Tuesday 9 February 2016

पुस्तकप्रेमींचा आनंदोत्सव



 एकीकडे लोक फेसबुक, व्हॉटस्अप आणि टीव्हीच्या चक्रव्यूहात अडकल्याने  त्यांची पुस्तक वाचनाची आवड कमी होत असल्याची तक्रार होत असताना दुसरीकडे पुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बऱ्याच वेळा औरंगाबादसारख्या शहरात काही पुस्तके मिळत नाहीत. पुण्यातून मागवावी लागतात, अशी स्थिती आहे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल पुस्तक प्रेमींचे कौतुक करताना पुस्तकांचे जग सर्वांसाठी खुल्या करून देणाऱ्या प्रकाशक आणि विक्रेत्यांनाही सलाम करावा लागेल. संगणकावर कितीही वेगात पुस्तक उघडले गेले. त्यातील प्रत्येक पानावर कितीही वेगात नजर मारता  येत असली आणि संगणकातील प्रकाश योजनेमुळे वाचनीयता वाढत असली तरी शेवटी पुस्तक हातात घेऊन त्यातील पानांना स्पर्श करण्यामुळे जी आपलेपणाचे भावना निर्माण होते. त्याची तुलना संगणकावरील वाचनात होतच नाही. हे देखील पुस्तक खरेदी वाढण्यामागचे एक कारण असावे. पण त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकेकाळी पुस्तक खरेदी आणि वाचन म्हणजे काही लोकांचेच विश्व होते. त्यात ठराविक मंडळी लिहित, बोलत अन् चर्चा करत. उर्वरित लोक फक्त ऐकण्याचे काम  करत होते. तो काळ झपाट्याने मागे पडला. सरकारी धोरण म्हणा किंवा काळाची गरज समजा. शिक्षणाचे वारे झपाट्याने वाहू लागले. हजारो वर्षांपासून शब्द, अक्षरांपासून दूर असलेला वर्ग अक्षर-शब्दांना जोडला गेला. महापुरुषांनी दिलेला वाचनाचा संदेश घेऊन पावले टाकू लागला. त्यातील काहीजण मनातील भावना अविष्कृत करत पुस्तक लेखनाची लेणी कोरू लागले. आणि त्यापेक्षाही अनेक लोक या लेण्यांचा आनंद घेऊ लागले. त्यातील चांगल्या-वाईट मुद्यांवर चर्चा करू लागला. त्याचा परिणाम पुस्तक विक्रीवर होऊ लागला नसता तर नवलच होते. या साऱ्या वाचकांची भूक भागवण्याची जबाबदारी प्रकाशक आणि विक्रेत्यांनीही स्वीकारल्याचे दिसून येते. कोणत्याही पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची,  खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. साहित्य संमेलन म्हणजे अशा वाचक आणि लेखकांसाठी एक पर्वणीच असते. त्यातील ग्रंथ प्रदर्शनातून साहित्य खरेदीचा आनंद काही औरच असतो. मात्र, बऱ्याच वेळा साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शने अलोट गर्दीची असतात. त्यात वाचकांना हवा असलेला निवांतपणा नसतो. शिवाय इतर कार्यक्रमांचीही रेलचेल असल्याने पुस्तक प्रेमी विभागले जातात. ही बाब लक्षात घेऊन प्रकाशक परिषदेने औरंगाबादेत जानेवारीच्या अखेरीस म्हणजे २८ ते ३१  जानेवारी कालावधीत चार दिवस पुस्तकांचे या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले  होते. सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर हा महोत्सव होता. प्रत्येक दालनातील पुस्तके मनसोक्तपणे चाळता येतील. याची व्यवस्था महोत्सवाची कल्पना साकारणारे श्रीकांत उमरीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. राजहंस प्रकाशनाचे शाम देशपांडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे कैलास अतकरे आदी अनेक अनुभवी मंडळींची त्यांना चांगली साथ मिळाली. पुण्या-मुंबईचे प्रकाशकही हजारो पुस्तकांचा खजिना घेऊन सभुच्या प्रांगणावर दाखल झाले होते. त्यात अनेक लोकप्रिय पुस्तके तर शिवाय दुर्मिळ पुस्तकांचाही खजिना होता. ऐतिहासिक पुस्तके तर सर्वच प्रदर्शनात पाहण्यास मिळतात. पण या महोत्सवात एेतिहासिक नोंदी असलेली, युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी  अत्यावश्यक असणारी तसेच इतिहासात शास्त्रीयदृष्ट्या डोकावू पाहणाऱ्यांना हवी असलेली अनेक पुस्तके होती. उमरीकर सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते. दोन वर्षापूर्वी त्यांनी औरंगाबादेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविषयी एक अनोखे आंदोलन करून तुरुंगवासही भोगला. त्यानंतर ते त्यांच्या मूळ उद्दिष्टापासून  म्हणजे वाचक चळवळीपासून दूर जातात की काय, अशी भिती वाटत होती. मात्र, शहरातील रस्त्यांच्या सुधारणेसोबत भारतीय, मराठी माणसाचे मन पुस्तकांच्या माध्यमातून घडविण्याचे काम अधिक महत्वाचे असल्याचे त्यांच्या  लक्षात आले. शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्यासाठी स्थापन केलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने केलेल्या  सहकार्यामुळेच हा महोत्सव कमालीचा यशस्वी होऊ शकला. अर्थात केवळ प्रदर्शन भरवून हेतू संपूर्णत: साध्य होणार नाही, हे उमरीकर यांच्या अनुभवी प्रकाशकाने आधीच हेरले होते. त्यामुळे त्यांनी प्रदर्शनासोबत लहान मुलांसाठी  विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन केले. हेरंब कुलकर्णी यांच्या बखर शिक्षणाची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही त्यात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण लेखन साहित्य, नांदेड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यांचे गॅझिटियर (औरंगाबाद जिल्ह्याचे मिळू शकले नाही.) महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आले. प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या भक्ती आणि धम्म पुस्तकावरील चर्चा म्हणजे बौद्धीकांसाठी मेजवानी होती. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या मंगेश पाडगावकरांच्या अवीट गीत, कवितांवर आधारित आनंदयात्री हा कार्यक्रम म्हणजे महोत्सवाच्या मुकुटातील मानाचा तुरा मानावा लागेल.  स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित असलेला शूरा मी वंदिले हा गीत सोहळाही लक्षवेधी ठरला. सहसा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व गोष्टी साध्य होणे कठीणच असते. आयोजन, नियोजनात त्रुटी राहतात. एखादा वाद विनाकारण उभा राहतो. मात्र, चार दिवस पुस्तकांचे महोत्सवात तसे काहीही झाले नाही. उलट दिवसेंदिवस त्यातील रंगत वाढत गेली.  चार दिवस  पुस्तकांचे महोत्सवाने पुस्तकप्रेमींच्या आनंदोत्सवाचे लक्ष्य सहज साध्य केले. यावर्षी जे प्रकाशक या महोत्सवात सहभागी झाले नाहीत. त्यांच्यात पुढील वर्षी येण्याची स्पर्धा लागावी आणि ज्या वाचक, पुस्तकप्रेमींना यंदा काही कारणांमुळे महोत्सवाला जाता आले नाही. त्यांना आतापासून २०१७ चा महोत्सव केव्हा आहे, असा वाटू लागावे इतपत यश पहिल्यावर्षी मिळाले आहे. ते अखंडित राहावे. हीच रास्त अपेक्षा.

 



1 comment: