Thursday 8 June 2017

कलारंग : तरुण कलाप्रेमींचा आश्वासक प्रारंभ

औरंगाबादमध्ये सातत्याने ताज्या दमाचे नाट्य, संगीत, चित्र, नृत्य कलावंत तयार होणे सुरूच असते. पण त्यातील बहुतांश जण थोडेसे नावारूपाला येताच मुंबई, पुण्यात निघून जातात. तेथे नाव कमावतात. त्यात गैर असे काहीच नाही. पण यामुळे औरंगाबादमध्ये नाट्य चळवळ गतिमान राहत नाही. सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग होत नाहीत. ही कमतरता भरून काढण्यासाठी ‘कलारंग’ संस्थेची स्थापना पार्थ बावस्कर, हृषिकेश दौड, रसिक वाढोणकर, 
सारिका कुलकर्णी, अथर्व बुद्रुककर, अभिजित जोशी, निकिता जेहूरकर, सलोनी पाटील आणि त्यांचे सहकारी विनोद सिनकर, शेखर कातनेश्वरकर, विलास कुलकर्णी, शिवानी खांबेटे, सोहम खांबेटे, अभिजित कुलकर्णी, ऐश्वर्या नाईक, सुधीर कोर्टीकर यांनी केली. त्यांना प्रख्यात बाल नाट्य लेखक आणि गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील रंगभूमीवर निष्ठेने काम करणारे सूर्यकांत सराफ यांचे पाठबळ लाभले. सांस्कृतिक विषयांवर चर्चेच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या तरुणाईला त्यांनी दिशा दिली. केवळ चर्चेपेक्षा काही प्रयोग केले पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. आणि तो ‘जनक’ दीर्घांकाचे सादरीकरण, नाट्य-चित्रपट, मालिकांत अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण कलावंतांचा सत्कार करून प्रत्यक्षातही आणला. त्यामुळे रविवारी तापडिया नाट्य मंदिरात कलारंगचा पहिला प्रयत्न चांगली सुरुवात असा वाटला. भारत-पाक क्रिकेट लढत असूनही नाट्यमंदिर हाऊसफुल्ल झाले होते, यातच सारे काही आले.
सध्या मुंबईच्या कलाप्रांतात नाव कमावत असलेल्या मूळ औरंगाबादकरांचा कलारंगने या सोहळ्यात परिचय करून दिला. त्यातील आघाडीचे नाव शार्दूल सराफचे. बालपणापासून कलेचा संस्कार झालेल्या शार्दूलने दूर्वा, पसंत आहे मुलगी, कमला, लव्ह-लग्न-लोचा या मालिकांचे पटकथा लेखन केले आहे. आमिर खानच्या पाणी फाउंडेशनची निर्मिती असलेल्या ‘तुफान आलंया’ या मालिकेचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. वळू, सलाम, कॅरी ऑन पांडू चित्रपटाचा तो सहायक दिग्दर्शक आहे. कलारंगच्या कार्यक्रमात त्याने लिहून दिग्दर्शित केलेल्या जनक दीर्घांकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लंडन येथील रॉयल कोर्ट रायटर्स ब्लॉग संस्थेतर्फे मुंबईत लेखकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात ‘जनक’ची निवड झाली होती. या दीर्घांकात त्याने मांडलेला विषय त्याच्यातील संवेदनशील आणि सृजनशील कलावंताची साक्ष देतो. अनिल रसाळ हादेखील आश्वासक अभिनेता. दृश्यम, वीरप्पन, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांत आणि लेकुरे उदंड झाली, झोपी गेलेले जागे झाले अशा नाटकांत तो चमकला आहे. याशिवाय अंकुश काणे (अस्मिता, शौर्य मालिका, सलाम, गुरू, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा चित्रपट), आनंद पाटील (असे हे कन्यादान, दिल दोस्ती दुनियादारी मालिका, चि. चि. सौ. कां. चित्रपट, अपवाद, ब्लूज, नियम नाटक), आरती मोरे (चि. चि. सौ. कां, बाबांची शाळा, कापूस कोंड्याची गोष्ट चित्रपट, पुढचं पाऊल, पसंत आहे मुलगी, जय मल्हार, स्वप्नांच्या पलीकडे मालिका), अपर्णा गोखले (मन में है विश्वास हिंदी मालिका, जवानी जानेमन आगामी चित्रपट), प्रणव बडवे (ए. आर. रहेमान यांच्या संस्थेत प्रशिक्षण, सध्या डिस्कव्हरी चॅनेलवरील दिग्दर्शक नारायण देव दिग्दर्शित हिंदी चित्रपटाच्या गाण्याची निर्मिती करत आहे.) हे कलावंतही प्रतिभावान आहेत. या सर्वांना आणखी बरीच मजल मारायची आहे. पाय जमिनीवर ठेवले आणि प्रामाणिकपणे काम करत राहिले तर ते निश्चितच उत्तुंग शिखरावर पोहोचतील. याविषयी शंका नाही.
आधीच म्हटल्याप्रमाणे औरंगाबादेत सातत्याने नाट्य, संगीत, नृत्यप्रेमी एकत्र येतात. ग्रुप स्थापन करून काही प्रयोग करतात आणि पुढे आपापल्या वाटेने औरंगाबादबाहेर पडतात. १९७५ ते १९९० काळातील नाट्यरंग, जाणिवा, जिगिषा, रंगकर्मी अशा काही ग्रुप्सचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. नाट्यरंगने राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धेत ठसा उमटवला. जाणिवाने एकांकिका स्पर्धांचे अप्रतिम आयोजन केले. जिगिषाने मुंबईकरांना दखल घेण्यास भाग पाडले, तर त्या काळी रंगकर्मीचे सदस्य असलेले मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, नंदू काळे आदी सध्या चित्रपट, नाट्य, मालिकांमध्ये उंचीवर पोहोचले आहेत. परंतु, या सर्व संस्थांमध्ये कलावंत होते. त्यांना औरंगाबादेत प्रायोगिक नाट्य चळवळ चालवणे शक्य झाले नाही. मात्र, कलारंग येथे प्रयोगांच्या आयोजनासाठी निर्माण झालेली संस्था आहे. म्हणून ती अधिक महत्त्वाची आहे. िवशेष म्हणजे या संस्थेने व्यावसायिकतेची गरज अचूक ओळखली आहे. नाट्य प्रयोग करणे खर्चिक बाब आहे. अनेक संस्था पैशाअभावी बंद पडतात, हे लक्षात घेऊन कलारंगने प्रायोजकही मिळवले. ही बाब नव्या पिढीतील दूरदृष्टी दाखवून देते. शिवाय पहिल्या टप्प्यात त्यांनी डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड, प्रा. छाया महाजन, प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, अनिल भालेराव, विश्वनाथ ओक, श्रीकांत उमरीकर, डॉ. आनंद निकाळजे, संदीप सोनार अशी दिग्गज मंडळी जोडली आहेत. त्यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि कलारंगच्या सदस्यांनी ते खरेच अमलात आणले तर यापुढील काळात सरस सांस्कृतिक उपक्रम पाहण्यास मिळतील, अशी अपेक्षा आहे. 

No comments:

Post a Comment