Sunday 21 February 2021

शशी‘कथा’

मोदी, हिंदुत्वावर सतत टीका आणि रुपेरी पडद्यावर चतुरस्त्र भूमिका अशा दुहेरी संगमामुळे तापसी पन्नू प्रसिद्धीच्या झोतात असते. सध्या ती ‘शाब्बाश मिठू’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये गर्क आहे. काही दिवसांपूर्वी तिनेच शूटिंगची काही छायाचित्रे सोशल मिडिआवर टाकून ही माहिती दिली. ‘शाब्बाश’ची कहाणी प्रख्यात महिला क्रिकेटपटू, भारताची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते. राहुल ढोलकिया त्याचे दिग्दर्शन करत आहे. कोरोनामुळे ‘शाब्बाश’चे वेळापत्रक लांबले. मिताली राज म्हणजे भारताची सर्वात यशस्वी खेळाडू. संघर्षातून यशाचे शिखर गाठताना तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. कोणताही सिनेमा चालायचा असेल तर त्यासाठी एक चमकदार गोष्ट लागते. यशस्वी, विक्रम प्रस्थापित करणाऱ्या खेळाडूची जीवनकहाणी विकली जाऊ शकते, याचा काही निर्मात्यांचा अंदाज असतो. त्यामुळेच अलिकडील काळात त्यांनी त्याकडे थोडे जास्त लक्ष वळवले आहे. फरहान अख्तरचा मिल्खासिंग, सुशांतसिंगचा धोनी त्याची काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी प्रियंका चोपडाचा ‘मेरी कोम’ बराच गाजला. भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा यांच्यावर सिनेमा येणार, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. पण ही कहाणी प्रत्यक्षात येण्यात अडचणी येत आहेत. ही सगळी झाली हिंदी जगताची सफर. मराठीमध्ये कायॽ याचे उत्तर काही नाही, असेच म्हणावे लागेल. मराठी खेळाडू राहू द्या. ज्या राजकारणाने अख्खा मराठी मुलुख कायम व्यापलेला असतो. त्यातील एखाद्या मराठी महिलेची गोष्ट पडद्यावर येत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री, पॉवरफूल मंत्री झाली नाही. मराठी निर्माते, दिग्दर्शक गाजलेल्या राजकारण्यांना पडद्यावर आणण्यापासून दूरच राहिले आहेत. अरुण साधू, जब्बार पटेलांचा सिंहासन हा मराठीतील अत्यंत गाजलेला राजकीय सिनेमा. त्यात रिमा लागू वगळता दुसऱ्या महिलेची व्यक्तिरेखा ठसा उमटवत नाही. ती देखील लोचट राजकारण्यांना गळाला लावणारी, नवरा बुळचट असल्याने सामर्थ्यवान सासऱ्यावर भाळलेली दाखवली आहे. भारताच्या राजकारणावर अलिकडे जया जेटली, ममता बॅनर्जी, जयललितांनी प्रभाव टाकला. अर्थात ममता, जयललितांच्या तुलनेत जेटलींचा प्रभाव काळ फारच किरकोळ, मर्यादित राहिला. ममतांवर अद्याप सिनेमा, वेबसिरीज आली नसली तरी नजिकच्या काळात नक्कीच येईल. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेत राजकारणातील महिलांच्या अनेक कहाण्या छोट्या-मोठ्या पडद्यावर येत असल्याचे दिसते. जयललितांवर आधारित एक वेबसिरीज लॉकडाऊनच्या काळात प्रचंड गाजली. दुसरी येऊ घातली आहे. आता आणखी एक वादग्रस्त व्यक्तिरेखा तमिळनाडूत पुन्हा उदयास येऊ पाहत आहे. तिचे राजकारणात काय व्हायचे ते होईल. पण तिचे जीवन एका सिनेमाच्या कहाणीला लाजवेल असे आहे. ती व्यक्ती म्हणजे व्ही. के. शशिकला. एकेकाळी जयललितांच्या जीवनावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या शशिकला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार वर्षे तुरुंगवास भोगून राजकारणात परतल्या आहेत. अद्रमुक पक्षावर ताबा घेण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत. एकेकाळचे सहकारी विरोधात गेले. तुरुंगात चार वर्षे घालवल्यावर एखादी महिला मुकाट्याने शांत बसली असती. पण शशिकला येत्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे जुळवून मुख्यमंत्री होण्याची भाषा करत आहेत. जेमतेम शिक्षण असलेल्या शशिकला एवढ्या प्रभावी कशा झाल्या. याच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. त्यांचे पती एम. नटराजन यांची एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सलगी होता. हा अधिकारी जयललितांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने शशिकलांनी जयललितांशी संधान बांधले. ते एवढे कसून होते की, पुढील काळात शशिकलांशिवाय श्वास घेणेही जयललितांना कठीण जाऊ लागले. सत्तेची धुंदी, माज बहुतांशवेळा सत्ताप्रमुखाआधी त्याच्याभोवतीच्या कोंडाळ्यावर चढतो. जयललितांभोवती फक्त शशिकलांचे कोंडाळे होते. त्यांनी भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले. मग निवडणुकीत पराभूत झालेल्या जयललितांनी निग्रहाने त्यांची घरातून हकालपट्टी केली. पण शशिकलांनी पुन्हा बाजी पलटवली. काही वर्षांतच पक्षाचा जवळपास पूर्ण ताबा मिळवला. त्यांची ताकद इतकी वाढत गेली, की त्यांचाच शब्द म्हणजे प्रमाण मानला जाऊ लागला. नियतीनेही अशी काही खेळी केली की, एकेकाळी व्हिडीओ पार्लर चालवणारी ही महिला दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्रीही झाली. आणि काही महिन्यातच तुरुंगातही पोहोचली. आता तेथून बाहेर पडल्यावर डरकाळ्या फोडू लागली आहे. अनेक नाट्यमय वळणे असलेली शशिकलांची कहाणी दक्षिणेतील मंडळी मोठ्या, छोट्या पडद्यावर आणतील आणि गाजवतील. आपल्या मराठी प्रांतात नजिकच्या काळात असे व्यक्तिमत्व, ताकदीची महिला राज पटलावर येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी शशिकलांची कहाणी मराठी बाजात बांधून मांडली तर रसिकांना नक्कीच पसंत पडेल. किमान नव्या, धाडसी प्रयोगाची नोंद होईलच. शेवटी सिनेमा, छोटा पडद्याला एका चमकदार कहाणीची गरज असतेच नाॽ

Wednesday 3 February 2021

शेळीच वात्तड होती

केबिनमध्ये बळजबरी केल्याच्या आरोपातून मिथुन चक्रवर्ती निर्दोष सुटतो. मल्लिका साराभाई न्यायालयाच्या आवारातच त्याला थांबवते. आणि अतिशय तळतळून जी सहा वाक्ये बोलते. ती कानावर अक्षरशः बॉम्बगोळ्यासारखी कोसळतात. असं वाटतं की, पुरुषी मानसिकतेचा क्रूर, ढोंगी, दांभिक बुरखा तिनं पेटवून दिला आहे. बधिर व्यवस्थेच्या कानात ज्वालामुखीचा लाव्हा ओतत आहे. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बासू चटर्जींच्या ‘शीशा’ सिनेमातला तो प्रसंग आजही अनुभवाला येतो. भारत स्वतंत्र झाल्यावर दोन दशकांनी मध्यमवर्गीयांची संख्या वाढू लागली. त्यांच्या आशा-आकांक्षा, मानसिकतेचे नवे, लपलेले पैलू बासुदांनी त्यांच्या अनेक सिनेमात खोलवर मांडले. ‘शीशा’मध्ये मध्यमवर्गीयांच्या निमित्ताने एकूणच पुरुषी रचनेचा एक चेहरा त्यांनी दाखवला. त्या काळात मिथुन चक्रवर्ती, मुनमुन सेन, मल्लिका साराभाईंच्या मध्यवर्ती भूमिका हे या सिनेमाचे एक बलस्थान. बासुदांनी टोकदार दिग्दर्शन तर केलेच शिवाय शंकर यांच्या मूळ कथेवर अतिशय कसदार पटकथाही बांधली. त्याचे कथानक असे होते की, दिनेश प्रकाश म्हणजे मिथुन एका बड्या कंपनीचा सीईओ आहे. त्याचा मनिषा म्हणजे मुनमुन सेनशी प्रेमविवाह झालाय. विवाहाचा पहिला वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असते. आणि त्याचवेळी टेलिफोन ऑपरेटर म्हणजे मल्लिका साराभाईवर बळजबरी केल्याच्या आरोपाखाली मिथुनला अटक झाल्याची बातमी येते. मुनमुनचे भावविश्व उद्ध्वस्त होते. आपला नवरा असं काही करू शकतो, यावर तिचा विश्वासच बसत नाही. दुसरीकडं ‘मी बळजबरी केलेलीच नाही. मल्लिकाच माझ्या गळ्यात पडली. मी तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिल्यावर तिनंच मला अडकवण्याचा प्रयत्न केला.’ असं मिथुन सांगत राहतो. खटला सुरू होतो. हळूहळू मिथुनच्या कार्यालयात कंड्या पिकू लागतात. मल्लिकाच कशी बदचलन आहे. यापूर्वीही तिने बड्या अधिकाऱ्यांना कसे जाळ्यात पकडून ब्लॅकमेल केले, याच्या कहाण्या सांगणे सुरू होते. तेव्हा मुनमुन नेमकं काय घडलंय, याचा शोध घेऊ लागते. मल्लिकाच्या वस्तीतील एक ज्योतिषी मल्लिकाच्या वाईट चारित्र्याचे पुरावे पोलिस ठाण्यातून मुनमुनला मिळवून देतो. ते घेऊन ती न्यायालयात जाते, मल्लिकाच वाईट चालीची बाई आहे, असे सर्वांसमोर येते. आणि त्या आधारावर मिथुनची निर्दोष मुक्तता होते. मल्लिका पुन्हा एकदा पराभूत होते. माघार घेते. पण वस्तुस्थिती तशी असते का? त्या दिवशी केबिनमध्ये खरंच तिनं मिथुनला ऑफर दिलेली असते की वेगळंच काही घडलेलं असतं? स्वत:ची नोकरी पक्की करून घेण्यासाठी तिनं त्याला मोहात पाडलेलं असतं का? त्याने निग्रहाने नकार दिल्यावर ती आरडाओरड करते का? या प्रश्नांची उत्तरे सिनेमाच्या अखरेच्या तीन मिनिटांत आणि मल्लिकाच्या सहा वाक्यात मिळतात. एकूणच पुरुषी नियंत्रणातील समाजात महिलाच महिलेकडे कशाप्रकारे बघते, हेही कळते. १९८६चा हा सिनेमा. आज २०२१. पण समाजमनात फारसा फरक पडलेला नाही. फक्त शेळीचा फडशा पाडून झाल्यावर तीच वात्तड होती, असे सांगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पुरुषाच्या काहीतरी भानगडी असतात. विशेषत: सार्वजनिक जीवनात मोठ्या पदांवर काम करणाऱ्याच्या तर त्या असतातच. पण त्या उघड करायच्या नसतात. उलट सर्वांनी मिळून त्या झाकण्याचाच प्रयत्न करायचा असतो, असा भयंकर पवित्रा बहुतांश प्रकरणात घेतला जातो. त्याला राजकारण, समाज, जात, धर्म, पंथ, मतांची गणितेही जोडली जातात. काही वेळा ‘मी टू’ सारखी चळवळ चालवणाऱ्या महिला, संघटना, प्रसारमाध्यमेही विशिष्ट प्रकरणात संधीसाधू मौन बाळगतात. त्या पुरुषाची कधी थेट कधी आडपडद्याने पाठराखणही करतात. स्त्री कशीही असली तरी तिच्या मनाविरुद्ध काहीही करण्याचा अधिकार पुरुषाला नाही, असा कायदा आहे. पण ती स्त्री वाईट चालीचीच आहे, असे सिद्ध केले. तसा गवगवा केला की, तिला लुटल्यावरही निर्दोष मुक्त होण्याचा मार्ग सापडतो, हे अनेकांना माहिती आहे. ते त्याचाच वापर करतात. चारही बाजूंनी तिच्याच चारित्र्यावर क्रूर, हिणकस, खालच्या पातळीवर जात हल्ले करतात. या हल्ल्यांनी ती हमखास मोडकळीस येते. मीच वाईट चालीची, बदनाम स्त्री आहे. मीच त्या पुरुषाला ब्लॅकमेल करत होते, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्यवस्थेकडे न्याय मागण्यात काय अर्थ आहे? मी माघार घेऊन टाकते, असा पवित्रा घेण्याशिवाय तिला पर्याय राहत नाही. तिला लुटणाऱ्या पुरुषाभोवतीची टोळकी त्या पुरुषाचा जयजयकार करू लागतात. बासुदांनी ३४ वर्षांपूर्वी ‘शीशा’मध्ये जे दाखवले तेच अजूनही सुरू आहे. होय ना?