Wednesday 19 April 2017

पाण्यामध्ये, फुटली बिंबे

रस्ते म्हणजे विकास. रस्ते म्हणजे प्रगतीचा मार्ग. रस्ते म्हणजे सुखी जीवनाची हमी, असे सांगितले जाते. दोन आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलेल्या भाषणात एका अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचा हवाला देत असे सांगितले होते की, अमेरिका संपन्न राष्ट्र आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे नव्हे. तर रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका संपन्न राष्ट्र आहे. त्यामुळे त्यांनी नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाला विरोध करू नका, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. दुसरीकडे फडणवीस यांच्याच पक्षाचे महापौर असलेले भगवान घडामोडे औरंगाबादेतील रस्ते दर्जेदार व्हावेत, यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी बीड बायपास या प्रचंड वाहतुकीच्या रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनीही प्रसारमाध्यमांच्या जोरदार पाठपुराव्यानंतर या रस्त्याकडे लक्ष वळवले. त्यानुसार महापालिकेचे एक पथक मार्किंग करण्यासाठी सोमवारी गेले. पूर्वी हा रस्ता १०० फुटांचा होता. तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने २०० फुटांचा होणार आहे. त्यानुसार किती मालमत्ता सर्व्हिस रोडच्या आड येतात, याचा शोध घेऊन खाणाखुणा करण्याचे काम मनपाचे कर्मचारी करत असताना भाजपचेच नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव हिवाळे काही व्यापाऱ्यांना घेऊन तेथे पोहोचले. आधी मोबदला द्या, मगच मार्किंग करा, असा त्यांचा आग्रह होता. मार्किंग केल्याशिवाय मोबदला देणे शक्य होणार नाही, अशी समजूत मनपाच्या अधिकाऱ्यांनी घालण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्याला यश येत नाही, असे लक्षात येताच पथक तेथून माघारी फिरले. म्हणजे भाजपच्या महापौरांनी हाती घेतलेल्या मोहिमेला भाजपच्या मंडळींचाच विरोध असल्याचे समोर आले. मुळात कोणतेही काम खूप बिघडल्यानंतरच हाती घ्यायचे आणि हाती घेतानाही त्याचे नियोजन करायचे नाही, हा औरंगाबाद महापालिकेचा आवडता फंडा आहे. दीड वर्षापूर्वी न्यायालयाच्या आदेशाने जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रस्ता ८० फूट रुंद करण्यासाठी मनपाने पाडापाडी केली. महिनाभरात डांबरीकरण करून रस्ता लोकांच्या वापरासाठी खुला केला जाईल, असे सांगण्यात आले. पण त्यानंतर एका गटाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा रस्ता तसेच बीड बायपास राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करा, अशी मागणी केली. ती त्यांनी तत्काळ मान्य केल्यावर डांबरीकरणाचा मार्ग बंद करून टाकण्यात आला. दीड वर्षापासून तेथील लोकांचे हाल सुरू आहेत. राजाबाजार ते जिन्सी रस्ता रुंदीकरणातही असाच प्रकार झाला. रुंदीकरणात धार्मिक स्थळे येणार. काही लोक मालमत्ता देण्यासाठी एफएसआय, टीडीआरऐवजी रोख रकमेची मागणी करणार, हे मनपाच्या अधिकाऱ्यांना पुरते ठाऊक होते. पण त्याचे नियोजन करण्यापूर्वीच मोहीम हाती घेण्यात आली आणि ती फसली. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीही मोठी मोहीम राबवत काही रस्ते रुंद केले. डांबरीकरणही झाले. पण भापकरांची बदली होताच या रस्त्यांवर दुतर्फा होत असलेले दुचाकी, हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी रस्ते रुंद होऊनही वाहतुकीची कोंडी कायमच आहे. तसाच प्रकार बीड सर्व्हिस रोडबद्दलही दिसून येत आहे. २०० फूट रस्ता रुंद करताना त्यात येणाऱ्या मालमत्तांच्या मोबदल्याचे काय करायचे, याचे उत्तर महापालिकेने शोधले नाही. केवळ बळाच्या जोरावर सुरु झालेली ही मोहीम कितपत यशस्वी होईल, याबद्दल शंकाच आहे. खरे तर जेव्हा सर्व्हिस रोडवर अतिक्रमणे होत होती. तेव्हा मनपाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत होते. वर्षभरापूर्वी गडकरी यांनी बीड बायपास राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्याची घोषणा केली. तेव्हा हा रस्ता अधिक मोठा होणार. पाडापाडी करावी लागणार, याचीही कल्पना मनपा अधिकाऱ्यांना होती. पण त्यांनी त्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही पत्र व्यवहारापलीकडे पाऊल टाकले नाही. म्हणून आता हे रुंदीकरण १०० टक्के साध्य होण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या दोन महिन्यांत सहा दुचाकीस्वारांचे बळी गेल्यानंतर बीड बायपास चर्चेत आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुढाकार घेत आठ दिवसांसाठी सकाळी सात ते रात्री दहापर्यंत जड वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अपघात टळतील. अनेकांचे जीव वाचतील, हे सत्य असले तरी ज्या कारणासाठी बीड बायपास तयार केला. तो मूळ उद्देशच राष्ट्रीय महामार्ग होईपर्यंत मागे पडणार आहे. बीड आणि अहमदनगर, धुळे, जळगावकडून येणाऱ्या जड वाहनांमुळे जालना रोडवर होणारे अपघात टाळण्यासाठी बीड बायपास तयार झाला होता. आणि हेच लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाची आखणी, बांधणी होणे गरजेचे आहे. शहरातून सातारा-देवळाईकडे जाण्याकरिता तीन चार उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग केले. दुभाजकांची मोडतोड रोखण्यासाठी पावले उचलली गेली तरच राष्ट्रीय महामार्ग जनतेसाठी आणि जड वाहतुकीला उपयुक्त ठरणार आहे. त्या दृष्टीने महापौर भगवान घडामोडे यांच्यासह आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह तमाम बड्या अधिकाऱ्यांना विशेष ‘सेवा’ करावी लागणार आहे. अन्यथा कवी ग्रेस यांच्या कवितेत म्हटल्यानुसार 
इथलेच पाणी, इथलाच घडा, 
मातीमध्ये तुटला चुडा... 
इथलीच कमळण, इथलीच टिंबे 
पाण्यामध्ये, फुटली बिंबे 
अशी औरंगाबाद शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बीड बायपासची अवस्था होईल. आणि विकासाचा आणखी एक मार्ग बंद होईल

No comments:

Post a Comment