Thursday 30 August 2018

हितोपदेश

तहानलेल्या औरंगाबादकरांसाठी २००५ मध्ये घोषित झालेली समांतर जलवाहिनी योजना १३ वर्षांत तसूभरही पुढे सरकलेली नाही. योजनेचे वाटोळे शिवसेनेने केले असे सूचक शब्दांत सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदाराला वाढीव २८९ कोटी रुपये शासन देईल. तुम्ही फक्त कोर्टाबाहेर तडजोडीचा प्रस्ताव मंजूर करून घ्या, असे सांगितले. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी मान डोलावली. पण परवाच्या सभेत उलटेच केले. कारण खासदार चंद्रकांत खैरे यांनी मातोश्रीवरून आणलेली किल्ली फिरवून कुलूप लावले, असे म्हटले जाते. दुसरीकडे एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादीने पाइपलाईन टाकण्याचे काम जीवन प्राधिकरणाने करावे, अशी भूमिका घेतली आहे. माजी मनपा आयुक्त कृष्णा भोगे यांचेही तसेच मत आहे. लोकांनी उठाव केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आता या साऱ्या गदारोळात योजना पुन्हा लांबणीवर पडू शकते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, महापौर, मनपाचे इतर कारभारी-अधिकारी आणि लोकांसाठी हितोपदेशाच्या काही गोष्टी.
---00---

१. नाग, ससे आणि बोका

एका बिळात पाच ससे राहत होते. एकदा एक बोका त्यांच्या बिळाजवळ घुटमळताना पाहून ते घाबरले. आता हा बोका आपला चट्टामट्टा करणार अशी भिती त्यांना वाटू लागले. तेवढ्यात त्यांना बिळाबाहेर एक भलामोठा नाग बोक्यावर हल्ला चढवत असलेला दिसला. थोड्यावेळात बोका घाबरून झाडावर जाऊन बसला. मग सशांनी नागाशी संपर्क साधत, ‘तु आमचे रक्षण करशील काॽ’ अशी विचारणा केली. बराच विचार करून नाग म्हणाला, ‘पण मला राहण्यासाठी चांगली जागा नाही.’ सशे म्हणाले, ‘आमचे बिळ आहे ना. निवांत रहा.’ डोळे चमकवत नाग आत शिरला आणि काही दिवसांतच त्याने  चारही सशांचा फडशा पाडला.
तात्पर्य : कोणापासून संरक्षण घेण्यासाठी कोणाला निमंत्रण द्यावे, याचे तारतम्य असलेच पाहिजे.
(आता यात ससा, नाग आणि बोका कोण हे सांगायची गरज पडू नये.)
---00---

२. मेंढपाळ आणि लांडगा

एक मेंढपाळ नेहमी मेंढरांना वनात चरायला नेत असे. तेव्हा एक लांडगा कळपापासून थोड्या अंतरावर शांतपणे बसून असे. मेंढ्याकडे तर तो ढुंकूनही पाहत नसे. काही दिवसानंतर हा लांडगा तर अहिंसक असल्याचे मेंढपाळाला वाटू लागले. म्हणून तो लांडग्याला सोबत मेंढवाड्यात घेऊन आला. लांडगा काहीच करत नसल्याचे पाहून मेंढ्या निर्धास्त झाल्या. एक दिवस मेंढपाळ मेंढराची जबाबदारी लांडग्यावर सोपवून कामानिमित्त बाहेरगावी गेला. आठ दिवसांनी तो परतला. तेव्हा त्याने पाहिले की, दहा-बारा मेंढ्यांचा फन्ना उडवून लांडगा पसार झाला होता.
तात्पर्य : चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवाल तर तुमचे नुकसान ठरलेलेच आहे.
(औरंगाबादकर गेल्या अनेक वर्षांपासून हेच इमाने इतबारे करत आले आहेत.)
---00---

३. लबाड कोल्हा, भोळा हत्ती

एका जंगलात महाकाय पण भोळसर हत्ती राहत होता. त्याला पाहून लबाड कोल्ह्यांच्या मनात विचार आला की, याला मारले तर अनेक दिवसांची ददात मिटेल. पण त्याला एकट्याला गाठून पाणवठ्याजवळ आणायचे कसे, असा प्रश्न होता. मग एक लबाड कोल्हा हत्तीकडे गेला अन्‌ म्हणाला, महाराज पाणवठ्यावर सर्व प्राण्यांची सभा भरली आहे. तुम्हाला जंगलाचा राजा म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे. फक्त तुमची परवानगी हवी आहे. तातडीने तुम्ही एकटे चला बरे. भोळा हत्ती भूलथापांना भुलला. पाणवठ्याजवळ येताच कोल्ह्यांची टोळी त्याच्यावर तुटून पडली.
तात्पर्य : भूलथापा ओळखता आल्या नाही तर तुमचे जगणे संपलेच म्हणून समजा.
(भूलथापा ऐकून पाणवठ्यावर जाणे आणि स्वतःला संपवून घेणे औरंगाबादकरांच्या अंगवळणी पडले आहे.)
---00---

हावरट तरस आणि काकडीचे शेत

एका शेतकऱ्याच्या काकडीच्या शेतात एका हावरट तरसाने खूपच धुमाकूळ घातला होता. शेतकऱ्याने त्याला तरसोबा, तुमच्या पोटात जागा असेल तेवढ्याच काकड्या खा. उगाच नको तेवढे पोटात का भरता, असे म्हणून पाहिले. पण उपयोग झाला नाही. मग शेतकऱ्याच्या बायकोने एक शक्कल लढवली. तिने झाडाचा चीक काढून एक छानसा बाहुला बनवून शेतात ठेवला. रात्री तरसाने बाहुल्याला पाहिले. त्याला वाटले की आपण तो मटकावलाच पाहिजे. म्हणून त्याने त्याला हात लावला तर तो चिटकला. खरं तर त्याला धोका कळायला हवा होता. पण हावरटपणा नडला. त्याने बाहुल्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. तसे चिकाने त्याचे तोंडच चिटकून गेले. त्याला हलताच येईना. ते पाहून शेतकरी आणि त्याची बायको जळकी लाकडे घेऊन आली आणि त्यांनी त्या हावरट तरसाला बेदम झोडपून काढले.
तात्पर्य : खायला मिळते म्हणून खातच सुटले की घात होतो.
(सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी आता अतीच अर्थकारण झाल्याचे म्हटले आहेच. आता हावरटांना मार कधी बसणारॽ)
 ---00---

कावळा, बगळा आणि साधू

एकदा एका कावळ्याला यक्षाने सांगितले की, त्या जंगलातील तलावात सोनेरी मासा आहे. तो खाल्ला की तु कायमचा सुखी होशील. कावळ्याने तलाव शोधून मासा पकडला आणि तो खाण्यासाठी निघणार तोच एक बगळा आला आणि  म्हणाला, हे तळे माझ्या मालकीचे आहे. त्यातल्या माशावर तुझा अधिकारच नाही. दोघांमध्ये वाद वाढला. तेव्हा ते तळ्याजवळच बसलेल्या साधूकडे गेले. साधू म्हणाला, हा मासा खाण्याची तुम्हा दोघांचीही योग्यता नाही. ती मिळवण्यासाठी कावळ्याला आधी अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ व्हावे लागेल. आणि बगळ्याला दोन्ही पायांवर उभे राहून, डोळे उघडून गोड आवाजात भजने म्हणावी लागतील. कित्येक वर्षे उलटून गेली कावळ्याला अंतर्मनापासून पांढरे स्वच्छ होता आले नाही. बगळ्याला गोड आवाजात भजन म्हणता आलेले नाही.
तात्पर्य : काही चांगले पदरात पाडण्यासाठी मनापासून कष्ट करावे लागतात. स्वतःत बदल करावा लागतो.
(फक्त जाती-धर्माच्या नावावर कारभारी निवडणाऱ्या औरंगाबादकरांना याबद्दल काय उलगडून सांगावे.)

1 comment: