Thursday 20 December 2018

एक कोटी २० लाखांचे पान

एका गावात एक रिकामटेकडा तरुण होता. एक-दोन वर्षे थोडीफार कष्टाची कामे केल्यावर त्याच्या डोक्यात आपण झटपट श्रीमंत झाले पाहिजे, असा विचार घोळू लागला. अशा श्रीमंतीचा मार्ग नेमका कोण दाखवेल, याचा त्याने शोध सुरू केला. गावातील प्रत्येकाला तो गाठून गाठून मला कोणीतरी भेटवून द्या म्हणू लागला. तेव्हा एकाजणाने सांगितले, त्या चार डोंगराच्या पलिकडे एका झोपडीत फकीर राहतो. त्याच्याकडे झटपट श्रीमंत होण्याचा मंत्र आहे. झाले. खूप मागे लागलास तर मिळेल तुला मंत्र. तरुण फकीराकडे पोहोचला आणि म्हणाला, ‘मला श्रीमंत होण्याचा मंत्र द्या’. फकीर म्हणाला, अरे बाबा असा काही मंत्र नाही माझ्याकडे. पण तरुण हट्टाला पेटला होता. झोपडीत मुक्काम ठोकत त्याने फकिरामागे एकच भुणभुण लावली. कंटाळून फकिराने त्याला एका झाडाच्या पानावर काहीतरी खरडून दिले. हा मंत्र दहा लाख वेळा म्हटला की, श्रीमंत होशील, असे सांगितले. तरुणाला अत्यानंद झाला. पान घेऊन तो पळत सुटला. फकिराने ओरडून सांगितले, हे पहा मंत्र म्हणत असताना मनात लोण्याच्या गोळ्याचा विचारही आला तर मंत्राचा प्रभाव राहणार नाही. त्यावर ‘अहो मी तो लोण्याचा गोळा काय असतो तेच मला माहिती नाही. तर त्याचा विचार कसा येईल.’ असे म्हणत तरुण गावात पोहोचला. मंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी फकिर लोण्याच्या गोळ्याचे काय सांगत होता बरं, असे त्याने आठवून पाहिले. आणि झाले त्याच्या डोळ्यासमोर लोण्याच्या गोळ्याचे चित्र फिरू लागले. दहा-बारा वेळा मंत्र म्हणताच पुन्हा पुन्हा लोण्याचा गोळा दिसू लागला. कितीही प्रयत्न केले तरी लोणी काही नजरेसमोरून हटेना. वर्षभर हाच प्रकार चालला. लोक तरुणाला वेडा म्हणून लागले. अखेर कंटाळून त्याने मंत्र लिहिलेले पान चोळामोळा करून टाकले.
ओशो रजनीशांनी सांगितलेल्या एका बोधकथेचा हा काहीसा बदललेला सारांश. तो आठवून दिला महापालिकेच्या कारभाराने. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत एक कोटी २० लाख रुपयांच्या उधळपट्टीचा विषय आला. औरंगाबादच्या मानगुटीवर मनपाचे कारभारी, पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याचा प्रश्न टाकला आहे. तो सोडवण्याच्या नावाखाली कमाईचे नवे रस्ते कसे शोधले जात आहे, याचे दर्शन त्यात घडले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार सांगूनही लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत. म्हणून लोकांचे उद्बोधन, प्रबोधन करण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्ली येथील फीडबॅक फाऊंडेशन, नॉलेज लिंक आणि नांदेडच्या अॅक्शन फॉर बेटर टुमारो संस्थांना पाचारण केले. पाच महिन्यात प्रत्येकी दहा लाख रुपये असे एका संस्थेला चाळीस लाख म्हणजे एकूण एक कोटी २० लाख रुपये देऊन झाल्यावर या संस्थांनी नेमके काय काम केले. त्याचा फायदा झाला की नाही, हे शोधण्यासाठी स्थायी समितीने त्या संस्थांच्या अधिकाऱ्यांची उलटतपासणी केली. त्यात एकवेळा महापौर, सभापती राहिलेले गजानन बारवाल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना कोंडीत पकडले. कुठे झाले काम. कोणत्या वॉर्डांत केले प्रबोधन, उद्बोधन अशी विचारणा केली. स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनीही बारवालांप्रमाणेच तिन्ही संस्थाचे काम निरुपयोगी असल्याचे मत नोंदवले. एवढ्यावर प्रकरण थांबले नाही तर दस्तुरखुद्द भोंबे यांनी संस्थांच्या प्रबोधनाचा अपेक्षित उपयोग झालाच नाही. लोक ओला-सुका कचरा वेगळा करत नाहीत, असे सांगितले. मग सभापतींनी फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता या आदेशातून काहीही साध्य होणार नाही. तिन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी निकराचे प्रयत्न केले. लोकांना विनवणी केली. पण लोकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. कारण ओला-सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ड्रम नाहीत, असा निष्कर्ष निघेल. संस्थांना दिलेला पैसा पुन्हा वसूल करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची त्यात चौकशी लावली जाईल. प्रबोधन, उद्बोधनासाठी इंदूर, भोपाळ, नागपूर, पुणे, मुंबईच्या नामवंत संस्थांनाच बोलवावे, असा फर्मान निघून सहा महिन्यांत अशा संस्था कामकाजही सुरू करतील. मूळात प्रश्न आहे की, या संस्था प्रबोधन करतात की नाही, हे चार महिने एकाही नगरसेवकाने का पाहिले नाही. संस्थेचे कर्मचारी काहीच करत नाही, हे त्यांनी आयुक्तांना का सांगितले नाही. की संस्थांना कोंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता औरंगाबादकरांनी करापोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेले १ कोटी २० लाख लोकहिताच्या नावाखाली उधळल्याचे प्रकरण दफन केले जाईल. कारण ओशो रजनीशांनी सांगितलेल्या कथेनुसार इथे लोण्याच्या गोळ्याचा ध्यास असलेल्यांची कमतरता नाही. केवळ एका मंत्राचा जप करून श्रीमंत व्हायचे आहे. आपण लोकांच्या सेवेसाठी निवडून आलो आहोत. लोकांच्या सेवेसाठी नोकरीत आहोत. लोकांनी कष्टाने, पै पै करून जमवून दिलेल्या पैशातून आपला पगार होतो, याचा विसर पडला आहे. हा पैसा आपल्या खिशात घालण्यासाठी दिलेला नाही, हे तर त्यांना मान्यच नाही, अशी स्थिती आहे.

Wednesday 12 December 2018

मुक्या प्राण्यांचातरी दुआ घ्या

दोन हजार वर्षांपूर्वी अजिंठा-वेरुळच्या लेण्या झाल्या. हजार – बाराशे वर्षानंतर दौलताबादचा किल्ला उभा राहिला. चारशे वर्षांनी बिवी का मकबरा, पाणचक्की, निर्माण झाली. मग सगळे दुष्काळ पडल्यासारखे कोरडेठाक झाले. हे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त मनमोहनसिंग यांना ४० वर्षांपूर्वी खटकले. म्हणून औरंगाबाद शहराच्या वैभवात भर टाकणारे सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय उभे राहिले. आता एकदा ते वैभव म्हटले की त्याची निगा राखण्याची जबाबदारी वैभवाच्या तळ्याभोवती बसून दिवसा एक – एक लोटा आणि रात्रीच्या वेळी मनसोक्त पाणी पिणाऱ्यांचीच आहे की नाहीॽ पण औरंगाबादमध्ये असे कोणतेही नियम, अलिखित संकेत नाहीत. ज्या कामात फारसा पैसा नाही ती कामे लोकांसाठी कितीही महत्वाची असली तरी सगळ्यात शेवटी ठेवायची, असे धोरण कायम राहिले. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची नोटीस केंद्रीय झू ऑथॉरिटीने काढली आहे. आता ती रद्द करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले लवाजमा घेऊन दिल्लीची वारी करणार आहेत. त्या दौऱ्यावर किमान ६०-७० हजार रुपये ते खर्च करतीलच. अर्थात हा पैसा जनतेचा असल्याने त्यावर कोणीही, कधीही आक्षेप घेणार नाही. महापौर, आयुक्तांनाही त्याचे काहीच वाईट वाटणार नाही. जनतेचा पैसा अशाच कामांसाठी वापरण्याची सवय पूर्वापार चालत आली आहे. तर महापौर दिल्लीला जाऊन झू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना भेटतील. सोबत अर्थातच खासदार चंद्रकांत खैरे असतील. आणि मग काही दिवसांची मुदतवाढ मिळवून महापौर परततील. वर्ष-सहा महिन्यांनी पुन्हा हाच प्रसंग पाहण्यास, ऐकण्यास मिळेल. कारण खरे पाहिले तर ही कहाणी २००६-०७ पासून सुरू आहे. तेव्हा प्राणीसंग्रहालयाचे तत्कालिन संचालक डॉ. एस. व्ही. रिझवी यांनी हरीण, वाघाच्या कातडीचा गैरव्यवहार केला, अशी बातमी फुटली. रिझवी यांच्यावर खार खाणाऱ्या त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांनीच ती प्रसारमाध्यमांना पुरवली असावी. त्यामुळे पुढे सारे काही नियोजनबद्धरितीने झाले. गैरव्यवहार झाला की नाही, याचा खरा तपास लागलाच नाही. डॉ. रिझवी निलंबित झाले. त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला. लगोलग एक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती महापालिका प्रभाव क्षेत्राच्या किंचित बाहेर असल्याने संवेदनशीलतेने प्राणी संग्रहालयाची तपासणी झाली. तेव्हा एवढ्या कमी क्षेत्रफळावर एवढ्या मोठ्या संख्येने प्राणी ठेवणे चुकीचे आहे, असे समितीने स्पष्ट केले. काही प्राण्यांचे पिंजरे तातडीने बदला, अशी सूचना केली. तर केंद्रीय झू ऑथॉरिटीने तत्काळ प्राणीसंग्रहालय शहराबाहेर हलवा, असे म्हटले होते. त्यास आता किमान दहा वर्षे होऊन गेली आहेत. महापौरांनी दिल्लीवारी जरूर करावी. पण एकदा जुनी कागदपत्रेही चाळून बघावीत. थोडा अभ्यास करून  गेलात तर प्राणीसंग्रहालयाच्या विषयावर ठोस मार्ग काढता येईल. कारण मधल्या काळात काहीच झाले असे नाही. पण जे व्हायला हवे होते, ते झालेलेच नाही. सरकारी कारभाराच्या कासवगतीने कासवालाही लाजवले. मिटमिटा – शरणापूर येथे प्राणीसंग्रहालयासाठी १२५ एकर जागेच्या १२५ वेळा घोषणा झाल्या. खुल्या, मोकळ्या जागेत जगण्याची स्वप्ने पाहत पाहत अनेक प्राण्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. जे जगताहेत त्यांच्याही  आशा मावळल्या आहेत. जे कारभारी लाखो लोकांना पाणी देण्यासाठी पंधरा-पंधरा वर्षे घेतात. ते आपल्यासाठी किमान ५० वर्षे तरी काही करणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली असावी. पण काही प्राणी, औरंगाबादचे नागरिक अजूनही आशावादी  आहेत. वाटे-हिस्से करून का होईना, आमदारपदाची स्वप्ने पडत असल्याने का असेना शहरासाठी थोडेफार काम करण्याची घोडेले यांची इच्छा सध्यातरी दिसते. त्यामुळे ते मुदतवाढीसोबत मिटमिटा-शरणापूर येथे अप्रतिम प्राणीसंग्रहालय तातडीने कसे सुरू करता येईल, याकडे लक्ष देतील. केवळ लक्ष देणार नाहीत तर अंमलातही आणतील, असे वाटते. तसे झाले तर औरंगाबादकरांसाठी एक बहारदार पिकनिक स्पॉट तयार होईल. आता जसे लोक सिद्धार्थ उद्यानासाठी मनमोहनसिंग यांचे नाव घेतात, तसे घोडेले यांचे नाव होऊ शकते. असे म्हणतात की चांगुलपणा नेहमीच जगात अल्पसंख्य असतो. लुटारू, कपटींची संख्या जास्तच असते. तरीही चांगुलपणाचे सामर्थ्य अधिकच असते. जसे काळोख्या अंधाराला एक पणती वितळवून टाकते, तशी स्थिती असते. बहुतांश वेळा चांगुलपणा तळागाळात जाऊन पडलेला असतो. दफन अवस्थेत पडतो. लुटारू, कपटींचेच राज्य येते. चांगुलपणावर विश्वास असलेली माणसे गलितगात्र होतात. आणि एका क्षणी सगळी शक्ती एकवटून उफाळून वर येतात. लुटारू, कपटी वृत्तीला पराभूत करतात. वाईटातून चांगले जन्माला येण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. ती घोडेले यांनाही पक्की ठावूक आहे. महापौरपदाची सूत्रे खाली ठेवण्यापूर्वी लोकांच्या लक्षात राहणारी किमान तीन कामे करण्याची त्यांची इच्छा  आहेत. त्यात त्यांनी प्राणी संग्रहालयाच्या स्थलांतराचा समावेश केला. वाघ, सिंह, नीलगायींसह सर्वच प्राण्यांना आणखी मोठ्या, खुल्या हवेत जगू दिले तर हे मुके प्राणी त्यांना नक्कीच आशिर्वाद देतील. तो घेण्याची संधी महापौरांनी घालवू नये, असे वाटते.

दशा, दिशेचे नाट्य

हिंदू धर्म, भारतीय  समाजाला लागलेला सर्वात काळाकुट्ट डाग म्हणजे वर्ण, जाती व्यवस्था. हजारो वर्षांपासून हा डाग कायम आहे. जाती-पातीच्या या अमानवीय, क्रूर पद्धतीतून महामानव, तेजसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना बाहेर काढले. तु देखील माणूस आहे. तुलाही स्वाभिमान आहे. तो मुळीच हरवू नको. या देशावर तुझाही सवर्णांइतकाच अधिकार, हक्क आहे. तो मिळवण्याचा, अबाधित राखण्याचा मार्ग मी तयार करत आहे., असे बाबासाहेबांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सवर्णांनी पुढील काळात दलितांना चिरडून टाकू नये म्हणून कायद्याचे संरक्षण दिले. उत्तम शिक्षण घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देताना इतरांप्रमाणे  चांगल्या दर्जाची सरकारी नोकरी मिळेल, अशी व्यवस्था केली. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारणातही दलितांचे स्थान अबाधित राहिल. त्यांनाही सत्तेत वाटा कसा मिळू शकेल, हे सांगितले. एकदा सत्तेत वाटा मिळाला सत्ताधारी जमात होऊन हे दलित नेते खालच्या पायरीवर उभ्या आपल्या बांधवांना मदत करून वरच्या पायरीवर आणतील, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. नेमकी ही अपेक्षाच फोल ठरत चालल्याची भावना आंबेडकरी चळवळीत रक्त सांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २५–३० वर्षांत कमालीची वाढली आहे. स्वाभिमानाने चळवळ कशी चालवायची. कोणाविरुद्ध लढायचे. कोणाला फटकारायचेॽ सगळ्या सवर्णांना एका तराजूत तोलणे खरंच योग्य आहे काॽ आणि हे सगळं करत असताना व्यावहारिक जगात जगायचं कसंॽ हलाखीच्या चक्रातून बाहेर कसं पडायचंॽ असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिले आहेत. कारण सत्ताधारी जमात होण्याच्या नावाखाली राजकीय तडजोडी करत अनेक नेते वरच्या पायरीवर गेले. पण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खालच्या पायरीवर उभ्या तमाम दलित समाजाला वरती आणण्यासाठी सत्ता वापरलीच नाही. स्वतःच्या समर्थकांपुरतेच ते मर्यादित राहिले. आणि इतरांना सत्तेच्या सोपानापासून कसे रोखता येईल, यासाठीच शक्ती पणाला लावू लागले. महाराष्ट्रात, मराठी मुलुखात हे अधिक प्रमाणात झाले, असे सिद्धहस्त साहित्यिक, समीक्षक आणि नियोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांना जाणवले. ही जाणिव त्यांना कमालीची टोचू लागली. अस्वस्थ करू लागली. ही अस्वस्थता त्यांनी ‘भाई तुम्ही कुठे आहात’ या दोन अंकी नाटकात अधोरेखित केली आहे. आंबेडकरी चळवळीच्या दशा, दिशेला अतिशय कमी, मोजक्या पण जहाल शब्दांत वाट दाखवणारे हे नाट्य आहे. जहालता असली  तरी त्यात विखार, द्वेष नाही. उलट सगळा समाज आंबेडकरी जनतेसोबत जोडण्याचा एक आशावादी सूर डॉ. कांबळे या नाट्यातून ठामपणे मांडतात. आंबेडकरांच्या नावावर मोठ्या झालेल्या नेत्यांना प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे करताना, त्यांच्यावर कठोर प्रहार करतानाही त्यात कोठेही आक्रस्ताळेपणा नाही. त्यामुळे ‘भाई तुम्ही कुठे आहात’ अधिक व्यापक भूमिकेचे असल्याचे जाणवत जाते. परिणाम करत राहते. 
दोन अंकात आणि बारा दृश्यात डॉ. कांबळे यांनी नाट्याची मांडणी केली आहे. मंत्री झालेले भाई, एकेकाळी त्यांच्यासोबत दलितांच्या हक्कासाठी लढलेला मिलिंद, भाईंचे सहकारी दिनकरराव, भाईंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोंडस नावाखाली त्यांच्यातील लढवय्येपणाची धार बोथट करणारे भास्करराव यांच्यातील संघर्ष, संवाद, प्रवास बारा प्रवेशात आहे. त्यात एक प्रवेश दलितांच्या हक्कासाठी स्वजातीयांशी वैर पत्करणाऱ्या एका ब्राह्मण दांपत्याचाही आहे. आंबेडकरी चळवळीची दशा नेमकी काय झालीय, दिशा काय आहे आणि प्रबोधन करणे, कार्यकर्त्याच्या मनातील खदखद नेत्यांपर्यंत पोहोचवणे, हेच डॉ. कांबळे यांच्या लेखनाचे उद्दिष्ट असल्याने त्यांनी संपूर्ण मांडणी उद्दिष्टाला पूरकच केली आहे. नाटक लोकप्रिय, वादग्रस्त, मसालेदार करण्यासाठी ओढूनताणून नाट्यमयता, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स किंवा अन्य विशिष्ट गणिते पेरलेली नाहीत. एका निखळ, प्रामाणिक भावनेतून त्यांनी लिखाण केले आहे. त्यामुळे ते दिग्दर्शकालाही प्रचंड संधी उपलब्ध करून देते. नाट्य लेखकाला रंगमंचावर  व्यक्तिरेखा कशा उभ्या राहतात, हे संवादांमधून सांगावे लागते. आणि दोन संवादांमधील निःशब्द क्षणांतून त्याला अभिनयाच्या जागा दाखवून द्यायच्या असतात. यात डॉ. कांबळे यशस्वी झाले आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सरस्वती भुवन महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. दिलीप घारे यांनी या पुस्तकाच्या ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे हे नाटक सत्ताधाऱ्यांमधील किंवा विशिष्ट उच्चभ्रू जातींमधील दोषांवर प्रखऱ भाष्य करते. पण त्याचबरोबर दलित चळवळी संबंधात आपल्याला अंतर्मुख करते. भारतीय विशेषतः मराठी सामाजिक रचनेवर भाष्य करताना आजच्या काळात सशक्त दलित चळवळ का उभी राहू शकत नाही, असा प्रश्न उभे करते. त्याची काही उत्तरेही देण्याचा निश्चित प्रयत्न करते. त्यामुळे ‘भाई तुम्ही कोठे आहात’ दलितविषयक प्रश्नांची मांडणारी करणारे दुर्मिळ, मौल्यवान नाटक आहे. औरंगाबादच्या चिन्मय प्रकाशनाचे दीपाली कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांनी ते पुस्तक रूपात प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संतुक गोळेगावकर यांचे मुखपृष्ठ नेमकेपणा सांगणारे. आता दोन वाक्ये सादरीकरणाविषयी. या नाटकाचे काही प्रयोग झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. आता येत्या काळात आंबेडकरी चळवळीशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक संस्था, महाविद्यालय, वसाहतीत प्रयोग व्हावेत. म्हणजे डॉ. कांबळे यांना हृदयापासून तळमळीने जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. नेत्यांचे हृदय परिवर्तन होण्याची, त्यांना कोणाची कणव येण्याची शक्यता नाहीच. पण समाजावर त्याचा परिणाम होऊन एक दोन चांगले सामाजिक बदल झाले तरी ते पुरेसे आहे. 

Thursday 29 November 2018

निखळ आनंदासह टोचणारा इतिहास

पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृती म्हणजे महाराष्ट्राचे भूषण मानले जाते. तब्बल पाच दशके पुलंचे लेखन, कथाकथन मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करत आले. आणि अजूनही त्याचा प्रभाव कायम आहे. त्यांच्या शब्दांत दडलेला निखळ विनोद आजही खळखळून हसवतो. पण तो केवळ हसवण्यापुरताच राहत नाही तर आणि हसवता हसवता गंभीरही करून टाकतो. आपण मराठी माणसं खरंच एवढी मोठ्या मनाची, महान परंपरेचा वारसा सांगण्याच्या लायकीची आहोत का? परस्परांच्या सुखात आपल्याला खरेच सुख वाटते का? दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले पाहिजे, असे आपल्याला फक्त वाटते. पण आपण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीच करत नाही. एवढेच नव्हे तर महान संत, राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसाही आपल्याला पुरेसा माहिती नाही. मग तो आचरणात आणणे तर केव्हाच मागे पडले आहे, असं बरंच काही ‘पुल’ नकळत उपस्थित करतात. तेव्हा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे लक्षात येते. हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे मुकेश माचकर यांनी नाट्य रुपांतरित आणि मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेला ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हा दीर्घांक. दिव्य मराठी आयोजित दिव्य मराठी लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये या दीर्घांकाचा प्रयोग झाला. त्याचे साक्षीदार असलेले सारेच प्रेक्षक तासभर मनमुराद हसले. शब्दांच्या कोट्यांतील ताकद त्यांनी अनुभवली आणि अखेरच्या क्षणाला प्रत्येकजण अनेक प्रश्नांनी अंर्तमुख झाला. निखळ विनोद इतकी गंभीर टोचणीही देऊ शकतो, याचा अनुभव आला.

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पुस्तकात पुल देशपांडेंनी जे अधोरेखित केले ते नाटकाच्या रुपात मंचावर आणणे तसे कठीणच. आणि अलिकडच्या अति संवेदनशील काळात तर अधिकच. कलावंतांच्या प्रत्येक शब्दाला, वाक्याला जाती-धर्माचे संदर्भ देऊन त्यावर हल्ला करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील बुरखे महान संतांचा संदर्भ देऊन फाडणे म्हणजे नव्या वादाला तोंड फोडणे आणि प्रयोगावर बंदी लादून घेण्यासारखेच आहे. पण माचकरांनी हे आव्हान खूपच शिताफीने पेलले आहे. पुलंना अपेक्षित असलेला संदेश त्यातील पंच अजिबात क्षीण होऊ न देता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. मराठी वाङ्मयाविषयी ओ की ढो माहिती नसलेली शाळकरी मुले आणि त्यांना महान मराठी संतांचे कार्य कळावे, यासाठी धडपडणारे त्यांचे शिक्षक अशी मांडणी त्यांनी केली आहे. प्रत्येक पात्र ठाशीव, आखीव, रेखीव आणि परिणामकारक केले आहे. त्यामुळे एकच धमाल उडते. दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनीही संहितेला पूर्ण न्याय दिला आहे. पुलंच्या कसदार लेखणीतून आलेला प्रहसनात्मक सूर त्यांनी अचूक पकडला आणि तो कलावंतांकडून आविष्कृत करून घेतला आहे. तासभर चालणारा हा दीर्घांक कुठेही एकसूरी होणार नाही. रंगमंच हलता, खळाळता राहिल. सर्व कलावंतांचे संवाद प्रवाही राहतील. त्यांच्यातील कुरघोडींचा अतिरेक होणार नाही, यासाठी पूर्ण मेहनत घेतल्याचे क्षणोक्षणी जाणवत राहते. अक्षय शिंपी, किरण राजपूत, दिपिंती भोबसकर, अक्षय पाटील, शिरीष बागवे, प्रियपाल गायकवाड यांनीही भूमिकांत जीव ओतला आहे. आपण एका महान लेखकाची कलाकृती सादर करत आहोत. त्यात कोणतीही कसर राहता कामा नये आणि अभिनयाच्या नादात त्यातील अर्थाचा अनर्थ होऊ नये, याचे भान साऱ्यांनीच पाळले. सिद्धार्थ साळवींचे नेपथ्य, महेश गुरव यांचे संगीत संयोजन, सागर नाईक यांची प्रकाशयोजना सारेच परिणामकारक असल्याने गाळीव इतिहास दीर्घकाळ स्मरणात राहिल असा झाला.

आता थोडेसे स्थानिक संदर्भात. पुल देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने मुकेश माचकर यांनी हे नाट्य रुपांतर केले आणि मंगेश सातपुतेंच्या दिग्दर्शनात त्याचे प्रयोगही सुरू केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आहे. सरस्वती भुवन, देवगिरी महाविद्यालयातही नाट्यशास्त्र आहे. तेथील तरुण लेखक - दिग्दर्शक पुलंच्या साहित्यकृतीवर एखादा दीर्घांक नक्कीच करू शकतात. ते करणे शक्य नसेल तर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कथा-कादंबऱ्यात, नारायण सुर्वेंच्या कवितांत, प्रा. रुस्तुम अचलखांब यांच्या आत्मकथनात उत्तम नाटकाची बीजे आहेत. त्यातील एखादे फुलले तर मराठवाड्यातील कलावंतांचा प्रयोग राज्यभरात गाजेल. त्याचा आनंद काही औरच असेल. 

Thursday 27 September 2018

थेट सोन्याचा हंडाच हवा

एका शेतकऱ्याला पाच आळशी, स्वार्थी मुले होती. त्यांना कामाला लावण्यासाठी शेतकरी त्यांना म्हणाला, मला पहाटेच स्वप्न पडले की शेतात सोन्याचे हंडे आहेत. झाले, मुलांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी शेत नांगरून, खोदून काढले. हंडे मिळाले नाहीत. पण शेत खोदले, नांगरलेच आहे, असे म्हणत बियाणे पेरले. सहा महिन्यात भरघोस पिक आले. ते पाहून मुलांना कष्टाचे महत्व पटले. अशी गोष्ट आहे. ती सर्व क्षेत्रात, सर्व काळासाठी सत्य आहे. खऱ्याखुऱ्या कष्टाशिवाय मिळवलेले यश, ऐश्वर्य, वैभव, समाधान टिकतच नाही. याची लाखो उदाहरणे आहेत. पण तरीही औरंगाबाद महापालिकेच्या कारभाऱ्यांना खोदायचे नाही. पेरायचे नाही. थेट सोन्याचा हंडाच हवा आहे. काही महिन्यांपूर्वी स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी कचरा प्रक्रियेचा ठेका वाळूजच्या मायोवेसल्स कंपनीला देण्याचा एकतर्फी निर्णय घेऊन टाकला. त्यावरून सुरू झालेला वाद त्या गोष्टीची अशी आठवण करून देतो. हा ठेका ३६ कोटी रुपयांचा असल्याने या प्रस्तावाचे ३६ नव्हे १३६ वाजणार, हे तर स्पष्ट होतेच. फक्त ते टेबलाखालून, बंद दाराआड वाजतील, असे वाटले होते. कारण महापालिकेत काही मंडळी साम-दाम-दंड-भेद वापरून आपली झोळी भरण्यात डबल पी.एचडी. प्राप्त आहेत. तर काहीजणांनी अशा पी.एचडी. प्राप्त लोकांना कोणताही बभ्रा न करता जेरीस कसे आणायचे, यात पी.एचडी. मिळवली आहे. पण भक्ष्य एकच. सोळा शिकारी आणि प्रत्येक शिकाऱ्याचा एक मार्गदर्शक. बरं, पूर्वी ज्येष्ठ नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली वाटाघाटी होत. वाटा कसा वाटायचा, हे आधीच ठरायचे आणि त्यानुसार थेट घरी पोहोचून स्थायी समितीच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात होते. त्यांच्या शंका, आक्षेपांचे समाधान प्रस्ताव मंजुरीस येण्यापूर्वीच केली जाईल, याची काळजी सभापती आणि ज्येष्ठ नगरसेवक घेत. सभापतींच्या दालनातील काही कर्मचारी तर केवळ शंका, समाधानासाठीच नियुक्त होते. पण हे सारे मायोवेसल्सच्या ३६ कोटींच्या ठेक्यात झालेले दिसत नाही. वैद्य यांनी नीटपणे नाडीपरीक्षा केली नाही किंवा रुग्णांना चमचा, चमचा वाटायचे औषध स्वतःच पिऊन टाकले, अशी चर्चा आहे. मायोवेसल्सच्या प्रकरणात पहिल्या इनिंगमध्ये वैद्य यांनी आघाडी घेतली. पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्या पक्षातील नगरसेवकांसह इतरांनी एकजूट करत औषध न वाटणाऱ्या वैद्यांना आजारी पाडले आहे. अगदी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मध्यस्थी करूनही प्रस्ताव पुढे सरकू देण्यास ते तयार नाहीत. म्हणजे सध्यातरी वैद्य एकाकी आहेत, असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. ते जर पूर्णतः खरे नसेल तर मनपाचा कारभार आणखीनच खालच्या पातळीवर गेला असे म्हणावे लागेल. कारण काही वेळा तुम्ही मारल्यासारखे करा, मी रडल्यासारखे करतो. ते पाहून ठेकेदार आणखी दोन-चार रुमाल डोळे पुसण्यासाठी देईल, अशीही रचना केली जाते. सात-आठ वर्षांपूर्वी कचरा वाहतूकीचा ठेका मिळालेल्या रॅम्के कंपनीला अक्षरशः पळ काढावा लागला, असे म्हटले जाते. पण कंपनीचे फक्त नाव होते. रॅम्केच्या नावाखाली आजी-माजी कारभाऱ्यांनीच ठेके घेतले होते. त्यामुळे कंपनी पळाली, असे म्हणताच येणार नाही, असे ज्येष्ठ, माजी नगरसेवक सांगतात. आता ‘मायोवेसल्स’कडून कोणाला काय हवे आहे. कोणत्या प्रश्नावर त्यांना चर्चा घडवून आणायची आहे. कोणत्या शंकांचे त्यांना पूर्ण समाधान करून हवे आहे आणि वैद्य यांनी घाईघाईने, मूळ विषयपत्रिकेवर प्रस्ताव न आणता तो परस्पर मंजूर का करून टाकला, हे सध्या दबक्या आवाजात सांगितले जात आहे. वाटाघाटीचे प्रसंग पडद्यावर धूसर दिसत आहेत. मात्र, त्याचा आवाज फार काळ कमी राहणार नाही. धूर हळूहळू विरेलच. पण यात शहराचे जे नुकसान व्हायचे ते होणारच आहे. एकीकडे १४ लाख औरंगाबादकर कचऱ्याची समस्या कधी सुटेल, याकडे डोळे लावून बसले आहेत. दुसरीकडे कचरा मुक्त औरंगाबादसाठी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी मार्चमध्ये दिलेल्या शपथ पत्राची ठरल्यानुसार अंमलबजावणी का होत नाही,  अशी विचारणा हायकोर्ट करत आहे. तिसरीकडे मनपा आयुक्त डॉ. विनायक निपूण जमेल त्या छोट्या-मोठ्या वाटांनी हा प्रश्न मार्गी लागावा, असा प्रयत्न करत आहेत. चौथीकडे कारभारी मंडळी अशी बेलगाम ओढाताण करत आहेत. यासाठीच त्यांना मोक्याची पदे हवे असतात, असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. वस्तुतः नगरसेवक राहूनही लोकांची हवी तेवढी सेवा करता येते. तरीही हे नगरसेवक कोट्यवधी रुपये खर्चून महापौर, स्थायी समितीचा सभापती, विषय समित्या-वॉर्ड सभापती होण्यासाठी का धडपडतातॽ सभागृहनेता, विरोधी पक्षनेता, गटनेता असं काहीतरी झालंच पाहिजे, यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत फिल्डिंग का लावतातॽ ही पदं नाही मिळाली तर स्थायी समितीत सदस्य झालोच पाहिजे, असं त्यांचं स्वप्न का असतंॽ याची उत्तरे प्रत्येक औरंगाबादकर अगदी सहजपणे देईल. एवढं टोक या साऱ्या पक्षांच्या कारभाऱ्यांनी गाठले आहे. लोकांसाठी असं करू, तसं करू, असं म्हणणारी ही मंडळी खुर्चीवर बसताच पार बदलून जातात. हिंस्त्र होतात. तोंडाला रक्त लागलेले जंगली जनावर पोट भरल्यानंतर शिकार करणे थांबवते. पण इथं कार्यकाळ संपेपर्यंत कायम शिकार सुरूच असते. एका सेकंदाचा दहावा भाग शिकारीच्या मागावर असताना वाया गेला तरी जीवनच संपले, असे वाटणाऱ्यांची दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे. शिकार आणि शिकाऱ्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. एवढेच नव्हे तर दुर्बिणीतून शिकार शोधून ती शिकाऱ्याला सांगणारेही उघड दिसू लागले आहेत. त्यांना खरे कष्ट न करता दुसऱ्यांच्या हक्काचे सोन्याचे हंडे हवेच आहेत. या साऱ्यांची शिकार एक ना एक दिवस औरंगाबादकरांनाच करावी लागणार आहे. ‌त्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.

गावगाड्याचे शेकडो भेदक छेद

बालाजी सुतार यांनी कथा, कवितांतून गावाचे उभे, आडवे शेकडो छेद भेदकपणे मांडले आहेत. त्यांच्या गावाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हे तर लांबलचक भेगा पडल्या आहेत. या भेगा किती भयावह, वेदनादायी आणि मराठी समाजात खोलवर पोहोचल्या आहेत, याची जाणिव ‘गावकथा’ हे नव्या शैलीतील नाट्य पाहताना वारंवार होते. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात ९ सप्टेंबरला गावकथाचा प्रयोग पाहणाऱ्या सर्वांनाच हा अनुभव आला. सभागृह खचाखच भरल्याने मी विंगेत उभा होतो. एकही क्षण नजर हटली, एखादा संवाद अगदी शब्द निसटला तर खूप काही गमावले जाईल, हे पहिल्या काही क्षणातच लक्षात आले. श्वास रोखत, एक एक प्रसंग डोळ्यात उतरवून घेत रसिक त्यात जणूकाही गावकरीच असल्यासारखे सामिल झाले होते. अनेक संवाद, प्रसंगांना ‘ओह...अरेरे...हं...’ असा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे मिळत होता. एवढी ताकद सुतार यांच्या लेखणीत आणि संजय मोरे यांच्या दिग्दर्शनात, तमाम कलावंतांत होती. खरेतर एकच प्रयोग करण्याचे नियोजन होते. पण रसिकांची एवढी तुडुंब गर्दी झाली की तिथेच दुसरा प्रयोग करावा लागला. यावरूनही ही कलाकृती किती सखोल होती, याचा अंदाज येऊ शकतो.
जग एकसारखे कधीच राहत नाही. ते सारखे बदलत असते. पण हा बदल सुखाच्या दिशेने असला पाहिजे, अशी अपेक्षा असते. सगळ्यांची धडपड तीच असते. प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. किमान भारतात, महाराष्ट्रात, मराठवाडा-विदर्भात ते झालेले नाही. ग्रामीण भागात तर नक्कीच नाही. निसर्गाचा कोप, बिघडलेली समाज व्यवस्था, सरकारी यंत्रणेकडून होणारे शोषण या साऱ्यांमुळे आपली खेडी रोगट, कुपोषित होत चालली आहेत. हजारो वर्षांपासून सुरू असलेले महिलांना उखळात टाकून कुटण्याचा उद्योग अजूनही सुरूच आहे. इंग्रज जाऊन सत्तर वर्षे उलटून गेली. त्यांची जागा नव्या आणि इंग्रजांपेक्षाही खतरनाक व्यवस्थेने घेतली आहे. सुबत्तेची सूज काहीजणांच्याच अंगावर झुलीसारखी चढली आहे. आणि झूल चढवलेली हीच मंडळी इतरांचे जगणे कठीण करत आहेत. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना कळालेलाच नाही. स्वातंत्र्यातून येणारी जबाबदारी स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांना बेलगाम जगणे हवे आहे. जाती, धर्माचा शिताफीने वापर करून दुसऱ्यांचे शोषण करण्यासाठीच ते धावत आहेत. अशी अनेक पैलूंची मांडणी गावकथामध्ये आहे.
सौम्य व्यक्तिमत्वाचे असले तरी बालाजी सुतार यांची लेखणी अतिशय टोकदार, कसदार आहे. मराठी मुलुखातील खेडेगाव त्यांच्या नसानसात आहे. गाव म्हणजे नेमके काय आहे. तिथे खरंच कोण राहतं आणि कोणाची पाळमुळे जमिनीत रुतली आहेत. गावे उद्‌ध्वस्त का होत आहेतॽ खरंच जागतिकीकरणामुळे गावांवर नांगर फिरत आहे काॽ गावातले तरुण काय करत आहेतॽ महिलांचे जगणे किती जिकीरीचे झाले आहेॽ जातीय राजकारणाने कोणाचे भले अन्‌ कोणाचे भले होत आहेॽ ज्यांना आरक्षण मिळाले तेच राज्य करतायत की त्यांच्याआडून अजून कोणी सत्तेच्या दोऱ्या हातात ठेवल्या आहेतॽ अशा साऱ्या प्रश्नांचा वेध ते घेतात. केवळ वेध घेण्यावर थांबत नाहीत तर त्याची अतिशय निडरपणे उत्तरेही देतात. तिखटात बुडवलेल्या चाबकाचे फटके समाज व्यवस्थेवर ओढतात. ‘गावकथा’मध्ये त्यांनी एक एक शब्द अतिशय मोजून, मापून दिला आहे. त्यामुळे हे नाट्य पाहता पाहता मनाभोवती वादळ निर्माण करते. नाट्यगृहात बाहेर पडल्यानंतरही हे वादळ घोंगावतच राहते. एवढ्या ताकदीच्या लेखनाला तेवढ्याच प्रभावीपणे रंगमंचावर अवतरित करण्याचे काम संजय मोरे यांनी विलक्षण प्रवाहीपणे केले आहे. कथा, कविता, ललित लेखनातील विस्तारलेला एक अख्खा गाव. त्या गावाचे जीवन त्यांनी ऐंशी मिनिटांच्या कालावधीत ज्या कसबीने जिवंत केले त्याला तोडच नाही. साऱ्या व्यक्तिरेखा एकात एक गुंतलेल्या तरीही त्या स्वतंत्रपणे येतात आणि पुन्हा एकमेकांत मिसळून जातात. पुन्हा विलग होतात आणि काही क्षणांनी एकमेकांशी नाते सांगू लागतात, हा अजब अनुभव मोरे यांच्यातील दिग्दर्शकीय पकड, कौशल्य सांगणाराच आहे. त्यांनी पारंपारिक चौकट नसलेल्या संहितेची रंगमंचीय अवतरणासाठी संगतवार मांडणी, काँपोझिशन्स, संवाद शैलीसाठी घेतलेली मेहनत क्षणोक्षणी जाणवत राहते. कोणत्या प्रसंगात आपल्याला काय सांगायचे आहे आणि कोणामार्फत ते पोहोचवायचे आहे. याची अचूक सांगड त्यांनी घातली आहे. संजय ठाकुर, महेंद्र प्रकाश, विनोद वणवे, अनिता डेंगळे, श्रीकांत शिवाजी, ऋताली वैद्य, रश्मी साळवी, तुषार हांडे, ए. जी. हर्षा, अरबाज मुलानी या तरुण, प्रतिभावान कलावंतांशिवाय हे नाट्य एवढ्या खोलीवर जाऊच शकले नसते. प्रत्येकजण भूमिकेत शिरलेला आणि ती जगणारा. त्यांचा रंगमंचावरील वावर, भूमिकेची समज अचंबित करणारी. जणू काही आपण खरेच गावातील मंडळींना पारावर, चौकात भेटत आहोत. ते आपल्याशी बोलत आहेत. त्यांचे म्हणणे मांडत आहेत. गाऱ्हाणे सांगत आहेत, असे वाटत होते. ‘गावकथा’ मनाच्या तळापर्यंत उतरवण्यात मयुर मुळे, दीप डबरे यांच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे. दोन प्रसंगांना जोडण्यात, त्यांना आशयघन करण्यात संगीतकार यशस्वी ठरले आहेत. त्यांना शिवानी कंधारकर, अनिरुद्ध गोरे, गोपाळ तिवारी यांची सुरेख साथ मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदावर, राजकारणात असूनही सर्वांना सोबत घेऊन चालणारे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव निलेश राऊत आणि त्यांचे सहकारी सुबोध जाधव यांच्यामुळे पुण्यातील रंगदृष्टी संस्था निर्मित हा अप्रतिम प्रयोग औरंगाबादकरांना पाहण्यास मिळाला. त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. यापुढील काळात त्यांच्याकडून अशाच कसदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होईल, अशी अपेक्षा नक्कीच करता येईल.

Saturday 15 September 2018

म्हातारी श्वास मोजतेय

हजारो गोरगरिबांच्या आरोग्याचा एकमेव आधार असलेल्या घाटी रुग्णालयावर आदळत असलेल्या समस्या पाहून कोणीही संवेदनशील माणूस हादरून जाईल. तेथील सिटी स्कॅन यंत्रे ६५ लाख रुपयांची थकबाकी देण्याएवढा पैसा उपलब्ध नसल्याने दहा दिवसांपासून बंद पडली आहेत. अतिदक्षता विभागातील आठपैकी सात व्हेंटीलेटर्सचा प्राण गेला आहे. औषधींचा साठा सात महिन्यांपासून धराशयी झाला आहे. पण या समस्यांतून मार्ग काढण्यासाठी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. पाहिले तर त्यांचा सूर घाटीचे अधिकारी आम्हाला काही सांगत नाहीत म्हणून आम्ही मदत करत नाही, असा असतो. एकीकडे सरकार आरोग्य सर्वांसाठी म्हणते. दुसरीकडे केवळ आमच्याकडे कोणी आले नाही म्हणून आम्ही मदतीला धावून जाणार नाही, असे सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे असते. औरंगाबादेत थेट लोकसेवेच्या दोन महत्वाच्या संस्था आहेत. त्यातील एक आहे महापालिका आणि दुसरे घाटी रुग्णालय आहे. महापालिकाच्या कारभाऱ्यांनी तर लोकांची परीक्षा पाहण्याचा कळस गाठला आहे. १०० कोटींच्या रस्त्यांचे काम अजूनही मार्गी लागलेले नाही. भूमिगत गटार योजनेचे पितळ केवळ जोरदार पाऊस नसल्याने उघड झालेले नाही. समांतर जलवाहिनी रखडली आहे. आठ वर्षांपूर्वी सुरू केलेले बीओटीचे प्रकल्प गुडघ्यावर रांगत आहेत. कचरा पडून आहे. घाटी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी रुग्ण सेवेसाठी धडपड करत असले तरी तेथे सरकारकडून वारंवार कोंडी होत आहे. एकूणात औरंगाबाद शहराला कोणी त्राता आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इथे काळ तर सोकावलाय अन्‌ म्हातारी अखेरच्या क्षणाचे श्वास मोजत आहे. सिटी स्कॅन म्हणजे अलिकडील काळात आजार तपासणीत महत्वाचे यंत्र आहे. खासगी रुग्णालयात या यंत्रासाठी रुग्णांना हजारो रुपये मोजावे लागतात. त्यांना घाटीचाच एकमेव आधार आहे. पण तोही हिरावून घेतला जात आहे. खरेतर रुग्णांची प्रचंड संख्या असल्याने सिटी स्कॅन यंत्रावर ताण आहे. ही यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांनी यंत्राचे आयुष्य दहा वर्षांचे सांगितले असले तरी घाटीत तेवढे आयुष्य काढणे कठीण असल्याचे रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे कागीनाळकर यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानुसार अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवलेही. पण त्यांचा मंत्रालयात पाठपुरावा करून नवी यंत्रे तातडीने आणण्याचे गांभीर्य आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, संजय शिरसाट यांनी दाखवले नाही. खरेतर या तिघांनी एकत्रितपणे घाटीत बैठक घेऊन समस्यांची यादी तयार केली पाहिजे. आणि तिघांनी आरोग्य मंत्री, अर्थमंत्र्यांकडे जाऊन काम करवून घेतले पाहिजे. किमान लालफितीत अडकलेले शिर्डी संस्थानकडून मिळणारे सिटी स्कॅन सोडवणे अपेक्षित होते. पण ते झालेले नाही. तीन वर्षांपूर्वी डीपीसीच्या बैठकीत तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांच्यापुढे आमदार इम्तियाज यांनी सिटी स्कॅन यंत्राचे तपासणी शुल्क कमी करण्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी धडाधड आदेश दिले. त्याची अंमलबजावणी होण्यास उशिर झाला असला तरी त्याचा काही प्रमाणात रुग्णांना फायदा झाला. कदमांची जागा घेणारे पालकमंत्री दीपक सावंत डॉक्टर असले तरी त्यांच्याकडे घाटी रुग्णालयाची नाडी परीक्षा करण्याचा वेळ नाही किंबहुना त्यांना औरंगाबादमध्येच स्वारस्य नाही, असे दिसते. डॉ. येळीकर, डॉ. रोटे यांच्याही ही बाब लक्षात आली असावी. लोकप्रतिनिधींकडून तातडीने मदत मिळणार नाही, हे त्यांना अनुभवावरून कळाले. म्हणूनच की काय त्यांनी नवी सिटी स्कॅन यंत्रे येतील तेव्हा येतील. सध्या रुग्णांना दिलासा म्हणून खासगी रोगनिदान केंद्रांमार्फत तपासणीचा प्रयत्न केला. त्याला आठ केंद्रांनी प्रतिसाद दिला. आम्ही इतर रुग्णांकडून घेतो त्यापेक्षा कमी रकमेत घाटीकडून येणाऱ्यांची चाचणी करून देऊ, असे या संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले. डॉ. येळीकरांचा हेतू चांगला असला तरी हे एक प्रकारे आरोग्य सेवेचे खासगीकरण आहे. गरिबांच्या उत्तम उपचाराची सोय करून देणे सरकारचीच मूळ जबाबदारी आहे. त्याची जाणिव सरकारला नसेल तर ती विविध मार्गांनी करून द्यावी लागेल, असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. मग त्यांनी प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचलनालयाकडे पाठवला आहे. त्याला आठ दिवसांत हिरवा कंदील मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण या सरकारचा आणि त्यांच्या प्रतिनिधींचा अनुभव लक्षात घेता आठवडाभरात अपेक्षापूर्तीची शक्यता धूसरच आहे. आणि तसे झालेच तर खासगीकरणाचा मार्ग आपोआप सोपा होऊन जाईल. त्यात रुग्णांचे हाल होतील. जास्तीचा पैसा मोजावा लागेलच. शिवाय खासगी तपासणी केंद्र ते घाटी रुग्णालय अशा खेट्या माराव्या लागतील. आता या समस्येतून मार्ग केवळ संवेदनशील औरंगाबादकरच मार्ग काढू शकतात. त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलने उभी केली तर आणि तरच लोकप्रतिनिधी भानावर येतील आणि सिटी स्कॅन यंत्रासह इतर सामुग्री, औषधींचा साठा उपलब्ध होईल. अन्यथा म्हातारीचा प्राण जाईल.

Thursday 30 August 2018

हितोपदेश

तहानलेल्या औरंगाबादकरांसाठी २००५ मध्ये घोषित झालेली समांतर जलवाहिनी योजना १३ वर्षांत तसूभरही पुढे सरकलेली नाही. योजनेचे वाटोळे शिवसेनेने केले असे सूचक शब्दांत सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदाराला वाढीव २८९ कोटी रुपये शासन देईल. तुम्ही फक्त कोर्टाबाहेर तडजोडीचा प्रस्ताव मंजूर करून घ्या, असे सांगितले. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मान डोलावली. पण परवाच्या सभेत उलटेच केले. कारण खासदार चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवरून आणलेली किल्ली फिरवून कुलूप लावले, असे म्हटले जाते. दुसरीकडे एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीने पाइपलाईन टाकण्याचे काम जीवन प्राधिकरणाने करावे, अशी भूमिका घेतली आहे. माजी मनपा आयुक्त कृष्णा भोगे यांचेही तसेच मत आहे. लोकांनी उठाव केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आता या साऱ्या गदारोळात योजना पुन्हा लांबणीवर पडू शकते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, महापौर, मनपाचे इतर कारभारी-अधिकारी आणि लोकांसाठी हितोपदेशाच्या काही गोष्टी.
---00---

१. नाग, ससे आणि बोका

एका बिळात पाच ससे राहत होते. एकदा एक बोका त्यांच्या बिळाजवळ घुटमळताना पाहून ते घाबरले. आता हा बोका आपला चट्टामट्टा करणार अशी भिती त्यांना वाटू लागले. तेवढ्यात त्यांना बिळाबाहेर एक भलामोठा नाग बोक्यावर हल्ला चढवत असलेला दिसला. थोड्यावेळात बोका घाबरून झाडावर जाऊन बसला. मग सशांनी नागाशी संपर्क साधत, ‘तु आमचे रक्षण करशील काॽ’ अशी विचारणा केली. बराच विचार करून नाग म्हणाला, ‘पण मला राहण्यासाठी चांगली जागा नाही.’ सशे म्हणाले, ‘आमचे बिळ आहे ना. निवांत रहा.’ डोळे चमकवत नाग आत शिरला आणि काही दिवसांतच त्याने  चारही सशांचा फडशा पाडला.
तात्पर्य : कोणापासून संरक्षण घेण्यासाठी कोणाला निमंत्रण द्यावे, याचे तारतम्य असलेच पाहिजे.
(आता यात ससा, नाग आणि बोका कोण हे सांगायची गरज पडू नये.)
---00---

२. मेंढपाळ आणि लांडगा

एक मेंढपाळ नेहमी मेंढरांना वनात चरायला नेत असे. तेव्हा एक लांडगा कळपापासून थोड्या अंतरावर शांतपणे बसून असे. मेंढ्याकडे तर तो ढुंकूनही पाहत नसे. काही दिवसानंतर हा लांडगा तर अहिंसक असल्याचे मेंढपाळाला वाटू लागले. म्हणून तो लांडग्याला सोबत मेंढवाड्यात घेऊन आला. लांडगा काहीच करत नसल्याचे पाहून मेंढ्या निर्धास्त झाल्या. एक दिवस मेंढपाळ मेंढराची जबाबदारी लांडग्यावर सोपवून कामानिमित्त बाहेरगावी गेला. आठ दिवसांनी तो परतला. तेव्हा त्याने पाहिले की, दहा-बारा मेंढ्यांचा फन्ना उडवून लांडगा पसार झाला होता.
तात्पर्य : चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवाल तर तुमचे नुकसान ठरलेलेच आहे.
(औरंगाबादकर गेल्या अनेक वर्षांपासून हेच इमाने इतबारे करत आले आहेत.)
---00---

३. लबाड कोल्हा, भोळा हत्ती

एका जंगलात महाकाय पण भोळसर हत्ती राहत होता. त्याला पाहून लबाड कोल्ह्यांच्या मनात विचार आला की, याला मारले तर अनेक दिवसांची ददात मिटेल. पण त्याला एकट्याला गाठून पाणवठ्याजवळ आणायचे कसे, असा प्रश्न होता. मग एक लबाड कोल्हा हत्तीकडे गेला अन्‌ म्हणाला, महाराज पाणवठ्यावर सर्व प्राण्यांची सभा भरली आहे. तुम्हाला जंगलाचा राजा म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे. फक्त तुमची परवानगी हवी आहे. तातडीने तुम्ही एकटे चला बरे. भोळा हत्ती भूलथापांना भुलला. पाणवठ्याजवळ येताच कोल्ह्यांची टोळी त्याच्यावर तुटून पडली.
तात्पर्य : भूलथापा ओळखता आल्या नाही तर तुमचे जगणे संपलेच म्हणून समजा.
(भूलथापा ऐकून पाणवठ्यावर जाणे आणि स्वतःला संपवून घेणे औरंगाबादकरांच्या अंगवळणी पडले आहे.)
---00---

हावरट तरस आणि काकडीचे शेत

एका शेतकऱ्याच्या काकडीच्या शेतात एका हावरट तरसाने खूपच धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्याने त्याला तरसोबा, तुमच्या पोटात जागा असेल तेवढ्याच काकड्या खा. उगाच नको तेवढे पोटात का भरता, असे म्हणून पाहिले. पण उपयोग झाला नाही. मग शेतकऱ्याच्या बायकोने एक शक्कल लढवली. तिने झाडाचा चीक काढून एक छानसा बाहुला बनवून शेतात ठेवला. रात्री तरसाने बाहुल्याला पाहिले. त्याला वाटले की आपण तो मटकावलाच पाहिजे. म्हणून त्याने त्याला हात लावला तर तो चिटकला. खरं तर त्याला धोका कळायला हवा होता. पण हावरटपणा नडला. त्याने बाहुल्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. तसे चिकाने त्याचे तोंडच चिटकून गेले. त्याला हलताच येईना. ते पाहून शेतकरी आणि त्याची बायको जळकी लाकडे घेऊन आली आणि त्यांनी त्या हावरट तरसाला बेदम झोडपून काढले.
तात्पर्य : खायला मिळते म्हणून खातच सुटले की घात होतो.
(सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी आता अतीच अर्थकारण झाल्याचे म्हटले आहेच. आता हावरटांना मार कधी बसणारॽ)
 ---00---

कावळा, बगळा आणि साधू

एकदा एका कावळ्याला यक्षाने सांगितले की, त्या जंगलातील तलावात सोनेरी मासा आहे. तो खाल्ला की तु कायमचा सुखी होशील. कावळ्याने तलाव शोधून मासा पकडला आणि तो खाण्यासाठी निघणार तोच एक बगळा आला आणि  म्हणाला, हे तळे माझ्या मालकीचे आहे. त्यातल्या माशावर तुझा अधिकारच नाही. दोघांमध्ये वाद वाढला. तेव्हा ते तळ्याजवळच बसलेल्या साधूकडे गेले. साधू म्हणाला, हा मासा खाण्याची तुम्हा दोघांचीही योग्यता नाही. ती मिळवण्यासाठी कावळ्याला आधी अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ व्हावे लागेल. आणि बगळ्याला दोन्ही पायांवर उभे राहून, डोळे उघडून गोड आवाजात भजने म्हणावी लागतील. कित्येक वर्षे उलटून गेली कावळ्याला अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ होता आले नाही. बगळ्याला गोड आवाजात भजन म्हणता आलेले नाही.
तात्पर्य : काही चांगले पदरात पाडण्यासाठी मनापासून कष्ट करावे लागतात. स्वतःत बदल करावा लागतो.
(फक्त जाती-धर्माच्या नावावर कारभारी निवडणाऱ्या औरंगाबादकरांना याबद्दल काय उलगडून सांगावे.)

Friday 24 August 2018

देवळी : फ्रेमपलिकडील जगाचा शोध


एक फोटो म्हणजे छायाचित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते, असे म्हणणे आणि त्यावरून वाद निर्माण करणे चुकीचे आहे. कारण दोन्ही माध्यमांची तशी तुलना होऊ शकत नाही. ज्या गोष्टी शब्दांनी आरपार होतात, तेथे फोटो कामाचा नाही. आणि जेथे फोटो बोलू लागतो तेथे शब्दांची गरज पडत नाही. फोटो या माध्यमाची एक स्वतंत्र शक्ती, अस्तित्व आहे. आभासी आणि वास्तव अशा दोन्ही जगात फोटो लख्ख प्रकाश टाकत असतो. काळाच्या सीमा ओलांडून फोटो आपल्या काहीतरी सांगतो. काही फोटोंच्या फ्रेम्स - चौकटी अशा असतात की त्यात त्याचा विषय पूर्णपणे सामावलेला असतो. विषयाचे तपशील त्या चौकटीतच शोधायचे असतात. किंवा ते तेथेच पसरलेले, विखुरलेले असतात. आणि काही फोटो असे असतात की जेथे त्याच्या चौकटी संपतात त्यापलिकडेही एक जग उभे असल्याची जाणिव करून देतात. केवळ जाणिव करून देत नाहीत तर ते जग शोधण्यासाठी तुमचे मन तो फोटो ताब्यात घेतो. मनाला जगाच्या कानाकोपऱ्याची सफर घडवून आणतो. अनुभवविश्वात फेरी मारण्यास भाग पाडतो. भूतकाळाच्या आठवणी जागवतो. अशा प्रकारचे फोटो काढणे प्रत्येक छायाचित्रकाराला शक्य नाही. कारण त्यासाठी दृष्टी, मन वेगळ्याच जगात नेऊन ठेवावी लागते. कमालीची भटकंती करत नवनवे विषय शोधावे लागतात. त्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या छायाकृतींचे `देवळी – कोनाडा` प्रदर्शन पाहताना हे प्रकर्षाने जाणवले. भंडारे यांच्या विचारशक्तीतील वेगळेपण मनात ठसते. जुन्या आठवणी, बालपणाच्या गोष्टीत रमणे अनेकांना आवडत असते. विशेषतः वयाला चाळिशीचे वेध लागले की आपला मूळ उगम, उदय जेथे झाला तो परिसर खुणावू लागतो. त्यातील तपशील डोळ्यांसमोरून भिरभिरू लागतात. भंडारे यांनी देवळी प्रदर्शनात नेमका हाच वेध वेधला आहे. ५० वर्षांपूर्वी गावांमधून शहरात वस्तीस आलेल्या लोकांचे बालपण वाडा संस्कृतीत गेले आहे. काळाच्या ओघात गावकरी वाडे सोडून गेले. हळूहळू वाड्यांना घरघर लागली. त्यातील स्थापत्य वैशिष्ट्यांच्या खुणा, सांस्कृतिक वेगळेपण लयाला जाऊ लागले. आता तर वाडे नामशेषच झाले आहेत. एक प्रकारे आपली एक समृद्ध परंपरा आपण मोडीत काढली आहे. त्याचे प्रतीक म्हणून भंडारे यांनी शेकडो जुन्या वाड्यांतील देवळी म्हणजे कोनाड्याची विविध रुपे टिपली. त्याचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्रातर्फे एमजीएमच्या कलादीर्घ दालनात भरवले. प्रत्येक फ्रेम पाहताना त्यातील भावार्थ अधिक व्यापक असल्याचे जाणवते. त्या काळी वाड्याची देवळी म्हणजे एक जिवंत व्यक्तिमत्वच होते किंवा एक हक्काचा माणूसच समजा. कोणीही येता जाता देवळीत काहीही ठेवून जावे आणि तिने ते जीवाभावाने सांभाळावे, अशी स्थिती होती. त्यामुळे वाड्यांमध्ये देवळी तयार करताना तिच्यावर छानपैकी संस्कार केले जात. तिला विविध आकार दिले जात. कलाकुसरही केली जात असे. काही देवळ्या मोठ्या आकाराच्या, विशाल हृदयाच्या. तर काही देवळ्या छोटेखानी पण मनात अपार माया भरलेल्या, असे सारे चित्रण भंडारे यांच्या या प्रदर्शनात पाहण्यास मिळाले. छायाचित्रातील प्रत्येक देवळी नकळत आपल्याशी बोलू लागते. मी  अमूक एका वाड्यातील. माझे मालक असे होते बरं...त्यांना इतकी मुलं-बाळं होती. त्यांच्या संसारात मी पण होते. पण एक दिवस सारे विस्कटून गेलं...अशी कहाणी ती सांगू लागते. विस्कटणेपणाचे साम्य असले तरी त्यातही विविध रंग भंडारे यांनी भरले आहेत. ते रंग फ्रेम बारकाईने पाहताना डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात. अशा या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे निलेश राऊत, सुबोध जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हे प्रतिष्ठान सातत्याने कोणताही दुजाभाव न करता कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत आहे. त्यासाठी झळही सोसत आहे, हे महत्वाचे.
टोकाचा जातीवाद, धर्मवाद पोसणाऱ्या औरंगाबाद शहराची दुसरी ओळख आता कचरा, खड्ड्यांचे, पाणीटंचाईशी झुंजणारे गाव अशी होऊ लागली आहे. येथे अनेक कलावंत मुंबईची चित्रपट-नाट्य दुनिया गाजवत असली तरी त्यांना येथे अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किंवा मिळाला तरी ते येथे थांबत नाहीत. फोटोग्राफीच्या दुनियेबद्दल बोलायचे झाले तर येथे नाट्य, संगीताप्रमाणेच ही कलाही फारशी बहरली नाही. मोहंमदभाई, कुमार खेकाळे, नरेंद्र लोंढे, पाठक गुरुजी, दीक्षित गुरुजी यांच्यासह काहीजणांनी १९४० ते १९९०च्या काळात औरंगाबाद परिसरातील घटना घडामोडी टिपल्या. १९९६-९७ मध्ये पंढरीनाथ गोंडे पाटील यांच्या पुढाकाराने वर्तमानपत्रातील छायाचित्रकारांनी एकत्र येऊन एक प्रदर्शन आयोजित केले होते. पण ते फक्त शिवसेना वर्तुळापुरते होते. खरेतर प्रसारमाध्यमांतील छायाचित्रकार हे शक्तीशाली, प्रभावी आणि सर्व ठिकाणी वावर असणारे असतात. त्यांच्यासमोरून हजारो बोलके क्षण, प्रसंग जात असतात. त्यापैकी काही त्यांनी छंद, आवड म्हणून टिपले किंवा जे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यालाच एका विचारसूत्रांत बांधत विशिष्ट चाळणी लावून त्याचे प्रदर्शन दर महिन्यातून एकदा भरवले तर औरंगाबादकर नक्कीच त्याचा आनंद घेऊन शकतील. काहीतरी वेगळे केल्याचा अनुभव छायाचित्रकारांनाही येऊ शकेल. भंडारे यांच्यापासून अशी प्रेरणा घेतली तर नयनरसिकांना ते हवेच आहे.

Thursday 9 August 2018

केवळ स्वतःच्या आनंदासाठी

१९७० नंतर मराठी रंगभूमी एका वेगळ्या वळणावर आणि उंचीवर पोहोचली. दिवाणखान्यात, कौटुंबिक पेचात किंवा हास्यविनोदात अडकलेले मराठी नाटक जागतिकस्तरावर वेगात निघाले. त्याचे श्रेय अर्थातच विलक्षण ताकदीचा विचार मांडणारे विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, दिलीप जगताप, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी आणि इतर मंडळींना आहे. त्यांनी नाटक म्हणजे केवळ मनोरंजन किंवा हृदय पिळवटून काढणे नव्हे. तर ते समाजमन घडवण्याचे एक प्रखर, सशक्त माध्यम असल्याचे सांगितले. दिवाणखान्याची चौकट मोडून टाकली. हलकाफुलका विनोद विनोदापुरताच जीवनात आहे. फार तर तो तुमच्या जगण्यातील ताण काही काळासाठी कमी करू शकतो. संपवू  शकत नाही. आजूबाजूला राजकीय, सामाजिक वावटळी उठल्या असताना तुम्हाला झुडूपाच्या आड लपून चालणार नाही. त्या वावटळीला अंगावर घ्यावे लागेल. समाजातील नवे बदल समजून घेत स्वतःच्या, येणाऱ्या पिढीची जडणघडण करणे गरजेचे आहे, असा त्या काळातील नाटकांचा सांगावा होता. काळाचे भान त्या काळातील नाटककारांनी रंगभूमीच्या माध्यमातून समाजाला दिले.  अर्थात ही सारे नाटके त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीवरून प्रवेशकर्ती झाली नाही. कारण एवढे मोठे वळण घेण्याएवढे धाडस तत्कालिन सर्वच संस्थांमध्ये नव्हती. अशा अवजड, वेगळ्या वाटेवरच्या नाटकांना प्रेक्षक मिळणार नाहीत, असे त्यांचे व्यावसायिक गणित  होते. आणि प्रारंभी या लेखकांनी लिहिलेल्या नाटकांचे प्रयोग जेव्हा सादर झाले. तेव्हा तर ते गणित योग्यच असल्याचे वाटत होते. पण म्हणतात ना की जे चांगले किंवा समाजासाठी अत्यावश्यक आहे. जी काळाची गरज आहे. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे येतेच. तसेच झाले. नवीन काही सांगू पाहणारी नाटके सादर होण्यासाठी समांतर, प्रायोगिक रंगभूमी अस्तित्वात यावी लागली. त्यासोबत राज्य नाट्य स्पर्धेनेही या नाटकांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे दार उघडे करून दिले. मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा कधी मूळापासून आणि विविध अंगांनी लिहिला  जाईल. तेव्हा राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धेचे पान सुवर्णाक्षरांनी लिहावे लागणार आहे. सांस्कृतिक संचलनालयाच्या सरकारी खाक्यात असूनही ही स्पर्धा ५८ वर्षे सातत्याने रसिक, रंगकर्मींना चिंतनशील प्रयोग देत आहे. किमान १०० उच्च दर्जाचे लेखक, तेवढेच दिग्दर्शक आणि दुपटीने तंत्रज्ञ, चौपटीने कलावंत केवळ या स्पर्धांनी चित्रपट, नाट्यसृष्टीला दिले आहेत. त्यातून विचारी, संयमी, चिंतनशील समाज किती घडला याची मोजदाद सध्या करता येणार नाही. पण या स्पर्धेने त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला एवढा नक्की. आणि मधला काहीसा उदासवाणा काळ मागे पडून पुन्हा ही स्पर्धा नाविन्याच्या शोधात निघाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वी केवळ मुंबई, पुणे, नागपूर याच मोठ्या शहरांपुरती असलेली मर्यादा या स्पर्धेने मोडीत काढली आहे. अगदी ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील कलावंतही रंगमंचावर स्वतःची चमक दाखवू शकतील, अशी यंत्रणा राबवली जात आहे. बाल नाट्यातून छोटे कलावंत आणि छोट्यांसाठी खास लिहिणारे, दिग्दर्शन करणारे तयार होऊ लागले आहेत. शेकडो नव्या संहिता येत आहेत.
हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे परवाच्या दिवशी तापडिया नाट्यमंदिरात झालेला या स्पर्धेचा विभागीय पारितोषिक वितरण सोहळा. प्रख्यात अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे, दिग्दर्शक प्रा. दिलीप महालिंगे, प्रा. डॉ. राजू सोनवणे, रमाकांत मुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रख्यात कवी प्रा. दासू वैद्य, सभु नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. किशोर शिरसाट, पद्मनाभ पाठक, गायिका आरती पाटणकर, शीतल रुद्रवार – देशपांडे आदी रंगभूमीशी दीर्घकाळापासून नाते जोडलेल्या मंडळींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. स्टैच्यू ऑफ लिबर्टी या प्रचंड गाजत असलेल्या नाटकातील प्रतिभावान अभिनेते रमाकांत भालेराव यांनी या साऱ्यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला होता. आणि त्याचवेळी यंदा होणाऱ्या स्पर्धेसाठी कोणकोणत्या संहिता तयार होत आहेत. दुसरी फेरी गाठण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचे भान पाळावे लागेल. संहितेतील त्रुटी दूर करण्यासाठी दिग्दर्शकाने काय मेहनत घेतली पाहिजे, यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे चार दशकांपूर्वी विद्यार्थी असलेले आणि अंबाजोगाईतील रंगभूमीचे विद्यापीठ अशी ओळख असलेले प्रा. केशव देशपांडे यांनी जे सांगितले ते नव्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचे. ते म्हणाले की, प्रतिभेत कमीजास्त असा विषय नसला तरी नाट्यसंघातील काही कलावंत अत्यंत चमकदार कामगिरी करतात. प्रेक्षकांना भावतात. पुढे निघून जातात. लोकप्रिय होतात. पण काहीजण मागे पडतात. यश मिळाले तरी ते टिकत नाही. त्यामागे मुख्य कारण म्हणजे तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर आणि तरच तुमच्यात नवीनतेची उर्जा सातत्याने निर्माण होत राहते. ती रसिकांना आवडत जाते. म्हणून आपण माणूस म्हणून किती चांगले आहोत, हे कलावंताने सातत्याने तपासत राहिले पाहिजे. थोडी कमतरता पडली असे वाटले तर ती शोधून दूर केली पाहिजे. आता माणूस म्हणून चांगले असणे म्हणजे काय याचेही उत्तर देशपांडे यांनी दिले. ते म्हणाले, सर्वप्रथम अहंकारशून्यता हवीच. समोरचा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही. अपमानित होणार नाही. याची काळजी घेणे. झालेल्या चुकांची मनमोकळी कबूली देणे, चुकांबद्दल माफी मागणे आणि दुसऱ्यांना माफ करण्यात अगदी पुढे असणे म्हणजे चांगला माणूस होय. हे सगळे आदर्श असले तरी ते कलावंतात अपेक्षित आहे. कारण कलावंत समूहाचे नेतृत्व करताना स्वतःचे जीवनही घडत असतो. जेवढे नितळ, पारदर्शी मन तेवढे ते अधिक क्रियाशील, निर्मितीक्षम असते. त्यातून तुमचे व्यक्तिमत्वही अधिक उंचीवर पोहोचत असते. त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीसाठी नितळ, पारदर्शी व्हा. स्पर्धेत उतरणाऱ्यांनाही त्यांनी एक सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, दुसऱ्यांना आनंद मिळवून देण्यासाठी, विचारांत गुंतवण्यासाठी किंवा समाज घडवायचा आहे, असा विचार करून नाटक करूच नका. मला नाटक करण्यात आनंद मिळतो म्हणून मी नाटक करतोय, एवढेच ध्येय ठेवा. स्पर्धेत यश मिळेल अथवा न मिळेल. तुमच्या रंगभूमीवरील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. प्रा. देशपांडे यांनी दीर्घ अनुभवातून दिलेला हा सल्ला नाट्य स्पर्धेच्या केवळ रंगकर्मी नव्हे तर सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे. कोणी ते अंमलात आणावे आणि कोणी सोडून द्यावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Thursday 2 August 2018

सगळी काट्यांचीच मोळी


महापालिकेचा कारभार हाती घेताच प्रत्येक आयुक्त कर्मचाऱ्यांची बैठक घेतात. कार्यपद्धती आणि अडचणी जाणून घेणे हा त्या मागील उद्देश असतो. तशी व्यापक बैठक नवे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी घेतली. आणि त्यात कर्मचाऱ्यांनी नगरसेवकच भ्रष्टाचाराचे उगमस्थान आहे, असा हल्ला चढवला. नगरसेवक आधी रस्ता बनववतात. मग ड्रेनेजलाईन, गट्टूसाठी खोदतात. पुन्हा तोच तोच रस्ता तयार करतात. अतिक्रमण हटाव मोहीम हाणून पाडण्यात नगरसेवकच अग्रेसर असतात, असे त्यांनी सांगितले. त्याचे दुसऱ्या दिवशी कारभाऱ्यांमध्ये पडसाद उमटले. महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, सभागृहनेता विकास जैन यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले. स्थायी समितीत राखी देसरडा यांनी अशा भ्रष्ट नगरसेवकांची नावे जाहीर करा, अशी मागणी केली. सभापती राजू वैद्य यांनी प्रशासनाने खुलासा करावा, असे आदेश दिले. आता यावरून सर्वसाधारण सभेतही चर्चा झडेल. अधिकारी, कर्मचारीच गैरव्यवहारात आकंठ बुडाले असल्याचे नगरसेवकही म्हणतील. काही उदाहरणेही देतील. मग आयुक्त भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांच्या याद्या जाहीर करून चौकशी लावतील. त्यात काहीजण दोषी सापडतील. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे औरंगाबादकरांना वाटत असेल तर ते केवळ एक स्वप्नरंजन आहे. कारण या महापालिकेत सगळी काट्यांची मोळी आहे. काही गवताची पाती सापडली तर ते नशिब समजावे, अशी अवस्था आहे. आणि हे केवळ औरंगाबाद महापालिकेचे काळेकुट्ट चित्र आहे, असे नाही. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी, निमसरकारी कार्यालयात, पोलिस दलात भ्रष्टाचार ओसंडत आहेच. फक्त औरंगाबाद महापालिकेत तो अनेक वर्षांपासून दुथडी भरून वाहत आहे. सगळी मोळी भ्रष्ट मनोवृत्तीच्या काट्यांची आहे. काटे काढून टाकायचे ठरवले तर मोळीच शिल्लक राहणार नाही. आणि गवताची नवीन मोळी तयार केली तरी तिला काही दिवसांतच काटे फोडणारी यंत्रणा तयार झाली आहे. अमूक काम का झाले नाही. त्यात चूक, दिरंगाई का झाली असा जाब विचारला की दुसऱ्या कोणावर तरी खापर मोडून मोकळे व्हायचे. आपल्यात चांगल्या, दर्जेदार कामाची क्षमता नाही हे कबूल करून स्वत:त सुधारणेऐवजी दुसरा कसा चुकीचा, भ्रष्ट हेच दाखवण्याची सगळीकडे मानसिकता आहे. सोमवारी डॉ. निपुण यांनी घेतलेल्या बैठकीत अनेक कर्मचारी अशाच पवित्र्यात होते. महापालिका म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आणि प्रशासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी चालवायचा रथ आहे, असे वारंवार म्हटले जाते. हा रथ लोकांच्या हितासाठी चालवण्याची जबाबदारी कायद्याने, लोकशाहीने त्यांच्यावर टाकली आहे. शिवाय रथ कसा चालवायचा, याची नियमावलीही तयार केली आहे. पण त्याला हुलकावणी देत, कायद्याच्या कचाट्यातून वाट काढत लोकांऐवजी स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी रथ शहरभर फिरवला जात आहे. काही नगरसेवक आणि काही अधिकारी आलटून पालटून रथ हाकतात. बाकीचे मागे बसून मिळेल तेवढी मौज लुटतात. ज्यांना हे सहन होत नाही. त्यांना रथाच्या खाली लोटून दिले जाते. बहुतांश औरंगाबादकर हा खेळ मूकपणे पाहत असतात. काही राजकीय संघटना आवाज उठवतात. पण तो अतिशय क्षीण असतो. कारण गरिबांमध्ये भ्रष्टाचाराचा रथ उलथवून टाकण्याची शक्ती नाही. मध्यमवर्गाची तेवढी ताकद लावण्याची मानसिकता नाही आणि श्रीमंत त्या रथाकडे, त्यातील कारभाऱ्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. त्यांच्यासाठी काही असले काय किंवा नसले काय काहीही फरक पडत नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की, सोमवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांविरुद्ध ज्या तक्रारी केल्या. त्यात तथ्य आहेच. आधी रस्ता बनवून ड्रेनेजलाईनसाठी खोदायचा. मग पुन्हा रस्ता करायचा. सुरू असलेले पथदिवे कमी प्रकाश देतात असे म्हणत जुनेच दिवे नवे म्हणून लावायचे. लोकांची गरज म्हणत लाखो रुपये अवाढव्य सभागृहे, व्यायामशाळा बांधून काढायच्या. सेवांचे खासगीकरण करून त्यात आपले नातेवाईक, ठेकेदार घुसवायचे असे उद्योग सुरूच आहेत. त्यात काही अधिकाऱ्यांची त्यांना साथ आहे. केवळ साथच आहे असे नाही तर भागिदारीही असते. यातून पैसे कमावता येतात, असा मार्ग अधिकारीच नगरसेवकाला दाखवतात. आणि एकदा तो दिसला की नगरसेवक तो मार्ग कधीच सोडत नाहीत. मग त्यात कर्मचारीही सामिल होतात. आज कमीतकमी काम करून जास्तीत जास्त वरकमाई कशी करता येईल, असा विचार करूनच अनेक कर्मचारी कार्यालयात येतात. एखाद्या दिवशी अपेक्षित कमाई झाली नाही तर दुसऱ्या दिवशी दुपटीचा निर्धार केला जातो. पूर्वी काही सर्वसाधारण सभांमध्ये अधिकाऱ्यांच्या मालमत्तेविषयी चर्चा झाली. तेव्हा एक-दोन नगरसेवकांनी सीबीआय, सीआयडीमार्फत चौकशीची मागणी केली. पण ती लावून धरली नाही. काही दिवसानंतर हेच अधिकारी आणि नगरसेवक गळ्यात गळा घालून सहलींना गेले. दहा-पंधरा वर्षांपूर्वी दुचाकीवर फिरणारे काही लोकप्रतिनिधी आज आलिशान गाड्यातून फिरतात. उंची बंगल्यात राहतात. त्यांची ही ‘अफलातून’ प्रगती सर्वजण पाहत आहेत. पीठात मीठ घालावेच लागते. थोडाफार भ्रष्टाचार केलाच पाहिजे. वरकमाई करण्याचा अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांना हक्कच आहे, असे भारतीय समाजाला मान्य झाले आहे. पण चिमूटभर पीठात भांडे भरून मीठ टाकणे सुरू आहे. काही दिवसांनी मीठाचीच पोळी तयार करून लोकांच्या ताटात वाढली जाणार आहे. हे सारे समूळ नष्ट करण्यासाठी शेकडो वर्षे लागतील. वारंवार काट्याच्या मोळ्या मोडाव्या लागतील. कायद्याच्या कचाट्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी सामान्य नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन कमीतकमी कमाईत जास्तीत जास्त चांगली कामे करणाऱ्या नगरसेवकांनाच निवडून देण्याचे धाडस दाखवावे लागेल. कारण हे शहर शेवटी आपल्या सर्वांचे आहे. त्याचे भले करण्याचे कामही तरुण पिढीला करावे लागणार आहे. होय ना?

Thursday 26 July 2018

जलधारांसोबत ...

भारत हा खरंच खूप विचित्र देश आहे. इथे तुमचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवा, असे वारंवार सांगावे लागते. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी एक पोलिस उभा करावा लागतो. हा देश तुमचाच आहे. त्यात रस्त्यावर थुंकू नका, कचरा टाकू नका, अशा जाहिराती कराव्या लागतात. थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करावा लागतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेतील ओळींची वारंवार आठवण करून द्यावी लागते. कारण एकमेकांशी वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध ठेवून जाती, धर्माविषयी सोशल मिडिआवर विष कालवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. झुंडीने हल्ले होत आहेत. हा अमुक जातीचा म्हणजे वाईटच. तो तमूक धर्माचा म्हणजे राक्षसच, असा प्रचार सुरू आहे. चारही बाजूंनी असा मारा होत असताना काहीच चांगले होत नाही. कोणालाही त्याविषयी काही वाटत नाही. कोणी त्याविरोधात उपाययोजना करत नाही, असे नाही. संख्येने कमी असतील पण काही व्यक्ती निश्चित धोरण आखत समाजाला जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन एकत्र आणण्याचा प्रयत्न कसोशीने करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष किशोर जगन्नाथ शितोळे त्यापैकीच एक आहेत. भेगाळलेल्या जमिनीला जलधारांना भिजवण्यासोबत ते सामाजिक एकोप्याचीही पेरणी करत आहेत. पाणी उपलब्ध होण्याइतकेच समाज एक राहणे महत्वाचे आहे. जातीय, धार्मिक द्वेषापलिकडे एक जग आहे. आणि ते खूपच समाधान मिळवून देणारे आहे, असा संस्कार ते तरुण पिढीवर करत आहेत.  
तीन-चार वर्षांपूर्वी दुष्काळाचे संकट मराठवाड्याला गिळंकृत करण्यास निघाले होते. सरकारकडून नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस सुरू झाला होता. जलयुक्त शिवारची योजना जाहीर झाली होती. काही गावांत त्याची कामे खरेच लोक सहभागातून आणि प्रामाणिकपणे केली जात होती. अनेक गावांत ठेकेदार, राजकारणी घुसून स्वतःचे बंधारे बांधून घेऊ लागले होते. अशावेळी महाराष्ट्राचा सुपरस्टार मकरंद अनासपुरेने प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत नाम फाऊंडेशन स्थापन केले. त्या माध्यमातून नाला खोलीकरण, नदी रुंदीकरण, तलावातील गाळ काढण्याची कामे सुरू झाली. तेव्हा त्यापासून मराठवाड्यातील काही तरुण, उद्योजकांनी प्रेरणा घेतली तर किती बरे होईल, असे वाटत होते. आणि मितभाषी, कायम नाविन्याच्या शोधात असलेल्या किशोर शितोळे यांनी ती अपेक्षा पूर्ण केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या उन्हाळ्यात त्यांनी शेकडो ग्रामस्थांची तहान भागेल, त्यांच्या शेताला पुरेसे पाणी मिळेल, अशी व्यवस्था त्यांच्या जलदूत संस्थेमार्फत ग्रामस्थांना सोबत घेऊन केली आहे. आधी स्वतःचा वाटा देऊन आर्थिक पाठबळ लोकवर्गणीतून उभे केले.एवढेच नव्हे तर शहरातील लोकांमध्येही जागरुकता आणली आहे. विशेषतः सातारा देवळाई भागावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. तेथे महापालिकेचे पाणी नाही. नजिकच्या काळात पोहोचण्याची शक्यता नाही. भूगर्भातील पाणी खोल खोल होत चालले आहे. अशा काळात तुम्हालाच तुमचे पाणी मिळवावे लागेल. पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवावा असे घरोघरी जाऊन समजावून सांगितले. केवळ समजावणुकीचे कार्यक्रम तर अनेक संस्था करत असतात. शितोळेंनी त्यापुढे एक पाऊल टाकले. ज्यांनी जल पुनर्भरणाची तयारी दाखवली. त्यांना पूर्ण तांत्रिक सहाय्य प्लंबिंग असोसिएशनच्या मदतीने उपलब्ध करून दिले. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील धूपखेडा गावाजवळील येलगंगेचे पुनरुज्जीवन इतर उद्योजकांच्या मदतीने करण्याचे अत्यंत कठीण आव्हान त्यांनी पेलले. सातारा, मुकुंदवाडी, वानखेडेनगर येथील पुरातन बारवांची साफसफाई केली. तेथील बुजलेले पाण्याचे झरे पुन्हा वाहू लागले आहेत.
हे सारे काही करताना शितोळे यांनी जी पद्धत अवलंबली ती अफलातून आहे. तरुणाई हीच खरी शक्ती आहे. तिला योग्य दिशा दाखवली तर ती अफाट काम करू शकते. लोकांच्या उपयोगी पडू शकते. शिवाय विविध जाती, धर्म, पंथ तसेच राजकीय विचारसरणींना मानणारे तरुण एकत्रित काम करू लागले तर त्यांच्यातील द्वेषाची धार निश्चित कमी होईल. ते एकमेकांना समजून घेतील. परस्परांच्या मतांचा आदर करू शकतील, हे त्यांना पक्के ठावूक होते. त्यामुळे त्यांनी जलदूतच्या प्रत्येक उपक्रमात तरुणांना सोबत घेण्यावर भर दिला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दलित पँथर, रिपब्लिकन अशा सर्व पक्षीयांनी राजकारण बाजूला ठेवून अमूक एका गावातील श्रमदानासाठी यावे, असे आवाहन ते करतात. त्याला आता भरभरून प्रतिसाद मिळतो. तरुणाई गाण्यांच्या तालावर नाचत-गात अंग झोकून काम करते. मग गावकऱ्यांसोबत चुली पेटवून स्वयंपाक केला जातो. रुचकर, खमंग भाकरी, पिठलं, ठेचा असा बेत असतो. तो संपवून मुले एका नव्या उमेदीने, सळसळत्या उत्साहाने घरी परततात. तेव्हा त्यांच्यात माणुसकीचा एक नवा कोंब पेरला गेलेला असतो. जात, धर्म, पंथ आणि राजकारण म्हणजेच सर्वस्व नाही. त्यात जगाचे, भारताचे सौख्य सामावलेले नाही. आपण सारे मतभेद बाजूला ठेवून गोरगरिबांच्या मदतीला एकत्रपणे धावून जाणे हीच खरी सेवा, असल्याचा विचार त्यांच्या मनात निश्चितपणे पेरला जातो. माझ्यामते शितोळेंच्या उपक्रमांची खरी ताकद आणि वैशिष्ट्य हेच आहे. कारण अनेकजण स्वतःच्या गोतावळ्यालाच सोबत घेऊन काम करत भेदाच्या भिंती आणखी उंच करत आहेतच. शितोळेंची जलदूत प्रारंभापासून भेद मोडण्यासाठीच काम करत आहे. प्रारंभीच्या काळात त्यांच्यासमोरही अनेक अडचणी आल्या. हेतूवर शंका उपस्थित करत टीकास्त्र सोडले गेले. त्यावर त्यांनी एक इंचही पाऊल मागे घेतले नाही. उलट दोन पावले पुढे टाकण्याची हिंमत दाखवली. यापुढील काळात जलदूतचे कार्य आणखी विस्तारत जावो. त्याचा पाया असाच सामाजिक एकोप्याचाच कायम राहो, अशी अपेक्षा आहे.  द्वेषाचा वणवा आणि त्यावर फुंकर घालत बसलेली मंडळी पाहता असंख्य शितोळेंची गरज आहे. चांगली कामे होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा ती होतात तेव्हा दीर्घकाळ पक्की राहतात. शितोळे करत असलेले जलपुनर्भरण, सामाजिक एकोप्याचे कामही असेच चांगले आहे. ते आणखी विस्तारत नेऊन मजबूत करण्यासाठी किमान चार-पाच जणांनी प्रेरणा घेतली तर देशाचे भले होईल ना?

Thursday 19 July 2018

मूक वेदनांचे आक्रंदन

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जाहीर होणाऱ्या सरकारी मदतीच्या योजना दिसायला गोंडस, गुटगुटीत असतात. त्या ग्रामीण भागात लवकर पोहोचतच नाहीत. जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांच्यातील प्राण अधिकाऱ्यांनी कधीच काढून घेतलेला असतो. दुसरीकडे निसर्गाचा, दलालांच्या लुटीचा, राजकारण्यांच्या लुटमारीचा मार आहेच. तिसरा भाग आहे तो आपल्या संस्कृती, परंपरांचा. त्याच्या जोखडाखाली मुली, महिलांची आयुष्य होलपाटून निघत आहे. पुरुष काही बोलूतरी शकतात. पण महिलांचे जीणे निष्पर्ण, वठलेल्या झाडांसारखे आहे. त्यांचे स्वतःचे असे विश्व नाहीच. बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार त्यांना दिलेलाच नाही. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांनी हेच वास्तव ‘नली’ या कलाकृतीत मांडले आहे. जळगावच्या परिवर्तन संस्थेने त्याचा एकपात्री प्रयोग रविवारी गोविंदभाई श्रॉफ अकादमीच्या सभागृहात केला. एकतर देशमुख यांच्या कसदार लेखणीला धार चढलेली. योगेश पाटील यांचे शब्दनशब्द घासून पुसून घेतलेले, चौकटी मोडून टाकणारे दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभिनेते हर्षल पाटील यांनी विलक्षण आत्मियतेने जिवंत केलेली नली. सारेच चटका लावून जाणारे. संवेदनशील मन एखाद्या भट्टीत भाजून काढणारे होते. एकपात्री असूनही असा अनुभव ‘नली’ पाहताना येतो. यावरून शेतकरी महिलेचे दुःख किती प्रभावीपणे रंगमंचावर आविष्कृत झाले असावे, याचा अंदाज व्यक्त करता येईल.
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग म्हणजे दिग्गजांचा. प्रा. डॉ. दिलीप घारे, प्रा. यशवंत देशमुख यांनी तर कलावंतांच्या किमान तीन पिढ्या घडवल्या. आता त्यांची परंपरा प्रा. डॉ. किशोर शिरसाट अत्यंत प्रामाणिकपणे चालवत आहेत. नवनव्याचा ध्यास आणि सर्व प्रवाहातील रंगकर्मींना संधी हे त्यांचे तत्व आहे. त्याची सुरुवात त्यांनी चार वर्षांपूर्वी रंगयात्रा उपक्रमातून केली. रंगमंचावर नेहमी काहीतरी घडत राहावे. विशेषतः तरुण पिढीचे अविष्कार कोणत्या का होईना रुपात सादर झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. विशेष म्हणजे त्यांनी विभागाचे दरवाजे सर्वच रंगकर्मींसाठी खुले ठेवले आहेत. केवळ औरंगाबाद किंवा मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील कोणीही येऊन त्याची कलाकृती सादर करू शकतो, असे धोरण राबवले आहे. त्यातून जळगावच्या परिवर्तन संस्थेने ‘नली’ हा एकल प्रयोग अविष्कृत केला. नव्याने काही सांगू पाहणारी ही कलाकृती अनुभवण्याची संधी प्रा. शिरसाट यांच्यामुळे औरंगाबादकरांना मिळाली

आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख यांनी ग्रामीण भागात आयुष्यभर काबाडकष्ट करून जगणाऱ्या, सुखाचा एखादा क्षण वाट्याला यावा म्हणून क्षितिजाकडे पाहत राहणाऱ्या आणि मातीत कष्ट करत करत मातीतच मिसळून जाणाऱ्या महिलांचे दुःख नलीमध्ये मांडले आहे. काहीवेळा महान लेखक व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘बनगरवाडी’ कादंबरीतील अंजीचे पात्र देशमुखांनी टिपून मांडले की काय, असे वाटत राहते. ‘शेतात राबणाऱ्या सगळ्या बायकांचे चेहरे एकसारखेच दिसतात’ असं एक काळजाला भेगा पाडणारं वक्तव्य ते करतात. ‘नली’मध्ये अशी हृदय तळतळून टाकणारी अनेक विधाने आहेत. त्यातील तीक्ष्णता केवळ विधानांपुरती थांबत नाहीत तर हे भारतीय समाजातील भयाण सत्य आहे. आणि त्याला तुम्ही सारेच जबाबदार आहात, असेही सांगते. ही सारी प्रखरता, वास्तव रंगमंचावर आविष्कृत करणे म्हणजे एक मोठे आव्हानच. ते दिग्दर्शक योगेश पाटील, अभिनेते हर्षल पाटील यांनी एकदम मनापासून पेलले आहे. देशमुख यांना जे काही सांगायचे आहे. तिथपर्यंत ते निश्चितच रसिकांना घेऊन जातात. महान दिग्दर्शक पीटर ब्रुक त्यांच्या ‘एम्प्टी स्पेस’ पुस्तकात म्हणतात की जमिनीच्या कोणत्याही भागावर एक अदृश्य रेषा आखून एक अभिनेता त्यात उभा राहतो आणि प्रेक्षक त्याला तन्मयतेने पाहू लागतो. तेथेच रंगभूमीचा जन्म होतो. नलीचा प्रयोग पाहताना तसाच काहीसा अनुभव येतो. हर्षल पाटील तासाभरात कहाणी नाट्यान्वित करताना रंगमंचावर अख्खा गाव आणि त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा उभ्या करतात. ती कहाणी थोडक्यात अशी की, खानदेशातील एका अतिशय छोट्या खेड्यागावातील बाळ्या लहानपणापासून हुशार. वर्गात शिकणारी सुंदर, चुणचुणीत नली त्याला आवडू लागते. तिलाही बाळ्या आवडत असतो. पण नली अभ्यासात कमालीची कच्ची. तिच्या घरी शिक्षणाचा गंधही नाही. हळूहळू ती मागे पडत जाते. दोघांचे प्रेम अव्यक्तच राहते. बाळ्या मोठा अधिकारी होतो. नलीचे गावातल्याच एका सुमार माणसाशी लग्न होते. ती शेतात राबू लागते. संसाराचा गाडा ओढता ओढता तिच्यातील माणूसपण मरून जाते. एक दिवस ती कर्जाला कंटाळून आत्महत्या करते. कायम संकटांशी दोन हात करणाऱ्या नलीनं खरंच आत्महत्या केली असावी काॽ शेतात काम करणाऱ्या बाया मातीत का मिसळतातॽ असा सुन्न करणारा प्रश्न विचारून प्रयोग थांबतो. पण तेथून तो प्रत्येक संवेदनशील मनात असंख्य विचारांचा प्रवास सुरू करून देतो.

प्रयोग एकपात्री असल्यामुळे आवाजातील वैविध्य, भाषा शैली अभ्यासपूर्णच लागेल, याचा अभ्यास दिग्दर्शक योगेश पाटील यांनी केला होता. तो त्यांनी हर्षल यांच्याकडूनही करून घेतला. त्यामुळे रुढ अर्थाने आवाजाला मर्यादा असल्या तरी त्याच्या वापरात हर्षल यांनी कोणतीही मर्यादा जाणवू दिली नाही. ग्रामीण भागातील दुःख, वेदना सारेकाही आत्मसात केले असल्याने सुरुवातीची एक-दोन मिनिटे सोडली तर त्यांच्या अभिनयात, रंगमंचावरील वावरात कमालीची सहजता जाणवत होती. शंभू पाटील यांच्या संकल्पनेतून दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यावर नाट्य किती उंचीवर जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर यांनी वेगळी वाट निवडत या प्रयोगाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. होरिलसिंग राजपूत यांची प्रकाश योजना, राहूल निंबाळकर यांचे पार्श्वसंगीत व्यक्तीरेखा म्हणून प्रेक्षकांशी बोलते एवढी त्यात कल्पकता आहे. मंजुषा भिडे यांची वेशभूषा ठीकठाक.

Thursday 5 July 2018

नोकरशाहीचे असेही दर्शन

नाटकाच्या अखेरच्या प्रसंगात रंगमंचाच्या मध्यभागी हातात कुत्र्याचे पिल्लू घेऊन बसलेली नायिका दिसते. ती कुत्र्याला जोराने भुंकण्यास सांगते. पण ते कुंथतच राहते. आपण सारे सुन्न होऊन जातो. खरे तर नायिका कुत्र्याच्या पिल्लाला नव्हे तर भारतीय समाजव्यवस्थेला भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवण्यास सांगत आहे. आणि आपल्यातील बोटावर मोजण्याइतक्या लोकांतच आवाज उठवण्याची ताकद आहे. बाकीचे सगळे निमूटपणे तिच्यासमोर शरणागती पत्करत आहेत. आपणही त्या शरणागतात आहोत. गलितगात्र झालो आहोत, अशा जबरदस्त थपडा पडू लागतात. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हिंदी विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे गेल्या महिन्यात झालेल्या ग्रीष्मकालीन नाट्य महोत्सवात सादर झालेल्या ‘ताजमहल का टेंडर’ नाटकाने संवेदनशील मनांना या थपडा लगावल्या. अजय शुक्ला यांनी लिहिलेल्या आणि चित्तरंजन त्रिपाठी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात जागोजागी भारतीय समाजव्यवस्था शोषून, पिळून, पोखरलेल्या नोकरशाहीचे वाभाडे काढले आहेत. अब्जावधी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून कोसो मैल दूर ठेवणाऱ्या व्यवस्थेचे हसतखेळत अक्षरश: कपडे फाडले आहेत. हे नाटक केवळ नोकरशाहीचे हिंस्त्र, ओंगळवाणे, हिडीस रूप दाखवून थांबत नाही. तर ही व्यवस्था खरेच का निर्माण झाली. तिच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले लोक तिच्यासमोर का नतमस्तक होतात. राजकारणी मंडळी नोकरशहांना डोक्यावर का घेतात, अशी विचारणा करताना यातून भारतीय समाजाची कधी सुटका होणार की नाही, असा मूलभूत प्रश्नही उपस्थित करते. नाटककाराने यात स्वत:चे मत नोंदवताना ‘अशी कित्येक युगे येतील आणि जातील. शहाजहानसारखे बादशहा तख्तावर येतील. नामशेष होतील. पण खरे राज्य नोकरशहांचेच असेल’ असे म्हटले आहे. ते ऐकल्यावर मागे वळून पाहताना आणि भविष्यात डोकावतानाही ते सत्यच असल्याचे जाणवते. यामुळे तर मन अधिकच विषण्ण होऊन जाते. एवढ्या प्रभावीपणे संहितेची मांडणी झाली आहे. भारतात तर नोकरशाहीने कहर केला आहे. पण काही अपवाद वगळता बहुतांश देशांमध्येही अशीच स्थिती आहे. रशियात कामगार क्रांतीनंतर गरीब, शोषित, पिडितांच्या प्रतिनिधीचे राज्य आले. काही वर्षे उलटून जाताच तेथे नोकरशाही गरीब, शोषितांची पिळवणूक करू लागली. चीनमध्येही नोकरशाहीच बलवान, भ्रष्ट आहे. यातील एक महत्वाची बाब म्हणजे नोकरशाहीतील वरच्या सिंहासनावर बसलेले लोक नोकरशाहीतल्याच खालच्या लोकांचीही पिळवणूक करत असतात. नोकरशाहीला नाव ठेवणारे, त्यातील भ्रष्टाचारावर हल्ला चढवणारे लोक स्वत: नोकरशहा होताच त्या भ्रष्ट सिस्टीमचा एक भाग होऊन जातात. त्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे प्रत्येक माणूस स्वत:चे हक्क, अधिकारांबद्दल जागरूक नाही. समाज व्यवस्थेत आपली नेमकी काय जबाबदारी आहे, याचे भान बहुसंख्य लोकांना नाही. ज्यांना हे भान आहे, ते पुरेसे ताकदीचे नाहीत. किंवा काही काळ लढल्यावर ते शरणागती पत्करतात. जात, धर्म, पंथाच्या नावाखाली परस्परांवर हल्ले चढवण्यात मशगुल होऊ जातात. नोकरशाही आणि त्यांच्याआडून व्यवहार करणाऱ्या राजकारण्यांना, राजकारण्यांच्या चेल्या-चपाट्यांना ते पुरते ठावूक झाले आहे. अशी विस्तीर्ण पटाची मांडणी ‘ताजमहल का टेंडर’मध्ये आहे. त्यासाठी लेखकाने निवडलेले कथानक अतिशय साधेसोपे पण हृदयात भाला खुपसणारे, रक्तबंबाळ करणारे आहे.
शहाजहान बादशहा जेव्हा ताजमहल उभा करायचा ठरवतो. तेव्हा नेमके काय झाले असेल, अशी कल्पना लेखकाने फुलवली आहे. शहाजहान त्याकाळचा सर्वात पॉवरफुल राजा होता. भारताची अर्थव्यवस्था त्यावेळी प्रचंड मजबूत होती. आजच्याच भाषेत सांगायचे झाले तर जीडीपी किमान १५ टक्के होता. तरीही ताजमहलचे बांधकाम कासवगतीनेच झाले. त्यामागे एकमेव कारण नोकरशाहीच असावे, अशी मांडणी शुक्लांनी केली आहे. सध्याची स्थिती आणि शहाजहानचा काळ यांची सांगड घातली आहे. त्या काळातही एक चीफ इंजिनिअर असेल. या कामातून मलिदा काढण्यासाठी त्यानेही उचापत्या केल्या असणार. त्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, म्हणून खटपटी केल्या असतील. शहाजहानच्या दरबाऱ्यांनी इंजिनिअरविरोधात मोर्चेबांधणी केलीच असेल. एकदा या बांधकामात पैसाच पैसा आहे, असे कळाल्यावर त्यावेळच्या काही उचापतखोर लोकांनी विरोध दर्शवून कमाई केलीच असणार, असा विस्तार अतिशय खुमासदारपणे मांडला आहे. दिग्दर्शक त्रिपाठी यांनी संहितेचे मूल्य, त्यातील खाचाखोचा आणि उपहास क्षणाक्षणाला उफाळत, ओसंडत राहिल, याची काळजी घेतली आहे. सादरीकरणाला प्रचंड वेग असला तरी प्रत्येक घाव वर्मी लागेल एवढी मेहनत घेतली आहे. दोन प्रसंगांमधील धागा गुंफणे, व्यक्तिरेखांना संहितेपलिकडे नेऊन सशक्त करणे, संवादशैलीतून अभिनेता, अभिनेत्री बलवान करणे आणि नि:शब्द शब्दांना बोलते करणे ही दिग्दर्शकाची खरी वैशिष्ट्ये किंवा ताकदीची स्थळे मानली जातात. ती त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनात पुरेपुर दिसतात. ‘ताजमहल का टेंडर’ यशस्वी करण्यात जेवढा वाटा लेखकाचा तेवढाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिक दिग्दर्शक त्रिपाठींचा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्रिपाठींनी या नाटकाचे संगीतही दिले आहे. ते देखील चपखल, प्रवाही आणि संहितेला अर्थ देणारे आहे. लेखक, दिग्दर्शकाला हवे तेच अतिशय सू्क्ष्मतेने मांडणारे कलावंत अत्यंत दुर्मिळ. पण या नाटकात तेही जमून आले आहे. शहानवाज खान (शहाजहान) आणि चीफ इंजिनिअर गुप्ता (सुरेश शर्मा) यांचा अभिनय पाहताना त्याचा अनुभव येतो. दोघांनी भूमिकांत अक्षरश: जीव ओतला आहे. असे म्हणतात की, रंगमंचावर वाचिक अभिनय जास्त असतो. म्हणजे संवादफेकीवर व्यक्तिरेखा फुलत जाते. पण काही कलावंत असे असतात की त्यांचा अभिनय संवादासोबत डोळ्यांमधूनही प्रेक्षकांशी बोलू लागतो. असे कलावंत अभिनेते, अभिनेत्री म्हणून ओळखले जाऊ लागतात. शहानवाज आणि शर्मा हे त्यापैकीच एक आहेत. व्यक्तिरेखेवर हुकूमत म्हणजे नेमके काय याचा वस्तुपाठच त्यांनी नव्या पिढीतील रंगकर्मींसमोर उभा केला. इतर कलावंतांमध्ये औरंगाबादचा सिद्धेश्वर थोरात, दीपकुमार, श्रुती मिश्रा, शंपा मंडल, राजू रॉय, अपर्णा मेनन, अपराजिता, मोहनलाल, बर्नाली बोरा, नवीनसिंग ठाकूर आदींनी धमाल केली आहे. ‘ताजमहल का टेंडर’चा पुन्हा प्रयोग औरंगाबादेत झाल्यास तो चुकवू नये, अशीच ती आहे. आपण सारेच अलिकडील काळात शोषणाविरुद्ध मूक, अंध, बहिरे नायक होऊ लागले आहोत. हे नाटक पाहून भ्रष्ट नोकरशाहीविरुद्ध मनात छोटीशी ठिणगी पडली तरी पुढील काही वर्षात काही काळापुरता का होईना वणवा पेटेल, अशी अपेक्षा आहे.

Thursday 28 June 2018

कवडीचे दान अन् शंभराचे नगारे

एकही काम, एकही घोषणा, मोहीम टोकाला जाईल. शंभर टक्के पूर्ण होईल. लोकांना दिलासा मिळेल, असा साधा प्रयत्नही औरंगाबाद महापालिका करत नाही. त्यामुळे सगळे प्रश्न, समस्या जैसे थे राहतात. फक्त गेल्या वर्षी एखाद्या भागात असलेले संकट दुसऱ्या वर्षी थोडेफार बदल होऊन दुसऱ्या वसाहतीवर कोसळलेले असते. नारेगाव येथे नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम ज्या प्रकारे दोनच दिवसांत फसली. त्यावरून हे स्पष्ट होते. २००६ च्या जुलै महिन्यात पहिल्याच आठवड्यात औरंगाबादेत तुफानी पाऊस झाला. हर्सूल तलाव तुडुंब भरून वाहू लागला. पाहता पाहता खाम नदीला पूर आला. अब्रार कॉलनी, जहागिरदार कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, जटवाडा ते थेट बेगमपुऱ्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या घरात पाणी शिरले. रात्रभर जागून अग्निशमन विभागाचे तत्कालिन प्रमुख शिवाजी झनझन यांच्या नेतृत्वातील पथकाने ८० कुटुंबे सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवली. ८० मिलिमीटर पावसात हे हाल तर पुढे काय होईल, असा प्रश्न त्यावेळी मनपाच्या स्थायी समिती बैठकीत विचारला गेला. त्यावेळचे सभापती काशिनाथ कोकाटे यांनी चौकशी, कारवाईचे आदेश दिले. असीमकुमार गुप्ता यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनुसार एक संस्था सर्वेक्षणासाठी नियुक्त केली. तेव्हा असे लक्षात आले की, खाम नदीच्या पात्रात अनेक घरे बांधली गेली आहेत. ही बांधकामे होत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे सवयीनुसार दुर्लक्ष केले आहे. आता भविष्यात लोकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर ही अतिक्रमणे काढावी लागतील. नदीचे पात्र किमान ८० फूट रुंद करून खोलही करावे लागेल. गुप्ता यांचे तर असेही म्हणणे होते की नदीच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंतही बांधूयात. तत्कालिन महापौर किशनचंद तनवाणी यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी योजना अतिशय उपयुक्त आणि सुंदर आहे. खाम नदी म्हणजे औरंगाबादचे एकेकाळचे वैभव आहे. या नदीचे पुनरुज्जीवन झालेच पाहिजे, असे म्हटले. पहिल्या टप्प्यात अतिक्रमणे काढा, असे फर्मान काढले गेले. त्यानुसार पथक तेथे पोहोचले आणि जोरदार दगडफेक सुरू झाली. लोक जेसीबी मशिनसमोर आ़डवे पडले. काहीजणांनी कागदपत्रे, नकाशे आणले. त्यात नदीचे पात्र त्यांच्या शेतातून गेल्याचे दिसत होते. एकाची शेती दुसराच विकून मोकळा झाला होता. तिसऱ्याने चक्क नदीपात्रात बांधकामाची परवानगी मिळवली होती. ते पाहून गुप्ताही चकित झाले. एक-दोन शेड, तीन-चार बांधकामे पाडून मोहीम गुंडाळण्यात आली. नारेगाव येथेही तसेच होईल, अशी दाट शक्यता आहे. शनिवारी अचानक तेथील बिस्मिल्ला कॉलनी, आनंद गाडेनगर, अजीज कॉलनीतील किमान ५०० घरांत पाण्याचा लोंढा शिरला. पाणी नेमके कुठून येतेय, तेच लोकांना कळेना. त्यांनी रात्र कशीबशी जागून काढली. नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके यांनी दुसऱ्या दिवशी पाहणी केली. तेव्हा कुठे त्यांना नाल्यावर बांधकामे झाली असून सुखना नदीच्या पाण्याला जाण्यासाठी वाट शिल्लक राहिली नसल्याने ते नाल्यात आणि तेथे जागा नसल्याने लोकांच्या घरात घुसल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी संपर्क साधला. मोर्चा काढण्याचा इशारा दिला. मग महापौरांनी तातडीने अतिक्रमणे काढणार अशी घोषणा केली. त्यानुसार जेबीबी मशिन पोहोचले आणि नाल्यात फसले. दोन दिवसांत फक्त दहा बांधकामे काढण्यात आली. त्यावरून महापालिकेच्या कामाचा वेग लक्षात येऊ शकतो. दुसरीकडे ज्यांची बांधकामे आहेत, त्यांनी आरडाओरड सुरू केली आहे. नाल्यात घरे नाहीतच, असा पवित्रा घेतला जात आहे. तो पुढे आक्रमक होईल आणि फक्त नाला काही भागांत थोडासा रुंद करून मोहीम फसवली जाईल, अशी दाट शक्यता आहे. तसे झालेच आणि मोठा पाऊस झाला तर चार-पाच बळीही जाऊ शकतात, हे गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आता महापौर घोडेले आणि आयुक्त डॉ. निपूण विनायक नेमके काय करतात, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. यासोबत दुसरी मोहीम आहे प्लास्टिक बंदीची. २५ जूनपासून ती सुरू होणार होती. पण पहिल्याच दिवशी पथके वाहनांच्या प्रतीक्षेत बसून राहिली. आयुक्त बैठकांमध्ये अडकले. पहिल्या दि‌वशी प्लास्टिक बंदीचा धडाका असे काहीच झाले नाही. दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी किरकोळ कारवाई झाली. प्लास्टिक बंद कायद्यात काही गोष्टी स्पष्ट नाहीत. ज्या स्पष्ट आहेत. त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत अचूकपणे पोहोचलेल्या नाहीत. नेमके काय करायचे, असा त्यांचा प्रश्न आहे. एका भागात कारवाई केली की लोक तुम्ही तिकडे का जात नाहीत, असे म्हणू लागले आहेत. व्यापाऱ्यांनीही विरोध सुरू केलाय. महापौर नेहमीप्रमाणे सगळ्यांना समजून घ्या, अशी भूमिका घेत आहेत. दुसरीकडे कचरा प्रश्नावर आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सारंग टाकळकर यांनी काही संवेदनशील, जागरूक नागरिकांच्या मदतीने बंदी असलेले प्लास्टिक गोळा करण्यासाठी संकलन केंद्रे सुरू केली आहेत. आणि प्लास्टिक बंदी मोहीमेचे प्रमुख म्हणून वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते किती कल्पकतेने जनजागृती करतात यावरच मोहीमेचे यश अपयश अवलंबून राहणार आहे. आता तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांचा. राज्य शासनाने वर्षभरापूर्वी म्हणजे २७ जून २०१७ रोजी रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये मंजूर झाले. त्यास वर्ष उलटून गेले तरी एक इंचही काम पुढे सरकलेले नाही. एका पदाधिकाऱ्याच्या आवडीचा ठेकेदार दुसऱ्यांच्या पसंतीस पडला नाही. केवळ एवढ्या कारणासाठी १५ लाख औरंगाबादकरांची घोर फसवणूक सुरू आहे. कचरा निर्मूलन प्रकल्पाचा कचरा सर्वांच्या साक्षीने होत आहे. कवडीचे दान दिल्यासारखे दाखवायचे आणि शंभराचे नगारे वाजवण्यात ही सारीच मंडळी वाकबगार झाली आहेत. आणि जोपर्यंत शहरातील प्रत्येक मतदार विलक्षण जागरूक आणि जाब विचारणारा होत नाही. तोपर्यंत नगारे वाजवणे सुरूच राहणार आहे.

Thursday 21 June 2018

मशाली, टेंभे पेटवावेत?

‘सायंकाळ होताच ढग दाटून आले. थोडा वारा सुटला. आणि रोज जे होते. तेच पुन्हा घडले. सारिकाने मेणबत्त्या पेटवल्या. दोन्ही खोल्यांत नेऊन ठेवल्या. पलिकडच्या घरातील कविताने काही दिवसांपूर्वीच माळ्यावरून काढलेला कंदील लावला. अनेक वर्षांपासून छोटेखानी किराणा दुकान चालवणारे मोहंमद शमसुद्दीन जड अंतकरणाने मेणबत्त्या पेटवू लागले. तर कोपऱ्यावर कापडाचे थोडे मोठे दुकान असलेले व्यापारी कांतीलाल काबरा यांनी  गिऱ्हाईकांची माफी मागत त्यांच्याकडील मोबाईलचा टॉर्च ऑन करण्यास सांगितले. त्याचवेळी सामाजिक सभागृहात सुरू असलेली बैठक मोडीत निघू नये म्हणून निलेशने मोठी मशालच पेटवून आणली. मध्यम, उच्चमध्यमवर्गीयांच्या घरातील इन्व्हर्टर लागले. पाहता पाहता पावसाने जोर धरला. डासांचे थवे घराघरात शिरू लागले. त्यांना हाकलता हाकलता लोक हैराण झाले. सारे शहर मिणमिणू लागले. मध्यरात्रीनंतर कधीतरी वीज परत आली.’ असे औरंगाबाद शहरांतील वसाहतींचे वर्णन पुढे एखाद्या कथेत, कादंबरीत आले तर आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती आहे. पावसाचा पहिला थेंब ढगातून निघताच आणि वाऱ्याची एखादी झुळूक येताच वीज गायब होत आहे. पाऊस आला. वारा सुटला, याचा आनंद घ्यायचा सोडून लोकांना वीजेच्या संकटाशी झुंजावे लागत आहे. बरे, औरंगाबादचे बहुतांश लोक इतके सहनशील आणि समंजस झाले आहेत की पाऊस आला म्हणजे वीज जाणारच, असे त्यांनी मनाशी पक्के करून घेतले आहे. उन्हाने तापलेल्या तारांवर पाणी पडताच ट्रिपिंग होते आणि वीज गायब होते. खूप मोठ्या भागात अंधार पसरल्यावर कोणीतरी फ्युज कॉल सेंटरला तक्रार करते. मग महावितरणचे कर्मचारी धावपळ करतात. त्यांना नेमका फॉल्ट कुठे झाला, हे अंधारात शोधणे कठीण जाते. म्हणून  त्यांना वीज परत आणण्यास थोडासा वेळ लागणारच, अशी चर्चा ते आपापसात करतात वाट पाहून निद्राधीन होतात. हे सारे औरंगाबादमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे. तीन-चार वर्षांपूर्वी जीटीएल कंपनीकडे वीज वितरणाचा कारभार होता. तेव्हा पंधरा मिनिटे वाट पाहून लोक कंपनीच्या कार्यालयावर धडकत. फोन करून भंडावून सोडत. शिवीगाळ करून मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचत असे. तसेच पुन्हा लोकांनी करावे, अशी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वीजेचे वितरण ही अतिशय तांत्रिक बाब आहे. फॉल्ट शोधण्यास वेळ लागू शकतो, याचीही जाणिव आहे. पण किती उशिर लागावा, याला काही मर्यादा आहेत की नाही. मुख्य म्हणजे दररोज अशी वीज गायब होत असेल तर त्यावर कंपनीने अजूनपर्यंत काही उपाय का शोधले नाहीत. कोणत्या भागांत तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल, याचा तपशील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असावा. आणि काही अनुभवी कर्मचारी तर त्यात तरबेज आहेत. ते देखील लोकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत आहेत की काय अशी शंका सामान्य नागरिकांनी व्यक्त केली तर त्यात गैर नाही. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया आणि मुख्य अभियंता सुरेश गणेशकर संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांना या शहरातील समस्या पूर्णपणे माहिती आहेत, असे म्हटले जाते.
कारण दरवर्षी पावसाळ्यापूर्वी  महावितरणची दुरुस्ती मोहीम असते.  पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीज गायब होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी अशी मोहीम प्रत्येक गावांत राबवली जाते. यंदाही मे महिन्यात ही मोहीम झाली. तरीही वीज गायब होणे काही थांबत नाही. त्यामुळे बकोरिया आणि गणेशकर यांना या कामात अधिक लक्ष घालावे लागणार आहे. लोकांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी या दोघांवर आहे. ती ते समर्थपणे पार पाडतील, अशी आशा करण्यास हरकत नाही. पण तसे झाले नाही तर लोकांना घरात मशाल, टेंभे पेटवूनच रात्र काढावी लागेल. व्यापारीवर्गाला मोठा फटका बसेल. आणि मग एक दिवस हाहा:कार उडेल. हे महावितरणच्या तमाम कर्मचाऱ्यांनी ध्यानात घेतले तर अधिक चांगले होईल.  दुसरा महत्वाचा म्हणजे वीस वर्षांपूर्वी औरंगाबादेतील सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणारी ‘ड्रम’ योजना जाहीर झाली होती. सुमारे २०० कोटी रुपये खर्च असलेली ही योजना पूर्ण झाली की, वीज पुरवठ्याच्या साऱ्या समस्या सुटतील. एकही व्यक्ती वीजेच्या तारेचा धक्का बसून मरण पावणार नाही. कारण खांबांवर, रस्त्यांवर तारा राहणारच नाहीत. त्या सगळ्या जमिनीखालीच असतील. पावसाळ्यात वीजेचा लपंडाव चालणार नाही, असेही सांगण्यात आले होते. याच कालावधीत औरंगाबाद शहरात ६७ एमएलडी (दशलक्ष लिटर) वाढीव पाणी आणण्यासाठी ६७ कोटी रुपयांची योजना जाहीर झाली होती. दोन्ही योजनांचा पैसा तर खर्च झाला पण अपेक्षित फायदा झालाच नाही. ६७ कोटी खर्चूनही पाणी टंचाई कायम आहे. तर २०० कोटी खर्चून लोकांच्या नशिबी हाल कायम आहेत. कारण ती योजनाच पूर्णपणे संगनमताने झाली आहे. त्यावर खल करणे म्हणजे वेळ घालवण्यापलिकडे काहीही नाही. म्हणून आता जी काही यंत्रणा उपलब्ध आहे. तीच बकोरिया, गणेशकर यांनी वेगवान केली. लोकांची तक्रार येण्याआधीच दुरुस्तीचे काम सुरू झाले तर लोक त्यांना कायम ‘प्रकाशदूत’ म्हणून दुवा देतील.

Friday 15 June 2018

कहाणी नायकाची पण...

समाज कायम नायकाच्या शोधात असतो. पण याच समाजातील मोठा वर्ग खलनायकाच्याही प्रेमात पडतो. त्याच्याभोवतीच गुंतून राहतो. ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ हे अफलातून पुस्तक वाचतानाही अशीच गुंतवणूक होते. आपल्याकडे एक प्रवाह उघड किंवा छुपेपणाने खलनायकाबद्दल आपुलकी, आकर्षण ठेवून असतो. वाईट असल्याशिवाय चांगल्याचं महत्व कळत नाही. कौरव होते म्हणून पांडवांची इतिहासात नोंद झाली. रावण नसता तर रामाचे काय झाले असते, असेही प्रश्न या प्रवाहातून, वर्गाकडून उपस्थित केले जातात. रावणाची मानसिकता समजावून घ्यावी. त्याने उगाच सीतेला पळवून नेले नाही. तो देखील दशग्रंथी ब्राह्मण होता. विलक्षण बुद्धीमान होता. त्याने रामाशी वैर का पत्करले, याचाच अभ्यास केला पाहिजे. सगळेच रावणाचे चुकले असे म्हणता येणार नाही. उलट रामच आक्रमक, पत्नीवर ‌अन्याय करणारा होता, असेही सांगितले जाते. रावणालाच नायक घोषित केले जाते. दक्षिण भारतातील तीन राज्यांचे सरकार तब्बल २० वर्षे हलवून टाकणाऱ्या कुसे मुनिस्वामी वीरप्पनबद्दलही हेच झाले आहे. सुमारे ६५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या घनदाट जंगलात त्याचा वावर होता. चंदन अन्‌ हस्तिदंताच्या चोरीत तो कुख्यात होता. त्याने थोड्याथोडक्या नव्हे १२४ जणांची पाशवी हत्या केली. कन्नड चित्रपटांचे सुपरस्टार राजकुमार यांचे अपहरण केल्यावर तो जागतिक पातळीवर पोहोचला होता. पण तत्पूर्वीच त्याला प्रसारमाध्यमांनी हिरो करून टाकले होते. त्याच्याविषयीच्या बातम्या मीठ मसाला लावून त्या पेरल्या, उगवल्या गेल्या. एकेकाळी तमाम पोलिस दलाला झुकांड्या देणारा वीरप्पन एका दैनिकाच्या संपादकाला मुलाखती देत होता, यावरून त्याचे माध्यमांवरील प्रेम आणि पकड लक्षात येते. शिवाय माध्यमांनाही खलनायकालाच नायक करण्याची किती मनापासून आवड असते, हेही स्पष्ट होते. असे होण्यामागे एक कारण असते की, आपला समाजच मुळात ढोंगी आहे. तो त्याची मते स्पष्टपणे, निधड्या छातीने फारच क्वचितपणे व्यक्त करत असतो. त्याचे वागणे, बोलणे आणि खरीखरी मते यात बऱ्याचवेळा अंतर असते. खलनायकातील लढाऊ वृत्तीचे, सरकारी यंत्रणेविरुद्ध रक्तपात करण्याच्या धाडसाचे समाजाला कमालीचे आकर्षण असते. म्हणून चित्रपटातील गब्बरसिंग, लॉयन, मोगँबो असे खलनायकही व्यक्तिरेखा, अभिनयाच्या पलिकडे जाऊन लोकप्रिय होऊ लागतात. हे तर समाजाचे, प्रसारमाध्यमांचे झाले. पण ज्या अधिकाऱ्याने वीरप्पनच्या जीवनाची अखेर केली. त्यानेच लिहिलेल्या पुस्तकातूनही वीरप्पनविषयी आकर्षणाचा, प्रेमाचा गंध पसरत असेल तर त्याला काय म्हणावे? पण तसे घडले आहे. वीरप्पनला यमसदनाला पाठवणारे तमिळनाडू स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख के. विजयकुमार यांनी लिहिलेल्या ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ या राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकात ते जाणवत राहते. पण यात विजयकुमार यांचा मुळीच दोष नाही. कारण प्रसारमाध्यमांनी वीरप्पनची निर्माण केलेली प्रतिमा मोडून काढण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. त्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्नही केला. तशी शब्दरचना, मांडणी केली आहे. वीरप्पनविरोधात लढलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या शौर्यकथा तपशीलासह सांगितल्या आहेत. पण तरीही...तरीही वाचकाचे मन खलनायकाच्या भोवतीच एका सुप्त आपुलकीने फिरत राहते. कारण पोलिस दल, सरकार म्हणजे कमालीच्या भ्रष्ट, किडलेल्या यंत्रणा आहेत. त्या सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठी निर्माण केल्या असल्या तरी प्रत्यक्षात गोरगरिब, सामान्यांना पिळून काढणाऱ्या, छळणाऱ्याच आहेत, याची पूर्ण खात्री लोकांना झाली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वीरप्पनविषयीच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक खऱ्या, खोट्या कहाण्या या ना त्या मार्गाने आधीच पोहोचल्या आहेत. एक डाकू २० वर्षे तीन राज्यांच्या सरकारांना सळो की पळो करून सोडतो. पण त्याचवेळी तो गोरगरिबांना मदत करत राहतो. आणि शेवटी जिवंत पकडला जात नाहीच. त्यामुळे तर त्याच्या धाडसाविषयी अप्रूप, कौतुक, आकर्षणाचा धागा बांधला जाणे अपरिहार्य आहे. तोच धागा ‘वीरप्पन विरुद्ध विजयकुमार’ पुस्तकात मजबूतीने बांधला गेल्याचे जाणवत राहते. म्हणूनच हे पुस्तक कमालीचे वाचनीय आणि विलक्षण रंजक झाले आहे. प्रास्ताविकात के. विजयकुमार यांनी लिहिलेली ‘लपणारी टीम आणि शोधणारी टीम यांच्यातील खेळात नव्वद टक्के वेळा जिंकते ती लपणारी टीम’ ही पहिलीच ओळ मेंदूत एखादी गोळी घुसून बसावी तशी घुसते. ती पुस्तकातील शेवटची ओळ संपल्यावर आणखीनच खोलवर जाऊन ठसठसू लागते. काही पाने पुन्हा वाचण्यास भाग पाडते. एखादा चित्रपट पाहिल्याचा अनुभव देते. एवढी सगळी मांडणी प्रभावी, नाट्यमय झाली आहे. के. विजयकुमार यांनी अतिशय तमाम सरकारी फायली तपासून त्यातील नोंदीनुसार प्रामाणिकपणे लेखन केल्याने ते शक्य झाले आहे. वीरप्पनला कोंडीत पकडण्यासाठी त्याकाळी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी जीव जोखमीत टाकला. त्यांचीही माहिती त्यांनी दिली. एवढ्या कुख्यात डाकूला मारल्यानंतर त्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेण्याचे त्यांनी विनम्रपणे टाळले आहे. एवढेच नव्हे तर स्वतःकडून ज्या चुका झाल्या. त्याचीही मनमोकळी कबूली त्यांनी दिल्याने पानानिशी पुस्तकातील गुंतवणूक वाढत जाते. याचे श्रेय डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेल्या अनुवादालाही आहे. त्यांनी मूळ इंग्रजी मांडणीचा अतिरेकी प्रभाव मराठी वाचकांवर पडणार नाही. आणि लेखकाला जे गोळीबंद पद्धतीने जे सांगायचे आहे त्याला कोठेही धक्का न लावता सारे प्रसंग खूपच प्रभावीपणे आणले आहेत. पहिल्या १८९ पैकी १७५ पानांवर जागोजागी वीरप्पनची दहशत पसरवलेली आहे. ती मेंदूतील नस न् नस तटतटवते. पटकथा म्हणजे काय. ती कशी लिहावी. त्यात कसे बारकावे असावेत. पटकथेमधून व्यक्तिरेखा कशी विकसित होत जाते. त्याच्या भोवतीचे वातावरण पटकथाकाराला कसे उभे करायचे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे २८७ पानांचे पुस्तक आहे. नाटक, चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या तसेच अभ्यासकांनीही जरूर ते वाचावे, इतके त्याचे मूल्य नक्कीच आहे. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी वाहव्वा, अशी दाद देण्यासारखी आहे. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर किमान दोन-तीन वेळा रेखाटने, फोटो बारकाईने नजरेखालून घालावेसे वाटतात, यातच भावसार यांची ताकद स्पष्ट होते. मुग्धा दांडेकरांची अक्षर जुळणी, डॉ. सुलभा बोरसे यांचे मुद्रीतशोधन पुस्तकाची उंची वाढवत नेते आणि एकूणात सारेच टीम वर्क जमून आल्याने वाचकाची टीम विजयी ठरते. 

Thursday 7 June 2018

नका ओलांडू रस्ता डोळे बंद ठेवून


तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद महापालिकेला डॉ. निपुण विनायक यांच्या रुपाने आयुक्त मिळाले आहेत. दिल्लीतून ते थेट औरंगाबादेत दाखल झाले आहेत. दिल्लीश्वर असले तरी त्यांचा मराठवाड्याशी चांगला परिचय आहे. नांदेड महापालिकेत त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. स्वच्छता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. नांदेडमध्ये असताना आवडीचा विषय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्यामुळेच तेथील गोदावरीचे घाट, गुरुद्वारा परिसर बऱ्यापैकी स्वच्छ झाला होता. प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन कामे करणे अनेक बड्या अधिकाऱ्यांना मनापासून आवडते. बरीच अवघड आव्हाने हे अधिकारी माध्यम प्रतिनिधींच्या मदतीने परतवून लावत असतात. काहीजणांच्यासमोर आव्हाने उभी करण्यासाठी माध्यमांची मदत घेत असतात. डॉ. निपुण मात्र अशा अधिकाऱ्यांपैकी नाहीत. आपण आपले काम करत राहायचे. माध्यमांनी दखल घेतली तर ठीक. नाही घेतली तर फार काही बिघडत नाही, असा त्यांचा स्वभाव आहे. दैनंदिन कामांची माहिती, प्रशासनातील अनुभव माध्यमांपेक्षा ब्लॉगवर शेअर करण्यात त्यांना रुची आहे. असे घडण्यामागे नांदेडमधील एक घटना कारणीभूत आहे. तेथे डॉ. निपूण स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम करत असताना तेथील एका पत्रकाराने त्यांच्याविषयी उलटसुलट लिखाण केले. वैयक्तीक अडचणी बाजूला ठेवून डॉ. निपूण वसाहतींमध्ये फिरत असल्याचे दिसत असूनही ते गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. तेव्हापासून माध्यमांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. औरंगाबाद स्वतः अतिशय संथगतीने बदलणारे शहर असले तरी येथे येणारे बडे अधिकारी वेगाने बदलत जातात. त्यांच्या धारणा विरून जातात. त्यांचे सारे निश्चय ढासळतात. कार्यपद्धतीही बदलून जाते. जुन्या रस्त्यांनी चालणे टाळताच त्यांना काही नवेच मार्ग सापडू लागतात, असा अनुभव आहे. त्यामुळे येथे  डॉ. निपुण यांनी माध्यमांबद्दलचा दृष्टीकोन बदलावा, अशी अपेक्षा आहे. कारण या शहराच्या विकासाची गती गेल्या काही महिन्यांपासून एकाच जागी थबकली आहे. ती पुढे नेण्यासाठी राजकारणी, प्रशासनासोबत माध्यमांचीही सकारात्मक मदत झाली तर डॉ. निपुण यांचे काम थोडे सोपे होईल. अर्थात हे करताना त्यांना एक पथ्य पाळावे लागेल. ते म्हणजे डोळे बंद ठेवून रस्ता ओलांडण्याची चूक करता येणार नाही. मूळ चंदीगडचे रहिवासी असलेल्या डॉ. निपुण यांना तेथील चौकोनी रस्त्यांची, शिस्तीच्या वाहतुकीची सवय असेल. इथे नेमके उलटे आहे. एकही चौक चौकोनात नाही. शिस्त ना वाहतुकीला आहे ना कामकाजाला. अगदी हिरवा दिवा लागला म्हणून तुम्ही निघालात तरी विरुद्ध बाजूचा माणूस त्याच्याकडील लाल दिवा असतानाही सुसाटत येऊन तुमच्यावर धडकत निसटू शकतो. आणि महापालिकेच्या कारभारात तर असे अनेकजण खास आयुक्तांवर धडकण्यासाठीच नियुक्त केले आहेत. नव्या आयुक्तांना जेरीस आणण्याच्या एकापेक्षा एक सरस युक्त्या केल्या जातात. लोकांनी मोठ्या विश्वासाने विकास कामांसाठी तिजोरीत जमा केलेला पैसा आपल्याच मालकीचा आहे, याची त्यांना पुरती खात्री पटलेली आहे. त्याच्या आड येणाऱ्यास ते सोडत नाहीत. म्हणून बांधकाम परवानगी, ठेकेदारांच्या बिलांच्या फायलीवर सह्या केल्या नाही की काही जुनाट, किचकट नागरी समस्या आयुक्तांपुढे उभ्या केल्या जातात. काही अधिकारी, पदाधिकाऱ्यांना हव्या त्या ठेकेदाराला काम मिळाले नाही की समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष असे म्हणून मोर्चे काढले जातात. आंदोलने होतात. बिले मिळवण्यासाठी नगरसेवक अधिकाऱ्याला मारहाण करतात. काही अधिकारी नगरसेवकांच्या आडून थेट आयुक्तांवर हल्ला करण्याची हिंमत करतात.बऱ्याच वेळा आयुक्तसाहेब तुम्ही या रस्त्यावरून बिनधास्त डोळे झाकून जा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगितले जाते. आयुक्तांनी दोन पावले टाकून मागे वळून पाहिले तर सांगणारे गायब झालेले असतात. रस्त्याच्या टोकावर उभे राहून तेच पुन्हा ‘पहा ते आयुक्त. डोळे झाकून चालले आहेत. त्यांच्या डोळेझाकीमुळे विकास कामे थांबली आहेत,’ अशी ओरड करू लागतात. या साऱ्याला कंटाळून आयुक्त पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या मनाप्रमाणे वागू लागतात. (काही आयुक्त तर एवढे चलाख निघतात की तेच आल्या आल्या पदाधिकाऱ्यांना गाठून वाटाघाटी करतात. त्यांचा कार्यकाळ सुखाचा जातो.) मग हळूहळू प्रशासनावर मिळवलेली किरकोळ का होईना पकड ढिली होऊन जाते. कोट्यवधींच्या उलाढालीची, लाखो लोकांसाठी महत्वाची असलेली कामे रखडतात किंवा सुमार दर्जाची होऊ लागतात. तसे काही होऊ नये, असे डॉ. निपुण यांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्यांनी सुनसान दिसणारा रस्ता डोळे बंद करून ओलांडण्याची चूक करू नये. हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यांनी १५० कोटींच्या रस्ता कामाच्या निविदा पुन्हा काढण्याचे ठरवले आहे. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी केलेल्या आग्रहामुळे फेरनिविदेत काही रस्ते वाढणार आहेत. एखादा माजी पदाधिकारी शहराच्या हिताचा एवढा विचार करतो, हे पाहून आनंद वाटला. आता तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी इतरांनी स्वीकारली पाहिजे. वर्षभरापूर्वी मिळालेल्या निधीचा अजूनही वापर झालेला नाही. कारण पहिल्यांदा निविदा काढताना फक्त एका ठेकेदाराचे हित पाहण्यात आले. म्हणून बाकीचे ठेकेदार कोर्टात गेले. त्यात विकासाचे काम थांबले. समांतर जलवाहिनी योजनेच्या १४४ कोटींचेही तसेच झाले आहे. आता पुन्हा रस्त्याची निविदा काढताना डॉ. निपुण यांनी सर्व प्रकारच्या वाटाघाटीचे प्रयत्न मोडून काढले पाहिजेत. ठेकेदारांच्या आडून घाव घालणाऱ्यांवर कठोर घाव घातलेच पाहिजेत. अगदी कोणी एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असो किंवा नेता, उपनेता असो त्याची गय करू नये. रस्त्यांची कामे नियमानुसार, कायद्यावर बोट ठेवूनच दिली जातील. तुमच्या लाडक्या ठेकेदाराला तुम्हीच समजावून सांगा, असे त्यांना बजवावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक इंच रस्ता दर्जेदारच होईल, याची काळजी डॉ. निपुण यांना स्वतः घ्यावी लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर त्यांनी तपासणी ठेवली तर कामाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा आतापर्यंतचा अनुभव सांगतो. इथे अनेकांचे समाधान केवळ स्वतःच्या तुंबड्या भरून होत नाहीत. त्यांना गोदामे ठासून भरून घ्यायची आहेत. त्यांचा डाव डॉ. विनायक कसा ‘निपुण’तेने हाणून पाडतात. याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले आहे. कारण फक्त लक्ष ठेवायचे. फार आवाज उठवायचा नाही. जात-धर्म, पंथावरच मतदान करायचे असा औरंगाबादकरांचाही स्वभाव झाला आहे. 

Tuesday 29 May 2018

सातत्य असेल तरच

औरंगाबादने मराठी, हिंदी कला जगताला अनेक उत्तम कलावंत, लेखक, दिग्दर्शक मिळवून दिले. आता या शहरातील नव्या कलावंतांना फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण मिळण्याची सुविधा एमजीएमने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. यातून निश्चितच कलेचा प्रांत उजळून निघेल. एरवी अनेकजण सभा, समारंभांमध्ये बोलताना कला क्षेत्रात नवनवे प्रयोग झाले पाहिजेत. मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हणतात. प्रत्यक्षात त्यासाठी फारसे काही करत नाहीत. पण एमजीएमने हे केले. त्याबद्दल एमजीएमचे सर्वेसर्वा अंकुशराव कदम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भार मानावे तितके कमी आहे. आपण केवळ कलावंतासाठी बोलत नाही तर करून दाखवतो, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी आणि तरुण पिढीतील अभ्यासू चित्रपट दिग्दर्शक अशी ओळख असलेले शिव कदम यांच्यावर कदम यांनी फिल्म मेकिंग विभागाची धुरा सोपवली आहे. हेही महत्वाचे आहे. कारण कदम यांना मराठवाड्याची संस्कृती, येथील तरुण कलावंतांच्या क्षमता, अपेक्षा बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे सातत्याने अगदी दरमहा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. तर फिल्म मेकिंग विभागाचे योगदान इतिहासात नोंदवले जाईल. कदम यांनी या दृष्टीनेच आखणी आणि पुढील वाटचाल करावी, अशी अपेक्षा आहे. सातत्याचा कॅमेरा हाच त्यांच्या वैयक्तीक यशाचाही मार्ग असेल. त्यांच्याकडे चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक अंगांविषयी बराच अनुभव आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी चांगला परिचय आहे. या सगळ्याचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी शिव कदम यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्यांच्यावरच या विभागाचे, अभ्यासक्रमाचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यांना या कामात प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर मदत करणार आहे. फिल्म मेकिंगसाठी प्रवेशाकरिता सुमारे 650 जणांनी विचारणा केली होती. त्यातील 50 जणांची कार्यशाळा कदम, कार्येकर यांनी घेतली. त्यापैकी 20 जणांची निवड केली जाणार आहे. एवढी मोठी चाळणी लागली असल्याने ज्यांना खरंच चित्रपट क्षेत्रात स्वारस्य आहे. तंत्र जाणून घ्यायचं आहे, अशीच मुले वीस जणांत असतील, असे वाटते. अर्थात फिल्म मेकिंग अभ्यासक्रम म्हणजे केवळ अभियन, लेखन, दिग्दर्शन एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर त्यात साऊंड रेकॉर्डिंग, स्र्क्रीन प्ले रायटिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा अनेक तांत्रिक अंगांचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. खरेतर हा अभ्यासक्रम विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात अपेक्षित होता. पण तो एमजीएममध्ये सुरू होत असेल तरी त्याचे स्वागत करावे लागेल. शेवटी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळणे महत्वाचे आहेच. सर्वात महत्वाचे म्हणजे फिल्म मेकिंग म्हणजे थेट चित्रपट किंवा टीव्ही मालिका अशी मर्यादा राहिलेली नाही. कंपन्यांची उत्पादने, सामाजिक समस्यांची मांडणी, दिग्गजांच्या ऑटोबायोग्राफी यातही कॅमेरा कमाल करू शकतो. त्यातून बराच पैसाही मिळू शकतो. काळाची गरज लक्षात घेता हा अभ्यासक्रम योग्यवेळी सुरू झाला असे वाटते.  
कदम कुटुंबियांनी 1980 च्या दशकात औरंगाबादच्या शैक्षणिक वर्तुळात प्रवेश केला. तेव्हा एक राजकारणी पैसा, प्रतिष्ठा कमावण्यासाठी आल्याची चर्चा सुरू झाली. कारण सिडकोतील कोट्यवधी रुपये किंमतीची जागा कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार यांच्यामुळे कदमांच्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टला नगण्य किंमतीत मिळाली होती. म्हणून एमजीएम ट्रस्ट शिक्षणाचा बाजार सुरू करणार, असा सूर त्यावेळी लागला होता. अर्थात कदम बडे राजकारणी. औरंगाबादेत इतर शिक्षण संस्थांचे संचालक समाजवादी, डावे किंवा काँग्रेसच्या ध्येय धोरणांवर चालणारे. त्यामुळे सूर नेहमीच दबक्या आवाजातील होता. तरीही त्यात तथ्य नव्हते, असे म्हणता येणार नाही. कारण खासगी मेडिकल, इंजिनिअरिंग महाविद्यालयांची दारे एमजीएमनेच त्या काळात उघडी केली. शेकडो उत्तम अभियंते, डॉकटर खासगीकरणाच्या वाटेने तयार झाले. त्यातून एमजीएमच्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. कोट्यवधींची उलाढाल करणारे नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले. कदम कुटुंबांचा रुतबा उंचावला. कारण त्यांनी शैक्षणिक जग कवेत घेताना बऱ्याच प्रमाणात जनसेवा कायम ठेवली. अत्यल्प मोबदल्याच्या अपेक्षेनेही काही केले पाहिजे, याकडे लक्ष दिले. जर्नालिझम, नाट्यशास्त्र. महागामी (शास्त्रीय नृत्य) असे फार उलाढाल नसलेले विषय त्यामुळेच सुरू झाले. नाट्यशास्त्र विभागात त्यावेळी प्रा. डॉ. राजू सोनवणे यांनी अनेक प्रयोग केले. हा विभाग नावारुपालाही आणला होता. विविध स्पर्धांमधून बक्षिसेही मिळवली. प्रख्यात कलावंत प्रा. डॉ. दिलीप घारे यांनीही बरेच योगदान दिले. पण हे दोघेही एमजीएममधून बाहेर पडल्यावर सगळेच थंडावले होते. आता फिल्म मेकिंगमुळे कॅमेऱ्यासाठी लेखन, दिग्दर्शन अभिनय करू इच्छिणाऱ्यांना नव्या जगात प्रवेश करता येईल. काही उत्तम तंत्रज्ञ तयार होतील. कॅमेरा हे प्रचंड ताकदीचे माध्यम आहे. अलिकडे मोबाईलमधील कॅमेराही चक्कपैकी छोटेखानी फिल्म चित्रित करू लागला आहे. त्याला फक्त कल्पक दिशा दिली की तो साऱ्या चौकटी मोडून टाकतो. नवे अद्‌भुत जग निर्माण करत नजरा खिळवून टाकतो. अशा चौकटी मोडत आणि नवे विश्व निर्माण करणारे कलावंत सर्वांना पाहायचे आहेत. शिव कदम आणि त्यांचे सहकारी ही संधी मिळवून देतील, अशी अपेक्षा आहे.


Wednesday 16 May 2018

एवढी निर्मळ मने आहेत का?

जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर शांतता नांदलेली वर्षे अत्यंत कमी आढळतात.  कारण हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव आहे. त्याच्या रोमारोमात कमी-अधिक फरकाने हिंसा भरलेली आहेच. रक्त सांडणे, सांडलेले रक्त पाहणे आणि रक्तपात करणाऱ्यांना विजयी वीराच्या नजरेने पाहणे हादेखील  माणसाचा स्थायी भाव आहे.  अगदीच एखाद्याला थेट हिंसाचार जमला नाही तर तो खालच्या पातळीवर उतरत किमान कोणाला तरी अर्वाच्य बोलून, शिव्या घालून हिंसेची भूक भागवेल. हेही जमले नाही तर एखादी मुंगी तरी मारेलच. अशा या माणसाला तर जाती-धर्माच्या नावाखाली हिंसा घडवून आणण्याची मोकळीक मिळाली तर तो राक्षसासारखा कसा वागतो, याचा अनुभव गेल्या आठवड्यात जुन्या औरंगाबादने घेतला. एकमेकांना पाहत लहानाची मोठी झालेली अनेक तरुण मुले एकमेकांवर तुटून पडली.  दगडा-विटांचा मारा केला. पेट्रोल, रॉकेल बाँब फेकले. घरे, दुकाने, वाहने पेटवून दिली. पोलिसांवरही हल्ले चढवले. त्यात सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह अनेक पोलिस जखमी झाले. दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाचा, तरुण मुलाचा बळी गेला. हे सर्व करून अखेरीस काय साध्य झाले, असा प्रश्न हातात  दगड, विटा, पेट्रोल बाँब घेणाऱ्यांनी स्वत:च्या मनाला प्रामाणिकपणे विचारला, तर काहीच हाती लागणार नाही. पण त्या वेळी दंगलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात आपण प्रतिकार केला नाही, चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जगू शकणार नाही, असे भय वाटत होते. समोरच्याला आपली शक्ती दाखवून दिलीच पाहिजे, असेही काही जणांना वाटत होते. आणि हे भय निर्माण करून देणारे त्यांचेच भाईबंद होते. आता जेव्हा पोलिसी कारवाई सुरू होईल तेव्हा काही भाई जबाबदारीचा दरवाजा ‘बंद’ करतील. उरलेले दोन-तीन वर्षे मदत करतील आणि नंतर स्वत:च्या कामकाजात गुंग होऊन जातील. एखाद् दुसरा दंगलखोर नेता म्हणून तयार होईल. आणि मग तोही आपल्या समूहाच्या मनात भीती निर्माण करून स्वत:ची नेतेगिरी अधिक मजबूत कशी होईल, याचीच आखणी करू लागेल. कारण औरंगाबादेत पुढे जायचे असेल तर हिंसाचार करणे, तेढ वाढवणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्याला कळलेले असेल. याच मार्गावरून चाललो तर लोक आपल्यासोबत राहतील, हे त्याला पक्के ठाऊक झाले असणार. जोपर्यंत औरंगाबादकर हे रस्ते बंद करत नाहीत तोपर्यंत हिंसाचार होतच राहणार आहे. गरिबांचे मरण ओढवून तेढ वाढवणाऱ्यांचे खुंटे बळकट होत जाणार.  शहराचे एकेक पाऊल मागे पडत राहणार. माजी महापौर रशीद मामू नेहमी असे सांगतात की, जेव्हा कधी औरंगाबादेत हिंदू-मुस्लिम समाज मागे जे झाले ते विसरून एक येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी क्षुल्लक घटनेवरून एवढी पेटवापेटवी होते की दोन्ही समाज पुन्हा एकमेकांपासून दूर जातात. केव्हा केव्हा असे घडले याच्या नोंदीही ते देतात. पण एवढा गाढा अनुभव असला तरी नेमके कोण हे घडवून आणते, याविषयी त्यांच्याकडे ठोस माहिती नाही. मात्र, रशीद मामू म्हणतात तसे घडले आहे हे खरेच आहे.  मोतीकारंजा येथील अनधिकृत नळ जोडणीविरुद्धची मोहीम कायद्याच्या चौकटीतीलच होती. वर्षानुवर्षे मोफत, मुबलक पाणी वापरणाऱ्यांवर उशिरा का होईना कारवाई सुरू झाली होती. त्यात एका धार्मिक स्थळाची जोडणी तोडण्यात आली. त्यावरून झालेला वाद मिटलाही होता. तेवढ्यात त्यावर एका गटाने फुंकर मारली आणि वणवा भडकला. शहागंज, राजाबाजार, नबाबपुरा, चेलिपुरा, काचीवाड्यात त्याच्या उडालेल्या भडक्याने औरंगाबादचे नाव जगभरात बदनाम करून टाकले. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश करणारे लच्छू पहिलवान आणि एमआयएमचे नगरसेवक विरोधी पक्षनेते फिरोज खान यांच्यातील वैयक्तिक वाद या सगळ्याच्या मुळाशी असल्याचे सांगण्यात येते. रमजान ईदनिमित्त शहागंज, सिटी चौकात भरणारा मीनाबाजारही एक निमित्त आहेच. या भागातील काही व्यापाऱ्यांचा मीनाबाजारच्या हातगाड्यांना कडाडून विरोध आहे.  इतर भागांतील अनेक व्यापारी आमच्या दुकानांसमोर हातगाडी नकोच, अशी भूमिका घेत आहेत. त्यासाठी त्यांनी दोन आठवड्यांपूर्वीच प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली होती. पण त्यांना या तक्रारीत पोलिसांनी दखल द्यावी, असे काही वाटले नाही. प्रभारी कार्यभार असताना आणि अतिक्रमण हटावची मूळ जबाबदारी महापालिकेची असताना आपण किती हस्तक्षेप करावा, अशी त्यांची भूमिका होती. औरंगाबाद शहराच्या धार्मिक तेढीचा अभ्यास करून त्यांनी हाताळणी केली असती तर कदाचित पुढचे काही घडले नसते, असे आता वाटते. अर्थात हे सर्व तपासात कितपत ठळकपणे समोर येईल, याविषयी शंका आहे. नेमका दंगा पेटला त्याचवेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील औरंगाबादेत नसल्याचाही परिणाम दिसत आहे. प्रसारमाध्यमांत दीर्घकाळ काम केलेले आमदार इम्तियाज यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत वेळोवेळी कमालीची समंजस भूमिका घेतली. जेव्हा कधी वादाचे, तणावाचे प्रसंग आले तेव्हा त्यांनी त्यांच्या समर्थकांना समजुतीचे चार शब्द ऐकवले. एखादा ऐकण्यास तयारच नसेल तर त्याला फटकारण्यासही मागेपुढे पाहिलेले नाही. पण ११ मे रोजी मध्यरात्रीनंतर हिंसाचार उफाळला तेव्हा ते औरंगाबादेत नव्हते. शिवसेनेच्या बाजूने तर कोणी समजूतदार पूर्वीपासूनच नाही.  मतपेटीची काळजी जशी आता एमआयएमला आहे, तशी शिवसेनेला आधीपासूनच आहे. त्यामुळे ११ मे रोजी मध्यरात्रीनंतर जे घडले ते पुन्हा कधीही घडू शकते. ते खरेच टाळायचे असेल तर पोलिस, वरिष्ठ अधिकारी, सर्व समाजाच्या धार्मिक तरीही समंजस असलेल्या नेत्यांना एकत्र येऊन शांतता आघाडी स्थापन करावी लागणार आहे. तणाव होण्याची चिन्हे दिसू लागताच तेथे धडकून शांततेचा फवारा मारावा लागणार आहे. सत्य उलगडून सांगावे लागेल. हिंसेने तुमचेच नुकसान होणार हे पटवून द्यावे लागेल.  समाज पेटवण्यासाठी दोन हात, एक डोके पुरेसे असते.  पण धार्मिक, जातीय आग शमवण्यासाठी शेकडो हात अन् निर्मळ मने लागत असतात. औरंगाबादेत तर असे शेकडो नव्हे हजारो हात, निर्मळ मने एकोप्याने पुढे यावी लागतील. एवढी निर्मळ मने, हजारो हात इथे आहेत का?