Wednesday 7 October 2015

आरोग्यम् अधनसंपदा



महापालिकेत नेहमीच नाट्यमय घटना असतात. पण त्या मुख्यत: राजकीय मंडळींच्या एकमेकांविरुद्ध हल्ल्याच्या असतात. किंवा राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते विरुद्ध अधिकारी अशा असतात. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक िकंवा महापौरांचे दालन अशी या नाट्याची केंद्रे असतात. सोमवारी आरोग्य अधिकाऱ्याच्या दालनात हा केंद्रबिंदू सरकला होता. शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले आरोग्य अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी कार्यभार स्वीकारताच प्रशासनातर्फे सक्तीच्या रजेवर (?) पाठवण्यात आलेल्या डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी त्यांच्या नियुक्तीला सर्वांसमोर आव्हान दिले. मला कोणीही सक्तीच्या रजेवर पाठवलेले नाही. मीच रजा टाकून गेले होते. आता मी माझी रजा  रद्द करून कार्यालयात दाखल झाले आहे. त्यामुळे माझी खुर्ची मला द्या, असे डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे होते. त्यावर जगताप यांनी मला शासनाकडून महापालिकेच्या सेवेत पाठवण्यात आले आहे. म्हणून या खुर्चीवर माझाच अधिकार असल्याचे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता न्यायालयातच भेट होईल, असे म्हणत डॉ. कुलकर्णी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे दालन सोडले. दहाच मिनिटे चाललेल्या या नाट्याने  अधिकाऱ्यांमधील वादाचे नवे रुप पाहण्यास मिळाले असले तरी त्यातून मनपाचा प्रशासकीय कारभार कुठल्या स्तरावर चालतो. सत्तेचे पद मिळवण्यासाठी अधिकारी काय काय करतात, याचे दर्शन घडले. आता महापौर त्र्यंबक तुपे आणि आयुक्त प्रकाश महाजन यांनी तातडीने उपाययोजना केली नाही तर डॉ. कुलकर्णी आणि डॉ. जगताप यांच्यातील वाद भडकण्याची चिन्हे आहेत. त्यात आधीच अस्ताव्यस्त असलेल्या आरोग्य विभागाचा कारभार आणखी मोडकळीस येईल. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. दिवाबत्ती, रस्ते आणि सफाई व जनतेचे आरोग्य हीच महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. दिवाबत्ती,  रस्ते, सफाई बऱ्यापैकी असली तरी जनता ते सहन करते. पण आरोग्य म्हणजे जिवाचाच खेळ असतो. तो डॉक्टरांनीच खेळला तर अनेकांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे आरोग्य विभागाला सर्वाधिक महत्व आहे. मनपाच्या दवाखान्यात येणाऱ्यांमध्ये गोरगरिबांचे प्रमाण ९९ टक्के आहे. म्हणूनच या विभागासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून िदला जातो. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या डॉक्टरांना मुबलक वेतनही दिले जाते. औषधींचा साठाही वेळावेळी मिळतोच. तरीही औरंगाबादेतील आरोग्य विभागाचे आरोग्य कायम बिघडलेले असते. गरीबांच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी स्वत:ची प्रकृती धडधाकट राहावी, यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिक धडपड करत असल्याचे गेल्या दहा-बारा वर्षातील चित्र आहे. त्यामागे महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक मंडळींची अनास्था आहे.  कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ते पूर्णपणे विसरल्याचे िंकंवा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. म्हणूनच आरोग्यम् धनसंपदाऐवजी आरोग्य अधनसंपदा झाले आहे. त्याचे एक कारण आरोग्य अधिकाऱ्याचे पद राखण्यासाठी डॉ. कुलकर्णी सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्याला त्यांच्या सहकारी डॉक्टरांकडून प्रचंड विरोध हा देखील आहे. डॉ. दिनकर देशपांडे, डॉ. पी. आर. कुलकर्णी, डॉ. श्रीकृष्ण देगावकर आरोग्य विभाग सांभाळत असताना एकहकुमी कारभार होता. ते स्वत: निष्णात वैद्यक तर होतेच शिवाय महापालिकेच्या कारभाराची नाडी परीक्षाही होती. आपले नेतृत्व सिद्ध करायचे असेल तर सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी काय करावे, याचा अनुभव त्यांना होता. मात्र, ते मनपातून बाहेर पडताच पदाचा झगडा सुरू झाला. सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. कुलकर्णी यांच्याकडे कार्यभार आला. कायद्यावर बोट ठेवून त्यांनी सूत्रे स्वीकारली. मनपाच्या इतर अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे कधी भ्रष्टाचाराच्या संशयाची सुई सरकली नाही. मात्र, सर्वसमावेशक नेतृत्वाचा गुण त्यांना विकसित करता आला नाही. त्यामुळे प्रचंड काम करण्याची क्षमता असूनही त्याचा उपयोग त्या करू शकल्या नाही. आपल्याइतकेच आणि आपल्यासारखेच काम आपले सर्व सहकारी करू शकत नाही, हे त्यांना मान्यच नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायम असंतोषाचे वारे वाहत गेले. बऱ्याच वेळा त्यांचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशीही खटके उडाले. तेव्हा राजकीय मार्गाने त्यांनी राजकीय मातब्बरांना  नमते घेण्यास भाग पाडले होते. मात्र, गेल्या महिन्यात  डॉ. संगिता देशपांडे, डॉ. संध्या जेवळीकर, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मनिषा भोंडवे आदी वरिष्ठ महिला डॉक्टरांनीच आघाडी उघडली. अनेक वर्षे महापालिकेत नोकरी केली. पण आरोग्य अधिकाऱ्याचा असा जाच  कधी पाहिलाच नाही, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे कुलकर्णींवर कारवाई अटळ झाली. आता कोर्टात काय होईल ते होईल पण आरोग्य विभागाचा कोसळता डोलारा सावरून किमान गोरगरिबांचे आरोग्य राखण्याची कामगिरी मनपाच्या कारभाऱ्यांसह डॉ. जगताप यांनाही समर्थपणे सांभाळावी लागणार आहे.



No comments:

Post a Comment