Wednesday 20 April 2016

तंतू : अस्वस्थ मनाचा आक्रंद









तंतू  :  अस्वस्थ मनाचा आक्रंद



भारत स्वतंत्र होऊन ६९ वर्षे उलटून गेली. महाकाय प्रदेश, अनेकविध धर्म. हजारो जाती. लाखो परंपरा. कोट्यवधी लोक असलेल्या या देशाने खरंच प्रगती केली की नाही, असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. भारतावर प्रदीर्घ काळ काँग्रेसने सत्ता केली. त्यामुळे काँग्रेस समर्थक मंडळी काँग्रेसच्याच सत्ताकाळात प्रगती झाली असे म्हणतात. भाजप किंवा अन्य विरोधी पक्ष गरीबी अजून कायम म्हणजे प्रगती का? दलित, आदिवासी, मुस्लिम स्वातंत्र्यपूर्व काळात होते. त्याच्या तसूभरही पुढे सरकले नाही. हीच काँग्रेसची निती का, असा सवाल करतात. तर भाजप धर्माधिष्ठित राजकारण करतो. जाती-धर्मात फूट पाडून सत्ता बळकावतो. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्यास भाजप किंवा अन्य हिंदुत्ववादी पक्ष तयार असतात. त्यांना भारताच्या विकासाशी काहीही देणेघेणे  नाही. भाजप मुस्लिम, दलितविरोधी असल्याचे टीकास्त्र काँग्रेस आणि भाजपविरोधकांकडून अलिकडे वारंवार सोडले जाते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून या टीकास्त्राला धार चढली आहे. मोदींमुळे समाजात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत प्रारंभापासूनच भाजपविरोधी भूमिका असलेल्या काही साहित्यिक, वैज्ञानिकांनी पुरस्कार वापसी केली.

राजकारण म्हटले की, हे सगळे होणारच. पण मूळ मुद्दा भारतीय समाजाचा विकास झाला आहे का, असा आहे. तर त्याचे उत्तर काही मंडळी बराच झाला तर काहीजण थोडाफार झाला, असेच देतील. मात्र, भारतीय समाजमनाची वेगाने घसरण सुरू आहे. यावर बहुतांशजण सहमत होतील, अशी स्थिती येऊन ठेपली आहे. विकासाचे काम कसे झाले यापेक्षा ते कोणत्या जातीच्या, कोणत्या धर्माच्या, कोणत्या पंथाच्या माणसाने केले, याकडे लोकांचा कल वाढला आहे. एखादा गुन्हा केला तर त्यालाही जाती-पातीचा, धर्माचा रंग दिला जात आहे. एकीकडे भौतिक प्रगती सुरू असताना असा कल वाढत जाणे पुढील काळात देशासाठी भयानक घातक ठरणार आहे. मात्र, सामान्य माणसाच्या जीवनातून नैतिकतेची ही घसरण आताच नव्हे तर १९७०च्या दशकापासून सुरू झाली आहे. इंदिराजींच्या अमर्याद सत्तेमध्ये घसरणीची, जाती, धर्म द्वेषाची बीजे रोवली गेली. तेव्हापासून असहिष्णुतेचा पाया रचणे सुरू झाले. हिंसा सहसा नष्ट होत नाही. ती वाढतच राहते. जुलमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही प्रवृत्तींचा कल स्वतःची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो. परंतु, विचारांवर कुणाचीही हुकूमत चालत नसल्याने या प्रवृत्ती हल्ल्यांचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंतांकडे वळवतात. आणीबाणी घोषित होण्यापूर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आले होते. राज्यकर्त्यांचा हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी…` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती, असे प्रख्यात साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, भारतातील सर्वश्रेष्ठ लेखकांमध्ये गणले जाणारे एस. एल. भैरप्पा त्यांच्या तंतू या कादंबरीतून सांगतात. तेव्हा मन सुन्न होते. भारतापुढे काय वाढून ठेवले, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता मन आक्रंदून जाते. खरेच आपल्याला स्वातंत्र्याचे महत्व कळाले आहे का. की आपल्याला फक्त जाती, धर्म, पंथ आणि त्यातील द्वेषातच स्वारस्य आहे. राजकारण्यांच्या हातचे कोलीत बनून राहणेच आपल्याला पसंत आहे का? ही घसरण थांबवण्याची कुणाची ताकद आहे का? घसरण सुरू असल्याचे कुणाच्या लक्षात तरी येतेय का? येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, या प्रश्नांनी आपण अस्वस्थ होतो.

समाजाची घसरण या मुद्याभोवती भैरप्पांनी `तंतू`चा पट मांडला आहे. त्यासाठी त्यांनी एका दैनिकाच्या संपादकाला नायक म्हणून केंद्रस्थानी ठेवले आहे. मुद्याचा विस्तार करण्यासाठी भैरप्पांनी जी अनेक वळणे घेतली आहेत. त्यात नवनवीन व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत. त्यातील बारकावे, तपशील थक्क करून टाकतो. प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाच्या हृदयात केवळ उतरणार नाही तर दीर्घकाळ रेंगाळत राहिल. अशी मांडणी ते करतात. बऱ्याच व्यक्तिरेखा तर जणूकाय आपल्याभोवतीच आहेत. आपल्याशी बोलत आहेत, असे वाटू लागते. त्यांच्यातील काहींशी तर नाते जोडले जाते. तंतूत मांडलेल्या बहुतांश घटना आश्चर्यकारक वाटत असल्या तरी त्या अशक्य वाटत नाहीत. होय, असे घडू शकते. अरे, असे घडत आहे. होय, प्रत्येक गोष्टीला जाती-धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची आणि त्यावरच बोलण्याची सवय लोकांना लागली आहे. भौतिक सुख सर्वश्रेष्ठ मानत अनिष्ट गोष्टी वेगाने घडू लागल्या आहेत, असे प्रत्येक पान वाचताना

ठसत राहते. हीच भैरप्पांच्या लिखाणाची ताकद आहे. फक्त त्यांनी तंतूचे लिखाण केले त्यावेळी वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे जातीय, धार्मिक द्वेषापासून काही अंतरावर असावीत. त्यामुळे अलिकडील काळात मिडिआत उफाळलेला जातीय, धार्मिक द्वेष तंतूमध्ये आढळत नाही. एवढा एक मुद्दा सोडला तर तंतूचे समकालीन मूल्य कायम आहे.

बेंगळूरु येथे एका राष्ट्रीय दैनिकाचा संपादक, ब्राह्मणी संस्कृतीत वाढलेला रवींद्र त्याच्या गावाकडे जातो. आजोबांनी गावात कोणे एकेकाळी उभारलेले रुग्णालय कोणत्या अवस्थेत आहे, हे पाहण्यासाठी गेल्यावर त्याला वस्तुस्थितीचे तडाखे बसू लागतात. दुसरीकडे त्याचा मुलगा, पत्नी भौतिक प्रगतीमागे धावू लागतात. या धावण्याच्या नादात त्यांच्या चरित्र्याची घसरण सुरू होते. त्यांना, स्वतःला, गावाला आणि समाजाला सावरता सावरता रविंद्र कोलमडून पडतो, अशी ८७६ पानांमध्ये भैरप्पांनी मांडणी केली आहे. तिचे धागेदोरे, तंतू वाचता वाचता चकित, संभ्रमित करतात. विचारांना आणखी खोलवर नेतात. मूळ कानडी भाषेतील ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊससाठी डा. उमा कुलकर्णी यांनी सुरेख, प्रवाही मराठीत अनुवादित केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.

1 comment:

  1. श्रीकांत खूप छान. आता कादंबरी वाचण्याची उत्सुकता वाढली. कादंबरी नक्की वाचीन

    ReplyDelete