Friday 27 August 2021

सुवर्ण स्वप्नांचा साधक

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मोठे यश मिळवले. या यशाचा पाया चार दशकांपूर्वी रचणारे ओ. एम. नांबियार यांचे नुकतेच निधन झाले. भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा यांचे ते गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उषा यांची कारकीर्द बहरली. १९८२च्या एशियाडमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. अशा या दिग्गज नांबियार यांच्या जाण्याने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त होणे साहजिक आहेच. पण नांबियार यांनी केवळ पी. टी. उषा यांचे जीवन घडवले नाही. तर भारतीय खेळ जगात एक खळखळता प्रवाह निर्माण केला. देशातील तरुणाईला एक नवी दिशा दिली. भारत म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे भारत असे समीकरण असले तरी इतर खेळांकडेही मुलांनी वळले पाहिजे. विशेषत: वेगात, विशिष्ट दिशा पकडून धावणे हे देखील एक क्रीडा कौशल्य आहे, असे नांबियार मानत. त्याचा हिरीरीने प्रचार करत. टोकियोतील सुवर्णयशाचा पाया त्यांनीच रचला. महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम धावपटू होते. हवाईदलात पंधरा वर्षे नोकरी करताना अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवली. जगातील उत्तम वेगवान धावपटू होण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, प्रशिक्षक झाल्यावर उषा यांच्या रुपात त्यांनी साकार करून घेतले. त्यावेळी त्यांनी स्वत: तिरुवअनंतपुरम येथील एका शिबिरात उषा यांची भारतीय संघात निवड केली. चार वर्षे कठोर परिश्रम घेतले. शिष्यातील अंगभूत कौशल्याला पैलू पाडणे. त्याला अचूक दिशा देणे हीच गुरुची शक्ती असते. नांबियार अशा शक्तीशाली गुरुंपैकी एक होते. यापुढे देशातील प्रत्येक गावात जागतिक दर्जाचे धावपटू तयार होणे. त्यासाठी सरकारी पातळीवर अनेक दिशांनी प्रयत्न करणे, हा नांबियारांची शक्ती, स्मृती जागृत ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.

No comments:

Post a Comment