Tuesday 28 September 2021

धरतीमातेच्या डॉ. धिर्ती

प्रा. डॉ. इश्तियाक अहमद प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय घडामोडींचे परखड अभ्यासक. ते मूळ पाकिस्तानी. पण स्वीडनच्या विद्यापीठात विभागप्रमुखपदी दीर्घकाळ काम केले. तेथेच स्थायिक झाले. त्यांनी भारतीय उपखंडाचा इतिहास मुस्लिम, इस्लाम या अंगाने अत्यंत बारकाईने अभ्यासला आहे. त्यांची अनेक पुस्तके कमालीची वाचकप्रिय आहेत. मोहंमदअली जिना यांच्याविषयी त्यांनी अलिकडील काळात काही नवीन विधाने केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळाचे ते साक्षीदार असल्याने त्यांच्या लेखनात, व्याख्यानांमध्ये अनेकवेळा भारताची जडणघडण, हिंदू समाज, हिंदुत्ववादी विचारसरणीचा उल्लेख येतो. अशाच एका व्याखान मालिकेत हिंदूधर्मियांतील सामाजिक सुधारणा या विषयावर बोलताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, रॉय यांनी त्या काळात म्हणजे १८२०च्या दशकात हिंदू समाजातील वाईट गोष्टी, रुढी मोडीत काढण्याचा चंगच बांधला होता. महिलांना त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगता आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच सतीच्या प्रथेविरुद्ध त्यांनी अक्षरश: रान पेटवले होते. इंग्रजांकडे पाठपुरावा करून त्यांनी ती प्रथा कायद्याने बंद केली. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. अन्यथा हिंदू धर्मातील इतर अनेक अनिष्ट गोष्टी त्यांनी त्या काळातच संपवल्या असत्या. किंवा त्या दिशेने हिंदूना वाटचाल करण्यास भाग पाडले असते, एवढी त्यांची त्या काळात ताकद होती. असे सांगून डॉ. इश्तियाक अहमद किंचित थबकले आणि म्हणाले, अर्थात कोणताही समाज नवे बदल सहजासहजी स्वीकारत नाहीच. काही वेळा तर छोट्या बदलांसाठीही त्यासाठी खूप वर्षे वाट पाहावी लागते. जिद्दीने पाठपुरावा करावा लागतो. तशी खंबीर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे जन्माला यावी लागतात. डॉ. इश्तियाक यांचे हे म्हणणे किती सत्य आहे, असे सांगणारी घटना गेल्या महिन्यात घडली. १०५ वर्षे जुन्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेच्या संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली. त्यांचे नाव आहे डॉ. धिर्ती बॅनर्जी. विशेष म्हणजे त्याही राजा राममोहन रॉय यांच्या पश्चिम बंगालमधील आहेत. निसर्ग, धरतीमातेवर निरातिशय प्रेम असलेल्या डॉ. धिर्ती यांचा प्राण्यांचा अधिवास, वर्गीकरण, आकारमान या विषयात गाढा अभ्यास आहे. जंगलातील विविध प्राण्यांचे राहण्याचे क्षेत्र ठरलेले असते. ते क्वचितच क्षेत्र ओलांडतात. त्या मागे नेमकी काय कारणे असू शकतात. हे प्राणी पुढे कुठल्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, याची सखोल माहिती त्यांच्याकडे आहे. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही अर्थातच इंग्रजांनी भारताला दिलेली एक देणगी आहे, असे म्हणावे लागेल. विपुल निसर्गसंपत्ती आणि हजारो प्रकारच्या प्राणी, श्वापदांचा अभ्यास करणे. त्यांची नोंद ठेवणे यासाठी ही संस्था १९१६ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. संस्थेची १६ विभागीय केंद्रे असून पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयांतर्गत ही संस्था काम करते. येथे सुमारे ३०० संशोधक आहेत. डॉ. धित्री या पहिल्या महिला संचालक असल्या तरी या संस्थेत काम करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान १९४९ मध्ये मीरा मनसुखानी यांच्या नावावर आहे. डॉ. धिर्ती बॅनर्जी १९९०मध्ये झुऑलॉजिकल सर्वेमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी महिला संशोधकांचे प्रमाण २४ टक्के होते. आता ते ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. डॉ. धिर्तींनी भारतातील सर्व जंगले पादाक्रांत केली आहेत. व्याघ्रारण्यांमध्ये भटकंती केली आहे. आणखी एक वेगळी गोष्ट त्यांच्यात आहे. ती म्हणजे किटक, माशांविषयी त्यांचा अभ्यास आहे. कोणताही प्राणी मरण पावला की, त्यावर विशिष्ट प्रकारच्या माशा घोंघावू लागतात. अशा माशा पाहून तो प्राणी किती वेळापूर्वी मृत पावला याचा अचूक अंदाज त्या व्यक्त करतात. प्राण्यांकडून मानवाकडे काही जीवघेणे रोग संक्रमित होत असतात. डॉ. धिर्ती यांनी त्याविषयीही संशोधन केले आहे. ते पुढील काळात मानवजातीला उपयुक्त ठरू शकते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले ते महत्वाचे. त्या म्हणाल्या की, नोकरी आणि कुटुंब यांचा सुरेख समन्वय साधत काम करण्याची नैसर्गिक शक्ती महिलांमध्ये असतेच. पण मला पती, मुले आणि कुटुंबीय, गुरुजनांकडून मोठे पाठबळ मिळाल्याने आवडत्या कामात अधिकाधिक लक्ष घालणे शक्य झाले, असे भाग्य अधिकाधिक महिलांना मिळाले तर भारतीय समाज निश्चित खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

No comments:

Post a Comment