Wednesday 22 January 2020

दरवाजा उघडा राहिला अन्...

आरोग्य अधिकारी पदावरून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या डॉ. शालिनींनी आधी अमेरिकेत बहिणीकडे धाव घेतली. तिथून सिंगापूर, श्रीलंका अशी फेरी मारून त्या परतल्या. यामुळे त्यांचे पती डॉ. रमेश चांगलेच खट्टू झाले होते. मी आजारी असताना तुझा साधा फोनही नाही, असे ते म्हणू लागले. त्यावरून त्यांचे जोरदार खटके उडाले. दोनदा डॉ. रमेश यांनी त्यांच्यावर हातही उगारला. मी तुझ्यापेक्षा वयाने आणि कर्तबगारीने लहान म्हणून तु मला असे टाळतेस, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर शालिनींनीही ‘तु माझा दुसरा नवरा. सतीशपासून झालेल्या मुलीचा तु स्वीकार केल्याचे नाटक केले. पण वर्षभरातच तुझे खरे रूप दिसल्यावर मी तुझ्यापासून मुल होऊ दिले नाही. हे कायम लक्षात ठेव’ असे तावातावाने म्हटले होते. हे ऐकून त्यांच्या शेजारी, कापड व्यापारी उमाकांत चकित झाला होता. प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेल्या शालिनींचे हे रुप पाहून त्याच्या मनात वेगळीच लालसा निर्माण झाली. अलिकडे आपल्याला धंद्यात खोट आली आहे. डॉक्टरबाईला काहीतरी करून गळाला लावून तिच्याकडून पैसे उकळले पाहिजे, असे त्याला वाटू लागले. पण अचानक त्या दिसेनात. मग त्याने रमेशना न राहवून विचारले. तेव्हा त्या मोरगावला मुलगी वैशालीकडे आठ दिवसांसाठी मुक्कामाला गेल्याचे कळाले. मग उमाकांतनेही मोरगावलाच शालिनींना भेटून पैसे मिळवण्याचे ठरवले. इकडे शालिनी वैशालीकडे घरी पोहोचल्या. तेव्हा तिच्याकडे नव्या रुग्णालयाच्या उद्घाटनाची लगबग सुरू होती. मराठी विषयाची प्राध्यापक असलेल्या वैशालीनं बालरोगतज्ज्ञ अविनाश यांच्याशी विवाह केला होता. अविनाश अतिशय तापट म्हणून प्रख्यात होते. शालिनींकडून लग्नाला विरोध होताये, असे लक्षात आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संतापले होते. त्यांच्यात जोरदार हमरातुमरीही झाली होती. पुढे वैशालीनं आईला न जुमानता विवाह केला. हळूहळू अविनाश कामात गुंतले. पण त्यांच्यातील धुमसणे अजूनही कायम होतं. म्हणूनच की काय त्यांनी रुग्णालयाच्या उद्‌घाटनाची साधी निमंत्रणपत्रिकाही सासू-सासऱ्यांना पाठवली नव्हती. पण वैशालीला राहवलं नाही. तिनं मोबाईल मेसेजवर आईला कल्पना दिली. शिवाय तुझ्याकडून दहा लाख रुपये मिळतील, का अशी विचारणा केली होती. शालिनींना तिचे असे मागणे मुळीच आवडले नव्हते. पण मुलीवरील प्रेमापोटी त्यांनी बँकेत दहा लाख रुपये वळवून ठेवले. ५० हजार रुपये घेऊन मोरगावात दाखल झाल्या. त्या रात्री वैशालीनं अविनाशना आईकडून दहा लाख रुपये मिळू शकतात, असं सांगितलं. तेव्हा त्यांचे डोळे काहीसे लकाकले. एवढी मदत झाली तर रुग्णसेवा चांगली होऊ शकते, असे त्यांना वाटू लागले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी वैशालीनं विषय काढला तर डॉ. शालिनींनी एवढा पैसा मिळणार नाही. देणार नाही, असा सूर लावला. आणि अविनाशचा तोलच सुटला. बेभान होऊन शिवीगाळ करत ते बाहेर पडले. त्यापाठोपाठ वैशालीही कॉलेजला निघून गेली. घरी एकट्या शालिनी राहिल्या. तेवढ्यात सोसायटीचा सुरक्षारक्षक बलराज ‘पाणी आलं आहे काॽ,’ असं विचारत आला. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली बाई इथं एकटी आहे, हे पाहून त्याचे डोके फिरले. कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागल्यानं तो पायऱ्या उतरला. 
तासाभरानं वैशालीनं आईची खबरबात विचारण्यासाठी पाच-सात वेळा कॉल केला तर उत्तर नाही. चिंतेत पडलेली वैशाली घरी पोहोचली. अर्धवट उघडा दरवाजा तिने घाबरतच लोटला तर कपाटाजवळ डॉ. शालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. 
पोलिसांच्या संशयाची सुई डॉ. रमेश, उमाकांत, डॉ. अविनाश, वैशाली आणि बलराजच्या दिशेने वळाली. यापैकी कोण होता खुनीॽ 
वाचा पुढील अंकात.

No comments:

Post a Comment