Friday 31 July 2015

उथळ आंदोलनाचे उड्डाण अन् महामंडळाचे ‘दिवे’

दिव्य मराठी भूमिका

---
वर्दळीच्या जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलावर बुधवारी अंधारलेल्या सायंकाळी अपघात झाला. एका भरधाव कारने धडक दिल्याने दांपत्य जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणताही अपघात झाला की त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर पोलिस शोधतील. अर्थात सर्वच दोषी सापडतील, असेही नाही. कारण अपघातात काहीजण छुपे दोषी असतात. त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडता येत नाही. तरीही त्यांच्यावरील जबाबदारी कमी होत नाही. कालच्या घटनेत मोंढा नाका उड्डाणपुलावरील अपघातास  उथळ आंदोलन आणि महामंडळाचे दिवे  छुपे दोषी असल्याचे दिसते. शहरातील इतर सर्व उड्डाणपूल प्रदीर्घ काळापासून रखडले असताना मोंढा चौकातील पूल त्या तुलनेत लवकर पूर्ण झाला. लोकांच्या उपयोगासाठी बांधलेला पूल तत्काळ खुला करणे हे महामंडळाचे कर्तव्य होते. मात्र, कोणत्याही विकास कामाला राजकारण्यांचा हात लागलाच पाहिजे, या दुराग्रहापोटी उद्घाटनाचे मुहूर्त लांबवण्यात आले. काही सामाजिक  संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर २५ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, ऐनवेळी ते रद्द करण्यात येऊन एक ऑगस्टचा नवा मुहूर्त जाहीर झाला. याचे राजकीय भांडवल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी केले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना न जुमानता त्यांनी पूल खुला करून टाकला. मुबलक प्रसिद्धी मिळवली. दोन वर्षापूर्वी संग्रामनगरचा उड्डाणपूल शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना असाच खुला करून टाकला होता. त्याची राजकीय परतफेड करण्याचे समाधान काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळवले असले तरी मोंढा नाका पुलावर पथदिव्यांचे सोय झालेली नाही. रात्री वाहनचालकांचा जीव धोक्यात पडू शकतो, हा विचार केलाच नाही. या आंदोलनामुळे जागे झालेल्या महामंडळाने पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी पूलावरून ये-जा करणे धोक्याचे असल्याचा इशारा देऊन टाकला. खरेतर  २५ जुलैला उद्घाटनाची पहिली तारीख जाहीर करतानाच त्यांना दिवे लावणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी त्याचे भान पाळले नाही. अजूनही दिवे लागलेलेच नाहीत. एक ऑगस्टचा नवा मुहूर्त माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे रद्द झाला आहे. तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान, दिवे लावू, असे महामंडळाकडून सांगितले जात आहे. म्हणजे महामंडळाचा बेजबाबदारपणा आणि उथळ राजकीय आंदोलनामुळे दांपत्यावर अपघाताचे संकट कोसळले आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि महामंडळाने त्यांना मदत केली तरच त्यांना लोकांच्या दु:खाची जाणिव असल्याचे सिद्ध होईल, हे तमाम औरंगाबादकरांनी लक्षात घ्यावे.







No comments:

Post a Comment