हा त्यांना एक आणखी धक्का बसला. क्लासेसमधील शिक्षिका मौसमीसोबत सुदीपचे जवळिकीचे संबंध होते. अगदी पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतची त्यांची तयारी होती. पण मौसमीचा नवरा प्रकाशला याची कुणकुण लागताच त्याने सुदीपच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर त्याने एकतर्फी संबंध संपवून टाकले होते. पण मौसमींनी सुदीपचा पाठलाग सोडला नव्हता. लग्नानंतर सुदीप – अनामिकामध्ये हुशारीवरून झालेल्या वादाचे एक कारण अनामिकाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या हितेंद्रही होता. त्या दोघांचे लग्नाआधीपासूनच प्रेम प्रकरण असल्याचा सुदीपला संशय होता. त्यातच प्रयोगशाळेचे मालक कनोजिया आणि अनामिकाचे मोबाईलवर चॅटिंग त्याला खटकत होते. त्याचा जाब विचारण्यासाठी तो प्रयोगशाळेवर गेला. तेव्हा कनोजियांनी त्याला अक्षरश: हाकलून दिले होते. या गुंतागुंतीच्या प्रकरणातील सर्वांचे महावीर यांनी जाबजबाब नोंदवले. मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासले. घटनास्थळाची कसून पाहणी केली. खबऱ्यांना अलर्ट केले आणि खुनी शोधला.



Thursday 6 August 2020

पहिला प्रवेश : रंगभूमीवर

खरंतर कोणत्याही एका कलेची दुसरीशी तुलना होऊच शकत नाही. पण नृत्य, नाट्य, चित्र, संगीत, शिल्प अशा सर्व कलांचा संगम नाट्यकलेत होतो. म्हणून मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये नाटकवाल्यांचा विशेष दबदबा असतो. त्यामुळेच की काय अलिकडील काळात हजारो तरुणांना नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत आहेत. पण एकीकडे अभियंता, डॉक्टर, संगणक तज्ज्ञ होण्याची इच्छा. दुसरीकडे नाटकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण कसे घ्यावे, असा पेच त्यांच्यासमोर होता. नव्या शैक्षणिक धोरणाने तो सोडवला आहे. एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रमाला त्यांना प्रवेश मिळू शकेल, अशी व्यवस्था निर्माण होत आहे. म्हणजे आयआयटी होताना नाट्यकलेचा विद्यार्थी होता येईल.

दिल्लीच्या एनएसडी म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९७० नंतर प्रवेशासाठी मारामार होती. पण तेथे बोटावर मोजण्याइतक्याच जागा असायच्या. त्यामुळे तत्कालिन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी १९७७-७८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका खोलीत नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. एकापाठोपाठ एक नाट्य महोत्सव गाजू लागले. आणि काही वर्षांतच नाट्यशास्त्र विभाग एका खोलीतून स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाला.

प्रा. सोनटक्के यांच्यानंतर विभागप्रमुख झालेले वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण

देशपांडे यांनी विभागाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. पण केवळ प्रा. देशपांडेच विभागाचे शक्तीस्थान नव्हते. तर त्यांच्याबरोबरीने किंबहुना काकणभर सरस

प्रतिभावान मंडळी प्राध्यापकपदी होती. त्यातील एक होते प्रा. कुमार देशमुख. त्यांनी

दिग्दर्शित केलेल्या ‘स्मारक’ नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास निर्माण केला होता. आवाजावर प्रचंड हुकुमत असलेले प्रा. देशमुख अतिशय कठोरपणे नाटकाच्या तालमी घेत. दुसरे होते प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब. लोककलांचे गाढे अभ्यासक, हजरजबाबी असलेल्या अचलखांबही मुलांना घडवण्यात वाकबगार होते. प्रा. डॉ. अलोक चौधरी म्हणजे उत्तम अभिनेते आणि प्रकाशयोजनेचे बादशाह. इंग्लंडमध्ये नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतलेले प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर अत्यंत कुशल दिग्दर्शक होते. एकेका प्रसंगाच्या सलग दहा-पंधरा तालमी घेऊन ते कलावंतांना भूमिकेत समरस होण्यास भाग पाडत. या चौघांसोबत होते प्रा. प्रताप कोचुरे. संगिताचे अत्यंत उत्तम ज्ञान असलेले प्रा. कोचुरे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियही होते. या सर्वांमुळे नाट्यशास्त्र विभागाच्या यशाची कमान चढत गेली. जिथे दोन

विद्यार्थी मिळवणे मुश्किल होते. तिथे एका जागेसाठी सहा अर्ज येऊ लागले. १९९० च्या दशकात विभागाचे एकांकिका, वार्षिक नाट्य महोत्सव म्हणजे धमाल होती. वर्षभर तालमींचा राबता होता. वर्षा उसगावकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, प्रतिक्षा लोणकर, नंदू काळे, नंदू भुरे, संजय भुरे आणि अनेकजण अशाच महोत्सवातून तयार झाले. आजही प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. अशोक बंडगर आणि त्यांचे सहकारी धूमधडाक्यात महोत्सवांचे आयोजन करतात. त्यात अनेक सरस संहितांचे सादरीकरण होत आहे. नव्या युगाची पावले ओळखून तांत्रिक बाबींचेही धडे गिरवून घेतले जात आहेत. कित्येक विद्यार्थ्यांचा टीव्ही, सिनेमा, रंगभूमीवरील प्रवेश तरुण प्राध्यापक मंडळी सुकर करत आहेत.

पण सध्या रंगभूमी, सिनेमा गाजवत असलेल्यांना नाट्यशास्त्र विभागात प्रवेश कसा मिळाला. तर त्यासाठी विभागात जून-जुलै महिन्यात एक परीक्षा असे. म्हणजे प्रा. देशपांडे किंवा अन्य प्राध्यापक मंडळी एका वर्गात बसत. एकेका मुला-मुलीला बोलावून दहा-पंधरा मिनिटांचा सलग संवाद, प्रसंग उभा करण्यास सांगत. नाटक ही जिवंत कला. त्यामुळे थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची कलावंतांची क्षमता आहे की नाही, हे तपासले जात असे. नंतर नाट्यक्षेत्रातील तत्कालिन घटना-घडामोडींविषयी काही तिरकस, गुगली प्रश्नही विचारत. अशा दोन-तीन फेऱ्या

झाल्यावर गुणवंतांची यादी जाहीर होई. गेल्या वर्षापर्यंत हीच पद्धत होती. पण आता कोरोनामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाईन होत आहेत. त्याचनुसार कलावंतांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ मागवून त्यांची निवड करावी लागू शकते. आजकालच्या युगात कॅमेरा हेच महत्वाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरातही काही गैर नाही. पण ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचे आहे. त्यांच्या नजरेला नजर भिडवत किंवा त्यांच्या नजरेसमोर कठोर परीक्षेची मौज काही न्यारीच. कलावंत म्हणून घडण्याची ती पहिली पायरी. त्यावर यंदा नाही तर पुढील वर्षी तरी नवख्या कलावंतांना उभे राहण्यास मिळाले तर त्यांचाच जास्त फायदा.

 


तो अडकत गेेला...

एकाच वेळी सहा जणांवर संशय. कारण प्रत्येकाचा त्याच्याशी खटका उडालेला. पण त्यामुळे थेट जीव घेण्यापर्यंत हे सहाजण जातील का, असा विचार वारंवार इन्सपेक्टर खडस यांच्या डोक्यात घोळत होता. मग त्यांनी पुन्हा एकदा सर्व घटना आणि संशयितांची माहिती कसून गोळा करणे सुरू केले. आणि आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट झाले. आरोपी गजाआड झाले.

मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत, विशेषत: व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाची सुरुवात सात-आठ वर्षांपूर्वी झाली. नजिकच्या गावातून रोजगारासाठी आलेला नंदन पाच भावांमधे सर्वात धाकटा. त्याच्या मित्राच्या मामाचे झेरॉक्स सेंटर होते. तेथे कामाला लागला. दिवसाचे जेमतेम शंभर रुपये मिळत. वर्षभर नोकरी करताना झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी यंत्राच्या सगळ्या बाबी त्याला कळाल्या. कारण कधी यंत्र बिघडले तर दुरुस्तीला येणाऱ्या इंजिनिअर सर्वेशसोबत तो लहान मुलासारखा कुतुहलाने असायचा. बाकी शिक्षणात गती नसली तरी झेरॉक्स यंत्राचे बारकावे त्याला आत्मसात झाले. कधी सर्वेशकडे जास्तीचे काम असले तर तो नंदनला यंत्र दुरुस्तीसाठी पाठवायचा

पाहता पाहता वर्षभरातच तो वाकबगार झाला. अगदी सर्वेशच्या बरोबरीने त्याचा व्यवसाय चालू लागला. आता मित्राच्या मामाच्या दुकानावर काम करण्याची गरज नाही, असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने धडपड सुरू केली. दुरुस्ती कामाच्या निमित्ताने ओळख झालेले बँकेचे मॅनेजर हरिवंश यांनी त्याला कर्ज मिळवून दिले. ते घेऊन त्याने मध्यवस्तीत एक छोटासा गाळा घेऊन झेरॉक्स कॉपी काढून देणे, यंत्र दुरुस्ती, इंटरनेट आणि सोबत पुस्तक बांधणीचा व्यवसाय सुरू केला. नशिब असे जोरावर होते की, दोन वर्षातच त्याच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला. आजूबाजूच्या शहरातूनही काम मिळू लागले

ज्या इमारतीत त्याचा छोटासा गाळा होता. तेथील एक अख्खा मजला त्याने खरेदी केला. दहा जणांना रोजगार मिळाला. लक्ष्मी मल्टी सर्व्हिसेसची स्थापना केली. दुसरीकडे सर्वेश बराच मागे पडला. पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात सर्वांसमक्ष वादाचे प्रकार तीन चार वेळा झाले. अखेर दहा-वीस हजार रुपये देऊन त्याने ते मिटवले. आता नंदनला इमारतीच्या वरच्या मजल्यावरचा आणखी एक गाळा हवा होता. त्यासाठी तो गाळा मालक चंदनमल यांना भेटला. तर ते प्रचंड संतापले. मग दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्या भांडणानंतर नंदन कितीतरी दिवस स्वत:वर नाराज होता. दरम्यानच्या काळात आई-वडिल वारले. भाऊ आपापल्या नोकरीत मग्न झाले

अशा स्थितीत त्याच्या आयुष्यात प्रणितानं प्रवेश केला. एका पुस्तकाची झेरॉक्स करण्यासाठी ती आली होती. दिसायला जेमतेम असली तरी तिचं बोलणं अतिशय प्रभावशाली होतं. एका सामाजिक संघटनेत ती काम करत होती. नंदनने तिच्याकडे प्रेमाची कबूली दिली. रेशीमगाठीत बांधले जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिने स्पष्टपणे होकार दिला नाही किंवा नकारही दिला नाही. संघटनेत मला विशिष्ट पदापर्यंत प्रगती करायची आहे. ते पद मिळाले की नक्की विचार करेन, असे ती म्हणाली. नंतर दोघांच्या भेटीगाठी खूपच वाढल्या. मध्यमवर्गीय घरातील प्रणिताला फक्त आई आणि एक भाऊ होता. त्यामुळे लग्नात फारशा अडचणी येणार नाहीत, असा नंदनचा कयास होता. पण तो चुकीचा ठरला. एक दिवस दुपारी तो कामात मग्न असताना प्रणिताच्या संघटनेचा सचिव अरुण पाच-सहा जणांना घेऊन आला. नंदनला वाटले त्यांचे काहीतरी कामच आहे. तर अरुणने त्याला सरळ मारहाण सुरू केली. बऱ्याबोलाने प्रणिताचा नाद सोड. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी देऊन गेला. थोड्यावेळाने स्थिरसावर होऊन त्याने प्रणिताला मोबाईल केला. तर ती खळखळून हसू लागली. माझ्या मागे लागणाऱ्या मुलांना तो असाच मारतो. पण माझे त्याच्यावर प्रेम नाही, असे सांगू लागली. बोलता बोलता तिने आमच्या संघटनेला एक लाख रुपयाची देणगी दिलीस तर अरुण शांत होईल, असे सूचक शब्दांत सांगितले. त्याने चौकशी सुरू केली तर तिच्यासोबत काम करणाऱ्या राकेश, सूरज यांच्याशीही तिचे निकटचे संबंध आहेत. ती त्यांच्यासोबत सहलीला, सिनेमांना जाते, असे कळाले. तो तिच्याबद्दल माहिती गोळा करत असतानाच राकेश, सूरज यांनीही दुकानावर येऊन धुडगूस घातला. जीवे मारण्याची धमकी दिली. यातला सूरज म्हणजे चंदनमल यांच्या पुतण्या आणि सर्वेश म्हणजे अरुणचा मावसभाऊ असल्याचे कळाल्यावर त्याचे डोके भणाणून गेले

प्रणिता, अरुण सारखे एक लाख रुपयांची मागणी करू लागले. यातून मार्ग काढण्यासाठी एकेकाळी आपल्याला मदत करणारे बँक मॅनेजर हरिवंश यांना बोलण्याचे त्याने ठरवले. थोडक्यात प्रकरण त्यांच्या कानावर घातले. त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी बोलावले. पण ती भेट झालीच नाही. सकाळी कामावरील नोकर नंदनच्या फ्लॅटची बेल बराच वेळ वाजवत राहिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दरवाजा तोडला. तेव्हा नंदन मृतावस्थेत होता. डोक्यावर कोणीतरी जोरदार फटका मारल्याने त्याची कवटी फुटली होती.