Friday 21 August 2020

सगळेच अनैतिक ...

तीन दिवसांपासून दुकान बंद. गेल्या दहा वर्षांत तर असे कधीच झाले नाही. रितेशने मोबाईलवर कॉल केला. तर स्वीच ऑफ. त्याचा धीर सुटला. त्याने पलिकडच्या हरदीपला दुकानावर बोलावून घेतलं. दोघांनी बराच विचार केला. आणि घाबरत घाबरतच इन्सपेक्टर बुधवंतांसमोर जाऊन बसले. आम्ही दोघे वंडर आर्केडमधील दुकानदार आहोत. दोघांची मोबाईल, स्पेअर पार्ट विक्री आणि दुरुस्तीची छोटी दुकाने आहेत. दोघांच्या मध्ये कापडाचं दुकान आहे. त्याचा मालक सदानंद आमचा मित्र. दहा वर्षांपासून आमची दुकाने बाजूबाजूला. गेल्या तीन दिवसांपासून त्याचं दुकान बंद, मोबाईल स्वीच ऑफ आहे. एका दमात रितेशनं सांगून टाकलं. इन्सपेक्टर बुधवंतांनी तक्रार नोंदवून घेतली. मग हवालदार मसलेंना ‘वंडर आर्केडकडे चक्कर मारा. तिथं सीसीटीव्ही आहेत का पहा. सदानंदचं घर शोधा. खबऱ्यांना कळवा.’ अशा सूचना केल्या. रात्री नऊच्या सुमारास ते ठाण्यात परतले. तेव्हा महत्वाचा पण दुर्देवी क्ल्यू हाती लागला होता. पश्चिमेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक प्रेत सापडलं होतं. ते बहुधा सदानंदचं असावं, असा हवालदार मसलेंचा अंदाज होता. त्यांनी दिवसभरात बरीच माहिती गोळा करून आणली होती.

त्या भागातील सर्वोत्तम कापड दुकानदार अशी कधी स्पर्धा झाली असती तर सदानंद शंभरजणांमध्ये पहिल्या पाचात नक्की आला असता. निवृत्त शिक्षक-शिक्षिकेचा तो एकुलता एक मुलगा होता. पदवीचं शिक्षण घेत असतानाच त्याने नोकरी करायची नाही. काका म्हणजे लक्ष्मणसारखा कापडाचा व्यवसाय करायचा असं ठरवलं होतं. म्हणून मोठी धडपड करून एका टपरीत दुकान सुरू केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं महिलांसाठी खास कापड तयार होत होते. ते सदानंद आणायचा. गरज पडली तर घरपोच कपडे पोहोचवायचा. बोलण्यात अत्यंत मिठ्ठास आणि न कंटाळता पाठपुरावा, ही त्याला मिळालेली देणगी होती. कितीही तापदायक ग्राहक असेल तरी तो कापड खरेदी करायला लावायचाच. तेही चढ्या भावाने. त्यामुळे तो झपाट्याने लोकप्रिय तर झालाच शिवाय पैसाही कमावू लागला. मग टपरीत माल ठेवणं त्याला शक्य होईना. म्हणून त्याने वंडर आर्केडमध्ये चांगला मोठा गाळा घेतला. बचतीचे वीस लाख रुपये टाकले. फर्निचर तयार केले. आपण कधी माल खरेदीसाठी बाहेरगावी गेलो तर दुकान चालवण्यासाठी कोणीतरी हवे म्हणून चुणचुणीत दीपाची नियुक्ती केली. एकीकडे कॉलेजमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दीपाचे कापड विक्री व्यवसायात स्वारस्य वाढले होते. त्यामुळे सदानंद तिच्यावर जास्त विसंबून राहू लागला होता. त्याला घरची फार जबाबदारी नव्हती. आई-वडिलांसाठी दरमहा वीस हजार रुपये पाठवलं की तो मोकळा होत होता. त्यांचीही त्याच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती. दर महिन्याला पैसे पाठवण्यापेक्षा सुनबाईचं मुख पाहू दे, असा धोशा त्यांनी लावला होता. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोराचा संसार लवकरात लवकर मार्गी लागावा, असा ते निकराचा प्रयत्न करत होते. नातेवाईकांमध्ये चांगली मुलगी शोधत होते. पण बहुतेक मुली विवाह होऊन सुखानं नांदत होत्या. चाळिशीच्या सदानंदसाठी पस्तिशीची पोरगी कुठून मिळेल, या नातेवाईकांच्या प्रश्नावर निरुत्तर होत होते. पण सदानंदला त्याची चिंता नसावी. तो फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागला होता. शहरातील प्रख्यात कपडा व्यापारी प्रतिभाराणीसोबतचे संबंध सध्या पुरेसे आहेत, असे त्याला वाटत होते. पाच-सात वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त त्याची प्रतिभासोबत भेट झाली. पतीचे अपघाती निधन झाल्याने त्यांनी दुकान सांभाळणे सुरू केले होते. पन्नाशीच्या जवळपास असलेल्या प्रतिभा दिसायला अत्यंत मादक, आकर्षक. काम करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे अल्पावधीतच त्या लखपती झाल्या. एकाची तीन दुकाने झाली. त्यातले एक त्यांनी पहिला सावत्र मुलगा प्रवीण आणि दुसरे प्रीतेशच्या नावावर करून दिले. तर तिसरे स्वत:कडे ठेवले. सदानंद एवढेच वय असलेल्या प्रवीण, प्रीतेशला सावत्र आईचे म्हणजे प्रतिभाचे सदानंदसोबतचे संबंध खटकत होते. पण प्रतिभा केवळ सदानंदवर अवलंबून नव्हती. दोन वर्षांपूर्वी तिचा नाट्यगृह मालक तनसुखसोबत याराना वाढला होता. आणि हा तनसुख सदानंद नसताना दुकानावर येऊन दीपाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. प्रवीण, प्रीतेशही दीपाच्या मागे हात धुऊन लागले होते. एकूणात सगळेच नातेसंबंध अनैतिकतेच्या चक्रात फिरत होते. इन्सपेक्टर बुधवंतांनी सारे कसब पणाला लावले. खुनी कोण, खुनाचा कट कोणी रचला असावा, हे शोधले.  

नातं... फिल्म फेस्टिव्हलचे

 प्रत्येक कलेची एक जागतिक भाषा असते. ती कोणत्याही अडथळ्याविना रसिकांपर्यंत पोहोचतेच. म्हणजे एखाद्या भारतीय चित्रकाराने रेखाटलेले एब्सर्ड चित्र किंवा शिल्प असेल, तर त्यात चित्रकार, शिल्पकाराला नेमके काय म्हणायचे आहे, हे अगदी रशियाच्या एखाद्या छोट्या शहरातील शिल्प, चित्रप्रेमीला कळते. सिनेमा तर सर्व कलांतील अत्यंत प्रभावी, तीक्ष्ण, टोकदार माध्यम. इजिप्शिअन दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे. कोणता संदेश द्यायचा आहे, हे नाशिक, सोलापूरच्या सिनेमाप्रेमीला लक्षात येते. अगदी हृदयापर्यंत भिडू शकते. त्यातील बारकाव्यांमध्ये तो गुंग होऊन जातो. सिनेमातील कलावंत, पटकथा लेखक, दिग्दर्शकाची रसिकांना जोडणारी भाषा, नाते तयार होते. पण, ही जोडणी केवळ तिथपर्यंत थांबत नाही, तर सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांमध्येही एक नाते तयार होते. त्याचा अनुभव औरंगाबादेत सात-आठ वर्षे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करणाऱ्या निलेश राऊत, सुबोध जाधव आणि प्रख्यात दिग्दर्शक शिव कदम यांना आला. झाले असे की, त्यांच्याकडे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, केरळचे  (एफएफएसआय) एक ऑनलाइन निमंत्रण आले. तेथे २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत जगविख्यात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या सिनेमांचा ऑनलाइन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तो पाहण्याची संधी जगभरातील रसिकांना उपलब्ध होणार आहे. त्यात औरंगाबादकर रसिकांनीही सामील व्हावे, अशी निमंत्रणामागची भावना. 

हे कसे काय घडले? त्याबाबत कदम यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाथ फाऊंडेशनच्या सहकार्याने औरंगाबादेत होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलची लोकप्रियता वर्षागणिक वाढत गेली. दर्जेदार सिनेमांच्या देखण्या आयोजनामुळे देशभरातील मान्यवर महोत्सवाला हजेरी लावू लागले. एफएफएसआयचे व्ही. के. जोसेफ त्यापैकी एक. 

औरंगाबाद फेस्टिव्हलचे आयोजन पाहून ते भारावून गेले. त्यांनी जेव्हा सत्यजित रे यांच्या सिनेमांचा फेस्टिव्हल आयोजित करण्याचे ठरवले, तेव्हा औरंगाबादकरांना आवर्जून निमंत्रण दिले. कदम यांनी आणखी जे सांगितले ते अधिक महत्त्वाचे. ते म्हणजे, दर्जेदार सिनेमे आणि देखणे आयोजन तर जोसेफ यांना भावलेच. पण त्यापेक्षाही त्यांना औरंगाबादच्या रसिकांचे विलक्षण कौतुक वाटले. ‘जगभरातील सिनेमांना तुमचे लोक गर्दी करतात, सिनेमात नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी धडपडतात, हे मला खूपच वेगळे वाटले’, अशी नोंद करत जोसेफ यांनी निमंत्रण धाडले. कदम यांच्या मते हे केवळ औरंगाबादकरांचेच नव्हे, तर तमाम मराठी रसिकांचे कौतुक आहे. ‘एफएफएसआय’च्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर या महोत्सवाचा आनंद घेता येईल. पथेर पांचाली, गणशत्रू, जलसागर, चारुलता, तीन कन्या, आरण्येर दिन रात्री, आगुंतक हे सिनेमे पाहण्यास मिळणार आहेत. आधी मल्याळी सिनेजगतातील मान्यवर षण्मुखदास, के. रामचंद्रन, मीना टी. पिल्लई, डॉ. जी. आर. संतोषकुमार, व्ही. एस. बिंदू, अनु पाप्पाचन, टी. के. उमेर सिनेमाची सूत्रे उलगडून सांगतील आणि मग तो रसिकांना पाहण्यास मिळणार आहे. 

सिनेमानंतर अर्थातच ऑनलाइन संवादही होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘एफएफएसआय’ने रे यांच्या सर्व सिनेमांच्या निगेटिव्हजचे डिजिटाझेशन करून घेतले. त्यामुळे ते अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतील. सिनेमा ही खरे तर सिनेगृहातच, गर्दीत पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट. कोरोना संकटाने ती हिरावून घेतली असली, तरी त्यावर मात करण्याचा एक मार्ग सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी झुंजणाऱ्यांनी शोधून काढला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.

Friday 14 August 2020

पत्थरात विचारांचे प्राण...

‘स्वर, शिल्प आणि रंग या साऱ्यांमधून उत्कट परिणाम साधणं हाच कलेचा हेतू. शिल्पकारांत ऑग्युस्त रोदँ हे त्या अर्थाने इंप्रेशनिस्ट आहेत’ असे नोबेल विजेत्या आन्द्रे जीद यांनी म्हटलं होतं. ते ज्या रोदँबद्दल सांगत होते. त्याचा साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी युरोपीय खंडात प्रचंड बोलबाला होता. त्याच्या गेटस ऑफ हेल, द थिंकर, द किस, द थ्री शेडस्, एज ऑफ ब्रांझ या गाजलेल्या शिल्पाकृती आजही त्याची साक्ष देत आहेत. पत्थराला आपल्या मनासारखे वळवून त्यात भावना ओतण्याचे अजब कौशल्य रोदँमध्ये उपजतच होते. हेच कौशल्य तरुण मराठी शिल्पकार सुनिल काशिनाथ देवरे यांच्यामध्येही आले आहे, असे त्यांच्या कलाकृती पाहून वाटते. ते सध्या मीरा – भाईंदर महापालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा अश्वारूढ पुतळा तयार करत आहेत. वीस फूट उंचीच्या चबुतऱ्यावर तीस फूट उंचीचा हा पुतळा निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने देवरे यांच्या इतर शिल्पांचे दर्शन झाले. तेव्हा मन थक्क होऊन गेले. एवढ्या उंचीचा तरुण शिल्पकार मराठी मातीत रुजला, फुलला याचा मनस्वी अभिमान वाटला. 

मुळ धुळ्याचे असलेले सुनिल यांचे वडिल पुरातत्व विभागात संवर्धन अधिकारीपदावर होते. वडिलांचे बोट धरून त्यांनी लहानपणी शेकडो वेळा वेरुळ लेणी पाहिली. आपण मोठेपणी शिल्पकारच व्हायचे, असे त्यांनी ठरवले. 1992 मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, अमेरिकेत, तुर्कस्थानात त्यांच्या कलाकृती आहेत. त्यांची हंटर, बोटमॅन, लायन, लँडींग बर्ड आदी शिल्पे रोदँची आठवण करून देतात. त्यांच्या बोटातून घडलेली वेरुळ – अजिंठ्याची प्रतिकृती त्यांनी भारतीयत्वाची नाळ किती पक्की धरून ठेवली आहे हे लक्षात आणून देतात. 

तसं पाहिलं तर भारतात फार पूर्वीपासून या अतिशय कठीण कलेची पाळेमुळे रुजली आहेत. अजिंठा-वेरुळ आणि ठिकठिकाणच्या लेणी त्याची साक्ष देतात. पण दुर्दैवाने या लेण्यांमधील कला पुढे अपेक्षेप्रमाणे फुलली, रुजली नाही. मधली अनेक वर्षे शिल्पकलेला गांभीर्याने पाहिले गेले नाही. राजा-महाराजांचे पुतळे एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहिली. ब्रिटीशांच्या अमदानीत दगडांमधून भावना व्यक्त करण्याला थोडी चालना मिळाली. आणि अलिकडील काळात या कलेकडे तरुणाईचा ओढा किंचित वाढल्याचे दिसते. तरीही चित्रकारांच्या तुलनेत शिल्पकारांची संख्या कमीच. देवरे याचे उत्तर देताना सांगतात की, ‘प्रदीर्घ साधना हे तर कोणत्याही कलेच्या यशाचे गमक आहे. पण चित्र, संगीत, गायन, वादनाच्या तुलनेत शिल्पकलेत यश खूप उशिरा मिळते. कारण कोणतेही शिल्प तयार होण्यासाठी कित्येक महिने लागतात. नेमके काय सांगायचे आहे, हे ठऱवून चित्र रेखाटावे लागते. मग मातीत तयार करावे लागते. मग त्याचा लाकडी साचा तयार करावा लागतो आणि शेवटी दगडाचे रुप बदलावे लागते. त्यात प्राण फुंकावे लागतात. तरच ते चहुबाजूंनी जिवंत होते. दुसरे म्हणजे शिल्पकाराला नाभिक, चित्रकार, फॅशन डिझायनर, प्रकाश योजनाकार, सुतार अशा सर्व कलांमध्ये पारंगत व्हावे लागते. एवढा वेळ देणारे बोटावर मोजता येतील एवढेच लोक आहेत. पण असेही आहे की, ग्रामीण भागामध्ये उत्तम शिल्पकार, मूर्तीकार आहेत. त्यांना किमान प्रशिक्षणाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात शिल्पकलेचा विभाग सुरू केला तर जागतिक कीर्तीच्या कलाकृती पाहण्यास मिळतील.’ देवरे म्हणाले ते खरंच आहे. शेवटी समाजाची प्रगती केवळ कारखाने आणि मोठे रस्ते यावरच ठरत नाही. तर कलेच्या प्रांतात जगासाठी काय नवे निर्माण केले याचीही मोजदाद होत असते. होय नाॽ

भरधाव ट्रक कोणाचा...

एक तरुण आपल्या पत्नीसोबत शहराबाहेर फेरफटका मारण्यासाठी जातो. संध्याकाळची वेळ असली तरी थ्रिल अनुभवण्याच्या नादात थोड्या निर्जन रस्त्यावर चारचाकी नेतो. काही वेळाने त्यांच्या गाडीचे चाक पंक्चर होते. तो तरुण चाक बदलण्यासाठी गाडीबाहेर पडतो. चाक बदलू लागतो आणि अचानक मागून भरधाव आलेला ट्रक त्याला चेंडूसारखे उडवतो. तरुण जागीच ठार होतो. हे दृश्य पाहून त्याची पत्नी, घटनेची एकमेव साक्षीदार बेशुद्ध पडते. दोन तासानंतर शुद्धीवर येते. तिला ट्रकचा नंबर, वर्णन आठवत नाहीतसं पाहिलं तर हा अपघातच. पण नेहमी शहराजवळच्या तलावाकडे भटकण्यासाठी जाणारे हे जोडपे नेमके त्या दिवशी निर्जन रस्त्यावर का गेले असावे? नेमके चाक कसे पंक्चर झाले. फारशी वर्दळ नसलेल्या त्या रस्त्यावर त्याचवेळी वेगात ट्रक कसा आला, असे प्रश्न इन्सपेक्टर महावीर यांना पडले. त्यांनी पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केलीसुदीप आणि अनामिका हसतमुख जोडपे. सुदीप एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता तर अनामिका एका प्रयोगशाळेत संशोधक होती. दीड वर्षांपूर्वीच त्यांच्या घरच्यांनी रितसर पाहण्याचा कार्यक्रम करून त्यांना विवाह बंधनात बांधले होते. सुरुवातीच्या काही महिन्यात एकमेकांना समजून घेण्यात थोडी अडचण झाल्याने त्यांच्यात दोघांपैकी कोण हुशार या मुद्यावरून वादावादी झाली होती. अगदी एकदा अनामिका संतापून माहेरीही गेली होती. पण त्यानंतर सारे सुरळित झाले, असे त्यांच्या आईवडिलांनी सांगितले. मग पोलिसांनी इतर दुवे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले की, कोचिंग क्लासमध्ये सुदीप अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या मार्गदर्शनात चार विद्यार्थ्यांनी सलग चार वर्षे राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे क्लासेसचे संचालक तातेडसर त्याच्यावर प्रचंड खुश होते. त्यांनी त्याचे वेतन दहा हजारांनी वाढवले होते. पण त्यामुळे त्याचे सहकारी नितीन, देवीदास त्याच्यावर खार खाऊन होते. शिक्षकांच्या मिटिंगमध्ये ते त्याचा पाणउतारा करण्याची संधी सोडत नव्हते. त्याचे कायमचे ‘कल्याण’ झाले पाहिजे, असे ते एकमेकांशी बोलताना म्हणत. पण नितीन आणि देवीदास यांच्यापेक्षाही जास्त राग तातेडसरांच्या चुलत बहिणीची मुलगी मानसीचा होता. त्या मागे कारणही तसे होते. सुदीप नोकरीस लागला. तेव्हा मानसी आणि त्याची चांगली अगदी घट्ट मैत्री झाली होती. तातेड यांना मूलबाळ नव्हते. ते मानसीलाच मुलगी मानत. क्लासच्या पैशांचा सगळा व्यवहार तीच बघत होती. पुढे चालून क्लासवर आपलीच मालकी होईल. त्यावेळी आपण दोघे मिळून हा व्यवसाय करू. राज्यातील प्रत्येक शहरात तातेड क्लासेसची शाखा असेल, असे तिचे म्हणणे होते. सुदीपला त्यात फारसे स्वारस्य नव्हते. पण सरांची मानसकन्या म्हणून तो तिला फारसा विरोध दर्शवत नसे. त्याने अनामिकासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मानसीचे भावविश्वच कोलमडून पडले. तिने भरपूर त्रागा केला. अनामिकाची भेट घेऊन तिला सुदीपसोबतचे तिचे काही फोटो दाखवावेत, असा विचारही तिने केला. पण फोटोमध्ये मैत्रीपलिकडचे काही दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर शांत राहण्याचे ठरवले. इन्सपेक्टर महावीर आणखी खोलात शिरले. तेव्हा त्यांना एक आणखी धक्का बसला. क्लासेसमधील शिक्षिका मौसमीसोबत सुदीपचे जवळिकीचे संबंध होते. अगदी पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतची त्यांची तयारी होती. पण मौसमीचा नवरा प्रकाशला याची कुणकुण लागताच त्याने सुदीपच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर त्याने एकतर्फी संबंध संपवून टाकले होते. पण मौसमींनी सुदीपचा पाठलाग सोडला नव्हता. लग्नानंतर सुदीप – अनामिकामध्ये हुशारीवरून झालेल्या वादाचे एक कारण अनामिकाच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या हितेंद्रही होता. त्या दोघांचे लग्नाआधीपासूनच प्रेम प्रकरण असल्याचा सुदीपला संशय होता. त्यातच प्रयोगशाळेचे मालक कनोजिया आणि अनामिकाचे मोबाईलवर चॅटिंग त्याला खटकत होते. त्याचा जाब विचारण्यासाठी तो प्रयोगशाळेवर गेला. तेव्हा कनोजियांनी त्याला अक्षरश: हाकलून दिले होते. या गुंतागुंतीच्या प्रकरणातील सर्वांचे महावीर यांनी जाबजबाब नोंदवले. मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासले. घटनास्थळाची कसून पाहणी केली. खबऱ्यांना अलर्ट केले आणि खुनी शोधला.



Thursday 6 August 2020

पहिला प्रवेश : रंगभूमीवर

खरंतर कोणत्याही एका कलेची दुसरीशी तुलना होऊच शकत नाही. पण नृत्य, नाट्य, चित्र, संगीत, शिल्प अशा सर्व कलांचा संगम नाट्यकलेत होतो. म्हणून मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये नाटकवाल्यांचा विशेष दबदबा असतो. त्यामुळेच की काय अलिकडील काळात हजारो तरुणांना नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत आहेत. पण एकीकडे अभियंता, डॉक्टर, संगणक तज्ज्ञ होण्याची इच्छा. दुसरीकडे नाटकाचे शास्त्रशुद्ध शिक्षण कसे घ्यावे, असा पेच त्यांच्यासमोर होता. नव्या शैक्षणिक धोरणाने तो सोडवला आहे. एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रमाला त्यांना प्रवेश मिळू शकेल, अशी व्यवस्था निर्माण होत आहे. म्हणजे आयआयटी होताना नाट्यकलेचा विद्यार्थी होता येईल.

दिल्लीच्या एनएसडी म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात १९७० नंतर प्रवेशासाठी मारामार होती. पण तेथे बोटावर मोजण्याइतक्याच जागा असायच्या. त्यामुळे तत्कालिन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी १९७७-७८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका खोलीत नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. एकापाठोपाठ एक नाट्य महोत्सव गाजू लागले. आणि काही वर्षांतच नाट्यशास्त्र विभाग एका खोलीतून स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाला.

प्रा. सोनटक्के यांच्यानंतर विभागप्रमुख झालेले वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण

देशपांडे यांनी विभागाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. पण केवळ प्रा. देशपांडेच विभागाचे शक्तीस्थान नव्हते. तर त्यांच्याबरोबरीने किंबहुना काकणभर सरस

प्रतिभावान मंडळी प्राध्यापकपदी होती. त्यातील एक होते प्रा. कुमार देशमुख. त्यांनी

दिग्दर्शित केलेल्या ‘स्मारक’ नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत इतिहास निर्माण केला होता. आवाजावर प्रचंड हुकुमत असलेले प्रा. देशमुख अतिशय कठोरपणे नाटकाच्या तालमी घेत. दुसरे होते प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब. लोककलांचे गाढे अभ्यासक, हजरजबाबी असलेल्या अचलखांबही मुलांना घडवण्यात वाकबगार होते. प्रा. डॉ. अलोक चौधरी म्हणजे उत्तम अभिनेते आणि प्रकाशयोजनेचे बादशाह. इंग्लंडमध्ये नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतलेले प्रा. डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर अत्यंत कुशल दिग्दर्शक होते. एकेका प्रसंगाच्या सलग दहा-पंधरा तालमी घेऊन ते कलावंतांना भूमिकेत समरस होण्यास भाग पाडत. या चौघांसोबत होते प्रा. प्रताप कोचुरे. संगिताचे अत्यंत उत्तम ज्ञान असलेले प्रा. कोचुरे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियही होते. या सर्वांमुळे नाट्यशास्त्र विभागाच्या यशाची कमान चढत गेली. जिथे दोन

विद्यार्थी मिळवणे मुश्किल होते. तिथे एका जागेसाठी सहा अर्ज येऊ लागले. १९९० च्या दशकात विभागाचे एकांकिका, वार्षिक नाट्य महोत्सव म्हणजे धमाल होती. वर्षभर तालमींचा राबता होता. वर्षा उसगावकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, प्रतिक्षा लोणकर, नंदू काळे, नंदू भुरे, संजय भुरे आणि अनेकजण अशाच महोत्सवातून तयार झाले. आजही प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. अशोक बंडगर आणि त्यांचे सहकारी धूमधडाक्यात महोत्सवांचे आयोजन करतात. त्यात अनेक सरस संहितांचे सादरीकरण होत आहे. नव्या युगाची पावले ओळखून तांत्रिक बाबींचेही धडे गिरवून घेतले जात आहेत. कित्येक विद्यार्थ्यांचा टीव्ही, सिनेमा, रंगभूमीवरील प्रवेश तरुण प्राध्यापक मंडळी सुकर करत आहेत.

पण सध्या रंगभूमी, सिनेमा गाजवत असलेल्यांना नाट्यशास्त्र विभागात प्रवेश कसा मिळाला. तर त्यासाठी विभागात जून-जुलै महिन्यात एक परीक्षा असे. म्हणजे प्रा. देशपांडे किंवा अन्य प्राध्यापक मंडळी एका वर्गात बसत. एकेका मुला-मुलीला बोलावून दहा-पंधरा मिनिटांचा सलग संवाद, प्रसंग उभा करण्यास सांगत. नाटक ही जिवंत कला. त्यामुळे थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याची कलावंतांची क्षमता आहे की नाही, हे तपासले जात असे. नंतर नाट्यक्षेत्रातील तत्कालिन घटना-घडामोडींविषयी काही तिरकस, गुगली प्रश्नही विचारत. अशा दोन-तीन फेऱ्या

झाल्यावर गुणवंतांची यादी जाहीर होई. गेल्या वर्षापर्यंत हीच पद्धत होती. पण आता कोरोनामुळे सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाईन होत आहेत. त्याचनुसार कलावंतांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ मागवून त्यांची निवड करावी लागू शकते. आजकालच्या युगात कॅमेरा हेच महत्वाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरातही काही गैर नाही. पण ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकायचे आहे. त्यांच्या नजरेला नजर भिडवत किंवा त्यांच्या नजरेसमोर कठोर परीक्षेची मौज काही न्यारीच. कलावंत म्हणून घडण्याची ती पहिली पायरी. त्यावर यंदा नाही तर पुढील वर्षी तरी नवख्या कलावंतांना उभे राहण्यास मिळाले तर त्यांचाच जास्त फायदा.

 


तो अडकत गेेला...

एकाच वेळी सहा जणांवर संशय. कारण प्रत्येकाचा त्याच्याशी खटका उडालेला. पण त्यामुळे थेट जीव घेण्यापर्यंत हे सहाजण जातील का, असा विचार वारंवार इन्सपेक्टर खडस यांच्या डोक्यात घोळत होता. मग त्यांनी पुन्हा एकदा सर्व घटना आणि संशयितांची माहिती कसून गोळा करणे सुरू केले. आणि आठवडाभरात सर्व चित्र स्पष्ट झाले. आरोपी गजाआड झाले.

मध्यमवर्गीयांच्या वसाहतीत, विशेषत: व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाची सुरुवात सात-आठ वर्षांपूर्वी झाली. नजिकच्या गावातून रोजगारासाठी आलेला नंदन पाच भावांमधे सर्वात धाकटा. त्याच्या मित्राच्या मामाचे झेरॉक्स सेंटर होते. तेथे कामाला लागला. दिवसाचे जेमतेम शंभर रुपये मिळत. वर्षभर नोकरी करताना झेरॉक्स म्हणजे फोटोकॉपी यंत्राच्या सगळ्या बाबी त्याला कळाल्या. कारण कधी यंत्र बिघडले तर दुरुस्तीला येणाऱ्या इंजिनिअर सर्वेशसोबत तो लहान मुलासारखा कुतुहलाने असायचा. बाकी शिक्षणात गती नसली तरी झेरॉक्स यंत्राचे बारकावे त्याला आत्मसात झाले. कधी सर्वेशकडे जास्तीचे काम असले तर तो नंदनला यंत्र दुरुस्तीसाठी पाठवायचा

पाहता पाहता वर्षभरातच तो वाकबगार झाला. अगदी सर्वेशच्या बरोबरीने त्याचा व्यवसाय चालू लागला. आता मित्राच्या मामाच्या दुकानावर काम करण्याची गरज नाही, असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने धडपड सुरू केली. दुरुस्ती कामाच्या निमित्ताने ओळख झालेले बँकेचे मॅनेजर हरिवंश यांनी त्याला कर्ज मिळवून दिले. ते घेऊन त्याने मध्यवस्तीत एक छोटासा गाळा घेऊन झेरॉक्स कॉपी काढून देणे, यंत्र दुरुस्ती, इंटरनेट आणि सोबत पुस्तक बांधणीचा व्यवसाय सुरू केला. नशिब असे जोरावर होते की, दोन वर्षातच त्याच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला. आजूबाजूच्या शहरातूनही काम मिळू लागले

ज्या इमारतीत त्याचा छोटासा गाळा होता. तेथील एक अख्खा मजला त्याने खरेदी केला. दहा जणांना रोजगार मिळाला. लक्ष्मी मल्टी सर्व्हिसेसची स्थापना केली. दुसरीकडे सर्वेश बराच मागे पडला. पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात सर्वांसमक्ष वादाचे प्रकार तीन चार वेळा झाले. अखेर दहा-वीस हजार रुपये देऊन त्याने ते मिटवले. आता नंदनला इमारतीच्या वरच्या मजल्यावरचा आणखी एक गाळा हवा होता. त्यासाठी तो गाळा मालक चंदनमल यांना भेटला. तर ते प्रचंड संतापले. मग दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्या भांडणानंतर नंदन कितीतरी दिवस स्वत:वर नाराज होता. दरम्यानच्या काळात आई-वडिल वारले. भाऊ आपापल्या नोकरीत मग्न झाले

अशा स्थितीत त्याच्या आयुष्यात प्रणितानं प्रवेश केला. एका पुस्तकाची झेरॉक्स करण्यासाठी ती आली होती. दिसायला जेमतेम असली तरी तिचं बोलणं अतिशय प्रभावशाली होतं. एका सामाजिक संघटनेत ती काम करत होती. नंदनने तिच्याकडे प्रेमाची कबूली दिली. रेशीमगाठीत बांधले जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिने स्पष्टपणे होकार दिला नाही किंवा नकारही दिला नाही. संघटनेत मला विशिष्ट पदापर्यंत प्रगती करायची आहे. ते पद मिळाले की नक्की विचार करेन, असे ती म्हणाली. नंतर दोघांच्या भेटीगाठी खूपच वाढल्या. मध्यमवर्गीय घरातील प्रणिताला फक्त आई आणि एक भाऊ होता. त्यामुळे लग्नात फारशा अडचणी येणार नाहीत, असा नंदनचा कयास होता. पण तो चुकीचा ठरला. एक दिवस दुपारी तो कामात मग्न असताना प्रणिताच्या संघटनेचा सचिव अरुण पाच-सहा जणांना घेऊन आला. नंदनला वाटले त्यांचे काहीतरी कामच आहे. तर अरुणने त्याला सरळ मारहाण सुरू केली. बऱ्याबोलाने प्रणिताचा नाद सोड. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी देऊन गेला. थोड्यावेळाने स्थिरसावर होऊन त्याने प्रणिताला मोबाईल केला. तर ती खळखळून हसू लागली. माझ्या मागे लागणाऱ्या मुलांना तो असाच मारतो. पण माझे त्याच्यावर प्रेम नाही, असे सांगू लागली. बोलता बोलता तिने आमच्या संघटनेला एक लाख रुपयाची देणगी दिलीस तर अरुण शांत होईल, असे सूचक शब्दांत सांगितले. त्याने चौकशी सुरू केली तर तिच्यासोबत काम करणाऱ्या राकेश, सूरज यांच्याशीही तिचे निकटचे संबंध आहेत. ती त्यांच्यासोबत सहलीला, सिनेमांना जाते, असे कळाले. तो तिच्याबद्दल माहिती गोळा करत असतानाच राकेश, सूरज यांनीही दुकानावर येऊन धुडगूस घातला. जीवे मारण्याची धमकी दिली. यातला सूरज म्हणजे चंदनमल यांच्या पुतण्या आणि सर्वेश म्हणजे अरुणचा मावसभाऊ असल्याचे कळाल्यावर त्याचे डोके भणाणून गेले

प्रणिता, अरुण सारखे एक लाख रुपयांची मागणी करू लागले. यातून मार्ग काढण्यासाठी एकेकाळी आपल्याला मदत करणारे बँक मॅनेजर हरिवंश यांना बोलण्याचे त्याने ठरवले. थोडक्यात प्रकरण त्यांच्या कानावर घातले. त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी बोलावले. पण ती भेट झालीच नाही. सकाळी कामावरील नोकर नंदनच्या फ्लॅटची बेल बराच वेळ वाजवत राहिला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दरवाजा तोडला. तेव्हा नंदन मृतावस्थेत होता. डोक्यावर कोणीतरी जोरदार फटका मारल्याने त्याची कवटी फुटली होती.