Tuesday 28 June 2016

मोरनामा : मुस्लिमांचे अंतरंग उलगडणाऱ्या २१ कथा

मोरनामा : मुस्लिमांचे अंतरंग

उलगडणाऱ्या २१ कथा

--

खंडप्राय असलेल्या भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. बड्या बड्या राजा-महाराजांना संस्थानिक करून त्यांच्या मानेवर कायम तलवार ठेवली. जनतेवर अंकुश ठेवण्यासाठी जाती, धर्माच्या भिंती आणखी उंच केल्या. भारतातून बाहेर पडताना गोरा साहेब फोडा आणि तोडाचा मंत्र देऊन गेला. त्याचे पर्यवसान फाळणीत झाले. तेही धर्माच्या नावावर. फक्त मुस्लिमांसाठीचे पाकिस्तान नावाचे एक राष्ट्र १४ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले. ही केवळ भूभागाची, नद्या, डोंगर, रस्त्यांची विभागणी नव्हती. तर त्यातून मनेही दुभंगली. एकाचवेळी भारतातून सुमारे ७४ लाख पाकिस्तानात गेले तर ८० लाख हिंदू पाकिस्तानातून भारतात आले. दीड कोटी लोकांनी धर्माच्या नावाखाली आपली जन्मभूमी सोडल्याचे हे अलिकडील काळातील दुर्मिळ आणि क्रौर्यदर्शनाचे एकमेव उदाहरण असावे. या घटनेने आधीपासूनच एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन धर्म एकमेकांपासून आणखी दूर गेले. १९७१मध्ये भारताच्या आक्रमक पवित्ऱ्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांगलादेश हा नवा देश उदयास आला. तेव्हापासून हिंदु-मुस्लिमांमधील तेढ आणखीनच वाढली. बाबरी मशिद पतनानंतर ती टिपेला पोहोचली. आता तर केवळ हिंदु-मुस्लिमच नव्हे तर हिंदूंमधील जातीय द्वेषही उफाळून आला आहे. बहुतांशजण जाती-पातीच्या पायावरच कुणाला चांगले आणि कोणाला वाईट म्हणायचे, हे ठरवत आहेत. जागतिक पातळीवर मुस्लिमांमधील पंथांमध्ये हिंसाचार सुरूच आहे. पाकिस्तानात शिया, अहेमदी पंथियांना वाळीत टाकले जाते. भारतात सुन्नी-शिया लढाई बऱ्याच वेळा रक्तरंजित होते. एकूणात माणूस माणसाला माणूस म्हणून समजून घेण्यासच तयार नाही, असे वारंवार दिसू लागले आहे. हिंदु-मुस्लिमांमधील दुरावा कमी करण्याऐवजी तो वाढवण्याकडेच राजकारणी, धर्मवेत्ते लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांच्यावर आरोप करून सामान्य नागरिक मोकळे होत असले तरी या धर्मवेड्यांना, राजकारण्यांना भरघोस पाठिंबा लोकच देत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ही दरी मिटवण्यासाठी अनेक संवेदनशील लोकांनी हयात घालवली. काहीजण अजूनही नेटाने प्रयत्न करत आहेत. यामध्ये पाकिस्तानी पत्रकार, लेखक इंतजार हुसैन यांचे नाव वरच्या फळीत आहे.

धर्माचा पगडा म्हणा किंवा कट्टरता मुस्लिमांमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी नसते. इतर समाजांमध्ये काय चालले आहे. सामाजिकदृष्ट्या प्रगतीच्या नव्या संधी शोधण्याचे प्रयत्न एखादा पंथ, गट करत आहे का, याकडे मुस्लिम गांभीर्याने पाहातच नाहीत, असा सर्रास आरोप होतो. अगदी साहित्याच्या प्रांतापुरते बोलायचे झाले तर मुस्लिम साहित्यिकांना हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मातील कथा, दंतकथा, पुराणे  आणि त्यातील व्यक्तिरेखा माहिती असतात. पण बहुतांश हिंदू साहित्यकार, लेखक इस्लाम धर्माबद्दल अनभिज्ञ असतात. कारण मुस्लिमांनी त्यांची कवाडे आतून घट्ट बंद केली आहेत. विशेषत: फाळणीनंतर कवाडांना आतून जाडजूड अडगळ लावले आहेत, असे म्हटले जाते. त्याचवेळी मुस्लिम साहित्यकार फक्त हिंदू धर्मातील त्रुटी दाखवतात. मूर्तीपूजेतील फोलता, हिंदुंमधील जाती व्यवस्था हाच त्यांच्या आवडीचा विषय असतो, असाही समज आहे. तो अर्थातच चुकीचा आहे. मुस्लिम साहित्यकारांध्येही कमालीची संवेदनशीलता आहे. माणुसकीवर त्यांचाही विश्वास आहे. दोन धर्मातील तेढ काहीही साध्य करणार नाही, हे त्यांनाही ठावूक आहे. केवळ ठाऊकच नाही तर त्यासाठी ते लढत, झगडत आहेत. लेखणी झिजवत आहेत. दोन्ही धर्माचे लोक एकमेकांजवळ आल्याशिवाय दुरावा, द्वेष मिटणार नाही, यावर ते ठाम आहेत. अशा साहित्यिकांपैकी इंतजार हुसैन त्यापैकी एक आहेत. त्यांच्या मोरनामा आणि इतर कथा या कथासंग्रहातून त्यांची संवेदनशीलता दिसून येतेच. शिवाय हिंदू, जैन, बौद्ध धर्मातील लोकांबद्दलचा एक जिव्हाळा ठळकपणे लक्षात येतो. मुस्लिमांची इतर धर्मियांबद्दलची वागणूक कुठे चुकत आहे, यावर फटकारे ओढणाऱ्या कथाही मोरनामा या कथासंग्रहात आहेत. त्यांच्या लिखाणाचा मूळ उद्देश हिंदू-मुस्लिम एकोपा असा असला तरी कथा केवळ प्रचारकी थाटाच्या नाहीत. तर त्यात साहित्यिक मूल्य आहे. त्यामुळेच साहित्य अकादमीने त्यांच्या २१ उर्दू कथांचा संग्रह मराठीमध्ये आणला आहे.

शियापंथीय असलेल्या हुसैन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बुलंद जिल्ह्यातील डिबाई गावचा. साल होते १९२२. त्या काळी हिंदू-मुस्लिमांमधील बंधुभाव चरमसीमेला पोहोचला होता. तो संस्कार हुसैन यांच्यात खोलवर झाला. फाळणी झाल्यावर हुसैन पाकिस्तानात  निघून गेले पण तो संस्कार मिटला नाही. उलट तेथे आलेल्या अनुभवांमुळे तो आणखीनच गाढ होत गेला. हिंदूस्थानातून एक पत्र, ते जे हरवून गेले, अयोध्या, बंद गल्ली, झोप, पश्चातापाचे शहर या कथांमधून ते त्यांनी मांडले आहे. मोरनामाच्या प्रस्तावनेत भास्कर भोळे यांनी म्हटले आहे की, माणसांच्या भूतकाळाची पुन:प्राप्ती आणि संस्कृतीच्या पाळामुळांचा शोध हा जरी इंतजार हुसैन यांच्या लेखनाचा मौलिक पैलू असला तरी त्यांची प्रतिभा केवळ भूतकाळात अडकून पडलेली दिसत नाही. त्यांच्या कथावस्तूंच्या प्रवासात साठोत्तर काळात ते ज्या टप्प्यावर पोहोचतात तो सद्यकालीन माणसांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांशी भिडणारा असल्याचे दिसून येते. भोळे यांचे हे निरीक्षण ‘बंद गल्ली’ या कथेतून आल्याचे दिसते. विलक्षण कोंडीत सापडलेला अर्शद नावाचा बिहारी मुस्लिम स्वत:च्याच गावात चोरा सारखा लपून छपून येतो. कोणी आपल्याला ओळखत नसल्याची वेदना वाटत असताना हिंदूंची त्याला मनोमन भिती वाटते. त्याबरोबर त्याचा मुस्लिमांवरील विश्वासही उडालेला असतो. सध्या हिंदू-मुस्लिम याच मनोवस्थेतून जात आहेत. त्यामुळे मोरनामातील कथा अधिक वाचनीय, चिंतनीय ठरतात. भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचे एकत्र, एकोप्याने आणि बंधुभावानेच राहणे दोघांच्या हिताचे आहे, असा संदेश हुसैन यांनी पेरला आहे. असे म्हणतात की जे पेरले तेच उगवते. हुसैन यांच्यासारख्या पेरत्यांची संख्या अजून खूप वाढली तर आणि तरच दोन धर्मात विष पेरणारे काळाच्या प्रवाहात लुप्त होतील.

No comments:

Post a Comment