Thursday 31 January 2019

तिबेटी निर्वासितांची कहाणी

अबे, तो पहा नप्पा चाललाय. चिनी आहे तो. डोळे तर गायबचंयत त्याचे. नाही रे जपानी दिसतोय. ए जपानी...एखादा अपऱ्या नाकाचा, लुकलुक्या डोळ्यांचा तरुण पाहिला की आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा संवाद असतो. दुसऱ्याला हीन लेखणे हे तर त्यात असतेच. शिवाय तो भारतीय नाही, हे पण सांगायचे असते. मग तो तरुण असामी, सिक्कीम किंवा मिझोराम, अरुणाचल प्रदेशाचा असला तरी त्याला चिनी, जपानी ठरवले जाते. म्हणजे दुसऱ्या जात, धर्म, पंथांविषयी द्वेष बाळगणे. त्याची हेटाळणी करणे, टिंगल उडवणे यापलिकडे अनेकजण जात आहेत. आणि मग हा तरुण तिबेटी आहे, असे लक्षात आल्यावर तर तुच्छतेचीही भावना व्यक्त होते. कारण तिबेटी निर्वासित आहेत. आपल्या देशात अनेक वर्षांपासून आश्रयाला आले आहेत. त्यांच्याशी आपण कसेही वागलो, त्यांच्याविषयी काहीही विचार केला तरी काय फरक पडणार, असा पवित्रा असतो. त्यांना चक्क नेपाळी म्हटले जाते. माणूस म्हणून त्यांच्या काय वेदना आहेत. आपले हक्काच्या घरातून कोणीतरी हाकलून दिले. म्हणून शेजाऱ्यांकडे आसऱ्याला राहणारी ही तिबेटी मंडळी मनावर मणामणाचे ओझे ठेवून कसे राहत असतील, याचा विचार बोटावर मोजण्याइतके राजकारणी करत असतील. संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या कलावंत, लेखक, दिग्दर्शकांनीही तिबेटींकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. तिबेटी लोक कष्टाळू, भारतीयांना आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेत असल्याचा हा परिणाम असावा. पण या निर्वासितांचे दुःख, वेदना, त्यांच्यावर असलेला चीनचा दबाव कोणाला तरी मांडणे आवश्यक वाटले. औरंगाबादेत नुकत्याच झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या ‘क्योयोंग नगारमों – द स्वीट रिक्विअम’मध्ये अतिशय साध्या कथानकात हे सारे खूपच तीव्रतेने आले आहे. दिग्दर्शक रितू सरीन आणि त्यांचे पती तेनझिंग सोनम यांनी सहजतेने चित्रपटाची मांडणी करताना त्यातील प्रसंग, संवाद, नाट्यमयता, संघर्ष, रहस्य अशी अनेकविध बांधणी हृदयापासून केली आहे. ती पाहताना आपणही तिबेटी होऊन जातो. त्यांच्यावरील अन्यायाने किती परिसीमा गाठली आहे. त्यांच्याकडे निर्वासितापेक्षा माणूस म्हणून पाहणे किती गरजेचे आहे, हे कळते. चीनचा भारतात असाही हस्तक्षेप आहे, असा प्रश्न उपस्थित होते. दुसरीकडे खरेच आपण आपल्या देशात राहतो. आपण स्वतंत्र आहोत, ही किती भाग्याची गोष्ट आहे, अशीही भावना उचंबळून येते. याचे सारे श्रेय अर्थातच सरीन-सोनम या दांपत्याला आहे. शिवाय तेनझिंग डोलकर, जंपा कलसंग, शावो दोरजी आणि भूमिका जगणाऱ्या कलावंतांना द्यावे लागेल.
‘क्योयोंग’ची कहाणी थोडक्यात अशी. २६ वर्षांची तेनझिंग डोलकर दीड तपापूर्वी निर्वासत म्हणून भारतात येते. दिल्लीतील तिबेटी नागरिकांच्या वसाहतीत ती लहानाची मोठी होते. ब्यूटी पार्लरमध्ये काम करू लागते. तिचा नुकताच एक ब्रेकअपही झालाय. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे तिबेटमधून भारतात येण्याचा तिचा प्रवास खूपच भयंकर झालाय. चिनी लष्कराच्या गोळ्या चुकवत वडिल आणि इतर काहीजणांसोबत भारताची वाट शोधत असताना त्यांची भेट गोंपो नावाच्या एका वाटाड्याशी होते. तो त्यांना दोन दिवस साथ देतो. पण तिसऱ्या दिवशी घरी मुलगी आजारी असल्याने तो त्यांना अर्धवट रस्त्यात सोडून देतो. गाढ झोपेत असलेल्यांना तसेच सोडून एक प्रकारे पळच काढतो. दिलेला शब्द पाळत नाही. जाताना तो त्याच्याकडील एक ताईत डोलकरला देऊन जातो. त्याला जात असताना फक्त डोलकरने पाहिलेले असते. नेमका मार्ग माहिती नसलेले हे सारेजण मग चिनी लष्कराच्या गोळीबारात सापडतात. डोलकर नशिबाने वाचते. इतकी वर्ष होऊन गेली तरी तिला गोंपोचा चेहरा लख्ख दिसत असतो. आणि एक दिवस गोंपो डोलकरच्या आयुष्यात येतो. ती त्याला ओळखते. तुम्ही आम्हाला त्या दिवशी वाऱ्यावर का सोडून गेलातॽ असा विश्वासघात का केलाॽ आमच्यासोबतचे जे लोक चिनी लष्कराच्या गोळीबाराला बळी पडले. त्याला तुम्ही जबाबदार नाहीत काॽ तुम्ही खरंच वाटाडे आहात काॽ असे प्रश्न तिला गोंपोला विचारायचे आहेत. पण तिचा मित्र तर गोंपो म्हणजे तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढणारा नेता आहे, असे सांगतो. मात्र, डोलकर स्मरणशक्तीवर ठाम आहे. ती गोंपोचा पाठलाग सुरू करते. आणि अचानक दोन चिनी गुप्तहेरही गोंपोच्या मागावर आहेत. ते त्याला धमकावत असल्याचे तिच्या लक्षात येते. पुढे काय होते, याचा उलगडा चित्रपट पाहूनच करून घ्यावा, असा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातील मानवी जीवनात जे काही सुरू आहे, त्याची मांडणी करणाऱ्या दर्जेदार कलाकृती, अशी अपेक्षा असते. ‘क्योयोंग‘ने ती पूर्ण केली आणि संवेदनशील भारतीयांना अंतर्मुख केले एवढे नक्की. 

No comments:

Post a Comment