Tuesday 22 June 2021

चक्रीवादळी नीना

‘आँ ... काय सांगताय’, ‘खरंच की काय’, ‘अरे बापरे ... भयंकरच आहे हे’, ‘कठीण आहे, यावर विश्वास ठेवणं’, ‘खूपच धाडसी आहे ती. तिला हवं ते मिळवलंय तिनं’ असे उद्गार १९८९ मध्ये पहिल्यांदा ही बातमी कानावर पडली तेव्हा लोक बोलत होते. समांतर सिनेमा जगात रमलेली आणि क्रिकेटवाली मंडळी त्यात आघाडीवर होती. पेप्रांचे कॉलमच्या कॉलम तिच्या त्या बातमीनं भरून गेले होते. त्या घटनेला ३२ वर्षे उलटून गेली तरी ती अजूनही प्रसारमाध्यमांची आवडती आहे. तिच्यासोबतच्या, तिच्यापेक्षाही अधिक चमकणाऱ्या अनेक तारका मागे पडल्या, लपल्या. काही संपूनही गेल्या. पण तिच्या नावावरील बातम्या विकल्या, वाचल्या, पाहिल्या जात आहेत. कोणालाही हेवा वाटावा अशा प्रसिद्धीच्या लाटेवर ती कायम आहे. तरीही ... तरीही ती काहीशी आंतरिक दुखावलेली, स्वतःपासूनच दुरावलेली आहे. आपल्याला जे हवं ते आपण हट्टानं, धाडसानं मिळवलं. पण ते आपल्याजवळ आपल्याला हवं तसं का राहिलं नाहीॽ आपलं काय चुकलंॽ असे प्रश्न तिला पडले आहेत. पडद्यावर सहनायिकेच्या भूमिकेत राहूनही बंडखोर नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या आहेत नीना गुप्ता. ६२ वर्षांच्या जीवनात जे काही अनुभवलं, पाहिलं, जाणून-समजून घेतलं ते त्यांनी ‘सच कहूँ तो’ पुस्तकात मांडलंय. १४ जून रोजी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झालंय. त्यामुळं त्यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत आणखी प्रखर झालाय. १९८०च्या दशकातील क्रिकेट जगताचे अनभिषिक्त सम्राट सर व्हिव्हियन रिचर्डससोबत नीनांनी संबंध प्रस्थापित केले. त्या संबंधातून १९८९ मुलीला म्हणजे मसाबाला जन्म दिला. ‘होय, मी लग्नाविना मूल मिळवलं’ असं धाडसानं जगाला सांगितलं. लिव्ह इन रिलेशनशिप, एकल महिलांना समजून घेणं. त्यांच्याविषयी किंचित का होईना सन्मानाची भावना ठेवणं हळूहळू सुरू होतंय. तरीही ती घटना भारतीय समाजातील प्रचंड मोठ्या वर्गाला धक्कादायक वाटते. त्या काळी तर भूकंपच झाला. काही व्यक्ती वादळी तर काही चक्रीवादळासारख्या असतात. त्या स्वतःभोवतीच धुळ उडवत फिरत राहतात. त्यातून त्यांना किनाऱ्यावर आदळल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. नीना अशाच चक्रीवादळी. ४ जुलै १९५९ रोजी दिल्लीत जन्मलेल्या, संस्कृत भाषेत मास्टर्स, एम.फिल. केलेल्या नीनांनी या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भूकंपाचे अनेक हादरे दिले आहेत. काही रहस्येही सांगितली आहेत. त्यातील काही चक्रावून टाकणारी आहेत. त्यांनी सांगितलंय की, रिचर्डसकडून होणाऱ्या बालकाला बाप म्हणून कोणाचं नाव लावावं, असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी विवाहाची तयारी दाखवली होती. बाळ कृष्णवर्णीय जन्माला आलं तर ते सतीश कौशिककडून झालंय, असं तु जगाला सांगू शकतील, असा कौशिकांचं म्हणणं होतं. पण रिचर्डसशिवाय कोणालाही आयुष्यात प्रवेश द्यायचाच नाही, असं त्यावेळी ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनी कौशिकांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढं मसाबाचा जन्म झाल्यावर लग्नाविना मूल जन्माला घालणारी महिला असं म्हणून त्यांना सिनेमात निगेटीव्ह भूमिकाच ऑफर होऊ लागल्या. आणि सिनेमातील पुरोगामींचा एक वेगळा चेहरा त्यांच्यासमोर आला. एकट्याने राहणे शक्यच नाही, असे लक्षात आल्यावर नीनांनी विवेक मेहरांशी वयाच्या पन्नाशीत लग्नही केलं. अर्थात मसाबाला विश्वासात घेऊन. तिनं होकार दिल्यावरच. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी प्रख्यात अभिनेत्री करीना खान कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत नीना सांगतात की, तसं तर मी गेल्या २० वर्षांपासून पुस्तक लिहण्याची तयारी करत होते. पण कोरोनाचं संकट आल्यावर उत्तराखंडातील एका गावात राहण्यास गेल्यावर बरंच लिखाण केलं. त्या वेळी मला जाणिव झाली की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळात माझा कोणी प्रियकर नव्हता. मी पतीविना होते. काही प्रेमप्रकरणं झाली. पण त्यातील एकही पूर्णत्वाला गेलं नाही. एक लग्न आई-वडिलांनी ठरवलं. पण शेवटच्या क्षणी मुलानं नकार दिला. लग्न मोडलं. एकूणात मी पूर्णपणे एकटीच राहिले. या पुस्तकात नीनांनी त्यांचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण, मुंबईच्या सिनेजगतातील संघर्ष, यश, राजकारण, काम मिळवून देण्यासाठी लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या वाचकांना निश्चितच सिनेमावाल्यांचा आणखी एक चेहरा दाखवतील. चेहऱ्यावरील एक बुरखा हटवतील. या निमित्ताने एकाकी चक्रीवादळाचं विचार, अनुभवविश्वही समजेल.

No comments:

Post a Comment