Thursday 22 December 2016

मध्यमवर्गाच्या विवाहबाह्य संबंधांचे समुद्र मंथन

मध्यमवर्गाच्या विवाहबाह्य संबंधांचे समुद्र मंथन


--
स्त्री पुरुषातील आकर्षण हाच जगातील नव्या जीवाच्या निर्मितीचा 
मूळ स्त्रोत आहे. त्यांच्यात आकर्षण नसेल
तर पृथ्वीतलावर जीवच निर्माण होणार नाही. मात्र, 
आकर्षणापोटी जोडीदार सोडल्यास किंवा 
जोडीदाराला अंधारात ठेवून नवा जोडीदार जोडला. 
त्याच्याशी भावनिक शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास
जगण्याचा मूळ आधार असलेले भावविश्व उद््ध्वस्त होते.
गुन्ह्यांचा जन्म होतो. म्हणून  कोणी, कोणावर, 
कशामुळे हक्क सांगायचा. एकपत्नी, एक पतीव्रत
कसे टिकेल येईल. कोणी कोणाला अधीन राहायचे
याच्या काही चौकटी समाज, कुटुंब व्यवस्था टिकवण्याची
आस असलेल्यांनी तयार केल्या. त्यांची पेरणी 
धार्मिक रुढी, परंपरांमध्ये केली. विवाह संस्थेची
बांधणी केली. त्यामुळे कौटुंबिकस्तरावरील जग
बऱ्यापैकी सुरळित जगत आहे. किमान भारतीय
कुटुंब व्यवस्थेत तरी त्याची अवस्था बिकट झालेली नाही. 
मात्र, गेल्या दहा-पंधरा वर्षात या मध्यमवर्गात
अनैतिक संबंधांचे वादळ येऊ घातले आहे, असे दिसते.
नाते-संबंध जपण्यासाठी आयुष्य पणाला लावूत.
पण जोडीदाराला धोका देणे. त्याला अंधारात ठेवून
संबंध ठेवणे शक्यच नाही, असे मध्यमवर्ग सांगत असे.
नैतिकतेच्या चौकटीत मध्यमवर्गाला बांधून ठेवणाऱ्या,
तसा संदेश देणाऱ्या अनेक साहित्यकृती 
आल्या आणि गाजल्या. त्यामुळे नैतिकता जपण्याची
जबाबदारी मध्यमवर्ग सांभाळत असल्याचे चित्र 
निर्माण झाले. ते तसे पाहण्यास गेले तर सत्यही आहे.
पण भारतात मोठ्या संख्येने मध्यम असलेला हा वर्ग
जागतिकीकरणामुळे उच्च किंवा उच्च 
मध्यमवर्गीयात समाविष्ट होऊ लागल्याने
अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. एकत्र कुटुंब
व्यवस्था मोडकळीस येत आहे. प्रचंड पैसा पण
मानसिक आधारासाठी कोणीच नाही, अशी
त्यांची अवस्था आहे. मग त्यातून मित्र, मैत्रिणी
शोधणे आणि त्यांच्यातच गुंतून शरीर
संबंधांपर्यंत जाणे अशी धावाधाव सुरू आहे.
एकीकडे नैतिक मूल्ये आणि दुसरीकडे मानसिक
विकलांगता, आकर्षण अशा कोंडीत हा नव उच्च
मध्यमवर्ग सापडत चालला आहे. अशीच घसरण
सुरू झाली तर पुढे काय, असा प्रश्न अनेकांना
पडला आहे. तसा तो मिलिंद बोकील यांनाही पडला.
त्यांनी समुद्र कादंबरीत त्याचे उत्तर शोधण्याचा 
प्रयत्न केला. तर चिन्मय मांडलेकर या प्रतिभावान
कलावंताने तो नाट्य रुपात रंगभूमीवर 
आणला आहे. त्याला स्पृहा जोशी या तेवढ्याच
ताकदीच्या अभिनेत्रीची साथ मिळाली आहे. 
अतिशय बोल्ड विषय तेवढ्याच बोल्डपणे तरीही
संयततेच्या चौकटीत त्यांनी मांडला आहे. उच्च मध्यम
आणि मध्यमवर्गाला पचेल, समजेल आणि अंमलात
आणणे शक्य आहे, अशाच पद्धतीने तो सादर
केला आहे. भूमिकांपासून तसूभरही बाजूला न हटता
त्यांनी व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. 
पस्तीशीतील उद्योजक भास्कर (चिन्मय मांडलेकर) 
आणि साहित्य, कवितांच्या, सृजनशील अन् तरल जगात
रमणारी तिशीतील त्याची पत्नी नंदिनी (स्पृहा जोशी)
समुद्रालगतच्या एका रिसोर्टवर मन मोकळे
करण्यासाठी येतात. तेथे नंदिनीकडून तो तिच्या अनैतिक
संबंधांची कबूली घेतो. या संबंधांची तिला का गरज पडली,
याचा शोध काढतो. ती देखील त्याला मनमोकळेपणे
सर्वकाही सांगते. चूक मान्य करते. मग पुढे काय
असा प्रश्न भास्करपुढे पडतो. तेथे त्याला पुन्हा
कुटुंब व्यवस्थेची आठवण येते. जोडीदाराची सर्वात
मोठी चूक पोटात घालून जगण्याचा निर्णय घेऊन
तो तिला मिठीत घेतो. जसा समुद्र अनेक गोष्टी
पोटात घेतो तसाच. अनैतिक संबंध हा तसा अनेक
नाटकांमधून येऊन गेलेला विषय. पण त्याची
मांडणी आणि दाहकतेचे टोक कुटुंब व्यवस्थेवर
फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे नव्हते. 
‘समुद्र’ २०-२५ वर्षापूर्वी आले असते तर ते
कदाचित एवढे वादळी वाटले नसते किंवा त्यात
गांभीर्य, तथ्य नाही, असे रसिकांना वाटले असते. 
मात्र, नव उच्च मध्यमवर्गात अशा संबंधांचे
प्रमाण वाढत चालल्याचे ‘समुद्र’चा प्रतिसाद स्पष्ट
सांगत आहे.  अनैतिक संबंधांचा शेवट चांगला नसतोच,
हे सांगण्यासाठी कुणा समाजशास्त्रज्ञाची गरज नाही.
तरीही अनेक तरुण-तरुणी त्या दिशेने जात आहेत.
एवढेच नव्हे तर त्याचे आपापल्या पद्धतीने समर्थनही
करत आहेत.  नाटकातील भास्कर आणि नंदिनी 
लेखकाला जसे अपेक्षित, त्याने आखून दिलेल्या
चौकटीतच वागले. खरेखुरे सगळेच भास्कर, नंदिनी
एवढा संयम पाळणे कठीण आहे. मानसिक
आधाराची गरज या त्यांनी विचारलेल्या
प्रश्नाचे नेमके उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही.
आणि म्हणूनच ‘समु्द्र’ने समोर आणलेले वादळ
ही खरेच एकूण भारतीय समाज व्यवस्थेसाठी
धोक्यची घंटा आहे. नाही का?

आता सादरीकरणाविषयी 
चिन्मय मांडलेकरांनी कादंबरीचे रुपांतर
नाटकात करताना मोठी जोखीम घेतली आहे.
कारण कादंबरीचा पट विस्तीर्ण असतो. त्यातील
मोजक्याच घटना रंगमंचावर सादर करणे शक्य असते.
आणि ज्या घटनांची नाटककार सादरीकरणासाठी निवड
करत असतो. त्याविषयी मूळ लेखकाने मांडलेला तपशील
रंगमंचीय अवकाशात मांडण्याला मर्यादा पडल्याचे 
प्रेक्षकांना जाणवले तर नाटकाला अपेक्षित खोली
प्राप्त होत नसते. समुद्र मध्ये तर तसे म्हटल्यास
घटनाच नाही. केवळ पती-पत्नींमधील चर्चा,
खटके आणि एकमेकांवर शाब्दीक हल्ले, एवढेच आहे.
त्यामुळे मांडलेकर यांचे विशेष कौतुक करावे लागेल.
त्यांनी दोन अंकात आणि सहा प्रवेशांत कादंबरीतील
अर्क बसवला आहे. तो देखील अतिशय चपखलपणे.
पहिल्या अंकाचा शेवट करताना भास्कर, नंदिनीचा 
बोल्ड सीन अश्लिलतेकडे न झुकता सुन्न
 करून टाकतो. पुढे काय होणार, असे प्रत्येक
क्षणाला वाटत राहते. नाटक पाहिल्यावर समुद्र
कादंबरी खरेदी करून वाचून पहावी, असे प्रेक्षकांना वाटते, 
यावरून त्यांच्या नाट्य रुपांतराची ताकद लक्षात येऊ शकते. 

स्वत:च नाट्य लेखन केले असल्याने त्यांनी
त्यावर दिग्दर्शकीय संस्कारही अत्यंत उच्च
दर्जाचा केला आहे. पडदा उघडल्यापासून ते पडदा
पडेपर्यंतचा शब्द ना शब्द, त्यातील तीव्रता, 
तिखटपणा टप्प्या-टप्प्याने वाढत जाईल, याची
काळजी घेतली आहे. कॉम्पोझिशन्स, संवादातील तणाव,
दोन प्रसंग जोडण्यासाठी कवितांच्या ओळींचा वापर आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे संहितेला दिलेली अचूक 
ट्रीटमेंट त्यांच्यातील टोकदार दिग्दर्शकाची साक्ष देतात.
प्रेक्षकांच्या उजव्या बाजूचा रंगमंच अधिकाधिक 
वापरताना काही काळ त्यांना काही काळ डाव्या
बाजूला घेऊन जाण्यासाठी चिन्मय यांनी भास्कर,
नंदिनीला तिकडेही नेले आहे. त्यामुळे रंगमंचीय
अवकाशात एकाकीपणा जाणवत नाही. अखेरच्या
प्रसंगात डोंगर उभा करण्याची क्लृप्तीही खासच.
त्यामुळे सादरीकरण डोंगराएवढ्या उंचीवर जाऊन पोहोचते.
चिन्मय उंचापुऱ्या व्यक्तिमत्वाचे आणि खणखणीत
आवाजाचे धनी आहेत. तो त्यांनी भास्करची व्यक्तिरेखा
उभी करताना विलक्षण पद्धतीने वापरला आहे. 
प्रचंड कष्ट करून स्वत:चा उद्योग व्यवसाय 
उभा करणारा, पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला 
आणि पत्नीचे तिच्या मित्राशी अनैतिक संबंध 
असल्याचे कळाल्यावर आतून मोडून पडलेला, 
या संबंधांमागे नेमके काय कारण असावे, याचा शोध
काढण्यासाठी धडपडणारा, तिच्यावर आपला उद्रेक
कोसळवणारा आणि अखेरीस कुटुंब जपणे महत्वाचे
असे मानून तिच्या चुका पोटात घालण्यास तयार होणारा
भास्कर असे अनेक कंगोरे त्यांनी लिलया उलगडले. 
रंगमंचावरील सहज वावर आणि मुद्राभिनय सारेच 
अफलातून जमले आहे. स्पृहा जोशी तरुण वर्गात आणि कुटुंबातही प्रचंड लोकप्रिय. 
एक सोज्वळ, कौटुंबिक मुलग, गृहिणी अशी
त्यांची प्रतिमा आहे. ही प्रतिमा मोडण्याचे धाडस
त्यांनी समुद्रमध्ये केले आहे. कामकाजात गुंतल्याने,
पतीला वेळ नसल्याने मानसिकदृष्ट्या भुकेली
नंदिनी, भुकेजलेपणा मिटवण्यासाठी गणेश 
राजोपाध्येच्या मैत्रीत अडकलेली महिला, 
मैत्रीच्या पुढे जाऊन परपुरुषासोबत तीनदा
शय्यासोबत करणारी बाई, ज्याच्यासोबत शारीरिक
संबंध प्रस्थापित केले त्याने नवऱ्याबद्दल खालच्या
पातळीवर जाऊन बोलताच त्याला मुस्काटात
भडकवण्याचे धैर्य दाखवणारी नारी आणि गणेशसोबत
शय्यासोबत करतानाही नवऱ्याचीच आठवण
होत होती असे सांगणारी बायको. भास्करने चुका
पोटात घालून पुन्हा स्वीकारावे अशी आर्त
हाक देणारी कारुणी., मुलावर प्रचंड प्रेम करणारी
आई अशा अनेक अंगांनी वेगाने जाणारी व्यक्तिरेखा
त्यांनी खूपच सहजतेने उभी केली. पहिल्या
प्रवेशाच्या अखेरपासून त्यांनी लावलेला खास रडवेला,
अनुनासिक स्वर त्यांच्यातील व्यक्तिरेखेच्या 
एकरुपतेचे जे दर्शन घडवतो ते चकित करणारेच
आहे. खरेतर लेखकाच्या आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने
नंदिनीची व्यक्तिरेखा म्हणजे कुत्सिततेचा, टीकेचा विषय. 
पण स्पृहा यांनी अभिनय, संवादातील अर्थ प्रवाही
करत नंदिनीने असे का केले. तिचे नेमके काय चुकले
याचाही विचार झाला पाहिजे, असे म्हणण्यापर्यंत
प्रेक्षकांना आणून सोडले आहे. मयुरेश माडगावकरांनी
पार्श्वसंगीतात समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा आणि
त्यासोबत रोरावत येणाऱ्या वाऱ्याचा अचूक वापर
केला आहे. नंदिनी - भास्करमधील तणाव हे संगीत
आणखीनच वाढवत नेते. राजन भिसेंचे नेपथ्य 
आणि जयदीप आपटेंची प्रकाश योजनाही संहितेला
आणखी सखोलता प्राप्त करून देते.
--
हे खटकते, हा प्रश्न पडतो

मला साहित्य, कवितेतील काहीच कळत
नाही. मी तरल मनाचा नाही. मी संवेदनशील नाही.
सौंदर्यशास्त्राविषयी माझा अभ्यास नाही, असे म्हणणारा
भास्कर नाटकात अतिशय साहित्यिक संवाद म्हणतो.
नंदिनीला नाट्यमय रितीने प्रश्न विचारतो, हे किंचित खटकते.
गणेश राजोपाध्ये भास्करबद्दल खालच्या पातळीवर
पोहोचल्यावर नंदिनी त्याला मुस्काटात मारते. 
त्याच्याशी संबंध तोडते. पण गणेश तसा बोलला
नसता तर नंदिनीने त्याला मारले असते का, 
असा सवाल भास्कर तिला विचारतो. तेथून नाटकाला
वेगळे वळण लागते. हे वळण नसतेच तर 
समुद्रचा काय शेवट झाला असता असा प्रश्न पडतो. 


1 comment: