Wednesday 22 July 2015

बोंबल्या मारुती

समीर : आमच्या बापजाद्यांना कोण हिंगलत होतं? त्यांना देवळातपण येऊ देत नव्हते.  आमची पोरं चांगली शाळा शिकतील, नोकरी करतील. आणि त्यांच्या बापाला जाळायला नेतानी तर त्यांना कोणी विचारणार न्हाई. रस्ते चकचकीत झाले की सुसाट गाड्या धावतील. मग चिखल न्हाई. पावसाचा त्रास न्हाई. कुणाला खांदे द्येयला नकोत. लाल दिव्याच्या अँब्युलन्स आरामात नेऊन पोहोचवतील मला. बघ मला दिसतंय. ते बघ माझी मुलं. छान-छान इंग्रजी बोलतायत. कुणी काही विचारणार नाही त्यांना. अन् हां, वाटेत देवाला पण नेलं मला. कोणी म्हटलं न्हाई हा तुमच्या समाजाचा देव हाय का म्हणून? कशाला म्हणतील आता. बघितलंस का माझ्या पोरांनी कसे चकचकीत कपडे घातलेत. त्यांनी लावलेल्या परफ्युमच्या वासातच गार पडलाय तिथला पुजारी.


विलास : मला सारखं वाटतं दूरवर पसरलेल्या काळ्याभोर जमिनीवर मी छोटी-छोटी रोपं लावत चाललोय मी. मिळेल त्या जागेत रोपं लागतायत. क्षणभर मला वाटतं की रोपं वाढतायत. पण क्षणभरासाठीच.  दुसऱ्या क्षणी लक्षात येतं की आपल्या मागं झप, झप, झप कुणीतरी येतंय आणि वाढणारी रोपं कापून टाकतंय. आता  वेग वाढतोय. सपासप, सपासप. त्यासरशी मी धावतोय. कापतायत ते सपासप. मी जातो तिथं तर कुणीच दिसत नाही. भयानक दमतो मी आता. धापा टाकतो. रोपं जातात. डांबरी चकाचक रस्ते वर येतात. ब्रिज तयार होतात. खटाखट. मशिनसारखे. आणि त्यावरनं सावकाशपणे चढतात हत्ती. पांढरे शुभ्र. बघ ते हत्ती इकडे येतायत. दिसतायत तुला? मला तर त्यांचे चकाकणारे सुळे आणि त्यांची लोंबणारी सोंड दिसतेय.

पु्ण्यातील नाट्य लेखक आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक आशुतोष पोतदार यांनी लिहिलेल्या पुलाखालचा बोंबल्या मारुती या नाटकातील दोन व्यक्तीरेखांच्या भूमिका उपरोक्त संवादातून स्पष्ट होतात. आणि जमिनीशी नाते असलेल्या, जमिनीत खोलवर पाळेमुळे रुतलेल्यांना नव्या भूसंपादन कायद्याबद्दल काय वाटते, हेही लक्षात येते. मात्र, पुलाखालचा बोंबल्या मारुती केवळ भूसंपादनाविषयी बोलत नाही. तर तो देशीवाद, गावाची संस्कृती, धार्मिक परंपरा, गावांमधील जातीय तणाव आणि विकासाचा जातीपातींवर होणारा परिणाम याबद्दलही कधी तिखट, टोकदार तर कधी वळसे घेत भाष्य करतो. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगयात्रा उपक्रमात रविवारी बोंबल्या मारुतीचे धीरगंभीर नाट्य अभिवाचन झाले. त्यात एका सामाजिक, धगधगत्या विषयाची कलावंतांच्या दृष्टीकोनातून केलेली मांडणी प्रामाणिक वाटली.

प्रामाणिक यासाठी की बहुतांश भारतीय माणसे दांभिकतेच्या चिमटीत अडकलेली आहेत.  विकास झालाच पाहिजे. गावांपर्यंत रस्ते पोहोचले पाहिजे. गावातील माणसाला कारखान्यात रोजगार मिळालाच पाहिजे. शेतकरी सुखी झालाच पाहिजे. मुलांना इंग्रजी शिक्षण मिळालेच पाहिजे. असे एकीकडे सर्वांसमोर ओरडून सांगणारी माणसे खासगीत आमचे मत वेगळे आहे हां, असे म्हणतात. स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी निरनिराळे बुरखे ओढून जगतात. ठोस भूमिका घेण्याची वेळ येताच पळ काढतात. काही समाज सुधारणावदी, नाट्य लेखक, कादंबरीकार, नामवंत कवीही  असेच दांभिकतेच्या कोशात असतात. त्या पार्श्वभूमीवर पोतदार यांचे लेखन अतिशय प्रामाणिक आहे. शहरातील माणसे वाईट, मातीपासून नाळ तुटलेली. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहितच नाही. शेत जमिनीवर बुलडोझर फिरवून विकास झाला पाहिजे, असे वाटणारी असतात. दुसरीकडे खेडेगावातील माणसे कमालीची प्रामाणिक. विकासाला विरोध करणारी. जाती-पाती टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारी, असे दोन समज तयार केले आहेत. वस्तुत: शहरी माणसालाही गावांचे पर्यावरण, अर्थकारण टिकून ठेवत विकास झाला पाहिजे, असे वाटत असते आणि गावातील लोकांनाही शहरांसारखा आपलाही विकास झाला पाहिजे. आपल्या गावाजवळून चांगला रस्ता गेला पाहिजे, असे वाटत असते. पोतदार यांनी या दोन्ही बाजू रसिकांसमोर ठेवल्या आहेत. त्यात त्यांनी कोणाचीही बाजू घेतली नाही. किंवा त्यासाठी आकांडतांडवही रचलेले नाही. हेच बोंबल्या मारुतीचे शक्तीस्थान आहे. प्रत्येक प्रसंगात सादरीकरणाची किंवा नेमका आशय पोहोचवण्याच्या दोन-तीन शक्यता त्यांनी खुल्या ठेवल्या आहेत. तेवढे स्वातंत्ऱ्य दिग्दर्शक, कलावंतांना दिले आहे. सामाजिक च‌ळवळीचा जवळून अभ्यास केल्याने त्यांच्यात ही प्रगल्भता आली आहे. शिवाय भारतीय माणसाची दांभिकता किंवा सोयीनुसार मते बदलण्याची मानसिकता पक्की ठाऊक झाल्यामुळेही त्यांनी तसे केले असाव े. यामुळे नाटक चर्चात्मक होते.

एकाचवेळी दहा-पंधरा व्यक्तीरेखांमधून अनेक विषय पटलावर मांडणारी ही संहिता अभिवाचनातून जिवंत करण्याचे काम पद्मनाभ पाठक यांच्या दिग्दर्शनाखाली प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. किशोर िशरसाट, सुजाता पाठक, निकिता मांजरमकर, आकाश  थोरात, विकी वाघमारे यांनी ताकदीने केले. आशुतोष त्यांनी सादरीकरणासाठी निवडलेला  फॉर्मही प्रायोगिकतेच्या अंगाने जाणारा. त्यामुळे पद््मनाभ यांनी नाट्य वाचनात त्यात जिवंतपणा येईल, यावर भरपूर मेहनत केली होती. आवाजातून प्रत्येक व्यक्तिरेखा आणि तिच्या संवादामागे लपलेले व्यक्तिमत्व उघड होईल, यावर भर दिला होता. रंगमंचीय सादरीकरण करताना त्यात त्यांना आणखी काही नव्या जागा सापडतील. मराठवाड्यातील कलावंत मंडळी आमचे जमिनीशी नाते आहे, असे सांगतात आणि विकासाचे वारे मराठवाड्यात वाहत नसल्याचीही ओरड करतात. अशा दोन्ही प्रकारच्या कलावंतांसाठी बोंबल्या मारुती म्हटले तर संधी आणि म्हटले तर आव्हान आहे. हे आव्हान ते पेलतात की नाही, हे लवकरच कळेल. पोतदार यांनी मांडलेला विषय तेवढ्याच ताकदीने रंगमंचावर आला तर प्रदीर्घ काळानंतर एका सामाजिक प्रश्नाला हात घालणारे नाटक पाहण्याचा आणि त्यानिमित्ताने भूसंपादन कायद्यामुळे होऊ घातलेल्या सामाजिक बदलांवर आणखी चर्चा होऊ शकेल. किमान अशी चर्चा घडवून आणण्याची संधी पद्मनाभ आणि त्यांचे सहकारी दवडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.



No comments:

Post a Comment