Monday 21 December 2015

अनुकंपा (अनुवादित उर्दू कथा : मूळ लेखक : सलीम अहेमद)




-- १ --

घामानं, धुळीनं भिजलेल्या चेहऱ्याचा त्याला प्रचंड वैताग आला होता.
 अशा मातकट तोंडानं घरात जायचं का, असा विचार करून त्यानं 
खिशात हात घालत रुमाल बाहेर काढला. 
एकक्षण रुमालाकडं पाहिलं. मातीनं एवढ्या भिजलेल्या रुमालानं 
तोंड पुसलं जाण्याऐवजी  आणखीनच काळं
 होईल आपल्या नशिबासारखं, असं पुटपुटत त्यानं रुमाल पुन्हा खिशात कोंबला. जड पावलानं 
गल्लीत वळाला. त्याचं अख्खं बालपण खाऊन टाकणारा महाकाय, जुनाट वाडा तसाच आपल्या
 जागी उभा होता. जागोजागी पडझड झालेल्या वाड्यात प्रत्येक कोपऱ्यावर झाडं उगवली होती. 
त्याच्या आडोशाला कशाबशा तग धरत पाच-सहा खोल्या होत्या. लोकांनी आडोशाचा वापर मुतारी 
म्हणून सुरु केल्यानं दुर्गंधीची भपकारे नाकात शिरत होते. वाड्याच्या मागच्या बाजूला तयार झालेली 
कचराकुंडी आणि त्यावर फिरणारी भटकी कुत्री वैताग आणत होती. हे सारं नजरेआड करत तो
 वाड्यात शिरला. डाव्या बाजूला असलेली अंधारलेली जुनाट खोली म्हणजे त्याचं घर.
 दारासमोर चप्पल काढताच आतून आईचा हृदयावर चरका ओढणारा आवाज आला.
काय झालं संभा? इंटरव्ह्यू झाला का?
दर महिन्याला तीन-चार वेळा येणारा हा प्रश्न संभाजीच्या सरावाचा झाला होता. 
खरं तर आपल्या येण्यावरून तिला सगळं कळतं तरीही ती का विचारते, 
असं वाटून त्याचाही आवाज चिरकला.
काय होणार. सांग ना तू? नवीन काय होणार? आतापर्यंत जे झालं तेच आजही झालं. कळालं का?
दम्यानं आधीच खोलवर गेलेला आईचा आवाज संभाजीच्या या उत्तरानं आणखीनच दबला. 
अरे, देवा...असं म्हणत ती भांडी आवरू लागली. तेवढ्यात अण्णा जागे झाले. अरे काय झालं. 
का ओरडताय. माझ्या घशाला कोरड पडलीय रे. कुणी पाणी देता का? संभाजी जागचा हलला नाही. 
जणूकाय त्याच्या पायातील त्राणच गेले होते. आईनं एक मिनिट त्याच्या हलण्याची वाट पाहिली. 
मग खिडकीत ठेवलेल्या गोळ्या उचलून पाण्याचा ग्लास तिनं अण्णांसमोर केला. 
थोड्याच वेळात खोलीत स्मशानशांतता पसरली. संभाजीनं कपडे बदलले. 
हातात एक पुस्तक घेऊन तो खोलीबाहेर पडला. नेहमीप्रमाणे वाड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या 
पडक्या माळवदावर अंग पसरण्यासाठी. काही खायचं नाही का? हा आईचा आवाजही त्याच्या
 कानावर पडला नाही. माळवदावर पोचताच त्यानं चटई अंथरली. रस्त्यावरील दिव्यामुळे 
येणाऱ्या उजेडाचा आधार घेत डोळ्यासमोर पुस्तक धरून काहीतरी वाचायचा प्रयत्न केला. 
पण एकही शब्द दिसेना. डोळ्यात पाण्याचा तवंग जमा होऊ लागला होता. 
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या परवडीची दृश्ये डोळ्यासमोरून झपाझप जाऊ लागली.
अनेक ठिकाणी झालेले अपमान आठवू लागले. दोन दिवसांपूर्वी स्टील ग्लास कंपनीतील अनुभव तर
ताजाच होता. रिसर्च असिस्टंट म्हणून कामावर घेतले मॅनेजरने. वाटले होते की हा 
आपल्या शिक्षणाच्या दर्जाला शोभेसा जॉब आहे. सुरुवातीला पैसा कमी आहे. पण हळूहळू वाढेल. 
पहिल्या पगारात किमान आईला एखादी साडी तर नक्कीच घेता येईल.  बाकीचे पैसे अण्णांच्या
 औषधासाठी द्यावाच लागेल. किती वर्ष झाले आपण एखादे चांगले नाटक पाहिले नाही.
 सिनेमालाही गेलो नाही. पगार हाती पडला की त्याच दिवशी अण्णा, आई आणि विमल, कुमुद आणि 
शरयूलाही सिनेमाला घेऊन जायचे. त्या पोरींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याची जबाबदारी आपलीच
 आहे ना. त्यांच्या शाळेच्या फीसची तजवीज करता करता आई, अण्णा थकून गेले आहेत. 
आता त्यांची फीस मी भरणार असे आपण अण्णांना जेव्हा सांगू तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती 
आनंद होईल, याचा विचार करूनच आपण कंपनीत पाऊल ठेवले. पण दोनच दिवसात
 मॅनेजरने रंग दाखवले. ग्लास पुसणे, फायलींचे गठ्ठे हलवणे अशी कामे करण्यास सांगितले. 
रिसर्च असिस्टंटला ही कामे का, असे विचारले तर हात धरून गेटबाहेर हाकलून दिले. 
असा अपमान कशामुळे आपल्या पदरी पडतो, हेच कळत नाही, असे वाटून संभाच्या
 डोळ्यात पुन्हा पाणी दाटून आले. त्याने पुस्तक घडी करून बाजूला ठेवून  िदले. 
तेवढ्यात खालून अण्णांचा आवाज ऐकू आला. त्याला वाटले की आपल्याला बोलवतायत
 की काय म्हणून त्याने कानोसा घेतला. तर अण्णा म्हणत होते.
‘मला माझी काही चिंता नाहीये. लाकडासारखं वाळलेलं शरीर आहे. चितेवर ठेवताच एका
 मिनिटात खाक होऊन जाईल. पण तुमचं काय. रिटायरमेंटसाठी काही महिनेच बाकी आहेत. 
काय सांगता येतं. तुम्ही सारखे आजारी असता असे म्हणून साहेब आधीच काम थांबवून टाकतील.
 संभाजीला नोकरी असती तर हा ताण झालाच नसता.  पोरींच्या शिक्षणाची, तुझी काळजी घेतली असती त्यानं.’
त्यावर आई म्हणाली
अहो, जगात कामं काय कमी आहेत का? हमाली करूनही लोक जगतातच ना?
 काबाडकष्ट करूनच अनेक लोक मोठे झालेत. पण आपल्या साहेबांना कामाची लाज.
 हे काम माझ्या शिक्षणाला शोभेसे नाही. ते काम मी कसे करणार? असं भपका असतो. 
चांगली नोकरी मिळेपर्यंत हमाली केली तरी काय हरकत आहे हो?
हं...तेही आहे म्हणा. पण मी एवढा पोटाला टाच देऊन त्याला शिकवलं. एमएस्सी केलं.
 त्यानंही जिद्दीनं शिक्षण घेतलं तर त्याला त्याच्या मनासारखी नोकरी पाहिजेच ना.
 हमालीच करायची होती तर दहावीनंतर त्याला रेल्वे स्टेशनवर मीच पाठवून दिलं असतं ना?
मग अण्णा बराच वेळ खोकत खोकत बोलत राहिले. आई त्यांना उत्तर देत राहिली. 
ती ऐकत ऐकत कधी झोप लागली ते संभाजीला कळालंच नाही.

-- २--

प्रचंड कलकलाटानं भरलेली ती निमुळती गल्ली म्हणजे संभाजीचं आवडतं ठिकाण. 
एका टोकाला एक भलामोठा जुनाट अन्् पडझड झालेला ऐतिहासिक दरवाजा अन््
 दुसऱ्या टोकाला एक तेवढीच जुनी मशिद. तिच्यासमोर एक पुरातन वडाचे झाड. 
आणि या दोन्ही टोकांच्या मध्ये पाच-दहा फूट एवढीच रुंदी असलेल्या सात-आठ पानाच्या टपऱ्या. 
वीस-पंचवीस कुलूप, छत्ऱ्या, कुकर, मिक्सर दुरुस्तीची दुकानं. काही मोबाईल दुरुस्तीची खोपटं. 
काही भेळ-पुरीच्या गाड्या. रस्त्यावर कढया लावून जिलेब्या, भजे तळणारे तर दोन-दोन 
फुटांवर बसलेले. त्यातून एखाद्या सायकलला वाट काढता आली तर त्या सायकलवाल्याचेच नशिब. 
तरीही तिथून अनेक रिक्षावाले घुसत. कढया बाजूला सरकायला लावून पुढे जात.
कुलूप, छत्री, मोबाईल दुरुस्तीसाठीचे शहरातील सर्व लोक या गल्लीतच येत
 आणि तिथं जिलबी, भज्यांवर ताव मारत. भेळपुरी खात. 

त्यामुळं सकाळी आठ ते रात्री एक दीडपर्यंत ही गल्ली म्हणजे कलकलाटाचं केंद्रच होतं.
तिथली पारस हॉटेल आणि त्याच्यासमोरची खुद्दूसची पानटपरी म्हणजे संभाजीचं अनेक वर्षाचं 
आवडतं ठिकाण. खिशात पैसा असेल तर एखादा चहा आणि त्यानंतर सिगारेट त्याला भारी आवडायची. 
अलिकडच्या काळात अण्णांकडून पैसे मागायची लाज वाटायची. 
त्यावर त्याने करीमशी दोस्तीचा उपाय शोधून काढला होता.
 शिवाय त्याच्या वाड्याजवळ राहणारे मंगेश, प्रशांत त्या गल्लीत भेटायचेच. त्यांची रद्दी विक्रीची दुकानं होती. 
त्यांच्या चहा पिण्याच्या वेळा त्याने पाठ करून ठेवल्या होत्या. ते दोघे असताना हॉटेलात गेले की 
चहा अन्् सिगारेटचे चार-पाच झुरके मिळायचेच.

आजही तो अचूक वेळ साधूनच गल्लीत दाखल झाला. आधी त्यानं प्रशांत कुठे आहे याचा शोध घेतला. 
त्याच्या दुकानावर काम करणाऱ्या पोराला खुणेनंच विचारलं. त्यानंही सरावानं गेलेत ते तिकडं असं
 खुणेनंच उत्तर दिलं. मग पुढं आल्यावर मंगेशच्या दुकानात त्याचा काका बसला होता. 
त्यानंही तो गेलाय तिकडे केव्हाचा. आता यायच्याच मार्गावर असेल असं सांगितलं. 
तेव्हा आता आपला चहा हुकला. सिगारेटचे झुरके गेले, असे वाटून संभाजीनं झपाझप पावलं टाकली 
अन्् हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. आत पाठमोरे बसलेले प्रशांत, मंगेश पाहून
 त्याला कमालीचं हायसं वाटलं. त्याचा चेहरा तेवढ्या तणावातही हसरा झाला.

त्या दोघांच्या जवळ पोहोचण्यापूर्वी त्यानं मोडकं स्टूल उचललं आणि त्यांच्याजवळ बस्तान मांडलं. 
त्याला पाहून ते दोघेही खुलले. या सरकारीसाहेब, असं नेहमीप्रमाणे म्हणत प्रशांतनं त्याला स्टूलवर 
नीट बसा हां, असं बजावलं. 
हो...हो काळजीच नको. मी एकदम व्यवस्थित आहे या स्टूलावर. माझा नेहमीचाच आहे तो.
हां...हां...सरकारीसाहेब कधी कधी नेहमीच्याच गोष्टी दगा देतात हां. कुणावर एवढा कायमचा भरोसा 
चांगला नसतो हां. मंगेशनं त्याच्या धंद्यातील खाचखळगे आठवत सांगितलं.
त्यावर प्रशांत मनमोकळं हसत म्हणाला
ओ, रद्दीवाले तुमचे विचार पण रद्दीसारखेच झाले आहेत हां. 
अरे, आपले संभाजी म्हणजे सरकारीसाहेब आहेत. आपल्यापेक्षा दहापटीनं जास्त शिकले आहेत. आपण पाचवी-सहावीतच शाळा सोडली आणि सरळ गल्ल्यावर येऊन बसलो. 
पण साहेब पहा किती शिकले आहेत. मोडक्या स्टुलावर कसं बसावं, याचाही अभ्यास
 त्यांनी केलाच आहे. 
प्रशांतचं हे बोलणं म्हणजे कौतुक आहे की टोला अशा विचारात संभाजी पडला असतानाच कलीम
 वेटरनं त्याची तंद्री मोडली. 
साब, क्या चाहिए. स्पेशल चाय, मसालेवाली चाय या फिर गोल्डन
संभाजीकडून ऑर्डर दिली जाण्याचा प्रसंग विरळाच. तरीही कलीम त्यालाच नेहमी 
ऑर्डरबद्दल विचारायचा. 
एक दिवस संभाजी सरकारीसाहेब होणारच, अशी खात्रीही तो द्यायचा. पण ऑर्डर देण्याचे काम प्रशांत
किंवा मंगेशच द्यायचे. आजही प्रशांत म्हणाला,
अरे कलीम तीन दिन बाद आए है. आज धंदाभी अच्छा हुआ है. तो तीन गोल्डन लाओ.
कलीम वळाल्यावर प्रशांत संभाजीकडे रोखून पाहात म्हणाला,
काय हो, सरकारीसाहेब...काही झालं की नाही?
कशाचं?
अहो, तुमच्या नोकरीचं. एवढ्या पेपराला जाहिराती असतात. असा
 माणूस पािहजे, तसा माणूस पाहिजे. तुम्ही तर एवढे हुशार. शिकलेले. तुम्हाला तर लगेच नोकरी मिळाली पाहिजे ना. इतके दिवस तुम्हाला
खाली ठेवणं सरकारला शोभतच नाही. 
ए पश्या, अरे बाबा कुठल्या जगात राहतो. आता सरकारी नोकऱ्याच राहिल्यात कुठं? झिरो 
बजेट सुरू आहे. 
झिरो बजेट. अरे, काही पण असू दे रे. सरकार चालवायसाठी माणसं तर लागत असतीलच ना.
सरकारकडं खूप माणसं झालीत म्हणे. आणि समजा एखादी जागा निघालीच तर पैसा लागतो पैसा. 
पाच - दहा लाख लागतात.  एवढा पैसा कुणाकडं आहे. काय हो सरकारीसाहेब बरोबर ना.
एक सुस्कारा सोडत संभाजी म्हणाला, एकदम खरंय दोस्तांनो. माझ्यासारख्या गरीब माणसाला 
सरकारी नोकरी शक्यच नाही. घरी आई-वडिल आजारी. तीन बहिणी. मी हा असा.
पण तुझ्या वडिलांना तर सरकारी नोकरी आहेच ना.
ती त्यांची आहे ना. ती कशी मला मिळणार.
कलीमनं आणलेल्या गोल्डनचा एक छान घोट घेताच मंगेशचा चेहरा आणखी फुलला. 
फुललेल्या चेहऱ्यानंच तो म्हणाला, कुछ चिंता मत करो. सब अच्छा हो जाएगा. मिळेल आपल्या
 सरकारीसाहेबांना सरकारी नोकरी. माझ्या मामाचा पोरगा होता ना. तो अविनाश नाही का रे.
त्याला कशी नोकरी मिळाली माहितेय का?
संभाजी अन्् प्रशांतनं हो...नाही म्हणण्याच्या आत त्यानं सांगून टाकलं.
अरे, बारावी पास झाल्यावर ना आरोग्य खात्याची एक परीक्षा दिली होती त्यानं. मग कुणीतरी 
त्या परीक्षेविरुद्ध कोर्टात अर्ज करून टाकला. चार-पाच वर्ष वाट पाहून अविनाश थकला. 
आपल्या सरकारीसाहेबासारखीच त्याच्याही घरची स्थिती. मामा मरायलाच टेकला होता. 
एक दिवस त्याला म्हणाला, नोकरी मिळत नसलं तर जा. जाऊन मर कुठेतरी. तर हा खरंच जीव 
देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला. तेवढ्यात त्याचा एक पानटपरीवाला मित्र धावत-धावतच
 रेल्वे स्टेशनवर आला. त्यानं एक पत्र त्याच्या हातात दिलं. ते वाचून हा स्टेशनावरच नाचू लागला. 
त्या पत्रात ना ताबडतोब नोकरीला या, असं म्हटलं होतं. एक रुपयाही खर्च झाला नाही त्याचा. 
आता चंद्रपूरला असतो. छान बायको केलीय. दोन पोरं आहेत. तसंच एक दिवस
 आपल्या सरकारीसाहेबांचंही होईल. 
मंग्या, तुझ्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पण मी इतक्या परीक्षा दिल्यात कुठूनही रिस्पॉन्स नाही. 
खासगी कंपन्यांमध्येही मला पाहिजे तसं कामच मिळत नाही. 
धीर धरा साहेब. होईल. होईल. तुझ्या वडिलांसारखी नाहीतर तुझ्या वडिलांचीच नोकरी मिळेल.
संभाजीनं पुन्हा एकदा सुस्कारा सोडला. सुसाट निघालेली रेल्वे आणि रुळावर आपण पडलेलो 
असंही दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून गेले. तो पुन्हा चिंतामग्न झाला. ते पाहून प्रशांत मैफल मोडण्याचं ठरवलं.
चला, खुद्दूस आठवण करतोय, असे म्हणत त्यानं जागा सोडली. तसा मंगेशही निघाला.
त्याच्या पाठोपाठ संभाजीही.

-- ३ --

आओ, आओ तिकडीबाज
खुद्दूसनं त्याच्या खास शैलीत स्वागत केलं. मग पानाची पिंक अचूकपणे टपरीच्या बाहेर टाकत 
तो म्हणाला,
क्या बात है. संभाजीसाब खूपच नाराज दिसतायत. आज सिगारेट पिण्याचा मूड नाही का?
संभाजीनं काही बोलण्याच्या आतच प्रशांतनं खुद्दूसला नजरेनंच शांत राहण्याचा इशारा केला. 
पण खुद्दूस ऐकण्याच्या तयारीत नव्हता. सिगारेटचं पाकिट काऊंटरवर ठेवत त्यानं बोलणं सुरूच ठेवला 
संभाजीसाहेब, नोकरीचा नाद सोडा. काहीतरी कामधंदा शोधा. बघा, मी पण बारावी झालो. 
गावातल्या कॉमर्स कॉलेजला अॅडमिशनपण झालं होतं. पण घरची गरिबी होती. बारदानाही भला मोठा. 
अब्बा सरकारी गेस्ट हाऊसवर खानसामा. त्याच्या पगारात कातही होत नव्हता. 
मग तो म्हणाला, जा तू शैरात. खय्युमचाचू तुला काहीतरी कामधंदा देतील. नोकरी तर मिळंलच. 
मग काय आलो इथं. तर कशाची नोकरी अन्् कशाचं काय. 
मुसलमानायला कोन फटकू पन देत  नाईत. 
गब्बर मुसलमान तर लईच कानकून करतेत. मग काय घेतली जागा बशीरसेठकडून 
अन्् टाकली टपरी. खुद्दूसची एक्सप्रेस थांबल्याचे पाहून मंगेशनं सिगारेट संभाजीकडं 
सरकवली.  संभाजीला एकदम हुरूप आला. त्याने दणादण दोन कश घेत त्याचा धूर हवेत भिरकावून दिला. 
प्रशांतची दुसरी सिगारेट सुरू झाली होती. त्यानं वीस रुपयांची नोट ठेल्यावर टेकवत खुद्दूसला विचारलं,
आता, घरचे सगळे मजेत ना?
फिर क्या. मैं यहाँ महिने कू कमसे कम एक हजार रुपये भेजताच. आता घरी अब्बा नाही. 
फक्त आई, दोन बहिणी आहेत.
का? 
मी इकडं आलो अन्् अब्बा गुजरले. त्यांची नोकरी धाकट्या भावाला मिळाली. 
पण तुम्हाला सांगतो जमाना लईच बेकार. अनुकंपा का काय तेचात सलीमला नोकरी मिळाली 
अब्बाच्या जागेवर. दोन महिन्यातच मालेगावची छान पोरगीही मिळाली.
 निकाह होऊन सहा महिने झाले की लगेच कुरकुर सुरू केली त्याच्या बायकोनं. झाला वेगळा.
 आता अम्मा दोन-तीन घरचे कामं करती. मी इकडून जमा उतना भेचताच.  
आता बहिणीच्या निकाहची तयारी सुरू आहे.
त्यात भावाची काही मदत?
आँ. अरे पलटके देखताच नई. नशिब त्याचं त्याला अब्बाच्या जागेची नोकरी मिळाली. 
मग तु का नाही केला प्रयत्न?
अरे, जाने दो जी. हो गया वो हो गया. उसका पेट भर रहा ना. अब ये देखो सरकारकी कमाल.
असं म्हणत त्यानं एका वर्तमानपत्राचं एक पान पुढं सरकवलं.
हे काय आहे, प्रशातनं विचारलं. त्यावर खुद्दूस म्हणाला
वाचा की, सरकार म्हणतंय आता जे लोक सरकारी नोकरीत हायेत. त्यांच्या नोकरीचा काळ अजून
 वाढविलाय. म्हणजे जे आता दोन महिन्यांनी रिटायर 
होतील त्यांना आणखी दोन वर्षे काम करता येईल.
अरे व्वा. चांगलंच आहे की. 
काय चांगलंय रे. म्हाताऱ्यांकडून काम होत नाही. तरीही त्यांना काम करायला लावायचं आणि
 जी पोरं कामासाठी धडपडतायत त्यांचं काय? प्रशांतनं त्याचा मुद्दा मांडताना काय हो सरकारी 
साहेब, अशी विचारणा केली. पण संभाजीचं फारसं लक्ष नव्हतं.
काय, काय झालंय?
अहो, साहेब सरकारी नोकरीचं वय वाढवलंय.
म्हणजे
रिटायरमेंट साठ वर्षावर करणारंय सरकार एक-दोन दिवसांत.
आँ...कोण म्हणतंय असं?
खुद्दूस. म्हणजे खुद्दूसनं पेपरमध्ये बातमी वाचलीय. तुम्ही पण वाचा. 
संभाजीनं घाईघाईत पेपर ओढून घेतला. झरझर बातमीवर नजर टाकली. आणि तो आणखीनच 
अस्वस्थ झाला. थोटकापर्यंत सिगारेट ओढण्याची नेहमीची सवय बाजूला ठेवत त्याने ती प्रशांतच्या
 हातात सरकवली. बराच काळ शांतता पसरली होती. सरकारीसाहेबाला नेमकं 
काय झालं ते कुणालाही कळेना. ओ सरकारीसाहेब, काहीतरी बोला राव, असं 
खुद्दूस म्हणेपर्यंत संभाजीनं रस्ता ओलांडला होता.

-- ४ --

वाड्याजवळ तो पोहोचला तेव्हा चांगलेच अंधारून आले होते. जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट उडू लागले होते.
 थोड्याच वेळात जोरदार पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली होती. माळवदावर ठेवलेली 
पुस्तके भिजून गोळे होण्याच्या शंकेने तो धावतच आत शिरला. आणि माळवदावर जाण्यासाठी 
जिन्याकडे वळला. तेवढ्यात शरयू धावत धावतच आली.
दादा, कुठे होतास तु इतका वेळ? दुपारपासून आम्ही तुझी वाट पाहतोय.
का काय झालं.? 
अरे, अण्णांची तब्येत खूपच बिघडलीय. डोळे सारखे पांढरे करतायत. श्वासही घेता येत नाहीये त्यांना.
अरे, मग कुणाला तरी पाठवायचं ना मला बोलवायला. आणि डॉक्टरांना घेऊन यायचे ना?
ते पाटकर डॉक्टर नाही म्हटले यायचे. मागचे १३०० रुपयांचे बिल बाकी आहे म्हटले ते.
च्या मायला या डॉक्टरांच्या. मग दुसरा कुणी नव्हता का?
आहेत. आले आहेत डॉक्टर. मी, आई, कुमूद तिघेही गेलो होतो त्या पाटकरांकडे. त्यांच्या 
हाता पाया पडून आणलं त्यांना. आताच आलेत ते. तू चल पटकन आत.
संभाजी धावतच आत शिरला. 
काय झालंय? सकाळी तर सगळं ठीक होतं ?
डॉक्टर पाटकरांनी त्याच्याकडे रोखून पाहत तुम्ही जरा शांत रहा. पेशंट
 सिरीअस आहे, असं सांगितलं. तेव्हा संभाजीचा चेहरा आणखीनच काळवंडला. 
तो अण्णांजवळ गेला. त्यांच्याकडे निरखून पाहू लागला. तर त्यांच्या पायाला जोरदार झटके सुरू होते.
 श्वास घेताना छाती भात्यासारखी फुलत होती. 
आईनं पदराचा बोळा तोंडात कोंबला होता. शरयू, कुमुदचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते. 
वाड्यात बाजूला राहणारे काळे काका, ताई मावशी, गणेशराव, 
त्यांची पोरं दरवाजापाशी येऊन थांबली होती.
डॉक्टर, काहीतरी करा ना...
पाटकरांनी डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर सरकवत थंडपणे बॅगमधून लेटरहेड काढले. 
अन् ते तेवढ्याच थंडपणे म्हणाले,
खूप मोठा अॅटॅक आहे. लंग्ज जवळपास डॅमेज झाले आहे. तरीही मी माझ्यापरीने प्रयत्न करतो. 
या काही गोळ्या आहेत. ताबडतोब घेऊन या.
अं...काय...
गोळ्या...गोळ्या घेऊन या...थोडासा फरक पडेल त्याने आणि सलाईनची बाटली घेऊन या.
संभाजीच्या पोटात गोळाच आला. त्यानं धीर एकवटत आईला विचारलं
तुझ्याकडं काही पैसे आहेत का?
आई तटतटून उठली. आतल्या बाजूला जाऊन तिनं डब्यांची उलथापालथ केली. तीनशे रुपये घेऊन
संभाजीच्या हातात देत ती म्हणाली,
जा आता पटकन. फार उशिर नको करूस.
पाटकर पटकन म्हणाले, अहो, तीनशे रुपयांनी काय होणार किमान दीड हजार रुपये लागतील.
डॉक्टर एवढे पैसे नाहीयेत हो आमच्याकडं.
काही काळ खोलीत काळसर शांतता पसरली. ती पाहून काळेकाका आत आले. संभाजीच्या 
हातात एक पाचशेच्या तीन नोटा कोंबत म्हणाले,
राहू दे. नंतर दे. तुला नोकरी लागल्यावर.
संभाजी त्यांच्याकडं पाहतच राहिला. गणेशरावांनी त्याला हाताला ओढतच खोलीबाहेर काढलं.
वेळ घालवू नको. बापाला वाचवायचं आहे की नाही? 
संभाजी धावतच वाड्याबाहेर पडला. पायात चप्पल सरकवायचंही भान त्याला राहिला नाही. 

-- ५--
पावसाचा जोरदार मारा सुरू झाला होता. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते.
 त्यातून वाट काढणं मुश्किल जात होतं. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती. अण्णांचा गलितगात्र, 
अखेरच्या घटका मोजणारा, आईचा गलबललेला चेहरा समोर येत होता. आपण दुपारीच घरी आलो 
असतो तर कदाचित...असाही विचार मनात आला. त्यापाठोपाठ त्याला खुद्दूसचं बोलणं कानावर पडलं. 
त्यानं पुढं सरकवलेलं वर्तमानपत्र डोळ्यासमोर आलं. सरकारी नोकरदारांच्या नोकरीला
 मुदतवाढीची बातमी मोठ मोठ्या अक्षरात दिसू लागली. 
आणखी दोन वर्षे अण्णांची नोकरी...
आणखी दोन वर्षे अण्णांची नोकरी...
पाण्याच्या लोटातून मार्ग काढणारी त्याची पावलं मंदावली. काही क्षणात तर ती थबकलीच. 
समोर दिसत असलेल्या मेडिकल स्टोअरकडे पाहत पाहत तो डावीकडं वळाला. 
पावलांचा वेग त्यानं वाढवला तसा पावसाचा जोरही अचानक कमी झाला. 
चालत चालत तो संजूच्या गजानन पान सेंटरपाशी येऊन थबकला. तर  संजू टपरी बंद करून निघतच होता.
काय, एवढ्या पावसात इकडं कशी चक्कर केली. 
आलो असाच.
घरी सगळं बरं आहे ना?
हो...एकदम मजेत आहे सगळे. आणि लवकरच सगळं मजेत होणार आहे?
संजूला काही कळालंच नाही. त्यानं विचारलं 
म्हणजे काय म्हणता संभाजीराव...कसं  काय सगळं मजेत होणार? भविष्य सांगताय की काय?
हो...हो...तेच तर सांगतोय. चल, आधी दोन सिगारेट  दे.
दोन?
होय...दोन...एकदम भारी ब्रँडच्या. हे घे शंभराची नोट. मागचे तीस रुपये पण कापून घे.
आश्चर्यचकित होत संजूनं दोन सिगारेटी काढल्या.
त्यातील एक खिशात टाकत संभाजीनं दुसरी पेटवली.
आणि
धुराचे ढीगच्या ढग तो वरती फेकू लागला. त्यात त्याला अण्णांचा निष्प्राण चेहरा,
 घरातील रडारड स्पष्ट दिसू लागली. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान उमटू लागले होते.


मूळ उर्दू कथा - सलिम अहेमद (९३७०३६२९७१)
अनुवाद - श्रीकांत सराफ (९८८१३००८२१)




No comments:

Post a Comment