Thursday 1 October 2015

एमआयएमचा सेना-भाजपला नवा ‘इशारा’



--
काँग्रेस-राष्ट्रवादीची कथित धर्मनिरपेक्षता आणि शिवसेना-भाजपचे फक्त हिंदुभोवती केंद्रीत झालेले राजकारण. यामुळे अशिक्षित, गरीब मुस्लिमांची कोंडी होत असल्याचा दावा करत एमआयएम म्हणजे मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाने २०१४ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत विधीमंडळात चंचुप्रवेश केला. मात्र, हा केवळ चमत्कार होता. एमआयएमचा प्रभाव कमी होणारच, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु, एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएमचा असा सामना झाला. मुस्लिम मते खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात फौज कामाला लागली. पैशाचा धूर निघाला. तिकीट वाटपावरून नाराजांना चिथावण्याचा प्रयत्न झाला. तरीही आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमने तब्बल २५ जागांवर एकहाती विजय पटकावला. राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. काँग्रेसची धूळधाण होता होता राहिली. दुसरीकडे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने धर्माच्या नावावर मते खिशात टाकण्याचा युतीचा विशेषत: शिवसेनेचा प्रयोग यशस्वी झाला. आता महापालिकेत प्रत्येक मुद्यावर रणकंदन होणार. प्रत्येक ठरावाला एमआयएमकडून धार्मिक रंग दिला जाणार, अशी भाकिते वर्तवण्यात आली होती. ती गेल्या पाच महिन्यात तरी खरी ठरलेली नाहीत. उलट जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा एमआयएमचा प्रयत्न सुरू आहे. आता तर त्यांनी त्या पलिकडे जाण्यासाठी पावले उचलली आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात झालेल्या सभांमध्ये मुस्लिमांच्या वसाहतीतील नागरी समस्या हाच मुद्दा एमआयएमने केंद्रस्थानी ठेवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला, युतीवर टीकास्त्र अशी मुस्लिम मतदारांना अपेक्षित असलेली मांडणी झाल्यावर आपल्या भागात दर्जेदार रस्ते, चांगली सफाई, अद्ययावत रुग्णालये का नाहीत, असा सवाल एमआयएमची नेतेमंडळी उपस्थित करत होती. धर्माच्या नावावर मते मागत असलो तरी निवडून येताच विकास कामे एवढाच अजेंडा असल्याचे ठासून सांगितले जात होते. सहसा प्रत्येक राजकीय पक्ष असे सवाल विचारून मते मिळवतो आणि निवडून आल्यावर विसरून जातो, असा अनुभव आहे. एमआयएमला तसा विसर पडला नाहीच. शिवाय त्यांनी अतिशय गतीने विधायक कामांकडे वाटचाल सुरू केली आहे. धर्माच्या नावावर लोक एकदा मते देतील. परंतु, शेवटी त्यांना काही चांगली कामे हवी असतात. रोज ज्या समस्यांशी लोकांना लढावे लागते. त्या दूर करणारा पक्षच त्यांना येणाऱ्या काळात कायमस्वरूपी बांधून ठेवू शकतो. विशेषत: मुस्लिमांची मानसिकता कोणत्याही क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वळण्याची असल्याने विकासाची कामे हाच पायाभरणीचा मंत्र अाहे, याची जाणिव एमआयएमला झाली असे दिसते. महापालिकेत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असली तरी सत्ताधाऱ्यांकडून मुस्लिमबहुल वॉर्डात फारशी कामे होण्याची शक्यता नाही. शिवाय मनपाच्या तिजोरीतही खडखडाट आहे. राज्य आणि केंद्राकडे मदत मागण्याचा तर प्रश्नच उद््भवत नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पातळीवरच विकासाचा रथ हाकण्याची जबाबदारी आमदार इम्तियाज आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी यांनी ओळखली. म्हणूनच त्यांनी आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत जीवन जगणाऱ्या दाट मुस्लिम वसाहतीत रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद येथे एमआयएमकडून रुग्णसेवा केली जाते. त्याच धर्तीवर अत्यल्प दरात उपचार करून देणारी ही रुग्णालये राहणार आहेत. केवळ दहा रुपयांत काही औषधी व डॉक्टरांचा सल्ला मिळवून देणारी यंत्रणा उभी केली जाणार आहे. शिक्षण हा मुस्लिम समाजातील सर्वात मोठा प्रश्न आहे. शिक्षणच नसल्याने हजारो तरुणांना मेकॅनिक, वेटरची कामे करावी लागतात. थोडा शिक्षित तरुण फार झाले तर मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्यामुळे आर्थिक प्रगती होत नाही. शिवाय इतर समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. वैचारिक जडणघडणही होत नाही. ज्या पालकांना आपली मुले चांगल्या शाळेत शिकावी, असे वाटते. त्यांच्याकडे शाळेचे भलेमोठे शुल्क भरण्यासाठी पैसाच नाही. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांतून प्रगती होण्याची शक्यता दुर्मिळच आहे. या साऱ्याचा अभ्यास करून एमआयएमने  गरीब मुलांसाठी अत्यल्प फी आकारून शाळा सुरू करण्याचेही ठरवले आहे. त्यासाठी ओवेसी कुटुंबातील सदस्य कुतुब, वास्तुविशारद संतोषकुमार यांनी जागेची पाहणीही केली. येत्या सहा महिने, वर्षभरात रुग्णालय आणि शाळेचा प्रकल्प कार्यान्वित व्हावा, अशी मोर्चेबांधणी होत आहे. शिवाय कटकटगेट येथे मनपाचे रुग्णालय चालवण्यासाठी द्या, असा प्रस्तावही दिला. पालकमंत्री रामदास कदम यांना या प्रस्तावाचे महत्व कळाले. त्यांनी तत्काळ या रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी दोन कोटींचा निधी जाहीर केला. याचा धसका शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी घेतला. एमआयएमची अशा पद्धतीने पाय रोवणी म्हणजे आश्चर्यच असल्याचा सूरही त्यांनी लावला आहे. तो अत्यंत खरा आहे. कारण गेल्या २५ वर्षापासून शिवसेना-भाजप धर्माच्या आधारावर हिंदूंची एकगठ्ठा मिळवत आहे. गुंठेवारीची वसाहत असो की रस्त्यांची दुरवस्था, अल्पसा पाणीपुरवठा. प्रत्येक समस्येवर मुस्लिमांकडे बोट दाखवून सुटका करून घेण्याचे तंत्र युतीच्या पदाधिकाऱ्यांनी घोटवले आहे. विधायक कामांची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात सुमार दर्जाचे काम करून त्यातील मलिदा खायचा, असा प्रकार हिंदूबहुल वसाहतींमध्ये सर्रास होताना दिसतो. ज्या मतदारांशी बांधिलकी असल्याचा गवगवा सेना-भाजपकडून होतो. त्या मतदारांची आठवण पाच वर्षानंतरच केली जाते. त्यांना एमआयएमची विधायक कामांकडे वळणारी वेगवान पावले म्हणजे खरा इशाराच आहे. २५ वर्षे सत्तेत असूनही एकाही मनपा रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यात युतीला यश आलेले नाही. महापालिकेच्या शाळा म्हणजे गरीबांच्या मुलांना तासभर बसण्याची जागा, असे चित्र युतीने निर्माण केले. ते बदलून मतदारांच्या मनात विधायक कामांच्या बळावर आपले स्थान बळकट करण्याची संधीही एमआयएमने प्राप्त करून दिली आहे. याची जाणिव केवळ औरंगाबादच नव्हे तर राज्यभरातील युतीच्या नेत्यांना करून दिली आहे. यातून त्यांनी धडा घेतला तर त्यातून त्यांचे आणि जनतेचेच भले होणार आहे, याविषयी कुणाच्या मनात काही शंका आहे का?





No comments:

Post a Comment