Tuesday, 28 December 2021

लालनांचे रंग

कर्म सर्वात महत्वाचं. कर्मानुसारच फळ निश्चित होतं. पण असंही म्हटलं जातं की, चार-पाच लोकांनी एकसारखंच कर्म केलं तरी त्यांचं फळ त्या प्रत्येकाला एकसारखेच मिळेलच, याची हमी नाही. या हमी नसण्याला नियती, नशिब, योग अशी नावं दिली जातात. अनेक राजकारणी, कलावंतांच्या दुनियेत तर नशिबाला फार महत्व आहे. आता हेच पहा ना. सर रिचर्ड अॅटनबरोंनी १९८१-८२मध्ये जगद्विख्यात गांधी सिनेमात महात्मा गांधींच्या भूमिकेसाठी हॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेते बेन किंग्जले यांची निवड केली. तेव्हा कस्तुरबा कोण होणार, असा प्रश्न होता. अनेकींची नावे चर्चेत होती. संधी मिळाली रोहिणी हट्टंगडींना. आणि त्या जागतिकस्तरावरील अभिनेत्री झाल्या. तसं पाहिलं तर तुलना चुकीची आहे. तरीही तो दोष स्वीकारून असे म्हणावे लागेल की, रोहिणींपेक्षा काकणभर प्रखर, धाडसी, अष्टपैलू असलेल्या लालन कमलाकर सारंग मराठी रंगभूमीवरच मर्यादित राहिल्या. अर्थात त्यामुळे त्यांचे अभिनेत्री म्हणून महत्व मुळीच कमी होत नाही. जेव्हा कधी मराठी रंगभूमीवरील अभिनेत्रींचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाईल. तेव्हा त्यात लालन यांचे नाव पहिल्या पाच जणींमध्ये घ्यावे लागेल. २००६मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान मिळाले. तरीही त्यांच्यावर मराठी रसिकांकडून किंचित का होईना अन्याय झाला, अशी रुखरुख डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेले त्यांचे ‘जगले जशी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचताना वाटत राहते. अर्थात हा दोष त्या ज्या काळात बहरात होता. त्या काळालाही द्यावा लागेल. कारण त्या वेळी खासगी मनोरंजन वाहिन्या, सोशल मिडिआ नव्हता. त्यामुळे रंगभूमी आणि अत्यल्प विस्तार असलेले दूरदर्शन एवढीच माध्यमे होती. २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यातील पैंगणकर कुटुंबात त्या जन्मल्या. सहसा मुलींना मिळत नसलेले लालन हे नाव त्यांच्या वडिलांनी एका कादंबरीतील बैरागिणीच्या नावावरून दिले. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई-वडिल अशा मध्यमवर्गीय पैंगणकरांच्या कुटुंबात दोन्ही बाजूंनी अभिनयाचा वारसा नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी करायची. आई-वडिल म्हणतील त्याच्याशी संसार थाटायचा. मुला-बाळांमध्ये रममाण व्हायचं, एवढंच लालन यांचं स्वप्न होतं. पण नशिब नशिब म्हणतात ते काय याचा अनुभव त्यांना आला. बीएचे शिक्षण घेत असताना मुंबईतील आयएनटी एकांकिका स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. चेहऱ्यावर पहिल्यांदा रंग लावला आणि त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. कमलाकर सारंग या अवलिया दिग्दर्शक, अभिनेत्यासोबत संसार करत तो दीर्घकाळ चालला आणि ९ नोव्हेंबर २०१८ रोजी थांबली. मधल्या प्रवास काळात त्यांनी रंगभूमी अक्षरश: दणाणून टाकली. मुंबईचा मराठी साहित्य संघ आणि अत्रे थिएटर्सच्या नाटकांतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया, मोरुची मावशीमध्ये त्यांनी हलक्याफुलक्या भूमिका केल्या. पण एक सशक्त, बंडखोर, बोल्ड अभिनेत्री अशी त्यांची ओळख झाली विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरमुळे. त्या काळात म्हणजे १९७२मध्ये त्यांनी ‘बाईंडर’मधील चंपा साकारली. तेंडुलकरांना अपेक्षित असलेल्या चंपाचे अंतरंग त्यांनी दाखवून दिले. रंगभूमीवरील त्या काळच्या महिलेच्या प्रतिमेला प्रचंड धक्के देणाऱ्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक जागा त्यांनी इतक्या सहजपणे आविष्कृत केल्या होत्या की खलनायिकासम भूमिका असूनही त्या प्रेक्षकांना थक्क करत. गिधाडे कमला या तेंडुलकरांच्या महाकाय नाट्यकृतीतील भूमिकाही लालन यांनी गाजवल्या. ‘जगले जशी’ या आत्मकथनात लालन यांनी छोट्या-मोठ्या घटनांतून जीवन प्रवास नोंदवला आहे. पण तो केवळ त्यांच्यापुरता प्रवास नाही. तर त्या काळात मराठी रंगभूमीवर काय घडत होतं, हे सांगणारा पटही आहे. यात अर्थातच सखाराम बाईंडर अग्रस्थानी आहे. हे नाटक लालन यांचे पती कमलाकर यांनी दिग्दर्शित केलं. स्त्री - पुरुष संबंधांचा एक वेगळाच चेहरा दाखवणाऱ्या सखारामनं मराठी मध्यमवर्गात वादळ निर्माण केलं. मराठी माणूस, मराठी संस्कृतीविषयी आक्रमक असलेल्या शिवसेनेने या नाटकाला कडाडून विरोध केला. तो हिंसक विरोध अंगावर घेत कमलाकर यांनी प्रयोग केले. कारण लालन यांचा भक्कम पाठिंबा होता. पण ते सारं कसं घडत गेलं, याची रोचक माहिती जगले जशीमध्ये आहेच. शिवाय अभिनेत्री, माणूस म्हणून त्या कशा खंबीर, प्रगल्भ, संवेदनशील, परिपक्व होत गेल्या. अभियनापलिकडील जीवन कसे शोधत गेल्या, हेही उलगडत जाते. त्यामुळे हे पुस्तक केवळ आत्मकथन नाही. तर खरंच अभिनेत्री होऊ इच्छिणाऱ्या आणि वादळाशी लढण्याची तयारी असणाऱ्यांसाठीही दिशादर्शक आहे.

Monday, 27 December 2021

वानरमाया

जेमतेम हजार उंबऱ्यांचं गाव. टळटळीत दुपार. सगळे बाप्ये एक तर शेतात नाही तर कारखान्यावर. बायका धुणी-भांडी करत होत्या. म्हाताऱ्या-कोताऱ्या ओसरीवर, अंगणात बसून देवाचं नाव घेत होत्या. जख्खड म्हातारे पांघरुणात गपगार होते. धरणाच्या पाण्याकडून सुटलेला वारा सोडला तर गावात तसा शुकशुकाट होता. कोरोनामुळं शाळा बंदच होती. पाखरं फांद्यांना बिलगली होती. कुत्री झाडांखाली, गटाराजवळ, भितींना चिटकून पडली होती. आणि अचानक चिर्र…चिर्र … हुप्प …हुप्प असा बुभुत्कार झाला. तशी गल्ल्यांमध्ये चिरखा-पाणी, धप्पाकुटी, लपाछपीत रंगलेली पोरं थबकली. कशाचा आवाज झाला म्हणून कानोसा घेऊन पुन्हा खेळू लागली. अन् पुन्हा तसंच झालं. आता आवाज चांगलाच वाढला होता. शहराच्या शाळेत दोन वर्ग शिकून गावात आलेला उंचापुरा चिंतामणी टाचा उंचावून म्हणाला, ‘अरे … वान्नेर, वान्नेर. ते पाहा तिकडं.’ त्याच्यापेक्षा अपरी असलेली पोरं तो ज्या दिशेनं बघत होता तिकडं पळाली. चिंतामणीही गेला आणि सगळ्यांसमोर लीडरसारखा उभा राहिला. एका क्षणानं त्याचा आणि साऱ्या पोरांचा श्वासच थांबला. एखादा अवजड ट्रक जावा तसा आवाज झाला. पुरुषभर उंचीचा, काळ्या ठिक्कर तोंडात वीतभर लांबीचे दात विचकत म्हाळ्या वानर शेपूट उंचावून झेपावला. काही पोरं घाबरून मागं सरकली. काही किंचाळून चिंगाट मागं पळाली. आणि पाहू लागली. तीन ढांगातच वानरानं ती छोटीशी गल्ली ओलांडली. अन् गवतात निवांत लोळत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला अलगद उचललं. पोरांना काही कळायच्या आत तितुरे पाटील, भगत मास्तराच्या वाड्यावरून म्हाळ्या महादेव मंदिरामागच्या वडाच्या झाडावर गेलाही. डोळ्यासमोर दिसणारं कुत्र्याचं पिलू असं गायब झालं. वानरानं उचलून नेलं, यावर चिंतामणीचा विश्वासच बसला नाही. तो थरथरू लागला. खोबऱ्याच्या वाटीएवढे डोळे करून आँ … आँ …. असं करू लागला. ते पाहून त्याचे सोबतीही हुडहुडू लागले. दोन दिवसांपूर्वीच त्या कुत्र्याच्या पिल्लाला दगडं मारून बेजार करणाऱ्या श्रीपती, दगडूचं कुत्र्यावरील प्रेम दाटून आलं. त्यांनी ‘माझा रॉबी, माझा रॉबी’ म्हणून गळा काढला. सुंदरानं रॉबीला दगडफेकीतून वाचवलं होतं. घरी नेऊन आईचा डोळा चुकवत दूध, पोळी कुस्करून खाऊ घातली होती. म्हाळ्या वान्नेर पिलाला उचलून गेला, हे लक्षात येताच तिनं गल्लीतच फतकल मारत, ‘मा यो…मा यो … रॉबीला मारलं त्यानं’ असं म्हणत भोकाड पसरलं. तसं अंती, मंजरी, वैशूनंही तिच्या सुरात सूर मिसळला आणि हसती-खेळती गल्ली रडव्यानं भरून गेली. वाड्यामागे मोकळ्या अंगणात कांदे, लसणाचा ढिगारा वाळत घालणाऱ्या अलकाला त्या गलक्यात मंजरीचा आवाज अचूक ओळखू आला. कालपासून लेकीच्या अंगात कसकस होती. नाही म्हटलं तरी खेळायला गेलीच. आता खेळता-खेळता पडली का कोणी मारलं, असं म्हणत अलका तावातावानं गल्लीत आली. ‘काय झालं, कोणं मारलं तुला? कारे रौल्या, का मारलंस तिला. का तिच्या सारखा अंगचटीला जातो. तुझ्या आई-बापाला सांगू का?’ असा एकच भडिमार तिनं केला. त्यामुळं केकाटणारी पोरं शांत होऊन भांबावल्यासारखी तिच्याकडं पाहू लागली. चिडलेल्या अलकानं पुन्हा आवाज चढवला. तेव्हा चिंतामणी धीर एकवटून म्हणाल्या, ‘आत्या … वरडू नको. थोडी गप ऱ्हा.’ ‘आँ माझ्या पोरीला मारतेत बाहेरची पोरं. त्यांना हिसका दाखवायचा तर मलाच गप म्हणतोय का रे?’ अगं कोणी नाई मारलंय मंजरीला. धक्काबी लागला नाय कोनाचा. तु आधी इकडं ये. अन् इथून पाहा. शहाणा दिसणारा हा पोऱ्या घाबऱ्याघुबऱ्या आवाजात काय सांगतोय, असा विचार करून अलका लगबगीनं त्याच्याजवळ आली आणि वडाकडं पाहू लागली. पाहता पाहता तिचे डोळे विस्फारले. जीभ दीड वित बाहेर आली. ‘अग्गो बया.. अग्गो बया … बया बया… काय झालंय हे. असं कसं झालं. त्यानं कसं काय नेलं त्याला.’ असं बडबडू लागली. आता सगळी पोरं तिच्याभोवती दाट गोळा झाली होती. ‘रॉबी … रॉबी’ करत मुसमुसणाऱ्या मंजरीचे डोळे तिनं पदरानं पुसून काढले. नाक स्वच्छ केलं. श्रीपती, दगडूच्या डोक्यावरून हात फिरवला. कोलाहल शांत झाला. पण काही क्षणांसाठीच. सुताराच्या वाड्यातील कडूलिंबावरून दोन म्हाळे अलगद उतरून अगदी माणसासारखे पोरांजवळ उभे राहिले. त्यांची चाहूल लागताच अलकाला भोवळ आली. पोरं पुन्हा चित्कारली. ‘यांना ओरडायला काय झालं बुवा’ असा अवि‌र्भाव करत दोन्ही वान्नेरांनी गल्ली ओलांडली आणि उड्या मारत तेही वडाकडं निघून गेले. अलकानं पोरीला उचललं आणि ती वाड्याच्या आडोश्याला जाऊन उभी राहिली. तर सावरलेला चिंतामणी त्याच्या खास उचापती दोस्तांना म्हणजे रघु, नित्याला घेऊन पुढं सरकला. तसा कुत्र्याच्या पिलाला एका हाताने सांभाळत वान्नेरानं फांदीवरून मुक्काम हलवला. बाकीचे दोन्हीही दिसेनासे झाले. त्यानं चिंतामणी, अलकाचं धैर्य वाढलं. ते वडाच्या दिशेनं चालू लागले. रघु, नित्यानं हळूचकन पाच-सहा दगडं खिशात भरले. चिंतामणी सगळ्यात पुढं होताच. वडापासून सात-आठ पावलांवर तो थबकला. बारकाईनं पाहू लागला. एक - दोन मिनिटात त्याला खात्री पटली. त्यानं तोंडावर बोट ठेवून शांतता राखा, असा इशारा केला. सगळ्यांनी श्वास पोटात धरून ठेवले. सगळीकडं फक्त वाऱ्याचा आवाज होता. मग चिंतामणीनं शाळेतले ड्रिल मास्तर करतात तसे हात उंचावले. एक … दोन … तीन … अशी बोट केली. आणि नित्या, रघुनं अंगात होती नव्हती तेवढी ताकद एकवटून ‘बजरंग बली की जय’ म्हणत दगडं भिरकावली. अलका त्यांच्यावर संतापली होती. पण पोरं ऐकण्यास तयार नव्हती. वान्नेरं चांगलीच उंचावर होती. दगडं त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत. पण पोट्ट्यांच्या आवाजानं ती दचकली. झपाझप उड्या मारत आंब्याच्या, चिंचेच्या डहाळ्यांवर गेली. चिंतामणी आणि कंपनीसाठी हा त्यांच्या आक्रमणाचा पहिला विजय होता. आपल्या दगडांनी वान्नेरं पळाली. आता आणखी वर्षाव केला तर कुत्र्याचं पिल्लू परत मिळणारच, असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. तोपर्यंत गावातील पाच-पन्नास पोरं जमा झाली होती. त्यांनी एकच ओरडा करत दगडांचा मारा सुरू केला. चारही दिशांनी नुसता धुराडा झाला. अन् शेतातून पतरणाऱ्या शंकर टेकाडे, इश्वर स्वामीच्या टेंपोवर चार-पाच दगडं पडली. आधीच कामानं वैतागलेल्या शंकरच्या रागाचा पारा चढला. टेंपोतून खाली उतरून त्यानं कचकचीत शिव्या हासडल्या. त्या ऐकून पोरं जागीच थिजली. त्यांच्या हातातली दगडं घामेजली. पोरांच्या घोळक्यात अलकाला पाहून शंकर म्हणाला, ‘ए, अलके …तु पन काय पोरासारखी ल्हान झालीस का? दोन लेकरांची आई. तुला असं शोभंतं का? चल जा घरी …’ तशी अलका लगलगीनं म्हणाली, ‘तसं नाही दादा. जरा तिकडं पाहा की.’ ‘काय झालंय. चोर आलाय का काय?’ ‘व्हय. पण बाप्या न्हाई. म्हाळ्याय. वान्नेर. कुत्र्याचं पिलू उचलून गेलंय झाडावर.’ ‘आँ … काय सांगतीस?’ आता आश्चर्यचकित होण्याची वेळ शंकरची होती. त्यानं इश्वरला अन् टेंपोत ज्वारीच्या पोत्यांवर पडलेल्या युसूफ, रज्जाकला हाळी दिली. मग हे चौघे, पाच-पन्नास पोरं, अलका वान्नेराला शोधत, दगडं फेकत सुटले. संध्याकाळी मशिदीत अजान झाली. मंदिरात आरतीसाठी घंटा वाजू लागली. तेव्हा कुठे हे दगडफेके भानावर आले. शंकरला दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावाला जायचं होतं. सासूबाई, नवरा आपल्या नावानं ठणाणा करत असतील, असं लक्षात येऊन अलका पोरीला घेऊन घराकडे गेली. चिंतामणी, नित्या, रघू थकले होते. आता रॉबीला घेऊन वान्नेर गेलं असलं तरी उद्या काही त्याला सोडायचं नाही. गलोलीनं दगड मारून खाली पाडायचंच, अशी शप्पथ घेऊन ते निघाले. तशी बाकीची पोरंही पांगली. त्यासोबत दहा-बारा दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू वान्नेरानं उचलून नेलं. चोरलं. बळकावलं. गळा दाबून काखोटीला मारलं, अशा गोष्टी तासाभरातच पांगल्या. ढेकळं काढल्यावर चारी अंगांनी वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यासारखा वाहू लागल्या. म्हातारीच्या कापसासारखा उडू लागल्या. ०००० गावातला मुख्य रस्ता सरपंचांनी नुकताच सिमेंटचा करून दिला होता. दोन्ही बाजूंनी झाडंही लावून दिली होती. त्या रस्त्यावरून शाळेकडं जाताना डावीकडं महादेव अन् मारुतीचं मंदिर होतं. चाळीस वर्षांपूर्वी धरणाच्या तळाशी मूळ गाव गेलं. तेव्हा सरकारनं गावकऱ्यांना मोबदल्यात जमीन दिली होती. तेव्हा त्या वेळचे तालेवार पंडितअण्णा हर्षेंनी ही दोन मंदिरं स्वखर्चातून बांधली होती. नव्या गावाची उभारणी सुरू असताना एक वानर कायम घिरट्या घालत असायचा. एक दिवस त्याचा देह ओढ्याजवळ आढळला. त्यामुळं त्याच्या आठवणीत मारुतीचं मंदिर बांधलं गेलं, असं लोक म्हणत. गावकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या पाच-पन्नास मुस्लिमांना एका छोट्या मशिदीसाठी दगड-विटा लाकूडही पंडितअण्णांनीच दिलं होतं. आता अण्णांची तिन्ही मुलं शहरात मोठ्या अधिकारी पदावर होती. तिथून जमेल तेवढं गावावर आणि शेतावर लक्ष ठेवून होती. मंदिरांचा त्यांनी विस्तार केला होता. मंदिराजवळ एक वाचनालय बांधून त्यात हजारभर अध्यात्मिक, धार्मिक पुस्तकं ठेवली होती. अण्णांच्या सगळ्यात लहान मुलानं दोन वर्षापूर्वी तालुक्याच्या गावातून दररोज दहा-बारा वर्तमानपत्रं रोज वाचनालयात येतील, अशी व्यवस्था केली होती. बोटावर मोजण्याएवढे सोडले तर कोणाच्या घरात टीव्ही नव्हते. ज्यांच्या घरात होते तेही फार टीव्हीला सुकाळले नव्हते. पोटात दोन घास पडल्यावर मंदिरासमोरचं अंगण हेच त्यांच्यासाठी मन निवांत होण्याचं एकमेव ठिकाण होतं. दिवसभर गावात काय घडलं हे त्यांना या अंगणातच कळत होतं. त्यानुसार त्या दिवशी काय झालं हे अनेकांना पोरा-टोरांनी सांगितलं होतं. पण पोरं सांगतात ते खरंच आहे की गपाट्या, याची खातरजमा करण्यासाठी अनेक मंडळी सुपाऱ्या, अडकित्ते, पान-तंबाकू घेऊनच आली होती. एका बाजूला बायकाही जमल्या होत्या. सरपंच पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते. म्हणून उपसरपंच दादारावांवर जबाबदारी आली होती. गेल्या काही वर्षांत त्यांना पहिल्यांदाच गावकऱ्यांसमोर बोलण्याची संधी मिळाली होती. ती पूर्ण साधून घ्या. दणक्यात भाषण ठोका. वान्नेराबद्दल खूप बोला, असं त्यांच्या सौभाग्यवती टापरेकाकींनी चार चार वेळा बजावलं होतं. त्यामुळं ते जबर तयारीनंच आले होते. ‘हे एक इपरित झालंय. असं कधी झाल्याचं मी माझ्या पन्नास पावसाळ्यात कधीच ऐकलं नवतं. आज त्यानं कुत्र्याचं पिलू उचललं. उद्या घरातलं चिरकं पोरगं नेलं तर काय भावात पडंल. म्हनून या वान्नेराचा तातडीनं बंदोबस्त झाला पायजे. मी लगेच जिल्ह्याला जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाला निवेदन देतो. विरोधी पक्षाचे असले तरी त्यांनी जनहिताची गोष्ट लक्षात घ्यावी. तसं जर झालं नाही. चार दिवसात उपाययोजना झाली नाही. तर मी थेट मुंबईलाच जातो. कारण हा माझा नाही, साऱ्या गावाचा प्रस्न आहे. गावाच्या हितासाठी मी काहीही करण्यास तयार आहे.’ असं दादारावांनी जाहीर केलं. त्यावर टाळ्या वाजल्या. एक-दोन कुजके ‘मुंबईला जाण्यापेक्षा उपोषणाला बसा’ असं कुजकटले. त्यांच्याकडं डोळे बारीक करून पाहत दादारावांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘सरकार जेव्हा करल तेव्हा करल. आपण आता जाऊन वान्नेराचा शोध काढू. हिंमतबाजांनी टार्ची, काठ्या अन् दोरखंड घेऊन माज्यासोबत यावं.’ एका दमात सांगून ते लगोलग निघालेही. तास-दोन तासांच्या विश्रांतीनं ताजेतवाने झालेले चिंतामण, नित्या, रघु दगडं उचलून चिंगाट वडाकडं पळाले. म्हातारे-कोतारे त्यांनी त्यांच्या तरुणपणात कशी वानरं पाहिली, याचे किस्से सांगत बसले. इकडं शंभरेकजणांनी वडाला घेरलं. टॉर्च लावून एकच कालवा केला. पण एकही फांदी हलंना. खुसपुसाट होईना. मग जमावानं आसपासची सारी झाडं धुंडाळली. कुठंच वानराचा मागमूस नव्हता. ‘गेलं वाटतं गाव सोडून.’ आबा शेळकेंनी शंका व्यक्त केली. घरी जाऊन जमिनीला पाठ टेकण्यासाठी आसुसलेल्यांनी ‘हो, हो … घाबरून पळालं असतील’ असं म्हणत पाय घराकडे ओढले. तेवढ्यात आईचा खणखणीत आवाज चिंतामणच्या कानी पडला. ‘आलो, आलो…चल नित्या, रघ्या’ असं सांगत त्यानंही निरोप घेतला. अन् त्याचं लक्ष मंदिराजवळच्या भल्यामोठ्या शिळेपाशी गेलं. त्यानं तिकडं हात दाखवत बेंबीच्या देठापासून बोंब ठोकली. ‘अऱ्या बापारे … अऱ्या बापारे’. चिंतामण ओरडला म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर असणार यावर पोरांचा ठाम विश्वास होता. ते शिळेपाशी धावले. दादाराव, युसूफ, प्रल्हाद, काशिनाथ आणि सगळा जमाव पोहोचला. कोणाचाच विश्वास बसंना. रक्तात माखलेल्या रॉबीनं काही वेळापूर्वीच प्राण सोडला होता. त्यापेक्षाही धक्का म्हणजे रॉबीच्या बाजूला आणखी एक पिल्लू मरून पडलेलं होतं. गावाची जबाबदारी स्वीकारलेल्या दादारावांसाठी ही खूपच भयंकर गोष्ट होती. अलकाच्या डोळ्यात पाणी आलं. मंजरीनं भोकाड पसरलं. अखेरच्या निरोपाचं कसब असलेल्या काशिनाथनं पटकन युसूफला पाठवून फावडं, कुदळ मागवली. पिल्लांवर माती सारली. माती सारता सारता त्याचा मोबाईल वाजू लागला होता. ‘च्या मारी या वेळेला कोण’, असा विचार करत त्यानं नाव निरखून पाहिलं आणि त्याच्या करामती डोक्यात घंट्या वाजू लागल्या. ‘लई दिवस झालेत. वाचनालयाचं उद्घाटन झालं. त्यानंतर आपल्या गावाचं पेप्रात नावच आलं नाही. खबरनामाला बातम्या देणारा कृष्णा मातोडे वळखीचा झालाय. तर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजेच’ असं पुटपुटत त्यानं पिलांवरची माती पायानं जोरजोरात दाबली. तेव्हा अख्खा जमाव पुढं गेला होता. माती सारखीवारखी करून घरी पोचताच हातपाय धुऊन, देवापुढं हात जोडून काशिनाथ माळवदावर गेला. हळूहळू आवाजात कृष्णाशी बोलू लागला. दोन मिनिटं बोलून झाल्यावर त्याला कोणाचीतरी चाहूल लागली. म्हणून त्यानं पटकन मोबाईल बंद करून टाकला. पायऱ्या उतरून तो खोलीत गपगार होऊन पडला. अप्पांनी त्याला दोन-तीनदा विचारलं, ‘काय रे वर जाऊन कोणाशी काय बोलत होता?’ पण काशिनाथनं उत्तर दिलंच नाही. त्याला साऱ्या गावाला चकित करायचं होतं. ०००००० वाचनालयात येणारे सारे पेपर सकाळी आठच्या सुमारास बारकाईनं वाचायचे. त्यातल्या महत्वाच्या बातम्या सखाराम तिनावे, पांडुरंग काकवे आणि नामदेवराव पंडितांना उलगडून सांगायच्या, असा प्रभाकर भगतांचा शिरस्ताच होता. शाळा बंद असल्यानं तर हे काम ते अतिशय मन लावून करत होते. नेहमीप्रमाणे ते चहाचा कप घेऊन पेपर चाळू लागले. अन् खबरनामाचं तिसरं पान उघडताच एकदम उडाले. ‘वानरांनी कुत्र्यांची २०० पिलं हालहाल करून मारली’ असं टप्पू अक्षरात छापलेलं होतं. त्यांनी लगोलग त्यांच्या रोजच्या तीन श्रोत्यांना ‘आपल्या गावात वान्नेरानं कुत्र्याची दोनशे पिलं मारून टाकलीत. कुत्र्यांनी वानेराच्या पिल्लाला मारल्यानं वान्नेरं त्याचा बदला घेत आहेत.’ अशी बातमी खबरनामात आल्याचं सांगितलं. नामदेवराव पंडितांनी चिरक्या, थरथरत्या आवाजात म्हटलं, ‘अरे देवा. पिसाळलीत का काय वान्नेरं. दोनशे पिलं मारलीत. आन् मला कुणी कसं काही सांगितलं नाही.’ त्यावर सखाराम म्हणाले, ‘आता आपण म्हातारी झालोत. अन् कोण काय सांगितलं नाई तर काय झालं ... पेप्रावाल्यानं खरं सांगितलंच की.’ पांडुरंगरावांनी त्यांच्या स्वभावानुसार शंकेखोरपणे विचारलं, ‘भगत मास्तर या एका पेप्रावाल्याचं काय खरंय. बाकीच्या पेप्रातबी बगा की.’ कधी नव्हे ते पांडुरंगरावांची शंका रास्त असल्याचं वाटून मास्तरांनी सगळ्या पेप्रांची चळत उघडली. अन् म्हणाले, ‘चार पेप्रात आलीय बातमी. खबरनामात आहे तेवढी मोठी नाही. पण आलीय. दोन जणांनी तर वान्नेरांचे फोटो पण टाकलेत. एकानं कुत्र्याची पिल्लंही दाखवलीत.’ भगतसर सांगतात. प्रेपातही आलंय म्हणजे कुत्र्याची दोनशे पिल्लं पिसाळलेल्या वानरांच्या टोळीनं ठेचून मारली. हालहाल करून मारली, यावर तिघांनीही शिक्कामोर्तब केले आणि ते गप्पांचा कार्यक्रम गुंडाळून लगोलग आपापल्या वाड्यात गेले. तासाभरात गावामध्ये एकच चर्चा सुरू झाली. छोटी पोरं हातात दगडं, तरणी पोरं काठ्या, गोफणी घेऊन फिरू लागली. ‘ते पहा वान्नेर. तिकडं पहा. पळा, पळा. अरं, अंगावर येईल रे. चावतंय बरं.’ म्हणत दिसंल त्या झाडांवर दगडं फेकू लागली. एकच कोलाहल सुरू झाला. एवढ्या आवाजातही सांडवे पाटलांच्या म्हातारीनं काढलेल्या किंकाळीनं सगळे थबकले. जाणते लोक सांडवेंच्या वाड्यात धावले. अंगणात कापसाच्या वाती करत बसलेल्या म्हातारीच्या दंडाला म्हाळ्यानं ओढलं होतं. झटापटीत तिचं पोलकं दंडाला टरटर फाटलं होतं. मग गर्दीत उभ्या काशिनाथनं आडोसा शोधत कृष्णाला कॉल केला. ‘पिसाळलेल्या वान्नेरानं म्हातारीवर हल्ला केला’ अशी वित्तंबातमी दिली. कृष्णानं लगोलग मुख्यालयात संपादकसाहेबांना कळवलं. संपादकसाहेब खुश झाले. बेव एडिशनच्या उपसंपादक जहीर शेखला बोलावून म्हणाले, ‘दोन ओळींचा स्क्रॉल चालवा. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ द्या. किमान दहा लाख व्ह्यूज मिळतील रात्रीपर्यंत.’ जहीरही खुश होत म्हणाला, ‘सर, वानरांचे लाईव्ह किंवा गावाचे, कुत्र्यांच्या मृतदेहांचे काही फोटो असतील तर फोटो स्टोरीपण चालवतो’. संपादकसाहेब गुरकावले. ‘आता एवढं तर चालवा. लायब्ररीमधले वानरांचे दुसरे फोटो टाका. सगळी वानेरं एकसारखीच तर दिसतात.’ जहीरनं आज्ञेचं पालन केलं. आणि संध्याकाळी गावात चार न्यूज चॅनेलच्या मोठमोठ्या गाड्या शिरल्या. त्यांच्यासोबत यु ट्युबवालेही आले होतेच. दिसेल त्याच्या ते मुलाखती घेत होते. गावातल्या प्रत्येकासमोर एक कॅमेरावाला होता. वार्ताहर काहीबाही प्रश्न विचारत होते. मुलाखती घेत होते. एकच धूम झाली. जगाच्या नकाशावर ठिपक्याएवढं गाव जगाएवढं मोठं झालं होतं. प्रसिद्धीच्या लाटेवर आरुढ झालं होतं. काशिनाथच्या चेहऱ्यावर समाधान ओघळत होतं. ०००००० इकडं चार दिवसाच्या सुटीनंतर कामावर परतलेला दैनिक पंचनामाचा रिपोर्टर गोरखनाथ काल्डे हैराण झाला होता. वानरांनी धुमाकूळ घातलेलं गाव त्याच्या गावापासून पाच किलोमीटरवरच होतं. एवढी मोठी घटना घडली पण आपल्याला कळाली नाही, याचं त्याला वाईट वाटत होतं. त्या गावात त्याचे एक दोन दूरचे नातेवाईकही होते. पण कुणीच काही का सांगितलं नाही, याचं त्याला आश्चर्य वाटत होता. कृष्णाशी त्याची चांगली मैत्री होती. पण त्यानंही कळवलं नाही. बाकी रिपोर्टरचा तर प्रश्नच नव्हता. आता काय करावं, या चिंतेत असतानाच मोबाईल वाजला. दैनिक पंचनामाचे संपादकसाहेब त्यांच्या खास कमावलेल्या संथ आवाजात म्हणाले. ‘गोरख … तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरल्या गावात एवढी जगावेगळी घटना घडते आणि आपल्याकडं त्याची एकही ओळ आली नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय.’ ‘सर, मी सुटी घेऊन बहिणीला भेटण्यासाठी गेलो होतो. लांडगेसाहेबांकडून मंजूर करून घेतली होती.’ गोरख चाचरत उत्तरला. दोन क्षण थांबत संपादकसाहेब म्हणाले, ‘ठीक आहे. पण आता फार वेळ घालवून उपयोग नाही. आपल्याकडं बातमी नसल्यानं आपलेच लोक काहीबाही बोलताहेत. तुम्ही तातडीनं त्या गावात जा. सगळ्या बाजू नीटपणे तपासून घ्या. खोलात चौकशी करा. खरंच काय प्रकार झालाय, हे शोधून काढा. उद्याच सविस्तर रिपोर्ट करा. तुमच्याच मोबाईलमध्ये फोटो काढा.’ संपादकसाहेबांनी नीटपणे समजावून सांगितल्यानं गोरखच्या मनावरील ताण बऱ्यापैकी पळाला. आणि तो पुढील तयारीला लागला. त्यानं वनाधिकारी साईनाथ वावटळेंशी संपर्क साधला. तेव्हा तेही त्याच गावाकडं निघाले होते. मग गोरखनं फोटोग्राफर संतोषला कॉल करून मोटारसायकल घेऊन येण्यास सांगितलं. संतोष येईपर्यंत तो खोलीची आवरासावर करू लागला. वानराविषयी डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिवरील डॉक्युमेंटरीज आठवू लागला. बहिणीच्या गावातील दुकानातून आणलेली पुस्तकं ठेवता ठेवता त्याच्या नजरेस व्यंकटेश माडगूळकरांची ‘सत्तांतर’ कादंबरी पडली. वानरांच्या दुनियेची अजब कहाणी सांगणाऱ्या ‘सत्तांतर’ची अनेक पारायणं त्यानं दोन वर्षांपूर्वीच केली होती. त्यात माडगूळकरांनी म्हटलं होतं की, भारतात वानरांच्या सोळा उपजाती आहेत. अठराशे तेहतीसमध्ये ब्रिटीश संशोधक चार्लस मॅकॅनने पहिल्यांदा वानरांचा सखोल अभ्यास केला. नंतर काही भारतीय, परदेशी संशोधकांनी खूप लिहिलं. रानकुत्री वानरांचा मोठा शत्रू. एका डहाळीवरून दुसऱ्या डहाळीवर सूर मारताना अनेकदा वय झालेल्या वानरांचा किंवा कवळ्या पिलांचा अंदाज चुकतो. आणि खाली उभी रानकुत्र्याची टोळी त्याचा काही मिनिटातच फडशा पाडते. गावातली साधी कुत्रीही वानराच्या मागं लागतात. पण त्याचा बदला म्हणून वानर कुत्र्याचं पिलू उचलून त्याला हालहाल करून मारतं, असा कुठंही उल्लेख सत्तांतरमध्ये नव्हता. ‘पण काय सांगावं वानरंही बदलली असतील. माणसासारखी’, असं तो पुटपुटला. तेवढ्यात संतोष आला. ‘चला महाराज, वानरांच्या दुनियेतील खरी गोष्ट शोधण्याच्या मोहीमेवर चला’ असं म्हणत गोरखनं संतोषच्या मागे बसकण मारली. ०००००० गावात अक्षरश: उत्सवाचं वातावरण होतं. फक्त बँड वाजवणंच बाकी होती. प्रत्येक रस्त्यावर पोरांच्या टोळ्या होत्या. थोडी जाणती झालेली पोरं झाडं शोधत होती. त्यांनी खुण केली की छोटे बाचकेबुचके हुप्प हुप्प असा आवाज करीत दगडं फेकीत होती. बिथरलेली वानरं मारा चुकवीत कधी दात विचकीत इकडून तिकडं पळत होती. सुदैवानं इतर कोणी मिडिआवाले नव्हते. त्यामुळं गोरख, संतोषसाठी रान मोकळं होतं. त्यांच्याभोवती लोक गोळा झालेच. एखाद्या शाळकरी मुलाला समजावून सांगावं तसं भगतमास्तरांनी पद्धतशीरपणे उलगडून सांगितलं. पण त्यांचा सगळा भर पेप्रात वाचलेल्या बातमीवरच होता. ‘हाहा:कार उडाला बघा. सरकारचं काही लक्षच नाही. सगळा गाव वान्नेरांनी वेठीस धरलाय. पण कोणी काही बघायला तयार नाही. खरं पाहिलं तर सरकारनं येऊन वान्नेरं धरली पाहिजेत’ असं नामदेवराव पंडितांनी जोरदारपणं सांगितलं. त्याला लगेच केशवरावांनी आक्षेप घेतला. ‘आवं तक्रारच केली नाई अजून. लेखी काही दिलंच नाही तर सरकार काय कोणाच्या बापाचं नोकरंय का? त्याला काय सप्न पडलं का?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या अशा हस्तक्षेपानं चिडलेले पांडुरंगराव म्हणाले, ‘घ्या. एवढी सगळ्या जगभरात बातमी चालली तरी सरकारला कळंना का? तुम्ही तर काहीही बोल्ता’. प्रकरण वेगळ्याच वळणावर जातंय, असं लक्षात येताच गोरख अन् संतोषनं हस्तक्षेप केला. एकच प्रश्न विचारला. ‘किती कुत्री मेली?’ कायम टाचा उंचावून फिरणारा आणि गेल्या काही दिवसात लीडर झालेला चिंतामण संधीची वाटच पाहत होता. ‘दोनशे, दोनशे मेलीत.’ त्याच्याकडे मोर्चा वळवत गोरखनं विचारलं, ‘तु पाहिलीस का?’ चढ्या आवाजात चिंतामण म्हणाला ‘हो तर. मी काय खोटं बोलतो?’ ‘तसं नाही. फक्त तु स्वत: पाहिलं का, असा माझा प्रश्न आहे. त्याचं हो किंवा नाही एवढंच उत्तर दे?’ त्यावर चिंतामण थोडासा गांगरला. म्हणाला, ‘ते काय, सदाशिवकाकानं पाहिलं ना.’ मग लवाजमा किराणा दुकानाच्या ओट्यावर बसलेल्या सदाशिवरावांकडे वळाला. स्मरणशक्तीवर बराच ताण देत ते म्हणाले, ‘हे पोट्टे काहीही सांगतेत. मी कदीच असं नाई म्हटलं हां. पण गावात पाच-सातशे कुत्रे असतील. त्यातील दोनशे दिसंनात असा अंदाजय माझा.’ संतोषनं किंचित चिडून विचारलं, ‘मग हा दोनशेचा आकडा आला कुठून? कोण खरं सांगल आम्हाला?’ तसं नुकताच वानरांचा पाठलाग करून आलेला श्रीपतीचा मोठा भाऊ हरीराम ओरडला, ‘काहीही बोलतेत लोकं. गावच एवढं छोटंसं. त्यात पाच-सातशे कुत्रे कुठून आले. एका एका गल्लीत दहा पकडले तरी शंभर असतील. त्यांची पिल्लं पन्नासच्या पुढं नाईतच.’ त्याच्या बोलण्यानं गोरखनाथ सुखावला. कृष्णानं घाईगडबडीत किंवा काहीतरी थरार करायचा म्हणून मेेलेल्या पिलांचा आकडा वाढवून टाकला. त्याला वान्नेर-कुत्र्याच्या टोळीयुद्धाची फोडणी मारली, हे त्याच्या लक्षात आलं. आता आणखी कोणाला बोलतं करावं, असा विचार करत असतानाच त्याचा दूरचा नातेवाईक बद्रीनाथनं हाळी दिली. ‘काय राव, एवढी मोठी घटना घडली तुमच्या गावात अन् तुम्ही मला कळवलंच नाही. मोबाईलवर मेसेज तर टाकायचा.’ गोरखनं नाराजी व्यक्त केली. बद्री खजिल होत म्हणाला, ‘अरे.. मी नवा मोबाईल घेतला तर तुझा नंबरच गेला बघ.’ ‘बरं जाऊ द्या. गाव तर जगप्रसिद्ध झालं. तुम्हाला पण पाहिलं मी काही न्यूज चॅनेलवर.’ ‘हा .. हा .. ते खरंय. पण मला जे सांगायचं होतं ते त्या चॅनलवाल्यानं बोलूच दिलं नाही.’ ‘काय सांगायचं होतं. मला सांगा. आम्ही स्पेशल रिपोर्ट करतोय.’ गोरखनं सांगून टाकलं. मग बद्री फुसफुसत म्हणाला, ‘हा जो आकडा सांगताय ना दोनशे कुत्र्याची पिल्लं मारली. ते काही खरं नाही. फार झालं तर पाच-सात गेली असतील.’ ‘अहो, पण पाच-सात का होईना मेली ना? वानरांनी कुत्र्याची पिल्लं हाल हाल करून मारणं हीच किती भयंकर गोष्टंय.’ गोरखनं मत व्यक्त केलं. बद्रीनाथ आवाज आणखी हलका करत म्हणाला, ‘हे पण काही खरं नाही. वान्नेरांनी पिलाला हाल करून मारलं. त्यांची मुंडी मुरगाळली, असं कोणीही पाहिलं नाही. दोन पिलं मंदिराजवळच्या दगडी शिळेवर रक्ताच्या थारोळ्यात दिसली. या पेक्षा काही नाही. अन् तुम्ही गावात कोणालाही विचारा. कुत्र्यानं वान्नेराच्या पिल्लाला मारलेलंच नाही. मग ते कुत्र्याच्या पिल्लांना मारून कशाला बदला घेतील? उगाच कोणीतरी तशा अफवा पसरवल्या. अन् काही पेप्रावाल्यांनी, चॅनलवाल्यांनी तेच भडकून दिलं.’ बद्रीचं असं बोलणं सुरू असतानाच गलका झाला. साळुंक्या चिरकत उडाल्या. गोसावी चिमण्यांनी कलकलाट केला. संतोषनं कॅमेरा झाडांच्या दिशेनं फिरवला तर म्हाळ्यानं एक पिलू बकोटीला मारून चिंचेची सगळ्यात वरची, मोठी फांदी गाठली होती. पोरांना तेच हवं होतं. त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळं चिडलेले दोन म्हाळे त्यांच्या अंगावर चालून येऊ लागले. संतोष लाईव्ह फोटोमुळं खुश होता.पण गोरखला ही हल्लेबाजी पसंत नव्हती. तो ओरडणार तोच पोरंच थबकली. कारण वन अधिकारी वावटळे आणि त्यांचं पथक दाखल झालं होतं. मग त्यांच्याभोवती घोळका झाला. या वाड्यासमोरून त्या वाड्यासमोर, या घरातून त्या घरात. एका झाडाकडून दुसऱ्याकडं घोळका फिरू लागला. दोन चकरा झाल्यावर गोरखनं वावटळेंनाही तेच विचारलं, ‘साहेब, दोनशे कुत्र्यांची पिलं मेली आणि ती पिसाळलेल्या वानरांनीच मारली, असं काही तुमच्या निदर्शनास आलंय का?’ गेल्या आठ दिवसांपासून वावटळेंना एकाही मिडिआवाल्यानं काहीच विचारलं नव्हतं. त्यामुळं त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पहिलीच संधी मिळाली होती. ते म्हणाले, ‘वानरानं उच्छाद मांडला अशी एक तक्रार आली होती. पण त्यात काही गांभीर्य जाणवलं नाही. म्हणून कारवाई करता आली नाही. आता हा दोनशेचा आकडा आला.’ ‘पण खरं काय आहे. तुमचा अनुभव, अभ्यास काय सांगतो?’ ‘एक एक गोष्ट क्लिअर करतो. पहिलं म्हणजे ही वानरं पिसाळलेली नाहीत. तसं असतं तर ती अनेकांना चावत सुटली असती. दुसरी गोष्ट - दोनशे पिलं मारलेली तुम्हालाही सापडणार नाहीत. आम्हालाही सापडली नाहीत. कितीही आकडा फुगवला तर वीसच्या पुढं जाणार नाही. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. तो म्हणजे वान्नेरं कुत्र्यांचा बदला घेत नाही. कारण या गावातल्या कुत्र्यांनी वानराचं एकही पिलू मारलेलं नाही. मुळात पिलू मेल्याचं वानराला तेवढं कळत नाही. अनेक माद्या मेलेलं पिलू तीन-चार दिवस स्वत:सोबत वागवत असतात.’ गोरखनं वावटळेंना मध्येच थांबवत विचारलं, ‘साहेब, हा बदला नाही, असं तुम्ही एवढ्या ठामपणे कसं म्हणू शकता?’ वावटळे पटकन खिजवत्या स्वरात म्हणाले, ‘अरे, असं काय करताय पत्रकारसाहेब. गावात फिरणारे तिन्ही नर आहेत नर. म्हाळे आहेत. त्यात एकही मादी नाही. आता मादीच नाही तर वान्नेराची पिलं कुठून आणली तुमच्या मिडिआवाल्यांनी? तुम्हीच शोध घ्या.’ ‘बरं, पण आता डोळ्यांनी मला आणि तुम्हालाही दिसतंय. एक वान्नेर कुत्र्याच्या पिलाला घेऊन बसलंय. तर ते कशासाठी?’ ‘ते शोधावं लागंल. एका ओळीत प्रश्न एका ओळीत उत्तर असं होणार नाही. वानर हजारो वर्षांपासून माणसासोबत राहत असलं. आपल्या पुराणात वानरांच्या अनेक कथा असल्या अगदी वानररुपातील हनुमान आपला देव असला तरी वानराशी कसं वागावं. त्याला कसं समजून घ्यावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं नाही.’ ‘साहेब, माझा थेट प्रश्न आहे. वानर पिलांना का उचलून नेतंय?’ गावकऱ्यांकडं हलकी नजर टाकत साहेब म्हणाले, ‘हे बघा. बीड जवळच्या तागडगावात वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक व प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे राहतात. त्यांनी मला कालच सांगितलंय की, वानरांना कुत्र्याच्या अंगावरील ऊ, लिखा व इतर किटक काढण्याची सवय असते. त्यासाठी त्यांनी कुत्र्याची पिलं उचलली असावीत. पण गावकऱ्यांनी त्यांना चोर, मारेकरी ठरवलं. त्यांच्यावर दगडं फेकली. धावपळीत उंचावरून पिलू वानराच्या हातातून पडून मेलं. त्याला सूड, बदला घेणं म्हटलं गेलं. खरंतर वानरानं पिलाची मान पिरगाळली, गळा आवळला किंवा वरून फेकून दिल्याचं कोणी पाहिलं नाही. काही पिलं अन्न-पाण्यावाचून मेली असावीत. आणखी एक निवृत्त वनाधिकारी विजय सातपुते यांनी तर असंही सांगितलं की, वानर आणि कुत्र्यांत टोळीयुद्ध सुरू झालं. वानरांनी दोन अडीचशे कुत्र्यांच्या पिल्लांचा बळी घेतला. माणसं, लहान मुलांवर हल्ले केले, अशा बातम्या मिडीयावाल्यानी दिल्या. वस्तुस्थितीत असं काहीही झालं नाही. दोन ते तीन पिलांचा मृत्यू झाला. वानर हा प्राणी समाजशील. तो लोकांच्या अवतीभोवती, गावाजवळ मुक्काम पसंत करतो. वानर स्वसंरक्षण सोडता विनाकारण कोणालाही इजा पोहोचवत नाहीत. त्यानं कुत्र्याची, मांजराची पिले उचलणे ही निव्वळ नैसर्गिक घटना आहे.’ वावटळेंच्या बोलण्यानं गोरख, संतोष काहीसे समाधानी झाले. पण गावकऱ्यांचं काय? त्यांनी घोळक्यावर नजर फिरवली तर अनेकांच्या चेहऱ्यावर वानरांच्या दुनियेविषयी नवे ज्ञान मिळाल्याची भावना होती. काशिनाथच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. आपण कृष्णाला दोन पिलं मेल्याचं सांगितलं होतं. पण त्याला वेगळंच ऐकू गेलं. तरी आपण त्याला तेही सांगायला नको होतं, असं त्याला वाटलं. विशेष म्हणजे चिंतामणीही बराच शांत झाला होता. त्यानं अन् नित्या, रघूनंही हातातली, खिशात भरलेली दगडं खाली टाकली. एक-दोन जाणत्या पोरांनी काठ्या झाडाखाली टाकून दिल्या. ते पाहून वावटळेही खुश झाले. ‘आपण विदर्भ, औरंगाबादेतून एक्स्पर्ट बोलावलेत. लवकरच या वानरांना पकडून जवळच्या जंगलात सोडलं जाईल’ अशी घोषणा त्यांनी केली. त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. आता सगळं संपलं. सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली, असं वाटून संतोष मोटरसायकलकडं वळाला. पण गोरखच्या डोक्यात एक प्रश्न गिरक्या घेत होताच. तो तडक बद्रीनाथचा मामेभाऊ उमाकांतच्या वाड्यात शिरला. तेव्हा तिथं पोरांची एक झुंड होतीच. शिवाय माहेरपणाला आलेल्या उमाकांतच्या दोन बहिणी, बहिणींच्या सासूबाईही होत्या. त्या सगळ्याजणी माळवदाकडंच बघत होत्या. अधून-मधून पत्र्याचा तडतड आवाज येत होता. गोरखनं विचारलं तर वैतागलेला उमाकांत म्हणाला, ‘अरे बाबा. तु एवढा मोठा पत्रकार. जरा मदत कर. तालुक्याच्या साहेबांना सांगून या वान्नेरांना पकडून दे.’ चहाचा कप हातात घेत गोरख माळवदाकडं पाहू लागला. त्याला काय प्रश्न पडला, हे जणूकाही उमाकांतला कळालंच असावं. तो सांगू लागला. ‘वान्नेरांनी चार पिलं आणून ठेवलीत पत्र्यावर. उंचावरून पिलू पडलं तर मरतं हे त्याला आता उमगलं असावं. पण आम्हाला त्याचा किती त्रास. दिवसभर नुसता धिंगाणा.’ कृषी खात्यात काम करणारे उमाकांतचे भावजीही बोलण्यास सरसावले. ‘दिवसभर वान्नेरं कोवळी पानं, उंबरं खातेत. पिलांना थोडीच ते जमतं. खाणं-पिणं नाही तर खंगून दोनएक पिलं मेली असणार. म्हणून मी उपाय सुचवला. आता वान्नेर थोडं इकडं तिकडं गेलं की आम्ही पत्र्यावर दूध-पोळी कुस्करून ठेवतो. वान्नेर पिलाला ते निवांत खाऊ देतं. हाडहूड करत नाही. गावातले काही लोक काहीही सांगोत. पिलं रमलीत वान्नेरांसोबत. अन् मला सांगा कुत्र्याचं अन् वान्नेराचं तर हाडवैर. मग पिलाला उचललं तर कुत्र्यांनी त्यांच्यावर किती हल्लाबोल करायला पाहिजे होता. तसं तर काही दिसत नाही. पिलंही केकाटत नाहीत. प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हिवरे यांचं तर असं म्हणणंय की, उत्क्रांतीच्या वरच्या शिडीवर असणाऱ्या प्राण्यांत अपत्य आसक्ती विकसित होत असते. वानर अशा वरच्या शिडीवर आहे. ’ असं म्हणत भावजींनी दीर्घ श्वास घेतला. आणि फर्मान काढावं अशा आवाजात म्हणाले, ‘हे सगळं तुम्ही लिहून काढा. म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज होणार नाही. सगळ्या शंका-कुशंका फिटतील.’ गोरखनं मान डोलावली. तरीही त्याच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न कायम होताच की, वान्नेरं पिलांना का उचलतात? त्यानं धीर एकवटून तो विचारला. त्यावर उमाकांत, भावजी अन् इतरही जाणते एकमेकांकडे टकमका बघू लागले. मग गोरख अखेरचा उपाय म्हणून महिलांकडे वळत म्हणाला, ‘काकी … तुम्ही तर कीर्तनकार, भारुडकार. पंचक्रोशीत तुमच्या बोलण्याला मान्यता. तुम्ही इतके उन्हाळे, पावसाळे पाहिले. तुम्हाला काय वाटतं? कशामुळं हे नर वान्नेरं पिलांना उचलत असतील?’ रुपयाएवढं कुंकू लावलेल्या, चेहऱ्यावर तेज पसरलेल्या बायजाबाईंनी डोक्यावरचा पदर नीटसा केला. अन् त्या उत्तरल्या, ‘यावर आमचंबी कालच थोडंसं बोलणं झालं. आता तु विचारलं तर थोडक्यात सांगते. कसंय की माणसासारखीच वान्नेरालाबी लेकराची लई आवड. लेकराबाळांसोबतच त्येंचं जीवन चालतं. लेकरं आजूबाजूला नसली तर जीव तगमत ऱ्हातो. आता या गावात आलेले तिन्ही नरच. त्यांच्यासोबत मादी नाही. मग लेकराची हौस भागवावी कुठून. कोणाचं लाड करावेत, कोणाचं कौतुक करावं, असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार चार पायावर चालणारं, शेपूट असलेलं, छोटंसं कुत्र्याचं पिलू उचललं. नर असला म्हणून काय झालं त्याच्यातही आईची, मातेची माया असणारच की. बापात पण माय असतीच ना.’ बायजाबाईच्या सांगण्यानं गोरखच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शंकेचं जाळं एका क्षणात फिटून गेलं. चटकन उठून त्यानं बायजाबाईंच्या चरणावर डोकं टेकवलं. अन् वाड्याबाहेर पडला. त्याची नजर समोर चिंचेच्या झाडावर पडली. उंच जाडजूड डहाळीवर वानर चारही दिशावर नजर फिरवत बसलं होतं. अन् त्याच्या मांडीची उशी करून कुत्र्याचं पिलू निवांतपणे पहूडलं होतं. जसं आईच्या कुशीत लेकरू. ००००००००

Tuesday, 7 December 2021

असं का होतं?

रसिकांच्या हृदयावर अविरत राज्य करणारी, जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी दोनच पण अतिशय सुमधूर गीते. संथगतीची तरीही खिळवून ठेवणारी कथा, कसदार दिग्दर्शन अन् सहजसुंदर अभिनय अशा चौरंगी संगमाचा सिनेमा ‘रजनीगंधा’. १९७४चा हा सिनेमा आजही मोहात पाडतो. त्याच्या मूळ कथाकार, हिंदीतील प्रख्यात लेखिका मन्नु भंडारी यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने रजनीगंधा पडद्यावर येण्याच्या प्रवासाची ही कहाणी. १९६९मध्ये हिंदीतील मातब्बर लेखक राजेंद्र यादव यांची ‘सारा आकाश’ कादंबरी प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक बासु चटर्जींच्या हाती लागली. त्यावरून त्यांनी सिनेमा केला. तो तिकीट खिडकीवर, समीक्षकांच्या नजरेत यशस्वी ठरला. त्यानंतर बासुदा नव्या कथेचा शोध घेत असताना राजेंद्र यादव यांच्या पत्नी मन्नू भंडारी यांची ‘यही सच है’ कथा त्यांच्या वाचनात आली. आणि याच कथेवर आपला पुढील सिनेमा असेल, असं त्यांनी जाहीर केलं. मन्नु उर्फ महेंद्रकुमारींना भेटून त्यांनी आपला मानस सांगितला. तेव्हा त्यांना सौम्य धक्काच बसला. कारण आपल्या या कथेत सिनेमा करण्यासारखं काही असेल, असा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. प्रेमभंगाचा धक्का पचवू पाहणाऱ्या एका मनस्वी, मध्यमवर्गीय तरुणीची मानसिक आंदोलनं त्यांनी ‘यही सच है’मध्ये तरुणीच्या रोजनिशीतून आविष्कृत केली होती. ही आंदोलनं पडद्यावर कशी मांडता येईल, असा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता की, हे मांडलेलं रसिकांना कसं आवडेल? आपल्या कथेतील अलगद तरीही अतिशय रुतत जाणारी मांडणी मोठ्या पडद्यावर हलकी तर होणार नाही ना? पण बासुदा त्यांच्या निर्णयावर ठाम होते. कथानकात काही बदल करून त्यांनी विद्या सिन्हा, अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर या त्या वेळच्या फारशा परिचित नसलेल्यांना भूमिका दिल्या. १९७२-७३ मध्ये दिल्लीत थोडंसं चित्रीकरण झालं. तेव्हा तर मन्नु भंडारींना सतत असं वाटू लागलं की हा सिनेमा आपटणार. मग बातमी कानावर आली की, वितरकांनी रजनीगंधा प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. यात काहीच मसाला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मन्नुजी खट्टू झाल्या. यात एकतरी बडा कलावंत हवा होता, असं त्यांना वाटू लागलं. पण काही महिन्यात त्यांना त्याचाही विसर पडला. सहा महिने उलटले आणि बासुदांनी कळवलं की, ताराचंद बडजात्या यांनी आपला सिनेमा वितरित करण्यास घेतला आहे. रजनीगंधा प्रदर्शित झाला आणि इतिहास घडला. रसिक आणि समीक्षक असे दोन्ही फिल्म फेअर पुरस्कार या सिनेमानं पटकावले. विद्या सिन्हा, अमोल पालेकर रातोरात स्टार झाले. दिनेश ठाकुरांभोवती वलय निर्माण झालं. बासुदांच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब झालं. त्या तुलनेनं मन्नु यांचे फारसं कौतुक झालं नाही. आणि त्यांनीही ते खेचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्या त्यांच्या लिखाण कामात दंग होऊन गेल्या. 'मैं हार गई', 'तीन निगाहों की एक तस्वीर', 'एक प्लेट सैलाब', 'यही सच है', 'आंखों देखा झूठ' और 'त्रिशंकु' या त्यांच्या कथांमधून त्यांनी महिलांच्या व्यथांची परखड, वास्तववादी मांडणी केली. हिंदीसह सर्व भाषिक साहित्यात त्या सर्व कथा प्रचंड गाजल्या. त्यांच्या महाभोज कादंबरीनं साहित्यिक, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. १९७९मध्ये प्रकाशित झालेल्या या साहित्यकृतीत एका सामान्य माणसाचे भ्रष्ट नोकरशाही कसे हाल करते, याचं मर्मभेदी वर्णन होतं. ‘आपका बंटी’ या त्यांच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित सिनेमा कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यात त्यांनी प्रेमात आकंठ बुडणं, विवाह होणं आणि एके दिवशी विभक्त होणं यात महिलेची किती, कशी फरफट होते, हे सांगितलं होतं. व्यक्तिगत जीवनातील अनुभव त्यांनी मांडले होते. यशस्वी लेखिका असल्या तरी वैवाहिक जीवनात त्या होरपळल्या होत्या. रजनीगंधानं स्टार बनवलेल्या विद्या सिन्हांचंही काहीसं असंच झालं. त्यांना खऱ्या आयुष्यात सुख मिळालंच नाही. अखेरच्या टप्प्यात तर त्यांना दुसऱ्या पतीकडून मारझोड सहन करावी लागली. एकाकी अवस्थेत त्यांचा शेवट झाला. म्हटलं तर काहीजणांचं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं, क्लिष्ट आणि काहींचं सोपं, सुटसुटीत, सरळ रेषेसारखं असतं. अनेकदा सरळ चालणारे भरकटून जातात आणि भरकटलेले ताळ्यावर येतात. हे असं का असतं? का होतं, याचं ठोस, अचूक उत्तर अजूनतरी सापडलेलं नाही. त्याचा शोध अखंडपणे सुरू आहे. आणि तो सुरू असेपर्यंत मन्नु भंडारी यांच्या कथा, अमोल पालेकर-विद्या सिन्हांचा सहज अभिनय, बासुदांचे दिग्दर्शन अजरामर राहिल. खरंय ना?

Tuesday, 23 November 2021

एक बदल : २७ वर्षे

भांडवलशाही नष्ट झालीच पाहिजे. भांडवलदारधार्जिणे सरकार हाकला, असं कितीही म्हटलं तरी ती काही नष्ट होत नाही. कारण भांडवलशाहीच्या जागी लोकांच्या पोटापाण्याची काळजी वाहणारी दुसरी मजबूत, कायमस्वरूपी यंत्रणा भांडवलशाहीच्या विरोधकांनी उभी केलेली नाही. म्हणून अवघे जगच भांडवल्यांची बाजारपेठ होत आहे. त्याने एकीकडे शोषण वाढत आहे. दुसरीकडे नवे शोधण्याची, नवनिर्मितीची संधी मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पैसा कमावणे शक्य होतंय. तसं म्हटलं तर या भांडवली व्यवस्थेची अनेक वैशिष्ट्ये, बलस्थाने आहेत. त्यात जाहिरात ही एक महत्वाची शक्ती आहे. या माध्यमाचा अत्यंत प्रभावी वापर, मारा सुरू आहे. पण त्यातून कधीकधी सामाजिक बदलांची नोंदही होते. चांगल्या अर्थाने समाज बदलावा, असेही सुचवले जाते. नुकत्याच दुबईत आयपीएल क्रिकेट लढती झाल्या. त्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण सुरू असताना झळकलेली एक जाहिरात अशा बदलांचे उत्तम उदाहरण. पण हा बदल होण्यास आणि तो जाहिरातीमधून अतिशय खुमासदार पद्धतीने येण्यास २७ वर्षे लागली. या जाहिरातीची बीज पेरणी १९६०मध्ये झाली. त्यावेळचे देखणे भारतीय फलंदाज अब्बास अली बेग यांचे एका तरुणीने अचानक मैदानात शिरून चुंबन घेतले होते. तो प्रसंग अनेकांच्या स्मृतीवर कायमस्वरूपी कोरला गेला. दुसरी घटना १८ एप्रिल १९८६ रोजीची. जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला आशिया कप मिळवून दिला. मैदानात चाहता शिरणे आणि अखेरच्या चेंडूवर षटकार या दोन्हीचे अचूक मिश्रण करणारी ओगेल्व्हे कंपनीनिर्मित, महेश मथाई दिग्दर्शित एक शानदार जाहिरात १९९४मध्ये झळकली. शेवटच्या चेंडूवर फलंदाज षटकार खेचतो आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची प्रेयसी सुरक्षा रक्षकांना नृत्याच्या तालावर हुलकावणी देत मैदानात शिरते. प्रियकर, फलंदाजाला आलिंगन देते. तिच्या धाडसी प्रेमवर्षावाने तो सुखावतो, लाजतो. अशी मांडणी त्यात होती. त्यातील प्रेयसीची भूमिका करणाऱ्या शिमोना राशी रातोरात स्टार झाल्या. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आणि एका नव्या रुपात पुन्हा ती जाहिरात २०२१ च्या आयपीएलमध्ये अवतरली. ती पाहून भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक सुखावले. महिलामध्ये तर विशेष कौतुक झाले. खरेतर नवी जाहिरात जुन्याची रिमेक होती. पण त्यात एक अतिशय महत्वाचा बदल होता. तो म्हणजे अखेरच्या चेंडूवर पुरुष नव्हे महिला क्रिकेटपटू षटकार खेचते. आणि तिचा प्रियकर सुरक्षारक्षकाला हुलकावणी देत मैदानात शिरतो. तिला अभिवादन करतो. आलिंगन देतो, असा आनंदाच्या लाटा उसळवणारा बदल दाखवला आहे. मूळ संकल्पना अत्यंत प्रभावी, कसदार. उच्च दर्जाचे चित्रीकरण. पियूष पांडेंच्या शब्दरचनेला शंकर महादेवन यांचा सुरेख स्वर. शिवाय अभिनेत्री, अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील रेष न रेष काहीतरी सांगणारी. त्यामुळे जाहिरातीची परिणामकारकता हजारपटीने वाढली आहे. नव्या पद्धतीने मांडणी करताना जुन्याची मोडतोड होणार नाही. उलट नवे अधिक चैतन्यदायी होईल, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली. महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणाऱ्या अन् काहीसा अलिया भटसारखा चेहरा असलेल्या काव्या रामचंद्रन चेन्नईच्या रहिवासी. तेथील रंगभूमीवर त्या काम करतात. शिवाय सुखा एज्युकेशन फाऊंडेशनमध्ये कार्यरत आहेत. हे फाऊंडेशन विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि रोजगार मिळावा, यासाठी काम करते. काव्या राष्ट्रीय जलतरणपटूही आहेत. १९९४मध्ये पहिली जाहिरात आली त्याच वर्षी त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे जुनी जाहिरात त्यांच्या कधी पाहण्यात आली नव्हती. नव्या जाहिरातीसाठी दिग्दर्शक शशांक चतुर्वेदींनी निवड केल्यावर मात्र त्यांनी ती असंख्यवेळा पाहिली, अभ्यासली. मुंबईच्या ब्रेवॉर्न स्टेडिअमवर चित्रीकरण झाले. तत्पूर्वी तीन दिवस षटकारासाठी हुकचा फटका मारण्याचा कसून सराव करून घेतला. आता त्यांच्या अभिनयक्षमतेचे जगभरात कौतुक होत आहे. त्यामुळे त्या सुखावल्या आहेत. अलिकडील काळात कित्येक महिला खेळाडू, क्रिकेटपटू स्टार झाल्या आहेत. त्यांच्याविषयीचा अभिमान या जाहिरातीत आहेच. शिवाय ही जाहिरात सामाजिक बदल नोंदवणारी, महिलांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण करणारी आणि आता पुरुषांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाच पाहिजे, असं सांगणारी आहे, असं काव्या सांगतात. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलंय की, या जगात काहीच कायम नाही. सगळेकाही बदलत असते. ते त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त चांगल्या सामाजिक बदलांसाठी दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. या जाहिरातीच्या रुपाने किमान त्याची सुरुवात झालीय. आता काव्या रामचंद्रन यांना पुरुषांकडून अपेक्षित असलेला बदल समाजात प्रत्यक्षात कधी येईल, याची वाट पाहावी लागणार आहे.

Tuesday, 16 November 2021

गुलजार सिनेमा

सिनेमा पेराडिजो नावाचा एक नितांत सुंदर सिनेमा आहे. १९८८चा. त्यात अभिनय, कहाणी, मांडणी, दिग्दर्शन तर अप्रतिम आहेच पण सिनेमा टॉकीजची वास्तूही त्यात अभिनय करते. सिनेमा संपल्यावरही ती डोळ्यासमोर रेंगाळत राहते. खुपत राहते. खूप काही सांगत, बोलत राहते. चाळिशी ते नव्वदीत असणाऱ्या अनेक सिनेमाप्रेमींसाठी सिंगल स्क्रीन म्हणजे एक पडद्यावाली टॉकीज ही केवळ पैसे घेऊन मनोरंजन देणारी इमारत नव्हे तर एक टुमदार, उबदार घरच होते. मनापासून, हृदयापासून प्रेम असलेले. त्या घराच्या भिंतींना, पडद्यांना एक सुरेख गंध होता. टॉकीजच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कुटुंबासारखा वाटत होता. १९७०च्या दशकात औरंगाबाद शहर म्हणजे अशा अनेक टुमदार, उबदार घरांची वसाहत होती. त्यातली एक होती गुलजार. नावच किती छान आहे ना. गुलजारला जाऊन येतो, असं म्हणताना त्या काळी मनात आनंदाच्या लाटा उसळत. जणूकाही एखाद्या आवडत्या मैत्रिणीनं बोलावलंय, असा भाव चेहऱ्यावर उमटत असे. गुलमंडीकडून पानदरिब्याकडं जाताना केळीबाजार ओलांडला की डाव्या बाजूला गुलजारचं दर्शन घडतं. आजही तिथं बाहेरच्या बाजूला जुन्या सिनेमांची भली मोठी पण अंधुक, पुसट झालेली पोस्टर्स दिसतील. पन्नास – साठ वर्षांपूर्वी ही पोस्टर्स अतिशय ठळक होती. गुलजारमध्ये कोणता सिनेमा लागणार आहे, याची घोषणा करणारा एक टांगा फिरायचा. त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाची पोस्टर्स बांधलेली असायची. मानेपर्यंत कुरळे केस रुळत असलेला, कपाळाला गंध लावलेला गुलजारचा कर्मचारी त्यात बसलेला असायचा. तो मोठ्या कर्ण्यावरून (माईक) आइए गुरुवार को देखीए पाच शो. ग्रेट गँबलर के. अमिताभ, झीनत, नीतू के साथ. असं सांगत फिरायचा. पाच-सात वर्षांची अनेक पोरं चड्डी सावरत त्या टांग्याच्या मागे मागे अक्षरश: सात-आठ किलोमीटर फिरायची. माझ्या आठवणीप्रमाणे गुलजारला कधी बिग बजेट सिनेमा पहिल्या स्लॉटमध्ये लागला नाही. रिपीटमध्ये मात्र गुलजारने कोणालाही सोडलं नाही. त्या काळी धार्मिक म्हणजे रामायण, महाभारत असे सिनेमेही गुलजारची मक्तेदारी होती. मोडकळीस आलेल्या पाच-सहाशे खुर्च्या असलेल्या या टॉकीजचा पाठिराखा दुय्यम, तिय्यम दर्जाचा प्रेक्षक होता. त्याला दर्जेदार कहाणी, सामाजिक संदेशाशी फारसे देणेघेणे नव्हते. दिवसभर काम करून आंबलेले मन मनोरंजनात बुडवून टाकण्यासाठी येथे लोक संध्याकाळ आणि रात्रीच्या शोला गर्दी करत. त्यामुळे सकाळ, दुपारचा शो म्हणजे प्रेमी, लफडेबाजांसाठी सुवर्णसंधी होती. मल्टीप्लेक्सवाले जशी गर्दी पाहून तिकिटाचा दर कमी जास्त करून टाकायचे. तशी सोय तेव्हा नव्हती. नाहीतर प्रेमी जोडप्यांकडून भलीमोठी कमाई करता आली असती. जुन्या औरंगाबादचे वैभव असलेली गुलजार टॉकीज माझ्या अंदाजाप्रमाणे दहा हजार चौरस फुट जागेत बसलेली असावी. त्यातील चार हजार खुली जागा होती. त्यावर संध्याकाळ, रात्रीच्या शोला मध्यंतरात मोठी मजा असायची. चटकदार भेळ, गरमागरम भजी, वडे, समोशाचे दोन गाडे असायचे. भल्यामोठ्या परातीत शेंगदाणे रचून त्यावर एक छोट्याशा मातीच्या भांड्यात भट्टी लावलेले तीनचारजण लोकांना खेचायचे. शिवाय गोटी सोडाची एक हातगाडी होती. त्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या, चॉकलेटी रंगाच्या बाटल्या ठेवलेल्या असायच्या. मध्यंतरात गाडीला सोडाप्रेमींचा गराडा पडायचा. सोडावाला आणि त्याचा कर्मचारी मोठ्या झोकात बाटलीचं झाकण उघडायचा. त्याचा टॉ … S S S क असा आवाज यायचा. फेस उसळायचा. सोड्याच्या चव घशात ठेवूनच लोक पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी पळायचे. गुलजारकडून थोडं पुढं सराफ्याकडं जाताना अगदी चिंचोळ्या, अंधारलेल्या गल्लीत रिगल टॉकीज होती. खरं तर एवढ्या दाटीवाटीच्या वस्तीत चांगली सहा-सातशे खुर्च्यांची टॉकीज म्हणजे आश्चर्यच होतं. पण जुन्या औरंगाबादमध्ये त्या काळात ते सहज शक्य झालं. कारण साठ-सत्तर वर्षांपूर्वी शहर फारसे गजबजलेले नव्हते. आणि निर्जन ठिकाणी टॉकीज करणं वेडेपणा. त्यामुळं मला वाटतं १९५१-५२मध्ये मालकानं योग्य निर्णय घेतला. हळूहळू रिगलला दुकानांनी घेरले. मग ती बंद पडली. आणि १९८०-८१मध्ये पुन्हा रसिकांच्या सेवेत आली. त्या काळी सोशल मिडिआ नाही. अनेक पेप्रावाले सिनेमाबद्दल सांगणं म्हणजे भ्रष्ट झालो, असा अविर्भाव आणत. त्यामुळं रिगल पुन्हा सुरू झाल्याची बातमी कळाल्यावर खूप लोक तिथं गल्लीत येऊन दुकानदारांना विचारून खात्री करून घेत. रविवार दिवस इथं खास असायचा. लष्करी छावणीतील वीस-बावीशीतले सैनिक सायकली घेऊन शहरात यायचे. किरकोळ खरेदी, एखाद्या हॉटेलात नाश्ता पाणी आणि सिनेमा असा त्यांचा बेत असायचा. मजबूत अंगकाठीच्या, उंचापुऱ्या, खळखळून हसणाऱ्या सैनिकांची गर्दी रिगलपाशी जास्त असायची. कारण काचीवाडा आणि इतर भागांतील पंधरा-वीस वेश्या तिथं दुपारच्या वेळी आलेल्या असायच्या. सैनिक येत म्हणून त्या यायच्या की वेश्यांवर तरुणाईतील गर्मी उधळण्यासाठी लष्करी यायचे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मागणी तसा पुरवठ्याचा नियम यातही लागू होतोच. तर रंगरंगोटी केलेल्या, भडक रंगाचे ब्लाऊझ, साडी नेसलेल्या या वेश्या दुकानांसमोर, टॉकीजच्या दरवाजाजवळ उभ्या असायच्या. त्यांच्याजवळ तिकीटे असायची. यातील बहुतांशजणी सैनिकांपेक्षा थोड्या अधिक वयाच्या असाव्यात. तीस-बत्तीशीच्या. ज्या सैनिकासोबत त्यांचा व्यवहार पक्का होत असे. त्याला घेऊन त्या टॉकीजमध्ये जात. जणूकाही नवरा – बायको अशा झोकात डोअरकिपरला तिकीट देत. त्यालाही हे सारं माहिती असल्यानं तो गालातल्या गालात हसत असे. पण काही सैनिकांना सिनेमात स्वारस्य नसे. मग तो तिला सायकलवर बसवून मोठ्या खुशीत, शिट्टी वाजवत घेऊन जायचा. शहागंज भागातून तिला एखादं घड्याळ, साडी किंवा चप्पल खरेदी करून द्यायचा. त्या काळात किमान सैनिक-वेश्येच्या किमान तीन चार प्रेम कहाण्या रिगलच्या साक्षीने फुलल्या असतील. १९९५नंतर पुन्हा रिगल वादात अडकली आणि बंद पडली. ती कायमचीच. सात-आठ वर्षांपूर्वी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला डर्टी पिक्चर प्रचंड गाजला. त्यात तिनं १९७० ते १९९० मध्ये प्रचंड गाजलेल्या साऊथ सेक्स बाँब सिल्क स्मिताची भूमिका केली. डर्टी पिक्चरमध्ये अर्थातच अनेक गरमागरम प्रसंगांची रेलचेल होती. शिवाय त्यातून सिल्क स्मिताच्या व्यक्तिगत जीवनाची थोडीशी माहिती सर्वांसमोर आली. कमालीची मादक, सेक्स बाँब असली तरी ती माणूस म्हणून पूर्णपणे अपयशी होती. तिनं काहीजणांचे आणि काहीजणांनी तिचं शोषण केलं. प्रेम मिळत नाही, असं म्हणून तिनं अकाली जीवन संपवलं. आणि ती प्रसिद्धीच्या आणखी एका लाटेवर आरुढ झाली. तिची औरंगाबादकरांना पहिली ओळख सदमा सिनेमातून १९८३ मध्ये झाली. पण तिचा सर्व वर्गात प्रचार, प्रसार झाला तो शहागंज सिटी चौक रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत लपलेल्या मोहन टॉकीजमध्ये. एखाद्या गोदामासारखं रूप असलेल्या मोहनची सुरुवात धर्मेंद्र – झीनत अमानच्या शालिमार सिनेमानं झाली होती. पहिला शो सकाळी आठ वाजताच होता. तुफान गर्दी उसळली होती. जेवढ्या वेगात शालिमार वर गेला तेवढ्याच वेगानं खाली आला. पुढं मोहनमध्ये मुकद्दर का सिकंदर, सरगम असे सिनेमे प्रचंड चालले. पण बहुधा बडे सिनेमा वितरक आणि मोहनच्या मालकांचा खटका उडला असावा. मोठ्या बॅनरचे, लोकप्रिय सिनेमे येणे कमी होत गेले. त्यांची जागा देशी ब्ल्यू फिल्म कॅटेगरीत टाकता येतील, अशा दक्षिणेतील सिनेमांनी घेतली. टॉकीजच्या एंट्री पॉईंटला म्हणजे अगदी वर्दळीच्या रस्त्यावर या सिनेमातील नट्यांची तुफानी पोस्टर्स लागलेली असायची. अजिंठा पेपरमध्ये भल्यामोठ्या टायपात अत्यंत उत्तेजक जाहिराती असायच्या. सोबत इतर उत्तान फोटो. तो पाहून लोक जायचे. त्यांना काहीवेळा रंगात आलेला सिनेमा ऑपरेटर थेट पाश्चिमात्य सिनेमाचा काही भाग दाखवायचा. चेकाळलेली तरुणाई ऑपरेटरची करामत मीठ मसाला लावून दहा मित्रांना सांगायची. मग काय प्रत्येक शो हाऊसफुल्ल. पाऊल ठेवायला जागा नसायची. पाच रुपयांचं तिकीट पंचवीसलाही मिळवता मिळवता मारामार व्हायची. मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मागील बाजूला नाचगाण्याचे कोठे होते. शौकिन लोक सिनेमा पाहून तिथं जात. वीस – पंचवीस वर्षांपूर्वी कोठेवाल्या परागंदा झाल्या. काहीजणींनी कुंटणखाने सुरू केले. इकडे मोहनच्या इंग्रजी सिनेमा प्रेमाची महती पोलिसांकडे पोहोचली. मग त्यांनी धाडी टाकण्याचे नाटक केले. खिसे गरम होताच नाटकावर पडदा पाडला. महत्वाचा मुद्दा म्हणजे मोहनमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची मालिका सुरू होण्याच्या काळात रंगारगल्लीसह काही ठिकाणी व्हिडिओ पार्लर सुरू झाली होती. तिथं थेट ब्ल्यू फिल्म दाखवल्या जायच्या. पार्लर खच्चून भरलेले असायचे. पण एकाच वेळी वीस-पंचवीसपेक्षा जास्त शौकिनांसाठी जागा नसायची. शिवाय ब्ल्यू फिल्म म्हणजे त्यात ना कहाणी ना भारतीयपणा, ना भारतीय चेहरे. त्यामुळे पार्लरनी मोहनचे फारसे नुकसान केले नाही. मोहनचा धंदा जोरात सुरू राहिला. तो तसाच राहिलाही असता. पण म्हणतात ना की, कोणतीही गोष्ट मग ती चांगली असो की वाईट. टिपेला जाऊन तुटते. तिची घसरण होतेच. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला या जगाच्या इतिहासात कोणीही आव्हान दिलेलं नाही. तर मोहनच्या गरमागरम सिनेमांना इंटरनेटचं ग्रहण लागलं. मोठ्या पडद्यावर जे काटून छाटून दाखवलं जात होतं. त्याच्या एक हजार पटींनी जास्त उघडंनागडं, बिभत्स मोबाईलवर दोन-तीन रुपयांत मिळू लागलं. मग मोहनकडं जाणाऱ्यांचा ओघ कमी कमी होत गेला. अर्थात तो अजून पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचं संकट संपल्यावर कदाचित पुन्हा मोहन फुलेल. मोठ्या पडद्यावर सर्व काही पाहण्याची मौज लुटणारे आंबटशौकिन मोहनला तारतील. त्यावेळी बहुधा शहागंजातील स्टेट टॉकीजशी मोहनची स्पर्धा असेल. कारण स्टेटमध्येही १९९० नंतर अश्लिल सिनेमांचे माहेरघर तयार झाले. खरेतर स्टेट म्हणजे औरंगाबादच्या सिनेइतिहासाचा मानबिंदू. अनेक मोठ्या कलावंतांनी स्टेटला भेट दिली. हिंदी सिनेमा जगात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलेला शोले इथेच लागला होता. तेव्हा औरंगाबादलगतच्या खेड्यातून लोक टांगा, बैलगाडीनं येत. स्टेटच्या आवारात टांगा, बैलगाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था होती. तेव्हाच्या पेप्रात स्टेटच्या मालकांविषयी बरंच चांगलं छापून येत असे. मुबलक पैसा बाळगणाऱ्या स्टेटच्या मालकांना बहुधा कौटुंबिक अडचणींनी ग्रासलं असावं. त्यामुळे त्यांचे लक्ष कमी होत गेले. वितरकांशी संबंध बिघडले असावेत. त्यामुळे चांगल्या सिनेमांचे प्रमाण झपाट्याने घसरत गेले. त्याऐवजी भडक सिनेमे झळकू लागले. इंटरनेटच्या आक्रमणानं मोठ्या पडद्यावरील सेक्सचे आकर्षण संपवून टाकले. त्याचा परिणाम स्टेटवर होत गेला. कोरोनापूर्वीच्या तीन-चार वर्षात स्टेट फक्त बातम्यांपुरतीच चर्चेत राहिली. जवळपास मोहन, स्टेटएवढेच आयुष्य आणि त्याच स्वरूपातील अडचमी असलेल्या सादिया टॉकीजने कधी कायमस्वरूपी आंबट मार्ग स्वीकारला नाही. जुन्या औरंगाबादच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सादियाला समोरच्या बाजूनं मोठं मोकळं मैदान लाभलं होतं. इथं औरंगाबादकरांना नेहमीच चांगले सिनेमे पाहण्यास मिळाले. अधूनमधून इंग्रजी सिनेमेही लागत पण तेही दर्जेदार असतील, याची काळजी टॉकीजमालक घेत. मल्टीप्लेक्सचे युग सुरू झाल्यावरही ते सिंगल स्क्रिनवर कायम राहिले. त्याचा तोटा त्यांना झाला. हक्काचा प्रेक्षक कमी कमी होत गेला. सादियाच्या कँटीनमध्ये त्या काळात मिळणारे सँडविच अफलातून होते. अत्यंत चविष्ट असे हे सँडविच खाण्यासाठी ठिकठिकाणाहून खवय्यै येत. तृप्त होऊन जात. आता जर तो सँडविचवाला असता तर नक्कीच वर्षभरात लखपती आणि नंतर करोडपती झाला असता. मल्टीप्लेक्स अवतरण्यापूर्वी औरंगाबादचा सिनेमा अंजली टॉकीजनं बदलला. १९८१मध्ये सावे कुटुंबियांनी सुरू केलेल्या अंजलीनं दर्जेदार सेवा म्हणजे काय याचा अनुभवर रसिकांना दिला. प्रशस्त जागा. आरामदायक खुर्च्या आणि उच्चप्रतीचा पडदा, असा त्रिवेणी संगम अंजलीत होता. भारतातील सर्व मोठ्या वितरकांशी सावे कुटुंबियांची थेट ओळख असल्याने त्या काळात सर्वोत्तम सिनेमे अंजलीतच येत. जेम्स बाँड, उर्सूला अँड्रेसच्या सिनेमांचे दर्शन अंजलीनेच घडवले. सुपरमॅन, सुपरवुमन असे हॉलिवूडपट येथेच पाहण्यास मिळाले. एवढेच नव्हे तर नट-नट्यांच्या पत्रकारांशी गप्पा असा नवा ट्रेंड त्या वेळी सावेंनी सुरू केला. टॉकीजवर टॉकीज हा प्रकारही औरंगाबादकरांनी अंजली – संगीताच्या रुपात पाहिला. संगिता म्हणजे आजकालच्या मल्टीप्लेक्ससारखं रूप होतं. फार झालं तर दीड-दोनशे खुर्च्या होत्या. त्यात लोकांना बऱ्यापैकी मराठी आणि दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे पाहण्यास मिळत. औरंगाबादमध्ये नव्या संस्कृतीचा पाया रचणारी आणखी एक टॉकीज होती सत्यम. रेल्वे स्टेशन एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला सत्यमची सुंदर, आखीव, रेखीव इमारत होती. हॉरर इंग्रजी सिनेमे पाहायचे असतील तर सत्यमशिवाय पर्यायच नाही, अशी १९९०मध्ये स्थिती होती. इंग्रजीप्रेमी रसिकांची चांगली गर्दी होत होती. पण तेवढ्यावर बहुधा टॉकीजचा खर्च चालत नसावा. सिनेमे आणून लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा निवासी इमारती बांधून पैसा कमावणं टॉकीजमालकाला सोपं वाटलं असावं. एक दिवस सत्यम बंदची घोषणा झाली. रॉक्सी टॉकीजचंही हेच झालं. तिथं आता दुकानंच दुकानं झाली आहेत. एकीकडं असं चित्र असताना मोक्याच्या जागेवरील अंबा-अप्सरा, अभिनय, अभिनित टॉकीज सर्व संकटांना तोंड देत उभ्या आहेत. औरंगाबादेतील सिनेमाहॉल संस्कृती टिकवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या मालकाला, व्यवस्थापनाला जेवढे सलाम करावेत, तेवढं कमी आहे. चार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका महाकाय माध्यम समूहाच्या एमडींनी सिनेमा टॉकीजचे काय होणार ते सांगितले. ते म्हणाले होते की, नेटफ्लिक्स ही अमेरिकन कंपनी पुढील काही वर्षांत भारतामध्ये किमान २५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. बिग ते लो बजेट सिनेमे मोबाईलवरच रसिकांना पाहण्यास मिळावेत, अशी व्यवस्था नेटफ्लिक्स करणार आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स संस्कृती येत्या काही वर्षांत मोडकळीस येणार आहे. अर्थात भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. सिनेमा ही टॉकीजमध्ये जाऊनच पाहायची गोष्ट असते, यावर ठाम विश्वास असलेले कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स सुरू राहतील. फक्त मध्यम, उच्च मध्यमवर्गीय रसिक मोबाईलवर झपाट्याने वळेल. त्यामुळे टॉकीजची भरभराट होणे कठीण आहे. हळूहळू त्यांची आर्थिक गाडी घसरू लागेल. दहा-बारा वर्षांत हे सर्व होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. तो दोन वर्षांतच खरा ठरू लागला आहे. अर्थात त्यात कोरोनाचा वाटा खूप मोठा आहे. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे की, संकटं कायमस्वरूपी मुक्कामी नसतातच. एकदा माणूस लढण्यासाठी तयार झाला की ती माघार घेतात. पळून जातात. त्यामुळं येत्या वर्षाच्या मार्चमध्ये कोरोना अखेरचे आचके घेत असेल. तोपर्यँत टॉकीज नव्या रुपात, पूर्ण ताकदीनं उभ्या राहतील. मोबाईलमधून बाहेर पडलेल्या रसिकांच्या वर्दळीनं गजबजतील. मल्टीप्लेक्सची जागा वेगळ्याच रचनेतील सिंगल स्क्रिन घेतील. टॉकीज संस्कृती मोडीत काढण्याचं नेटफ्लिक्सवाल्यांचं स्वप्न मोडीत निघेल. उलट ते त्यांचे सिनेमे टॉकीजमध्ये दाखवू लागतील. सिनेमाच्या मध्यंतरामध्ये पुन्हा सोड्याच्या बाटलीची झाकणं टॉ … क असा आवाज करून उघडू लागतील. वडे, भेळ, समोसे, भज्यांचा गंध दरवळेल. औरंगाबादचं जग गुलजार होऊन जाईल, असं वाटतंय.

Wednesday, 10 November 2021

फाळणी : द्वेषाची पेरणी

धर्म, जात असं काही नसतं. शेवटी माणुसकी हाच खरा धर्म. धर्म म्हणजे अफुची गोळी. धर्माच्या आधारावर निर्माण होणाऱ्या राष्ट्राचे काही खरं नाही, असा प्रचार, प्रसार गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरु असला तरी प्रत्यक्षात धर्म, जातीभोवतीच गेली किमान दहा हजार वर्षे पृथ्वी फिरत आहे. माणुसकीचा अनुभव वैयक्तिक पातळीवर येत असला तरी मानवी समूहातून ती केंव्हाच परांगदा झालीय. धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली बहुतांश राष्ट्र बऱ्यापैकी जगत आहेत. खडतरपणे का होईना पाकिस्तान, बांगलादेश या कट्टर इस्लामी देशांची वाटचाल सुरु आहे. ते भारतात सामिल, विलीन होण्याची शक्यता नाही. पश्चिम आणि पूर्व जर्मनीसारखं भारतीय उपखंडात होणे नाही. कारण दुसऱ्या महायुद्धातील विजयानंतर कम्युनिस्ट आणि भांडवलशाही शक्तींनी जर्मनीचे राजकीय विचारसरणीनुसार तुकडे पाडून घेतले होते. दोन्ही बाजूंच्या जर्मनांमध्ये एकमेकांविषयी खरेच प्रेम होते. रक्ताच्या थेंबाथेंबात मुरलेल्या धर्माचा, त्यातील द्वेषाचा मुद्दा नव्हता. बर्लिनची भिंत पाडण्यासाठी दोन्ही बाजूंचे लोक धावले होते. तशी स्थिती इथे नाही. उलट कमालीचा द्वेष पसरला आहे. फाळणीने तो कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत गेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लढतीत त्याचा अनुभव आला. भयंकर महायुद्ध. ते भारत जिंकणारच. जिंकायलाच हवे, अशी मिडिआवाल्यांनी हवा तयार केली. तशा बातम्या छापून आणल्या गेल्या. दाखवल्या गेल्या. आणि भारताने हजार टक्के सपाटून मार खाल्ला. मग भारतातील कश्मिर प्रांताच्या तरुणांनी पाक जिंकल्याचा जल्लोष साजरा केला. त्यानं भारतात पाकविषयी धार्मिक द्वेष आणखी वाढला. खरं तर दोन कब्जेदारांत प्रॉपर्टीची वाटणी झाली. सुरुवातीची काही वर्षे दोघेही जे हवे ते मिळाले म्हणून खुश होते. हलके हलके का होईना एकमेकांचे गोडवे गात होते. त्यामुळे झालं ते बरंच झालं. धार्मिक द्वेष आटोक्यात राहिल, असं जगाला वाटू लागलं. पण नंतर गोडव्याचे सूर अत्यंत कडवट, हिंसक होत गेले. एकाच्या दोन फाळण्या होऊन भारत, पाकिस्तान, बांगलादेशात कायम अस्वस्थता आहे. तिन्ही देशांतील लोक भूभागाचे तुकडे करण्यातून द्वेषापलिकडे काहीही शिकलेले नाहीत. अडीच महिन्यांपूर्वी अफगणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यावर जी राजकीय, सामाजिक, आर्थिक समीकरणे तयार होत आहेत. देशांच्या सीमेवर ज्या घडामोडी होत आहेत. तिन्ही देशात आणि आसपास राजकारण जे वळण घेत आहे. ते पाहता फाळणीविषयी प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार विचारमंथन करणे आवश्यक आहे. या मंथनासाठी प्रतिभा रानडे यांचे फाळणी ते फाळणी हे दस्तावेजी पुस्तक भरीव मदत करते. येणाऱ्या काळात काय घडू शकते, याचे संकेत देते. फाळणीच्या पोटात दडलेला द्वेष समजून घेण्यात, समजावून सांगण्यात महत्वाची भूमिका बजावते. एक तपापूर्वी म्हणजे २००९ मध्ये राजहंस प्रकाशनातर्फे ‘फाळणी ते फाळणी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्या वेळेपेक्षा आता त्यातील माहितीमूल्य निश्चित वाढले आहे. काही संदर्भ अधिक खोलवर जाऊन काही सांगत आहेत, असे लक्षात येते. रानडेंनी इतिहासकाराप्रमाणे अतिशय चिकाटी, तटस्थपणे फाळणीचा, पाकिस्तान जन्माचा अभ्यास केला. त्यासाठी आवश्यक पुस्तके अमेरिकेतून मिळवली. मुंबई विद्यापीठातील एशियन सर्व्हे आणि इतर देशी-विदेश नियतकालिकांचे वर्षानुवर्षांचे अंक अभ्यासण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. त्यामुळेच त्यांना या चार प्रकरणांच्या २०९ पानी पुस्तकात सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी सांगता आल्या आहेत. उदा. फारुख अब्दुल्लांचे वडिल शेख अब्दुल्ला पाकिस्तानकडे कसे झुकले होते, याची माहिती त्या देतात. मोहंमद अली जिनांनी २३ जुलै १९४३ रोजी फाळणीविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेण्याचे ठरवले होते. आणि या भेटीची बातमी पेप्रांमध्ये प्रसिद्ध होऊ नये, अशी व्यवस्थाही केली होती, असं त्या सांगतात. १९५३ साली लाहोरमध्ये अहमदिया पंथियांचे शिरकाण झाले. त्याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती मोहंमद मुनीर, कयानी यांचा आयोग नेमण्यात आला. त्याच्यासमोर घटना समितीचे सदस्य भूपेंद्रकुमार दत्त, राजकुमार चक्रवर्ती काय म्हणाले. आणि शेवटी न्यायमूर्ती मुनीर यांनी काय् अहवाल दिला, या सह रानडे यांनी पानापानांवर सांगितलेल्या अनेक गोष्टी चारही दिशांना चौकसपणे पाहण्यास सांगतात. मिडिआतून जे पेरले जाते. त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा संदेश देतात. विशिष्ट अजेंडा ठरवून काहीजण काहीही लिहित, बोलत असले तरी प्रत्यक्षात काय घडते, हेच महत्वाचे असते. म्हणून ऐतिहासिक तथ्य, पुराव्यांतून मांडणी करणारे ‘फाळणी विरुद्ध फाळणी’ पुस्तक आता नव्या घडामोडी डोक्यात ठेवून अभ्यासू मनाने वाचावे असे नक्कीच आहे.

Saturday, 30 October 2021

शालिन तलवार

भारतातील सर्वात मोठे राज्य, सर्वाधिक मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याच्या प्रचाराचा ढोल-ताशे आतापासूनच वाजण्यास सुरूवात झाली आहे. जात-धर्म हा भारतीय समाजाचा राजकीय पाया आहेच. तो उत्तर प्रदेशात अत्यंत मजबूत आणि गुंतागुंतीचाही आहे. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी काँग्रेस, समाजवादी आणि इतर काही पक्षांची धडपड सुरू आहे. त्याचा आधार घेत भाजप हिंदू मतांची मोट बांधत आहे. जसजसे निवडणुकीचे वातावरण तापत जाईल तसतसे धार्मिक तेढ वाढवण्याचे प्रकार वाढीस लागणार आहेत. त्यासाठी नवनवीन फंडे वापरले जातील. काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशात राजकारण्यांच्या तेढीला साहित्य जगतातून ठोस उत्तर दिले जात असे. ते ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्या समाजातील काही मंडळी चूक करत असतील. प्रक्षोभक वक्तव्ये करत असतील. साहित्यिक मंडळी समाजाचा एकोपा कायम राखण्यासाठी धडपडत. त्यांच्या कलाकृतींमधून प्रागतिक विचारांचा संदेश दिला जात असे. पण हळूहळू असे तडाखेबंद, निस्पृह आणि प्रगतीशील साहित्यिक झुंडशाहीमुळे लोप पावत आहेत. जे काही शिल्लक आहेत त्यांचा आवाज क्षीण होत आहे. राजकारण तर बाजूला राहू द्या दुटप्पी समाजावर प्रहार करण्याचाही त्यांना विसर पडला आहे. हे सगळे पाहून इस्मत जुगताई यांची प्रकर्षाने आठवण येते. ३० वर्षांपूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर १९९१ रोजी या जगाचा निरोप घेणाऱ्या इस्मत यांचे जीवनचरित्र, लेखन अतिशय हृदयस्पर्शी, बोलके होते. वैयक्तिक जीवन एका रंगाचे आणि लेखन अनेकरंगी असा दुहेरी चेहरा त्यांनी ठेवला नाही. वेळप्रसंगी समाजाशी संघर्ष करण्याची, चुकीच्या प्रथांवर बोट ठेवण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्या उर्दूतील नवसाहित्याच्या आधारस्तंभ होत्या. इस्मतचा अरेबिकमध्ये अर्थ पवित्र तसेच शालिन, नम्र असा होतो. साहित्यिक भाषेतच बोलायचे झाले तर त्या पवित्र तर होत्याच. शिवाय शालिन तरीही धारदार तलवार होत्या. मुक्तपणे आणि अत्यंत निर्भयतेने त्यांनी लिखाण केले. तत्कालिन समाजव्यवस्थेवर टीका केली. बिनधास्त मांडणी करत समाजमन ढवळून काढले. असे असले तरी त्यांच्या सर्व लिखाणात मानवी समूहाविषयी कमालीची करूणा दिसून येते. उत्तर प्रदेशातील बदायू शहरात २१ ऑगस्ट १९१५ रोजी नुसरत आणि कासीम बेग चुगताई दांपत्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. चुगताई कुटुंबातील दहा मुलांमध्ये त्यांचा क्रमांक नववा होता. वडिल न्यायाधीश होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे इस्मत यांचे बालपण अलिगढ, आगरा, जोधपूरसह अनेक शहरात गेले. त्या वेळी त्यांनी जी भारतीय संस्कृती पाहिली, अनुभवली त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या बहिणी वयाने त्यांच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. विवाह होऊन त्या सासरी गेल्याने इस्मत यांचे बालपण भावांसोबत गेेले. म्हणून मुलांमध्ये असलेला एक प्रकारचा बंडखोरपणा त्यांच्यात आला. घरात साहित्यिक वातावरण होतेच. विविध प्रकारचे भरपूर साहित्य त्यांनी वाचले. वाचनाचा दिनक्रम सुरू असताना लोकांना जे आवडते ते लिहिणार नाही. मला जे वाटते तेच लिहिन असा निश्चय त्यांनी केला होता. हा निश्चय त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत अंमलात आणला. स्वातंत्र्यपूर्व काळात लिहाफ ही त्यांची पहिलीच कथा प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल झाला. तेव्हा त्यांच्या सासरेबुवांनी इस्मत यांच्या पतीला म्हणजे शाहीद यांना एक पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की, ‘लिखाणासाठी खटला दाखल होणे ही काही फार चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इस्मतने रोज अल्लाह आणि प्रेषितांचे नामस्मरण करावे. आम्हाला तिची काळजी वाटते.’ अशा प्रकारचा काळजीवजा पाठिंबा सासरच्या मंडळींकडून त्यांना मिळाला. या बाबत त्या नशिबवानच होत्या. त्यामुळे घराबाहेरील लढाई त्यांना खंबीरपणे लढता आली. भारतीय साहित्यातील वास्तववादी, परखड लेखक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. आता ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अनेक साहित्यिक मंडळी मनासारखा वापर करतात. त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांना अधिकार आहे, असे त्या मानत. त्यानुसार त्या जगल्या. प्रत्येक साहित्यकृतीतून स्त्री-पुरुष समानतेचा घोष केला. त्यांनी कायम निम्नमध्यमवर्गीय मुस्लिम समाजातील शोषित, पिडित महिलांच्या जीवनाचे चित्रण केले. कथा लेखन हा त्यांचा आवडीचा प्रांत होता. शिवाय गरम हवा, जुगनू, छेडछाड आदी तेरा सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. अशा या चतुरस्त्र लेखिकेची उणिव दिवसेंदिवस वाढत आहे, हीच त्यांच्या व्यक्तिमत्व आणि लेखनाची ताकद आहे. होय ना?

Tuesday, 19 October 2021

कितीजण विहीर उपसतील?

केवळ औरंगाबाद, मराठवाडाच नव्हे तर पूर्ण राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वर्तुळात प्रचंड वावर असलेले प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा भयानक पद्धतीने खून झाला. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजेपासून सोशल मिडिआवर ही बातमी व्हायरल होताच खळबळ उडाली. उच्चवर्गीय वसाहतीत, आलिशान बंगल्यात राहणाऱ्या प्राध्यापकाचा खून म्हणजे चोरी किंवा दरोड्याचा प्रकार असावा, असेच वाटले. पण घरातून एकही वस्तू चोरीस गेली नाही. कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. शिंदेंना चाकूने भोसकले नाही तर त्यांचा गळा चिरला, दोन्ही हातांच्या नस कापण्यात आल्या. हे कळाल्यावर काहीतरी वेगळाच प्रकार आहे, या दिशेने चर्चा सुरु झाली. प्रा. शिंदे देखणे, उमदे, लोकप्रिय हायप्रोफाईल व्यक्तिमत्व. त्यांच्या पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापक. त्यामुळे घटनेचं महत्व लक्षात घेऊन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा फार झालं तर सायंकाळी मारेकरी जेरबंद होणार अशीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. कारण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी ठोस पुरावेच नव्हते. मोठ्या शिताफीने कट रचून प्रा. शिंदेंना मारण्यात आलं होतं. कुठेही मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हेत. शिंदेशी झटापट झाल्याच्या खाणाखुणा नव्हत्या. रात्री बारानंतर घरात कोणी आलं आणि बाहेर पडलं, असंही दिसत नव्हतं. मनीषा शिंदे आणि त्यांची मुले एकच घटनाक्रम सातत्याने सांगत होती. त्यात विसंगती सापडत नव्हती. त्यामुळे मारेकरी समोर दिसत होता. त्याचा वावर, त्याचे बोलणे, खून होण्यापूर्वी त्याने वापरलेला मोबाईल डेटा हे सारे त्याच्या दिशेने जात असले तरी त्याच्याभोवती घेराबंदी करणे पोलिसांना मुश्किल होत गेले. मग त्याला बोलते करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबण्यात आले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एसआयटी स्थापन झाली. काही महिला अधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली. चारही बाजूंनी हलकल्लोळ केल्यावर मारेकऱ्यानं हत्यारे शिंदेंच्या बंगल्याजवळील विहीरीत टाकल्याची कबूली दिली. आणि वडिलांना का मारले, याचेही एक कारण सांगितले. अनेक तास विहीरीतील पाणी, कचरा उपसून हत्यारे काढण्यात आली. मग ही घटना कशी आणि का घडली. याचा उलगडा १८ ऑक्टोबरला सायंकाळी पोलिसांनी केला. तरीही पूर्ण उलगडा झालाच नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कारण प्रा. शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना कसे कळाले नाही. कळाले तर त्यांनी त्याला रोखले का नाही. वडिल रक्ताच्या थारोळ्यात असताना गाढ झोपेतील आईला न उ‌ठवता मुले रुग्णवाहिका आणण्यासाठी घराबाहेर कशी पडू शकतात. प्रा. शिंदे यांच्या आई-वडिलांनी या बद्दल नेमकी काय माहिती दिली. मुलीविषयी शिंदेची विचित्र वागणूक होती काय? एकूणातच शिंदे कुटुंबातील परस्परांशी नाते कसे होते, याविषयी उलटसुलट माहिती येत आहे. त्याची ठोस उत्तरे उलगड्यातून मिळत नाहीत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू होताच जोडीदाराचा नवा चेहरा दिसल्याचे शेकडो पती-पत्नीला वाटू लागले. त्यातूनही काही दुरावलेले संबंध जुळून आले. धाडस दाखवून अनेकांनी स्वत:च्या खासगी आयुष्याची गाळाने भरलेली विहीर उपसली. कुटुंब हीच खरी संपत्ती. प्रामाणिकपणे नाती जपली तरच जीवन आनंदी ठरते, याचा शोध त्यांना लागला. अशी विहीर उपसण्याची आणखी किती जणांची तयारी आहे, हा प्रा. शिंदे प्रकरणाने समाजासमोर उभा केलेला खरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.

Wednesday, 13 October 2021

भानुमतीची माया

कोणत्याही समस्येवर राजकारणी मंडळींची आश्वासने म्हणजे तथ्य कमी आणि बडेजाव, पोकळपणा जास्त असतो. यात मरण सामान्य माणसाचं, गरिबांचं होतं. त्याचं एक उदाहरण गेल्या महिन्यात अनुभवास आलं. झालं असं की, एका पक्षाच्या लोककलावंत आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गरिबांचा मसिहा अशी प्रतिमा असलेले मंत्री महोदय खास पाहुणे होते. त्यात या महोदयांनी विरोधी सरकारवर जबर टीकास्त्र सोडले. गरिबांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणा ते सरकार कसे विसरले, याची उजळणी केली. त्यावर कलावंतांनी एका स्थानिक नेताजींमार्फत मंत्रीसाहेबांना आठवण करून दिली की, साहेब, तुमच्या सरकारनं आम्हाला ठोस मदतीचं आश्वासन दिलं होतं. कित्येक महिने उलटून गेले. मदत बेपत्ता, फरार झालीय. त्यावर कसलेल्या त्या मंत्र्यानं ‘लवकरच होईल. थोडं थांबा’ एवढंच म्हणत पुन्हा विरोधी सरकारकडे तोफेचे तोंड वळवले. ते पाहून लोककलावंत कमालीचे निराश झाले. आपलं आपल्यालाच लढावं लागणार. राजाश्रयाच्या भाकड गप्पा ऐकण्यापेक्षा लोकाश्रयाकडं वळालं पाहिजे, असं त्यांच्यातील काहीजणांना वाटलं असावं. त्यांच्यासाठी, खऱ्याखुऱ्या दानशूर रसिकांसाठी केरळच्या ए. भानुमती यांची ही खरीखुरी कहाणी. केरळ म्हणजे शास्त्रीय, परंपरागत नृत्य कलांचे आगार. महाराष्ट्राएवढी नसली तरी नाट्यकला तेथे स्थिरावली आहे. पर्यटकांसमोर कथ्थकली आणि अन्य नृत्यांचे सादरीकरण झाल्यावर एखादे छोटेसे नाटक सादर करणारे ग्रुप तेथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. केरळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. ते बऱ्यापैकी पैसे बाळगत असल्याने नाट्य कलावंतांना कुटुंब चालवण्यापेक्षा थोडी जास्तही कमाई होत होती. त्रिसूर येथील ए. भानुमती अशा कलावंतापैकी एक होत्या. वयाच्या पंचवीशीत असताना त्यांनी नाट्यकलेतून पोट भरण्याचा मार्ग निवडला. छोट्या, किरकोळ भूमिका त्या पार पाडत. शिवाय ग्रुपच्या प्रमुखांनी सांगितली ती कामंही करत. त्यातून सुखाचे चार घास मिळत होते. पण पन्नाशी ओलांडली असताना कोरोनाचं संकट कोसळलं. अतिथी हाच देव असलेल्या केरळची अक्षरश: नाकेबंदी झाली. पर्यटकच नाही म्हटल्यावर अर्थकारण ठप्प झालं. अशा स्थितीत सरकारकडून आश्वासनाच्या पलिकडं काहीही मिळणार नाही, हेही भानुमतींच्या लक्षात आलं. त्यांनी बरीच शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना मराठी कलावंतांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण झाली असावी. वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघालंय लंडनला हे एकपात्री नाटक गिनीज बुकात नोंदवले गेले. त्या काळात, तत्पूर्वी आणि नंतरही अनेकांनी एकपात्रीत यश मिळवले. वऱ्हाडचे सादरीकरण सुरुवातीच्या काळात एखाद्या घराच्या गच्चीवर अगदी चार-पाच प्रेक्षकांपुढे होत असे. त्याच धर्तीवर भानुमतींना सुचलेला प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी रंगचेतना नावाचा नाट्यग्रुप मदतीला धावून आला. नवरात्रोत्सवाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी या प्रयोगांना प्रारंभ केला. त्यासाठी त्या राहत असलेल्या एका खोलीच्या भाड्याच्या घरात नेपथ्य रचना केली. कोरोनापूर्वी ज्यांच्या रिक्षातून त्या नेहमी प्रवास करत ते रिक्षाचालक एकमेव श्रोते बनले. त्यांच्यासमोर त्यांनी स्वत: लिहिलेला एकपात्री प्रयोग सादर केला. त्याची संहिता म्हणजे कोरोनामुळे कलावंतांचे काय हाल होत आहेत, याचीच कहाणी होती. त्याचे थेट प्रक्षेपण रंगचेतनाच्या सोशल मिडिआ पेजवर करण्यात आले. भानुमतींची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रसिक मायबापांनी इच्छेनुसार मदत करावी, अशी ओळ प्रक्षेपणाच्या खाली ठळकपणे सांगण्यात आली. आणि राजाश्रयापेक्षा लोकाश्रय किती मोलाचा, भरवशाचा असतो,याचा अनुभव भानुमतींना आला. तासाभरात त्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते. रंगचेतना ग्रुपच्या चौघांचाही रसिक दात्यांमध्ये समावेश होता. पण एका महिला कलावंताने स्वत:च्या अस्तित्वासाठी केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग आणि त्याला नाट्यसंघाने केलेली मदत इथं ही गोष्ट संपत नाही. तर सुरू होते. ठरवलं असतं तर त्या स्व केंद्रित सहज राहू शकल्या असत्या. पण त्यांनी मदतीचं जग आपल्याभोवती ठेवले नाही. उलट त्याचा विस्तार केला. असं म्हणतात की, नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रुपांची आठवण करून देणारा उत्सव. देवीचं एक रुप शैलपुत्री म्हणजे कणखर, खंबीर, निडर. दुसरं रुप कात्यायनी म्हणजे संगोपन, सांभाळ करणारी आणि तिसरं स्कंदमाता म्हणजे करुणामयी. चौथं सिद्धीयात्री म्हणजे प्राविण्य कमावलेली. तर भानुमतीचा अर्थ जादू करणारी, माया रचणारी असा आहे. त्रिसूरच्या भानुमतींमध्ये देवीच्या चारही रुपांचा संगम झाला आहे. त्या कणखर, खंबीर, निडर आहेत. आपल्यासोबतच्या लोकांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना आहे. स्वत:हून मदतीला धावून जाणे, यात त्यांची करुणा दिसते. सर्वात म्हणजे त्यांच्यातील कलागुणामध्ये त्यांनी निपुणता, प्राविण्य मिळवले आहे. कोरोनापूर्वी कदाचित त्यांच्या अभिनयगुणाला एवढा प्रतिसाद मिळाला नसता. तो त्यांच्यातील नाविन्यतेमुळे मिळाला. त्यांनी स्वत:च्या नावाप्रमाणे रसिकांवर अक्षरश: जादू केली. रंगचेतनाच्या मदतीने त्यांनी प्रयोगांचा धडाका लावला. आणि पाहता पाहता १५ कलावंतांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळवून दिली. ती देखील सन्मानाने. सरकारी यंत्रणेपुढे हात न पसरता. रंगचेतनाचे अध्यक्ष ई. टी. वर्गिस सांगतात की, भानुमती यांनी जे केले ते अफलातून होते. त्यांनी जे काही भोगले तेच त्यांनी मांडल्याने त्यातील अस्सलता रसिकांच्या हृदयाच्या आरपार गेली, यात शंकाच नाही. ही मालिका आता थांबणार नाही. कारण हरीश पेराडीसारखे नामवंत कलावंत यात सादरीकरण करून इतरांना स्वत:च्या खिशातून मदत करत आहेत. त्या मागे अर्थातच भानुमती यांच्या प्रयोगाची प्रेरणा आहे. एक सामान्य अभिनेत्री जर हे करू शकते तर आपण मागे का, असा विचार केरळमधील अनेक स्थिरावलेले कलावंत करू लागले आहेत. नवरात्रोत्सव आणि पुढील सणांच्या काळात मालिका अधिक व्यापक होणार आहे. किमान १०० गरजू रंगकर्मींना मदतीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मराठी कलावंतापासून प्रेरणा घेऊन भानुमतींनी शोधलेल्या या मार्गावरून मराठी लोककलावंत चालले तर त्यांनाही सरकारच्या भरवशावर राहून कपाळमोक्ष करून घेण्याची गरज भासणार नाही. होय नाॽ

Tuesday, 28 September 2021

धरतीमातेच्या डॉ. धिर्ती

प्रा. डॉ. इश्तियाक अहमद प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि राजकीय घडामोडींचे परखड अभ्यासक. ते मूळ पाकिस्तानी. पण स्वीडनच्या विद्यापीठात विभागप्रमुखपदी दीर्घकाळ काम केले. तेथेच स्थायिक झाले. त्यांनी भारतीय उपखंडाचा इतिहास मुस्लिम, इस्लाम या अंगाने अत्यंत बारकाईने अभ्यासला आहे. त्यांची अनेक पुस्तके कमालीची वाचकप्रिय आहेत. मोहंमदअली जिना यांच्याविषयी त्यांनी अलिकडील काळात काही नवीन विधाने केली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळाचे ते साक्षीदार असल्याने त्यांच्या लेखनात, व्याख्यानांमध्ये अनेकवेळा भारताची जडणघडण, हिंदू समाज, हिंदुत्ववादी विचारसरणीचा उल्लेख येतो. अशाच एका व्याखान मालिकेत हिंदूधर्मियांतील सामाजिक सुधारणा या विषयावर बोलताना त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, रॉय यांनी त्या काळात म्हणजे १८२०च्या दशकात हिंदू समाजातील वाईट गोष्टी, रुढी मोडीत काढण्याचा चंगच बांधला होता. महिलांना त्यांचे जीवन त्यांच्या इच्छेनुसार जगता आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच सतीच्या प्रथेविरुद्ध त्यांनी अक्षरश: रान पेटवले होते. इंग्रजांकडे पाठपुरावा करून त्यांनी ती प्रथा कायद्याने बंद केली. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. अन्यथा हिंदू धर्मातील इतर अनेक अनिष्ट गोष्टी त्यांनी त्या काळातच संपवल्या असत्या. किंवा त्या दिशेने हिंदूना वाटचाल करण्यास भाग पाडले असते, एवढी त्यांची त्या काळात ताकद होती. असे सांगून डॉ. इश्तियाक अहमद किंचित थबकले आणि म्हणाले, अर्थात कोणताही समाज नवे बदल सहजासहजी स्वीकारत नाहीच. काही वेळा तर छोट्या बदलांसाठीही त्यासाठी खूप वर्षे वाट पाहावी लागते. जिद्दीने पाठपुरावा करावा लागतो. तशी खंबीर, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे जन्माला यावी लागतात. डॉ. इश्तियाक यांचे हे म्हणणे किती सत्य आहे, असे सांगणारी घटना गेल्या महिन्यात घडली. १०५ वर्षे जुन्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेच्या संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली. त्यांचे नाव आहे डॉ. धिर्ती बॅनर्जी. विशेष म्हणजे त्याही राजा राममोहन रॉय यांच्या पश्चिम बंगालमधील आहेत. निसर्ग, धरतीमातेवर निरातिशय प्रेम असलेल्या डॉ. धिर्ती यांचा प्राण्यांचा अधिवास, वर्गीकरण, आकारमान या विषयात गाढा अभ्यास आहे. जंगलातील विविध प्राण्यांचे राहण्याचे क्षेत्र ठरलेले असते. ते क्वचितच क्षेत्र ओलांडतात. त्या मागे नेमकी काय कारणे असू शकतात. हे प्राणी पुढे कुठल्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, याची सखोल माहिती त्यांच्याकडे आहे. झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही अर्थातच इंग्रजांनी भारताला दिलेली एक देणगी आहे, असे म्हणावे लागेल. विपुल निसर्गसंपत्ती आणि हजारो प्रकारच्या प्राणी, श्वापदांचा अभ्यास करणे. त्यांची नोंद ठेवणे यासाठी ही संस्था १९१६ मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. संस्थेची १६ विभागीय केंद्रे असून पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयांतर्गत ही संस्था काम करते. येथे सुमारे ३०० संशोधक आहेत. डॉ. धित्री या पहिल्या महिला संचालक असल्या तरी या संस्थेत काम करणाऱ्या पहिल्या महिलेचा मान १९४९ मध्ये मीरा मनसुखानी यांच्या नावावर आहे. डॉ. धिर्ती बॅनर्जी १९९०मध्ये झुऑलॉजिकल सर्वेमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी महिला संशोधकांचे प्रमाण २४ टक्के होते. आता ते ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. डॉ. धिर्तींनी भारतातील सर्व जंगले पादाक्रांत केली आहेत. व्याघ्रारण्यांमध्ये भटकंती केली आहे. आणखी एक वेगळी गोष्ट त्यांच्यात आहे. ती म्हणजे किटक, माशांविषयी त्यांचा अभ्यास आहे. कोणताही प्राणी मरण पावला की, त्यावर विशिष्ट प्रकारच्या माशा घोंघावू लागतात. अशा माशा पाहून तो प्राणी किती वेळापूर्वी मृत पावला याचा अचूक अंदाज त्या व्यक्त करतात. प्राण्यांकडून मानवाकडे काही जीवघेणे रोग संक्रमित होत असतात. डॉ. धिर्ती यांनी त्याविषयीही संशोधन केले आहे. ते पुढील काळात मानवजातीला उपयुक्त ठरू शकते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सांगितले ते महत्वाचे. त्या म्हणाल्या की, नोकरी आणि कुटुंब यांचा सुरेख समन्वय साधत काम करण्याची नैसर्गिक शक्ती महिलांमध्ये असतेच. पण मला पती, मुले आणि कुटुंबीय, गुरुजनांकडून मोठे पाठबळ मिळाल्याने आवडत्या कामात अधिकाधिक लक्ष घालणे शक्य झाले, असे भाग्य अधिकाधिक महिलांना मिळाले तर भारतीय समाज निश्चित खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

Friday, 24 September 2021

दळणासाठी जाते बदलून काय होईल?

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत मुंबई वगळता प्रभाग म्हणजे बहुसदस्यीय पद्धतीने लोकांना मतदान करायला लावायचे, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांचे निराकरण करणे आणि कामांची एकत्रित जबाबदारी घेणे, हे एका प्रभागात तीन नगरसेवक निवडणूक पद्धतीमुळे सोपे जाते, असे सरकारी कारण पुढे करण्यात आले आहे. पण ते तद्दन गुळगुळीत आहे. खरे म्हणजे बहुसदस्य निवडीमध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात अनुकूल एकगठ्ठा मतदान करून घेणे शक्य असते. त्यात अपक्षांची कोंडी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही पक्षाच्या खुल्या प्रवर्गातील कोणत्याही स्थानिक नेत्याला मैदानात उतरण्याची अधिकाधिक संधी मिळते. असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा युक्तीवाद आहे. तो त्यांनी रेटत नेला. आणि इतक्या ताकदीने रेटला की चार वर्षांपूर्वी एक वॉर्ड एक नगरसेवक अशा घोशा लावणाऱ्या शिवसेनेलाही कोलांटउडी घ्यावी लागली. तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसने काही ठिकाणी बहुसदस्य पद्धतीला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे या निर्णयाचा अध्यादेश निघून तो कितपत टिकेल, याविषयी शंका आहे. जरी तो टिकला तरी पुन्हा वॉर्डांचे आरक्षण, चतु:सीमा म्हणजे हद्दी ठरवणे यासाठी सारी यंत्रणा जुंपावी लागणार आहे. त्यावर पुन्हा कोर्ट कचेऱ्यांचा फेरा पडणार आहेच. बरे, एवढे सगळे करून महाविकास आघाडी सरकारला जे ध्येय गाठायचे आहे, ते प्रत्येक शहरात शक्य होईलच, याची कोणतीही हमी नाही. कारण प्रभाग असो की एक वॉर्ड एक नगरसेवक पद्धत. त्यात आपल्या कामाचा कोण, हे जनता बऱ्यापैकी ओळखते. त्यामुळे बहुसदस्यीय निवडणुकीचा निर्णय म्हणजे मनासारखे दळण पाहिजे म्हणून ज्वारीऐवजी जाते बदलण्यासारखे वाटते आहे.

Wednesday, 15 September 2021

मतदारांचीही लिटमस टेस्ट

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधातील भाजपने खूप ढकलाढकली करून पाहिली. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका शक्य तितक्या दिवस लांबणीवर टाकण्याचा खेळ सुरु झाला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापुढे त्यांना झुकावेच लागले. निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार सरकारचा नव्हे तर निवडणूक आयोगाचा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने मार्गदर्शक कानउघाडणी केली. त्यामुळे आपणच ओबीसींचे तारणहर्ते असा आव आणणारे सर्वच राजकीय पक्ष कोंडीत सापडले आहेत. पण ही कोंडी फोडता येणे शक्य नसल्याने त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. कोणतीही निवडणूक म्हटली की, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आपापली शक्ती जोखून पाहण्याचा एक मार्ग असतो. पण आता ओबीसी आरक्षणाच्या सावटाखाली होणारी ही निवडणूक केवळ शक्ती जोखण्यासोबत सामाजिक समीकरणांची कडवट परीक्षा असेल. राज्यातील मोजक्याच म्हणजे सहा जिल्ह्यांमध्ये मतदान असले तरी पुढील काळात महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण कोणत्या वळणावर जाणार, याची या निवडणुकीत लिटमस टेस्ट होणार आहे. कारण यामध्ये मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जागरूक असणारा मोठा वर्ग सहभागी होत आहे. त्याला ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा एक धारदार कंगोरा आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही या कंगोऱ्याचा आपल्या मतलबासाठी कसा वापर करता येईल, अशा प्रयत्नात आधीपासून आहेत. आता प्रचाराच्या रणधुमाळीत हा वापर अधिक विखारी, विषारी होऊ शकतो. पक्षाचा अधिकृत उमेदवार एक, पडद्याआडचा वेगळा असाही प्रकार होऊ शकतो. जाती - धर्माच्या नावाखाली मतदान ही बाब भारतात अजिबात नवीन नसली तरी तिची व्याप्ती, खोली अशा पद्धतीने वाढणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ही लिटमस टेस्ट फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्यांवर, लोकशाही मार्गानेच होईल, याची जबाबदारी महाराष्ट्रातील सुजाण जनतेलाच घ्यावी लागेल.

Tuesday, 14 September 2021

प्रिया ती रजनी

सरकारी यंत्रणा भ्रष्टाचारात नाकापर्यंत बुडालीय. पोलिसांची लाचबाजी, हप्ताखोरी एव्हरेस्ट शिखरापेक्षा उंचीवर पोहोचलीय. प्रत्येक गोष्ट जात, धर्माच्या जात्यात भरडली जातेय. महिलेला कोंडीत पकडून चिणलं जातंय. रुग्णालये लुटीची केंद्रे झालीत. भ्रष्टाचार दुथडी भरून वाहतोय. पण भ्रष्टाचार, भंपकबाजी अचानक अवतरलेली नाहीये. ती अनेक वर्षांपासून अखंडपणे वाहतेय. समाज, संस्कृतीचाच भाग होतेय. कलावंतांच्या नजरेनं पाहिलं तर पूर्वी लेखक मंडळी लोकांचं दु:ख, वेदना मांडण्यासाठी कळकळीनं लेखण्या सरसावत. दिग्दर्शक संहितेला धारदार बनवत. कलावंत भूमिकेत प्राण ओतत. शंभर टक्के धंदेवाईकपणा, दुकानदारी नसल्याने कलाकृतीत सत्व दिसे. त्याचा थोडाफार परिणाम यंत्रणेवर होत होता. १९८५मध्ये दूरदर्शनवर झळकलेली ‘रजनी’ ही मालिका त्याचेच उत्तम उदाहरण. कुठेही अन्याय दिसला तर लोक सरकारी खाबूदारांना रजनीचा धाक दाखवत. अगदी घरा-घरात तिचा बोलबाला होता. कारण ती भूमिका १९८० च्या दशकातील मराठी अभिनेत्री प्रिया तेंडूलकर यांनी अतिशय आसोशीने साकारली होती. त्यांच्या डोळ्यातून जणूकाही ठिणग्या पडत. प्रत्येक संवादातून त्या आपलंच दु:ख, वेदना मांडतायत, असं लोकांना वाटे. छोट्या पडद्यावरील अँग्री यंग वुमन अशी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्यातील इतर अभिनय पैलूंच्या आविष्काराची शक्यता असताना वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी १९ सप्टेंबर २००२रोजी त्यांनी हे जग सोडले. आता त्यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे ओटीटी, बेव सिरीजमधून उदयास येणाऱ्या कलावंतांच्या नव्या पिढीला मागील वारसा सांगितला तर त्यातून ते काही शिकू शकतील. समाजाच्या दायित्वाची जाणिव ठेवतील. कलेतील धंदेवाईकपणा बाजूला ठेवून स्वत:त सत्व निर्माण करण्यासाठी धडपडतील. संघर्षाशिवाय पदरात पडलेलं टिकत नाही, हेही रजनीचे एपिसोड पाहून त्यांच्या लक्षात येईल. भारतीय रंगभूमीला महत्वाचे वळण देणारे विजय तेंडूलकर यांची मुलगी असल्यातरी प्रियांना रजनीची भूमिका सहज मिळाली नाही. लेखक-दिग्दर्शक बासू चटर्जींनी आधी शर्मिला टागोर, मौसमी चटर्जीचा पाठपुरावा केला. दोघींनी नकार दिल्यावर पद्मिनी कोल्हापूरेंची संमती मिळवली. रजनीच्या भूमिकेतील पद्मिनींचे तीन-चार भागही चित्रित झाले. पण त्यापुढे भट्टी बिघडली. कोणीतरी बासुदांना प्रियांचे नाव सुचवले. पण त्यावेळच्या प्रथितयश फोटोग्राफर्सनी तिचा चेहरा चौकोनी आहे. त्यात आकर्षण बिंदूच नाहीत, अशी टिप्पणी केली होती. मात्र, बासुदांनी हो-ना करत, आढेवेढे घेत प्रियांची निवड केली. आणि प्रियांनी इतिहास घडवला. त्यांना चौकोनी चेहऱ्याची म्हणून हिणवणारे फोटोग्राफर त्यांना एका क्लिकसाठी विनवू लागले. जगभरातील मिडिआ मुलाखतीसाठी रांगा लावू लागला. अभिनयाची क्षमता तर लाखोंमध्ये असते. पण त्यातील मोजक्याच लोकांचा अभिनय रसिकांना आवडत असतो. त्यातील एखाद-दुसऱ्यालाच ते डोक्यावर घेतात. यालाच कलावंतांच्या दुनियेत नशिब म्हणतात. नशिब टिकवून ठेवण्याची वाट खडतर असते. रजनीच्या यशापूर्वी प्रियांनी किमान सात-आठ सिनेमे, दहा नाट्यप्रयोगात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. तरीही त्यांनी एखाद्या शिकाऊ अभिनेत्रीप्रमाणे बासुदांच्या दिग्दर्शनात काम केले. बंडखोर व्यक्तिरेखा साकारत असल्या तरी त्या समंजस व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. बालपणापासून त्यांच्यावर अभिनयाचा संस्कार होत होता. बालवयातच त्यांनी हयवदन नाटकात पहिली भूमिका केली. तेव्हा त्या अभिनेत्री होतील, असा त्यांच्या वडिलांसह अनेकांचा कयास होता. पण कयास चुकवण्याचा आनंद घेणे हा प्रियांचा स्वभाव होता. एखादी गोष्ट शिकायची त्यांना प्रचंड हौस, आवड होती. पण एकदा की ते शिकून झाले. आत्मसात केले की त्यात रमणे, गहिऱ्या पाण्यात उतरणे, त्यातील इतर पैलू शोधणे त्या टाळत. एका ठिकाणी स्थिर राहणे, त्यांना आवडत नव्हते. त्यामुळे आंतरिक उर्मी असूनही त्या चित्रकला शिक्षिका झाल्या नाहीत. पंचतारांकित हॉटेलात नोकरी करताना तेथील महिलांना रात्री-अपरात्री घरी जाताना सुरक्षा रक्षक मिळावा, यासाठी यशस्वी आंदोलन केले. वडिलांसोबत नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होऊन ‘नर्मदा सरोवर क्या करेगा, सबका सत्यानाश करेगा’, अशा घोषणा दिल्या. काही दिवस हवाई सुंदरी, अर्धवेळ मॉडेलिंग, वृत्त निवेदिकेचे काम केले. त्या नाविन्याचा शोध घेणाऱ्या, कल्पक लेखिकाही होत्या. त्यांची पाच-सहा पुस्तके वाचकप्रिय झाली. या चतुरस्त्र अभिनेत्रीच्या वाटचालीतून नव्या पिढीने काही शिकले. अन्याय, अत्याचाराविरुद्ध खऱ्या तळमळीने आवाज उठवला तरच कलावंत आणि रसिकांमधील नाते अधिक बळकट होईल. होय ना?

Tuesday, 31 August 2021

सलिमा : रक्षणासह शांतता

तिकडं काबूल पडलं आणि इकडं जणूकाही नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तालिबान्यांचा झेंडा फडकला आहे. हातात मशिनगन्स घेऊन तालिबानी चांदनी चौकात फिरू लागले आहेत. संसद भवनात त्यांनी सभा भरवली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानच्या मदतीने कश्मिर स्वतंत्र करून टाकला आहे. १३५-१४० कोटींचा भारत देश गुडघे टेकून शरणागती पत्करतो आहे, असं वाटण्याइतपत कोलाहल प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाला. युद्ध नको. त्यांच्याशी बोलाचाली सुरू करा. त्यांना समजून घ्या, असेही सल्ले देण्यात आले. दुसरीकडं पाकिस्तान, चीनलाच कसा धोका आहे, असंही पत्रपंडित भरभरून बोलू लागले. लिहू लागले. खरंतर कोणी कितीही म्हणत असलं तरी क्रौर्य, हिंसा, अतिरेक, द्वेष, अहंकार, गर्व माणसाच्या रक्ताच्या थेंबाथेंबात ठासून भरला आहे. त्यामुळे त्याच्यातील प्रेम, ओलावा, आपुलकी, माणुसकी असे तुलनेने कमी प्रभावी असलेले गुण क्वचित प्रगट होऊन दिसेनासे होतात. माणसाला शांतता हवी असते पण ती कोणाला तरी संपवूनच मिळू शकते, यावर मोठ्या समूहाचा ठाम विश्वास आहे. म्हणून कोणी कितीही म्हटलं तरी पृथ्वीच्या पाठिवर कुठेना कुठे युद्ध सुरू असतं किंवा युद्धासाठीचं वातावरण तयार होत असतं. माणसाला युद्धासाठी फक्त एक कारण हवं असतं. त्यात काहीजण जिवावर उदार होऊन लढतात. तळहातावर शिर घेऊन मैदानात उतरतात. कारण त्यांना त्यांच्या भूमीचं, अस्तित्वाचं, संस्कृतीचं रक्षण करायचं असतं. तर काहीजणांना या रक्षण करणाऱ्यांचं शिरकाण करायचं असतं. लढणाऱ्या आणि रक्षणकर्त्यांमध्ये मुख्यत्वे पुरुषांचा समावेश असला तरी काही महिलाही त्यात आघाडीवर असतात. काही महिलांनी थेट फौजांचे नेतृत्व केले आहे. रणांगणातून पळ काढणाऱ्या पुरुषांना त्यांनी लढण्यासाठी प्रेरणा दिली आहे. अशा काही लढवय्या, धाडसी महिलांमध्ये अफगणिस्तानातील सलिमा माझारी यांचा समावेश झाला आहे. महिनाभरापूर्वी त्या जागतिक प्रसिद्धीच्या पडद्यावर आल्या. एकीकडे महासत्तेने प्रशिक्षित केलेले अश्रफ घनी समर्थक सैन्य अक्षरश: एकही गोळी न झाडता शरणागती पत्करत होते. दुसरीकडे सलिमा तालिबान्यांच्या फौजेशी झुंज देत होत्या. लढता लढता त्यांना तालिबानने कैद केले. सलिमा या शब्दाचा अरेबिक भाषेमधील अर्थ संरक्षण, शांतता असा आहे. या दोन्ही शब्दांना परिपूर्ण अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे व्यक्तिमत्व. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीची द्वारे मुलींसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय गेल्याच आठवड्यात दिला. त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तर सलिमांचे लढवय्येपण अधिक अधोरेखित होते. त्या मूळ अफगाणी. हाजरा समूहाच्या प्रतिनिधी आणि शिया पंथीय. रशियाने अफगणिस्तानात घुसखोरी केली. तेव्हा त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून इराणमध्ये पोहोचले. तेथे १९८०मध्ये सलिमांचा जन्म झाला. तेहरान विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत काम सुरू केले. अमेरिकेने तालिबानचा पाडाव करण्यासाठी घुसखोरी केल्यावर त्या अफगणिस्तानात त्यांच्या मूळ गावी चहारकित येथे पोहोचल्या. २०१८मध्ये त्यांच्या जिल्ह्यासाठी गर्व्हनरपद भरले जाणार असल्याचे कळाल्यावर त्यांनी अर्ज केला. त्यांची निवड झाली. अफगणिस्तानातील त्या पहिल्या महिला गर्व्हनर ठरल्या. या पदावरून लोकांची सेवा करणे त्यांनी सुरू केले. विशेषत: महिलांचे शिक्षण, त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळवून देणे, यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या पुढाकाराने दोन वर्षांपूर्वी सुमारे १०० तालिबानी अतिरेक्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. सलिमांच्या शब्दांनी तो चमत्कार घडवला होता. पुढे काही महिन्यातच अमेरिकन फौजा अफगणिस्तानमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली. आणि या फौजांची माघार सुरू होताच तालिबान देशाचा ताबा घेण्यासाठी हल्ले करतील. त्यांची राजवट म्हणजे महिलांना सर्वाधिक धोका हे सलिमांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने त्यांच्या बाल्ख प्रांतासाठी सैन्य बांधणी सुरू केली. त्यांच्या आवाहनावरून लोकांनी गाई, म्हशी, घरे विकून शस्त्रे खरेदी केली. सलिमांनी तरुणांच्या तुकड्या स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देणे, लढाईसाठी प्रेरणा देणे सुरू केले. त्यांच्या नेतृत्वातील छोटेखानी दलाने तीन दिवस कडवी लढत दिली. पण अखेर तालिबान्यांनी त्यांना पकडले. अजूनपर्यँत त्यांची खबरबात नाही. पण त्यांना मारण्यात आले असावे, असा त्यांच्या समर्थकांचा कयास आहे. तसे झाले असेल अफगणिस्तानने खरेच संरक्षण, शांतता गमावली असे म्हणावे लागेल. नाही का?

Friday, 27 August 2021

सुवर्ण स्वप्नांचा साधक

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मोठे यश मिळवले. या यशाचा पाया चार दशकांपूर्वी रचणारे ओ. एम. नांबियार यांचे नुकतेच निधन झाले. भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा यांचे ते गुरु होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उषा यांची कारकीर्द बहरली. १९८२च्या एशियाडमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले. अशा या दिग्गज नांबियार यांच्या जाण्याने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त होणे साहजिक आहेच. पण नांबियार यांनी केवळ पी. टी. उषा यांचे जीवन घडवले नाही. तर भारतीय खेळ जगात एक खळखळता प्रवाह निर्माण केला. देशातील तरुणाईला एक नवी दिशा दिली. भारत म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे भारत असे समीकरण असले तरी इतर खेळांकडेही मुलांनी वळले पाहिजे. विशेषत: वेगात, विशिष्ट दिशा पकडून धावणे हे देखील एक क्रीडा कौशल्य आहे, असे नांबियार मानत. त्याचा हिरीरीने प्रचार करत. टोकियोतील सुवर्णयशाचा पाया त्यांनीच रचला. महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम धावपटू होते. हवाईदलात पंधरा वर्षे नोकरी करताना अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवली. जगातील उत्तम वेगवान धावपटू होण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, प्रशिक्षक झाल्यावर उषा यांच्या रुपात त्यांनी साकार करून घेतले. त्यावेळी त्यांनी स्वत: तिरुवअनंतपुरम येथील एका शिबिरात उषा यांची भारतीय संघात निवड केली. चार वर्षे कठोर परिश्रम घेतले. शिष्यातील अंगभूत कौशल्याला पैलू पाडणे. त्याला अचूक दिशा देणे हीच गुरुची शक्ती असते. नांबियार अशा शक्तीशाली गुरुंपैकी एक होते. यापुढे देशातील प्रत्येक गावात जागतिक दर्जाचे धावपटू तयार होणे. त्यासाठी सरकारी पातळीवर अनेक दिशांनी प्रयत्न करणे, हा नांबियारांची शक्ती, स्मृती जागृत ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे.

Thursday, 19 August 2021

सरोज नावाची खाण

काळाचा प्रवाह मोठा गतिमान, सगळं काही सोबत वाहून नेणारा आहे. कालपर्यंत आपल्यासोबतचा माणूस अचानक निघून जातो. काही दिवस त्याची आठवण टोचत राहते. हळूहळू ती टोचणी बोथट होत जाते. एक दिवस टोचणीच गायब होऊन जाते. पण ती व्यक्ती कर्तृत्ववान असेल तर तिची आठवण येत राहते. रितेपणा, कमतरता जाणवते. भारतीय सिनेमासृष्टीवर जवळपास ४० वर्षे राज्य गाजवणाऱ्या नृत्य दिग्दर्शक सरोज खान अशा व्यक्तींपैकीच एक. वर्षभरापूर्वी ३ जुलैला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोरोनाने या उर्जावान महिलेला आपल्यातून हिरावून नेले. त्या वेळी निर्बंध काटेकोर होते. मृत्यू वाढत असल्याने भारतीय जनमानस भयभीत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याची, कर्तृत्वाची अपेक्षित नोंद झालीच नाही. एखाद्या राजा, सम्राटाचा सुवर्णकाळ असतो. तसा प्रत्येकाचा काही वर्षांचा काळ असतो. अगदी व्यवसाय, उद्योग, कलेचाही असतो. अगदी अलिकडील उदाहरण द्यायचे झाले तर स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, पंडित नेहरू, मोहंमद अली जिना आदी बॅरिस्टर होते. त्यांना पाहून अनेकजण वकिली व्यवसायात गेले. आता मुले डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी धावत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी सिनेमा-नाटकात काम करणे म्हणजे वेडेपणा, वाया जाणे समजले जात होते. आता काय स्थिती आहे, ते तुम्ही पाहतच आहात. तर मुद्दा असा आहे की, प्रत्येक क्षेत्राचा एक काळ येतो. त्यासाठी एखादी व्यक्ती कारणीभूत असते. प्रचंड मेहनत, असामान्य प्रतिभा, नाविन्याची ओढ आणि इतरांना उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता असलेले नेतृत्व अशा गुणांचा संगम या व्यक्तीत असतो. सरोज खान यांनी हिंदी सिनेमातील अत्यंत महत्वाच्या पण तरीही दुर्लक्षित अशा नृत्याला सुवर्णाची झळाळी मिळवून दिली. गाण्याचे शब्द, संगीताइतकाच पावलांचा ठेका, चेहऱ्यावरील हावभावालाही महत्व असते, हे त्यांनी सांगितले. कधीकधी तर शब्द, संगीताची कमतरता नृत्य भरून काढू शकते याची अनेक उदाहरणे सादर केली. सरोज नावाच्या या खाणीमुळे जगाला एकापेक्षा एक सरस नृत्य रत्ने पाहण्यास मिळाली. मूळ नाव निर्मला नागपाल असलेल्या सरोज खान यांचे व्यक्तिगत जीवन एखाद्या कथानकासारखेच. अवघे तेरा वर्ष वय असताना त्या ४१ वर्षांचे डान्स मास्टर सोहनलाल यांच्या प्रेमात पडल्या. ते आधीच विवाहित आहेत हे त्यांनी सरोज यांना सांगितले नाही. जेव्हा कळाले तोपर्यंत तीन मुले पदरात पडली होती. अल्प शिक्षणामुळे पोटापाण्यासाठी हातपाय हलवणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून समूह नृत्यात पाय थिरकवणे सुरू केले. पण म्हणतात ना, तुमच्यात उच्च दर्जाची प्रतिभा असेल तर तुम्ही ठरवले तरी लपून राहू शकत नाही. सरोज यांचे तसेच झाले. ‘गीता मेरा नाम’ सिनेमात त्यांना पहिल्यांदा नृत्य दिग्दर्शक म्हणून संधी मिळाली. आणि त्यानंतर त्यांना वळून पाहण्याची गरज पडली नाही. अगदी ठोकळा असलेल्या नट-नट्यांचे चेहरे त्यांनी बोलके केले. त्यांना थिरकणे शिकवले. आणि त्यांचे थिरकणे लोकांना आवडेल इथपर्यंत नेऊन ठेवले. महानायक अमिताभ बच्चन सरोज यांच्याविषयीच्या एका आठवणीत सांगतात की, सत्तरच्या दशकात मुमताज नृत्याची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री होत्या. एका सिनेमात त्यांच्यामागे गर्दीत सरोज नाचत होत्या. त्यात एक क्षण असा आला की मुमताज यांच्याऐवजी सरोज लक्ष वेधत होत्या. बच्चन यांची ही आठवण या महान नृत्य दिग्दर्शिकेची ताकद सांगणारी आहे. एकेकाळच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांनीही सरोज यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त सांगितलं की, त्यांचे जीवन नृत्यासाठी पूर्ण जीवन समर्पित होते. अचूकता हा त्यांचा प्राण होता. सहजसोप्या पदन्यास असताच कामा नये, असे त्यांचे ठाम मत होते. देवदास सिनेमातील ‘मार डाला’ गीतातील एका ठेक्यावर चेहऱ्यावरील भाव सहा प्रकारे दाखवला जावा, असा त्यांचा आग्रह होता. तो हळूहळू त्यांनी निग्रहात रुपांतरित केला. आणि एक अख्खी रात्र केवळ सहा भावमुद्रांचे चित्रीकरण करण्यात आले. अशी जिद्द, चिकाटी आणि नवे काही करण्याचा ध्यास असेल तरच कोणत्याही क्षेत्रात अत्युच्च स्थानावर जाता येते. प्रदीर्घ काळ टिकता येते. हाच सरोज नामक अमूल्य खाणीच्या जीवनाचा संदेश आहे.

लपून – छपून … जपून

गुंड, दरोडेखोर, उतल्या-मातल्यांवर कारवाईसाठी एकेकाळी राजा, महाराजांचे सैनिक असत. इंग्रजांनी राजा-महाराजांची संस्थाने खालसा केल्यावर सैनिकांच्या जागेवर पोलिस नावाची यंत्रणा उभी केली. भारतीय माणसाला दंडुका हाणत, शिवीगाळ करत नियंत्रणामध्ये ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली. पुढे इंग्रज गेले. पण त्यांनी केलेला पोलिसी कायदा आणि पोलिस दोघेही राहिले. आधीपेक्षाही जास्त दिमाखात झळकू लागले. थोडा फरक असा पडला की, हे पोलिस सरसकट दंडुका हाणत, दरडावत नाहीत. फक्त गोरगरिब, लाचार, सामान्य, मध्यममार्गी असला तरच त्याचा मनसोक्त छळ करतात. मारहाण तर करतातच. शिवाय तक्रार करणारा आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा दोघांकडूनही पैसे काढतात. सामान्य माणसाचा तसा रोज फक्त रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या किंवा वाहतूक पोलिस हवालदाराशी संबंध येतो. यातील बहुतांशजण कमालीचे उद्धटपणे, एकेरी बोलतात. छळ करतात. पण उपद्रवी, गुंड मंडळी, राजकारण्यांपुढे ते निमूटपणे शरणागती पत्करतात. त्यामुळे एकूणच पोलिसांविषयी सामान्य भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. समूह किंवा व्यवस्थेचा भाग म्हणून पोलिस आवश्यक असले तरी संकटकाळी ते खरेच, निस्वार्थीपणे आपल्या मदतीला येतील, याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही. तरीही … तरीही पोलिसांविषयी आपुलकी, अभिमान असणारा एक वर्ग आहेच. कारण सगळीच पोलिस मंडळी भ्रष्टाचाराच्या तलावात बुडालेली नाहीत. बोटावर मोजण्याइतके अपवाद आहेत. त्यांच्यामुळे एवढ्या बिकट स्थितीतही पोलिसांविषयी किंचित सन्मानाची भावना आहे. अशा सन्माननीय अधिकाऱ्यांत मीरां चढ्ढा – बोरवणकर आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख, पुणे पोलिस आयुक्त आणि सीबीआयच्या विविध विभागांत काम केलेल्या बोरवणकर महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या घटना-घडामोडींच्या साक्षीदार आहेत. शेकडो गुन्ह्यांची उकल त्यांनी केली आहे. पुरुषी मानसिकता ठासून भरलेल्या पोलिस दलात त्यांनी एक शिस्तशीर, कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. क्लिष्ट, तणावपूर्ण प्रसंग धीरोदात्तपणे हाताळण्याचा एक मानदंड त्यांनी तयार केला. त्यांच्याभोवती एक आदर, दराऱ्याचे वलय निर्माण झाले आहे. त्यांच्याप्रमाणे पोलिस सेवेत दाखल होण्याचे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. हिंदी, दक्षिणी मसाला सिनेमात दिसणाऱ्या सिंघम, सिंबाच्या थ्रील, मस्तीचे आकर्षण तरुणाईला असते. अशा सर्वांसाठी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेले ‘इन्सपेक्टर चौगुले’ हे पुस्तक वास्तववादी गाईडलाईन ठरते. कारण यात त्यांनी पोलिसांचे जीवन प्रत्यक्षात कसे असते. काही गुन्ह्यांची उकल कशी होते. त्यात कागदोपत्री पुरावे, मांडणी किती महत्वाची असते. एखादा गुन्ह्याची वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याची कशी दखल घेतात. काय विचार करत परिस्थिती हाताळतात. राजकारण्यांचा त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप कसा होतो, याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. थोडासा यासाठी म्हणावे लागते कारण पुस्तकातील पंचवीसपैकी बहुतांश प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी आरोपी, गुन्हेगारांची नावे सांगणे टाळले आहे. जे काही सांगायचे आहे ते लपून-छपून आणि जपून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कदाचित कायदेशीर कारवाईची कटकट किंवा वादविवाद नको म्हणून त्यांनी असे केले असावे. हे वगळता सर्व प्रकरणे बऱ्यापैकी रोचक माहिती देतात. बोरवणकर यांनी एकाही घटनेला मसाला किंवा रंजकतेचा लेप लावलेला नाही. आपल्या आयुष्यातील अनुभव सहजपणे सांगत आहे. त्यातून वाचकाने त्याला जे हवे ते टिपून घ्यावे, असा त्यांचा सरळसरळ दृष्टीकोन दिसतो. त्यासाठी त्यांनी दक्षता या एकेकाळी गाजलेल्या मासिकाला शोभेल अशी पोलिस निरीक्षक चौगुले नावाची व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. खरेतर पोलिस दलात दीर्घकाळ काम केलेल्या बोरवणकर यांच्यासारख्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पुस्तकातून काहीतरी खळबळजनक, वादग्रस्त सांगावे. कोणाचा तरी थेट बुरखा फाडावा, अशी अनेकांची अपेक्षा असेल. एक पुसटसा अपवाद वगळता ती यात पूर्ण होत नाही. त्या अपवादात्मक प्रकरणात म्हटले आहे की, माजी केंद्रीय मंत्र्यावर त्याच्या भावाने गोळ्या झाडल्या. कारण त्याला आदराची वागणूक मिळत नव्हती. ‘अगदी त्यांची आईसुद्धा लहानपणापासून त्यांच्यामध्ये भेदभाव करायची.’ एवढे वाक्य वगळता अन्य कुठेही स्फोटक किंवा भुवया उंचाव्यात अशा माहितीला थारा नाही. म्हणून सायली पेंडसे यांनी मराठीत छानपणे अनुवादित केलेले विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे हे पुस्तक पोलिसी सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तसेच पोलिस आपल्यापासून दूरच बरे असे वाटणाऱ्यांसाठीही वाचनीय आहे.

Monday, 26 July 2021

महिला संत : महती ते शक्ती

पंढरपूरची वारी म्हटलं की, डोळ्यासमोर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला वारकऱ्यांचा महापूर येतो. डोळ्यात देव भेटीची आस दाटलेले, भक्तीरसात न्हाऊन निघालेले वारकरी म्हणजे आषाढी एकादशी असे चित्र डोळ्यासमोर येते. महान मराठी संतांनी ही परंपरा सुरू केली. त्यात विलक्षण सत्व असल्याने शेकडो वर्षे उलटून गेल्यावरही त्यात खंड पडलेला नाही. त्याचे एक कारण या परंपरेला मिळालेले महिला वर्गाचे बळ हेही आहे. पुरुषांइतक्याच कदाचित काकणभर अधिक श्रद्धेने महिलाही वारीमध्ये सहभागी होतात. मात्र, संतांची भूमी असलेल्या भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला संतांची संख्या मोजकीच आहे. पूर्वीच्या पुरुषी वर्चस्वामुळे महिलांमधील भक्तीभाव बाजूला सारला गेला असावा. तरीही त्या काळची समाजव्यवस्था, दडपण बाजूला सारत महिला संत उदयास आल्या. देवभक्तीची एक निराळी परंपरा त्यांनीही विकसित केली. समाजमन घडवण्याचे काम त्यांनीही मोठ्या हिरीरीने केले. त्यापैकी काहीजणींची माहिती पुस्तक रुपात उपलब्ध आहे. काहीजणींच्या जीवनकार्याचे उल्लेख टीव्हीवरील मालिकांमध्ये अधूनमधून येत असतात. पण नव्या पिढी पुस्तकांपासून काहीशी दुरावलेली आहे. मालिका पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतोच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन व्रिशाली गोटखिंडीकर यांनी संतश्रेष्ठ महिला ही वीस भागांची मालिका मातृभारती बेवसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. ती इंटरनेटची सहजपणे हाताळणी करणाऱ्या आणि जिज्ञासू पिढीसाठी उपयुक्त आहे. ही पण एक प्रकारे वारकरी सेवाच आहे. संतांविषयीचा ठेवा तरुण पिढीला दिला आहे. संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई अशा अनेक थोर महिलांची महती, शक्ती या मालिकेतून त्यांनी मांडली आहे. गोटखिंडीकर यांचे अध्यात्मिक लेखन विपुल आहे. दत्त अवतार, नवदुर्गा, महती शक्तीपीठांची, नवनाथ महात्म्य, नर्मदा परिक्रमा, हरतालिका अशा विविध विषयांवर त्यांनी लिहिले आहेच. शिवाय पुनर्भेट, प्रारब्ध, अघटित, अचानक, अतर्क्य, सुनयना, चित्रकार, माणसांच्या गोष्टी, बँक डायरी ३२४ कथा, २५ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहे. वेबसाईटवर पीडीएफ रुपातील हे सारे साहित्य पाहून आपण थक्क होतो. संतश्रेष्ठ महिला या वीस भागांच्या मालिकेत गोटखिंडीकर यांनी जे म्हटले ते महत्वाचे आहे. त्या लिहितात की, माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही. देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेण्यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो. हे काम संत करीत असतात. संकटाशी सामना करू शकणारा समाज घडवण्यासाठी संत पुढाकार घेत असतात. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसह अनेक संत या मातीत जन्मले. परंतु पुरुष संतांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी, अशी अनेकांच्या मनातील खंत गोटखिंडीकरही व्यक्त करतात. या मालिकेतील एकेका भागात त्यांनी महिला संतांची महती, कर्तृत्व अतिशय साध्या, सोप्या भाषेत सांगितले आहे. काही ठिकाणी या संतांच्या जीवनातील प्रसंग रंजकपणे पेरले आहेत. मांडणीची विशिष्ट अशी पारंपारिक चौकट त्यांनी स्वीकारलेली नाही. शब्दांमध्ये कुठेही क्लिष्टता नाही. महिला संतांच्या अभंग रचना, समाजमनावर केलेला परिणाम आणि आता आपण त्यांच्याकडून नेमके काय शिकू शकतो, याची माहिती त्या ओघवत्या, दार्शनिक रुपात देतात. उदाहरणार्थ संत मुक्ताबाईंविषयी त्या म्हणतात की, गोरक्षनाथांच्या कृपेचाही मुक्ताबाईंवर वर्षाव झाला होता. या कृपेनंतरच मुक्ताबाईंना “अमृत संजीवनीची” प्राप्ती झाल्याचे सांगितले जाते. समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपुर्ण अशी मुक्ताबाईंची अभंग निर्मीती आहे. मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणुन आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. संत मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी गेल्या. विवेकबुद्धी तर मुक्ताबाईंकडे अत्यंत दृढ होती. म्हणूनच समाजाकडून होणारा अपमान सहन न होऊन ज्ञानेश्वर जेव्हा पर्णकुटीचे दार (ताटी) बंद करून ध्यानस्थ बसले. तेव्हा मुक्ताबाईंनीच त्यांना आर्त हाक दिली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या संत जनाबाई यांच्या आई-वडिलांविषयीही एका अभंगातून शोधलेला धागा त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत वेणाबाई यांच्या अभंग रचनातील भावार्थही त्यांनी उलगडून सांगितला आहे. संत बहिणाबाईंचे अभंग अनुप्रास, यमक, अनन्वय अशा अनेक अलंकारांनी नटले आहेत. करूण, वत्सल, हास्य, भयानक, अद्भुत, वीर आणि भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत, असे त्या सांगतात. केवळ मराठीच नव्हे तर इतर प्रांतातील महिला संतांची महतीही मालिकेत वाचण्यास मिळते. त्यामुळे ही मालिका अधिक व्यापक आणि भक्तीचा विचार विस्तारणारी झाली आहे.

Tuesday, 6 July 2021

गौरींचा गौरव

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी, अभिनेते दादासाहेब फाळकेंनी १९१२ मध्ये भारतीय सिनेमाचा पाया रचला. तेव्हा रुपेरी पडद्यावर महिलांचे येणे अत्यंत दुर्मिळ होते. त्यामुळे त्यांच्या राजा हरिश्चंद्र या पहिल्या सिनेमात पुरुषांनीच महिलांच्या भूमिका केल्या होत्या. आज २०२१ म्हणजे १०९ वर्षे होत आहेत. या काळात शेकडो, हजारो तारका पडद्यावर आल्या. काही प्रखरतेने चमकल्या. काहींनी मंद का होईना प्रकाश दिला. रसिकांचे मनोरंजन केले. अभिनयाने सिनेमाची दुनिया चमकदार केली. त्यात मराठी तारकांचे मोठे योगदान आहे. मधला काही काळ वगळला तर आज मराठीचा हिंदी सिनेमातही मोठा दबदबा आहे. पण महिला जगतापुरते पाहिले तर १०९ वर्षांच्या इतिहासात मराठीपणाची तटबंदी ओलांडून हिंदीमध्ये ठसा उमटवणाऱ्या मराठी दिग्दर्शिका अत्यंत मोजक्याच आहेत. त्या मोजक्यांमध्ये गौरी शिंदे आहेत. म्हणजे आपण अगदी गेल्या काही दशकांची पाने चाळून पाहिली तर असे लक्षात येते की सई परांजपेंनंतर थेट गौरी शिंदेंचे नाव येते. एक विलक्षण प्रतिभावान, नवीन काही करू पाहणारी, प्रेक्षकांना बांधून ठेवणारी दिग्दर्शिका अशी गौरी यांची ओळख केवळ दोन सिनेमांत झाली आहे. तेही सिनेमा इंडस्ट्रीचा वारसा पाठिशी नसताना. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ६ जुलै १९७४ रोजी जन्मलेल्या गौरी यांनी सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिम्बॉयसिस विद्यापीठात मास कम्युनिकेशन विषयात पदवी मिळवली. त्याच काळात त्यांच्या सिनेमाविषयी आकर्षण निर्माण झाले. पण तिथला दरवाजा कसा उघडेल, असा प्रश्न होता. म्हणून त्या जाहिरात संस्थेत क्रिएटीव्ह कॉपीरायटर म्हणून काम करू लागल्या. तेथे त्यांचा पुढे प्रख्यात सिने दिग्दर्शक झालेले आणि कॉपीरायटर म्हणून काम करणारे आर. बाल्की यांच्याशी परिचय झाला. त्यांच्याशी क्रिएटीव्ह चर्चा करताना गौरी यांना ‘ओह मॅन’ या शॉर्ट फिल्मची कल्पना सुचली. बाल्कींच्या पाठिंब्याने त्यांनी ती दिग्दर्शित केली. ही शॉर्ट फिल्म २००१मध्ये बर्लिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवडली गेली. त्यामुळे समांतर सिनेजगतात त्यांच्या नावाला छोटेसे का होईना वलय प्राप्त झाले. पण त्या पुढे फारसे काही घडले नाही. अगदी जवळपास दहा वर्षे सामसूम होती. आणि २०१२ मध्ये गौरी शिंदे हे नाव भारतातील प्रत्येक रसिकाच्या तोंडावर आले. कारण होते श्रीदेवींचे पुनरागमन. होय. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी प्रदीर्घ कालखंडानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार, अशा बातम्या मिडिआमधून येऊ लागल्या. पहिल्यांदा अशी चर्चा होती की, कोणीतरी बडा दिग्दर्शक आहे. कोण असावा तो या विषयीचे कयास बांधले जाऊ लागले. आणि एक दिवस अचानकपणे लेखिका, दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदे यांचे नाव आले. ते पाहून जवळपास सर्वांनाच धक्का बसला. श्रीदेवींनी नवख्या, मराठी मुलीच्या दिग्दर्शनात काम करण्याचे का ठरवले असावे, याबद्दल उलट सुलट बोलले गेले. अगदी सिनेमा पडावा, म्हणून ग्लॅमरस व्यक्तिमत्वाच्या गौरींच्या हातात सूत्रे दिली, इथपर्यंत म्हटले गेले. पण इंग्लिश विंग्लिश २०१२ मध्ये पडद्यावर आला आणि अक्षरश: रातोरात गौरी स्टार झाल्या. त्यांच्यातील दिग्दर्शन कौशल्याच्या तारिफीने रकानेच्या रकाने भरू लागले. टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ला परदेशी रसिकांनीही डोक्यावर घेतले. श्रीदेवींच्या अभिनयाइतकेच किंबहुना काकणभर जास्त गौरींच्या दिग्दर्शनाचे कौतुक झाले. फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शिकेचा पुरस्कार मिळाला. पण त्या इंग्लिश विंग्लिशवर थांबल्या नाहीत. त्यांनी शाहरूख खान, अलिया भट यांना घेऊन ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातून तरुण आणि मध्यमवर्गीय पिढीला साद घातली. त्यांचे म्हणणे आहे की, खरेतर कोणतीही गोष्ट तुम्ही महिलेच्या नजरेतून पाहिली तर त्यात एक वेगळेच स्वारस्य निर्माण होत असते. बहुतांश वेळा सिनेमाची कहाणी महिलांच्या दृष्टीकोनातून पडद्यावर मांडलीच जात नाही. आणि मला मानवी भावभावनांविषयी काहीतरी विलक्षण, वेगळं सांगायला खूप आवडतं. मला जे आवडतं तेच मी करते. मी त्यासाठीच सिनेमात आले आहे. आता कोरोनामुळे थिएटरच्या सिनेमाचे जग आक्रसले असले तरी सिनेमा जगभर पोहोचवणारे जग खूप विस्तारले आहे. त्यामुळे गौरींच्या पाऊलवाटेवर मराठी मुली चालू लागल्या तर हिंदीच काय इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनातही मराठी महिलांची प्रतिभा सिद्ध होईल.

Tuesday, 22 June 2021

चक्रीवादळी नीना

‘आँ ... काय सांगताय’, ‘खरंच की काय’, ‘अरे बापरे ... भयंकरच आहे हे’, ‘कठीण आहे, यावर विश्वास ठेवणं’, ‘खूपच धाडसी आहे ती. तिला हवं ते मिळवलंय तिनं’ असे उद्गार १९८९ मध्ये पहिल्यांदा ही बातमी कानावर पडली तेव्हा लोक बोलत होते. समांतर सिनेमा जगात रमलेली आणि क्रिकेटवाली मंडळी त्यात आघाडीवर होती. पेप्रांचे कॉलमच्या कॉलम तिच्या त्या बातमीनं भरून गेले होते. त्या घटनेला ३२ वर्षे उलटून गेली तरी ती अजूनही प्रसारमाध्यमांची आवडती आहे. तिच्यासोबतच्या, तिच्यापेक्षाही अधिक चमकणाऱ्या अनेक तारका मागे पडल्या, लपल्या. काही संपूनही गेल्या. पण तिच्या नावावरील बातम्या विकल्या, वाचल्या, पाहिल्या जात आहेत. कोणालाही हेवा वाटावा अशा प्रसिद्धीच्या लाटेवर ती कायम आहे. तरीही ... तरीही ती काहीशी आंतरिक दुखावलेली, स्वतःपासूनच दुरावलेली आहे. आपल्याला जे हवं ते आपण हट्टानं, धाडसानं मिळवलं. पण ते आपल्याजवळ आपल्याला हवं तसं का राहिलं नाहीॽ आपलं काय चुकलंॽ असे प्रश्न तिला पडले आहेत. पडद्यावर सहनायिकेच्या भूमिकेत राहूनही बंडखोर नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या आहेत नीना गुप्ता. ६२ वर्षांच्या जीवनात जे काही अनुभवलं, पाहिलं, जाणून-समजून घेतलं ते त्यांनी ‘सच कहूँ तो’ पुस्तकात मांडलंय. १४ जून रोजी या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झालंय. त्यामुळं त्यांच्यावरील प्रसिद्धीचा झोत आणखी प्रखर झालाय. १९८०च्या दशकातील क्रिकेट जगताचे अनभिषिक्त सम्राट सर व्हिव्हियन रिचर्डससोबत नीनांनी संबंध प्रस्थापित केले. त्या संबंधातून १९८९ मुलीला म्हणजे मसाबाला जन्म दिला. ‘होय, मी लग्नाविना मूल मिळवलं’ असं धाडसानं जगाला सांगितलं. लिव्ह इन रिलेशनशिप, एकल महिलांना समजून घेणं. त्यांच्याविषयी किंचित का होईना सन्मानाची भावना ठेवणं हळूहळू सुरू होतंय. तरीही ती घटना भारतीय समाजातील प्रचंड मोठ्या वर्गाला धक्कादायक वाटते. त्या काळी तर भूकंपच झाला. काही व्यक्ती वादळी तर काही चक्रीवादळासारख्या असतात. त्या स्वतःभोवतीच धुळ उडवत फिरत राहतात. त्यातून त्यांना किनाऱ्यावर आदळल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. नीना अशाच चक्रीवादळी. ४ जुलै १९५९ रोजी दिल्लीत जन्मलेल्या, संस्कृत भाषेत मास्टर्स, एम.फिल. केलेल्या नीनांनी या आत्मचरित्रात्मक पुस्तकात भूकंपाचे अनेक हादरे दिले आहेत. काही रहस्येही सांगितली आहेत. त्यातील काही चक्रावून टाकणारी आहेत. त्यांनी सांगितलंय की, रिचर्डसकडून होणाऱ्या बालकाला बाप म्हणून कोणाचं नाव लावावं, असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा प्रख्यात सिनेमा दिग्दर्शक, सतीश कौशिक यांनी त्यांच्याशी विवाहाची तयारी दाखवली होती. बाळ कृष्णवर्णीय जन्माला आलं तर ते सतीश कौशिककडून झालंय, असं तु जगाला सांगू शकतील, असा कौशिकांचं म्हणणं होतं. पण रिचर्डसशिवाय कोणालाही आयुष्यात प्रवेश द्यायचाच नाही, असं त्यावेळी ठरवलं होतं. त्यामुळं त्यांनी कौशिकांचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढं मसाबाचा जन्म झाल्यावर लग्नाविना मूल जन्माला घालणारी महिला असं म्हणून त्यांना सिनेमात निगेटीव्ह भूमिकाच ऑफर होऊ लागल्या. आणि सिनेमातील पुरोगामींचा एक वेगळा चेहरा त्यांच्यासमोर आला. एकट्याने राहणे शक्यच नाही, असे लक्षात आल्यावर नीनांनी विवेक मेहरांशी वयाच्या पन्नाशीत लग्नही केलं. अर्थात मसाबाला विश्वासात घेऊन. तिनं होकार दिल्यावरच. पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी प्रख्यात अभिनेत्री करीना खान कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत नीना सांगतात की, तसं तर मी गेल्या २० वर्षांपासून पुस्तक लिहण्याची तयारी करत होते. पण कोरोनाचं संकट आल्यावर उत्तराखंडातील एका गावात राहण्यास गेल्यावर बरंच लिखाण केलं. त्या वेळी मला जाणिव झाली की, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळात माझा कोणी प्रियकर नव्हता. मी पतीविना होते. काही प्रेमप्रकरणं झाली. पण त्यातील एकही पूर्णत्वाला गेलं नाही. एक लग्न आई-वडिलांनी ठरवलं. पण शेवटच्या क्षणी मुलानं नकार दिला. लग्न मोडलं. एकूणात मी पूर्णपणे एकटीच राहिले. या पुस्तकात नीनांनी त्यांचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षण, मुंबईच्या सिनेजगतातील संघर्ष, यश, राजकारण, काम मिळवून देण्यासाठी लैंगिक शोषण अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या वाचकांना निश्चितच सिनेमावाल्यांचा आणखी एक चेहरा दाखवतील. चेहऱ्यावरील एक बुरखा हटवतील. या निमित्ताने एकाकी चक्रीवादळाचं विचार, अनुभवविश्वही समजेल.