Thursday 4 April 2019

आयुक्त हरवले आहेत...!

डॉ. निपुणजी रुसू नका, चंदीगडचे काम संपताच तत्काळ परत या...

नाव डॉ. विनायक निपुण. उंची अंदाजे ५ फूट ८ इंच. बांधा दणकट. चेहरा निमुळता. चेहऱ्यावर कायम गंभीर भाव, असे वर्णन असलेले औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त चंदीगड येथे शासकीय कामानिमित्त गेल्याचे सांगण्यात येते. १७ मार्चपर्यंत ते तेथेच राहणार, अशी माहिती महापालिकेच्या परिवारातून दिली जात आहे. मात्र, ते औरंगाबादकरांवर रुसून गेले आहेत आणि तेथून दुसऱ्या शहरात बदली होऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा ऐकिवात येते. पण, १५ लाख औरंगाबादकरांना असे वाऱ्यावर सोडून कसे जाता येईल तुम्हाला?
प्रिय, डॉ. निपुण, तुम्ही कशामुळे रुसलात, हे औरंगाबादकरांना ठावूक झाले आहे. २९ फेब्रुवारीच्या महापालिकेच्या सभेत तुम्ही तुमचा वैताग, त्रागा व्यक्त केला. कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. पाणीटंचाई वाढत चालली आहे. त्यावर उपाययोजना होत नाही. काही अधिकाऱ्यांच्या तुम्ही वारंवार बदल्या केल्या. म्हणून स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी तुम्हाला १३ मुद्यांचे पत्र दिले. ते वाचून तुम्ही विमनस्क झाला. हेची फळ काय मम तपाला, अशी भावना तुम्ही वहिनीसाहेबांकडेही बोलून दाखवली. आणि मग मनातले सारे काही भडभड बोलून टाकावे, असा विचार करत दोन तास बोललात. औरंगाबाद महापालिकेच्या कारभाराची कीर्ती जगभर पसरल्याने येथे कोणी येत नव्हते. तरीही मी आलो. पालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर येथील कचरा पाहून रात्र रात्र झोप येत नव्हती, असे तुम्ही म्हणालात. आणि मग हा प्रश्न सोडवण्यासाठी नऊ महिन्यांच्या कारकीर्दीत काय केले, त्याचा तपशील सभेला ऐकवला. ते सारे ऐकून महापौरांसह सारे पदाधिकारी, नगरसेवक गहिवरून जातील. तुमची तळमळ समजून घेत तुम्हाला खरंच मनापासून सहकार्य करू लागतील, अशी तुमची अपेक्षा होती. पण यापूर्वीच्या सर्वच आयुक्तांशी ही मंडळी जशी वागली, तशीच तुमच्याशीही वागली. ‘हो...हो...सहकार्य करू ना.’ असे म्हणाली. प्रत्यक्षात काही केले नाही. मुख्य म्हणजे ज्या वैद्यांच्या पत्रावरून तुम्ही एवढे बोलतात तेच त्या दिवशी सभेत नव्हते. उलट त्यांनी आणखी एक पत्र देण्याची तयारी सुरू केली. त्यातच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी तुमच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. म्हणून तुमचा वैताग अधिकच वाढला. आणि मग रागाच्या म्हणा किंवा संतापाच्या भरात म्हणा, तुम्ही तातडीने चंदीगडचा रस्ता धरला.
पण साहेब, घरातील एक माणूस असं काही बोलला किंवा त्यानं पत्र लिहिलं तर कोणी असं नाराज होऊन घर सोडून जातं का? घर म्हटलं की चार प्रकारचे लोक असणार. महापालिकेत तर सगळ्याच पत्रांमागे एक ‘अर्थ’ असतो. तो समजून घेतला की कामाचा आनंद अनेक टक्क्यांनी वाढतो. बरं, जी मंडळी तुम्हाला त्रास देतात. त्यांना धडा शिकवण्याचे अनेक मार्ग तुमच्याकडे आहेत. ते तु्म्ही वापरत नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कठोर निर्णय घ्या. टक्केवारीत बुडालेल्यांना उचलून बाहेर फेका असं ‘दिव्य मराठी’ने १५ लाख औरंगाबादकरांच्या वतीने तुम्हाला वारंवार सांगितले. पण तुम्ही आम्हालाही विश्वासात न घेता बॅग भरली आणि अचानक निघून गेलात. खरं तर मुख्यमंत्ऱ्यांनी भरघोस निधी देऊन तुमच्यावर किती विश्वासाने आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली. रस्त्यांसाठीही पैसा दिला. समांतर जलवाहिनीचा पेच सोडवण्यासाठी दोन पावलेही उचलली. आता औरंगाबादकर तुमच्याकडे आशेने बघत आहेत, याचा कळकळीने विचार करा.
तुम्हाला कोणीही, काहीही बोलणार नाही. रागावणार नाही. पत्र देणाऱ्यांनाही आम्ही रोखून धरू. सुनिल केंद्रेकर यांच्याशी चर्चा करून तुम्हाला कार्यपद्धतीत काही सुधारणाही करता आल्या तर नक्की करा. या शहराला निपुण अधिकाऱ्यांची गरज आहे. म्हणून रुसवा सोडा आणि चंदीगडचे काम संपताच औरंगाबादेत दाखल व्हा.


No comments:

Post a Comment