Tuesday 16 November 2021

गुलजार सिनेमा

सिनेमा पेराडिजो नावाचा एक नितांत सुंदर सिनेमा आहे. १९८८चा. त्यात अभिनय, कहाणी, मांडणी, दिग्दर्शन तर अप्रतिम आहेच पण सिनेमा टॉकीजची वास्तूही त्यात अभिनय करते. सिनेमा संपल्यावरही ती डोळ्यासमोर रेंगाळत राहते. खुपत राहते. खूप काही सांगत, बोलत राहते. चाळिशी ते नव्वदीत असणाऱ्या अनेक सिनेमाप्रेमींसाठी सिंगल स्क्रीन म्हणजे एक पडद्यावाली टॉकीज ही केवळ पैसे घेऊन मनोरंजन देणारी इमारत नव्हे तर एक टुमदार, उबदार घरच होते. मनापासून, हृदयापासून प्रेम असलेले. त्या घराच्या भिंतींना, पडद्यांना एक सुरेख गंध होता. टॉकीजच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कुटुंबासारखा वाटत होता. १९७०च्या दशकात औरंगाबाद शहर म्हणजे अशा अनेक टुमदार, उबदार घरांची वसाहत होती. त्यातली एक होती गुलजार. नावच किती छान आहे ना. गुलजारला जाऊन येतो, असं म्हणताना त्या काळी मनात आनंदाच्या लाटा उसळत. जणूकाही एखाद्या आवडत्या मैत्रिणीनं बोलावलंय, असा भाव चेहऱ्यावर उमटत असे. गुलमंडीकडून पानदरिब्याकडं जाताना केळीबाजार ओलांडला की डाव्या बाजूला गुलजारचं दर्शन घडतं. आजही तिथं बाहेरच्या बाजूला जुन्या सिनेमांची भली मोठी पण अंधुक, पुसट झालेली पोस्टर्स दिसतील. पन्नास – साठ वर्षांपूर्वी ही पोस्टर्स अतिशय ठळक होती. गुलजारमध्ये कोणता सिनेमा लागणार आहे, याची घोषणा करणारा एक टांगा फिरायचा. त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाची पोस्टर्स बांधलेली असायची. मानेपर्यंत कुरळे केस रुळत असलेला, कपाळाला गंध लावलेला गुलजारचा कर्मचारी त्यात बसलेला असायचा. तो मोठ्या कर्ण्यावरून (माईक) आइए गुरुवार को देखीए पाच शो. ग्रेट गँबलर के. अमिताभ, झीनत, नीतू के साथ. असं सांगत फिरायचा. पाच-सात वर्षांची अनेक पोरं चड्डी सावरत त्या टांग्याच्या मागे मागे अक्षरश: सात-आठ किलोमीटर फिरायची. माझ्या आठवणीप्रमाणे गुलजारला कधी बिग बजेट सिनेमा पहिल्या स्लॉटमध्ये लागला नाही. रिपीटमध्ये मात्र गुलजारने कोणालाही सोडलं नाही. त्या काळी धार्मिक म्हणजे रामायण, महाभारत असे सिनेमेही गुलजारची मक्तेदारी होती. मोडकळीस आलेल्या पाच-सहाशे खुर्च्या असलेल्या या टॉकीजचा पाठिराखा दुय्यम, तिय्यम दर्जाचा प्रेक्षक होता. त्याला दर्जेदार कहाणी, सामाजिक संदेशाशी फारसे देणेघेणे नव्हते. दिवसभर काम करून आंबलेले मन मनोरंजनात बुडवून टाकण्यासाठी येथे लोक संध्याकाळ आणि रात्रीच्या शोला गर्दी करत. त्यामुळे सकाळ, दुपारचा शो म्हणजे प्रेमी, लफडेबाजांसाठी सुवर्णसंधी होती. मल्टीप्लेक्सवाले जशी गर्दी पाहून तिकिटाचा दर कमी जास्त करून टाकायचे. तशी सोय तेव्हा नव्हती. नाहीतर प्रेमी जोडप्यांकडून भलीमोठी कमाई करता आली असती. जुन्या औरंगाबादचे वैभव असलेली गुलजार टॉकीज माझ्या अंदाजाप्रमाणे दहा हजार चौरस फुट जागेत बसलेली असावी. त्यातील चार हजार खुली जागा होती. त्यावर संध्याकाळ, रात्रीच्या शोला मध्यंतरात मोठी मजा असायची. चटकदार भेळ, गरमागरम भजी, वडे, समोशाचे दोन गाडे असायचे. भल्यामोठ्या परातीत शेंगदाणे रचून त्यावर एक छोट्याशा मातीच्या भांड्यात भट्टी लावलेले तीनचारजण लोकांना खेचायचे. शिवाय गोटी सोडाची एक हातगाडी होती. त्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या, चॉकलेटी रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. मध्यंतरात गाडीला सोडाप्रेमींचा गराडा पडायचा. सोडावाला आणि त्याचा कर्मचारी मोठ्या झोकात बाटलीचं झाकण उघडायचा. त्याचा टॉ … S S S क असा आवाज यायचा. फेस उसळायचा. सोड्याच्या चव घशात ठेवूनच लोक पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी पळायचे. गुलजारकडून थोडं पुढं सराफ्याकडं जाताना अगदी चिंचोळ्या, अंधारलेल्या गल्लीत रिगल टॉकीज होती. खरं तर एवढ्या दाटीवाटीच्या वस्तीत चांगली सहा-सातशे खुर्च्यांची टॉकीज म्हणजे आश्चर्यच होतं. पण जुन्या औरंगाबादमध्ये त्या काळात ते सहज शक्य झालं. कारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी शहर फारसे गजबजलेले नव्हते. आणि निर्जन ठिकाणी टॉकीज करणं वेडेपणा. त्यामुळं मला वाटतं १९५१-५२मध्ये मालकानं योग्य निर्णय घेतला. हळूहळू रिगलला दुकानांनी घेरले. मग ती बंद पडली. आणि १९८०-८१मध्ये पुन्हा रसिकांच्या सेवेत आली. त्या काळी सोशल मिडिआ नाही. अनेक पेप्रावाले सिनेमाबद्दल सांगणं म्हणजे भ्रष्ट झालो, असा अविर्भाव आणत. त्यामुळं रिगल पुन्हा सुरू झाल्याची बातमी कळाल्यावर खूप लोक तिथं गल्लीत येऊन दुकानदारांना विचारून खात्री करून घेत. रविवार दिवस इथं खास असायचा. लष्करी छावणीतील वीस-बावीशीतले सैनिक सायकली घेऊन शहरात यायचे. किरकोळ खरेदी, एखाद्या हॉटेलात नाश्ता पाणी आणि सिनेमा असा त्यांचा बेत असायचा. मजबूत अंगकाठीच्या, उंचापुऱ्या, खळखळून हसणाऱ्या सैनिकांची गर्दी रिगलपाशी जास्त असायची. कारण काचीवाडा आणि इतर भागांतील पंधरा-वीस वेश्या तिथं दुपारच्या वेळी आलेल्या असायच्या. सैनिक येत म्हणून त्या यायच्या की वेश्यांवर तरुणाईतील गर्मी उधळण्यासाठी लष्करी यायचे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मागणी तसा पुरवठ्याचा नियम यातही लागू होतोच. तर रंगरंगोटी केलेल्या, भडक रंगाचे ब्लाऊझ, साडी नेसलेल्या या वेश्या दुकानांसमोर, टॉकीजच्या दरवाजाजवळ उभ्या असायच्या. त्यांच्याजवळ तिकीटे असायची. यातील बहुतांशजणी सैनिकांपेक्षा थोड्या अधिक वयाच्या असाव्यात. तीस-बत्तीशीच्या. ज्या सैनिकासोबत त्यांचा व्यवहार पक्का होत असे. त्याला घेऊन त्या टॉकीजमध्ये जात. जणूकाही नवरा – बायको अशा झोकात डोअरकिपरला तिकीट देत. त्यालाही हे सारं माहिती असल्यानं तो गालातल्या गालात हसत असे. पण काही सैनिकांना सिनेमात स्वारस्य नसे. मग तो तिला सायकलवर बसवून मोठ्या खुशीत, शिट्टी वाजवत घेऊन जायचा. शहागंज भागातून तिला एखादं घड्याळ, साडी किंवा चप्पल खरेदी करून द्यायचा. त्या काळात किमान सैनिक-वेश्येच्या किमान तीन चार प्रेम कहाण्या रिगलच्या साक्षीने फुलल्या असतील. १९९५नंतर पुन्हा रिगल वादात अडकली आणि बंद पडली. ती कायमचीच. सात-आठ वर्षांपूर्वी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला डर्टी पिक्चर प्रचंड गाजला. त्यात तिनं १९७० ते १९९० मध्ये प्रचंड गाजलेल्या साऊथ सेक्स बाँब सिल्क स्मिताची भूमिका केली. डर्टी पिक्चरमध्ये अर्थातच अनेक गरमागरम प्रसंगांची रेलचेल होती. शिवाय त्यातून सिल्क स्मिताच्या व्यक्तिगत जीवनाची थोडीशी माहिती सर्वांसमोर आली. कमालीची मादक, सेक्स बाँब असली तरी ती माणूस म्हणून पूर्णपणे अपयशी होती. तिनं काहीजणांचे आणि काहीजणांनी तिचं शोषण केलं. प्रेम मिळत नाही, असं म्हणून तिनं अकाली जीवन संपवलं. आणि ती प्रसिद्धीच्या आणखी एका लाटेवर आरुढ झाली. तिची औरंगाबादकरांना पहिली ओळख सदमा सिनेमातून १९८३ मध्ये झाली. पण तिचा सर्व वर्गात प्रचार, प्रसार झाला तो शहागंज सिटी चौक रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत लपलेल्या मोहन टॉकीजमध्ये. एखाद्या गोदामासारखं रूप असलेल्या मोहनची सुरुवात धर्मेंद्र – झीनत अमानच्या शालिमार सिनेमानं झाली होती. पहिला शो सकाळी आठ वाजताच होता. तुफान गर्दी उसळली होती. जेवढ्या वेगात शालिमार वर गेला तेवढ्याच वेगानं खाली आला. पुढं मोहनमध्ये मुकद्दर का सिकंदर, सरगम असे सिनेमे प्रचंड चालले. पण बहुधा बडे सिनेमा वितरक आणि मोहनच्या मालकांचा खटका उडला असावा. मोठ्या बॅनरचे, लोकप्रिय सिनेमे येणे कमी होत गेले. त्यांची जागा देशी ब्ल्यू फिल्म कॅटेगरीत टाकता येतील, अशा दक्षिणेतील सिनेमांनी घेतली. टॉकीजच्या एंट्री पॉईंटला म्हणजे अगदी वर्दळीच्या रस्त्यावर या सिनेमातील नट्यांची तुफानी पोस्टर्स लागलेली असायची. अजिंठा पेपरमध्ये भल्यामोठ्या टायपात अत्यंत उत्तेजक जाहिराती असायच्या. सोबत इतर उत्तान फोटो. तो पाहून लोक जायचे. त्यांना काहीवेळा रंगात आलेला सिनेमा ऑपरेटर थेट पाश्चिमात्य सिनेमाचा काही भाग दाखवायचा. चेकाळलेली तरुणाई ऑपरेटरची करामत मीठ मसाला लावून दहा मित्रांना सांगायची. मग काय प्रत्येक शो हाऊसफुल्ल. पाऊल ठेवायला जागा नसायची. पाच रुपयांचं तिकीट पंचवीसलाही मिळवता मिळवता मारामार व्हायची. मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मागील बाजूला नाचगाण्याचे कोठे होते. शौकिन लोक सिनेमा पाहून तिथं जात. वीस – पंचवीस वर्षांपूर्वी कोठेवाल्या परागंदा झाल्या. काहीजणींनी कुंटणखाने सुरू केले. इकडे मोहनच्या इंग्रजी सिनेमा प्रेमाची महती पोलिसांकडे पोहोचली. मग त्यांनी धाडी टाकण्याचे नाटक केले. खिसे गरम होताच नाटकावर पडदा पाडला. महत्वाचा मुद्दा म्हणजे मोहनमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची मालिका सुरू होण्याच्या काळात रंगारगल्लीसह काही ठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू झाली होती. तिथं थेट ब्ल्यू फिल्म दाखवल्या जायच्या. पार्लर खच्चून भरलेले असायचे. पण एकाच वेळी वीस-पंचवीसपेक्षा जास्त शौकिनांसाठी जागा नसायची. शिवाय ब्ल्यू फिल्म म्हणजे त्यात ना कहाणी ना भारतीयपणा, ना भारतीय चेहरे. त्यामुळे पार्लरनी मोहनचे फारसे नुकसान केले नाही. मोहनचा धंदा जोरात सुरू राहिला. तो तसाच राहिलाही असता. पण म्हणतात ना की, कोणतीही गोष्ट मग ती चांगली असो की वाईट. टिपेला जाऊन तुटते. तिची घसरण होतेच. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला या जगाच्या इतिहासात कोणीही आव्हान दिलेलं नाही. तर मोहनच्या गरमागरम सिनेमांना इंटरनेटचं ग्रहण लागलं. मोठ्या पडद्यावर जे काटून छाटून दाखवलं जात होतं. त्याच्या एक हजार पटींनी जास्त उघडंनागडं, बिभत्स मोबाईलवर दोन-तीन रुपयांत मिळू लागलं. मग मोहनकडं जाणाऱ्यांचा ओघ कमी कमी होत गेला. अर्थात तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचं संकट संपल्यावर कदाचित पुन्हा मोहन फुलेल. मोठ्या पडद्यावर सर्व काही पाहण्याची मौज लुटणारे आंबटशौकिन मोहनला तारतील. त्यावेळी बहुधा शहागंजातील स्टेट टॉकीजशी मोहनची स्पर्धा असेल. कारण स्टेटमध्येही १९९० नंतर अश्लिल सिनेमांचे माहेरघर तयार झाले. खरेतर स्टेट म्हणजे औरंगाबादच्या सिनेइतिहासाचा मानबिंदू. अनेक मोठ्या कलावंतांनी स्टेटला भेट दिली. हिंदी सिनेमा जगात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला शोले इथेच लागला होता. तेव्हा औरंगाबादलगतच्या खेड्यातून लोक टांगा, बैलगाडीनं येत. स्टेटच्या आवारात टांगा, बैलगाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था होती. तेव्हाच्या पेप्रात स्टेटच्या मालकांविषयी बरंच चांगलं छापून येत असे. मुबलक पैसा बाळगणाऱ्या स्टेटच्या मालकांना बहुधा कौटुंबिक अडचणींनी ग्रासलं असावं. त्यामुळे त्यांचे लक्ष कमी होत गेले. वितरकांशी संबंध बिघडले असावेत. त्यामुळे चांगल्या सिनेमांचे प्रमाण झपाट्याने घसरत गेले. त्याऐवजी भडक सिनेमे झळकू लागले. इंटरनेटच्या आक्रमणानं मोठ्या पडद्यावरील सेक्सचे आकर्षण संपवून टाकले. त्याचा परिणाम स्टेटवर होत गेला. कोरोनापूर्वीच्या तीन-चार वर्षात स्टेट फक्त बातम्यांपुरतीच चर्चेत राहिली. जवळपास मोहन, स्टेटएवढेच आयुष्य आणि त्याच स्वरूपातील अडचमी असलेल्या सादिया टॉकीजने कधी कायमस्वरूपी आंबट मार्ग स्वीकारला नाही. जुन्या औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सादियाला समोरच्या बाजूनं मोठं मोकळं मैदान लाभलं होतं. इथं औरंगाबादकरांना नेहमीच चांगले सिनेमे पाहण्यास मिळाले. अधूनमधून इंग्रजी सिनेमेही लागत पण तेही दर्जेदार असतील, याची काळजी टॉकीजमालक घेत. मल्टीप्लेक्सचे युग सुरू झाल्यावरही ते सिंगल स्क्रिनवर कायम राहिले. त्याचा तोटा त्यांना झाला. हक्काचा प्रेक्षक कमी कमी होत गेला. सादियाच्या कँटीनमध्ये त्या काळात मिळणारे सँडविच अफलातून होते. अत्यंत चविष्ट असे हे सँडविच खाण्यासाठी ठिकठिकाणाहून खवय्यै येत. तृप्त होऊन जात. आता जर तो सँडविचवाला असता तर नक्कीच वर्षभरात लखपती आणि नंतर करोडपती झाला असता. मल्टीप्लेक्स अवतरण्यापूर्वी औरंगाबादचा सिनेमा अंजली टॉकीजनं बदलला. १९८१मध्ये सावे कुटुंबियांनी सुरू केलेल्या अंजलीनं दर्जेदार सेवा म्हणजे काय याचा अनुभवर रसिकांना दिला. प्रशस्त जागा. आरामदायक खुर्च्या आणि उच्चप्रतीचा पडदा, असा त्रिवेणी संगम अंजलीत होता. भारतातील सर्व मोठ्या वितरकांशी सावे कुटुंबियांची थेट ओळख असल्याने त्या काळात सर्वोत्तम सिनेमे अंजलीतच येत. जेम्स बाँड, उर्सूला अँड्रेसच्या सिनेमांचे दर्शन अंजलीनेच घडवले. सुपरमॅन, सुपरवुमन असे हॉलिवूडपट येथेच पाहण्यास मिळाले. एवढेच नव्हे तर नट-नट्यांच्या पत्रकारांशी गप्पा असा नवा ट्रेंड त्या वेळी सावेंनी सुरू केला. टॉकीजवर टॉकीज हा प्रकारही औरंगाबादकरांनी अंजली – संगीताच्या रुपात पाहिला. संगिता म्हणजे आजकालच्या मल्टीप्लेक्ससारखं रूप होतं. फार झालं तर दीड-दोनशे खुर्च्या होत्या. त्यात लोकांना बऱ्यापैकी मराठी आणि दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे पाहण्यास मिळत. औरंगाबादमध्ये नव्या संस्कृतीचा पाया रचणारी आणखी एक टॉकीज होती सत्यम. रेल्वे स्टेशन एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला सत्यमची सुंदर, आखीव, रेखीव इमारत होती. हॉरर इंग्रजी सिनेमे पाहायचे असतील तर सत्यमशिवाय पर्यायच नाही, अशी १९९०मध्ये स्थिती होती. इंग्रजीप्रेमी रसिकांची चांगली गर्दी होत होती. पण तेवढ्यावर बहुधा टॉकीजचा खर्च चालत नसावा. सिनेमे आणून लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा निवासी इमारती बांधून पैसा कमावणं टॉकीजमालकाला सोपं वाटलं असावं. एक दिवस सत्यम बंदची घोषणा झाली. रॉक्सी टॉकीजचंही हेच झालं. तिथं आता दुकानंच दुकानं झाली आहेत. एकीकडं असं चित्र असताना मोक्याच्या जागेवरील अंबा-अप्सरा, अभिनय, अभिनित टॉकीज सर्व संकटांना तोंड देत उभ्या आहेत. औरंगाबादेतील सिनेमाहॉल संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मालकाला, व्यवस्थापनाला जेवढे सलाम करावेत, तेवढं कमी आहे. चार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका महाकाय माध्यम समूहाच्या एमडींनी सिनेमा टॉकीजचे काय होणार ते सांगितले. ते म्हणाले होते की, नेटफ्लिक्स ही अमेरिकन कंपनी पुढील काही वर्षांत भारतामध्ये किमान २५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. बिग ते लो बजेट सिनेमे मोबाईलवरच रसिकांना पाहण्यास मिळावेत, अशी व्यवस्था नेटफ्लिक्स करणार आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स संस्कृती येत्या काही वर्षांत मोडकळीस येणार आहे. अर्थात भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. सिनेमा ही टॉकीजमध्ये जाऊनच पाहायची गोष्ट असते, यावर ठाम विश्वास असलेले कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स सुरू राहतील. फक्त मध्यम, उच्च मध्यमवर्गीय रसिक मोबाईलवर झपाट्याने वळेल. त्यामुळे टॉकीजची भरभराट होणे कठीण आहे. हळूहळू त्यांची आर्थिक गाडी घसरू लागेल. दहा-बारा वर्षांत हे सर्व होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. तो दोन वर्षांतच खरा ठरू लागला आहे. अर्थात त्यात कोरोनाचा वाटा खूप मोठा आहे. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे की, संकटं कायमस्वरूपी मुक्कामी नसतातच. एकदा माणूस लढण्यासाठी तयार झाला की ती माघार घेतात. पळून जातात. त्यामुळं येत्या वर्षाच्या मार्चमध्ये कोरोना अखेरचे आचके घेत असेल. तोपर्यँत टॉकीज नव्या रुपात, पूर्ण ताकदीनं उभ्या राहतील. मोबाईलमधून बाहेर पडलेल्या रसिकांच्या वर्दळीनं गजबजतील. मल्टीप्लेक्सची जागा वेगळ्याच रचनेतील सिंगल स्क्रिन घेतील. टॉकीज संस्कृती मोडीत काढण्याचं नेटफ्लिक्सवाल्यांचं स्वप्न मोडीत निघेल. उलट ते त्यांचे सिनेमे टॉकीजमध्ये दाखवू लागतील. सिनेमाच्या मध्यंतरामध्ये पुन्हा सोड्याच्या बाटलीची झाकणं टॉ … क असा आवाज करून उघडू लागतील. वडे, भेळ, समोसे, भज्यांचा गंध दरवळेल. औरंगाबादचं जग गुलजार होऊन जाईल, असं वाटतंय.

No comments:

Post a Comment