Wednesday 13 April 2016

साकेत बुकवर्ल्ड अन् नेमाडेंच्या आठवणी

--
‘पूर्वी मी औरंगाबादेत असताना पुस्तकांची फारशी दुकानं नव्हती. बोर्डे नावाचे एक चांगले विक्रेते होते. त्यांच्याकडे उत्तमोत्तम पुस्तके मिळत. पण त्यांच्या दुकानात ते उभे राहू शकतील, एवढीच जागा होती. दुसरे एक साहित्य सहकार नावाचे दुकान होते पोलिस चौकीज‌वळ. त्यांच्याकडे काही पुस्तके मिळत. पण ते नेमके काय करत ते मला काही कळाले नाही. जोशींच्या पुस्तक दुकानात दुकानाच्या आकाराच्या तुलनेत फारशी पुस्तके नसायची.’ असे प्रख्यात साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. साकेत बुकवर्ल्ड या आधुनिक स्वरूपातील रचना असलेल्या पुस्तक दालनाचे उद्घाटन आठ एप्रिलला नेमाडेंच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी वाचक, रसिकांशी संवाद साधताना त्यांच्या औरंगाबादेतील पुस्तक दालनाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्या खास शैलीत नेमाडेंनी त्या काळच्या पुस्तक विक्री व्यवहाराची आठवण करून दिली ती हशा उडवून गेली. पण खरेतर नेमाडेंनी औरंगाबादकरांच्या सांस्कृतिक, साहित्यिक मागासलेपणावर केवळ अचूक बोटच ठेवले नाही तर हे मागासलेपण नेमके कशातून आले आहे, हेही दाखवून दिले. तिरकस बोलण्यासाठीच प्रख्यात असलेल्या नेमाडे यांचे ६०-७०च्या दशकात औरंगाबादमध्येच वास्तव्य होते. त्या काळात औरंगाबाद जडणघडणीच्या दिशेने निघाले असे सर्वांना वाटत होते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरात ऐतिहासिक वास्तूंची कमतरता नव्हती. देश-विदेशातील पर्यटक सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून येथे येत होते. भौतिक सुविधा नसल्यातरी शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीची लक्षणे दिसू लागली होती. उच्च आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था उभ्या राहतील. त्यात शिक्षण घेणाऱ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारे, त्यांना प्रगल्भ बनवाणारे सांस्कृतिक सोहळे जागोजागी होऊ लागतील, असे चित्र होते. सर्वात महत्वाचे म्हणजे विचारपूर्वक जीवनाची घडी बसवण्यासाठी मदत करणारी किंबहुना त्यात सिंहाचा वाटा असणारी ग्रंथ दालने निर्माण होतील. प्रत्येक महत्वाच्या वसाहतीत ग्रंथालये, पुस्तक विक्रीची दुकाने सुरू होतील, अशी अपेक्षा होती. ते सारेच फोल ठरल्याचे वळून पाहिल्यावर लक्षात येते. म्हणजे उच्च व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. पण त्यात मुलांना घडवण्याचे काम फार थोडे झाले. संवेदनशील, समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी शक्ती देण्याऐवजी मुलांना राजकीय वळणावर नेऊन उभे करण्यात आले. सांस्कृतिक चळवळ मुंबई, पुण्यावरच अवलंबून राहिली. तेथून आले तेच चांगले. आपले एखादे नाटक खूपच चांगले असले तर त्यावर आधी मुंबईतून शिक्का  मारून आणायचा. लेखकाच्या प्रतिभासंपन्नतेवर पुण्याची मोहर लावून आणायची, असा प्रकार सुरू झाला. ग्रंथालयांतील पुस्तके नेली तर ती परत करायची नाही, अशी परंपरा मान्यवर मंडळींनीच सुरू केली. पुस्तकांच्या दुकानांविषयी तर नेमाडेंनी सांगितले तशीच अवस्था होती.  कोणत्याही शहराच्या वाटचालीत, प्रगतीत, संपन्नतेत अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात. त्याची काही मानके सांगितली जातात. रस्ते, पाणी, वीज, गटारी, रोजगार या भौतिक मानकांचे महत्व आहेच. पण त्यासोबत त्या गावातील प्रत्येकाचे मन घडवण्याचे, त्याला सुसंस्कृत, विचारी बनवण्याचे काम पुस्तके करत असतात. पुस्तक वाचनाची संस्कृती असलेली शहरेच खऱ्या अर्थाने प्रगत मानली जातात. दुर्दैवाने राजकीय नेतृत्व प्रगल्भ नसल्याने आणि धार्मिक, जातीय राजकारणातच अडकून पडल्याने भौतिक मानकात औरंगाबाद मागे पडलेच. पुस्तक वाचन संस्कृतीतही त्याची फारशी प्रगती झालेली नाही. जी काही झाली ती देखील वाचकांच्या रेट्यामुळेच झाली. त्यात पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनी अपेक्षित वाटा उचलला नसल्याचे नेमाडेंनी तिरकस शब्दात सांगून टाकले. त्यांचे बोलणे एकीकडे जिव्हारी लागत असताना दुसरीकडे प्रख्यात साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांचे चिरंजीव साकेत भांड यांच्या साकेतवर्ल्ड पुस्तक दालनाचे उद्घाटन होत असल्याचा आनंदही होता. नेमाडे भाषणात म्हणाले की, आता मी लेखनासाठी प्रदीर्घ काळ बुडी मारणार आहे. बुडीतून बाहेर आल्यावर त्यांना साकेत बुकवर्ल्डसारखी किमान तीन दालने सुरू झाल्याची दिसली तरी औरंगाबादची सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल सुरू झाली असे म्हणता येईल.

औरंगाबादेत पुस्तक विक्रीची दालने सुरू न होण्यामागे काही महत्वाची कारणेही आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तक खरेदीची क्षमता असलेल्यांची संख्या कमी आहे. चित्रपट पाहणार नाही. हॉटेलात जेवण टाळेन पण महिन्याला एक पुस्तक खरेदी करेनच, असा पुस्तकवेडा वर्ग अत्यल्प आहे. पुस्तक खरेदीचा संस्कार शालेयस्तरावर पुरेसा होत नाही. महाविद्यालयीन जीवनात तर त्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ज्यांना पुस्तक विकत घ्यायचेच आहे, अशांसाठी राजहंस प्रकाशनाचे शाम देशपांडे, जनशक्तीचे श्रीकांत उमरीकर, मसापचे के. एस. अतकरे, विद्या बुक्सचा आधार पुरेसा ठरला. मात्र, गेल्या काही वर्षात औरंगाबादेत वाचकांचे आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दरमहा बलवंत वाचनालयाच्या इमारतीत भरणाऱ्या प्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद त्याचेच प्रतीक आहे. पुढील काळात औरंगाबादच्या तरुण पिढीला, विविधस्तरातील वाचकांना प्रदर्शनापुरते मर्यादित राहण्याची इच्छा नाही. जगातील सर्वोत्तम पुस्तके त्यांना तत्काळ हवी आहेत. त्यासाठी प्रदर्शनाची वाट पहावी लागू नये, असे त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे. शिवाय एका अत्याधुनिक पद्धतीने पुस्तकांची मांडणी असावी. प्रत्येक पुस्तक हाताळण्याचा निवांतपणा असावा, असेही वाटू लागले होते. नेमकी  हीच बाब साकेत यांनी टिपत नवे दालन सुरु केले. तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेल्या साकेत यांनी पुढील काळात व्यावसायिकता जपताना औरंगाबादेत वाचन संस्कृती फुलवण्याचा मूळ उद्देश अडगळीत टाकू नये. वाचक हाच केंद्रबिंदू ठेवून वाटचाल केली तर त्यांचे बुकवर्ल्ड खऱ्या अर्थाने औरंगाबादचा अलंकार ठरेल. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतरही तरुण मंडळी या व्यवसायात आली तर तो सर्वोच्च  अलंकार होईल, याविषयी शंका  नाही.



No comments:

Post a Comment