--
औरंगाबाद म्हणजे पर्यटकांची वर्दळ असलेले शहर. त्यांच्यासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणारच, असा कुणाचा समज होऊ शकतो. पण तो समजापुरताच मर्यादित राहावा, अशी स्थिती पूर्वीही होती आणि आजही आहेच. अर्थात येथे सांस्कृतिक जगतात काहीच घडत नाही, असे नाही. नाटक, नृत्य, शिल्प, चित्र अशा प्रांतात काहीना काही घडत असतेच. पण ते कलावंतांच्या पुढाकाराने होते. येथून मराठी, हिंदी चित्रपट-नाट्य सृष्टीला अनेक लेखक, दिग्दर्शक, कलावंत मिळाले. येथील नर्तकांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वाहवा मिळवली. सुनिल देवरेंची शिल्पकला अमेरिकेसह युरोपातील अनेक शहरांत गाजली. सध्या टीव्ही मालिकांमध्ये औरंगाबादचे कलावंत लोकप्रियता मिळवत आहेत. निरंजन भाकरे, मीरा उमप यांची लोकलला लोकांनी डोक्यावर घेतली. बशर नवाज यांची शायरी देशाच्या हद्दी ओलांडून गेली. हे सगळे कलावंतांनी त्यांच्या बळावर मिळवलेले यश आहे. असे म्हणतात की, कलेला राजाश्रय असला की ती अधिक खुलते. सर्वस्तरातील लोकांमध्ये पोहोचते. आणि त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम सुसंस्कृत समाज घडवण्यात होत असतो. राजाश्रय देण्याचा एक मार्ग म्हणजे किमान मोठ्या शहरांमध्ये दर्जेदार महोत्सवांचे आयोजन करणे. त्यात जागतिक पातळीवरील कलावंतांना आमंत्रित करून त्यांच्यातील ताकदीचा अनुभव रसिकांना करून देणे. आणि अशा महोत्सवांमध्ये स्थानिक प्रतिभावान कलावंतांनाही संधी देणे. महाराष्ट्रातील इतर प्रांतात सरकार कलावंतांना मदत करताना दिसते. त्यांच्यासाठी महोत्सवांचे आयोजन केले जाते. मात्र, पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत असे सातत्यपूर्ण महोत्सव होत नाहीत. त्यामुळे १९८० च्या दशकात सुरू झालेला वेरुळ महोत्सव म्हणजे कलावंत, रसिकांसाठी एक पर्वणीच होती. कडाक्याच्या थंडीत मकबरा, वेरुळ येथे अत्युच्च दर्जाच्या कलावंतांचे सादरीकरण ऐकण्या-पाहण्यासाठी औरंगाबादकरच नव्हे तर मराठवाड्यातील रसिकही गर्दी करत होते. मात्र, कधी दुष्काळाचे सावट कधी सामाजिक ताणतणावांमुळे गेल्या काही वर्षात महोत्सवाच्या आयोजनात सातत्य राहिले नव्हते. गेली तीन वर्षे दुष्काळ असल्याने सरकारी यंत्रणेने महोत्सवातून अंग काढून घेतले होते. यंदा चांगला पाऊस होताच रसिकांनी वेरुळ महोत्सव झालाच पाहिजे, असा आग्रह धरला. तो विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मान्य केल्यावर तर जणू उत्साहाला उधाण आले होते. नव्या सरकारने हे फार चांगले केले, असे रसिक म्हणू लागले होते. प्रत्यक्षात महोत्सवाच्या आयोजनाचा तपशील जसजसा समोर येऊ लागला तसतसा रसिकांचा अपेक्षाभंग होऊ लागला. आणि महोत्सवातील सादरीकरणाने तर त्याचा कडलोटच झाला. महोत्सव म्हणजे सर्वांसाठी खुला असेल असे वाटत होते. मात्र, सरकारी यंत्रणेने संपूर्ण महोत्सवातील रसिकांचे कंत्राट कलासागर संस्थेला देऊन टाकले होते. पैसे मोजून आपल्यापुरते कला प्रदर्शन अशी मानसिकता असलेल्या कलासागरला सरकारी महोत्सवात अतिशय छुप्या पद्धतीने प्रवेश देण्यात आला. तिकीटाचे दरही हजार, दीड हजार रुपये ठेवण्यात आले. त्यामुळे सामान्य रसिकांसाठीचे दरवाजे आपोआप बंद झाले. महोत्सव सरकारीऐवजी खासगी संस्थेचा झाला. स्थानिक कलावंतांना सादरीकरणासाठी महोत्सवाच्या पूर्वरंगमध्ये संधी देण्यात आली. खरेतर त्यांना संत तुकाराम, तापडिया अशा शहराच्या मध्यभागी किंवा रसिकांना सोयीस्कर अशा ठिकाणी सादरीकरण करता आले असते तर ते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले असते. पण ज्या कलाग्राममध्ये कधीही कुणी फिरकत नाही, अशा ठिकाणी या कलावंतांना जागा देण्यात आली. त्यामुळे त्यांची कला रसिकांपर्यंत प्रसारमाध्यमांद्वारेच पोहोचली. प्रत्यक्ष जेव्हा कलावंत गात होते. नृत्य करत होते. तेथे त्यांच्यासमोर दाद देण्यासाठी बोटावर मोजण्याइतकेही प्रेक्षक नव्हते. सरकारने स्थानिक कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिले पाहिजे, असे म्हणणारेही या कलावंतांच्या कौतुकाकडे पाठ फिरवून बसले होते. मूळ महोत्सवात प्रख्यात अभिनेत्री ग्रेसी सिंग यांचे वेरुळ लेणीच्या पायथ्याशी झालेले नृत्य उत्कृष्टतेचा नमुना होते. (एमजीएम महागामीच्या पार्वती दत्ता प्रत्येक सरकारी, निमसरकारी महोत्सवात असतातच.) त्यामुळे महोत्सवाचा प्रारंभ चांगला झाला असे वाटले. मात्र, दुसऱ्या दिवशी सोनेरी महालात झालेल्या अजय-अतुल यांच्या मैफलीने जबर धक्का दिला. मराठी चित्रपट संगीताला देशभरात पुन्हा एकदा सुवर्ण वैभव मिळवून देणाऱ्या या जोडगोळीकडून फार अपेक्षा होत्या. त्यांचे लाईव्ह गाणे ऐकण्यासाठी आलेल्या (कलासागर वगळता) रसिकांना त्यांनी साऊंड ट्रॅकवरील गाणे ऐकवले. रसिक, आयोजकांची कलावंतांशी एक अप्रत्यक्ष बांधिलकी असतेच. पण इथे अजय-अतुल यांच्या लेखी आयोजक अन् रसिक यांचे मूल्य शून्य असल्याचे लक्षात आले. तिसऱ्या दिवशी अदनान सामी यांची मैफल असाच अनुभव देऊन गेली. समोर कोणत्या प्रकारचा रसिक आहे, याचा अंदाज न घेताच सामींनी गायन केले. त्यामुळे महोत्सवाचा समारोप अपेक्षेनुसार झाला नाही. औरंगाबादकरांच्या मागणीनुसार वेरुळ महोत्सव घेण्याचा डॉ. दांगट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न म्हणून चांगला असला तरी त्यात त्यांनी ज्या काही अनिष्ट गोष्टी पेरून ठेवल्या. त्या निश्चितच सांस्कृतिक जगताला धक्का देणाऱ्या आहेत. पुढील वेळी त्या उपटून टाकाव्या लागतील. तरच तो खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत पोहोचेल.