Tuesday 28 July 2015

तोतये सर्वत्रच असतात



पानिपताच्या युद्धात मरण पावलेल्या सदाशिवभाऊंचे तोतये पुण्यात दाखल झाले होते. त्यामुळे पेशवाईत बराच हलकल्लोळ उडाला होता. बऱ्याच तपासणीनंतर ते तोतये असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांना चाबकाच्या फटक्यांनी फोडून काढण्यात आले, अशा ऐतिहासिक नोंदी आहेत. पण तोतये ही काही पेशवेकालीन काळापुरती किंवा सदाशिवभाऊंपुरती मर्यादित घटना नाही.

गेल्या आठवड्यापासून प्रख्यात साहित्यिक, संशोधक आणि आगामी विश्व साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष शेषराव मोरे यांनी लिहिलेले ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे पुस्तक वाचणे सुरू आहे. त्यात इस्लाम धर्माचे संस्थापक, अल्लाचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या कार्यकाळातील अनेक ऐतिहासिक नोंदी संदर्भांसह नोंदवल्या आहेत. त्यातील एक प्रकरण तोतयांचे आहे. त्या काळात म्हणजे पैगंबर कर्तृत्वाच्या ऐनभरात असताना त्यांनाही तोतयांचा सामना करावा लागला होता. त्यातील एका तोतयाने मीच अल्लाचा अखेरचा प्रेषित असल्याचे जाहीर केले होते. कारण त्यानेही तहानलेल्यांना पाणी मिळवून देण्यासाठी  झरा शोधून काढला होता. दुसरा आणि तिसरा तोतयाही अशाच चमत्कारांचा दावा करत होता.  त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश पैगंबरांनी त्यांच्या सेनापतींना दिले होते. त्यातील एक तोतया त्याला धडा शिकवण्यापूर्वीच मरण पावला. उर्वरित दोघांना सेनापतींनी ठार केले.

खरे म्हणजे कोणीही माणूस स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा झाला. उंच शिखरावर पोहोचला की त्याच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक मंडळी अचानक उगवतात. मीच त्याचे जीवन घडवले, असे म्हणू लागतात. तोतये ही अशा मंडळींची पुढील आवृत्ती म्हणावी लागेल. इतरांच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्यांचा बंदोबस्त योग्य वेळी होत असतोच. पण अशी मंडळी आपल्या आजूबाजूला नाही ना, याची वारंवार खात्री करून घेतली पाहिजे. कारण ही मंडळी छुप्या पद्धतीने त्यांचे जाळे विणत असतात. त्यात अडकून पडल्यास आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण हिरावले जातात. मुळात म्हणजे सदाशिवभाऊंच्या तोतयांचा बंदोबस्त करण्यासाठी  पेशव्यांकडे सरदार होते. प्रेषित मोहंमद पैगंबरांकडे सेनापती होते. आपण त्यांच्याएवढे कर्तृत्ववान आणि महान नसलो तरी आपल्यालाही अशा उपटसुंभांचा मानसिक त्रास होत असतोच. तो टाळण्यासाठी आधीच काळजी घेतलेली बरी.

1 comment: