Monday 25 July 2016

खट्याळपणातील मौज : संगीत संशयकल्लोळ



खट्याळपणातील मौज म्हणजे काय अन्् संसारात जोडीदारावर किती संशय घ्यावा. सुखाचा संसार कसा करावा, याची गुपिते सांगणाऱ्या संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा २० जुलै रोजी औरंगाबादेत प्रयोग होत आहे. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले आणि दमदार गायक राहूल देशपांडे यांच्या अभिनयाची धमाल असलेल्या या नाटकाविषयी

---

मराठी माणसाला अनेकविध प्रकारच्या शंका असतात. त्यातील रसिकमनाची शंका अगदीच मूलगामी आणि समाजाच्या हिताच्या असतात. उदाहरणार्थ मराठी भाषेचे काय होईल. इंग्रजीच्या लाटेत मराठी टिकेल का?  संगीत नाटकांचे वैभव परत येईल की नाही? त्यावरून राजकीय, सामाजिक क्षेत्रात बरीच भांडणे, वादविवाद होत असतात.  पण काही मंडळी या वादात पडत नाहीत. ती सृजनशीलतेचा, नाविन्याचा ध्यास घेऊन मैदानात उतरतात आणि स्वत:च्या शक्ती, प्रकृतीनुसार मराठीचे हित जपण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. मराठी  नाट्य संगीत ही एक अद््भुत देणगी असून ती रसिकांपर्यंत विविध रुपांमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे मानत असतात. प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले हे त्यातील अग्रणी नाव आहे. अफलातून  टायमिंग, रंगमंचावरील सहज सुखावून टाकणारा वावर आणि शब्दांवरील हुकुमत या त्रिगुणी संगमामुळे ते लोकांच्या हृदयावर दीर्घकाळ राज्य करत आहेत. मात्र, आपण केवळ राज्य करण्यासाठी नाही तर परंपरा, संस्कृती जपण्यासाठीही काम केले पाहिजे, याची जाणिव त्यांना आहे. त्यांनी नुकत्याच रंगमंचावर आणलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातून त्यांची जाणिव ठळकपणे जाणवते.

 रात्रभर चालणारी संगीत नाटके पाहणे रसिकांना शक्य होणार नाही. अर्धा तासाचे नाट्यपद ऐकले जाणार नाही, हे लक्षात आल्यावर नव्या रुपात काय करता येईल, याचा विचार त्यांनी केला. त्यातील ताजेपणा, नाविन्य पाहता  प्रशांत दामले यांनी संगीत संशयकल्लोळचा नव्या स्टाईलमध्ये आणलेला प्रयोग खरेच कौतुकास्पद आहे.

गोविंद बल्लाळ देवल या प्रतिभावान नाटककाराने लिहिलेले संगीत संशयकल्लोळ एक अजरामर कलाकृती आहे. कारण त्यात माणसाच्या मुळ स्वभावावर बोट ठेवले आहे. हा स्वभाव अधिक उलगडून सांगितला आहे. मूळ संकल्पनेला धक्का न देता मांडणीत बदल केला तर त्यांनी केलेली रचना कोणत्याही पिढीसमोर सादर करता येऊ शकते, हे मर्म दामले यांनी अचूक ओळखले आहे. ते सांगतात की, खट्याळपणा हा माणसाचा विशेषत: पुरुषांचा स्वभावगुण. तो प्रत्येकात असतोच. पण खट्याळपणा किती करावा, याचे  भान प्रत्येकाला ठेवता आले पाहिजे. म्हणजे लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून मनसोक्त वारा अंगावर घेणे हा खट्याळपणाच आहे. पण दाराशी उभे राहून तुम्ही त्यावर झोके घेऊ लागलात की जीवावर बेतू शकते. तसेच संशयाचे आहे. संसारात जोडीदारावर किती संशय घ्यावा, याच्याही मर्यादा आहेत. हेच देवलांनी संशयकल्लोळमध्ये सुरेख पद्धतीने मांडले आहे. माणसाच्या मूळ स्वभावाविषयीचे हे भाष्य असल्याने आजकाल फेसबुक, व्हॉटस्अपमध्ये गुंतलेली पिढीही त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकते. तशाच पद्धतीने निपुण धर्माधिकारी यांनी संकलन व दिग्दर्शन केले आहे. साडेचार मिनिटांचा कालावधी असलेली १८ सुरेख नाट्यगीते प्रतिभावान गायक राहूल देशपांडेंकडून लाईव्ह ऐकता येणे, हे देखील या प्रयोगाचे बलस्थान आहे. प्रशांत दामले यांच्या अभिनयाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. तो प्रत्यक्ष अनुभवलाच पाहिजे, एवढा निरागस आणि सुखद आहे. म्हणूनच मराठी नाट्यसंगीतावर प्रेम असलेल्यांनी नव्या रुपातील संशयकल्लोळ आवर्जून पाहावे, एवढेच या निमित्ताने सांगणे आहे.

No comments:

Post a Comment