Thursday 30 July 2020

डोंगरावर सापळा

त्या उजाड माळरानावरून जाणारा छोटा रस्ता. दिवसातून एखादा ट्रक, एखादी मोटार आणि पाच-दहा दुचाकी त्यावरून जात होत्या. पण हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाला आणि पाहता पाहता सगळे चित्रच बदलून गेले. भली मोठी यंत्रे आली. जेसीबीने खोदकाम होऊ लागले. शंभर कामगारांची छोटी वस्ती तयार झाली. संगारामाचे एक छोटेसे हॉटेल आले. धनिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोक्याच्या जागांवर ढाबे, मोठी हॉटेल बांधणे सुरू केले. त्यामुळे एकच गजबजाट झाला. मजुरांच्या त्या वस्तीतील काळीसावळी, उंचीपुरी, कोणाच्याही मदतीला धावून जाणारी आशा लक्षवेधी होती. ती दोन मुलांची आई आहे, हे तिला पाहून कोणालाही खरे वाटले नसते. अवखळ, मनमोकळ्या स्वभावाच्या आशाला चांगला जोडीदार मिळाला होता. कमालीचा शांत, सुस्वभावी सुधाकर ठेकेदार पुरुषोत्तम रावचा अत्यंत लाडका होता. कारण कामाशी काम असा त्याचा स्वभाव होता. कामगारांच्या चहाटळ गप्पांमध्ये त्याला अजिबात स्वारस्य नसायचे. संगारामच्या हॉटेलमध्ये काही जण दुपारच्या वेळी खुशाल दारू ढोसत. त्या दारुड्यांत सुधाकरचा भाऊ चंद्रकांतही होता. ते त्याला मुळीच पसंत नव्हते. आपल्याला ठेकेदाराकडून मान-सन्मान मिळतो, महिन्याच्या एक तारखेला पूर्ण मोबदला हातात पडतो, मग आपण दारू पिऊन काम करणे चांगले आहे का, असा त्याचा प्रश्न होता. अर्थातच चंद्रकांत आणि इतर कामगार त्याला उडवून लावत. तुला आयुष्यच कळालेले नाही, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, त्याची मजा लुटली पाहिजे, ठेकेदाराकडं करोडो रुपये आहेत, असं ते सांगत. सुधाकरची पाठ वळली, की आशाबद्दलही उलटसुलट बोलत. ती अनेकांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय होती. ती खडी फोडताना, टोपली उचलताना, रस्त्याच्या आजुबाजूला खड्डे खोदताना तिच्या हालचालीवर बारीक नजर ठेवायचे. त्यांच्या विखारी नजरा तिच्या लक्षात येत, पण ती दुर्लक्ष करायची. काही जणांना मुद्दाम भैय्या, भाऊ, भाऊसाहेब, दादा अशा हाका मारायची. अपवाद
प्रीतमकुमार, बालाप्रताप, समशेरचा. या तिघांशी तिची चांगली मैत्री जुळली होती. तिघेही तिच्यापेक्षा तीन-पाच वर्षांनी लहान होते. लहान वयातच त्यांची शाळा सुटली होती. आता सरकारी योजनेत बाराखडी तरी लिहिता आली पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. इयत्ता सातवीपर्यंत शिकलेल्या आशाला हे कळताच तिनं तिघांची शाळा सुरू केली. सुधाकर घरी नसला तरी ते तिघे बिनधास्तपणे येत. हळूहळू तिचा जीव अभ्यासात गती असलेल्या आणि आक्रमक स्वभावाच्या समशेरमध्ये गुंतू लागला, पण त्याला तिच्यात तसं स्वारस्य नव्हतं. त्यापेक्षा आशाची मावसबहीण रूपा त्याला आवडत होती. पत्नी पद्माला काडीमोड देऊन रूपाला पळवून नेण्याची स्वप्नं तो बघायचा. इकडं सुधाकर कामात मग्न होता. आशा अवखळ, मनमोकळी, सर्वांशी गप्पा मारणारी आहे, पण ती कधीच धोका देणार नाही, असं तो वारंवार इशारे देणाऱ्या चंद्रकांतला सांगायचा. आणि एक दिवस दोन्ही मुलांना घरी सोडून आशा गायब झाली. सुधाकर हादरून गेला. प्रीतमकुमार, बालाप्रताप, समशेरही गडबडून गेले. मात्र, तीन वर्षांच्या पोलिस तपासात काहीच हाती लागलं नाही. इन्स्पेक्टर उदयनी जवळपास नाद सोडून दिला. तोपर्यंत रस्ता तयार झाला. मुला-बाळांना घेऊन सगळे कामगार दुसऱ्या कामावर रुजू झाले.. आणि एक दिवस खबऱ्यानं सांगितलं की, जवळच्या डोंगरावर एक सापळा पडला आहे. तिथून चक्रं फिरली. इन्स्पेक्टर उदय यांनी आशाचा खुनी शोधला. 

ही वेळ का आली?

एका शेतकऱ्याने शेतात ऊस लावला. सुदैवाने त्याच्या विहिरीला तुडुंब पाणी होते. तो रोज पाटातून उसाला पाणी देई. महिना उलटून गेला तरी पीक वाढलेले दिसेना. त्यामुळं तो चिंतातुर झाला. नेमकं काय झालं म्हणून त्यानं तपासलं तर त्याच्या लक्षात आलं की, पाटामध्येच खूप सारी बिळं झालीत. सगळं पाणी त्या बिळातच चाललं होतं. हे पाहून शेतकरी कळवळला. आपल्याला उसाचं मन कळायला खूपच उशीर झाला असं त्याला वाटलं. असंच काहीसं मराठी नाट्यसृष्टी आणि त्यात काम करणाऱ्या बड्या दिग्गजांचे झालं आहे की काय अशी शंका येत आहे. विशेषत: ग्रामीण भागातील, छोट्या शहरातील रसिकांना नेमकं काय हवं आहे याबद्दल दिग्गजांना काही देणे-घेणे आहे की नाही? मुंबई, पुण्यामध्ये जे वाटते तेच खरे. बाकीच्या लोकांना विचारण्याची गरज नाही. माध्यमांमध्ये प्रपोगंडा करून आपण गल्ला भरू शकतो असा त्यांचा समज झाला आहे का, असा प्रश्न पडतो. विशेषत: कोरोना संकटाच्या काळात ते प्रकर्षानं जाणवलं.
हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी सुरू केलेले कलचाचणी अभियान. यात ते रसिकांशी एका फॉर्मद्वारे संवाद साधत आहेत. कोरोनानंतर रसिकांना कोणत्या प्रकारचे नाटक पाहण्यास आवडेल. म्हणजे विनोदी की सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक? शिवाय लोक नाट्यगृहात येण्यास उत्सुक आहेत का? आले तर दोनअंकी नाटक पाहू इच्छितात की दीर्घांक? अशा अनेक अंगांनी दामले चाचपणी करत आहेत. त्याचा पहिला टप्पा अर्थातच त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक असा ठेवला. नंतर ते दुसऱ्या टप्प्यात कोकण, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडं वळाले आहेत. अखेरचा टप्पा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा आहे. त्यातून रसिकांचे खरे मत कळावे अशी अपेक्षा आहे. एकदा ते कळाले की मग ते त्यांच्या पसंतीच्या म्हणजे मुंबई-पुण्यातील काही लेखकांना सांगणार. लेखक त्यानुसार लिखाण करणार. मग प्रशांत दामले आणि त्यांचे सहकारी ते नाटक बसवणार आणि आधी अर्थातच मुंबई-पुणे येथे त्याचे प्रयोग होतील. तेथील लोकांना ते आवडले तर राज्यात इतर ठिकाणी सादरीकरण होणार आहे. अशी एकुणात दामले यांची योजना आहे. ती त्यांनी चौदा वर्षांपूर्वी म्हणजे महामंदीची चाहूल लागली तेव्हा राबवली होती. रसिकांना त्या वेळी आवडनिवड कळवली होती. त्यानुसार नाटकांची यशस्वी निर्मिती झाली. आताही तसेच व्हावे. फक्त चौदा वर्षांमध्ये बरेच पाणी वाहून गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाने थेट रसिक संख्येवरच आघात केला आहे. डिसेंबरमध्ये नाटकाचा प्रयोग होईल. तेव्हा पाचशे जणांच्या नाट्यगृहात अडीचशे लोक असतील अशी शक्यता आहे. म्हणजे एकुणात नाट्यसृष्टीचे अर्थकारण अडचणीत असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी एकट्या दामलेंनी धडपड करण्यापेक्षा सर्वांचा हातभार लागायला हवा होता. तसे काही होत नसावे. एरवी नाटकवाली मंडळी नेहमी नवनवीन आयडिया शोधून काढतात. विषयांना तोंड फोडतात. काहीतरी वक्तव्ये करून जगाचे लक्ष वेधून घेतात. मग कोरोनानंतर नाटकाचे जग या विषयावर एकटे दामले का? असा प्रश्न पडतो. रसिकांच्या मनाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रयोग करणे, त्यांची मते जाणून घेणे हा प्रयोग चांगला आहे. पण, असे करण्याची वेळ का आली? मुंबई-पुण्याबाहेर, छोट्या शहरात, ग्रामीण भागातही आपले रसिक आहेत, त्यांच्याशी कायम संवाद हवाच याची जाणीव दिग्गज लेखक, दिग्दर्शक, कलावंतांनी ठेवली नाही. म्हणून हा प्रयोग करावा लागत आहे असं म्हटलं जातं. आता कलचाचणी अभियानाने पाटाला पडलेली बिळं बुजली आणि रसिक-नाट्यकर्मींचे नाते नव्या वळणावर गेले तर मराठी रंगभूमीचा अधिक फायदा होईल.

फुलपाखरांचे संमेलन

एकीकडे शास्त्रज्ञ, संशोधक कोरोनाची लस काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे काही लोक लस येऊच शकत नाही. लसीच्या तारखेच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असं म्हणत आहेत. एका बाजूला कोरोना रुग्णांना जगवण्यासाठी काही क्षेत्रातील मंडळी झुंजत आहे. दुसरीकडे या लढाईतून स्वत:ची झोळी भरून घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. झुंजीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करून लक्ष वेधण्याचा डाव साधला जात आहे. अगदी शाळकरी मुलांनाही त्यातून सोडलेले नाही. आधी शाळा बंद कशा. त्या ऑनलाईन सुरू करा, असा धोशा लावण्यात आला. सुरु झाल्यावर सर्वांना कनेक्टिव्हिटी नाही, असा ओरडा झाला. मग सतत ऑनलाईनमुळे मुलांचे डोळे दुखतात. ते चिडचिडे होतात, असा गवगवा होऊ लागला. त्यामुळे अभ्यासाचा वेळ घटवण्यात आला. 
हे असे होत असताना काही लोक मुलांच्या विकासासाठी, त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी धडपडत आहेत. वाद-विवादापासून दूर राहत मुलांसाठी चांगले काम करत राहणे हेच त्यांचे ध्येय असते. मुलगा पडला. वाहून चालला, असा नदीच्या काठावर उभे राहून आरडाओरडा करण्यापेक्षा पाण्यात उडी मारून मुलाला वाचवणे त्यांना आवडते. अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वांमध्ये बालकवी गणेश प्रल्हाद घुले यांचा समावेश करावा लागेल. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांसाठी जे काही केले. त्याचे मोजमाप करणे अवघड आहे. काय केले त्यांनीॽ तर त्यांनी तब्बल ७५ दिवस सातत्याने फेसबुक पेजवर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी बालकांना, रसिकांना मिळवून दिली. चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारण्याचा आनंद अनेक लेखक, कवी, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, साहित्यिकांना प्राप्त करून दिला. जणू काही एक स्वतंत्र, मुक्त शाळाच घुले यांनी त्यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबुक पेजवर भरवली होती. वक्त्यांसाठीचे विषय ‘मुलं आणि स्क्रीन’, ‘मुलांचे भावविश्व आणि सिनेमा’, ‘लहान मुलांची जडणघडण करताना’, ‘बालक-पालक, योगाभ्यास’ असे वैविध्यपूर्ण अन् उपयुक्त असतील, याची काळजी त्यांनी घेतली. मुलांचे व्यक्तिमत्व घडावे. त्यांना जगाची ओळख व्हावी. आणि मुलांचे जग मोठ्यांना समजावे, असा विषय निवडीमागील प्रमुख उद्देश होता. त्यासाठी घुलेंना अभ्युदय फाऊंडेशन, श्रीराम पोतदार, निरंजन भालेराव, संतोष लोमटे, मंगेश निरंतर, ईश्वर उमाळे, महेश अचिंतलवार यांची कल्पक मदत मिळाली. ऑनलाईन उपक्रमात अवघड असलेले सातत्य त्यांनी प्राप्त केले. 
इथपर्यंत तर ठीक आहे. पण रविवारी म्हणजे १९ जुलैला त्यापुढची मजल त्यांनी गाठली. राज्याच्या सोळा शहरांतील बालकवींचे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन भरवले. फुलांनी बहरलेल्या झाडावर रंगीबेरंगी फुलपाखरे गोळा व्हावीत. मध चाखत चाखत त्यांनी साऱ्यांवरच गोडव्याचा शिडकावा करावा, असे दृश्य त्या ऑनलाईन संमेलनात दिसले. बुलडाण्यातून मैत्री लांजेवार, अवंती शिंगाडे, लातूरमधून ऋषिकेश गुजलवार, तृप्ती आंबुलगे, औरंगाबादेतून अन्वयी वैद्य, ऋचा सिनकर, सांगलीतून गौतम पाटील, सारिका पाटील, श्रावणी पाटील, तेजश्री पाटील, जळगावमधून समृद्धी चोखट, अमरावतीची उर्वी ख, जालन्याची सृष्टी लोमटे, उस्मानाबादची राधा जाधव, सोलापूरची सिद्धी कोकीळ, बीडची  ऋतुजा शिंदे यांनी बहारदार रचना सादर करत सव्वा तास धमाल उडवून दिली. लहान मुले काय विचार करतात. एखाद्या प्रश्नाकडे कशी पाहतात. त्यांचा पुढील काळातील प्रवास कसा असू शकतो, याचा अंदाज या संमेलनातून आला. त्यामुळेच या उपक्रमाचे मोजमाप लगेच करणे चुकीचे ठरेल. जालना जिल्ह्यातील पाडळी या खेडेगावात लहानपण गेलेल्या घुले यांना हे सारे करण्याची शक्ती त्यांच्या बालपणातून मिळाली. चिमुकली मुले हेच विश्व मानत ते त्यात रमले. आणि जो लहानांसोबत लहानांसारखा होतो. तो सर्वांना आपलासा वाटतो. कृतीतून जग घडवण्याची ताकद त्याच्यात असते. कवीसंमेलनातून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

Wednesday 15 July 2020

हात सापडला, पण मारेकरी?

ज्युलिया रेडिडेन्सी म्हणजे शहरातील उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत. सुरक्षा रक्षकांच्या तपासणीशिवाय प्रवेश नाही. दोन कोटी किंमत असलेल्या टुमदार बंगल्यांची रांग. प्रत्येक बंगल्यासमोर छोटीशी बाग. किमान तीन कारसाठीचे पार्किंग. वरच्या मजल्यावर दहा जणांची पार्टी करता येईल एवढा टेरेस. एकेक खोली तीनशे चौरस फुटांची होती. उंची संगमरवर. प्रख्यात बिल्डर जगलानी यांचे आवडते आर्किटेक्ट नाडकर्णी यांनी या सोसायटीचा आराखडा तयार केला होता. तरुण नवरा-बायको, त्यांची दोन मुले आणि आणखी एखादा नोकर राहू शकेल, अशी त्यांनी प्रत्येक बंगल्याची रचना केली होती. त्यामुळे मेट्रो मशिनरीज कंपनीचे मालक रत्नदीप यांनी पाच वर्षांपूर्वी पाहता क्षणी बंगला खरेदी केला. तेव्हा तीन वर्षाची मुलगी क्षमा त्यांच्यासोबत होती. कारण त्यांची पत्नी रिया मैत्रिणीच्या विवाहासाठी परदेश दौऱ्यावर गेली होती. परत आल्यावर बंगला पाहून ती हरखून गेली होती. वर्षभरापासून तिने आलिशान बंगल्यासाठी रत्नदीप यांच्यामागे लकडा लावला होता. नवऱ्याने हट्ट पूर्ण केल्यामुळे ती मनोमन खुश झाली. पण तिने तसे मुळीच दाखवले नाही. उलट सोसायटीत शेवटच्या टोकाचाच बंगला का घेतला. इथे पलिकडे नाला आहे. त्याच्या दुर्गंधीचे काय? नाल्यावरून उडी मारून कोणी बंगल्यात शिरले तर काय करणार? असे प्रश्न तिने विचारले. त्यामुळे रत्नदीप थोडासा खट्टू झाला. पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. कारण तिचा स्वभाव आता बदलणार नाही, हे त्याला माहिती होते. अत्यंत आकर्षक, सुंदर असलेली रिया लग्नापूर्वी मॉडेलिंग करत होती. आणि रत्नदीप छोटा उद्योजक होता. एका कार्यक्रमात त्यांची ओळख झाली. तो पाहता क्षणी तिच्यावर लट्टू झाला. तिच्या वडिलांची मुळीच इच्छा नव्हती. पण आईने आग्रह धरला. मुलगा सध्या उद्योगात पाय जमवत आहे. मेहनती, कल्पक आहे. लवकरच त्याची  भरभराट होईल, असे दिसते. तुम्ही माझ्याशी विवाह केला. तेव्हा तुमच्याकडे तरी काय होते, असा सवाल तिने केला. आणि रिया-रत्नदीप विवाह बंधनात बांधले गेले. अधूनमधून किरकोळ कुरबुरी वगळता दोघांचा संसार तसा ठीकठाक सुरू होता. म्हणजे बायकोचे उधळपट्टी करणे त्याला मुळीच पसंत नव्हते. कष्टाचा पैसा आहे. तो जपूनच वापरला पाहिजे, असं तो वारंवार तिला बजावत होता. तर तिचं म्हणणं होतं की, आयुष्य एकदाच मिळालं आहे. तारुण्य पुन्हा परतून येणार नाही. त्यामुळे जे काही करायचं ते आताच केलं पाहिजे. पैसा मनसोक्त खर्च करण्यासाठीच असतो. रत्नदीप फारच तगादा लावू लागला. म्हणून मग मुलीला सांभाळण्यासाठी एक आया ठेवून तिने चक्कपैकी एका फॅशन मार्केटिंग फर्ममध्ये नोकरी सुरू केली. तिथे तिची फर्मचा मालक निमिषसोबत गट्टी जमली होती. आणि वर्षभरात फर्मची अर्धी पार्टनरही झाली. खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी तिने सुरू केलेल्या नोकरीचा व्याप वाढू लागला. तिच मॉडेलिंग शो आयोजित करू लागली. इकडे रत्नदीपचा उद्योगही झपाट्याने प्रगती करत होता. चार मोठ्या शहरात प्रकल्प सुरू झाले होते. आणखी मोठी झेप घेण्याची त्याची तयारी सुरू होती. त्याच कामानिमित्त बाहेरगावी गेला. परतला तर रिया, क्षमा दोघीही गायब. आयाला विचारले तर ती म्हणाला, मालकीणबाईने मला दोन दिवसांच्या सुटीवर पाठवले होते. रत्नदीपने रियाच्या आई-वडिल, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. पण पत्ता लागेना. मग त्याने पोलिसांत तक्रार दिली. मोठ्या घरचे प्रकरण असल्याने थेट एसीपी घाटगे यांनीच सूत्रे हाती घेतली. रिया, क्षमाच्या शोधासाठी जोरदार मोहीम चालवली. आठ दिवसानंतर जनावरे चारण्यासाठी टेकडीवर गेलेल्याने खबर दिली की नदीच्या काठावर एक तुटलेला मानवी हात पडला आहे. पोलिस घटनास्थळी धावले. तेव्हा दाट झाडीत रिया, चिमुकल्या क्षमाचे मृतदेह सापडले. घाटगेंनी सखोल चौकशी सुरू केली. तेव्हा निमिषच्या जबाबातून असे समोर आले की, कॉलेजच्या काळात रियाचे विश्वनाथ नामक तरुणाशी प्रेमप्रकरण होते. महिनाभरापूर्वी ती त्याला एका हॉटेलमध्ये भेटली. तर निमिष आणि मालकिणीमध्ये काहीतरी आरडाओरड झाली. भाऊबीजेच्या दिवशी मालकिणबाईँचे वडिल आणि दोन भाऊ मालकिणबाईला धमकावून गेले, असं आया म्हणाली. बिल्डर जगलानीचा मुलगा रौनकशीही रियाची जास्त मैत्री होती, असं सुरक्षा रक्षकांनी सांगितलं. सगळ्यांच्या जाब-जबाबातून धागे पकडत घाटगेंनी खुनी शोधला.   

कलावंत लाईव्हज् मॅटर्स

काळ मोठ्या वेगानं धावत असतो. अनेकांच्या ते लक्षात येत नाही.कलावंतांच्या तर मोठ्या मुश्किलीनं कारण त्यांना आधी यशाचे शिखर गाठायचे असते. एकदा शिखरावर पोहोचले की आजूबाजूला चाहत्यांचा इतका गराडा असतो. पैशांचा महापूर वाहत असतो की काही वर्षानंतर हे सर्व उताराला लागणार आहे. त्यावेळी जीवन कंठण्यासाठी बेगमी केली पाहिजे, याचा विसर पडून जातो. हे तर झाले शिखरावर पोहोचणाऱ्यांचे. पण जे आयुष्यभर झगडून पायथ्याशीच राहतात. विशेषत: नाटक, सिनेमात बॅकस्टेजला काम करतात. त्यांचे काय? कोरोनाच्या संकटाने या प्रश्नाचे भयाण रुप पुन्हा एकदा जगासमोर आले. दररोजचा एखादा प्रयोग, शूटिंग. त्याचा रात्री खिशात पडणारा मेहनताना घेऊन घरी जायचे आणि निपूटपणे दुसऱ्या दिवसाची वाट पाहायची असा त्यांचा जीवनक्रम. कोरोनामुळे तो बंद झाला. जी काही थोडीफार बचत होत ती महिनाभरात संपली. मग स्वत: काय खायचे आणि कुटुंबाचे पोट कसे भरायचे. त्यापैकी कित्येकांनी मित्रांची मदत मागितली. काहीजणांना मिळालीही.पण सगळेच एवढे सुदैवी नव्हते. चारही बाजूंनी अंध:कार दाटून आला होता. अशा प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलावंत आघाडीने त्यांना मोलाची मदत केली. खरेतर राजकीय मंडळी फक्त मतदारांपुरते पाहतात. असे म्हटले जाते. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे म्हटले जाणे त्यांच्यापुरते पुसून टाकले आहे. कलावंतांना राजाश्रय द्यायचा म्हणजे काय करायचे असते ते दाखवून दिले. त्यांच्या या दातृत्वाचा परिणाम म्हणजे प्रख्यात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह काही प्रथितयश कलावंताचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. प्रिया म्हणजे तीन दशके मराठी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी. पण त्यांची केवळ तेवढीच ओळख नाही. तर काळाची पावले ओळखण्याची शक्ती त्यांच्यात असावी. या शक्तीचा गरीब कलावंतांना लाभ देण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. लॉकडाऊनमध्ये राष्ट्रवादीने कोणताही गवगवा न करता तीन हजार लोक कलावंतांना प्रत्येकी तीन हजार रुपये मानधन दिले. त्यामुळे मी या पक्षाची निवड केली. असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून कायम सत्तेत असणारी मंडळी. त्यांची सुबत्ता आणि कलावंतांची गरज लक्षात घेता ही रक्कम पुरेशी नाही, असे काहीजण म्हणू शकतील. पण इतर गडगंज नेते, पक्ष काहीच देत नाहीत. त्यापेक्षा राष्ट्रवादीचे देणे कितीतरी महत्वाचे आहे. असो. राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे. ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी. मालिका कलाकारांना तीस दिवसात मानधन मिळावे. असे प्रिया यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या राजकीय शक्तीचा प्रभावी वापर करून त्या हे सर्व प्रत्यक्षात आणतील. अशी अपेक्षा आहे. कलावंतांनी राजकारणात जावे की नाही या विषयी तीन-चार मतप्रवाह आहेत. राजकीय मंडळी कलावंतांचा काही काळासाठी फक्त वापर करतात, असा आरोप होतो. त्यात तथ्य आहेच. पण व्यवहारातील अंगभूत गुण लक्षात घेऊन काम केले तर राजकारणाातही कलावंतांना निश्चित यश मिळू शकते. दक्षिणेत तर कलावंत हमखास राजकारणाच्या वाटेवर जातात. प्रिया यांच्या रुपाने हा ट्रेंड मराठीमध्येही जोरात यावा. तरच कलावंतांची दु:खे सरकारला कळतील. त्यातील काही दूर करता येतील. प्रिया यांच्याकडे शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस असेही पर्याय होते. पण शिवसेनेत आधीच आदेश बांदेकर आणि मंडळी पाय रोवून आहेत. मनसेची कलावंत आघाडी तर आधीपासूनच कार्यरत आहे. भाजप, काँग्रेस राष्ट्रीयस्तरावर काम करणारे पक्ष. मराठी कलावंत हा निकष त्यांच्याकडे पाळला जाणे कठीण. त्यामुळेच प्रिया यांनी सत्तेच्या जवळ असणारा आणि मराठी माणसांचा बोलबाला असलेल्या राष्ट्रवादीची निवड केली असावी असे दिसते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय वर्तुळात पाऊल ठेवण्यापूर्वी कोणीही मोठमोठी आश्वासने देतात. कालांतराने स्वत:ची प्रगती होऊ लागल्यावर आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे गरीब कलावंतांसाठी लढण्याची जबाबदारी प्रिया आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांना कायम स्मरणात राहिल. ‘कलावंत लाईव्हज मॅटर्स’ हाच त्यांचा मूलमंत्र असेल, अशी अपेक्षा आहे.

Thursday 9 July 2020

गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट

नदी, ओढ्यालगत एक छोटेसे गाव. आजूबाजूला शेती पसरलेली. 
गावात काही चौसोपी वाडे. कौलारुंनी शाकारलेली छोटेखानी घरे. 
त्यासमोर भलेमोठे अंगण. शेणाने सावरलेले. अंगणात झाडे. 
दिवसभर माळरानात चरलेल्या गाई-म्हशी गावात शिरतात. 
मग गडी मंडळी दूधाने भरलेल्या चरव्या माजघरात पोहोचवतात.
ताटात चुरलेली चुलीवरील गरमागरम भाकरी, दूधावर ताव मारुन 
सात-आठ लहान मुलं, मुली मस्ती करत अंगणात येतात.
हलकाहलका गार वारा फिरु लागलाय. पोरं थोडी मस्ती करतात. 
मग एकजण म्होरक्या होतो. सर्वांकडून अंगणभर अंथरुणे टाकून घेतो. 
आणि ती सारीजण गारवा अंगावर घेत लोळू लागतात. 
कोणाची तरी वाट पाहत असतात. त्यांचं लक्ष माजघराकडं. तेवढ्यात 
चाहूल लागते. सारे एकमेकांना इशारे करत खुरमांडी घालून, हाताचे कोपरे 
हनुवटीवर टेकवून बसतात. दिवसभर कष्ट करून, माजघरात राबून थकलेली,
तरीही नातवंडांच्या चिवचिवाटाने आनंदात भिजलेली आजी येते. 
डोईवर नऊवारी लुगड्याचा पदर, कपाळाला ठसठशीत कुंकू. हातभर बांगड्या.
कुरकुरणाऱ्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करत मुलांमध्ये जाऊन बसते. ती तिच्याभोवती 
जणूकाही घेराबंदी करतात. ‘गोष्ट, गोष्ट…’ असा धोशा लावतात.
मग ती एखाद्या जादूगारानं पोतडीतून अलगद मोरपीस काढावं, तशी गोष्ट 
काढू लागते. कधी गोष्ट असते राज्यकन्या - राजपुत्र - राक्षसाची. तर
 कधी छत्रपती शिवाजी महाराज, राम-कृष्णांची, भगवान गौतम बुद्धांची, 
भगवान महावीरांची, गुरु नानकांची किंवा मोहंमद पैगंबरांची. 
साऱ्या कथांचा समारोप आजी बोधवचनातून करते. म्हणजे खोटं बोलणं, 
चोरी करणं पाप आहे. गरीबांवर अन्याय, दगाबाजी, मोठ्यांना उलटून बोलणं 
मोठा गुन्हा आहे. जिद्द, कष्टाशिवाय यश मिळत नाही, असे अनेक 
आयुष्यभराचे संस्कार आजी गोष्टीमधूनच करते. तो मनात भिनवत
 मुलं पेंगतात. गाढ झोपी जातात. 
आता चाळीस-पन्नाशीत पोहोचलेल्या अनेकांनी आजीच्या गोष्टींचा 
आनंद घेतला असेल. पण विशी-पंचविशीत असणाऱ्यांना तो मिळालेला नाही. 
कारण गोष्ट सांगणारी आजी वीस वर्षांपूर्वीच धूसर होणे सुरू झाले. 
त्यामुळे त्यांना हा वारसा पुढील पिढीला देता येणार नाही. 
अर्थात असे, एवढे सगळे असले तरी गोष्ट नावाच्या गोष्टीची गोष्ट 
अजिबात संपलेली नाही. एक गोष्ट सांगू का, असं म्हणतच कोट्यवधी लोक
बोलण्याची सुरुवात करतात. माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. तो कशावरही 
गोष्टी रचतो आणि कोणाला तरी सांगत राहतो. म्हणून नद्या, ओढे आटले. 
गावे, वाडे ओसाड झाले. अंगणातील झाडे करपली. तरी गोष्टीचे महत्व आहेच. 
हे लक्षात घेऊन काही कल्पक तरुणांनी कोरोना संकटात, काळानुरूप तिचे 
रुप बदलले. आणि गोष्ट सांगणे हा प्रकार एकदम जागतिक पातळीवर नेला.
गेल्या महिन्यात मुंबईच्या आगाझ प्रॉडक्शन्स या करमणूक कंपनीने 
सोशल मिडिआवर कथा लेखनाची स्पर्धा जाहीर केली. देशाच्या 
कानाकोपऱ्यातून ५०० तरुण लेखकांनी चकित करुन टाकणाऱ्या विषयांवर 
कथा पाठवल्या. आयोजकांनी त्यातील दहा सर्वोत्तम निवडल्या. आणि
त्या सांगण्यासाठी नव्या रुपातील आजी-आजोबा आणले. या कथा 
त्यांनी रंगमंच, सिनेमासृष्टी गाजवत असलेल्या, आवाजाची नैसर्गिक
देणगी लाभलेल्या आणि शब्दांचा अर्थ प्रकट करण्याची शक्ती प्राप्त 
कलावंतांकडून वाचून घेतल्या. अमृता सुभाष, सतीश आळेकर, उमेश कुलकर्णी, 
मकरंद देशपांडे, प्रसाद ओक, ऋता दुर्गुले, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, 
राजेश मापुसकर या दिग्गजांनी दहाही कथा श्रवणीय केल्या. त्या ऑडिओ-व्हिज्युअल
रुपात उपलब्ध झाल्या आहेत. तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहेत. 
कंपनीने खर्चाचा ताळमेळ आणि काहीतरी थ्रील म्हणून या कथांमध्ये व्होटिंगची 
एक स्पर्धाही सुरू केली आहे. 
आजी, वाडा, अंगण नसले तरी प्रत्येक कथेत ‘संस्कार’ नावाचा आत्मा आहेच.
या कथांचे लेखक नेमके कोण, याचा शोध घेण्यासाठी तुम्हालाही सोशल मिडिआ 
धुंडाळावा लागेल. गोष्टी ऐकाव्या लागतील. समोरचा सांगतोय ते मनापासून ऐकणं,
समजून घेणं हे देखील तुम्ही समंजस, सुसंस्कृत माणूस असल्याचं एक लक्षण आहे. नाही का?

... की त्यांनी स्वत:ला संपवले?

सहाव्या मजल्यावरून त्यांना खाली कोसळताना अनेकांनी पाहिले. काहीजणांनी प्रसंगावधान राखत तत्काळ अँब्युलन्स बोलावली. लोळागोळा झालेला तो देह रुग्णालयात पाठवताना त्यात प्राण शिल्लक नाही, असे त्यांच्या लक्षात आले होते. तरीही त्यांना आशा होती. रुग्णालयात पोहोचल्यावर ती मावळली. इथे येण्यापूर्वीच सर्व संपले होते, असे म्हणत रुग्णालयाने शहरातील प्रथितयश डॉक्टर अस्थाना यांचा मृतदेह त्यांच्या शेजाऱ्यांच्या हवाली केला. कारण साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या डॉ. अस्थाना यांच्या दोन्ही मुली सुप्रिया आणि रश्मी परगावी फिरण्यासाठी गेल्या होत्या. वडिल गेल्याचे कळताच त्या पती आणि मुलांसोबत पहाटे शहरात परतल्या. घटना पाहणाऱ्या सर्वांनी एकसूरात सांगितले की, तुमचे वडिल खाली कोसळताना आम्ही पाहिले. त्यावेळी टेरेसवर कोणीही दिसले नाही. पण मुली ठाम होत्या. आमचे वडिल अतिशय खंबीर मनाचे होते. वीस वर्षांपूर्वी आमची आई अपघातात मरण पावली. तेव्हापासून त्यांनीच आमचा सांभाळ केला. ते स्वत:चे जीवन संपवूच शकत नाही. हा घातपाताचा प्रकार आहे, असे त्यांनी ठामपणे बजावले आणि पोलिसांत तक्रार केली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ‘प्रख्यात डॉक्टर अस्थाना यांची सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, मुलींना घातपाताचा संशय’ अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. एकच खळबळ उडालीइन्सपेक्टर मकासरे यांनी तपास सुरू केला. डॉ. अस्थाना मूळचे पंजाबातील जालंदरचे रहिवासी. प्रेमविवाहानंतर घरात वाद सुरू झाल्याने तरुण वयातच जालंदरमधून या शहरात आले होते. त्यांच्या हाताला उत्तम गुण होता. शहरात डॉक्टरांची संख्याही फारशी नव्हती. त्यामुळे त्यांचा पटकन जम बसला. अत्यल्प दरात रुग्णसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले होते. त्यामुळे नावलौकिक पसरत गेला. भरभराट झाली. आणि तो दुर्दैवी दिवस उजाडला. पत्नीसोबत शहराबाहेर फिरण्यासाठी गेले असताना एक ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य काही काळ खच्ची झाले होते. पण मुलींची जबाबदारी असल्याने ते पुन्हा ताकदीने उभे ठाकले. अनेक नातेवाईकांनी दुसऱ्या विवाहासाठी आग्रह धरला. पण त्यांनी तो निग्रहाने परतवून लावला. एक छोटेखानी हॉस्पिटल उभे केले. शहराबाहेरच्या तलावाजवळ एक कोटी रुपये खर्चून टुमदार बंगलाही खरेदी केला. दोन्ही मुलींनी डॉक्टरच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण रश्मी प्राध्यापक तर सुप्रियाला बँकेत लेखापाल झाली. दोघींचे विवाह झाल्यावर अस्थाना वर्षभर एकटेच बंगल्यात राहिले. त्यांच्या एकटेपणाची मुलींना काळजी होती. म्हणून त्यांनी त्यांच्या मागे लागून त्यांना शहरातील त्या भव्य सहा मजली अपार्टमेंटमध्ये एक भलामोठा फ्लॅट खरेदी करायला लावला होता. आम्ही इथून जवळच राहतो. त्यामुळे येता-जाता तुम्हाला भेटू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. पण प्रत्यक्षात त्या संसार आणि नोकरीच्या व्यापात इतक्या अडकून पडल्या होत्या की महिन्यातून एकदा कधीतरी वडिलांकडे फिरकत. वाढत्या वयामुळे डॉ. अस्थानांमध्ये एकाकीपणाची भावना वाढू लागली होती. इन्सपेक्टर मकासरेंनी अधिक माहिती घेतली. फ्लॅटची तपासणी केली. तेव्हा कुठेही चिठ्ठी ठेवलेली नव्हती. मात्र, उंची मद्याच्या पाच-सहा बाटल्या आढळल्या. अस्थाना रात्री हमखास मद्यपान करत. अपार्टमेंट सोसायटीचे अध्यक्ष माळेगावकर, सचिव हंबर्डे यांनी सांगितले की, डॉक्टरांकडे त्यांचे सहकारी डॉ. मलिक, डॉ. लांबा वगळता कोणाची ये-जा नव्हती. तर सोसायटीचे सुरक्षा रक्षक रामभाऊंनी सांगितले की, महिनाभरापूर्वी या दोन्ही डॉक्टरांची अस्थानांनी पार्किंगमध्ये हॉस्पिटल नावावर करण्यावरून बाचाबाची झाली होती. चौकशीत असेही समोर आले की, सुप्रियाचा नवरा कंवलजीत अलिकडे व्यवसायात कंगाल झाला होता. तलावाजवळचा एक कोटींचा बंगला विकून सासऱ्याने पैसे द्यावेत, असा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी तो अधूनमधून येऊन अस्थानांना धमकावत होता. हॉस्पिटलमधील महिला सहकारी डॉ. अलकांसोबत तुझ्या वडिलांचे नाते तयार होत आहे, असे तो सुप्रियाला सांगत होता. डॉ. अलकांचे पती प्रशांतना त्याने डॉ. अलका आणि डॉ. अस्थानांची एक व्हिडिओ क्लीपही पाठवली होती. त्यावरून अलका अस्वस्थ होत्या. त्यांची अस्थानांशी प्रचंड वादावादी झाली होती. अस्थानांच्या कथित आत्महत्येदिवशी डॉ. मलिक, डॉ. लांबा, डॉ. अलका दुपारच्या सत्रात फ्लॅटवर येऊन गेले होते. इन्सपेक्टर मकासरेंनी पोस्टमार्टेम रिपोर्ट तपासला. त्यात मद्याचे प्रमाण अधिक असल्याचे म्हटले होते. अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही तपासले आणि अस्थानांना सहाव्या मजल्यावरून कोणी ढकलले, याचा शोध काढला.


Monday 6 July 2020

निष्पाप भावंडांचा काय गुन्हा होता?

शहराच्या मध्यभागातील ती वसाहत अशी होती की तिचा प्रत्येकाला अभिमान होता. चारही बाजूंनी सर्व धर्मांची धार्मिक स्थळे होती. मंदिर, मशिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार, चर्च असे होते. त्या वास्तुही ऐतिहासिक म्हणजे दोन-चारशे वर्षांपूर्वीच्या असे म्हटले जात होते. शिवाय दहा फुटांच्या अंतराने पसरलेल्या लांबलचक दीडशे गल्ल्या. त्यात एकदम दाटीवाटीने घरे. ती देखील जुनाट. दुमजली. प्रत्येक घराच्या खालच्या मजल्यावर हमखास छोटेखानी दुकान, हॉटेल, ऑफिस किंवा पान टपरी, खानावळी. त्यातल्या काही खानावळी, हॉटेल्स, दुकाने तर शंभर वर्ष जुनी होती. या वसाहतीत येणार नाही, असा माणूस विरळाच. काहीही खरेदी करायचे असेल तरी अनेकजण या वसाहतीत येत. काहीजण भटकंती, काही नेत्रसुखासाठी येत. अगदी शरीर सुखासाठीही. कारण एक गल्ली कुंटणखान्यांनी भरलेली होती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून नव्हे तर पोलिसांच्या मदतीने हा व्यवहार खुलेआम चालत असे. त्याची सर्वांना अगदी सवय झाली होती, असे म्हटले तरी चालेल. वसाहतीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे अमर आणि राजेश हे लॉटरी तिकीट विक्रेते. आता वयाच्या चाळीशीत पोहोचलेल्या दोघांची दृष्टी लहानपणीच गेली होती. त्यांची विधवा आई धुणी-भांडी करायची. दृष्टीहीन लहान मुलांना कसे सांभाळणार असा प्रश्न तिच्यापुढे होता. नेमकी त्याचवेळी शहरात दंगल उसळली होती. त्यात दंगलखोरांनी तिच्या लॉटरीविक्रेत्या भावाच्या पोटात चाकू खुपसला होता. त्याने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी तिकिटांचा गठ्ठा बहिणीच्या हातात सोपवला होता. तो तिने अमर-राजेशच्या हातात दिला. इकडून तिकडे फिरताना दोघेजण सिनेमाची गाणी म्हणत. दोघांचाही आवाज खणखणीत होता. अनेक लोकांना त्याचे कौतुक वाटे. ते त्यांच्याकडून तिकीटे खरेदी करत. कधीकधी बक्षिसी देत. काही दुकानदार, हॉटेलचालक त्यांना बोलावून घेत. गाणी म्हणण्यास सांगत. एका गाण्यासाठी कधीकधी शंभर रुपये मिळत. कधी कपभर चहा. एखाद्या ठिकाणी नुसती पाण्यावर बोळवण होत असे. पण मनाने दिलदार असलेल्या या भावंडांनी त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. ते सकाळी नऊ ते दहापर्यंत सगळ्या धार्मिक स्थळांचा फेरफटका मारत. मग रात्री नऊपर्यँत या गल्लीतून त्या गल्लीत भटकत. दृष्टी नसली तर त्यांचे कान अतिशय तीक्ष्ण होते. शेकडो प्रकारचे वास ते ओळखत. अनेक वर्षे त्यांचे जगणे असेच सुरू होते. अगदी रिनाची अमरशी ओळख मर्यादेपलिकडे वाढेपर्यंत. कमला वर्षभरापूर्वी कुंटणखान्यात आली होती. दिसायला अत्यंत मादक, आकर्षक असलेल्या रिना गाण्याची शौकिन होती. गोड गळ्याची तिला देणगी होती. बाजारातून फिरताना तिच्या कानावर अमर-राजेशचे सूर पडले. तिने त्यांना बोलावून घेतले. आणि पाहता पाहता तिघांच्या जोरदार मैफली सुरू झाल्या. त्यातल्या त्यात शांत स्वभावाच्या अमरशी तिचे सूत अधिक जुळले होते. त्यामुळे ती त्याला स्वत:च्या खोलीत रात्री उशिरापर्यंत थांबवून घ्यायची. पहाटे दोघे भाऊ घराकडे परतायचे. त्यांना पाहिल्यावर त्यांची वृद्ध आई झाडलोट सुरू करायची. ती आता खूप थकली होती. अमर-राजेशचं लग्न झालं नाही. आता आपला वंश चालणार नाही, या कल्पनेने ती दु:खी, कष्टी झाली होती. वाड्यातल्या दोन खोल्या दोघांच्या नावावर करून मोकळं व्हावं, असं तिला वाटू लागलं होतं. कारण दिवसागणिक खोल्यांचं महत्व वाढत चाललं होतं. वाडा मालक जहागिरदार एका खोलीचे दहा लाख रुपये घेऊन बाहेर पडा, असं म्हणत मागे लागले होते. गल्लीच्या तोंडाशी हैदराबादी बिर्याणी हॉटेल चालवणारा हरमेश तीन हजार रुपये महिन्याने खोल्या मला भाड्याने द्या, असा तगादा लावत होता. इकडे या दोघांची रिनासोबत वाढत चाललेली जवळिक कुंटणखाना चालवणाऱ्या कमलाबाई आणि रिनाचे खास चाहते अमीरचंद यांना पसंत नव्हती. एका रात्री अमीरचंदने राजेश-अमरला रिनाच्या खोलीतून अक्षरश: धक्के मारून हाकलून दिले होते. असे सारे सुरु असताना वसाहतीतील एनएम ज्वेलर्सवर मध्यरात्रीनंतर दरोडा पडला. पाच-सात जणांनी मिळून पन्नास लाखांचे दागिने पळवले. दरोडेखोर पळून जात असताना राजेश-अमर रिनाच्या कोठ्यावरून येत होते. रिनाने त्यांच्याकडून खरेदी केलेल्या लॉटरी तिकीटावर एक कोटीचे बक्षिस लागल्याने दोघे खूप खुश होते. गाणी म्हणत होते. या दोघांनी आपल्याला पाहिले, असे त्यांना वाटले आणि दरोडेखोरांनी त्यांच्यावर सपासप चाकूचे वार केले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचा मृत्यूपूर्व जबाब घेताना इन्सपेक्टर तालेवारांना काही शब्दच कळाले. त्यातून त्यांनी दरोडेखोर आणि हल्लेखोर, हल्ल्यामागील डोके शोधून काढलेॽ