Wednesday 14 March 2018

दायाद : ‘नाट्यत्रयी’चा दस्तऐवज

 मराठवाड्याचं मागासपण केवळ सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा, 
सरकारी नोकऱ्यांपुरते नाही. ते त्या पलीकडच्या मानसिकतेत आहे. 
ज्या क्षेत्रात आपण मागास आहोत, त्याची शास्त्रशुद्ध नोंद ठेवण्यातही 
मराठवाडा कमालीचा मागास आहे, असा अनुभव येतो. एवढेच नव्हे, तर 
जी काही चांगली कामे झाली त्यांचा इत्थंभूत आराखडा, इतिहास, खाचाखोचा 
पुस्तकरूपात तयार करण्याचे कामही फारसे झाले नाही. विशेषतः कला प्रांतात 
ते ठळकपणे जाणवते. नाटक लोकांना आवडले ना? मग झाले तर. आपले काम 
संपले, असे मानणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात प्रचंड आहे. आपण केलेली 
निर्मिती शब्दबद्ध करावी आणि तो वारसा अभ्यासासाठी, आठवणींकरिता 
पुढील पिढीसाठी द्यावा, असे वाटणारे बरेच असतील. पण त्यासाठी प्रत्यक्ष 
काम करणारे नाहीतच. कारण तसा संस्कार कधी मराठवाड्यात झालेला नाही.
 हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे प्रख्यात नाटककार प्रशांत दळवी यांनी 
संपादित केलेले दायाद : वारसा ‘वाडा’त्रयीचा हे पुस्तक. महान नाटककार 
महेश एलकुंचवार लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित वाडा चिरेबंदी, 
मग्न तळ्याकाळी, युगांत या त्रिनाट्यधारेने रंगभूमीवर इतिहास निर्माण केला.
 सलग तीन नाट्यप्रयोग एकाच दिवसात, अशी केवळ अशक्य वाटणारी घटना  
प्रत्यक्षात आणली गेली. हे कसे शक्य झाले. मुळात वाडा चिरेबंदीच्या पुढे
एलकुंचवारांनी मग्न तळ्याकाठी, युगांत कसे लिहिले. ते कुलकर्णींकडे कसे आले. 
कलावंत भूमिकांत कसे शिरले. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसाठी काय 
अभ्यास झाला, हे सारे नाट्य रसिकांसमोर पुस्तकरूपातच येणे आवश्यक होते. 
आणि तसे कुलकर्णी – दळवींच्या जिगिषा प्रकाशनाने आणले आहे. त्याबद्दल 
त्यांचे कौतुक करावे, त्यांना तमाम नाट्यकर्मींतर्फे द्यावेत, तेवढे धन्यवाद 
कमीच आहेत. मूळचे मराठवाड्यातील असले आणि मराठवाड्याचे असल्याचा 
अभिमान वाटतो, असा दावा ते म्हणजे विशेषतः कुलकर्णी करत असले तरी 
मराठवाड्याच्या मुळात असलेले मागास, आळसपण, जाती-धर्म, प्रांतवादात 
घुटमळणे त्यांच्यात नाही. औरंगाबादमध्ये काम करत असतानाच 
त्यांच्यात व्यावसायिकता कमालीची भिनलेली होती. मुंबईत तर त्यावर
झळाळी चढली. आपल्या भोवतीच्याच वर्तुळाला घेऊनच पुढच्या पायरीवर 
पाऊल ठेवायचे, हा शिरस्ता पाळत कुलकर्णी चालत गेले. त्या अर्थाने 
दायादमध्ये मांडलेला नाट्यत्रयीचा चित्तवेधक इतिहास म्हणजे त्याचेच 
पुढचे पाऊल आहे. संपादक म्हणून प्रशांत दळवी यांनी दायादची अतिशय 
आकर्षक मांडणी केली आहे. नाट्यत्रयीला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या 
कुलकर्णींच्या संवादापासून पुस्तकाचा प्रवास सुरू होतो. तो श्याम चौघुले या 
नौकानयनपटूंच्या प्रतिक्रियेनं थांबतो. मधल्या पानांवर नेपथ्यकार प्रदीप 
मुळ्ये, संगीतकार राहुल रानडे यांच्यासह निवेदिता सराफ, वैभव मांगले, 
प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर आदी रंगमंचावर विविध भूमिका साकारणारे 
त्यांची प्रांजळ मते नोंदवतात. शिवाय नाट्यत्रीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका 
बजावणारे श्रीपाद पद्‌माकर यांचाही अनुभव वाचण्यास मिळतो. जयंत पवार, 
रवींद्र पाथरे, राज काझी, श्रीपाद ब्रह्मे, सुधीर पटवर्धन, विजय तापस या 
मुंबई-पुणेकर समीक्षकांनी तेव्हा काय म्हटले होते, हेही कळते. शिवाय भालचंद्र
 मुणगेकर, निळू दामले, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, संदीप कुलकर्णी, 
सुनील बर्वे, क्षितिज पटवर्धन, प्रा. दासू वैद्य, अनिकेत सराफ यांना नाट्यत्रयीतून 
नेमके काय गवसले हेही समोर येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुराधा कपूर यांनी 
घेतलेली महेश एलकुंचवारांची १५ पानांची प्रदीर्घ मुलाखत यात आहे. यात एलकुंचवार 
यांनी त्यांचे सामाजिक स्थित्यंतराबद्दल मांडलेले चिंतन नाट्यकर्मींसाठी 
खूपच उपयुक्त दस्तऐवज आहे. तसेच काहीसे कुलकर्णींच्या लेखात आहे. त्यात त्यांनी 
स्वतःतील दिग्दर्शकीय कौशल्याबद्दल ओघवत्या शब्दांत सांगितले आहे. दिग्दर्शक होऊ
 इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी त्यांचे ओघवते सांगणे म्हणजे मैलाचा दगड ठरू शकते,
 एवढी ताकद त्यात आहे. वाडा आणि नाट्यत्रयीचे प्रयोग केव्हा झाले. कुलकर्णींच्या 
दिग्दर्शकीय नोंदी कशा होत्या. प्रदीप मुळ्येंनी नेपथ्य रेखाटन कसे केले होते, असे 
अनेक महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात वाचण्यास, अभ्यासण्यास मिळतात. म्हणून 
ते पानागणिक सखोल आणि समृद्ध करणारे होत जाते. मुंबईच्या यशवंतराव 
चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत 
आणि त्यांचे सहकारी सुबोध जाधव यांनी हे पुस्तक विविध माध्यमांकडे पोहोचवले. 
त्यामुळे तेही या अमोल ठेव्याचे मानकरी आहेत. कलाकृतीची टिपणे तयार करणे, 
ती जपून ठेवणे, नंतर ती अभ्यासणे. नाटकाची छायाचित्रे, नाटक बांधणीसाठी 
दिग्दर्शकाने कागदावर उतरवलेली कॉम्पोझिशन्स, प्रकाश योजनेचे चार्ट हे सारे
 म्हणजे नाटकाच्या आयुष्यभराच्या प्रवासाची ऐतिहासिक कहाणी असते. 
मराठवाड्यात निर्माण झालेल्या स्मारक, वऱ्हाड निघालंय लंडनला, थांबा रामराज्य 
येतंय, गाजराची पुंगी या आणि अशा अनेक नाट्यकृतींनी तर अस्सल इतिहास 
निर्माण केला आहे. या प्रत्येकाचा पुस्तकरूपात दस्तऐवज तयार होऊ शकला असता 
तर रंगकर्मींच्या विश्वात मोठी भर पडली असती. पण ते मराठवाड्याच्या मागास, 
आळशी मनोवृत्तीमुळे शक्य झाले नाही. जे होऊन गेले त्यावर बोलून उपयोग नाही. 
म्हणून आता नव्या पिढीने विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून काही 
नाट्यकृतींना पुस्तकात आविष्कृत केले तर ती मोलाची कामगिरी निश्चित ठरेल.

No comments:

Post a Comment