Saturday 3 February 2018

चकवा चांदण : विचार चक्राचा गुंता

दुसऱ्यांच्या ताटातील, दुसऱ्यांच्या हक्काचे ओरबाडून 
घेणारा पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी म्हणजे 
माणूस. ओरबाडण्याचा हव्यास अब्जावधी वर्षांपासून
सुरूच आहे. त्यातून त्याने निसर्गाला तर सोडले नाहीच.
पण निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींना, 
प्राण्यांनाही सोडलेले नाही. ही वृत्तीच माणसाला
हळूहळू रसातळाला घेऊन जात आहे. असा संदेश 
देणाऱ्या काही कलाकृती संवेदनशील लेखक,
नाटककारांनी अविष्कृत केल्या आहेत. 
मराठवाड्याच्या तरुण पिढीतील प्रतिभावान लेखक,
दिग्दर्शक प्रा. डॉ. कमलेश महाजन यांच्या 
‘चकवा चांदण’ या दीर्घांकातही हाच संदेश आहे.
कथावस्तूचे विस्तारीकरण, अर्थ विषद करणारे 
संवाद, व्यक्तिरेखांचे उलगडत जाणे आणि
प्रसंगांची गुंफण यामुळे हा दीर्घांक विचार चक्रात
खोलवर गुंतवून टाकतो. मराठवाड्यात नाविन्यपूर्ण 
आणि आशयघन, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या
नाट्य प्रयोगांची परंपरा आहे. चकवा चांदणमुळे ही
परंपरा आणखी मजबूत होईल, अशी आशा तापडिया
नाट्य मंदिरात प्रयोगासाठी उपस्थित रसिकांच्या मनात
पल्लवीत झाली असावी. प्रा. महाजन यांच्या कसदार
लेखणीतून उतरलेल्या या दीर्घांकाचे कथानक केवळ
जंगलांवर शहरी माणसाचा हल्ला, आदिवासींचे जगणे
उद्ध्वस्त करणे, श्वापदांची क्रूर कत्तल एवढ्यापुरते मर्यादित
नाही. तर ते माणसातील भ्रष्ट प्रवृत्तीचे आणि त्याच्यातील
किंचित उरलेल्या चांगुलपणाचेही दर्शन घडवते. तमाम माणूस
जात हल्लेखोर नाही. बोटावर मोजण्या इतक्या का होईना
काही माणसांमध्ये माणुसकी शिल्लक आहे, असा आशावाद
दाखवते. हे देखील चकवा चांदणचे एक बलस्थान आहे.
त्याचे कथानक थोडक्यात असे. विकास भामरे (रोहित देशमुख)
सरकारच्या शहर विकास विभागातील प्रामाणिक कारकून. 
भ्रष्टाचार करत नसल्याने त्याला बायकोच्या म्हणजे मिताच्या 
(निकिता मांजरमकर) स्वप्नातील महागडे घर खरेदी
करणे शक्य होत नाही. त्यावरून त्यांच्यात भयंकर वाद होतात.
एके दिवशी माहेरी निघून जाते. त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा
वाढदिवस असतो. मग विलास आणि त्याचा भ्रष्टाचार हाच सुखी
जगण्याचा मंत्र आहे, असे मानणारा मित्र गजानन (प्रेषित रुद्रवार)
पार्टी करतात. मध्यरात्री कधीतरी गजानन बाहेर पडतो. काही 
लाख रुपये घेऊन बिल्डराची फाईल पुढे सरकवायची, असा निश्चय
विकास करतो आणि त्याचवेळेस त्याच्या घरात एक हिंस्त्र 
श्वापद शिरते. मात्र, मद्यधुंद अवस्थेत त्याला ते लक्षात 
येत नाही. काही वेळाने मद्याचा असर काहीसा कमी होतो.
तेव्हा झाल्या नावाचा आदिवासी (अमर सोनवणे) चोरीसाठी
घुसल्याचे त्याला दिसते. विकास त्याला शिताफीने बांधून ठेवतो.
पण या घरात गर्भार असलेली मादी बिबट्या आली असल्याचे
झाल्याला कळते. आणि तेथून पुढे शहरी माणसाचे जंगलांवरील
आक्रमण, डोंगर नष्ट करून त्यावर घरे बांधण्याची वाढत 
चाललेली लालसा असे अनेक मुद्दे समोर येत जातात. 
त्याचा विकासवर काय परिणाम होतो. तो बिल्डराच्या
आमिषाला बळी पडतो का. मादी बिबट्या त्याच्याच घरात 
का शिरते. तिचे पुढे काय होते, या प्रश्नांची उत्तरे चकवा
चांदण पाहताना मिळतात. एका रात्रीत घडणारे हे नाट्य
दीर्घ अंतरानंतर नाट्य चळवळीकडे वळलेल्या प्रा. महाजन
यांनी दिग्दर्शक म्हणून विलक्षण असोशीने बांधले आहे.
प्रत्येक व्यक्तिरेखा फुलवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत
क्षणाक्षणाला जाणवत राहते. कॉम्पोझिशन्स, प्रसंगांचा वेग,
पात्रांच्या हालचाली, शब्दांचे अर्थ उलगडणे हे देखील 
एखाद्या चित्रपटासारखे भासते. अखेरचा भाग काहीसा
संपादित केला तर शेवट अधिक परिणामकारक होऊ शकतो.
अमर सोनवणे यांच्या काही हालचाली किंचित कमी करून,
बिबट्या देखील एक व्यक्तिरेखा आहे, असे जाणवून देण्याकडे
महाजन यांनी लक्ष द्यावे. रोहित देशमुखने प्रामाणिक, बायकोवर
प्रचंड प्रेम करणारा आणि तिच्या सुखासाठी भ्रष्ट मार्गाकडे वळू
पाहणारा विकास प्रचंड ताकदीने उभा केला आहे. त्याचा 
रंगमंचावरील वावर, संवादावरील पकड त्याच्यातील अभिनेत्याची
साक्ष देतात. अमर सोनवणेने आदिवासी झाल्या समर्थपणे 
साकारला आहे. त्याच्या चेहऱ्यावरील रेष न रेष बोलत राहते.
निकिता मांजरमकर यांनी हट्टी, सुखाची लालसा असलेली मिता
बारकाव्यानिशी उभी केली. वाट्याला आलेल्या एकमेव प्रसंगात 
प्रेषित रुद्रवार लक्षात राहतो. प्रख्यात गायक निरज वैद्य यांचे संगीत
आणि एक गाणे दीर्घकाळ स्मरणात राहणारे झाले आहे. 
कौशल महाजन यांचे संगीत नियोजन, निसार शेख, 
लक्ष्मण चौधरी, रमेश लांडगे यांचे नेपथ्य देखणे. त्यांनी
एका निम्न मध्यमवर्गीयाच्या घरातील बारीकसारीक 
तपशील उभे केले होते. शिवा जाधव, मनोज कुलकर्णी
यांची प्रकाश योजना संहितेला आशयघन करणारी होती. 

No comments:

Post a Comment