Wednesday 5 April 2017

डॉ. रखमाबाई : मराठी महिलेच्या लढाऊ बाण्याची प्रभावी कहाणी

एका जुनाट वाड्यासमोर घोडागाडी येऊन थांबते. त्यातून एक तरुण महिला उतरते. वाड्यात शिरते. तिथे एका आरामखुर्चीवर पडलेल्या वृद्धेशी बोलू लागते. आणि त्यांच्या बोलण्यातून उलगडत जातो एका विलक्षण संघर्षाचा प्रवास. त्या वृद्ध महिलेने जिद्दीने स्वतःचे आणि इतरांचेही जग बदलून टाकण्याचा इतिहास समोर येत जातो. आणि आपण त्यात गुंतत जातो. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर सात वर्षांनी म्हणजे १८६४ मध्ये जन्मलेल्या डॉ. रखमाबाई यांनी केवळ डॉक्टर होण्यासाठीच नव्हे तर स्वतंत्र माणूस म्हणून जगण्यासाठी केवढा मोठा लढा त्या काळात दिला. त्याची ही आत्मकथनात्मक कहाणी.
दहा वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांनी कात टाकली. नावीन्याचा ध्यास धरला. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारेंच्या पर्वातून (हे पर्व खूप वाईट होते, असे म्हणता येणार नाही. कारण लोकांना त्याची गरज होती. फक्त त्यात अति उथळपणा आला होता.) मराठी सिनेमा बाहेर पडला आहे. आणि आता तो एका सर्जनशील, संवेदनशील आणि तरीही तांत्रिकदृष्ट्या उच्च दर्जाच्या सादरीकरणाकडे निघाला आहे. एका विशिष्ट उंचीवर जाऊन थांबता त्यापलीकडे जाण्याची आस तरुण लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना लागलेली दिसते. नंदू आचरेकर, अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला डॉ. रखमाबाई हा त्याच सर्जनशील, संवेनदशीलतेचा चित्रपट. तो नाथ सीड‌्स, परिवर्तन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने औरंगाबादकरांना पाहण्यास मिळाला.
स्त्री आणि पुरुषातील नाते. त्यातील गहिरेपण. खाचाखोचा. लैंगिक संबंध आकर्षण हा तर पुरातन आणि कधीच संपणारा विषय आहे. त्यासोबत पुरुषांची मानसिकता. त्यांच्याकडून महिलांना दिली जाणारी खालच्या स्तराची वागणूक. प्रगतीची संधी नाकारणे. प्रतिभावान महिलांची पुरुषांच्या टोळीकडून होणारी कोंडी, असेही अनेक विषय आहेत. महिलांना बरोबरीचा दर्जा देण्याच्या नुसत्या गप्पा होतात. प्रत्यक्षात बहुतांश पुरुष विशिष्ट क्षणाला त्यांच्यातील सगळे मतभेद बाजूला ठेवून महिलेच्या विरोधात एकत्र येत असतात. फक्त त्याचे स्वरूप आणि तीव्रता बदलत असते. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात असे असूनही काही महिला बिकट परिस्थितीवर मात करतातच. पुरुषी मानसिकतेला धूळ चारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात. एवढेच नव्हे तर पुरुषी समाजावर अधिराज्य गाजवतात. त्यातील काही महिला त्यांच्या काळात नावारूपाला येतात. त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा सर्वपरिचित होतो. तर काहीजणी दुर्दैवाने त्यांची जीवन कहाणी सर्वदूरपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरतात. अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी समाजाला कळते. अशा काही महिलांपैकी एक डॉ. रखमाबाई. ब्रिटीश साम्राज्यात रुग्णसेवा करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर. वयाच्या ११ व्या वर्षी नावडत्या व्यक्तीसोबत झालेला विवाह नाकारून परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे धाडस त्यांनी त्या काळात दाखवले. मुंबईत मराठी माणूस साथ देत नाही असे लक्षात आल्यावर गुजरातेत जाऊन त्यांनी काम केले. पण त्यांची दखल पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळी घेतली गेली नाही. मराठी साहित्यात किंवा इतिहासात त्यांचे कुठे अपेक्षेनुसार उल्लेख आढळत नाहीत. अभिजन वर्गाने मृत्यूनंतरही त्यांचे अस्तित्व, कर्तृत्व नाकारले असावे की काय अशी शंका येते. पण म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीची अजोड कामगिरी फार काळ लपवून ठेवता येत नाही. ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने समाजासमोर येतेच. डॉ. रखमाबाईंबद्दलही हेच झाले आहे.
खरे तर कोणत्याही महान व्यक्तीच्या जीवन कार्याविषयी सांगणारे चित्रपट एकसूरी आणि प्रचारकी थाटाचे होण्याचा धोका असतो. तो डॉ. रखमाबाईमध्ये पूर्णपणे टाळण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. विकास रंजन मिश्रा, मोहिनी वर्दे यांनी पटकथा बारकाव्यांनिशी मांडताना त्यातील अधिकाधिक व्यक्तिरेखा गहिऱ्या कशा होतील, याची काळजी घेतली आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा काळ उभा करणे. त्यासाठी लागणारे कपडे, घरगुती वस्तू जमा करणे हे मोठेच आव्हान होते. ते पेलण्यात आल्यानेही डॉ. रखमाबाई यांची जीवन कहाणी उजवी ठरत जाते. तनिष्ठा चटर्जी या गुणी अभिनेत्रीने उभी केलेली रखमाबाई हे या चित्रपटाचे प्रमुख बलस्थान आहे. आयुष्यात काहीतरी चांगले करायचे आणि त्यासाठी निकराचा लढा द्यायचा. हा डॉ. रखमाबाई यांचा स्वभावगुण तिने ज्या ताकदीने दाखवून दिला. त्याला तोडच नाही. मराठी व्यावसायिक चित्रपटात यशस्वी असलेली प्रसाद ओक, संतोष जुवेकर, शरद पोंक्षे, कविता लाड-मेढेकर अशी अनेक मंडळी डॉ. रखमाबाईमध्ये आहेत. प्रसाद ओक यांनी त्यांची प्रतिमा पुसत साकारलेला डॉ. रखमाबाईंचा सावत्र बाप (सखाराम अर्जुन) लाजबाब. जुवेकरांनी अत्यंत कमी संवाद असूनही केवळ चेहऱ्यांवरील रेषा आणि डोळ्यातून रखमाबाईंचा पती (दादाजी भिकाजी) खूपच प्रभावीपणे उभा केला आहे. आभाळाएवढे कर्तृत्व असूनही मराठी माणसाने विस्मरणात, अडगळीत टाकलेल्या लढाऊ बाण्याच्या मराठी महिलेची ही कहाणी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर आणि तेही उच्च दर्जा राखत आणल्याबद्दल निर्माता अनंत महादेवन, दिग्दर्शक नंदू आचरेकर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता शाळा, महाविद्यालयांमध्ये, ग्रामीण भागात हा प्रेरणादायी चित्रपट दाखवला गेला पाहिजे. कारण अजूनही आपल्या समाजाला अशा शेकडो, हजारो रखमाबाईंची गरज आहे. नाही का? 

No comments:

Post a Comment