Tuesday 7 June 2016

बेणारेंच्या पलिकडल्या







रंगभूमी, चित्रपटांमध्ये ६० पेक्षा अधिक वर्षे टिकून राहणे. कर्तृत्वाचा ठसा उमटवणं भल्या भल्या जमले नाही. ते लीलया प्रत्यक्षात आणणाऱ्या आणि म्हणूनच उत्तुंग ठरलेल्या सुलभा देशपांडे उर्फ लीला बेणारे आपल्यातून गेल्या. जाताना त्या त्यांच्या अनेक आठवणी, नाटक, चित्रपटांतील भूमिका तर देऊन गेल्या आहेतच. पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे संयत अभिनय शैलीचा, खडतर प्रवासातून यश संपादनाचा वस्तुपाठ देऊन गेल्या आहेत. कला क्षेत्रातील नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका या तीनही प्रांतात यशस्वी कसे होता येते, याचे त्या मूर्तीमंत उदाहरण होते, असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. १९६० च्या दशकात जेव्हा त्या मराठी रंगभूमीवर आल्या. तेव्हा प्रायोगिक रंगभूमीची बीजे रोवली जात होती. मराठी नाट्य क्षेत्रात विजया मेहता, विजय तेंडूलकर आदी मंडळी पारंपारिक, पौराणिक, कौटुंबिक नाटकांची चौकट मोडून सामाजिक प्रश्न मांडण्याची तयारी करत होती. समाजाची सगळी सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेणाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून हे असं का घडतंय. हे चुकीचं घडतंय. या घसरणीला तुम्ही जबाबदार आहात, असे सांगण्याची हिंमत दाखवत होती. त्यामुळे नाटकाची हिरोईन, नायिका म्हणजे सुंदर, सुबक, देखणी असे समज ढासळवणे सुरू झाले होते. पण केवळ सर्वसामान्य चेहरा असलेली नायिका एवढ्या भांडवलावर टिकता येईल, असा सुलभा देशपांडे यांचा समज नव्हता आणि हिरोईन, नायिका होण्याचा त्यांचा पिंडही नव्हता. त्या अस्सल, बावनकशी अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांनी आवाज, रंगमंचावरील वावर आणि भूमिका जगणे म्हणजे काय असते ते दाखवून दिले. छबिलदास शाळेत शिक्षिकेची नोकरी करताना त्या प्रायोगिक रंगभूमीवर स्थिरावल्या. या  स्थिरावण्यामागे त्यांचे पती अरविंद देशपांडे यांचा मोठा वाटा होताच. पण एकदा स्थिरावल्यानंतर पुढची वाट त्यांनी स्वतःच निर्माण केली. शांतता कोर्ट चालू आहे, या तेंडूलकरांच्या जगद्‌विख्यात नाटकातील लीला बेणारे साकारून त्या एकूणच भारतीय रंगभूमीवर सर्वोत्तम अभिनेत्रींच्या रांगेत जाऊन बसल्या. बेणारेच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. तेव्हा त्यांना स्वतःलाही या भूमिकेत नेमके काय आहे, याची पूर्ण कल्पना नव्हती. तरीही अगदी पहिला प्रयोग काही तासांवर आलेला असताना त्यांनी तेंडूलकरांना अपेक्षित  असलेले बेणारेबाईंचे अंतर्मन अचूक पकडले आणि त्यापेक्षाही अधिक ताकदीने साकारले. २० डिसेंबर १९६७ रोजी झालेल्या `शांतता`च्या त्या प्रयोगाने एक इतिहास निर्माण केला. सुलभा देशपांडेंच्या रुपाने एक महान, चतुरस्त्र, कल्पक आणि प्रयोगशील अभिनेत्री नाट्य-चित्रपट सृष्टीला दिली. पुढील काळात त्यांनी अनेकविध भूमिका केल्या. पण लीला बेणारे म्हणजे सुलभा देशपांडे असे समीकरण कायम राहिले. खरेतर त्या बेणारेंपलिकडील रंगकर्मी होत्या. १९६०-८० च्या दशकात त्यांनी बालरंगभूमीसाठी जे कार्य केलं ते `शांतता`च्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्वाचे आहे. शाळेतील ७५-८० मुलांना घेऊन त्या तेंडूलकरांची बालनाट्ये बसवत. नाटकांमध्ये काम केल्याने उर्जा मिळते. काहीतरी वेगळे केल्याचे समाधान मिळते, असे त्यांनी त्या चळवळीतून मुलांवर, प्रेक्षकांवर सातत्याने बिंबवले. कलावंत, प्रेक्षकांची पिढी घडवली. विजया मेहतांसारख्या विलक्षण प्रतिभेच्या पण आक्रमक दिग्दर्शिकेसोबत वाद झाल्यानंतर `रंगायन` फुटली. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडेंनी अविष्कारची स्थापना केली. तेव्हा अविष्कारचे अस्तित्व किती दिवस टिकणार, असा प्रश्न विचारला जात होता. पण काही कालावधीतच तो विरून गेला. अविष्कार वैभवशाली संस्था बनली, याचेही श्रेय त्यांनाच. केवळ अभिनेत्री पुरते त्यांचे विश्व मर्यादित नव्हते. तर त्या एक कुटुंबवत्सल गृहिणी होत्या. म्हणून त्यांनी मुलांवर संस्कार करणारी बालनाट्याची चळवळ हाती घेतली. त्या एक उत्तम व्यवस्थापक होत्या. म्हणूनच त्यांनी अविष्कारची नौका व्यवस्थितपणे चालवली. अरविंद देशपांडेंचे अकाली निधन झाल्यावर त्या मनातून हादरल्या असल्या तरी संपल्या नाहीत. त्यांनी स्वतःची नवी वाट अधोरेखित केली. केवळ मराठी रंगभूमीपुरते मर्यादित राहून चालणार नाही तर मराठी हिंदी चित्रपट, टीव्हीवरील मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा कस लागला पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटत होते. म्हणून त्यांनी तशा भूमिका स्वीकारल्या. हिरो, हिरोईनची गर्दी असूनही लोकांच्या लक्षात आपली भूमिका राहिल, याची काळजी घेत राहिल्या. आणि हे सारे करत  असतानाही मराठी रंगभूमीची मूळ नाळ त्यांनी तुटू दिली नाही. कला क्षेत्रातील नव-नवे प्रवाह सातत्याने शोधत राहिल्या. म्हणूनच त्या बेणारेंच्याही पलिकडे जाणाऱ्या प्रयोगशील अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शक होत्या, अशीच नोंद इतिहासात करावी लागेल.

No comments:

Post a Comment