Tuesday 25 January 2022

हिंदीतल्या अर्नाळकर

 ‘तुम्हाला ते कळण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील’, असं एखाद्या पक्षाचे प्रवक्ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविषयी ओथंबलेल्या स्वरात म्हणतात. तेव्हा त्याची खूप चर्चा होते. पण खरेतर हे म्हणणं जवळपास सगळ्या मनुष्यांना लागू होतं. कोणताही माणूस खरंच कसा असतो, हे कळणं जवळपास अशक्यप्राय आहे. कारण, त्याच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारची आवरणं असतात. समाजात वावरताना त्याला वेगवेगळ्या भूमिका बजवाव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी एकसारखेच वागणे, बोलणे किंवा निर्णय घेणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळं  त्याच्या स्वभावाचं रहस्य काही कळत नाही बुवा. फारच गूढ आहे तो, असं म्हटलं जातं. आणि अशी व्यक्तिमत्वं रहस्यकथांना जन्म देतात. चपखलपणे बांधलेल्या या कथा विलक्षण लोकप्रिय असतात. त्यांचा मोठा, बांधलेला वाचक वर्ग असतो. त्यातील थरार, संघर्ष, दर पानांवरील नवी वळणे आणि अखेरच्या क्षणी खलनायकाचा खरा चेहरा उघड होणे, याचा आनंद वाचकांना घ्यायचा असतो. 


आनंद, दु:ख, क्रौर्य, द्वेष, मोह, लोभ या सोबत रहस्यही साहित्यातील महत्वाचा पैलू आहे. इंग्रजीमध्ये तो अतिशय व्यापकपणे हाताळला गेला आहे. शेरलॉक होम्स हे त्याचे सर्वात उत्तम उदाहरण. अगाथा ख्रिस्तीसारख्या अनेक इंग्रजी रहस्यकथाकारांना जागतिक मान्यता, सन्मान मिळाला. मुख्य प्रवाहातील लेखिका झाल्या. १९४० ते १९९० पर्यंत एक हजारापेक्षा अधिक रहस्यमय मराठी कथा-कादंबऱ्या लिहिणारे चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकरही (जन्म ९ जून १९०६, मृत्यूू ५ जुलै १९९६) अशा मान्यतेचे, सन्मानाचे हक्कदार होते. पण मराठी साहित्य विश्वाने त्यांना तो दिला नसला. तरीही ते लाखो वाचकांच्या हृदयात अढळस्थानी आहेत. अर्नाळकरांपासून प्रेरणा घेऊन अनेक मराठी तरुण रहस्यकथालेखनाकडे वळाले. त्यांच्या वाचकांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने होत्या. मात्र, दुर्दैवाने मराठी महिला रहस्यकथाकारांची परंपरा तयार होऊ शकली नाही.


मराठीसारखीच स्थिती महासागरासारख्या पसरलेल्या हिंदी साहित्यविश्वातही होती. महिलांभोवती रहस्यकथा विणल्या जात असल्यातरी रहस्यकथा लिखाणात महिलेचे काय काम, अशी बंदिस्त चौकट तेथेही होतीच. उत्तर प्रदेशातील मेरठच्या रहिवासी गजाला अब्दुल करीम यांनी २००४ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ही चौकट मोडून टाकली. त्यांनी चारच वर्षांत तुरुप का इक्का, ख्वाबों की शहजादी, कट्टो, अंगुरी बदन, चुलबुली, हवा हवाई, लेडी हंटर आदी ३६ कादंबऱ्या लिहिल्या. त्या विलक्षण लोकप्रिय ठरल्या. 


काही कौटुुंबिक कारणांमुळे त्यांनी २००९मध्ये अचानक लेखन थांबवले. वाचकांच्या पाठपुराव्यानंतर त्यांनी धडाकेबाज पुनरागमन केले. तीन वर्षांपूर्वी त्यांची आय एम बॅक कादंबरी आली आहे. त्यात देशावरील प्रेमासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या गुप्तहेराची कहाणी सांगितली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये गप्पा मारत बसलेल्या तरुणांच्या गूढ गप्पांमधून महिला गुप्तहेराला देशविरोधी कटाचे धागेदोरे मिळतात. आणि तो त्या तरुणांचा पाठलाग सुरू करतो. त्या देशद्रोह्यांच्या म्होरक्याला शोधतो. तेव्हा वाचक थक्क होतात.  


प्रागतिक विचारसरणीच्या कुटुंबात जन्मलेल्या गजाला यांना त्यांचे वडिल अब्दुल करीम आणि आई जाहिदा यांना कायम लिखाणासाठी प्रोत्साहन दिले. सतत नवीन काहीतरी शोधत राहा. व्यक्त होत रहा. जे सुचेल, ते लिहित राहा, असा संस्कार कायम माता-पित्याने केल्यामुळेच त्या हिंदीतील पहिल्या नामवंत रहस्य कथालेखक म्हणून प्रस्थापित होऊ शकल्या. हिंदीतील अर्नाळकर असे त्यांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 


गजाला हिंदीतील प्रख्यात लेखक, कादंबरीकार वेदप्रकाश शर्मा यांच्या शिष्या. एखाद्या सिनेमाच्या पटकथेला साजेसे कथानक. त्यात रहस्यमयी व्यक्तिमत्वे. त्यांची काळी कृत्ये यांची रंजक मांडणी ही गजाला यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये, बलस्थाने सांगितली जातात. त्या कथानक अशा पद्धतीने फुलवत, रचत नेतात की, हे लेखन एखाद्या महिलेने केले असावे, अशी शंका येत नाही. सर्वच कथानकांमध्ये त्यांनी सामाजिक एकोपा, भारताचे ऐक्य, भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले आहे. त्यामुळे त्या सर्व समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या. त्यांचे  आगामी लिखाण प्रकाशित करण्यासाठी हिंदीतील नामवंत प्रकाशकांमध्ये स्पर्धा सुरू आहे.


अलिकडील काही वर्षांत सबा खान, रुनझुन सक्सेना, मंजिरी प्रभू, कोलकोत्याच्या शर्मिष्ठा शेणॉय, सुपर्णा चटर्जी, केरळच्या अनिता नायर, तसेच  तमिळनाडूच्या सी. एस. लक्ष्मी उर्फ अंबई आदी इंग्रजी रहस्यकथाकार म्हणून नाव कमावत असल्याचे या क्षेत्रातील जाणकार विकास नैनवाल यांनी दोन वर्षांपूर्वीच्या लेखात म्हटले आहे. आणखी पाच-सात वर्षांनी त्यांनी पुन्हा आढावा घेतला आणि त्यात मराठी रहस्यकथा लेखिकांची नावे आली तर मराठी साहित्य जगताचे माहिती नाही पण मराठी माणसाची शान वाढेल. होय ना?

Tuesday 18 January 2022

आस्था सरकारी

सरकार म्हणजे काय असतं? सरकारनं काय केलं पाहिजे? या प्रश्नाची अनेक उत्तरे. पण त्यातील एक महत्वाचे असेल की, जनतेच्या आणि त्यातही गरिबांच्या अडचणी ज्याला कळतात ते खरं सरकार. आणि या अडचणी दूर करण्यासाठी झुंजणाऱ्या यंत्रणेला लोकांचं सरकार म्हटलं पाहिजे. आता एवढं आदर्श, सर्वोत्तम काम करणारं सरकार हवं असेल तर त्यासाठी गरिबांविषयी हृदयापासून कणव, आस्था असलेली मंडळीच सत्तेत हवीत. नुसती कणव, आस्था असून चालत नाही. तर अडचणींना नेस्तनाबूत करण्याची शक्तीही त्यांच्या अंगात हवी. तेवढे सामर्थ्य हवे. निर्णयाची अंमलबजावणी करता आली पाहिजे. तसं नसेल तर लोक योग्य वेळी अशा सरकारला थोडं बाजूला सरका असं म्हणतात. सरकवूनही टाकतात. कारण अगदी अलिकडच्या भाषेत बोलायचे झाले तर स्मार्ट सोल्यूशन देणारे, गतिमान सरकार काळाची गरज झाली आहे. अशी संवेदनशील, गतिमान सरकारे दुर्मिळ होत चालली आहेत. पण एखादे उदाहरण समोर आले तर ते नक्की सांगायला हवे. कोरोनाच्या संकटकाळात केरळ सरकारनं एक छोटेखानी निर्णय घेतला. तो अंमलातही आणला. त्यातून मुख्यमंत्री विजयन यांची संवेदनशीलता दिसली. आपली काळजी करणारे कोणीतरी राज्यकर्ता आहे, अशी जाणिव तमाम कलावंत जगताला झाली.  त्या विषयी दक्षिणेतील प्रसारमाध्यमात वार्ताही प्रसिद्ध झाल्या. गेल्या वर्षी कोरोनाचे केरळात तांडव सुरू झाले. सरकारने पहिल्याच फटक्यात सगळे बंद करून टाकले. त्या मुळे सादरीकरणावरच जगणारी रंगकर्मी मंडळी सैरभैर झाली. नाटकाचा प्रयोगच नाही म्हणजे रसिकांकडून कोडकौतुक नाही. खिशात चार पैसेही नाही. मग करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला. काहींनी इतर नोकऱ्या शोधल्या. पण नाटकात काम हेच ज्यांचे एकमेव कौशल्य होते. त्यांचे काय? आंदोलन, मंत्र्यांना निवेदन  असा विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच मल्याळम मिशन या केरळ सरकारच्या प्रकल्पातील अधिकाऱ्यांना त्यांची वेदना कळाली. मल्याळी भाषा, मल्याळी संस्कृतीच्या जतनासाठी हे मिशन काम करते. या मिशनने एक योजना आखली. नाट्यगृहे बंद असली तरी नाटकांवर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्याच्यापर्यंत आवाजाचा वापर करून पोहोचण्याचे त्यांनी ठरवले. त्यात मिशनचाच एक भाग असलेल्या रेडिओ मल्याळमचे जाणते, कलाप्रेमी तंत्रज्ञ सहभागी झाले.  तिरुवअनंतपुरम येथील निरीक्षा या महिलांच्या थिएटर ग्रुपने नऊ प्रख्यात महिला लेखिकांच्या कथा लघुनाटिकेत रुपांतरित केल्या. ‘ती’ नावाच्या रेडिओ चॅनेलवरून यातील तीन नाटिकांचे प्रक्षेपण पहिल्या टप्प्यात झाले. त्याला तुडुंब प्रतिसाद मिळाला. उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना थोडीफार कमाई झाली. रेडिओमुळे ते आणखी मोठ्या, वेगळ्या रसिकवर्गापर्यंत पोहोचले. यात सर्वात महत्वाचे म्हणजे ‘ती’ नावाचे हे रेडिओ चॅनेलही केरळच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे  चालवले जाते. स्त्री पुरुष समानता या विषयावर समाजमन तयार करणे, हे या चॅनेलचे ध्येय, उद्दिष्ट आहे. मल्याळम मिशनच्या संचालक सुजा सुसान जॉर्ज यांनी ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात आणली. उत्तम दर्जाचे साहित्य वेगळ्या रुपात रसिकांकडे पोहोचावे. कलावंत, त्यातही महिला कलावंतांना सन्मान मिळावा. त्यांची समाजातील ओळख कायम रहावी. त्यांचा उदरनिर्वाह चालावा, अशी सारी उद्दिष्टे त्यांनी सरकारी यंत्रणेतून साध्य केली. त्यांना निरीक्षा ग्रुपच्या संस्थापक इ. राजेश्वरीदेवी, सुधी देवयानी यांची मोलाची, दर्जेदार मदत मिळाली. मान्यवर महिला लेखिकांनी पोटतिडकीेने महिलांचे प्रश्न मांडलेल्या नऊ कथा निवडणे महत्वाचे होते. या दोघींनी स्फोटक, वादळी विषयांवरील कथांची निवड केली. त्यामुळे त्यांची केरळातील शहरांपासून खेडेगावांपर्यंत जोरदार चर्चा झाली. अभिजन आणि सामान्य असा दोन्ही रसिकवर्ग कानासमोर ठेवून कथांचे नाट्य रुपांतर करणे आणि ते सादर करण्यासाठी कलावंत निवडणे, अशी सगळी आव्हाने राजेश्वरीदेवी, सुधी यांनी अत्यंत कमी वेळात पेलली. अर्थात नाट्य रुपांतरणात त्यांनी लेखिकांच्या परवानगीने काही बदलही केले. नव्या व्यक्तिरेखा निर्माण केल्या. एखाद्या वेबसिरीजला साजेल अशी सजावट केली. तो त्या मूळ लेखिकांसाठीही नवा, सुखद धक्का देणारा अनुभव होता. आता कोरोनाचे संकट ओसरल्यावर या लघुनाटिका रंगमंचावर सादर करण्याचाही प्रयत्न त्या करणार आहेत. एकीकडे एक सरकार कलावंतांना एक एक रुपयाच्या मदतीसाठी झुंजवते. खेट्या मारून त्यांची हाडे मोडतील, अशी व्यवस्था तयार करते. दुसरे सरकार स्वत:हून मदतीला धावून जाते. नाविन्यपूर्ण योजना राबवून कलावंतांना पैशासोबत सन्मानही मिळवून देते. हा ज्या त्या सरकारच्या विचारसरणी, कार्यपद्धतीचा भाग म्हणावा लागेल. बाकी काय?


Wednesday 12 January 2022

एमबीएसचं ‘सौदी’

जागतिक स्तरावर झालेल्या एका अभ्यासानुसार २०७०मध्ये इस्लाम या पृथ्वीवरील सर्वात मोठा धर्म असेल. आणखी पाच दशकांनी तो ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांना मागे टाकेल. त्यामुळे इस्लामचा जन्म ज्या भूूमीत, देशात झाला. जेथे त्याचा झपाट्याने प्रचार, प्रसार झाला. त्या सौदी अरेबियाविषयी विविध अंगांनी जाणून घेणे पुढील काळात अत्यंत उत्सुकतेचा विषय असू शकतो. कारण इस्लामविषयीचे बहुतांश सर्व अत्यंत महत्वाचे निर्णय याच देशातून होतात. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रे सौदीवर अवलंबून आहेत. दुसरीकडे धर्माच्या पोलादी पडद्यामागे दडलेल्या या देशाची काही कवाडे प्रिन्स मोहंमद बिन सुलेमान म्हणजे ‘एमबीएस’ हळूहळू किलकिले करत आहेत. धर्ममार्तंडांचा विरोध पत्करून जनतेवरील अनेक बंधने ते शिथिल करत आहेत. खनिज तेलाने सोन्याचा धूरात बुडालेल्या सौदी अरेबियात त्यांनी महिलांना चारचाकी चालवण्याची परवानगी दिली. तेव्हा ती जगभरातील प्रसारमाध्यमात सर्वाधिक चर्चेची बातमी होती. न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराची हत्या एमबीएस यांनीच घडवून आणली असेही म्हटले जाते. महिनाभरापूर्वी आपल्या सुपरस्टार सलमान खानने तेथे फिल्मी गाण्यांवर नृत्य केले. त्याच्यासोबत किमान ऐंशी हजार प्रेक्षक थिरकले. त्यावर मोठे वादळ उठले. पण ‘एमबीएस’नी त्याची फार दखल घेतली नाही. जग ज्या दिशेने, गतीने बदलत आहे, त्या प्रमाणे काही पावले टाकावी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे. ते सुपर शक्तीमान नेते असले तरी त्यांची वाट खडतर राहणार आहे. कारण सौदी अरेबियाची सामाजिक जडणघडण अत्यंत वेगळी आहे. माणूूस म्हणूून तेथील माणसं कशी आहेत? प्रसारमाध्यमांनी काही घटनांच्या आधारे अरबांची रंगवलेली प्रतिमा वेगळी आहे का? प्रत्यक्षात अरब कसे वागतात. कसा विचार करतात. त्यांचे जगणे कसे आहे. परदेशी लोकांसोबत त्यांचा व्यवहार कसा असतो. तेथे प्रत्येक गावातून सोन्याचा धूर निघतो? तेथे गरीब लोक असतात? खेडेगावातील महिलांची स्थिती कशी आहे? धर्माचे तेथे सामान्य माणसे खरंच कडकपणे पालन करतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या, सोप्या शब्दात आणि निरागसपणे जाणून घ्यायची असतील तर डॉ. उज्वला दळवी यांचे ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेले पुस्तक नक्की वाचावे. त्यांनी सांगितलेले किस्से, कहाण्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या आहेत. तरीही त्यातून सौदी समाजाविषयी बऱ्यापैकी अंदाज येतो. जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या सौदी अरेबियाबद्दल मराठीत फारसे लिखाण झालेले नाही. तेथील सामान्य माणसाच्या आयुष्याविषयी तर फार काही उपलब्ध नाही. त्यामुळेही ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ महत्वाचे आहे. अनेक अडचणींची लढत, संकटांचा सामना करत डॉ. दळवी आणि त्यांचे पती जवळपास पंचवीस वर्षे म्हणजे १९८५ ते २०१० पर्यंत सौदी अरेबियामध्ये रुग्ण सेवेत होते. उम्म खद्रा या दुर्गम खेड्यात त्यांचा दवाखाना होता. तो चालवताना त्यांना सौदी अरेबियात गेल्या अनेक शतकांपासून राहणारा मूळ निवासी बदायुँ समाज जवळून पाहण्यास मिळाला. त्या काळात त्यांनी जे पाहिले, अनुभवले, अभ्यासले. ते त्यांनी या पुस्तकातील २६ प्रकरणांमध्ये मांडले आहे. त्यांची शीर्षके भाऊचा धक्का, पहिल्या दिवसाच्या ठेचा, ना मेघ ना दूूत, धर्मकारण, खानाखजाना, मरुभूमीतली मुशाफिरी, लक्ष्मीचा सारीपाट, वाळवंटी सूर मारिला अशी मराठी मनाला पटकन वेधून घेणारी आहेत. यावरून डॉ. दळवींनी सौदीतले त्यांचे दिवस कोणताही राजकीय, धार्मिक अभिनिवेश न ठेवता कसे टिपले असावेत, हे लक्षात येते. त्यांच्या कथनाला कोणताही रंग लागलेला नाही. कुठलाही विखार नाही. त्या अतिशय निखळपणे वर्णने करतात. सौदी कुटुंबाचे चित्र डोळ्यासमोर उभे करतात. सौदी पुरुष आणि सौदी महिलांचे विश्व उलगडून सांगतात. धर्माचा पगडा म्हणजे नेमके काय असते. हा पगडा सांभाळण्यासाठी राज्यकर्त्यांनी कशी यंत्रणा उभी केली आहे, याची कुशलतेने माहिती देतात. तंबूच्या आसपास वावरणाऱ्या महिला, मुला-मुलींच्या वेगळ्या शाळा, परदेशी विशेषत: युरोपीय कर्मचाऱ्यांचा रुतबा असे अनेक पैलू त्या खुमासदारपणे सांगतात. त्यामुळे काहीवेळा आपण हा प्रसंग पडद्यावर पाहात आहोत की काय, असा भास होतो. सौदी महिलेचे दु:ख, वेदना त्यांनी जवळपास पुस्तकभर मांडल्या आहेत. हे ‘सोन्याच्या धुराचे...’ खूप मोठे बलस्थान आहे. डॉ. दळवींनीच म्हटल्यानुसार या पुस्तकाने अलिबाबाच्या गुहेचे दार हलकेच सरकवले आहे. त्यातून डोकावताना काहीजणांना सोन्याच्या राशी दिसतील. काहींच्या नजरेस तेलाचे बुधले पडतील. मराठी वाचकांनी हा खजिना नक्कीच लुटावा असा आहे.